जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
नाना पाटेकर लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत
पंडित, (डॉ.) अनला
कोणत्याही खासगी अथवा सार्वजनिक कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या यंत्रणेने आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहिती साठय़ाचा योग्य उपयोग करून घेतल्यास त्याचा कंपनीच्या विकासासाठी मोठा फायदा होऊ शकतो; पण त्यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांना आपल्याच कंपनीमध्ये उपलब्ध असलेल्या या माहितीचा कसा शोध घ्यायचा याचे प्रशिक्षण दिले जाणे आवश्यक असते. किंबहुना ही माहिती कशी जमा करावी, त्याचा उपयोग कसा करावा याबाबतचा खास अभ्यासक्रम असेल तर त्याचा मोठाच फायदा होऊ शकतो.
‘वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिटय़ूट’च्या (व्हीजेटीआय) सहाय्यक प्राध्यापिका अनला पंडित यांनी ‘आयबीएम’ या जगविख्यात संगणक कंपनीला अशा माहितीचा उपयोग करून घेणारा ‘कॉम्पिटिटिव्ह इंटलिजन्स यूजिंग बिझनेस अॅनॅलिसिस’ हा प्रोजेक्ट सादर केला. पंडित यांचा हाच प्रोजेक्ट ‘आयबीएम’च्या दहा हजार डॉलर्सच्या (सुमारे साडेचार लाख रुपये) ‘सर्जनशील शिक्षक पुरस्काराचा’ मानकरी ठरला आहे. जगभरातून २०४ तर भारतातून अवघ्या सहा जणांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती, त्यात पंडित एक होत्या. ‘आयबीएम’ने दिलेल्या या रकमेतून आता पंडित ‘व्हीजेटीआय’मध्ये हा प्रोजेक्ट प्रत्यक्ष राबविणार आहेत. कोणत्याही प्रोजेक्टसाठी, संशोधन कार्यासाठी एखाद्या कंपनीकडून अशा प्रकारचा पुरस्कार मिळणे ही त्या शिक्षकासाठी व संबंधित महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब असते. सायन येथील ‘एसआयईएस’ महाविद्यालयातून त्यांनी १९८१ मध्ये बीएस्सी तर १९८३ साली मुंबई विद्यापीठातून एमएस्सी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी अमेरिकेत ‘युनिव्हर्सिटी ऑफ लुईविल’मध्ये दोन वर्षांचा एमएस इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग हा (एमटेक समकक्ष) अभ्यासक्रम पूर्ण केला. पंडित यांच्या आई शिक्षिका तर वडील महापालिकेमध्ये नोकरी करणारे. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे उच्चशिक्षण शक्य झाले. ८५ साली शिक्षण पूर्ण करून त्या मुंबईस परतल्या आणि वाटुमल अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्यात्या म्हणून रुजू झाल्या. विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरचे शिक्षण द्यायचे, त्यांना संशोधनासाठी प्रवृत्त करायचे, पुस्तकी शिक्षणाबरोबरच समाजासोबत जोडून घ्यायला प्रवृत्त करायचे या हेतूने त्यांनी विविध उपक्रम महाविद्यालयात सुरू केले. पती अनिरूद्ध हे ‘आयसीटी’मध्ये (यूआयसीटी) प्राध्यापक, तर सासरे भालचंद्र पंडित हेसुद्धा शिक्षकच. त्या दोघांचे अनेक बाबतींत मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांना लाभले. सुमारे साडेतीन वर्षांच्या सेवेनंतर काही कारणास्तव त्यांनी वाटूमल महाविद्यालयातील नोकरीचा राजीनामा दिला आणि क्रॉम्प्टन या खासगी कंपनीत त्या ‘कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह’ पदावर रूजू झाल्या. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन वरिष्ठांनी प्रोबेशन काळातच त्यांना बढती दिली. मात्र तीन-चार वर्षे हे काम केल्यानंतर पुन्हा शिक्षकी पेशात यायचा निर्णय त्यांनी घेतला. १९९४ ते ९९ या काळात त्यांनी रिझवी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, व्हीजेटीआय, एमईटी या महाविद्यालयांमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम केले. २००० मध्ये त्यांना व्हीजेटीआयमध्येच पूर्णवेळ व्याख्याता होण्याची संधी मिळाली. त्यांच्या कामाचा व्याप आता रेडिफ, आयबीएम, सिटी बँक अशा विविध कंपन्याच्या कर्मचाऱ्यापर्यंत जाऊन पोचला आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या काही पुरस्कारांच्या मानकरीही त्या ठरल्या आहेत. त्यांना पीएच.डी.साठी अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ लुईविल’ येथे पाठविण्याचा निर्णय व्हीजेटीआयने घेतला आहे. ऑगस्टमध्ये त्या अमेरिकेला जाणार आहेत, त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा.
ज्येष्ठ गायिका आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म ११ मे १९१४ रोजी गोव्यातील बांदिवडे गावी झाला.
आपल्या अथक परिश्रमांच्या बळावर ज्यांनी ‘स्वरज्योत्स्ना’ असं नावं मिळवलं.
त्या गायला लागल्या, की वाद्यं आपोआप झंकारायला लागत, असं म्हटलं जात असे. गायिका म्हणूनच नव्हे, तर अभिनेत्री म्हणूनही नाव कमावलेल्या जुन्या पिढीतील कलावंत ज्योत्स्ना भोळे.
ज्योत्स्ना भोळे यांना अभिनया प्रमाणे आवाजाची दैवी देणगी होती. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा खास आवाज होता. ज्योत्स्ना केशव भोळे या पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळेकर होत. त्यांचा जन्म गोव्यातल्या बांदिवडे या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव वामन केळेकर होते. एकूण चौदा भावंडांपैकी त्या एक होत्या. त्यांना गाण्याचे उपजतच अंग आणि फार वेड होते.
वयाच्या आठव्या वर्षी पहिल्या दोन इयत्ता बांदिवड्याच्या शाळेत पूर्ण करून दुर्गा आपल्या थोरल्या गायिका भगिनी गिरिजाबाई यांच्यासह मुंबईत वास्तव्यास आल्या. संगीत शिक्षणासाठी मुंबईस येणे भागच होते. त्या लॅमिंग्टन रोडवर राहत असत व तिथल्याच महानगरपालिकेच्या शाळेत त्यांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतले. संगीत हेच मुख्य ध्येय असल्याने त्यांनी शाळा सोडली.
गिरिजाबाई आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गवई खाँसाहेब विलायत हुसेन यांच्याकडे तालीम घेत असत. ज्योत्स्नाबाईही आग्रा घराण्याचे खादिम हुसेन खाँ यांची तालीम घेऊ लागल्या. मुंबईत शालेय, आंतरशालेय गायनस्पर्धांमध्ये नेहमीच पहिला नंबर पटकावून त्यांचे बरेच नाव झाले होते. ‘बॉम्बे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ या आकाशवाणीवर ज्योत्स्नाबाई महिन्यातून तीन-चार वेळा गात असत. बालगायिका म्हणून त्या खूपच प्रसिद्ध झाल्या. तेराव्या-चौदाव्या वर्षापर्यंत त्या रागदारी संगीतातही उत्तमपणे पारंगत झाल्या.
याच सुमारास महाराष्ट्रात, खास करून मुंबईत काव्यगायन, त्यातूनच निर्माण होऊ पाहणारे ‘भावगीत’ हा गानप्रकार मूळ धरू लागला होता. केशवराव भोळे हे यात अग्रेसर असून, भावगीत गायक म्हणून संगीत शौकिनांमध्ये चांगलेच प्रसिद्ध व लोकप्रिय होते. त्यांच्या नाट्यपदांनी त्यांनी अगोदरच नाव मिळविले होते. केशव ‘एकलव्य’ या टोपणनावाने संगीतावर समीक्षापर लेखनही करीत होते. त्यामुळे याही क्षेत्रात त्यांच्या नावाची खूप चर्चा होती.
ज्योत्स्नाबाईंचा भाऊ रामराय हा केशवराव भोळ्यांचा मित्र व चहाता होता. त्याने केशवराव भोळ्यांना आपल्या बहिणीला भावगीत शिकवण्याची विनंती केली. या वेगळ्याच, नवीन व सुंदर गानप्रकाराचे ज्योत्स्नाबाईंना वेडच लागले. मनापासून, लक्षपूर्वक शिकून घेऊन त्यांनी ‘भावगीत’ आत्मसात केले. गाण्यातले भावनेचे महत्त्व त्यांना जाणीवपूर्वक असे प्रथमच या वेळी कळले. तोवरचे त्यांचे गायन हे नकळतपणे स्वाभाविक भावनेने होत असे. लवकरच ज्योत्स्नाबाई भावगीत गायिका म्हणूनही अतिशय लोकप्रिय झाल्या.
केशवराव भोळ्यांशी १९३२ साली त्यांचा विवाह झाला. केशव भोळे यांचे संगीत असलेल्या ‘कृष्ण सिनेटोन’ या कंपनीच्या ‘संत सखू’ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. ज्योत्स्नाबाई यात सखूची भूमिका करीत होत्या. त्या वेळी त्यांचे नाव दुर्गा भोळे असेच होते; पण सिनेमात आणखी एक दुर्गा शिरोडकर नावाच्या नटी काम करीत होत्या. या दोन दुर्गांमुळे जरा गोंधळ होऊ लागल्याने लहान दुर्गाचे ‘ज्योत्स्ना’ असे नामकरण झाले व त्या ज्योत्स्ना भोळे झाल्या.
केशवराव भोळ्यांचे, ज्योत्स्नाबाईंच्या सांगीतिक आयुष्यातलेही स्थान आत्यंतिक महत्त्वाचे होते. विवाहानंतर त्यांचे कलागुण अधिकच बहरू लागले. विवाहसमयी त्या जेमतेम अठरा वर्षांच्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांतच प्रो. बा.र. देवधर यांच्या म्युझिक सर्कलमध्ये मैफल करून ज्योत्स्नाबाईंनी देवधर मास्तर व जाणकार श्रोत्यांची दाद मिळवली.
केशवराव भोळे यांचा मंजी खाँ, रामकृष्णबुवा वझे, मल्लिकार्जुन मन्सूर, मास्तर कृष्णराव इ. अनेक गवयांशी स्नेह होता. त्यांनी अनेक बंदिशींचा संग्रह केला. वेगवेगळ्या घराण्यांच्या रंगांमुळे ज्योत्स्नाबाईंच्या गायकीचे एक स्वतंत्र, प्रभावी असे रसायन तयार झाले. पक्का सूर, लय-तालावरची पकड, तडफ, लालित्य आणि माधुर्य या गुणांनी युक्त असे त्यांचे गायन श्रोत्यांना खिळवून ठेवी.
बशीर खाँ, घम्मन खाँ (ठुमरीची तालीम) या उस्तादांकडेही त्यांनी थोडी तालीम घेतली. बरीच वर्षे त्या ‘तानरस खाँ’ घराण्याचे खाँसाहेब इनायत हुसेन यांच्याकडे शिक्षण घेत होत्या. त्यांनी अनेक गुरूंकडे डोळसपणे तालीम घेतली.
गोरख कल्याण, भीम, मधमाद सारंग, शुद्ध भटियार, शामकल्याण, जलधर-केदार इ. काही राग खास ज्योत्स्नाबाईंचे म्हणून लोकप्रिय झाले. भेंडीबाजार घराण्याचे मोहंमद हुसेन खाँ (सारंगिये कादरबक्ष यांचे चिरंजीव) यांनी बांधलेला ‘शिवकंस’ हा रागही ज्योत्स्नाबाईंनी गाऊन लोकप्रिय केला.
ज्योत्स्नाबाईंनी देशभरातल्या महत्त्वाच्या संगीत सभांमधून अनेक वर्षे गायन केले. असरदार गायन, तसेच आवाजावरची हुकमत, उत्तम दमसास, सूक्ष्म सांगीतिक जाण, रंगतदार आलापी, प्रभावी तानक्रिया, शास्त्र आणि भाव यांचा सहजसुंदर मेळ आणि सुधमुद्रा-सुधबानी म्हणजेच ज्योत्स्नाबाई.
लग्नानंतर वर्षभरातच, म्हणजे १९३३ मध्ये ज्योत्स्नाबाईंना नाटकात काम करण्याचा योग आला. ‘आंधळ्यांची शाळा’ हे ते नाटक. लेखक वर्तक, के.नारायण काळे, पार्श्वनाथ आळतेकर, केशवराव दाते, केशवराव भोळे या नवमतवादी मंडळींनी ‘नाट्य मन्वंतर’ ही संस्था स्थापन केली.
रंगभूमीवर स्त्रियांनीच स्त्रियांची कामे करावीत या आग्रहाने ज्योत्स्नाबाई व वर्तकांची पत्नी रंगभूमीवर उभ्या राहिल्या. यापूर्वीही हिराबाई बडोदेकर व त्यांच्या भगिनींनी नाटकमंडळी काढून रंगभूमीवर कामे केली होती. पण ‘आंधळ्यांची शाळा’ हे सर्वार्थाने आधुनिक नाटक तर होतेच; पण यात संगीत म्हणजे अनंत काणेकरांची भावगीते घेतली होती व ती फार परिणामकारक, प्रसंगोचित होती. त्यामध्ये पार्श्वसंगीताचा वापरही प्रथमच केला होता. केशवराव भोळेच याचे संगीतकार होते.
ज्योत्स्नाबाईंचे हे प्रथम पदार्पण त्यांच्या ठायी असलेल्या रूप, संगीत व अभिनय या त्रिवेणी संगमामुळे ऐतिहासिक महत्त्वाचे ठरले. पुढे १९४१ साली ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेत प्रवेश केल्यावर संगीत अभिनेत्री म्हणून त्या चांगल्याच प्रस्थापित झाल्या. त्यांनी या संस्थेत एकूण अकरा नाटकांतून प्रमुख भूमिका केल्या, पैकी ‘संगीत कुलवधू’ने त्यांना अजरामर कीर्ती दिली.
मास्तर कृष्णरावांचे संगीत या नाटकाचे महत्त्वाचे यश होते. ज्योत्स्नाबाईंचे अभिनयमंडित गायन, तेही संयम ठेवून नेटके व वेधक असे. हा बदल घडवून आणण्याचे मोठे श्रेय ज्योत्स्नाबाईंना, लेखक-दिग्दर्शक मो.ग. रांगणेकरांना, तसेच मास्तर केशव, श्रीधर पार्सेकर, स्नेहल भाटकर इ. संगीतकारांनाही जाते. ज्योत्स्नाबाईंच्या अत्यंत लोकप्रिय नाट्यपदांमध्ये, ‘कुलवधू’तील सर्व पदे, ‘क्षण आला भाग्याचा’, ‘मन रमणा मधुसूदना’, ‘बोला अमृत बोला’; ‘एक होता म्हातारा’मधील ‘छंद तुझा मजला’, ‘ये झणी येरे माघारी’; ‘कोणे एके काळी’मधील ‘का रे ऐसी माया’ ही भैरवी; ‘राधामाई’ या नाटकातले ‘खेळेल का देव माझिया अंगणी’; ‘भूमिकन्या सीता’मधील ‘मी पुन्हा वनांतरी फिरेन’, ‘मानसी राजहंस पोहतो’ इ. वानगीदाखल सांगता येतील. ‘कुलवधू’तील ‘बोला अमृत बोला’ने लोकांच्या अंत:करणाचा ठाव घेतला.
ज्योत्स्नाबाईंना उत्कृष्ट भावगीत गायिकेचाही मान मिळाला. आकाशवाणीवरही त्यांच्या भावगीतांना वाढती मागणी येऊन अधिक प्रसार झाला. त्या बहुतांशी राजा बढे, अनंत काणेकर, कवी अनिल, मो.ग. रांगणेकर अशा कवी-गीतकारांच्या रचना गात असत.
त्यांच्या लोकप्रिय भावगीतांमध्ये राजा बढे यांची ‘माहेर’विषयीची तीन गीते, यांतील ‘माझिया माहेरा जा’ हे पुलंनी चाल दिलेले फारच लोकप्रिय झाले. अनंत काणेकरांचे ‘किती गोड गोड वदला’ व ‘आला खुशीत समींदर’; मो.ग. रांगणेकरांचे ‘नको वळून बघू माघारी’ इ.च्या ‘यंग इंडिया’, ‘कोलंबिया’, ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ अशा कंपन्यांनी ध्वनिमुद्रिकाही काढल्या.
ज्योत्स्नाबाईंच्या भावगीतांत विस्तार-शक्यता असूनही त्या खूप तारतम्याने, जडपणा आणू न देता, चालीच्या अंगाने आकर्षकपणे गायल्या याची प्रचिती त्यांची कोणतीही ध्वनिमुद्रिका ऐकताना येते.
खानदानी गाण्याच्या तालमीमुळे आवाजाला जी झिलई व तेज लाभले, त्याचा त्यांनी नाट्यपदे व भावगीते यांत वेगळा आणि खुबीने वापर केला. त्यांनी गीतांचा व नाट्यगीतांचाही दर्जा जो प्रथमच उंच करून ठेवला, याचे महत्त्व फार मोठे आहे. ती त्यांची या क्षेत्राला देणगी आहे. कारण त्यामुळेच श्रोत्यांना विशिष्ट दर्जाची भावगीते ऐकण्याची चोखंदळ वृत्ती आली. त्यांची अभिरुची घडली.
ज्योत्स्नाबाईंनी गीतापासून भावगीत, भावगीतापासून पद, पदापासून ख्याल ही सगळी स्थित्यंतरे मोठ्या सहजपणे केली. सुगम संगीत पुढे नेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यात एक पद्धत अशी की, आकार तोच ठेवायचा; पण त्यात स्वत:च्या आवाजाच्या पोताची भर घालायची, आणि हे ज्योत्स्नाबाईंनी केले.
ज्योत्स्नाबाईंनी थोडे लेखनही केले. १९६० च्या सुमाराला त्यांनी ‘आराधना’ हे संगीत नाटक लिहिले. निर्मिती, दिग्दर्शन, काव्य, संगीत सर्वकाही त्यांचेच होते. चारएक वर्षांनी ‘अंतरीच्या खुणा’ हे पत्ररूपी पुस्तक, तसेच नभोवाणीसाठी ‘घराण्याचा पीळ’ ही नाटिका लिहिली. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार, ‘विष्णुदास भावे’ पुरस्कार (१९८०), संगीत नाटक अकादमीचा संगीत अभिनेत्रीचा पुरस्कार (१९७७), ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार, चौसष्टाव्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा म्हणून १९८४ साली बिनविरोध निवड, गोमंतक मराठी अकादमीचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार (१९९५), महाराष्ट्र सरकारचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार (१९९९) असे काही महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. १९९९ मध्ये, त्यांच्या निधनाच्या तीन वर्षे आधी ‘तुमची ज्योत्स्ना भोळे’ हे आत्मचरित्र लिहिले होते.
पुण्यातील सृजन फाऊंडेशन ही संस्था २००९ सालापासून दरवर्षी दोन दिवसांसाठी ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव’ नावाचा कार्यक्रम आयोजित करते. ज्योत्स्ना भोळे यांच्यावर एक लघुपटही निघाला आहे. ज्योत्स्ना भोळे यांचे निधन ५ ऑगस्ट २००१ रोजी झाले.
ज्योत्स्ना भोळे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
सुप्रसिद्ध मराठी गायिका ज्योत्स्ना भोळे (11-May-2017)
ज्योत्स्ना भोळे (5-Aug-2017)
ज्येष्ठ गायिका आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे (5-Aug-2021)
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ वंदना खांडेकर
कुमार गंधर्व नावाची ही जादूच अशी आगळीवेगळी होती. त्यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९२४ साली बेळगावजवळच्या सुळेभावी खेड्यात कानडी कुटुंबात झाला. लहान वयातच त्यांनी आपल्या गायकीची चमक दाखवली. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने त्यांनी रसिकांवर अक्षरशः गारुड केले. घराणेशाहीच्या चौकटीत बंदिस्त व्हायला त्यांनी साफ नकार दिला. त्याऐवजी आपली स्वतःची गानशैली जनमानसात रुढ केली. ‘कुमार गंधर्व’ ही पदवी गुरुकल्ल मठाचे स्वामी यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी दिली. त्यांचे वडीलही गायक होते. जन्मापासून रुजत असलेल्या संस्कारांमुळे वयाच्या सहाव्या वर्षी एकदम गाऊच लागले.
१९३६ सालच्या अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेतील गायनाने एकदम प्रसिद्धी मिळून त्यांच्यावर बक्षिसे व पदके यांचा वर्षाव झाला. १९४० च्या दशकात पंडित बी. आर. देवधर यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारले. त्यावेळीच कुमारजींच्या नावाचा दबदबा भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात निर्माण झाला. एप्रिल १९४७ मध्ये भानुमती कंस यांच्याशी कुमारजींचा विवाह झाला आणि ते मध्य प्रदेशातील देवासमध्ये स्थायिक झाले. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर आकस्मिक आघात केला. त्यांना टीबीची बाधा झाली. या दुखण्याने त्यांची फुफ्फुसे खालसा केली. असं म्हणतात की, या दुखण्यात त्यांचं एक फुफ्फुस कायमस्वरुपी निकामी झालं. पत्नी भानुमती यांनी याकाळात त्यांची सेवाशुश्रुषा केली. त्या आधी देवधरबुवांकडे आणि नंतर कुमारजींकडेच गाण्याचे शिक्षण घेत होत्या. त्यांच्याच मदतीने पंडितजी आजारातून बरे झाले आणि १९५३ मध्ये आजारानंतरची त्यांची पहिली मैफल रंगली. परंतु या दुखण्याने त्यांच्या स्वरराज्याला चांगलाच हादरा दिला होता.
१९६१ मध्ये बाळंतपणात पत्नी भानुमतीचे निधन झाले. त्यानंतर कुमारजींनी वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला. त्याही देवधरबुवांच्या शिष्या होत्या. कुमारजी आणि वसुंधराबाईंची कन्या कलापिनी ही अनेकदा गाण्याच्यावेळी तानपु-यावर त्यांना साथ द्यायची. माळव्याची लोकगीतं, निर्गुणी भजन , नवरागनिर्मिती यांवर कुमारजींचा मोठा व्यासंग होता. कुमारजींची लोकप्रियता अफाट होती. संगीतातील जाणकार मंडळी त्यांच्या गायकीवर जीव ओवाळून टाकायची. त्यामध्ये महाराष्ट्रीय मंडळींची संख्या मोठी होती. पुणे आणि मुंबईच्या उपनगरातील रसिकांच्या हृदयावर कुमारजींनी अधिराज्य गाजवले. याचठिकाणी त्यांच्या गाण्याच्या मैफली रंगायच्या. चेंबूरसारख्या परिसरात शाळांमध्ये त्यांच्या मैफली व्हायच्या. अगदी फुकट. खरेखुरे संगीताचे दर्दी या मैफलींना हजेरी लावायचे आणि कुमारजींच्या गाण्याची हरएक तान कानात जपून ठेवायचे. कुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली.
माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’ इ. कार्यक्रम सादर केले व संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले. १९६५ साली अनुपरागविलास हा नव्या- जुन्या रागांत स्वत: बांधलेल्या बंदिशींचा संग्रह प्रसिद्ध केला. सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या पदांच्या गायनाचे कार्यक्रम व खास माळवी लोकगीतांच्या मैफली त्यांनी केल्या.
कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून कुमारजींना आश्चर्य वाटले. पंडितजींनी जब्बारना विचारले , कॅमेरात किती मोठा रोल आहे ? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे ? जब्बार यांनी सांगितले , पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले. भारत सरकारने १९९० साली कुमारजींना पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. त्यांचे पुत्र मुकुल शिवपुत्र आणि कन्या कलापिनी कोमकली हे दोघेही गायक आहेत. त्यांच्या कन्या कलापिनी कोमकली आणि रेखा इनामदार-साने यांनी संपादित केलेल्या 'कालजयी कुमार गंधर्व' या ग्रंथात कुमार गंधर्व यांची प्रयोगशीलता आणि वैचारिकता यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पहिला खंड मराठीमध्ये असून, दुसरा खंड हिंदी आणि इंग्रजी असा द्वैभाषिक आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या ४५ मान्यवरांचे लेख, कविता आणि मुलाखतींचा या ग्रंथात समावेश आहे. प्रसिद्ध गायक आणि विश्लेषकांनी कुमार गायकीचं मर्म उलगडून दाखवलं आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय, अविनाश पसरिचा आणि कोमकली कुटुंबियांच्या संग्रहातील दुर्मिळ छायाचित्रंही ग्रंथाच्या दोन्ही खंडात समाविष्ट करण्यात आली आहेत. मा.कुमार गंधर्व यांचे १२ जानेवारी १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्या गीतांची संख्या इतर कोणाही अमराठी गायकाच्या तोडीस तोड आहे. त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत ” अ आ आई म म मका, धुंद आज डोळे”. त्याचबरोबर “घन घन माला नभी ” ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते.”घरकुल” चित्रपटातील “हाउस ऑफ बांबू”हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते.
कविवर्य वासुदेव गोविंद ऊर्फ वा.गो.मायदेव यांचा जन्म २६ जुलै १८९४ रोजी झाला.
कवी मायदेव म्हटले की, कवितांची आवड असणाऱ्या जु्न्या पिढीतील वाचकांना हटकून आठवणार ती त्यांची 'गाइ घरा आल्या' ही सुंदर कविता. सकाळी चरायला गेलेल्या गाई संध्याकाळी घरी आल्या तरी गाई राखायला गेलेला 'वनमाळी' मात्र काही घरी आलेला नसतो. कातरवेळ उलटते, रात्रही होते, तरी वनमाळी न आल्यामुळे आईच्या जिवाची जी उलघाल होते, तिचे वर्णन मायदेव यांनी या कवितेत अतिशय साध्या-सोप्या शब्दांत केले आहे. ही कविता हीच मायदेव यांची ओळख होती. १९२९ साली त्यांनी ती लिहिली. १९१५ ते १९२९ या कालखंडात त्यांच्या हातून ज्या कविता लिहून झाल्या, त्या सर्व कविता 'भावतरंग' या संग्रहात वाचायला मिळतात. 'गाइ घरा आल्या' ही कविता याच संग्रहात आहे.
कवी मायदेव रविकिरण मंडळातील कवींचे म्हणजे, माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन, यशवंत, गिरीश, श्री. बा. रानडे आदींचे समकालीन कवी. गंभीर विचारवृत्तीच्या; तसेच बालांसाठीच्या विपुल कविता मायदेव यांनी लिहिल्या. त्या काळी लहान मुलांमध्ये मायदेव यांच्या बालकविता विशेष आवडीच्या असत. कवी वनमाळी या टोपणनावानेही ते साहित्यक्षेत्रात परिचित होते.
'काव्यमकरंद', 'भावतरंग', 'भावनिर्झर', 'सुधा', 'भावविहार' हे त्यांचे काव्यसंग्रह; तर 'बालविहार', 'किलबिल', 'शिशुगीत', 'क्रीडागीत' हे बालगीत संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भा. रा. तांबे यांच्या कवितांचेही संपादन मा.मायदेव यांनी केले होते. मा.मायदेव यांचे ३० मार्च १९६९ रोजी निधन झाले. मा.मायदेव यांना आदरांजली.
मायदेव यांची गाइ घरा आल्या कविता
गाई घरा आल्या
गाई घरा आल्या । घणघण घंटानाद
कुणीकडे घालू साद । गोविंदा रे? ।। १ ।।
गाई घरा आल्या । धूळ झाली चहूंकडे
घनश्याम कोणीकडे । माझा गेला? ।। २।।
गाई घरा आल्या । वासरे हंबरती ।।
कुणीकडे बालमूर्ती । कृष्ण माझा? ।।३।।
गाई घरा आल्या । ब्रह्मानंद वासरांना
काय करू माझा कान्हा । चुकला का? ।।४।।
गाई घरा आल्या । घोटाळती पाडसांशी
हाय! नाही हृषीकेशी । माझ्यापाशी ।।५।।
गाई घरा आल्या । पाडसास हुंगीतात
माझा मात्र यदुनाथ । दुरावला! ।।६।।
गाई घरा आल्या । आंवरेना मुळी पान्हा
राहणार भुका तान्हा । वासुदेव ।।७।।
गाई घरा आल्या । दूध वाहे झुरूझुरू
माझ्या जीवा हुरूहूरू । मुकुंदाची ।।८।।
गाई घरा आल्या । दूधवाट राहियेली
कुणी माझा वनमाळी । गुंतवीला ।।९।।
गाई घरा आल्या । झाली बाई कातरवेळ
आजुनी का घननीळ । ये ना घरा? ।।१०।।
गाई घरा आल्या । लावियेली सांजवात
बाळा दामोदरा रात । झाली न का? ।।११।।
गाई घरा आल्या । पाल चूकचूक करी ।
राख अंबे माझा हरी । असे तेथे ।।१२।।
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
अभिनेता टॉम हॉलंड यांचा जन्म १ जून १९९६ रोजी लंडन येथे झाला.
थॉमस स्टैनली हॉलड हे टॉम हॉलडचे खरे नाव. त्याचे शिक्षण लंडन येथील डॉनहेड प्रिपरेटरी स्कूल, विंबलडन कॉलेज, बीआरआईटी स्कूल ऑफ परफार्मिंग आर्ट्स येथे झाले. सपासप जाळे विणून या बिल्डिंगवरून त्या बिल्डिंगवर उडणारा स्पायडर मॅन बच्चे कंपनीचा जबरदस्त फेव्हरेट आहे. हा पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेला स्पायडर मॅन साकारण्याची संधी टॉम हॉलडला मिळाली. मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स फिल्म्सचा काल्पनिक सुपरहिरो, स्पायडर मॅनची भूमिका साकारणारा टॉम हॉलडला कधी-कधी स्पायडर मॅनचा ड्रेस खूपच त्रासदायक वाटतो.
एका मुलाखती तो म्हणतो स्पायडर मॅनचा ड्रेस घालणे सुरुवातीला फारच मजेशीर वाटत होते. नंतर तो फारच त्रासदायक वाटायला लागला. आपण स्पायडर मॅनची भूमिका साकारत असल्याचा जेव्हा विचार मनात येत होता, तेव्हा मात्र मी स्वत:ला भाग्यशाली समजत होतो. कारण हा ड्रेस घालण्यासाठी हॉलिवूडमध्ये कलाकारांची अक्षरश: रिघ लागलेली आहे. त्यामुळे कितीही त्रास झाला तरी, मी ही भूमिका करतो.
बिली इलियट द म्युझिकल (२०१२) या स्टेज शोमध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याच्या अन्य चित्रपटांमध्ये द इम्पॉसिबल (२०१२), इन हार्ट ऑफ सी (२०१५) आणि द लॉस्ट सिटी ऑफ जी (२०१६) यांचा समावेश आहे. २०१४ मध्ये त्याला बीएएफटीए राइजिंग स्टार पुरस्काराने गौरविण्यात आले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
उत्कृष्ट वक्त्या व कथाकथनकार असणाऱ्या जोगळेकरांचा विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी रुची निर्माण करण्यात हातखंडा होता. संध्याकाळचा चेहरा व रंग अमेरिकेचे प्रवासिनी आदी त्यांची माहित्यकृती मराठी रसिकांच्या मनांत घर करून राहिली. ‘संध्याकाळचा चेहरा’ या कादंबरीला राज्य शासनाचे कथासंग्रहासाठीचे प्रथम पारितोषिक मिळाले. ‘लोकसत्ता’ मध्ये त्यांनी प्रवासवर्णनावर आधारीत ‘प्रवासिनी’ या लेखमालिकेचे लेखन केले होते. तुकारामांचे फ्रेंचमधील अभ्यासक फादर दलरी यांचे चरित्रही लिहीले.
पत्रकार, शिक्षक ते राष्ट्रीय राजकारण अशा पायऱ्या चढत गेलेल्या महाजनांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात १९९५ मध्ये प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीमुळे सेना-भाजप युती त्यांनी घडविली.
कवी गिरीश यांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. त्यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८९३ रोजी झाला. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत. कवी गिरीश हे रविकिरण मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते. कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत.
त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. माधव ज्युलियन यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड ना.वा. टिळक यांच्या ख्रिस्तायनची प्रत संपादित केली.
कवी गिरीश यांचे ०४ डिसेंबर १९७३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti