जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्चशिक्षित, प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते होते. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. त्यांचा प्रेम विवाह डॉ. चिटणीस ह्यांच्यांशी झाला होता. स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता.
लीला चिटणीस यांची रुपेरी पडद्यावरची कारकीर्द जशी प्रदीर्घ , तशीच ती धाडसीही म्हणावी लागेल. नाटकांत किंवा चित्रपटांत कामे करणे म्हणजे अतिशय लाजिरवाणे व निषिद्ध मानले जायचे , त्या काळात लीला चिटणीस यांनी रोमॅन्टिक भूमिका केल्या. काहीशा बुजऱ्या व बावळट अशोककुमारचा आत्मविश्वास वाढविण्यात लीला चिटणीस यांचा फार मोठा हातभार आहे. आपण नायिकेच्या भूमिकेत यशस्वी होत असतानाच त्यांनी ' शहीद' मध्ये दिलीपकुमारच्या आईची भूमिका स्वीकारत आपल्या धाडसी वृत्तीची झलक दाखविली.
दिलीप-राज-देव आनंद या रुपेरी पडद्यावर सर्वात यशस्वी त्रिकुटाची लीला चिटणीस पडद्यावरची यशस्वी आई ठरली. त्यांच्या डोळ्यांतील कारुण्य, चेहऱ्यावरील भावुकता, कृश शरीरयष्टीतील सहज दिसणारी लवचीकता व संवादफेकीतील स्पष्टता यामुळे लीला चिटणीस कोणत्याही शॉटमध्ये भाव खाऊन जात. त्या कधीच सुलोचना, कामिनी कौशल किंवा अचला सचदेवप्रमाणे रडक्या आई झाल्या नाहीत, किंवा ललिता पवारसारख्या खाष्ट आईही झाल्या नाहीत.
वात्सल्यसिंधू आईचे एक उदात्त, पण प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून लीला चिटणीस या रुपेरी पडद्यावरील एक अजरामर कलाकार म्हणून कायमच स्मरणात राहतील. त्या काळात, लीला चिटणीस आपल्या चित्रपटातली गाणी स्वत:च गायच्या आणि त्या गाण्यावर त्या अशा काही धमाल नाचायच्या की लोक त्यांचा तो नाच पाहून वेडावून जायचे. ' झूला ' मधल्या ' हिंडोले कैसे झूलू..' व ' झूलो के संग..' या दोन गाण्यांवर त्या अगदी धमाल नाचल्या होत्या. त्यांच्या नृत्यावर अनेक जण अगदी जीव ओवाळून टाकायला तयार असायचे.
लीला चिटणीस यांनी त्यांचे आत्मचरित्रही लिहिले आहे. मा.लीला चिटणीस यांचे १४ जुलै २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
विजय घाटे यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी तबला शिकण्यास सुरवात केली. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६४ रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथे झाला. १२ व्या वर्षी त्यांनी तबलामधील विशारद पदवी मिळविली होती. वयाच्या १६ व्या वर्षी ते मुंबईत आले आणि बारा वर्षांहून अधिक काळ तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्या कडे गुरुकुल पध्दतीत शिक्षण घेतले. वयाच्या १६ व्या वर्षीही ते आपल्या चमकदार एकल म्हणजेच सोलो तबला वादनाने प्रसिद्ध झाले. विजय घाटे हे काही कलाकांरपैकी एक आहे जे गायन, वाद्य आणि नृत्य या तीनमध्ये निपुण आहेत.
विजय घाटे यांनी उस्ताद बिस्मिल्लाह खान, उस्ताद विलायत खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद अमजद अली खान, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित बिरजू महाराज, पंडित जसराज, उस्ताद शाहिद परवेझ आणि अनेक मान्यवर कलाकारांच्या सोबत साथ केली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय कलाकार प्रसिद्ध संगीत जेथ्रॉटेल सारख्या प्रसिद्ध संगीतकारांसोबत आणि जॉर्ज ड्यूकेस, अल्जेर्यु, रवी कॉलतारिन यांच्या सारख्यांना साथ दिली आहे. तसेच विजय घाटे यांनी गिसॉन्टी, लॅरी कॉरीयेल, जॉर्ज ब्रुक्स इ. त्यांनी लुई बॅंक, शंकर महादेवन, हरिहरन, शिवमणी या सुप्रसिद्ध भारतीय संगीतकारांसोबत काम केले आहे. विजय घाटे यांनी कर्नाटकी फ्युजन मध्ये डॉ. सुब्रायमॅनियम, विद्याभवन विनायकम, एम.एस गोपालकृष्णन व यू. श्रीनिवास यांच्या बरोबरही काम केले आहे. विजय घाटे नेदेरलंड मधील रॉटरडॅम मधील आर्ट कॉट्स युनीव्हसीटीत व्हिजीटींग फॅकल्टी म्हणून काम करतात.
विजय घाटे यांनी पॅरिस येथे १९८४ साली भारत-फ्रांस फेस्टिव्हल, १९८५ साली भारत फेस्टिव्हल रशिया येथे, राष्ट्रपती भवन येथे आणि भारत भवन येथे भारतीय महोत्सव येथे आपल्या तबला वादनाची प्रतीभा दाखवली होती. ते सवाई गंधर्व संगीत महोत्सव, हरवलाभा संगीत महोत्सव, तानसेन समारोह, गुनीदास संमेलन, उस्ताद अखिलिया खान संगीत समारोह, कालिदास महोत्सव, खजुराहो महोत्सव, विष्णु दिगंबर संगीत उत्सव महोत्सवामध्ये आपले उत्कृष्ट तबला वादन प्रदर्शित करत असतात. विजय घाटे यांनी तालचक्र नावाचा एक ट्रस्ट स्थापन केला असून तो तरुण आणि नवीन कलाकारांसाठी व्यासपीठ पुरवते आणि आर्थिक दुर्बल घटकांमध्ये संगीतकारांना मदत करते. या ट्रस्टने अनुभवी संगीतकारांकडून संगीत कार्यशाळा आयोजित करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वातावरणात असलेल्या संगीतकार व संगीत शिक्षकांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याची योजना आखली आहे. तालाचक ट्रस्ट शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांना प्रोत्साहित करतो.
विजय घाटे यांनी 'विजय' नावाचा आपला अल्बम प्रसिद्ध केला आहे. विजय घाटे यांना पं. जसराज पुरस्कार, सरस्वती बाई राणे पुरस्कार, डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारत सरकारने त्यांचा २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
पुण्याच्या ललित कला केंद्रात मेवाती घराण्याच्या गायकीसाठी गुरुपद मिळवणारे औरंगाबादचे सचिन नेवपूरकर हे सर्वात तरुण गुरु ठरले आहेत. आजवर ११० बंदिशींची रचना करणारे नेवपूरकर हे स्वत:ही मेवाती घराण्याचे अनेक विद्यार्थी घडवत आहेत व शास्त्रीय संगीताच्या मासिक सभांमधून शास्त्रीय संगीताविषयीची रुची सर्वदूर पोहोचविण्यात योगदान देत आहेत.
घरंदाज मेवातीचा 'ध्यास'
नाथमाधवांची पहिली कादंबरी, प्रेमवेडा, ही १९०८ साली प्रकाशित झाली. नाथमाधवांची शेवटची कादंबरी ‘स्वराज्यातील दुही’ ही अपुरी राहिली. त्यांच्या ‘डॉक्टर’ या कादंबरीवरून ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट निघाला. उषा किरण, सूर्यकांत यांच्या भूमिका असलेल्या वसंत प्रभू यांच्या संगीताने नटलेल्या या चित्रपटाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
बाबाराव मुसळे हे नाव मराठी साहित्य विश्वाला नवं नाही. १९८५ मध्ये 'हाल्या हाल्या दुधू दे' या कादंबरीने त्यांचं नाव एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलं. या कादंबरीने ग्रामीण वास्तव आपल्या खास शैलीत टिपणारे कादंबरीकार म्हणून त्यांना लौकीक मिळवून दिला.
'हाल्या हाल्या दुधू दे' नंतर आलेल्या 'पखाल' कादंबरीलाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पु. ल. देशपांडे यांनी 'पखाल'चं विशेष कौतुक केलं होतं. दरम्यानच्या काळात बाबाराव मुसळे यांची 'झुंगु लुखू लुखू', 'मोहोरलेला चंद', 'नगरभोजन' हे कथासंग्रह आणि 'पाटीलकी', 'दंश' या कादंबर्या प्रकाशित होत राहिल्या तर 'वारुळ' या कादंबरीने पुन्हा एकदा मराठी साहित्यात हलचल निर्माण केली. मात्र एव्हाना वाचक त्यांच्या लेखनशैलीला सरावलेला असतानाच 'इथे पेटली माणूस गात्रे' या कवितासंग्रहाला 'सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील' हा मानाचा साहित्य पुरस्कार मिळाला आणि बाबाराव मुसळे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं.
खरंतर बाबाराव मुसळे यांच्यासाठी पुरस्कार आणि प्रसिद्धी नवी नाही. मात्र गेली अनेक वर्षं कादंबरी-कथा प्रांतात जोरकस मुशाफिरी करणार्या मुसळे यांचं कवीतिक अंग आजवर रसिकांना फारसे उमगलेलं नव्हतं. वास्तविक कादंबरी आणि कथालेखन करत असतानाच मुसळे यांचे कवितालेखनही समांतरपणे सुरू होते. त्यांची ही कविता नागर, ग्रामीण, दलित, आदिवासी असा विविध प्रवाहांना आपल्यात सामावून घेत आपल्या पद्धतीने व्यक्त होत होती. मात्र ती आजवर पुस्तकरूपाने प्रकाशात न आल्यामुळे वाचक तिच्यापासून अनभिज्ञ होते. परंतु 'काव्याग्रह प्रकाशन'च्या विष्णू जोशी यांनी मुसळे यांच्या कवितेला प्रकाशनाची वाट दाखवली आणि या कवितेने कवितेचा गाभारा लख्खपणे उजळून टाकला.
मुसळे यांच्या गद्य लेखनावर यशस्वीतेची मोहोर उमटलेली होतीच. परंतु त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहालाही मानाचा साहित्यिक पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांनी कवी म्हणूनही आता स्वत:ला सिद्ध केलं आहे. अर्थात हा त्यांच्या कवितेचा आणि त्यांनी त्या कवितेतून जो मानवतेचा धर्म जागवलाय त्याचा गौरव आहे. कारण त्यांची कविता केवळ स्वत:चं दु:ख जागवत नाही, ती समोरच्याचं दु:ख पाहूनही तेवढीच व्याकुळ होते. प्रसंगी पेटून उठते. एकूण मुसळे यांची कविता ही माणुसकीची कविता आहे आणि त्यांच्या कवितेचा झालेला गौरव हा माणुसकीचा गौरव आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
ठाणे शहरातील विख्यात लेखक व कवी अशी ख्याती असलेल्या गणेश ताम्हणे यांचा अलिबाग सारख्या निसर्गरम्य गावी जन्मल्यामुळे निसर्गाबद्दल विशेषतः कोकणातील फुललेल्या निसर्गाबद्दल त्यांना वाटणारी अभिरूची त्यांच्या लेखनातून वाचकांच्या मनात उत्तमरित्या उमटलेली आहे. त्यांनी आजवर नियतकालिकांमधून व मासिकांमधून विपूल प्रमाणात लेखन केले असून “सुमन”, “भारत सेवक” अशा प्रथितयश मासिकांचे सहसंपादकपद, तसेच “बालविश्व” या लहान मुलांच्या नाजुक भावविश्वावरती अलगद प्रकाश टाकणार्या मासिकाचे संपादकपद त्यांनी भुषविलेले आहे. “भग्न बासरी”, “रेंगाळणारे सुगंध”,“कोकणाची पाऊलवाट” अश्या निरनिराळ्या विषयांवरती अत्यंत रोचक व लक्षवेधी शैलीने लिखाण केल्यामुळे ते रसिकांच्या साहित्य आठवणींमध्ये ते कायमचे कोंदले गेलेले आहेत. कोकणाची “पाऊलवाट” हे त्यांचे थेट कोकणातल्या दाट वनराईमध्ये वाचकांना घेवून जाणारे व साधेपणाच्या एका वेगळ्याच विश्वाची सफर करून आणणारे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक, विशेष गाजले होते. कोकण संस्कृतीमध्ये, पुस्तक वाचून झाल्यानंतरही सर्वांना आणखी काही क्षण रेंगाळायला लावणार्या या पुस्तकामध्ये आपल्याला त्यांचे बालपण, ए.सी.सी. कंपनीमध्ये नोकरी करत असताना त्यांना आलेले अनुभव, भारताचा स्वातंत्र्यलढा, जीवनविषयक त्यांचा ऐकुण दृष्टीकोन, १९२२ पासूनचे ठाणे, आदींचा तपशील संदर्भवार स्पष्ट होतो. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हणे यांनी देखील आपल्या वडिलांकडून म्हणजेच गणेश ताम्हणें कडून देशासाठीच्या योगदाना बद्दलचे मोलाचे धडे घेतले असल्यामुळे ते देखील सामाजिक कार्यात यशस्वी होऊ शकले . ठाण्यातील मराठी साहित्यपरंपरेचे नियोजनबध्द संवर्धन करण्याच्या हेतूने स्थापन झालेले शारदा मंडळ, मराठी ग्रंथसंग्रहालय, कथामाला मध्यवर्ती मंडळ आणि राष्ट्र सेवा दल अशा संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून त्यांनी बहुमूल्य योगदान दिले होते. ठाणे पालिकेचे दोन वेळा निर्वाचित सदस्य म्हणून ते निवडून आल्यामुळे त्यांच्या व्यक्तित्वाला राजकीय किनारदेखील लाभलेली होती. पण मूळचा पिंड साहित्यिकाचा असल्यामुळे राजकारणात ते विशेष रमू शकले नाहीत.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
तुकडोजी महाराजांचा वारसा घरात असल्याने त्या संस्काराने मार्ग दाखविला आणि 'आपुलकी' चा जन्म झाला. कम्पयुटर क्षेत्रात करिअर असतानाही वर्धा जिल्ह्यातील अभिजीत फाळके यांनी शेतकर्यांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार केला. केवळ आर्थिक मदत नव्हे, तर त्यांना अवजारे पुरविणारी 'अॅग्रो टुल बॅंक' सारखी कल्पना राबविली. हे काम सचिन तेंडुलकरलाही थक्क करुन गेलं...
अभिजीत फाळके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'आपुलकी' चे उड्डाण हा लेख पुढील पानावर वाचा.
अभिजीत फाळके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'आपुलकी' चे उड्डाण हा लेख वाचा.
लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी हे मराठी लेखक, कोशकार, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.
त्यांचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर इथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले.त्यांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व राज्य ग्रंथ पुरस्कारांची सुरूवात केली. त्यांना १९५५ साली 'वैदिक संस्कृतीचा विकास' साठी पहिला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शिवाय त्यांना १९७३ साली राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्काराने तर १९७६साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
१९५४ साली दिल्ली येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९६० ते १९८० दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. ते महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळ पहिले अध्यक्ष होते.मराठी विश्वकोशाचे ते आद्य संपादक आहेत.प्रा. रा.ग. जाधवांनी 'शास्त्रीजी' हा तर्कतीर्थांच्या कार्याचा परिचय देणारा ग्रंथ लिहिला आहे. त्यांचा मृत्यू २७ मे १९९४ रोजी झाला.
त्यांचे प्रकाशित झालेले साहित्य
वैदिक संस्कृतीचा विकास
मराठी विश्वकोश (संपादन)
धर्मकोश (एकूण १६ खंडांचे संपादन)
विचार शिल्प
आधुनिक मराठी साहित्य
समीक्षा आणि रस सिद्धांत
हिंदू धर्मसमीक्षा
श्रीदासबोध
राजवाडे लेख संग्रह (संपादन)
उपनिषदांचे भाषांतर
संस्कृत संहितेचे वर्गीकरण (Catalogue of Sanskrit Scripts)
गड-किल्ले, आपली मराठी संस्कृती, मराठी भाषा याविषयी त्यांना खूप वाटे. त्यांच्याच अविरत परिश्रमाने रायगडावर मेघडंबरी बसविली गेली. गड-किल्ल्यांच्या आजच्या अवस्थेमुळे ते अस्वस्थ होत. ‘सरकारवर विसंबून न राहता एकेका गिर्यारोहक मंडळाने एकेक किल्ला दत्तक घेऊन तो जतन करावा,’ असे त्यांचे सांगणे होते.
आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम् डी ची पदवी मिळाली. एम् डी साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’.
Copyright © 2025 | Marathisrushti