जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
आज शॉटगन म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा वाढदिवस.
शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म ९ डिसेंबर १९४५ रोजी झाला.
शत्रुघ्न सिन्हा हे बिहारच्या उच्च शिक्षित कुटुंबातील सदस्य आहेत. चारही बंधूंची नावे राम, भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण अशी आहेत. वडिलांची इच्छा नसतानाही ते पुण्याला आले होते. फिल्म्स & टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटची प्रवेश परीक्षा तो उत्तीर्ण झाला होते. या संस्थेत राजकपूर भेट द्यायला आले होते. भेटीचा कार्यक्रम उरकल्यावर जाताना त्यांनी शत्रूला त्याच्या मित्रांसह मुंबईला शुटींग पाहण्यासाठी बोलवले. ते तिथे जाऊन त्यांना भेटले. जुहूमधील शत्रुघ्न यांच्या बंगल्याचे नावही ‘रामायण’ आहे. त्यांच्या मुलांची नावे लव आणि कुश आहेत.शत्रुघ्न सिन्हा यांनी १९६९ मध्ये `साजन’ चित्रपटाद्वारे सिनेमासृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यांनी आतापर्यंत २०० हिंदी चित्रपटांसह बंगाली आणि पंजाबी चित्रपटांतही काम केले आहे. त्यांच्या सिनेमामधील अनेक डॉयलॉग आजही प्रसिद्ध आहेत. कालीचरण, विश्वनाथ, ब्लॅकमेल, दोस्ताना, शान आणि काला पथर हे त्यांची काही नावाजलेले सिनेमे आहेत. चित्रपटात काम केल्यानंतर सध्या ते राजकारणात कार्यरत असून सध्या बिहार तालुक्यात पाटणा साहिब क्षेत्राचे लोकसभेचे खासदार होते. अभिनेता म्हणून लोकप्रिय झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी राजकारणातही जगन्मैत्री टिकवण्याचा प्रयत्न केला. पत्रकार भारती प्रधान यांनी सुमारे सात वर्षांपर्यंत विविध शहरांमध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांशी चर्चा करून शत्रुघ्न सिन्हा यांच्या जीवन, प्रेम आणि करिअरवर ‘एनिथिंग बट खामोश’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. शत्रुघ्न एका चित्रपटात आपल्या भारदस्त आवाजामध्ये ‘खामोश’ म्हणाले होते. तेव्हापासून ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जनतेच्या आग्रहाखातर ‘खामोश’ हा डायलॉग म्हणतात. सिनेस्टार काही प्रमाणात आपल्या प्रयत्नातून आणि काही प्रमाणात चाहत्यांच्या सहकार्याने स्वत:ची प्रतिमा तयार करतो. शत्रुघ्नसारख्या बडबड्या व्यक्तीच्या प्रतिमेसोबत ‘खामोश’ शब्द कसा काय जोडला गेला, हे कुणालाही कळालेले नाही. आपल्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात एकमेकांचे घनिष्ठ मित्र राहिलेल्या शत्रुघ्न आणि अमिताभ यांच्यात नंतर कटुता आली. त्यांनी यश जोहर यांचा पहिला चित्रपट ‘दोस्ताना’मध्ये एकत्र काम केले होते. शत्रुघ्न यांनी रिना रॉयसोबत प्रेमप्र करण गाजले होते, पण लग्न पूनम यांच्यासोबत केले. १९६८ मध्ये पूनम या मिस यंग इंडिया म्हणून निवडली गेल्या होत्या. पूनम यांनी जोधा-अकबर’मध्ये तिने बादशहाच्या आईची भूमिका अत्यंत विश्वासार्हतेने साकारली आहे.शत्रुघ्न यांचा स्वभाव बडबड्या असला, तरी पूनम शांत स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जातात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट.
अभिनयासाठी आवश्यक असलेले बोलके डोळे, क्षणाक्षणाला चेहऱ्यावरती बदलणारे भाव व आकर्षक व्यक्तीमत्व हे सर्व गुण त्यांना लाभले होते. १९५९ मध्ये भालजी पेंढारकर यांनी ‘आकाशगंगा’ नामक चित्रपट तयार केला होता. त्या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि त्यांचा चंदेरी दुनियेत प्रवेश झाला.
ज्येष्ठ सिनेपत्रकार देवयानी चौबळ यांचा जन्म १९४५ मध्ये झाला.
असे म्हणतात देवयानी चौबळ या अत्यंत फटकळ सिनेपत्रकार होत्या. तिच्या जिभेच्या तडाख्यात भलेभले सापडले होते. त्या बॉलीवूड मध्ये देवी या नावाने प्रसिद्ध होत्या. खरे तर त्यांना फिल्मस्टार व्हायचं होतं. घरात सगळे पोलीसखात्यात नोकरीला. त्यांचे वडील सुप्रसिध्द वकील होते. त्यांना हिरोईन म्हणून सगळीकडे मिरवायचं होतं. दिसायलाही त्या देखणी होती. छोट्या मोठ्या सिनेमात सहज काम मिळाले असते.
देवयानी या शाळा संपण्यापूर्वीच दिलीपकुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांच्याशी लग्न करायचं होतं. पण दुर्दैव दिलीप कुमारने देवयानी यांना नकार दिला. त्या मुळे देवयानी बिथरल्या. आधीच ती फटाकडी होती त्यात डोक्यात राग. सिनेमामध्ये करीयर सुद्धा झालं नाही. मग लिखाणाकडे वळल्या. अंगात भिनलेला सगळा जहर ती आपल्या लेखातून बाहेर काढू लागली. इंग्लिश वर तिची कमांड होतीच पण गरज पडेल तिथे हिंदी शब्द वापरून हिंग्लिश लिखाणाची पहिली सुरवात तिने भारतात केली. दिलीपकुमार यांच्या विरुद्ध लिहिण्यासाठी त्यांनी ज्युनियर रिपोर्टर म्हणून 'स्क्रीन' जॉइन केले, पण त्यांच्या वागणुकीने तीन दिवसांत नोकरीच्या बाहेर करण्यात आले आणि त्यांना नोकरी गमवावी लागली. पण, त्यांनी हार मानली नाही. त्या काळी 'स्टार अँड स्टाईल' नावाचे एक नवीन मासिक आले होते आणि त्यात महिला पत्रकारांची गरज होती तेथे देवयानी यांना नोकरी मिळाली आणि लवकरच त्या 'फ्रँकली स्पिकिंग' या नावाचा स्वतःचा स्तंभ देवी या नावाने लिहू लागल्या.
नावाप्रमाणेच बिनधास्त खुसखुशीत लेख, त्यातल्या तिखट जाळ गॉसिप गप्पा थोड्याच दिवसात पॉप्युलर झाल्या. लोक आवडीने या लेखांची वाट पाहू लागले आणि बॉलीवूड? बॉलीवूड तिच्या नावाने खडे फोडू लागले. यात सगळ्यात आघाडीवर होता सुपरस्टार दिलीप कुमार ज्यांनी देवयानी यांना नाही म्हणायची हिंमत केली होती. देवयानी आपल्या प्रत्येक लेखात त्याला उभा आडवा सोलायच्या. तो म्हातारा होत चाललाय, त्याची जादू संपलीय याच्या चर्चा करायची. त्याने मुलगा व्हावा म्हणून आस्मा नावाच्या बाईशी दुसरा निकाह केला ही बातमी सुद्धा तिने फोडली. दिलीप कुमार वैतागले. त्यांनी आपल्या फिल्मइंडस्ट्रीमधल्या सगळ्या दोस्तांना बजावलं की देवयानीला मुलाखत द्यायची नाही. पण ही अघोषित बंदी खूप काळ चालू शकली नाही. किती जरी नाव ठेवली तरी फिल्म इंडस्ट्रीला देवयानी चौबळ सारख्या पत्रकाराची गरज होतीच. देवयानी एकीकडे आणि बाकीचे फिल्म मगझीन एकीकडे. सगळ्यांच्यात ठसठसीत उठून दिसणाऱ्या देवयानीशी आपले संबंध चांगले राहावेत यासाठी सगळे फिल्मस्टार प्रयत्न करायचे.
आज जी फिल्मी पत्रकारिता प्रचलित आहे याचा देवयानी चौबळ यांनी शुभारंभ केला होता. आजकाल हे फंडे सिनेमा चे प्रमोशन करण्यासाठी सर्रास वापरले जातात, पण त्याकाळी लोकासाठी हे सर्व नवीन होते.
आराधना या सिनेमावेळी देवयानीची आणि राजेश खन्नाची ओळख झाली. या भेटीत त्याने काय जादू केली माहीत नाही पण देवयानी अगदी त्याच्या प्रेमात पडली. तसं पाहायला गेलं तर अख्ख्या देशातल्या पोरी तेव्हा राजेश खन्नाच्या प्रेमात होत्या, पण यात देवयानीचा मोठा हात होता.
इतरानां कायम शिव्या घालणारी फटाकडी देवयानी राजेश खन्नाबद्दल बोलताना मात्र नुसता कौतुक, विशेषणांचा भडीमार करायच्या. त्याला सुपरस्टार ही उपाधी पहिल्यांदा देवयानी यांनीच दिली. तिच्या लेखात येणाऱ्या सुपरस्टार, सुपरस्टार या उल्लेखामुळे सगळे राजेश खन्नाला सुपरस्टार म्हणू लागले. देवयानी अगदी बिनधास्त होती. राजेश खन्नाबरोबरची मैत्री, त्याच्यावरच प्रेम कधी लपवायची नाही. आपण आयुष्यात एकाच पुरुषाबरोबर रात्र घालवली आहे तो म्हणजे राजेश खन्ना असं रोखठोक सांगायची. राजेशने मात्र अंजू महेंद्रू बरोबर देवयानी चौबळला सुद्धा गंडा घालून लग्न केलं तरुण डिम्पल कपाडिया बरोबर आणि ही बातमी पहिल्यांदा सांगितली देवयानीलाच.
पण राजेश खन्नावर चिडणे त्यांना शक्य नव्हते. तो त्यांच्यासाठी देव होता. राजेशने देखील तिच्यावरचा आपला कृपाशीर्वाद कधी काढून घेतला नाही. असं म्हणतात की देवयानी चौबळ ने आनंद चित्रपट बघितल्यावर त्याला सांगितलेलं की या सिनेमात त्याच्याबरोबर काम केलेला अमिताभ बच्चन पुढे जाऊन त्याची खुर्ची काढून घेऊ शकतो.
त्यांनी त्या काळी अमिताभ यांच्याबद्दल एक भविष्य वर्तवले होते. ‘अमिताभ बच्चन हा असा नट आहे की तो प्रसिद्धीच्या शिखरावर जाईल. पण तो इतरांसारखा तिथून खाली कोसळणार नाही; तर एक एक पायरी उतरत आपली स्वतःची अशी वेगळी जागा बनवेल...’ आजवरचा या महानायकाचा प्रवास पाहता ते खरंच झालेलं दिसतं आहे!
देवयानी चौबळ यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत गॉसिप कॉलमला कमालीचं ग्लॅमर मिळवून देण्यात यांचा खूप मोठा हातभार होता. त्यांच्या लेखणीबरोबरच त्यांची बिनधास्त अॅटिट्यूड, बोलणं, दिसणं या सर्वच गोष्टी चर्चेचा विषय असायच्या.
देवयानी चौबळ यांनी पत्रकारितेचे धडे आचार्य अत्रे यांच्या कडे गिरवले होते. शिरिष पै व देवयानी यांची खास मैत्री होती. एका दिपावली अंकात ताईनी "देवी" नावाचा तिच्या जीवनावर व आठवणी वर एक लेख लिहिला होता. एवढी वर्षे झाली तरी राजेश खन्ना विषयीच तीच एकतर्फी प्रेम कमी झालं नाही. त्याच्या साठी तिने डायट सुरु केलं होतं. पण याचा परिणाम तिच्या तब्येतीवर झाला आणि त्यात पॅरालीसीसच्या अटॅकमुळे ती अगदीच गारद झाली. त्यातूनही तिने आपले फटाकेदार लिखाण चालूच ठेवले होते. या काळात धर्मेंद्र आणि सुनील दत्त यांनी तीला मदत केली.
असं म्हणतात की शेवटपर्यंत ती राजेश खन्नाच्या प्रेमातचं जगली. येणाऱ्या जाणाऱ्याना सांगायच्या, की राजेश मला रोज फुलं पाठवतो. त्याच्यासाठी मी बरी होणार.
देवयानी चौबळ यांचे १३ जुलै १९९५ रोजी निधन झाले.
#DevyaniChaubal
प्राध्यापक बापुराव जगताप हे प्रख्यात नामांतरवादी नेते, लेखक, व निळ्या पहाडीवरच्या कवितांचे जनक असे अष्टपैलु व्यक्तिमत्व होते. आंबेडकरांचे कट्टर अनुयायी व गाढे आभ्यासक असलेले जगताप हे अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या तत्वप्रणालीशी एकनिष्ठ राहिले. औरंगाबाद येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून प्रा. बापुराव जगताप हे मराठी विभागप्रमुख म्हणून 2001 साली निवृत्त झाले होते.
पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा मुकुट किती काटेरी असतो, याची कल्पना डॉ. रघुनाथ शेवगावकर यांना एव्हाना येऊ लागली असेल! अर्थात, कुलगुरुपदी नियुक्ती होतानाच त्यांनी इतिहास घडवला आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविणारे ‘आयआयटी’मधील पहिलेच संशोधक होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. इतकेच नव्हे, तर अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून उच्चशिक्षण व संशोधन केलेल्या व्यक्तीकडेही हे पद प्रथमच जात आहे.
‘आयआयटी’ आणि पुणे विद्यापीठ या दोन्ही संस्था राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिकपात्र असल्या, तरी त्यांच्या कारभाराच्या व्यवस्थेमध्ये आमूलाग्र तफावत आहे. हा ‘धक्का’ डॉ. शेवगावकर यांना पचवावा लागणार आहे. तात्कालिक आंदोलनबाजीचा मुकाबला त्यांना करावा लागेलच, शिवाय इतरही अनेक महत्त्वाच्या घडामोडी त्यांच्या कार्यकालात संभवतात. महत्त्वाचे म्हणजे सुमारे हजारभर महाविद्यालये-संस्थांमधून शिकणाऱ्या सहा लाख विद्यार्थ्यांचा डोलारा विद्यापीठाला आता डोईजड होऊ लागला आहे. त्यामुळेच विद्यापीठाचे पुणे, अहमदनगर व नाशिक असे त्रिभाजन करण्याचा प्रस्ताव जोर धरत आहे.
मुख्य कॅम्पसमधील पदव्युत्तर विभागातून ‘आयआयटी’प्रमाणे संशोधन करायचे आणि तीन जिल्ह्य़ांमध्ये स्थानिक कॅम्पसच्या माध्यमातून विस्ताराचे उद्दिष्ट साध्य करायचे, असे पथदर्शी मॉडेल विकसित करण्यास वाव आहे. डॉ. शेवगावकर मूळचे ग्वाल्हेरचे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून पदवी प्राप्त केल्यानंतर मुंबई ‘आयआयटी’मधून पीएच.डी. संपादन केली. बंगलोरची रामन संशोधन संस्था व अमेरिकेतील मेरीलॅण्ड विद्यापीठातून खगोलभौतिकी विषयामध्ये त्यांनी अद्ययावत संशोधन केले.
संगीतशास्त्रामध्येही ते पदवीधर असून सतारवादनाचा छंद त्यांनी जोपासला आहे. १९८७ पासून ते ‘आयआयटी’मध्ये संशोधन-अध्यापन करीत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तळागाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण देण्याच्या केंद्रीय प्रकल्पाचे ते समन्वयक आहेत. त्याद्वारे विद्येच्या माहेरघरातील ज्ञानगंगा अगदी जुन्नरसारख्या आदिवासी क्षेत्रातील महाविद्यालयांपर्यंत पोचविण्याची लक्ष्यपूर्ती केली जाऊ शकते. ‘आयआयटी’चे उपसंचालकपद सांभाळणाऱ्या डॉ. शेवगावकर यांच्याकडे प्रशासन-व्यवस्थापकीय अनुभवाची कमतरता नाही. त्याची कसोटी मात्र ‘पूर्वेकडील ऑक्स्फर्ड’मध्ये नक्कीच पाहिली जाईल!
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार अमोल पालेकर यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४४ रोजी झाला. चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा विविध भूमिका करत असलेले अमोल पालेकर यांचे वडील पोस्टात काम करत असत, आणि आई खाजगी कंपनीत काम करत होती.
खरे तर, पालेकर चित्रकार व्हावयाचे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून फाइन आर्टची पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या अमोल पालेकरांच्या अप्रतिम चित्रांची सात प्रदर्शनेही झाली आहेत. पण, सत्यदेव दुबेंच्या रूपात गुरू भेटला आणि यथावकाश त्यांच्यातील चित्रकार अभिनेत्याच्या रूपात दृढ होत गेला. समांतर रंगभूमीवरील निष्ठा, नैतिकता या दुबेंच्या गुणांचा मनोहारी संगम पालेकरांमध्येही झालेला दिसतो. छबिलदास थिएटर चळवळीचा, किंबहुना समांतर रंगभूमीचा इतिहास लिहिला जाईल; तेव्हा त्यातील एक सुवर्ण पान अमोल पालेकरांच्या नावाने लिहिलेले असेलच!
अमोल पालेकर यांनी सत्यदेव दुबे यांच्याबरोबर मराठी प्रयोगात्मक नाटकात रंगभूमीवर पदार्पण केले आणि नंतर "अनिकेत" नावाची स्वतःची नाट्यसंस्था १९७२ मध्ये सुरू केली. त्यांनी चित्रपटातील अभिनयाची सुरुवात १९७१ सालच्या शांतता! कोर्ट चालू आहे या सत्यदेव दुबे दिग्दर्शित मराठी चित्रपटातून केली. या चित्रपटापसून नवीन मराठी चित्रपट चळवळ सुरू झाली असे समजले जाते. १९७४ मध्ये अमोल पालेकर यांनी बासू चॅटर्जी यांच्या रजनीगंधा आणि छोटीसी बात या कमी खर्चात केलेल्या पण गाजलेल्या चित्रपटांत काम केले. यातूनच आणखी विनोदी चित्रपटांतून त्यांना "मध्यमवर्गीय" माणसाच्या भूमिका मिळत गेल्या.
गोलमाल चित्रपटासाठी त्यांना १९७९ मध्ये फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. १९८२ मध्ये त्यांनी ओलंगल या मल्याळम चित्रपटात रवीची भूमिका केली, नंतर हा चित्रपट हिंदीत मासूम नावाने करण्यात आला. मराठी चित्रपट आक्रीत पासून अमोल पालेकर यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहेली हा चित्रपट २००६ मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे अधिकृतरीत्या पाठविण्यात आला. पण तो अखेरच्या नामांकनांपर्यंत पोचला नाही. मराठी बरोबरच कानडी, बंगाली, मल्याळम या भाषांतील अमोल पालेकर यांच्या चित्रपटांना समीक्षकांनी वाखाणले आहे.
दिग्दर्शक म्हणून त्यानी स्त्रियांचे चित्रण अधिक संवेदनशीलपणे केले. भारतीय साहित्यातील अभिजात कथांवर त्याचे काही चित्रपट आधारलेले आहेत. अमोल पालेकर यांच्या चित्रपटांतून आधुनिक दृष्टिकोन असतो. बादल सरकार यांचा मोठा प्रभाव पालेकर यांच्यावर आहे. त्यामुळेच त्यांना बगीचे, गॅरेज, कॅन्टीन, इमारतीची गच्ची अशा एरवी अशक्यव मानल्या जाणाऱ्या ठिकाणी नाटक सादर करण्याची प्रेरणा मिळाली असावी. समांतर रंगभूमी जगविण्यासाठी जे जे प्रयत्न झाले, त्यामध्ये पालेकरांच्या या अजोड भूमिकेचीही दखल घ्यावी लागेल.
विजय तेंडुलकरांच्या "शांतता, कोर्ट चालू आहे‘ चे हिंदी रूपांतर "चूप! कोर्ट चालू है‘, मोहन राकेश यांचे "आधे अधुरे‘, गिरीश कार्नाड यांचे "हयवदन‘ या नाटकांतील संस्मरणीय भूमिकांच्या बरोबरीने पालेकरांनी नाट्यदिग्दर्शक म्हणूनही प्रवास सुरू ठेवला होता. बादल सरकार यांचे "वल्लभपूरची दंतकथा‘, "पगला घोडा‘, "जुलूस‘, चिं. त्र्यं. खानोलकरांचे "अवध्य‘, अच्युत वझेंचे "चल रे भोपळ्या टुणूक टुणूक‘, महेश एलकुंचवारांचे "वासनाकांड‘ आणि "पार्टी‘, अकिरा कुरोसावा यांचे "राशोमान‘, दिवाकरांच्या नाट्यछटांना त्यांनी दिलेले नाट्यरूप, असे पालेकरांच्या नाट्यसाधनेच्या मार्गातील लक्षणीय टप्पे आहेत. फक्त नाट्यगृहापुरती नाटकाची व्याप्ती न ठेवता नाटक थेट लोकांपर्यंत नेण्यासाठी त्यांनी केलेले विविध प्रयोगही अत्यंत महत्त्वाचे आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=5jJIb55qGHg
https://www.youtube.com/watch?v=jibrG5b-IpU
१९९० साली सचिन खेडेकर यांनी जीवा सखा या मराठी चित्रपटा द्वारे पदार्पण केले. त्यांचा जन्म १४ मे १९६५ रोजी झाला. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपट केले आहे. मराठी चित्रपटांप्रमाणेच त्यांनी बॉलिवुडमध्येदेखील आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांनी आतापर्यत अनेक बॉलिवुड चित्रपट केले आहे. त्यांचा पहिला बॉलिवुड चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला आहे. जिद्दी असे या बॉलिवुड चित्रपटाचे नाव आहे. आपली माणसे, चिमणी पाखरे, विधिलिखित, लालबाग परळ, शिक्षणाच्या आईचा घो, काकस्पर्श, फक्त लढ म्हणा असे अनेक मराठी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय त्यांचा हा चित्रपट फारच गाजला होता. रूस्तम, क्रिश ३, मुंबई कटींग, आजान, जंग, बादशाह, रॉक, अनुराधा, बबल गम, तीस मार खॉं असे अनेक तगडे बॉलिवुड चित्रपटदेखील त्यांनी केले आहेत.
त्यांची सिंघम या सुपरहीट बॉलिवुड चित्रपटातील गोठया नावाची भूमिका विशेष गाजली होती. कौन होईल मराठी करोडपती हा छोटया पडदयावरील त्यांचा कार्यक्रमाचे अॅकंरींग त्यांनी केले होते. सचिन खेडेकर यांना बॉलिवुड ,मराठी चित्रपट आणि छोटया पडदयावर देखील त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांच्या अभिनयाचे कौतुक नेहमीच ऐकण्यास मिळाले आहे. सैलाब या टीव्ही शोसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कारदेखील मिळाला आहे. तसेच ऐतिहासिक भूमिकेसाठीदेखील त्यांना उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
देसाईंनी फक्त ऐतिहासिक साहित्य लिहिले असे नाही. ग्रामीण साहित्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. सवाल माझा ऐका, रंगल्या रात्री या गाजलेल्या चित्रपटांच्या कथाही त्यांनीच लिहिल्या.
स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला.
बाळ कोल्हटकर यांना नऊ अक्षरांचा नाटककार म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२६ रोजी सातारा येथे झाला. बाळकृष्ण हरी तथा बाळ कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू. मा.बाळ कोल्हटकर यांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतच झाले. लहानपणापासून नाटकांची अतिशय आवड. तसेच लेखनाचीही आवड होती. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी "जोहार" हे आपले पहिले नाटक लिहिले.
१९४७ पर्यंत ते रेल्वेत नोकरी करत होते. त्यानंतर लेखनासाठी आणि रंगभूमीसाठी त्यांनी आपले पुढील आयुष्य वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली नाटकं ही भावनाप्रधान आणि कौटुंबिक अशी असत. त्यांच्या नाटकातील प्रसंग भले बेतलेले असोत थोडेसे अती भावनिक असोत पण सामान्य प्रेक्षकांना अश्रु पुसायला लावत. त्यांची बरीच नाटकं अतिशय लोकप्रिय झाली. व्यवसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाटकं लिहिली होती तरी प्रत्येक नाटकातून काही मूल्य जपली होती. "दुरितांचे तिमिर जावो" या नाटकांचे पंधराशे प्रयोग, 'वाहतो ही दुर्वाची जुडी' या नाटकाचे चौदाशे प्रयोग, मुंबईची माणसे' याचे जवळपास दोन हजाराच्या वर तर 'एखाद्यांचे नशीब' या नाटकांचे हजारावर प्रयोग झाले. यावरुन नाटककार म्हणून लोकांनी त्यांच्यावर किती प्रेम केले याची साक्षच पटते.
बाळ कोल्हटकर हे अंबरनाथच्या खेर विभागात १९५९ ते १९७२ या काळात वास्तव्यास होते. त्यांनी खेर विभागातील प्रसिद्ध हेरंब मंदिरात 'वाहतो ही दुर्वांची जुडी', 'वेगळं व्हायचंय मला', अशी काही प्रसिद्ध नाटकं लिहिली तसेच सीमेवरुन परत जा, लहानपणा देगा देवा, देव दीनाघरी घावला, देणाऱ्याचे हात हजार, उघडलं स्वर्गाचे दार, इत्यादी त्यांची गाजलेली नाटके. त्यांच्या 'वाहतो ही दुर्वांची जुडी', 'दुरितांचे तिमीर जावो', 'वेगळं व्हायचंय मला', अशा नाटकांनी तर गर्दीचे विक्रम रचले. त्यांनी एकंदर ३० हून अधिक नाटके लिहिली. शहरी मध्यमवर्गीय नाटकांबरोबरच कोल्हटकरांनी काही पौराणिक व ऐतिहासिक विषयही हाताळले. 'देव दीनाघरी धावला', 'सीमेवरून परत जा', 'शिवराय कवि भूषण' ही नाटकेही गाजली.
कोल्हटकर उत्तम कवी होते. त्यामुळे त्यांच्या नाटकांत पदेही असत. 'आई तुझी आठवण येते,' व 'निघाले आज तिकडच्या घरी' ही गाणी नाट्यगृहांत प्रेक्षकांना हमखास रडवीत असत. पंडित कुमार गंधर्व व वाणी जयराम यांच्या आवाजातील 'ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तुष्टता मोठी' हे प्रेमद्वंद्वगीत अजरामर झाले. कुमार गंधर्वजींच्याच आवाजातील भूपाळी 'ऊठी ऊठी गोपाळा' आजही सकाळी ऐकू येते. मा.कोल्हटकरांच्या नाटकांच्या शीर्षकांचे एक वैशिष्टय होते की 'एखाद्याचं नशीब', 'आकाशगंगा' असा अपवाद सोडला तर त्यांच्या ३१ पैकी बहुतेक नाटकांची शीर्षके नऊ अक्षरी आहेत. सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवडीची कल्पना असलेल्या कोल्हटकरांनी मध्यमवर्गीय कुटूंबातील प्रश्न हाताळणारी सुखांत नाटकेही लिहिली.
प्रेक्षकांना जे हवे, जे आवडते ते त्यांनी रंगभूमीवर उभे केले. ते उभे करताना कथानकाची सुसूत्रतेनी बांधणी, काव्यात्मक संवाद आणि सुभाषितवजा टाळी घेणारी काही वाक्ये याचा त्यांनी प्रयत्नपूर्वक उपयोग करुन नाटकं यशस्वी केली. नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. मा.बाळ कोल्हटकर यांचे ३० जून १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti