(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • नामवंत हिंदी लेखक व पत्रकार धर्मवीर भारती

    धर्मवीर भारतीं यांचे आडनाव वर्मा. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९२६ रोजी अलाहाबाद येथे झाला. १९४७ मध्ये हिंदी साहित्याची पदवी संपादन केलेले भारती विद्यार्थीदशेपासूनच स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभागी होते. स्वातंत्र्योत्तर काळात काही काळ त्यांनी हिंदी साहित्याचे अध्यापन केले.नंतर ‘अभ्युदय’ या हिंदी साप्ताहिकेतून आपल्या पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली.

    अलाहाबाद विद्यापीठात काही काळ हिंदीचे अध्यापन करून १९६० मध्ये टाईम्स समूहाच्या ‘धर्मयुद्ध’ मध्ये त्यांनी प्रवेश केला. १९८७ पर्यंत ‘धर्मयुग’चे ते संपादक होते. डॉ. धर्मवीर भारतींना आधुनिक हिंदी साहित्याचे अध्वर्यू मानले जाते. त्यांनी ऑस्कर वाईल्डच्या कथांचे हिंदी अनुवादही केले. त्यांचा ‘कनुप्रिया’ हा काव्यसंग्रह हिंदी साहित्यातील एक नवा टप्पा मानला जातो.

    ‘सूरजको सातवाँ घोडा’, ‘गुनाहोंका देवता’ या त्यांच्या साहित्यकृतींवर चित्रपट झाले. सुमारे ५० वर्षे हिंदी साहित्य आणि पत्रकारिता ही क्षेत्रे गाजविणा-या धर्मवीर भारतींची ‘अंधा युग’ ही कलाकृती अजरामर ठरली. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना अनेक साहित्य पुरस्कार दिले. भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरव केला. धर्मवीर भारती यांचे ४ सप्टेंबर १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३.
    संदर्भ.इंटरनेट

    ‘सूरजको सातवाँ घोडा’, ‘गुनाहोंका देवता’ चित्रपट
    https://youtu.be/adP9erjnDQo
    https://youtu.be/JS00ybwPZtw

  • संकेत आहिरे

    संकेत अहिरे यांनी जर्मनी सारख्या प्रतिष्ठीत व तंत्रज्ञानप्रेमी देशात आपल्या प्रगल्भ बुध्दिमत्तेचा व अफाट कल्पनाशक्तीचा सुंदर मिलाफ साधला असून, आपल्या कार्यक्षमतेने सर्वच भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. कन्सेप्ट मिडीया वर्क्स ही जर्मनीमधील प्रथितयश व वेब तसेच संगणक क्षेत्रातील कोणत्याही समस्येवर रामबाण इलाज असणारी कंपनी आहे.

  • टीम इंडियाचा ‘द वॉल’ – राहुल द्रविड

    राहुलचा जन्म ११ जानेवारी १९७३ रोजी मध्य प्रदेशमधील इंदूर इथं एका महाराष्ट्रीय कुटुंबात या प्रतिभावान क्रिकेटपटूचा झाला. मात्र द्रविड कुटुंब कर्नाटकला वास्तव्याला असल्याने त्याचं शालेय शिक्षण बंगळुरूमधील सेंट जोसेफ बॉईस या शाळेत तर कॉलेज सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून झालं. शरद आणि पुष्पा या द्रविड दाम्पंत्याचा हा मुलगा अभ्यासात हुशार आणि सिनसिअर होता. याशिवाय त्याला क्रिकेटचीही तेवढीच आवड होती. राहुलने वयाच्या १२ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरूवात केली.

    शालेय क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा गाजवणाऱ्या राहुलला ३ एप्रिल १९९६ मध्ये प्रथम टीम इंडियासाठी दरवाजे उघडले. यानंतर त्याच वर्षी जूनमध्ये त्याची प्रथमच टेस्ट सीरीजसाठी भारतीय टीममध्ये निवड झाली. यानंतर गेली जवळपास १५ वर्ष द्रविड टीम इंडियाचा एक भक्कम अविभाज्य घटक बनला आहे. त्याने अनेकदा टीम इंडिया संकटात असताना विकेटवर टिच्चून भारताची लाज राखली आहे. त्याच्या या चिकाटी आणि मेहनतीमुळेच त्याला 'द वॉल' ही बिरुदावली चिकटली.

    द्रविडने आतापर्यंत १६२ टेस्टमध्ये ५२.८२ च्या सरासरीने १३ हजार अधिक रन्स केल्या आहेत. यामध्ये ३६ सेंच्युरी आणि ६३ हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. तर ३४४ वन-डेमध्ये त्याने ३९.१६ च्या सरासरीने १० हजार ८८९ रन्स केल्या आहेत. यामध्ये १२ सेंच्युरी आणि ८३ हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. द्रविडची बॅटिंगची शैली ही जगातिल सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे. तंत्रशुद्धता हा त्याच्या बॅटिंगचा आत्मा आहे. याशिवाय मैदानावर आणि मैदानाबाहेरील त्याची वागणूक ही कोणाही क्रिकेटपटूसाठी एक आदर्श आहे. एप्रिल २०१६ पर्यंत राहुल द्रविड हा कसोटी क्रिकेटमधील सचिन तेंडूलकर, रिकी पाँटिंग आणि जॅक कॅलिसनंतर चवथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. तसेच कसोटी आणि एकदिवसीय ह्या दोन्ही प्रकारांत प्रत्येकी १०००० धावा करणारा सचिन तेंडूलकर नंतर तो भारताचा केवळ दुसरा क्रिकेटपटू आहे. २००४ मध्ये, चट्टग्राम येथे बांगलादेशविरूद्ध शतक केल्यानंतर, सर्वच्या सर्व दहा कसोटी खेळणार्या देशांत शतके करणारा, तो जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज बनला. एप्रिल २०१६ पर्यंत, यष्टीरक्षकाव्यतिरीक्त, कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जास्त झेल घेण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. त्याने एकूण १६४ सामन्यांत २१० झेल घेतले आहेत. ऑगस्ट २०११ मध्ये, इंग्लंडविरूद्ध एकदिवसीय मालिकेसाठी अचानक निवड झाल्यानंतर, त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधून निवृत्ती जाहीर केली आणि मार्च २०१२ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेट मधूनही निवृत्ती जाहीर केली. २०१२ इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते. सिडनी येथे १ नोव्हेंबर २०१२ रोजी झालेल्या सातव्या वार्षिक ब्रॅडमॅन पुरस्कार सोहळ्यात राहुल द्रविडचा, ग्लेन मॅकग्रासोबत सन्मान करण्यात आला होता. भारत सरकारने राहुल द्रविडला पद्मश्री आणि पद्म भूषण ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

    २०१४ मध्ये, राहुल द्रविड बंगळूर स्थित गोस्पोर्टस् फाऊंडेशमध्ये सल्लागार मंडळाचा सभासद म्हणून सामील झाला. गोस्पोर्टस् फाऊंडेशनच्या सहकार्याने राहुल द्रविड मार्गदर्शक कार्यक्रमाअंतर्गत तो भविष्यातील ऑलिंपिक आणि पॅरालिंपीक खेळाडूंना मार्गदर्शन करीत आहे.[१६] भारताचा बॅडमिंटन खेळाडू प्रणॉय कुमार, पॅरा-जलतरणपटू शरथ गायकवाड आणि तरूण गोल्फपटू चिक्करंगप्पा एस. हे तो मार्गदर्शन करीत असलेल्या सुरवातीच्या गटातील खेळाडू आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- विकिपीडिया

  • ‘रोमन हॉलिडे’ प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री ऑड्रे हेपबर्न

    ऑड्रे हेपबर्न चे खरे नाव ऑड्रे रस्टन. ऑड्रे हेपबर्न ही मूळची ब्रसेल्सची. ऑड्रे रस्टनने पुढे आपल्या नावातले रस्टन काढून हेपबर्न केले. त्यांचा जन्म ४ में १९२९ रोजी झाला. तिच्या लहानपणी वडिलांची नोकरी फिरतीची असल्यामुळे तिचे वास्तव्य बेल्जियमखेरीज इंग्लंड आणि हॉलंडमध्येही झाले. त्यामुळे ती डच, फ्रेंच, इंग्लिश, जर्मन आणि स्पॅनिश सफाईदारपणे बोलत असे. ब्रसेल्समध्ये प्रथम बॅले नृत्याचे शिक्षण घेतल्यावर ती लंडनच्या वेस्ट एंड या संगीत नाटक कंपनीत कोरस गायिका आणि छोटय़ामोठय़ा भूमिका करू लागली. पुढे ब्रॉडवेवर समावेश झाल्यावर तिची ओळख युरोप- अमेरिकेत एक होतकरू कलाकार म्हणून झाली. १९५१ साली ब्रॉडवेच्या ‘जिगी’ या नाटकात ऑड्रेने केलेल्या भूमिकेने तिला एक अभिनेत्री म्हणून उंचीवर नेऊन ठेवले.

    हॉलीवूडची एक आघाडीची चित्रतारका म्हणून ऑड्रेचे नाव झाले ते १९५३ साली प्रकाशित झालेल्या ‘रोमन हॉलिडे’ या चित्रपटाने. रोमन हॉलिडेमध्ये तिने राजवाडय़ाच्या बंदिस्त आयुष्याला कंटाळून बाहेरचे मुक्त जग अनुभवण्यासाठी पळून शहरात गेलेल्या एका राजकन्येची भूमिका साकारली. तिने साकारलेल्या अल्लड, अवखळ, निरागस राजकन्येने ऑड्रेला १९५४ सालचे उत्कृष्ट अभिनेत्रीचे अकॅडमी अॅजवॉर्ड म्हणजेच ऑस्कर अॅावॉर्ड मिळवून दिले. त्यानंतरच्या तिच्या साब्रीना (१९५४), द नन्स स्टोरी (१९५९), ब्रेकफास्ट अॅकट टिफनीज (१९६१), शराड (१९६३), माय फेअर लेडी (१९६४) तसेच वेट अन्टिल डार्क (१९६७) या चित्रपटांतील अभिनयाने लोकप्रियतेचे शिखर गाठले. या चित्रपटांपकी पाच चित्रपटांतील सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचे ऑस्कर पुरस्कार ऑड्रेला मिळाले आणि बाकी चित्रपटांसाठी तिला गोल्डन ग्लोब, सेसिल डिमेलो अॅिवॉर्ड, ग्रॅमी अॅकवॉर्ड, सिने अॅिक्टर्स गिल्डतर्फे जीवनगौरव हे पुरस्कार मिळाले.

    १९८८ साली चित्रपट क्षेत्रातून निवृत्ती स्वीकारल्यावर ऑड्रेने तिच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९३ पर्यंत युनिसेफसाठी इथिओपिया, सुदान, सोमालिया वगरे दुष्काळग्रस्त आणि गरीब देशांतील कुपोषित मुलांसाठी मदतकार्य केले. ऑड्री हेपबर्न यांचा अभिनय, त्यांचे सौंदर्य व त्यांची सामाजिक जाणीव या विषयी विनिता महाजनी यांनी ‘मृगनयनी मनस्विनी : ऑड्री हेपबर्न’ हे पुस्तक लिहिले आहे. ऑड्रे हेपबर्नचे २० जानेवारी १९९३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रसिध्द चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर

    आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रसिध्द चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांच जन्म १ जानेवारी १९३४ रोजी बांदोडा-गोवा येथे झाला. प्रफुल्ला दिलीप डहाणूकर, माहेरच्या प्रफुल्ला सुब्राय जोशी. प्रफुल्ला डहाणूकर या एक मराठी चित्रकार होत्या. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, आर्टिस्ट्सद सेंटर, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, गोवा कला अकादमी आदी अनेक कलासंस्थांच्या त्या अध्वर्यू होत्या.

    प्रफुल्ला डहाणूकर यांचे वडील सुब्राय अनंत जोशी, यांचा वाहतुकीचा व वाहनांचा व्यवसाय होता. प्रफुल्ला डहाणूकर पाच वर्षांची असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईत आले. प्रफुल्लाचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले. शाळेच्या मासिकासाठी तिने काढलेली चित्रे बघून वडिलांनी तिला कलाशिक्षणासाठी ’जे.जे.स्कूल ऑफ आर्ट’मध्ये दाखल केले. १९५५ मध्ये जे.जे मधून सुवर्णपदक मिळवून कलापदवीधर झाल्यानंतर प्रफुल्ला डहाणूकर चित्रकलेच्या अधिक शिक्षणासाठी फ्रान्स सरकारची शिष्यवृत्ती मिळवून १९६१ मध्ये पॅरिसला गेल्या, आणि शिक्षण पूर्ण करून परत भारतात आल्या. त्या भित्तिचित्रांमध्ये खास प्रवीण होत्या.

    भारतामध्ये अशा चित्रांसाठी त्यांनीच पहिल्यांदा रोलरचा वापर सुरू केला. जे. जे. मधून पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात रौप्य पदक (सिल्व्हर मेडल) मिळवत त्यांनी आपल्या चित्रकलेतल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली होती. वर्षभरातच त्यांनी स्वतःची चित्र प्रदर्शने भरवून कलाप्रेमींची मने जिंकली. चित्रकलेच्या क्षेत्रातील त्यांची कारकिर्द वाखाणण्याजोगी ठरली. चित्रकलेतल्या सुवर्ण महोत्सवी कारकिर्दीचा गौरव म्हणून जहांगीर आर्ट गॅलरीने त्यांना निवडक चित्रांचे विशेष प्रदर्शन भरवण्याचा बहुमान दिला होता.

    फ्रान्सने दिलेल्या शिष्यवृत्तीद्वारे कला शाखेचा अभ्यास करत असताना त्यांनी फ्रान्स, इंग्लंड, हंगेरी, स्विर्त्झलंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, पोर्तुगाल, आइसलंड या ठिकाणी भरवलेली प्रदर्शने प्रचंड गाजली होती. भारतीय दूतावासाने तब्बल तीन वेळा लंडनमध्ये डहाणूकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजीत केले होते. ही तिन्ही प्रदर्शने कलाविश्वात कौतुकास पात्र ठरली होती. सिटी बँक आणि बार्कले बँकेनेही डहाणूकर यांची विदेशात प्रदर्शनं आयोजीत केली होती. त्यांच्या दुबईतल्या एका प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या हस्ते झाले होते. प्रफुल्ला डहाणूकर यांचे निधन १ मार्च २०१४रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जगप्रसिद्ध नर्तक उदयशंकर

    जगप्रसिद्ध नर्तक उदयशंकर यांचा जन्म ८ डिसेंबर १९०० रोजी जन्म राजस्थान मधील उदयपुर येथे झाला. उदयशंकर चौधरी ऊर्फ उदयशंकर मुळचे नाराली गावचे. त्यांचे वडिल जमीनदार होते. हारचौधरी ही त्यांना पदवी होती. पुढे चौधरी हेच रुढ झाले. त्यांचे वडिल संस्कृतचे पंडित होते. त्यांना तीन लहान भावंड होती. राजेंद्रशंकर, देवेंद्रशंकर, भुपेंद्रशंकर व रवीशंकर. पैकी रवीशंकर हे पुढे जगप्रसिद्ध सतार वादक झाले.

    १९१८ साली शिक्षणा साठी मुंबई जेजे स्कुल ऑफ आर्ट्स येथे प्रवेश घेतला.पुढे गंधर्व महाविद्यालयातही शिक्षण घेतले. १९२० साली लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्स येथे प्रवेश घेतला. तिथे भारतीय नृत्य व पाश्चात्य नृत्य यांचा सखोल अभ्यास करुन दोन्हीचे फ्युजन केले. १९३१ साली पँरीस येथे Indian Dance Academy ची स्थापना केली. जानेवारी १९३३ ला ते अमेरिकेत गेले.

    न्युयॉर्क मधे पहिला शो झाला. त्या नंतर अमेरिकेतील ८४ शहरात त्यांचे शो झाले. १९६२ साली ' संगीत नाटक अकादमी ' चा पुरस्कार त्यांना मिळाला. १९६५ साली कोलकाता येथे त्यांनी Udayshankar center for dance या संस्थेची स्थापना केली. १९७१ साली भारताच्या सरकारने त्यांना पद्मविभुषणने सन्माननीत केले. संपुर्ण युरोप, अमेरिका, रशिया सह जगातील अनेक देशात त्यांचे नृत्याचे कार्यक्रम झाले.

    त्यांना दोन अपत्य, आनंदशंकर व ममताशंकर. आनंदने न्रत्यातच आपले करियर केले. तर ममताने अभिनयात आपला ठसा ऊमटवला. सत्यजीत रे, मृणाल सेन सारख्या दिग्दर्शका सोबत काम केले. ममताने हॉलीवुड चित्रपटात बालकलाकार म्हणुन काम केले.

    उदयशंकर यांच्या कलेने भारतीय नृत्य जगभर प्रसिद्ध झाले. उदयशंकर यांचे निधन २६ सप्टेंबर १९७७ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • लेखिका अरुणा ढेरे

    ‘आदिबंध आणि स्वातंत्र्योत्तर मराठी कथा-कादंबरी’ या विषयासाठी त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. पाच राज्य पुरस्कार, ‘मसाप’चे सहा पुरस्कार, बहिणाबाई प्रतिष्ठान, काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठान पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे.

  • जेष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर

    जेष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३० गोव्यातील माशेल येथे झाला. मोहनदास सुखटणकर यांचे पणजोबा, आजोबा आणि वडील हे त्या काळातील प्रख्यात वैद्य. मोहनदास यांचे प्राथमिक आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण माशेल आणि म्हापसा येथे झाले. म्हापशाच्या ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच एका छोटया नाटुकलीत काम केले.

    त्या नाटुकलीचे नाव होते, ‘खोडकर बंडू’. अभिनय येतो म्हणून नाही, तर वर्गात सतत बडबड करतो म्हणून, आरोंदेकर मास्तरांनी त्या नाटुकलीत काम करायची त्यांना शिक्षा केली होती. त्या नाटुकल्याच्या निमित्ताने मोहनदास सुखटणकरांच्या गालाला जो पहिल्यांदा रंग लागला तो कायमचा. नाटुकलीत खोडकर बंडूची प्रमुख भूमिका करून ज्या वेळी त्यांनी बक्षीस पटकावले, त्या वेळी प्रेक्षकांनी त्यांच्या धिटाईचे कौतुक केले. या नाटुकलीमुळेच सुखटणकरांना नाटकाची गोडी लागली. त्या निमित्ताने आपल्याला मुळातच अभिनयाची आवड होती याची जाणीवही त्यांना झाली.पुढे गोव्यात ‘अँग्लो-पोर्तुगीज इन्स्टिटय़ूट’ या हायस्कूलमध्ये शिकत असताना शाळेच्या वार्षिक संमेलनातून तीन ते चार वर्ष स्व-लिखित कोकणी प्रहसनांतून मोहनदासांनी विनोदी भूमिका साकारल्या व पारितोषिकेही मिळवली.

    तेव्हा अभिनयात करिअर करायचे आहे, असे काही त्यांच्या मनात नव्हते. पण छंद म्हणूनच सुखटणकर सारे करीत होते. त्यांच्या गांधीवादी विचारांच्या मामांचे एक सांगणे असायचे, आयुष्यात छंद जोपासावेत, पण मुख्य कामाकडे दुर्लक्ष करून नाही. मामांचे विचार त्यांच्यावर बिंबले ते कायमचे. त्यामुळे अभिनयाचा छंद जोपासताना सुखटणकरांनी शाळेच्या अभ्यासाची कधीही हेळसांड केली नाही. गावी मॅट्रिकच्या परीक्षेचे केंद्र नसल्याने १९५० मध्ये ते परीक्षेसाठी मुंबईला आले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी नोकरीची शोधाशोध सुरू केली. ‘बर्मा शेल’ मध्ये लेखी परीक्षा व मुलाखतीत यशस्वी झाले, पण वैद्यकीय चाचणीत कमी वजन भरल्याने त्यांना नोकरी मिळाली नाही. बॅलार्डपिअर येथून चर्चगेटला चालत निघाले असताना मुंबईत राहून काय करायचे, पुन्हा गोव्याला जाऊ या असा विचार त्यांच्या मनात घोळायला लागला. फ्लोरा फाउंटनजवळ ते आले असता एक गाडी थांबली.

    गाडीत ‘इकॉनॉमिक टाइम्स’चे सहसंपादक डी. के. रांगणेकर होते. रांगणेकर कुटुंब मूळचे गोव्याचे असल्याने ते सुखटणकर कुटुंबीयांना ओळखत होते. विचारपूस झाल्यानंतर रांगणेकर यांनी त्यांना गाडीत बसायला सांगितले व त्यांना चष्म्याच्या काचा व फ्रेम बनविणाऱ्या ‘माँटेक्स कॉर्पोरेशन’ कंपनीच्या मालकांकडे घेऊन गेले. ‘याला नोकरी द्या’ अशी विनंती मालकाला केली. येथे ‘टंकलेखक’ म्हणून सुमारे सहा महिने त्यांनी नोकरी केली. १ एप्रिल १९५१ मध्ये ‘ओरिएन्टल इन्शुरन्स’ मध्ये ते ‘लिपिक’ म्हणून लागले आणि ३० नोव्हेंबर १९९० मध्ये महामंडळाच्या सेवेतून ‘प्रसिद्धी अधिकारी’ म्हणून निवृत्त झाले. नोकरी करत असताना ते जयहिंद महाविद्यालयातून ‘अर्थशास्त्र’ विषय घेऊन ‘बी.ए.’ झाले.

    महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी डॉ. चारुशीला गुप्ते यांनी जयहिंद मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना करून सुखटणकरांना सचिव बनवले. या वाङ्मय मंडळांतर्गत विविध कार्यक्रम झाले.. महाविद्यालयाच्या वसतिगृहासाठी ‘लग्नाची बेडी’ हे नाटक करून मंडळाने निधी जमा केला. त्यार नाटकात मोहनदास यांनी ‘गोकर्ण’ची भूमिका साकारली होती. आत्माराम भेंडे, आशा भेंडे, बबन प्रभू ही व्यावसायिक रंगभूमीवर काम करणारी माणसेही त्यात होती.

    त्यानंतर सुखटणकर विविध एकांकिका स्पर्धांमधून भाग घेऊ लागले. त्यांनी एकांकिकांतून फक्त विनोदी भूमिकाच केल्या नाहीत, तर गंभीरही केल्या. ‘वहिनी’ या एकांकिकेत त्यांनी ‘वल्लभ’ची गंभीर भूमिका रमाकांत देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारली.

    ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या स्पध्रेत चारुशीला गुप्ते यांच्या ‘आम्ही सारेच वेडे’चा प्रयोग झाला. त्यात सुखटणकरांनी एका प्रौढाची विनोदी भूमिका वठवून उत्कृष्ट अभिनयासाठी असलेले पारितोषिक मिळवले. भारतीय विद्याभवनात ‘आंतर महाविद्यालयीन नाट्यस्पर्धा’ व्हायच्या. तिथे सुखटणकरांनी ‘भाऊबंदकी’त काम केले आणि. गंगाधर गाडगीळांच्या ‘वेडयांचा चौकोना’तही केले.. या दोन्ही नाटकांसाठी त्यांना बक्षीस मिळाले.१९५८ साली बी. ए. झाल्यावर मोहनदास सुखटणकर मुंबईतच ‘गव्हर्नमेंट लॉ कॉलेज’मध्ये शिकू लागले.आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत या कॉलेजने सादर केलेल्या ‘बळी’ आणि ‘लाल गुलाबाची भेट’ या एकांकिकांसाठी त्यांना अभिनयाची प्रशस्तीपत्रके मिळाली. १९५९ साली महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धेत ‘इंडियन नॅशनल थिएटर’ने ‘अशीच एक रात्र येते’ हे प्रा. प्रभाकर ताम्हाणे यांचे नाटक सादर केले.

    त्यात भय्यासाहेब वकील ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका मोहनदास सुखटणकरांनी वठवली. या नाटकात त्यांच्याबरोबर प्रसिद्ध लेखिका विजया पाटील यांनी काम केले होते, तर भय्यासाहेब वकिलाच्या मुलीची भूमिका मीनल मडकईकर यांनी केली होती. या नाटकाच्या प्रयोगाला ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’चे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी सुखटणकरांनाला गाठून ‘तू गोव्याचा. आमच्या संस्थेत तू असलंच पाहिजेस,’ वगैरे गोष्टी सुनावल्या, आणि त्यांना ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’मध्ये घेतले.

    मोहनदास सुखटणकर यांच्या आयुष्यात आणि नाटय़ प्रवासात ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ला खूपच महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थेत अगोदर त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर ‘कार्यकर्ता’ भूमिकेत वावरले. संस्थेच्या बहुतेक नाटकांमधून मोहनदास सुखटणकर यांनी कामं केलीत. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात स्त्रीपात्र सोडून त्यांनी बहुतेक भूमिका साकारल्या. मोहनदास सुखटणकर यांनी चाळीस नाटकांमधून कामं केली आहेत. मत्स्यगंधा (चंडोल) , लेकुरे उदंड झाली (दासोपंत ), अखेरचा सवाल (हरिभाऊ), दुर्गी (मोरोबा नाडकर्णी), स्पर्श (नाटेकर), आभाळाचे रंग (आबा) ही काही त्यांची गाजलेली नाटकं.

    नाटकांप्रमाणेच त्यांनी ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ आदी मराठी चित्रपटांतही काम केले आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रांवरील अनेक श्रुतिका, नभोनाटय़ यातही ते सहभागी झाले. मुंबई दूरदर्शन केंद्रावरील विविध नाटके, ‘गजरा’ या कार्यक्रमात ते होते. ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘महाश्वेता’ या त्यांच्या निवडक मराठी मालिका तर ‘आनंदी गोपाळ’, ‘सिंहासन’, ‘नई दुनिया’ या हिंदूी मालिका. पण दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकेत ते फारसे रमले नाहीत. नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचा निकटचा सहवास त्यांना लाभला. शिरवाडकर यांचे मोठे ऋण आपल्यावर असल्याचे ते मानतात.

    शशी मेहता यांच्यासह सुखटणकर यांनी शिरवाडकर यांच्या नाटकातील स्वगते, कविता यांचा समावेश असलेला ‘शब्दकळा कुसमाग्रजांच्या’ हा कार्यक्रम सादर केला. कुसुमाग्रज यांच्या सूचनेवरूनच ‘गोवा हिंदू’ने गोव्यात १९८१ ‘स्नेहमंदिर’ वृद्धाश्रम उभारला. रामकृष्ण नायक यांच्याबरोबर सुखटणकर यांचेही या कामात योगदान आहे. साहित्य, सांस्कृतिक, नाटय़ क्षेत्रातील दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. पु. ल. देशपांडे, पं. भीमसेन जोशी, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, शंकर वैद्य, सुधीर मोघे, वसंत कानेटकर, भास्कर चंदावरकर, जयवंत दळवी, व. पु. काळे आदी मंडळी या ना त्या निमित्ताने अनेकदा त्यांच्या घरी आली आहेत.

    मोहनदास सुखटणकर यांना राजहंस प्रतिष्ठान' या संस्थेतर्फे देण्यात येणारा 'राजहंस पुरस्कार' , नाट्यक्षेत्राची ५०हून अधिक वर्षे सेवा केल्याबद्दल मुंबईच्या ’आम्ही गोवेंकर’ या प्रतिष्ठित संस्थेकडून जीवनगौरव पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहेत.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • संगीतकार त्यागराज खाडिलकर

    त्यागराज यांची आई श्रीमती मंजुश्री खाडीलकर या ख्यातनाम किर्तनकार, त्यांनी ’किर्तन मंदाकिनी’ ही पदवी मिळविली. त्यांचा जन्म ११ जून १९६७ रोजी झाला. त्यांची आजी श्रीमती इंदिराबाई खाडिलकर ह्या गंधर्व गायकीसाठी प्रसिद्ध. स्वातंत्र सैनिक, पत्रकार, नाटककार श्री. मा.कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडिलकर हे त्यांचे पणजोबा.

    बालपणी त्यांनी विख्यात गायक, नट कै. डॉ वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर ’कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकामध्ये काम केले. त्याचबरोबर मा. शरद तळवलकर यांच्याबरोबर बालकलाकार म्हणुन ’सखी शेजारणी’ या विनोदी नाटकामध्ये काम केले. तसेच अष्टपैलु व्यक्‍तिमहत्त्व असलेल्या मा. पु. ल. देशपांडे यांच्या ’वार्यावरची वरात’ या चंद्रलेखाचे मोहन वाघ द्वारा निर्मीत नाटकातही काम केले. त्याचबरोबर त्यांनी ’निवडुन’ या दैनंदिन मालिकेतही अभिनय केला.

    त्यांनी सगीताचे आणि नाट्य गीताचे शिक्षण आपल्या आजी श्रीमती इंदिराबाई खाडिलकर आणि किराणा घराण्याचे गायक पंडित गंगाधरबुआ पिंपळखरे यांच्या कडून घेतले.त्यांना ’गानहिरा’ हा सन्मान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारा आयोजित अंतर महाविद्यालयीन शास्त्रीय गायनाच्या स्पर्धेमध्ये मिळाला.
    ’बिच्छू बाइट’(विंचु चावला) हा युनिवर्सल द्वारा निर्मित त्यांनी आवाज दिलेला अल्बम खूप गाजला.

    त्यांनी दत्‍ता डावजेकर, अनिल मोहिले, श्रीधर फडके, राम-लक्षम, अशोक पत्‍की,अवधुत गुप्‍ते या सारख्या सर्व विख्यात संगीतकारांबरोबर काम केले आहे. त्यांनी जवळ-जवळ ३५ मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. त्यांनी सुपरस्टार भरत जाधव यांना ’चालु नवरा भोळी बायको’ व मकरंद अनासपुरे यांना ’काय द्याच बोला’ या चित्रपटांसाठी आवाज दिला. त्यांनी संगीतकार आनंद मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली ’दिशा’ व संगीतकार बप्पी लहरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदाबहार हिरो देव आनंद दिग्दर्शित ’मि. प्राय मिनिस्टर’ या हिन्दी चित्रपटांसाठीही पाश्वगायन केले.त्यांनी ६० पेक्षा ही जास्त मालिकांची शिर्षक गीते गायिली आहेत.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #TyagrajKhadilkar

  • बलवंत संगीत मंडळीतील प्रमुख स्त्रीपार्टी नट मास्टर अविनाश

    मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचे शालेय शिक्षण मिरज येथेच इयत्ता पहिलीपर्यंत झाले. त्यांचा जन्म १ जानेवारी १९०९ मिरज येथे झाला. वडील लक्ष्मणरावांना संगीताची आवड होती. संगीताचे भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांकडे ते थोडीफार गायकी शिकले होते. गणपतरावांना २ भाऊ आणि ५ बहिणी. मोठा बळवंत हा बळवंतराव मराठे यांच्या ‘हिंदी नाटक मंडळीत’ बालनट होता. मधला शंकर हा जनुभाऊ निमकरांच्या ‘स्वदेश हितचिंतक मंडळीत होता. पुढे लक्ष्मणरावांनी शंकर आणि गणूला संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’मध्ये दाखल केले. ललितकलादर्शच्या ‘शापसंभ्रम’ मध्ये गणूने महाश्वेताच्या मैत्रिणीचे काम केले. मराठी संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या किर्लोस्कर संगीत मंडळीतील दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांनी ‘किर्लोस्कर’मधून बाहेर पडून नवीन नाटय़संस्था काढण्याचे ठरविले. १८ जानेवारी १९१८ रोजी बोरिवली येथे या नवीन ‘बलवंत संगीत मंडळी’ची स्थापना झाली. या तीन प्रमुख कलाकारांबरोबरच अन्य कलाकारांचीही संस्थेला आवश्यकता होती.

    शंकर आणि गणू या बालनटांची कीर्ती ऐकून कृष्णराव कोल्हापुरे यांनी त्यांना ‘बलवंत’मध्ये आणले. ज्या बलवंत संगीत मंडळीने गणूचे आयुष्यच बदलून टाकले, उजळून टाकले त्या कंपनीत गणू वयाच्या दहाव्या वर्षीच दाखल झाला.
    नाटय़ाचार्य अण्णासाहेब (बळवंत) किर्लोस्कर आणि लोकमान्य टिळक यांच्या नावाचा सार्थ अभिमान बाळगणारी बलवंत कंपनी राष्ट्रकार्यातही अग्रेसर होती. कंपनीच्या स्थापनेनंतर लगेचच लोकमान्य टिळकांच्या होमरूल चळवळीच्या फंडासाठी आयोजित केलेल्या ‘पुण्यप्रभाव’ या नाटकाच्या प्रयोगाला स्वत: लोकमान्य टिळक हजर होते. या नाटकात युवराजाची भूमिका करताना गणूच्या ‘भुलूनिया खलजनालापा’ ‘दुर्दैवे हेतू झाला’ ‘अंतरि खेद भरे’ या पदांना आणि भूमिकेला श्रोत्यांची भरपूर दाद मिळाली. पदांना ‘वन्समोअर’ मिळाले. मध्यंतरात लोकमान्यांनी गणूचे विशेष कौतुक करताना म्हटले,‘युवराजाची सुंदर भूमिका करणऱ्या या मुलाचे कौतुक करावेसे वाटते. याला काहीतरी द्यायला हवे. पण मी हा असा! काय देऊ या मुलाला?’

    टिळक असे म्हणताहेत तोच त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या गृहस्थांनी आपली सोन्याची अंगठी काढून टिळकांच्या हातात दिली. ‘‘या सद्गृहस्थांनी दिलेली ही अंगठी मी या मुलाला बक्षीस देतो,’’ असे म्हणून टिळकांनी ती अंगठी गणूच्या बोटात घातली.

    पुढे १९३१ मध्ये झालेल्या बलवंतच्या स्वातंत्र्यवीर सावरकरलिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकाच्या वेळीही नलिनीच्या अप्रतिम भूमिकेबद्दल स्वातंत्र्यवीरांनी त्यांचे कौतुक केले. शासकीय पुरस्कारांकडून सदैव उपेक्षित राहिलेल्या गणपतरावांना लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीरांनी केलेले हे कौतुक कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे वाटत असे.

    १९१८ ते १९४० या बलवंत कंपनीच्या कार्यकाळात गणपतरावांनी कंपनीचे मुख्य कलाकार दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्याबरोबर प्रामुख्याने स्त्री भूमिका केल्या. शारदा, उग्रमंगल, भावबंधन, राजसंन्यास, संन्यस्त खड्ग, ब्रह्मकुमारी इ. नाटकातील त्यांच्या भूमिका रसिकांना पसंत पडल्या. दीनानाथांच्या सहवासात आणि त्यांच्याकडून मिळालेल्या संगीत शिक्षणाने गणपतरावांची कला बहरली. बलवंत कंपनीच्या मालकांनी कपंनी बंद करून ‘बलवंत पिक्चर्स’ ही चित्रपटनिर्मिती संस्था काढली. दीनानाथांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही तरी ‘कृष्णार्जुन युद्ध’, ‘ठकीचं लग्न’, ‘भक्त पुंडलिक’, ‘अंधेरी दुनिया’ या चित्रपटातील गणपतरावांच्या भूमिका रसिकांना भावल्या. यातील काही चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले. दीनानाथांच्या अकाली निधनानंतर त्यांनी मो. ग. रांगणेकराच्या ‘आशीर्वाद’, ‘कुलवधू’ इ. नाटकात प्रमुख भूमिका केल्या. अत्रे पिक्चर्सच्या ‘पायाची दासी’ या चित्रपटाच्या वेळी आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘मा.अविनाश’ हे नाव दिले आणि तेच पुढे रूढ झाले. मास्टर अविनाश यांचे मंगेशकर कुटूंबियांशी त्यांचे घनिष्ठ सबंध होते. दिनानाथ मंगेशकरांच्या पडत्या काळात त्यांनीच हात दिला. दीनानाथांनंतर ह्रदयनाथ, लतादीदींना त्यांनी आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं. दीनानाथांचेही गणपतराव हे प्रिय शिष्य सहकारी होते. १९४२ साली दीनानाथांच्या निधनाच्या वेळी गणपतराव पुण्यात नव्हते. दीनानाथांनी मृत्यूपूर्वी आपल्या या प्रिय शिष्याची आठवण काढताना,

    ‘इतुके कळवि आजि माझ्या गुरुला’
    ‘मरताही भय नाही शिवले कचाला’
    या विद्याहरण नाटकातील पदात थोडा पदल करून
    ‘इतुके कळवि आजि माझ्या गणूला
    मरताही भय नाही शिवले दिनाला’
    असा निरोप गणूसाठी ठेवला.

    संगीत आणि नाटय़क्षेत्रातून अकाली, अकारण निवृत्ती घेतलेल्या गणपतरावांनी १९५३-५७ मध्ये तळेगाव दाभाडे येथे ‘अशोक सहकारी शेतकरी संघा’च्या माध्यमातून सामुदायिक शेतीचा प्रयोग केला. त्यानंतर मात्र सांगली येथे जाऊन वानप्रस्थ जीवन ते व्यतीत करू लागले. सांगलीकरांनी त्यांचा योग्य तो सन्मान करताना ‘‘विष्णुदास भावे पुरस्कार’, ‘सांगली भूषण’ हे पुरस्कार त्यांना दिले. तरी शासकीय सन्मान त्यांच्या योग्यतेनुसार मिळणे आवश्यक होते ते त्यांना मिळाले नाहीत. शासनदरबारी त्यांची उपेक्षा झाली हे शल्य त्यांच्या मित्रपरिवाराला आणि चाहत्यांना अस्वस्थ करणारे आहे. मास्टर अविनाश हे संगीत आणि नाटय़क्षेत्राचा चालताबोलता इतिहास आणि शतकाचा साक्षीदार होते. मास्टर अविनाश यांचे निधन ३ एप्रिल २००९ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ डॉ. रवींद्र घांगुर्डे