जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मराठी रंगभूमीवरील व चित्रपटातील एक प्रसिध्द गायक-नट म्हणून गोविंद पंत यांची ख्याती होती. आपल्या आयुष्यातील बहुतांश कार्यकाळ पंत यांनी मराठी रंगभूमीचं संवर्धन करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. “मृच्छकटिक”, “संगीत सौभद्र”, “लग्नाची बेडी” ही नाटके रंगभूमीवर आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
चित्रपट निर्माते व दिग्दर्शक व्ही.शांताराम यांच्या “अमरभूपाळी” या चित्रपटात होनाजी बाळाची भूमिका गोविंद पंतांनी साकारली होती. तसंच लता मंगेशकर यांच्याबरोबर “घनः श्याम सुंदरा” या गाण्यावर आपल्या पहाडी स्वरांचे साज चढवून ही भूपाळी अविस्मरणीय केली. भावमधुर आवाज, तल्लीनता, हे त्यांच्या गायनातील उल्लेखनीय गुण होते.
“सिंहासन” मधील “माणिकराव” यांची दत्ता भट यांची एक अजरामर भूमिका. हा जब्बार पटेलांचा सिनेमा अप्रतिमच आहे. या चित्रपटातील दत्ता भट हे सत्यनारायणासमोर साष्टांग दंडवत घालून मनातील विचार तो बोलतात, त्यावेळचा मुद्राभिनय आणि आवाजाचा बाज व फेक जबरदस्त होती.
भालजींनी काही काळ पुण्यातील केसरी वृत्तपत्रात नोकरी केली. ते नाटकाकडे वळले व जवळ जवळ सहा नाटके त्यांनी लिहिली तसंच नाटकात कामही केले. याच दरम्यान भालजींनी कोल्हापूर येथील महाराष्ट्र फिल्म कंपनीसाठी काम सुरू केले. त्यांचा जन्म २ मे १८९८ रोजी झाला. एका चित्रपटासाठी त्यांनी लेखनही केले; पण दुर्दैवाने तो चित्रपट पडद्यावर आला नाही. तेथून ते बाहेर पडले. तोरणे आणि पै यांच्यासोबत त्यांनी “पृथ्वीवल्लभ’ चित्रपटाची योजना आखली. याचे पटकथालेखन आणि रंगभूषा व अभिनयही केला. हा चित्रपट लोकप्रिय झाला आणि बाबांना पटकथा लेखनाचे काम वाढले. पण भालजीना दिग्दर्शक व्हायचे होते.
श्याबमसुंदर, महारथी कर्ण, कालियामर्दन, सावित्री, नेताजी पालकर, जयभवानी, पावनखिंड यांसारखे एकापेक्षा एक सरस चित्रपट भालजीनी दिले. १९४८ मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये भालजींचा कोल्हापूर येथील ‘जयप्रभा’ स्टुडिओ जाळला गेला. चित्रपटांची संपूर्ण आघाडी सांभाळणारे भालजी पेंढारकर यांची वाटचाल अगदी सहजसोपी अशी झाली नाही. नव्याने तयार केलेला ‘मीठभाकर’ , ‘मेरे लाल’ हे चित्रपट आगीत भक्षस्थानी पडले. दीडशे ते दोनशे कामगार बेकार झाले.पण भालजींनी पुन्हा लाखो रुपये खर्चून ‘जयप्रभा’ स परत उभे केले. जिद्दीतून ‘मीठभाकर’ व ‘मेरे लाल’ ची पुनर्निर्मिती केली व मीठ भाकरने चांगला व्यवसाय देखील केला. भालजींनी कोल्हापुरात मराठी चित्रनिर्मितीस वेग मिळवून दिला. बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, मोहित्यांची मंजुळा यांतून लाचारी विरुद्ध शाद्बिक आसूड संवादातून ओढले. ‘शिवकाळ’ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती.
भालजीं पेंढारकारांचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी संस्था होती. या माध्यमातून भालजींनी सुलोचनादीदी, चंद्रकांत, सूर्यकांत, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले. भालजी पेंढारकरांनी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानासाठी अनेक पुरस्कारांने त्यांना सन्मानीत करण्यात आलं यामध्ये ‘तांबडी माती’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद या विभागात राष्ट्रीय पारितोषिक, चित्रभूषणजीवन गौरव, ग.दि.मा. पुरस्कार, तसंच १९९१ साली भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा व सर्वोच्च अश्या दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. कलेची साधना अगदी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम निभावली आणि “साधा माणूस” ही स्वत:ची ओळख नेहमी जपली. भालजी पेंढारकर यांचे उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “थोरातांची कमळा”, “तांबडी माती”, “साधी माणसं”, “मराठा तितुका मेळवावा”, “छत्रपती शिवाजी’, “मोहित्यांची मंजुळा”, “घरची राणी’, “स्वराज्याचा शिलेदार”, “कांचनगंगा” ,”महाराणी येसुबाई” ,”बाल शिवाजी”, “प्रीत तुझी माझी” आणि “शिलंगणाचे सोने’.
भालजी पेंढारकर यांचे २६ नोव्हेंबर १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मराठी सिने-नाट्य क्षेत्रातील एक चतुरस्त्र अभिनेत्री म्हणजे ज्योती चांदेकर.
पुण्याच्या सरस्वती नाट्यमंदिरात शिकताना केवळ आवड म्हणून ज्योती चांदेकर यांनी तिथल्या नाट्यवाचन स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. याच वाचनावेळी बाबा ओक यांनी ज्योती यांची गुणवत्ता हेरुन त्यांना' सुंदर मी होणार' या नाटकासाठी विचारलं. त्यांच्या नाटकातल्या कलाकाराची झालेली अडचण लक्षात घेऊन ज्योती यांनी अवघ्या १४ व्या वर्षी रंगमंचावर पाऊल ठेवलं आणि अल्पावधीतच ती हौस न उरता त्यांचं प्रोफेशन बनलं. या नाटकातलं त्यांचं काम पाहून 'नाट्यसंपदा' च्या प्रभाकर पणशीकर यांनी आपल्या 'बेइमान' या नाटकासाठी विचारणा केली. ज्योती तिथेही उभ्या राहिल्या त्या बदली खेळाडू म्हणूनच. यावेळी त्यांचा सहकलाकार होते सतीश दुभाषी. नवोदित ज्योती यांच्यांवर शाबासकीची पहिली थाप पडली ती दुभाषी यांच्याकडूनच.
मुंबईतल्या नाटकांमध्ये चुणूक दाखवतानाच, त्यांनी आपलं मूळ गाव पुणे मात्र सोडलं नाही.'थ्री स्टार्स' या बाबूराव गोखले यांच्या संस्थेतून 'वर्हाडी माणसं', 'स्वयंसिद्धा', 'प्रेमा तुझा रंग कसा ?' आदी अनेक नाटकं केली. घरातल्या दोन धाकट्या बंधूंची असलेली जबाबदारी लक्षात घेऊन ज्योती यांनी त्याकाळी ऑर्केस्ट्रामधून आपलं नृत्यकौशल्यही दाखवलं. अनेक लोकनाट्यातून काम केलं. परंतु, अभिनेत्री म्हणून मोठी लोकमान्यता त्यांना मिळाली ती १९७५ साली आलेल्या 'रखेली' या नाटकामुळे. अरुण सरनाईकही या नाटकात मुख्य भूमिका करत. हे नाटक होतं आशयघन. पण त्या काळी 'प्रौढांसाठी' च्या नाटकांचं पेव फुटलं होतं. त्यात हे नाटक विनाकारण भरडलं गेलं असलं, तरी ज्योती यांच्या कामाचं कौतुक होत होतं. त्यानंतर 'श्रीचिंतामणी', 'सुयोग' आदी बड्या संस्थांमधून त्यांनी अनेक नाटकं केली. 'नाट्यदर्पण', 'रंगदर्पण' आदी अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.
अनेक नाटकांतून त्यांच्या अभिनयाचा धडाका सुरू असतानाच, आठ वर्षांपूर्वी आलेल्या 'मित्र' नाटकानंतर मात्र तब्येतीच्या कारणास्तव ज्योती यांनी नाट्यसृष्टीतून काढता पाय घेतला. पुढे पाचेक वर्षं ज्योती पुण्यातच होत्या. त्यांचं मोठं कमबॅक झालं ते 'सुखान्त' या सिनेमातून. यातील भूमिकेसाठी 'मटा सन्मान', 'झी' यांसह अनेक पुरस्कार पटकावले. त्यानंतर मात्र ज्योती यांनी मागे वळून पाहिलं नाही. समोर आलेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं. ही त्यांची दुसरी इनिंग होती. त्यानंतर आलेल्या 'मी सिंधुताई सपकाळ', 'पाऊलवाट' या सिनेमांमधल्या भूमिकांसाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे अनेक पुरस्कार मिळाले. आगामी काळात त्यांचे आणखी काही सिनेमे येणार आहेत. पुण्यात राहून ज्योती यांनी हे योगदान कोणताही गाजावाजा न करता दिलं आहे. गेल्या ४५ वर्षांचं त्यांचं नाट्य, सिनेसृष्टीतील योगदान लक्षात घेऊन अ. भा. चित्रपट महामंडळाने त्यांचा 'चित्रकर्मी' पुरस्काराने उचित गौरवच केला आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
मैदानी आणि मर्दानी हे दोन शब्द महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजले आहेत. त्यामुळे मराठी माणूस एकतर मैदानात मर्दूमकी गाजवतो नाहीतर मर्दानी छातीनं मैदान मारतो. असंच ठाण्यातलं एक व्यक्तीमत्व म्हणजे ४० वर्षं मैदानी खेळाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. दत्ता चव्हाण होय.
मराठी साहित्यामधील प्रतिभासंपन्न लेखक, उत्कृष्ठ वक्ते, व अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले पुरूषोत्तम भावे यांचा जन्म धुळे येथे जन्म झाला. हृद्यस्पर्शी कथा, चित्तवेधक प्रवासवर्णने, संवेदनशील व भावस्पर्शी नाटके, ओघवते ललितगद्य, चिंतनात्मक लेख इत्यादी विविध साहित्यप्रकार त्यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीमधून हजारो मराठी वाचकांच्या आठवणींच्या पानांवर चिरायू केले आहेत. मराठी नवकथेचे जनक, असे त्यांना मराठी साहित्यपटलावरती आदराने संबोधले जाते.
जुलै १९३१ साली किर्लोस्कर खबरमध्ये त्यांची 'फुकट' ही कथा प्रकशित झाली. तथापि त्यांचे लेखणीचे व प्रतिभेचे सामर्थ्य प्रगट झाले ते त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनामुळे. हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या नागपूरच्या सावधान या साप्तहिकातून त्यांचे लेख प्रसिद्ध होताच, त्यांतून प्रगट होणार्या भाषासौंदर्याने व तेजस्वीपणाने वाचक मुग्ध होऊन गेले. अच्युत बळवंत कोल्हटकर व शिवराम महादेव परांजपे ह्या दोन प्रसिद्ध शैलीकार साहित्यिकांच्या लेखनगुणांचे मनोज्ञ रसायन भावांच्या शैलीतून प्रगट झाले. “आदेश“ या त्यांच्या स्वतःच्या साप्ताहिकातूनही त्यांचे अनेक चित्तवेधक लेख प्रसिद्ध झाले आहेत. मूलतःप्रचारी स्वरूपाचे स्वरूपाचे असूनही त्यांचे अनेक लेख वाङ्मयगुणांनी मंडित झालेले दिसतात. त्याचे कारण भावेंची विशिष्ट लेखनशैली हेच होय. “रक्त आणि अश्रू“ हा त्यांचा लेखसंग्रह मराठी निबंधवाङ्मयाताही अद्वितीय ठरला आहे.
“वाघनखे“ , “विठ्ठला पांडुरंगा“ , “अमरवेल“, “रांगोळी“, “असे एकुण चौदा लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. १९७४ साली प्रकाशित झालेल्या “स्मरणी हा त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा संग्रहही उल्लेखनीय आहे. त्याचप्रमाणे “सावल्या“, “प्रतारणा“, “नौका“, “घायाळ“, “ध्यास“,“मुक्ती“ अशा एकाहून एक सरस कथा त्यांनी लिहिल्या.
तसेच त्यांच्या “व्याध“, “पिंजरा“, “रोहिणी“ अशा कादंबर्यांनादेखील जाणकार वाचकांकडून कौतुकाची थाप मिळाली होती. “स्वामिनी“, “विषकन्या“, “महाराणी पद्मिनी“ ही नाटके आणि “सौभाग्य“, “माझा होशील का?“ या दोन चित्रपटांच्या कथा लिहून ते मोठया पडद्यावरील प्रेक्षकांच्या भेटीस आले होते.
भावे हे हिंदुत्वनिष्ठ होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे आदर्श होते. हिंदुमहासभा या राजकीय पक्षाचे ते काही काळ भावे हे सक्रिय कार्यकर्तेही होते आणि सनातन भारतीय संस्कृतीचे व जीवनमूल्यांचे उपासक व प्रवक्ते देखील होते.
अहमदनगर येथे १९६४ साली भरलेल्या ४६व्या नाटय संमेलनाचे ते अध्यक्ष होते. भावे यांनी साहित्य क्षेत्राला दिलेल्या योगदानाची दखल घेऊन पुणे येथे १९७७ साली आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती .
“थमपुरूषी एकवचनी“ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध असून त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची व आयुष्य कसे घडले हे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त असे आहे.
१३ ऑगस्ट १९८० रोजी पु.भा.भावे यांचे मुंबईत निधन झाले.
महाविद्यालयीन काळात सलग पाच वर्षे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभाग आणि अनेक बक्षिसे पटकाविली आहेत. त्याच काळात महाराष्ट्र आणि बाहेरील मिळून एकूण ६५ वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत ८ वर्ष सहभाग आणि अनेक बक्षिसे मिळवत २२ हौशी नाटकातून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.
त्यांच्या कथालेखनास ‘ अभिरुची ‘ मासिकांमधून सुरवात झाली. त्यांनी ‘ ‘सात सक्कं त्रेचाळीस ‘ लिहिली आणि त्यांच्या ह्या पहिल्याच कादंबरीवरून त्याच्याकडे एक गंभीर लेखक म्ह्णून वाचक बघू लागले.
शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी महेश काळे हे सुपरिचित नाव. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळं हे नाव सर्वदूर पोहोचलं. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९७६ रोजी झाला. विशेषत: तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महेशच्या गाण्याने लोकांना वेड लावलेलं आहे. कुठल्याही प्रकारांतलं गाणं असो, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत, गजल, कव्वाली किंवा एखादं पाश्चिमात्य गाणे प्रत्येक प्रकार संपूर्ण ताकदीने, तो ऊर्जेने परिपूर्ण असतो. वयाच्या अवघ्या तीन वर्षाचे असतानाच महेशने आपला गायनाचा पहिला सार्वजानिक प्रयोग गोंदवले येथे केला होता. महेशने, हजारों लोकांना "पाय तुझे गुरुराया, देवपूजा देवपूजा" ऐकवून मंत्रमुग्ध केलं होते. महेशने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून गाणं शिकण्यास सुरुवात केली. त्याची आई मीनल काळे शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेत असे, वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडे मीनल काळे संगीत शिकल्या होत्या. जेव्हा त्याची आई या शास्त्रीय संगीताचे तास घेत असत, तेव्हा महेश आलापावरून नोटेशन तयार करायचा. याच काळामध्ये त्याला संगीताबद्दल ओढ निर्माण झाली. यानंतर रवींद्र धांगुर्डे यांच्याकडे त्याने काहीकाळ शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले; पण खर्याग अर्थाने त्याच्यातील गायक श्रोत्यांसमोर आला तो अभिषेकीबुवांमुळे.
दहावीच्या सुट्टीमध्ये महेश अभिषेकीबुवांकडून संगीताचा रियाज केला. बुवांबरोबर कायम राहून तो त्यांचा पट्टशिष्यच झाला. या पट्टशिष्यावर बुवांनी भरपूर मेहनत घेतली. यानंतर शौनक अभिषेकींनीसुद्धा त्याला मार्गदर्शन केले. बुवांच्या सहवासामुळे महेशला शास्त्रीय संगीतातील बारकावे कळून आले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतानासुद्धा महेश पहाटे चार वाजता उठून अभिषेकीबुवांकडे रियाजासाठी जात असे.
पुणे विश्वविद्यालयातून बी.ई. इलेक्ट्रॉनिक्सची पदवी पूर्ण करताना सुद्धा फिरोदिया करंडक स्पर्धेमध्ये त्यांनी आपली छाप उमटवली आणि इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर महेश उच्च शिक्षणाकरिता अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेतील सँटा क्लारा विश्वविद्यालयातून इंजीनियरिंग मैनेजमेंट मधून मास्टर्स डिग्री संपादन केली. तसेच २००५ मध्ये ‘अभियांत्रिकी व्यवस्थापना’तही दुसरी ‘मास्टर्स’ पदवी मिळविली.
‘मास्टर्स’च्या दुसऱ्या पदवीचे शिक्षण घेत असतानाच महेशने त्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गाण्याचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. अर्थातंच नोकरीच्या पुष्कळ संधी महेशसमोर चालून आल्या. परंतु, शास्त्रीय संगीतामध्ये असलेली ओढ. महेशला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून वडिलांची परवानगी घेऊन महेशने अमेरिकेच्या कॅलिफोनिर्यातील सनीवेल या ठिकाणी विद्यार्थ्यांकरिता शास्त्रीय संगीताचे क्लासेस सुरू केले. बघता बघता ३०० हून अधिक विद्यार्थी या क्लासला दाखल झाले. तेथे गेली १५ वर्षे तो या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहे. भारतीय, पाकिस्तानी, अफगाणी, अमेरिकन, युरोपीयन अशी सर्व वंशांची मुले भारतीय शास्त्रीय संगीत शिकतात. जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सनीवेलमध्ये होते, तेव्हा महेशला राष्ट्रगीत गाण्याकरिता सांगण्यात आले.
महेशने आपल्याबरोबर आपल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले, तर ही सुवर्णसंधी ठरेल, असे मत मांडले. त्यानुसार अमेरिकेमध्ये वास्तव्य करण्याऱ्या विद्यार्थ्यांसह त्याने आपल्या भारताचे राष्ट्रगीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केले. लॉस एंजेलिसमध्ये प्रसिद्ध विंडप्लेअर पेद्रो युस्ताच यांच्या सोबत ‘रागाजॅझ’ बॅण्डमध्ये परफॉर्म केलंय. प्रख्यात कीबोर्ड आर्टिस्ट फ्रँक मार्टिन आणि प्रसिद्ध सॅक्सोफोनिस्ट जॉर्ज ब्रुक्स यांच्यासोबत परफॉर्म केलंय. हरिहरन, विक्कू विनायकम, झाकीर हुसेन अशा दिग्गजांबरोबर कोलॅबरेशन केलंय. प्रख्यात तालवाद्य कलाकार शिवमणींबरोबर आणि त्रिलोक गुर्टू यांच्यासोबतही परफॉर्म केलंय.
प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णीनी रागमालेवर आधारित गाणं रचलं आहे. या डय़ुएटचं रेकॉर्डिग अलीकडंच प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवतीसोबत महेशनी केलं. सध्या ‘सूर निरागस हो’ या कार्यक्रमातून महेश आजवरचा गायनप्रवास उलगडतोय. देशविदेशातील तरुणवर्गाशी महेश संवाद साधतो सुरांच्या भाषेत. कट्यार काळजात घुसलीच्या गीत गायना साठी महेश काळेला सर्वोत्कृष्ट गायक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
शास्त्रीय गाण्यासाठी पुष्कळ वर्षांनंतर मराठी गायकाने हा सन्मान प्राप्त केला आहे. महेश आई-वडील-गुरू व संगीतावर निष्ठा असणारा अतिशय नम्र साधक आहे. कट्ट्यार. नाटकासाठी भारतात महेशला पुन्हा भारतात आणण्याची संधी राहुल देशपांडे यांनी शोधून काढली. त्यांनी कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक सुरू करण्याचा निर्णय घेतला यावेळी सदाशिवच्या भूमिकेकरिता महेश काळे याला निवडले. त्याच्याशी अमेरिकेमध्ये संपर्क करून त्याला या संगीत नाटकाची स्क्रीप्ट पाठवली.
महेश काळे यांनी अमेरिकेतच या स्क्रिप्टवर काम केले. तिथं तालमी करूनच तो भारतात आला. भारतात आल्याआल्या तो तत्काळ प्रयोगात सहभागी झाला. आज या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग पूर्ण झाले आहेत. ‘स्टार प्रवाह’वर ‘नकुशी..तरीही हवीहवीशी’ या मालिकेचं टायटल साँग महेशनं संगीतबद्ध केलं आहे. महेश काळेने २०११ मध्ये सवाई गंधर्व कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
२०१५ मध्ये, सुबोध भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या "कट्यार काळजात घुसली"ह्या फिल्ममध्ये महेश काळेचा आवाज 'सदाशिव'च्या महत्वपूर्ण भूमिकेच्या पार्श्वगायनासाठी वापरला. या चित्रपटात महेश काळेला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti