जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
स्टीफन हॉकिंग यांचे वडील डॉ.फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी ऑक्सफर्ड इंग्लंड येथे झाला. स्टीफन यांच्या जन्माच्या वेळी, डॉ.फ्रँक आणि इसाबेल या दांपत्त्याने उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला स्थलांतर केले, कारण त्यावेळी दुसरे महायुद्ध चालु होते. स्टीफन यांच्या जन्मानंतर हॉकिंग कुटुंबाने परत लंडनला स्थलांतर केले, कारण त्यांचे वडील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडिसीनमध्ये पार्सिटॉलॉजी विभागाचे प्रमुख झाले होते. १९५० मध्ये हॉकिंग कुटुंबाने सेंट अल्बान्स येथे स्थलांतर केले. येथेच १९५० ते १९५३ अशी तीन वर्षे त्यांचे शिक्षण "सेंन्ट अल्बान्स स्कूल फोर गर्ल्स" या शाळेत झाले. त्याकाळी गर्ल्स स्कूलमध्ये मुलांनाही प्रवेश मिळे. स्टीफन लहानपणापासून एकपाठी होते. त्यांना संगीत, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड विद्यार्थीदशेपासूनच होती.
हॉकिंग यांना पहिल्यापासून विज्ञान विषयात रस होता. गणिताच्या शिक्षकाच्या प्रेरणेमुळे त्यांना विद्यापीठात गणिताचे शिक्षण घ्यावयाचे होते पण त्यांच्या वडीलाना असे वाटत होते कि त्यांनी "युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफर्ड" येथे प्रवेश घ्यावा. पण युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये त्यावेळी गणितासाठी फेलोशिपची सोय नसल्याने हॉकिंग यांनी निसर्गविज्ञान या विषयासाठी प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. त्यांनी १९६२ यावर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी स्टीफन यांनी केंब्रिज विद्यापीठ येथे आपले नाव नोंदविले. एकदा लंडनमध्ये गणितज्ञ रॉजर पेनरोज यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले.
तार्यायतील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोज यांनी त्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्यांप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. या प्रबंधासाठी १९६६ सालचे ऍडम्स प्राईझ त्यांना मिळाले. स्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांताची जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले. १९६२ मध्ये हिवाळी सुट्यांसाठी स्टीफन आपल्या घरी गेले असता त्यांना अचानक त्रास होऊ लागला.
उपचारासाठी अनेक डॉक्टरांकडे दाखवून झाले पण रोगाविषयी काहीच माहिती मिळेना. त्यातच रोगाचा जोर वाढला आणि ८ जानेवारी १९६३ रोजी, २१ व्या वाढदिवस साजरा करीपर्यंतच दिवशीच स्टीफन यांना एक असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले. या रोगाला इंग्लंडमध्ये मोटर न्यूरॉन डिसीज (MND) तर अमेरिकेत अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस (A. L. S.) असे म्हणतात. स्टीफन हॉकिंग जेमतेम दोन वर्षे जगतील असे त्यांना सांगण्यात आले. आधी ते खूप निराश झाले पण त्याच इस्पितळातील एका रोग्याला असाध्य रोगाशी झगडतांना पाहून स्टीफन यांनाही आशेचे किरण दिसू लागले.
स्टीफन यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हील चेअरचा आधार घ्यावा लागला. मग या व्हील चेअरलाच एक संगणक जोडण्यात आला. फक्त एक बोट वापरून स्टीफन या संगणकावर हवे ते काम करू शकत. १९८५ साली हॉकिंग यांना न्यूमोनिया रोग झाला. केवळ श्वास नलिकेला छिद्र करूनच शस्त्रक्रिया होऊ शकणार असल्याने तशी शस्त्रक्रिया हॉकिंग यांच्यावर करण्यात आली पण त्यामुळे हॉकिंग यांचा आवाज कायमचा गेला. यावर संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले.
१९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक आणि सापेक्षतावादाचा सिद्धांतची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्याो किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली. १९८० च्या दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला.
विज्ञान विषयात काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी हॉकिंग यांना १९७९ Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून मॅन ऑफ दि इयर हा किताब देण्यात आला. मा. हॉकिंग 'ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम'सारखे पुस्तक लिहून सामान्यांपर्यंत विज्ञानाची कास आणि गंमत पोहोचविली आहे.
स्टीफन हॉकिंग यांना महिलांचे गुढ वाटत असते. ते म्हणतात, स्त्री हे एक गुढच आहे. 'न्यू सायंटिस्ट' या नियतकालिकाने हॉकिंग यांना प्रश्न विचारला होता, की तुम्ही सर्वांत जास्त वेळ कशाचा विचार करता? यावर त्यांनी उत्तर दिले ते असे, 'स्त्रिया. त्या पूर्णपणे गुढ आहेत. स्टीफन हॉकिंग यांचे १४ मार्च २०१८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आमचा सुहृद मित्र कै. दिलीप सत्तूर मला दरवर्षी आठवण करून द्यायचा “श्रीकांत, तळवलकर ट्रस्टच्या “अनुकरणीय उद्योजक” पारितोषिकासाठी तू मन्मनच्या गोखल्यांचा विचार का करत नाहीस? एकदा त्यांना भेट. मन्मन उद्योग सदाशिव पेठेत मुलांच्या भावेस्कूल समोर आहे. तुला फार लांब नाही. फार वेगळे गृहस्थ आहेत. बघ एकदा त्यांच्याशी बोल आणि तुला योग्य वाटले तरच पारितोषिकासाठी विचार कर.” माझ्या डोक्यात अनेक नावे असत, त्यामुळे गोखल्यांचे नाव मागे पडत गेले. यंदा परत दिलीपने आठवण करून दिली आणि आग्रह देखील केला. तु गोखल्यांना एकदा भेटच तुमचा अनुकरणीय उद्योजकाचा शोध नक्की संपेल. फार अफलातून गृहस्थ आहेत. मी ठरवले, जाऊयात एकदा हा एव्हडा म्हणतोय तर. खरं म्हणजे सदाशिव पेठेत असा काही उद्योग असेल असे मनाला पटत नव्हते आणि असलाच तर असून असून किती मोठा असेल? असा प्रश्न मला उगीचच पडत होता. कदाचित म्हणूनच माझे पाय तिकडे वळत नव्हते. पण शेवटी मी ठरवले गोखल्यांना भेटायचे. दिलीपला विचारले तुझी ओळख देऊ का? तर दिलीप म्हणाला छे छे मी त्यांना १०-१२ वर्षांपूर्वी भेटलोय ते मला आता ओळखणार देखील नाहीत. शेवटी मी, अरुण नित्सुरे आणि अजय मोघे मन्मनच्या ऑफिसमध्ये धडकलो. स्वागतिकेला गोखल्यांना भेटायचे आहे म्हणून सांगितले. माझे कार्ड दिले. तिने कार्ड आत नेऊन दिले आणि १० मिनिटात बोलावतील असे सांगितले. आम्ही रिसेप्शन मध्ये वाट पहात बसलो. तेव्हड्यात एक कुरियरवाला आला त्याने पार्सल स्वागतिकेकडे दिले. बिल दिले आणि निघाला तोच तिने त्याला परत बोलावले आणि Octroi रिसीट विचारली. तो म्हणाला
“Octroi भरला नाही, मटेरियल तसचं आणलाय. पण मॅडम octroi भरला नाही म्हणून पैसे पण घेतले नाहीत.” आणि तो वळून जाऊ लागला. रिसेप्शनिष्टने त्याला जरबेने बोलून घेतले आणि सुनावले.
“हे बघा, octroi भरला नसेल तर ते पार्सल परत घेऊन जा. मी पाठवणाऱ्या कंपनीला कळवते की ह्या कुरियरने परत पार्सल पाठवू नका. हे घेऊन जा आणि octroi भरून आणा.” कुरियरवाल्याला हे नवीन होते तो बाईंना पटवू लागला
“बाई, तुमचं काहीतरी वेगळच. आता मी कुठे भरू octroi? घ्याना ह्यावेळी पुढे बघू.”
“हे बघा हे चालायचं नाही. मी आत्ताच फोन करते त्यांना” आणि फोन लावला देखील.
शेवटी होय नाही म्हणता कुरियर ते पार्सल परत घेऊन गेला. बाईंनी पार्सल पाठवणाऱ्या सप्लायारला याची खबर दिली व असे परत होणार नाही याची तंबी दिली.
पार्सल परत देताना मन्मन मधल्या कोणी ते मागवले होते? वेळेत न मिळाल्याने व्यवसायावर काय परिणाम होईल? याचा विचार न करता ते परत पाठवले. मी हे सर्व बघत होतो. गोखल्यांच्या कंपनीचे एथिकल वेगळेपण इथेच बघायला मिळाले. मला गोखल्यांचे आत बोलावणे आले आणि स्वागतिकेने स्वत: मला त्यांच्या केबिनपर्यंत सोडले. आत मनोहर गोखल्यांचे दर्शन झाले. वय साधारण सत्तरच्या आसपास, कोकणस्थी गोरेपण आणि चेहऱ्यावर सात्विक शांत भाव असलेले गोखले प्रथम दर्शनीच आवडले. रिसेप्शनिस्टने octroi न भरल्याने पार्सल परत पाठवल्याचे गोखल्यांच्या कानावर घातले. उत्तम केलेस, असे बाईंचे कौतुक केले आणि माझ्याकडे बघून स्माईल केले व मला बसण्याची खुण केली. मी माझा येण्याचा उद्देश सांगितला की, “आम्ही तुमच्या विषयी खूप ऐकले आहे एक उत्सुकता म्हणून आपण काय करता हे जाणून घेण्यास आलोय.” त्यांना माझी ओळख सांगितली. असे काही कुणी उत्सुकते पोटी येईल अशी त्यांना कल्पना नसल्याने आश्चर्य मिश्रित कौतुकाने मला म्हणाले “बोला काय माहिती हवी.”
“हेच की आपण काय करता? प्रॉडक्ट काय?”
“आम्ही मेडिकल सर्जरीसाठी लागणारी सामग्री बनवतो.” असे म्हणून त्यांनी त्यांचा एक प्रॉडक्ट कॅटलॉग समोर ठेवला. मी इंजिनीअर असून मला फारसे आकलन झाले नाही. पण त्यांनीच हा प्रश्न सोडवला आणि त्यांनी सुरवात केली. “आम्ही orthopedic सर्जरी पासून मेंदूच्या सर्जरी पर्यंत लागणारी सर्व प्रकारची शल्य उपकरणे बनवतो, ज्यामुळे डॉक्टरला शल्यक्रिया करणे सुकर जाते. आम्ही १००-१२५ प्रकारची शल्य उपकरणे बनवतो. देशात तसेच परदेशात देखील वितरीत करतो.” एकंदर मला जे कळले त्यावरून जशी कारखान्यात आपण वेगवेळ्या प्रकारची टूल्स वापरतो तशीच टूल्स एखाद्या सर्जनला ऑपरेशन करता वापरावी लागतात. एखादे मशीन दुरुस्त करताना ठराविक वेळेत दुरुस्त व्हावे असे इंजिनीअरला बंधन नसते. आज काम अपुरे राहिले तर उद्या करू. आहे काय अन नाही काय. पण माणसाचे हृदय, किडनी अथवा मेंदूची दुरुस्ती करताना, वेळ अतिशय काटेकोरपणे वापरावा लागतो. आज दुरुस्ती झाली नाही रुग्णाला तसेच ठेऊन उद्या उरलेली करू असे चालत नाही. हा महत्वाचा फरक माणूस आणि मशीन दुरुस्त करण्यातला आहे. तसाच इंजिनियर आणि सर्जन या मधला आहे. त्यामुळे शल्यक्रीयेची अशी उपकरणे बनवताना अजून एक महत्वाची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे त्या आयुधामुळे रुग्णास कोणतीही इजा होता कामा नये. एकंदर लक्षात आले की, गोखलेसाहेब आपल्या आकलना आणि आवाक्याच्या पलीकडचे काम करतायत. “तुम्ही इकडे कसे वळलात?” असे मी विचारले
“ अहो त्याची मोठी गम्मतच झाली.” श्रोते मिळाल्यामुळे गोखलेसाहेब रंगात आले होते.
“२० वर्षांपूर्वी माझा भाऊ ससूनमध्ये न्युरो सर्जन होता. तो एकदा म्हणाला अरे मला मेंदूचे ऑपरेशन करताना कवटीतून मेदू मोकळा करून कवटी डाव्या हाताने धरून शस्त्रक्रिया करावी लागते त्यामुळे शस्त्रक्रियेस वेळ लागतो आणि आपले काहीतरी चुकले तर? ही मोठी भीती वाटत रहाते. तर तू अशी काही वस्तू कर की ती कवटी अलगद पकडून ठेवेल आणि माझे दोन्ही हात शल्यक्रियेस मोकळे राहतील, जेणेकरून मला नीट काम करता येईल आणि वेळ कमी लागेल. परदेशात अशी उपकरणे मिळतात पण ती फार महाग असतात आणि त्यामुळे शस्त्रक्रीयेचा खर्चही वाढतो आणि तो रुग्णास परवडत नाही. मी म्हटले मला तू ऑपरेशन करताना एकदा बघावे लागेल.”
“त्याने मला एकदा ऑपरेशन करताना बोलावले. जवळ जवळ ४ तास ऑपरेशन चालले. मी शांतपणे तो काय करतो ते बघत होतो. तेव्हा काही आत्ता सारखी मोबाईलवर व्हिडीओ घेण्याची सोय नव्हती. मोजमाप देखील घेता येणार नव्हते. मी फक्त निरीक्षण केले आणि २ महिन्यांच्या प्रयत्नाने एक साधे मेदूची कवटी पकडणारे उपकरण बनवले, ते भावास दिले. त्याने ते पुढच्या ऑपरेशनसाठी वापरले आणि त्याला खूप आवडले आणि उपयुक्त देखील वाटले. त्याचे ऑपरेशन निम्म्या वेळात झाले. मुख्य म्हणजे परदेशी उपकरणाच्या तुलनेत फक्त १०% किमतीत हे उपकरण तयार केले ह्यात आमचा प्रॉफिट देखील आला.”
“ही बातमी हा हा म्हणता अनेक शल्यकर्मीपर्यंत पोहचली. हळूहळू अनेक डॉक्टर्स मला भेटून विविध प्रकारची उपकरणे बनवून घेऊ लागली. यात orthopedic आले, पोटाचे, किडनीचे अशा सर्व प्रकारच्या स्पेशालीस्टना मी वेगवेगळी उपकरणे करून देऊ लागलो. मला तो नादच लागला कोणतेही ऑपरेशन करताना निरीक्षण करायचे आणि वर्कशॉप मध्ये उपकरण बनवायचे. अशा शेकडो शस्त्रक्रिया मी ऑपरेशन थियेटर मध्ये जाऊन बघत असे. यातून मी अशा प्रकारची शेकडो उपकरणे बनवली. देशात असे कोणतेही मोठे हॉस्पिटल आणि सर्जन नसेल ज्याला माझे नाव माहीत नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो हल्ली मेंदूतल्या ट्युमरची शस्त्रक्रिया करण्यास सर्व कवटी उघडावी लागत नाही. जिथे ट्युमर अथवा दोष असेल त्याच्या वर कवटीला एक भोक पाडतात आणि शस्त्रक्रिया करून ती जागा पुन्हा बंद करतात. ह्या मेंदूच्या कवटीस ड्रील करण्याचे मशीन आम्ही बनवतो. आता एक विचार करा कुलकर्णी, हे ड्रील मेंदूत एक मायक्रॉन देखील घुसलेही नाही पाहिजे आणि अर्धवट ड्रील करून देखील चालणार नाही. असे अवघड उपकरण मी डिझाईन केले आहे आणि अनेक शस्त्रक्रियेत ते वापरले जाते.” माझ्या अंगावर सणकून शहारा आला. गोखलेसाहेब हे अगदी सहज सांगत होते.
गोखलेसाहेब या व्यवसायात पडले, ते देखील वयाच्या पन्नाशीत. पुण्याच्या कुस्रो वाडिया इंस्टीटयूटमधून draftsman चा कोर्स करून ते भोपाळच्या BHEL मध्ये नोकरी केली. ती नोकरी सोडून पुढे पुण्याच्या टाटा मोटर्समध्ये (तेव्हाची टेल्को) आले. तिथे ते ट्रेनिंग विभाग बघू लागले. जेआरडी जेव्हा जेव्हा पुण्याला भेट देत तेव्हा ते प्रथम या विभागास भेट देऊन मगच पुढच्या कामास जात. जेआडींच्या या सवयीमुळे हा विभाग कायम व्यवस्थित ठेवण्याची सवय लागली. गोखल्यांच्या क्रिएटिव्ह स्वभावामुळे जेआरडी त्यांना नेहमी विचारत गोखले यावेळी नवीन काय? गोखले एखादी नवीन केलेली गोष्ट त्यांना दाखवत. नवीन काहीतरी शोधण्याचा त्यांना ध्यासच लागला. त्यातून अनेक गोष्टी निर्माण होऊ लागल्या. त्यांच्या बंधुंमुळे यातूनच पुढे विविध शल्यसामग्री डिझाईन करून बनवू लागले. आता व्याप वाढू लागला आणि टेल्कोची आरामाची नोकरी सोडून पूर्णपणे व्यवसायात झोकून दिले. सदाशिवपेठेतली जागा कमी पडू लागली तर अरण्येश्वर रोड वर उपकरणे बनवण्यासाठी एक वर्कशॉप सुरु केले. मुलगा समीर ते वर्कशॉप बघत असे. नावही मोठे गमतीचे ठेवले “समीरचे वर्कशॉप” घरचे इतर देखील सर्व त्यांना उद्योगात मदत करू लागले. पण मध्येच एका अपघातात समीरचे तरुण उमद्या वयात निधन झाले. ज्या बंधुंमुळे ते या व्यवसायात आले तो डॉक्टर भाऊ देखील अकाली गेला. पण गोखले साहेब त्या आघातातून सावरले.
“गोखले हे “मन्मन” ही काय भानगड आहे ? नुसतं मन का नाही?” मला सतावणारा प्रश्न मी शेवटी विचारलाच. त्याच काय आहे कुलकर्णी, मी असे समजतो आपल्याला दोन मने असतात. एक बाहेरचे मन जे चंचल असते. सारखं सुख, दुखः, बरे, वाईट याचा विचार करते. ते स्वार्थी असते, दुसऱ्याला पीडा देण्याचा विचार करते, हे हवंय, ते हवंय असा हव्यासी विचार करते. पण त्या मनाच्या आत एक आणखीन मन असते ते निरागस असते, क्रिएटिव्ह असते. ते मनाचे मन असते. तिथे चांगले विचार निर्माण होतात. तिथे वेगवेगळी डिझाईन घडतात. त्या बाहेरच्या चंचल मनाचे जे अंतर्मन ते “मन्मन.” हे अंतर्मन जागे असले, तर उत्तम कल्पना सुचतात. मी एखाद्या डॉक्टरचे ऑपरेशन बघतो तेव्हा माझे हे मन्मन मला ते उपकरण कसे बनवायचे ते सुचवते आणि मी ते फक्त प्रत्यक्षात आणतो. मला drawing काढावे लागत नाही. ते आतूनच येते. कसे येते ते माहित नाही पण सुचत जाते. परमेश्वराने दिलेली देणगी आहे. मी निमित्तमात्र करता करविता तोच, विधाता.” गोखल्यांमधला निगर्वी उद्योजक बोलत होता. मीपणाचा स्पर्शही नाही. पेशाने इंजिनीअर असलेले गोखले किती कविमनाचे तत्वचिंतक कलाकार आहेत ह्याचे मी प्रत्यंतर घेत होतो.
त्यावर्षीचा अनुकरणीय उद्योजकाचा शोध संपला होता. इथे सगळेच अनुकरणीय होते. गोखलेसाहेब इंजिनिअर आहेतच, पण कलाकार, गुरु, तत्वचिंतक, सेवाभावी शिवाय एथिकल आणखीन काय काय होते. त्यांना सगळ्यात शेवटी माझा येण्यातला स्वार्थ सांगितला आणि तळवलकरसरांच्या नावाने अनुकरणीय उद्योजक हा पुरस्कार त्यांना देणार असे सांगितले. त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. काही क्षण ते बोलू शकले नाही. अहो मी फार छोटा माणूस मला कसले पारितोषिक? माझ्यापेक्षा कितीतरी महान लोक या जगात आहेत? त्यांच्या मृदू स्वभावाला साजेल अशी शंका त्यांनी उपस्थित केली. त्यांना तळवलकरसरांविषयी सांगितले. ते म्हणाले मी त्यांना ओळखायचो कारण, मी देखील कुस्रो वाडीयाचाच ना. मला ते शिकवायला नव्हते पण त्यांची शिस्त माहीत होती. पुरस्कार स्वीकारणार असे त्यांनी कबूल केले. प्रत्यक्ष कार्यक्रमाची तारीख जवळ आली तर त्यांनी मला फोन केला कुलकर्णी मी पुरस्कार स्वीकारणार आहे, पण ते भाषण वगैरे मला जमणार नाही. मी कधी असे लोकांसमोर बोललो नाही. तर ते जरा टाळता आले तर बघा. मी त्यांना समजावले गोखले आमच्याशी जे बोललात तेच सांगा लोकांना आवडेल. भाषण करावेच लागेल. होय नाही करता तयार झाले. परत एकदा माझ्या ऑफिसमध्ये आले म्हणाले भाषण लिहून आणलंय तुम्ही ऐका. मी ऐकले. छान लिहिले होते. त्यावर्षी जी चार भाषणे झाली त्यात गोखल्यांनी बाजी मारली. प्रत्यक्ष भाषण करताना लिहून आणलेले भाषण तसेच राहिले आणि फार उत्कट आणि उत्स्फूर्त बोलले. जेष्ठ विचारवंत विद्याताई बाळ अध्यक्षा होत्या त्या भान हरपून ऐकत होत्या. त्यांनी त्यांच्या भाषणात गोखल्यांचे मनापासून कौतुक तर केलेच, पण पुढे त्यांच्या ऑफिसमध्ये देखील जाऊन आल्या.
खरे म्हणजे गोखल्यांचे भाषण एव्हडे नितांत सुंदर झाले कारण, ते त्यांच्या मन्मनातून आले होते. आतून आले होते आणि ते सर्व श्रोत्यांच्या मन्मनात खोलवर भिडले. मनोहर गोखल्यांचा जीवनपट निरागस कर्मयोगी जीवन जगण्याचा एक वस्तुपाठ आहे.
श्रीकांत कुलकर्णी
९८५००३५०३७
Shrikaant.blogspot.com
Shrikantkulkarni5557@gmail.com
WhatsApp वरुन
१८८८ मध्ये डनलॉप कंपनीने पोकळी रबरी धावा (न्युमॅटिक टायर्स) ची कल्पना अस्तित्वात आणली. त्यामुळे मोटारींना टायर ट्यूब बसविणे शक्य झाले.
‘संगीत सुवर्णतुला’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘मंदारमाला’, ‘जावयाचे बंड’, ‘चमकला ध्रुवाचा तारा’, ‘जयजय गौरीशंकर’ ही संगीत नाटकं लोकप्रिय झालीच पण ‘साक्षीदार’, ‘अमृत झाले जहराचे’, ‘मदनाची मंजिरी’, ‘स्वरसम्राज्ञी’ ही त्यांची पाश्चात्य कृतीवर आधारित असलेली संगीत नाटकं.
जन्म महाड येथे, मूळ गाव – महाड, जि. रायगड, शालेय शिक्षण – महाड येथेच झाले. ऐन तरुणपणी देवलांच्या रॉयल सर्कसमध्ये तारेवरती रिंग सायकल चालविणे व वाघ सिंहाचे रिंग मास्टर म्हणूनही अल्पकाळ कामगिरी केली.
त्यांचे वडील राजदरबारी सनईवादक होते. वयाच्या सहाव्या वर्षी ते वाराणसीमध्ये आले. त्यानंतर तेथे वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यानी आपले काका ‘ अली बक्श ‘ यांच्याकडे सुरु केले. अत्यंत कठोर परिश्रम ते करत असत याचा आपण सामान्य माणूस विचारही करू शकणार नाही.
एकाच नावाच्या दोन व्यक्ती असेल तर फार आश्चर्य वाटते. पण जेव्हा एकाच नावाच्या दोन व्यक्ती एकाच इंडस्ट्रीमध्ये असेल तर इंडस्ट्रीसह, प्रेक्षक व मिडीयाची देखील तारांबळ उडते. या दोन व्यक्ती म्हणजे मराठी इंडस्ट्रीच्या सुंदर तारका सोनाली कुलकर्णी. या दोघींची ओळख सांगण्यासाठी प्रेक्षकांनी देखील छोटी सोनाली-मोठी सोनाली, सीनिअर सोनाली-ज्युनिअर सोनाली, अप्सरावाली सोनाली-दिल चाहतावाली सोनाली अशी वेगवेगळी नावेदेखील त्यांना दिली आहे.
गंमत म्हणजे, मिडीया व प्रेक्षकांची तारांबळ उडू नये म्हणून या दोन सोनालींनी आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्येच बदल केला आहे. सीनिअर सोनालीने इंग्रजी नावाच्या स्पेलिंगमध्ये आय लिहिते तर ज्युनिअर सोनाली डबल ई लिहीते. आज ज्युनिअर सोनालीचा वाढदिवस. तिचा जन्म १८ मे १९८८ रोजी खडकी पुणे येथे झाला. सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात ३० वर्षे काम केले आहे.
तिच्या आई, सविंदर ह्या पंजाबी असून त्यांनी देहू रोड, पुणे येथील COD येथे काम केले आहे. सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालय येथे झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालय येथे झाले आहे. तिने फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून पत्रकारिता विषयातील पदवी प्राप्त केली आहे. तसेच पुणे येथील इंदिरा स्कुल ऑफ मॅनेजमेंट ह्या संस्थेतून तिने पत्रकारिते मधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
सोनाली कुलकर्णीने कारकिर्दीच्या प्रारंभी एक मॉडेल म्हणून काम केल्यानंतर सोनालीने केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामधून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला झी गौरव पुरस्कार चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. ती मुळची पुण्याची आहे. सोनाली ही प्रामुख्याने तिच्या नटरंग ह्या चित्रपटामधील 'अप्सरा आली' ह्या लावणीवरील नृत्यासाठी साठी ओळखली जाते. ह्या अभिनयासाठी तिला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. यानंतर तिने क्षणभर विश्रांती, अजिंठा, आणि झपाटलेला २ अशा चित्रपटामध्ये काम केले. २०१४ मध्ये सोनालीने स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासमवेत मितवा हा चित्रपट केला होता , ज्याच्यासाठी तिला झी गौरव पुरस्कार च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराकरीता नामांकन प्राप्त झाले.
स्मिता पाटील, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये मराठीतून हिंदी चित्रपटांकडे गेलेल्या काही मोजक्याच अभिनेत्रींना यश मिळाले आहे. यात सोनाली कुलकर्णीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. तिने ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला, ज्यात तिने रितेश देशमुख च्या पत्नी, ममता हीची भूमिका केली होती. तसेच अजय देवगण याच्या सिंघम २ ह्या चित्रपटात देखील सोनाली ने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती. सोनाली कुलकर्णीचे 'सोशल मीडिया'वर फॅन सुद्धा जबरदस्त आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
यवतमाळ मधील राणी अमरावती ह्या छोट्याशा गावातून आलेले राम केवटे हे एक प्रसिद्ध चित्रकार असून आज त्यांचे ह्या क्षेत्रात फार मोठे नाव आहे.
गुलजारीलाल नंदा मुंबई विधानसभा मतदारसंघाचे सन १९३७ ते १९३९ व १९४७ ते १९५० या काळात आमदार राहिले. त्यांनी श्रम आणि आवास मंत्रालयाचा कार्यभारदेखील सांभाळला. नॅशनल ट्रेड युनियनची स्थापनाही त्यांनी केली.
सुरुवातीस राजिंदरसिंग बेदी यांनी पंजाबीत लेखन केले; पण नंतर ते उर्दूतून लिहू लागले. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९१५ रोजी झाला. त्यांच्या पंजाबीतील कथांचे हड्डीआँ ते फुल्ल (१९४२) व घर विच बजार विच (१९४४) हे दोन संग्रह होत. आपल्या कथालेखनाची सुरुवात त्यांनी प्रख्यात रशियन लेखक चेकॉव्ह याच्या लेखनाने प्रभावित होऊन केली होती. चेकॉव्हशिवाय त्यांनी टॉलस्टॉय, ब्रेट हार्ट, डी.एच्.लॉरेन्स आणि मोपासा यांच्या साहित्याचेही वाचन केले. ‘भोला’ ही कथा १९३६ मध्ये लिहून त्यांनी आपल्या उर्दू कथालेखनाची सुरुवात केली आणि दाना-व-दाम हा आपला पहिला कथासंग्रह १९३९ मध्ये प्रकाशित केला. या संग्रहामुळे त्यांना खूपच प्रसिध्दी मिळाली. या कथासंग्रहात अपार सहानुभूती आणि प्रखर वास्तवता यांचा प्रत्यय प्रकर्षाने येतो.
बेदी हे आपल्या कथांतून जीवनातील दुःखमय पैलूचे दर्शन घडवत असतानाही त्यातील सुखमय पैलूंचेही विस्मरण त्यांना होत नाही, हे त्यांच्या कथेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या दृष्टीने त्यांचे गर्म कोट हे आत्मवृत्त विशेष लक्षणीय म्हणावे लागेल. त्यांच्या कथालेखनाचे आणखी काही विशेष म्हणजे त्यांच्या कथातील सुरुवातीच्या काही वाक्यातच ते सबंध कथेच्या आशयाचे सार सूचकतेने गोठवत असत. कथांशिवाय बेदींनी काही नाटके व एकाकिंकाही लिहिल्या आहेत आणि त्याचे अनुक्रमे बेजान चीजे (१९४३) व सात खेल (१९४६) हे संग्रह प्रकाशित झाले आहेत. एक चादर मैली सी (१९६२) ही त्यांची लघुकांदबरी असून तिला १९६४ चा साहित्य अकादेमी पुरस्कार मिळाला. पंजाबमधील एका गावाच्या पार्श्वभूमीवर ती लिहिली असून तीत ‘राणू’ च्या वैवाहिक जीवनाचे उत्कृष्ठ चित्रण आहे. खूशवंतसिंग यांनी तिचा इंग्रजीत (आय टेक धिस वूमन - १९६७) अनुवादही केला आहे.
‘मिथुन’या कथेतही अशाच प्रकारचे सुंदर शैलीत वर्णन आहे. बेंदीनी ‘सिर्फ एक सिगरेट’ ह्या आणखी एका रमणीय कथेमध्ये पिढयांच्या तफावतीबाबत सुंदर चित्रण केले आहे. दाना-ष-दाम (१९३९) , गिऱ्हान (१९४२) , कोख जली (१९४९) अपने दुख मुझे दे दो (१९६५) , हाथ हमारे कलम हुए (१९७४) हे त्यांचे उल्लेखनीय उर्दू कथासंग्रह होत. मिर्झा गालिब (१९५४), देवदास (१९५६), मधुमती (१९५८), अनुराधा (१९६०) सत्यकाम (१९६९), मेरे सनम इ. गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या असून एक आघाडीचे पटकथा लेखक म्हणून त्यांनी मोठाच लौकिक संपादन केला. एक चादर मैली सी (१९७१), फागुन (१९७२) आणि आँखो देखी (१९७७) हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेत. दस्तक(१९७२) ह्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांची कथा, पटकथा, दिग्दर्शन व निर्मितीही त्यांचीच असून ह्या चित्रपटास तीन राष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत. १९७५ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मा.राजिंदरसिंग बेदी यांचे निधन १९८४ मध्ये झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. marathivishwakosh
Copyright © 2025 | Marathisrushti