जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
जंगल आमच्या हक्काचे, जंगल आमच्या मालकीचे आणि इंग्रजांचा त्याच्यावर कोणताही अधिकार नाही हे वर्तमान पनवेल जिल्ह्यातील चिरनेर येथे अक्कादेवीच्या टेकडीवर झालेल्या 1930 च्या जंगल सत्याग्रहाच्या संघर्षात केवळ 19 वर्षाच्या नाग्या कातकरीने आपल्या शरीरावर गोळी झेलून सिद्ध केले.
आज ६ नोव्हेंबर..आज “गंधर्व भूषण” जयराम शिलेदार यांची पुण्यतिथी.
जयराम शिलेदार यांचा जन्म ६ डिसेंबर १९१६ रोजी झाला.
जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान. चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये "गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. घरचा सराफीचा व्यवसाय चांगला चालत होता. आजोबांच्या हातून घडलेल्या तोडे, बाजूबंद, पैंजणादी अलंकारांना आजूबाजूच्या संस्थानांतील राजघराण्यांतून मागणी असे. संगीताच्या सुरांशी या घराचा काहीही संबंध नव्हता. पण तत्कालीन प्रथेप्रमाणं प्रतिष्ठेचा प्रघात म्हणून कर्णेवाला ग्रामोफोन आणि गाजलेल्या कलाकारांच्या ध्वनिमुद्रिका घरात आल्या. खोडकर जयराम सतत खेळत असे. पण ग्रामोफोनच्या कुतूहलाने जयरामाचे पाय घरात रेंगाळू लागले. रेकॉर्ड्स ऐकत त्यांचं अनुकरण करता करता छोटय़ा जयरामला सूर गवसला. निसर्गत: उत्तम आवाज, गळ्याला चांगली फिरत, प्रभावी आकलनशक्ती यामुळं त्याला संगीताचा चांगलाच नाद लागला. सर्वाना जयरामचे गाणे आवडू लागले. गल्लीतल्या गणेशोत्सवात हौशी मंडळींनी ‘स्वयंवर’ नाटक बसवायचा घाट घातला. गाणाऱ्यांची वानवा असल्याने पदं कटाप करून गद्य नाटक करायचं ठरलं. ग्रामीण बोलीमुळे ‘सयेंवर’ नाटक तुफान विनोदी वाटू लागलं. उपस्थित प्रेक्षक हुर्यो करू लागले की शिलेदारांच्या जयरामला रंगमंचावर ढकललं जाई.. ‘कंचंबी कृष्नाचं गान गाऊन सोड.’ पण नाटकाशी संबंध नसलेलं ‘राधेकृष्ण बोल मुखसे’ हे पद जयराम यांनी सुरू करताच उधळलेले प्रेक्षक शांत झाले आणि आवडीनं पद ऐकू लागत. त्यांनी टाळ्या व ‘वन्स मोअर’ने जयरामला डोक्यावर घेतले. बाल जयरामने गद्य ‘स्वयंवर’ संगीत करण्याची ही घटना म्हणजे भावी काळात संगीत रंगभूमीची धुरा वाहण्याचं अवघड कार्य त्यांच्या हातून होणार याची नांदी होती. .
सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर जयराम शिलेदार यांना शाळेचा कंटाळा आला. लिहिता-वाचता आलं, हिशेब करता आला की शाळेत जायलाच पाहिजे हे बंधन सैल होई. वडिलोपार्जित सराफी व्यवसायात जयराम यांनी यावं असं आजोबांना वाटत असे. पण त्यात जयराम यांचं मन अजिबात रमलं नाही. मग एका वकिलाकडं कारकुनी करायला त्यांना पाठवलं गेलं. तिथंही त्यांचे गाणं गुणगुणणं चालूच होते. ‘सयेंवर’च्या चमत्कारानंतर आजोबांनाही वाटू लागलं, की हा पोरगा नाटकातच नाव काढील; तर आपणच त्याला नाटक मंडळीत भरती करू. त्या काळात ही गोष्ट आगळीच म्हणावी लागेल. बेळगावात मुक्कामाला आलेल्या रघुवीर सावकारांच्या रंगदेवता हिंदी-उर्दू-मराठी थिएट्रिकल कंपनीत आजोबांनी जयराम यांना दाखल केलं. पूर्वीच्या नाटक मंडळ्या म्हणजे नाटय़विद्यालयेच असत. भावी कलाकारांना संगीत आणि नाटय़ाचं पद्धतशीर शिक्षण देण्यात तिथं कसूर होत नसे. सुरुवातीचं नमन म्हणण्यासाठी स्त्रीवेश धारण करून हात जोडून उभं राहण्याचं काम त्यांनी सहा महिने केलं. मग छोटय़ा भूमिका करत एका वर्षांत जयराम यांनी धैर्यधराच्या भूमिकेपर्यंत झपाटय़ानं मजल मारली. त्यावेळी त्यांचं वय होतं अठरा र्वष. मूकपटाचं बोलपटात रूपांतर झाल्यावर नाटकाचा प्रेक्षक चित्रपटांकडं वळला. नाटक मंडळ्या बंद पडू लागल्या. रंगदेवता नाटक मंडळी बंद होताच त्यांनी ‘राजाराम संगीत मंडळी’, ‘नवजीवन संगीत नाटक मंडळी’ या संस्थांत कामं केली. राजाराम संगीत मंडळीत त्यांना चिंतुबुवा गुरव, गणपतराव बोडस यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. किर्लोस्कर मंडळीच्या पठडीचं शिक्षण मिळाल्याने जयराम यांची कामगिरी उठावदार होऊ लागली. नंतर त्यांना गंधर्व नाटक मंडळीचं बोलावणं आलं. त्यांच्या दृष्टीनं हा भाग्ययोग होता. बालगंधर्व म्हणजे त्यांचं परमदैवत. गंधर्वाच्या सुरांनी मोहून गंधर्व-गायकी आत्मसात करणारे अनेक होते, पण मा.जयराम शिलेदार वेगळेपण हे- की त्यांनी गंधर्ववृत्तीचं अनुसरण केलं. संगीत नाटक कसं पेश करावं, त्यासाठी जीवन कसं झोकून द्यावं, हे त्यांना गंधर्वाकडून शिकायला मिळालं. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी संगीत नाटकाची पताका फडकवीत ठेवली. वयाच्या १६ व्या वर्षी रंगदेवता रघुवीर सावकारांच्या कंपनीत त्यांनी नाट्यकलेचा श्रीगणेशा केला. नंतर गंधर्व नाटक मंडळींमध्ये नटसम्राट बालगंधर्वांबरोबर नायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपटात ललिता पवार, सुमती गुप्ते, तर नाटकात हिराबाई बडोदेकर, शांता आपटे, मीनाक्षी, जयमाला शिलेदार यांच्याबरोबर त्यांची कारकीर्द गाजली. गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते यांचे मार्गदर्शन मिळाले. पुढे "मराठी रंगभूमी‘सारखी संस्था उभी केली. ४५ हून अधिक संगीत नाटकांचे सहा हजारहून अधिक प्रयोग केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत नाटकाची पताका फडकवत ठेवली.
राम जोशी यांच्यात जीवनावर आधारीत व्हीठ. शांताराम आणि बाबुराव पेंटर यांनी दिग्द र्शीत केलेला 'लोक शाहीर राम जोशी' हा चित्रपट १९४७ साली प्रदर्शित झाला. त्या चित्रपटामध्यें जयराम शिलेदार यांनी राम जोशी यांची तर हंसा वाडकर यांनी बयाची भूमिका साकारली होती.
'जिवाचा सखा'मधील त्यांची भूमिकाही विशेष गाजली. १९४७ मध्ये डॉ. भालेराव यांच्या नाटय़महोत्सवातील 'धरणीधर' या नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्यासमवेत जयमाला यांनी पहिल्यांदा काम केले. तर 'शाकुंतल' नाटकामध्ये त्या शिलेदार यांच्या नायिका होत्या. १० ऑक्टोबर १९४९ रोजी जयराम शिलेदार, नारायणराव जाधव आणि प्रमिला जाधव यांनी मराठी रंगभूमी संस्थेची स्थापना केली. २३ जानेवारी १९५० रोजी जयराम शिलेदार यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या जयमाला शिलेदार झाल्या. जयमाला आणि जयराम शिलेदार यांचा संगीत नाटक हाच प्राण आणि सर्वस्व होते. संगीत रंगभूमीसाठी त्यांनी अपार कष्ट केले, पण त्याचा गाजावाजा कधीही केला नाही. संगीत रंगभूमीची सेवा ही त्यांनी निर्मोहीपणे केलेली नटराजाची सेवा होती. संगीत सौभद्र, सुवर्ण तुला, संशय कल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, शाकुंतल, मृच्छकटिक, मानापमान, ही एककाळ लोकप्रियतेचा कळस गाठलेली नाटके या दोघांनी सातत्याने रंगभूमीवर सुरू ठेवली. नव्या युगात संगीत रंगभूमीचा प्रेक्षकवर्ग कमी झाल्यामुळे, ही नाटके चालणार नाहीत, हा समजही त्यांनी खोटा ठरवला. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या शहरात संगीत रंगभूमीचे महोत्सव होत. काही महोत्सवाच्या सर्व नाटकांची तिकीट विक्री पूर्ण झाल्यावर, रसिकांना नाट्यगृहात बसायलाही जागा उरत नसे. तेव्हा अनेक रसिकांनी जमिनीवर बसून संगीत नाटकांचा आनंद लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. संगीत नाटक रसिकांनी या दोन्ही शिलेदारांवर अफाट प्रेम केले. हे प्रेम आणि संगीत रसिकांचा प्रतिसाद हेच त्यांचे खरे भांडवल होते. रसिकांची प्रशंसा हाच आपला सन्मान, असे हे दोघेही कृतज्ञपणे सांगत असत. 'मराठी रंगभूमी' ही संगीतनाट्य संस्था स्थापन करून त्यांनी अनेकांची कारकीर्द घडविली. जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर "गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट' ही संस्था स्थापन करून मा.जयमालाबाईंनी कलावंतांना घडवायचे कार्य केले होते. मा.जयराम शिलेदार यांचे ६ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गो. नि. दांडेकरांच्या ‘जैत रे जैत’ या कादंबरीवरून काढलेला त्याच नावाचा चित्रपट म्हणजे चित्रपटातली सांगितिक वाटली. १९७९ सालचा ‘सिंहासन’ हा अरुण साधूंच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या कादंबऱ्यांवरून काढलेला राजकीय विषयावरचा पहिला मराठी चित्रपट होता. राजकारणातल्या सशक्तांमधले सत्तेसाठी होणारे आपापसातले छुपे व उघड संघर्ष त्याचप्रमाणे त्यांनी अशक्तांचा टूल म्हणून केलेल्या खेळी हा सर्व भाग त्यात अतिशय समर्थपणे दाखवला होता.
`ज्ञानकोशकार’ म्हणून डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या नावामागे उपाधी लागली असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पांडित्य आणि विक्षिप्तपणा यांचे अजब मिश्रण होते. श्रीधर व्यंकटेश केतकर हे एक लेखक, समाजशास्त्रज्ञ व विचारवंत म्हणून जेवढे ज्ञात आहेत, त्यापेक्षा ‘ज्ञानकोशकार केतकर’ म्हणून अधिक सुपरिचित आहेत. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १८८४ रोजी झाला.समाजप्रबोधनासाठी जीवनभर अत्यंत निर्धारपूर्वक झटलेले व ‘भारतीय जातिसंस्थेचा इतिहास’ या आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तकाने देशाबरोबरच पाश्चारत्त्य जगातही मान्यता पावलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर. एक समाजशास्त्रज्ञ, विचारवंत आणि लेखक म्हणून ते लोकप्रिय ठरले हे खरे, पण ‘ज्ञानकोशकार केतकर’ म्हणून ते विशेष प्रसिद्ध झाले.
डॉ. केतकर यांनी मनाचा निश्चरय करून ज्ञानकोशाचे कार्य पूर्ण करायचेच असा निर्धार जेव्हा केला, तेव्हा सुप्रसिद्ध इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यांनी आपल्या मनातील रास्त शंका केतकरांपुढे मांडीत म्हटले, ‘हे काम एवढे अवाढव्य आहे की, त्यासाठी एखाद्याची पुरी हयात खर्च होईल.’ डॉ. केतकर यावर स्मितहास्य करीत म्हणाले,‘ प्रयत्न तरी करून पाहूया.’ आणि डॉ. केतकर यांनी आपल्या प्रचंड मेहनतीने हे अपूर्व व असामान्य काम बारा वर्षांत पूर्ण केले व याकामी आपणास सहकारी संपादक म्हणून य. रा. दाते, चिं. ग. कर्वे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले हेही अत्यंत प्रांजळपणे कबूल केले. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे कोकणातील दाभोळजवळील अंजनवेल हे मूळ गाव. त्यांचे वडील पोस्ट खात्यात पोस्टमास्तर होते. वडीलांचे छत्र लहानपणीच नाहीसे झाल्यामुळे आईच्या मदतीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक दुसर्याा इयत्तेपासून प्रवेश मिळेपर्यंत त्यांचे शिक्षण उमरावतीस झाले. तिसरीहून चौथीत जाताना त्यांनी ‘हायस्कूल एंट्रंस’ ही परीक्षा देऊन पहिल्याप्रथमच आपली शालेय चमक दाखवली. नववीत असताना गंमत म्हणून ते दहावीच्या परीक्षेला बसले व अनेक विषयांत उत्तम गुण मिळवून शिक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले. पुढे व्हर्नाक्युलर स्कॉलरशिप’ च्या परीक्षेत बसून दुसर्यात क्रमांकावर उत्तीर्ण झाले.
शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या केतकर यांनी अनेक हालअपेष्टांना तोंड देत ते उच्चविभूषित झाले. शिवाय शालेय जीवनात जोपासलेल्या वाचन, कविता करणे, इतिहास, वाङ्मय, राजकारण, रोमन कायदा यांत विशेष रस घेणे यांचा फायदा त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात झाला. ते इंग्लंडमध्ये सांपत्तिक स्थिती हलाखीची असूनही उच्च शिक्षण घेताना कसे जीवन जगले व शिक्षणाची हौस पूर्ण केली हे समजून घेणे उचित ठरेल. इंग्लंडमध्ये ‘हिंदुइझम’ या तेथे प्रसिद्ध झालेल्या आपल्या ग्रंथावर आणि ‘अथिनियम’ किंवा ‘राजस्थान’ या नियतकालिकात समालोचन करून किंवा लेख लिहून ते आपला उदरनिर्वाह चालवित. पण या पैशांतून भागत नसे. तेव्हा ते दिवसातून एकदाच जेवण घेत. जेवणाला पुरेसे पैसे नसल्यामुळे लंडनमध्ये स्वस्तात स्वस्त जेवण कुठे मिळेल याचे ते ‘तज्ज्ञ’ बनले. ते स्वस्त जेवण जेवण्यास ये-जा करण्यासाठी खिशात आवश्यक पैसे नसल्याने लंडनमध्ये पायी फिरण्याची ‘खास मौज’ ते अनुभवीत. पण आपले हे दैन्य त्यांनी इतरांना दाखवून दिले तर नाहीच, पण त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये याची खबरदारीही त्यांनी घेतली.
ऑक्टोबर १९१२ मध्ये उच्चविद्याविभूषित होऊन ते जेव्हा हिंदुस्थानात परतले तेव्हा त्यांच्या जीवनातील खर्याा कार्यास सुरवात झाली. त्याकाळी अनेक हिंदुस्थानी लोक पाश्चाेत्य पदवी संपादून मायदेशी येत व बड्या पगाराची नोकरी मिळवून ऐषारामी जीवन जगत. पण डॉ. केतकर यांनी अनुकरण केले ते रँग्लर अप्पासाहेब परांजपे यांचे. त्यांनी त्यागपूर्वक जीवन जगण्याचा निर्धार केला होता. १९१३-१४ च्या दरम्यान त्यांनी कलकत्ता विद्यापीठात पदवीधर विद्यार्थ्यांना राजकारण व अर्थशास्त्र शिकविण्याचे काम स्वीकारले खरे, पण त्यांच्या सत्य बाण्यामुळे त्यांना नोकरीचा त्याग करावा लागला. येथील वास्तव्यात त्यांनी ‘इंडियन इकॉनॉमिक्स’ हे पुस्तक लिहिले, पण त्यातील सत्यांशामुळे ते विरोधाचे धनी बनले. ‘हिंदू लॉ’ या दुसर्याय पुस्तकात त्यांनी अर्थकारण व समाजनियमन या दोन क्षेत्रांतील विचारांना चालना दिली. शिवाय सामाजिक, राजकीय विषयांवर अभ्यासपूर्ण लेख लिहून समाजमन जागृत करण्याचे काम केले. या वेळपर्यंत त्यांची परिपक्व झालेली परिस्थिती आणि कर्तबगार व्यक्तींचे प्रयत्न यांची सांगड पडली की त्यातून मोठी कार्ये उभी राहत असतात याची पूर्ण जाणीव झाली आणि त्यांनी ‘ज्ञानकोशा’च्या भव्य दिव्य कार्यात स्वतःला अक्षरशः झोकून दिले. तोपर्यंत तेलगू, बंगाली, हिंदी, गुजराथी, ऊर्दू यांसारख्या भारतीय भाषांत ज्ञानकोश तयार झाले होते.
केतकरांनी ‘मराठी’ ज्ञानकोशाचा ध्यास घेतला. १९१५ च्या ऑगस्टमध्ये त्यांनी सर्वप्रथम ज्ञानकोशाची कल्पना मांडली व आर्थिक अडचणींवर मात करीत असंख्यांचे असंतोष मनात साठवित व असंख्यांचे सहकार्य घेत बारा वर्षांनी त्यांनी हा ज्ञानकोश तयार केला. त्यांच्या या अद्वितिय कार्याची पावती देत त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या ‘श्रीधर व्यंकटेश केतकर’ या नावाऐवजी त्यांना ‘श्रीधर व्यंकटेश ज्ञानकोशे’ असे संबोधून त्यांचा गौरव केला. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे १० एप्रिल १९३७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटककार अनंत विष्णू म्हणजेच बाबुराव गोखले यांचा जन्म १५ सप्टेंबर १९१६ रोजी झाला.
बाबुराव गोखले, राजा गोसावी, शरद तळवलकर यांनी गाजवलेलं एव्हरग्रीन अस्सल दर्जेदार विनोदी म्हणजे नाटक ‘करायला गेलो एक’ त्यांचं गाजलेलं नाटक ‘करायला गेलो एक’ म्हणजे मनोरंजनाचा खच्चून भरलेला मसालाच!
नव्या पिढीला बाबूराव गोखले यांची नाटके परिचित नाहीत, पण किमान डझनभर नाटकांनी त्यांनी रसिकांना हसविले. त्यात ‘करायला गेलो एक’ हा एक मास्टरपीसच. ‘अन् झालं भलतच’, ‘रात्र थोडी सोंग फार’, ‘नाटक झाले जन्माचे’, ‘पतंगावरी जीवन माझे’, ‘पाप कुणाचे शाप कुणाला’, ‘ते तसे तर मी अशी’, ‘झालं गेलं गंगेला मिळालं’, ‘खुनाला वाचा फुटली’, ‘संसार पाहावा मोडून’, ‘थांबा-थांबा घोळ आहे’, ‘पुत्रवती भव’, ‘पेल्यातील वादळ…’ त्यातली ही काही नाटके. जी नावापासूनच ‘नाट्य’मय ठरलेली. आता ‘करायला गेलो एक’ हे नाटक १९५५ च्या सुमारास रंगभूमीवर पुण्याच्या ‘श्रीस्टार’तर्फे आणलेलं. याच्या लेखनासोबतच दिग्दर्शन आणि भूमिकाही बाबूरावांनी केलेली.
पहिल्या प्रयोगात शरद तळवलकर, शीला गुप्ते, राजा गोसावी, प्रभाकर मुजुमदार, इंदिरा चिटणीस, इंदू मुजुमदार यांच्या भूमिका होत्या. यातल्या हीरोची म्हणजे हरिभाऊ हर्षेची मध्यवर्ती भूमिका भाऊ बिवलकर यांनी केलेली. ‘नटसम्राट’ नाटकातील विठोबा, ‘भावबंधन’ मध्ये महेश्वपरी, ‘लग्नाची बेडी’तला अवधूत या भूमिका भाऊंनी केलेल्या. पुढे काही प्रयोगांत शरद तळवलकर यांनी पत्रकार शंखनाद व हरिभाऊच्या भूमिका केल्या.
फिल्मस्टार राजा गोसावी यांनीही हरिभाऊची भूमिका केली होती. रवींद्र स्टार्स, श्री स्टार्स या संस्थांतर्फे त्यांनी स्वत:ची व इतर नाटककारांची नाटके रंगभूमीवर आणली. त्यांचा 'वारा फोफावला' हा कवितासंग्रह, 'करायला गेलो एक', ' संसार पाहावा मोडून', 'अन् झालं भलतंच', 'नवरा म्हणून नये आपला', 'रात्र थोडी सोंगे फार' इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत.
बाबुराव गोखले यांचे २८ जुलै १९८१ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दामिनी, अवंतिका, अक्कासाहेब, राधिका असो की राजश्री प्रॉडक्श्नच्या गाजलेल्या हिंदी मालिका. रोहिणी निनावेंच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली प्रत्येक व्यक्तिरेखा आणि मालिका लोकप्रिय होतेच.
जोगवा ह्या २००९ सालच्या मराठी चित्रपटामधील भूमिकेसाठी मुक्ताचे कौतुक झाले व तिला ह्यासाठी काही पुरस्कार देखील मिळाले. आपल्या वैविध्यपूर्ण आणि सहज अभिनयाने मुक्ताने रसिकांच्या मनात प्रेमाचे स्थान मिळवले आहे. टेलिव्हिजन, सिनेमा आणि नाटक अश्या तिन्ही माध्यमांवर जबरदस्त पकड असणार्या अत्यंत मोजक्या अभिनेत्यांमध्ये मुक्ताचे स्थान अग्रक्रमावर आहे.
इत्तफाक मधील सी.आय.डी. इन्स्पेक्टर कर्वें या भुमिकेने त्यांचे आयुष्य बदलून टाकले. धुम्मस या गाजलेल्या गुजराती नाटकावर आधारित हा सिनेमा एकाच सेटवर संकलनासह आठ दिवसात तयार झाला. इन्स्पेक्टर चा युनिफॉर्म त्यांच्या व्यक्तीमत्वाला इतका शोभला की तश्याच भुमिकेचे सिनेमे भरभर मिळत गेले.
१९४७ मध्ये गरीबांचे राज्य या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. कुंकवाचा धनी या १९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी शांताबाई आपटे यांच्याबरोबर नायकाची भूमिका प्रथमच केली.
फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार कुमार मंगलम बिर्ला २०१७ साली भारतातले आठवे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते. नोव्हेंबर २०२० नुसार दानशूरांच्या यादीत कुमार मंगलम बिर्ला चौथ्या स्थानावर आहेत. त्यांनी एका वर्षात २७६ कोटी रुपये सामाजिक कार्यासाठी दान केले आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti