जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
पल्लवी रेणके या भटक्या-विमुक्तांसाठी पूर्ण वेळ काम करणार्या एक कर्तुत्ववान कार्यकर्त्या आहेत. शिक्षणाने त्या एल एल बी असल्या तरी स्वतःची नाळ मात्र त्या विसरलेल्या नाहीत. शहरात, चांगल्या प्रतिष्ठीत उद्योजकांच्या फिर्यादी लढवून बक्कळ पैसा कमवण्याच्या संध्या उपलब्ध असूनसुध्दा त्या उच्च न्यायालयात किंवा इतर कोर्टांमध्ये जी काही वकिली करतात ती भटक्या-विमुक्तांच्या हितासाठीच. त्या स्वत: ‘गोंधळी’ कुटुंबात जन्मलेल्या आहेत.
ईस्ट विंड, वेस्ट विंड ही पर्ल बक यांची पहिली कादंबरी १९३० मध्ये प्रसिध्द झाली. त्यानंतर प्रकाशित झालेल्या द गुड अर्थ (१९३१) ह्या कादंबरीने पर्ल बक यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करून दिली. भूमीवर प्रेम करणारा वांग लुंग हा कष्टाळू चिनी शेतकरी आणि त्याची बायको ह्यांची ही वास्तववादी कहाणी बायबलसारख्या साध्या, सोप्या शब्दात बक यांनी मांडली होती. १९३२ मध्ये या कादंबरीला ‘पुलिट्झर पारितोषिक’ मिळाले.
अभिजात भारतीय रंगभूमी, लोकरंगभूमी आणि समकालीन रंगभूमी यांचे अचूक भान असणा-या प्रतिभाशाली नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला.
विजया मेहता उर्फ बाई हे नाव म्हणजे मराठी रंगभूमीवरचा एक मैलाचा दगड आहे. फक्त मराठी रंगभूमीच नव्हे, तर हिंदी इंग्रजी नाटकं, दूरदर्शन, चित्रपट याही क्षेत्रांत मा.विजया मेहता वावरलेल्या आहेत. पण त्या खऱ्या रमल्या त्या नाटकातच. विजया मेहता या पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत होत. जवळच्याच नात्यांतील नलिनी जयवंत, शोभना समर्थ व त्यांच्या कन्या नूतन, तनुजा यांच्यामुळे मोहमयी हिंदी चित्रसृष्टीशी जवळचा संबंध येऊन देखील त्यांची भावनिक जवळीक मात्र सतत मराठी रंगसृष्टीशी राहिली.
दुर्गा खोटे यांचा मुलगा हरीन खोटे यांच्याशी विवाह झाल्यावर देखील हिंदी चित्रपटांच्या मायाजालामध्ये न गुरफटण्याचा निर्णय त्यांनी कायम ठेवला हे पहाता ‘आपल्या मराठी रंगभूमीचे नशीब बलवत्तर‘ असेच म्हणावयास हवे. साठ सत्तरच्या दशकांत तेंडुलकर, खानोलकर, एलकुंचवार व इतर समकालीन संवेदनक्षम नाटककारांची, नाट्यक्षेत्रातील तत्कालीन प्रचलित रुढींना सुरुंग लावून आणि प्रमाण मानल्या गेलेल्या प्रस्थापित संकेतांची चौकट नाकारुन वा प्रसंगी धुडकावून देऊन प्रयोगशीलतेला प्राधान्य देणारी, नवनवीन नाटकेएकांकिका ‘रंगायन‘ वा अन्य माध्यमांतून मंचावर आणण्यात बाईंचा आणि त्यांच्या जोडीने अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, माधव वाटवे, कमलाकर सारंग, श्रीराम लागू या त्यांच्या सहकाऱ्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. ‘रंगायन‘ संस्था व त्या अनुषंगाने एक चोखंदळ प्रेक्षकवर्ग सुध्दा उभारुन प्रायोगिक एकांकिकानाटकांची चळवळ त्या काळात त्यांनी दहाबारा वर्षे जोमाने चालवली.
सतत काहीतरी नवीन करण्याचा देण्याचा ध्यास घेतलेल्या विजया मेहता प्रायोगिक समांतर रंगभूमीने त्या काळात अक्षरशः झपाटल्या गेल्या. मात्र पुढे दुर्दैवाने जेव्हा ‘रंगायन‘ अंतर्गत बेबनाव मतभेदांमुळे फुटली तेव्हा प्रायोगिकतेच्या चौकटीतच कायम रहाण्याच्या विचारांचे गाठोडे ओझे ऊराशी न बाळगता व्यावसायिक रंगभूमीवर सुध्दा तितक्याच ताकदीने व उत्साहाने त्या परत कार्यरत झाल्या व स्थिरावल्या. वैयक्तिक जीवनात सुध्दा, लग्नानंतर अवघ्या पाच वर्षांतच पदरात दोन लहान मुलं असताना पतिनिधनाचा प्रचंड आघात सोसून व त्यामुळे आयुष्याला मिळालेली विलक्षण कलाटणी पचवून, बाई न खचता परत कंबर कसून उभ्या राहिल्या. पुढे कालौघात फरोख मेहता यांच्याशी पुनर्विवाह करुन त्या पुनश्च स्थिरस्थावर झाल्या.
‘पाश्चांत्य रंगमंचावरील जे भावले ते मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजे‘ या भावनेने बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या ‘कॉकेशियन चॉक सर्कल‘चे रुपांतर ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, आयनेस्को यांच्या ‘चेअर्स‘ या एकांकिकेचे अनुवादित रुप ‘खुर्च्या‘ या व अशा इतर काही विदेशी नाट्यकृती त्यांनी मराठी रंगमंचावर आणल्या. याच धर्तीवर ‘मराठी नाटकांतील काही उत्तम कृती सुध्दा पाश्चाकत्य प्रेक्षकांसमोर सादर झाल्या पाहिजेत‘ असा विचार करुन जर्मन दिग्दर्शक फ्रिट्झ बेनेव्हिट्झ व ब्रिटिश दिग्दर्शक पीटर ब्रुक यांच्या मदतीने ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, ‘मुद्राराक्षस‘, ‘शाकुंतल‘, ‘हयवदन‘, ‘नागमंडल‘ या नाटकांचे प्रयोग मूळ व/वा रुपांतरित वेषात परदेशी मंचांवर सादर केले. भाषिक सांस्कृतिक भौगोलिक मर्यादा ओलांडून त्यांनी मराठी नाटक सीमेपार नेले.
‘श्रीमंत‘, ‘मादी‘, ‘एक शून्य बाजीराव‘, ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, ‘पुरुष‘, ‘बॅरिस्टर‘, ‘महासागर‘, ‘हमीदाबाईची कोठी‘, ‘वाडा चिरेबंदी‘, ‘हयवदन‘, ‘सावित्री‘ अशी अनेक लक्षणीय नाटकेएकांकिका तसेच ‘पेस्तनजी‘, ‘रावसाहेब‘, ‘स्मृतिचित्रे‘ अशा अनेक लक्षवेधी चित्रकृती बाईंच्या रेखीव बांधीव दिग्दर्शनाने फुलल्या फुलवल्या. केवळ अर्थकारणाच्या म्हणजेच ‘गल्ल्याच्या गणिता‘च्या दृष्टीने पाहिल्यास यातील बरीचशी चांगलीच तरली तरारली फोफावली असली तरी क्वचित काही बुडाली फसली देखील. मात्र यातील प्रत्येक कृतीवर आपला असा एक वैशिष्ठ्यपूर्ण कलात्म ठसा उमटवून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व बाईंनी निश्चितच प्रस्थापित केले. बाईंनी स्वतःची अशी एक स्वतंत्र पठडी वा घराणं निर्माण केलं.
मराठी नाट्यक्षेत्रातील आजचे अनेक आघाडीचे व प्रथितयश कलाकार त्या काळात बाईंच्या हाताखाली हळूहळू जडतघडत गेले. विक्रम गोखले, उषा नाडकर्णी, नाना पाटेकर, रिमा लागू, भक्ती बर्वे, प्रदीप वेलणकर, सुकन्या कुलकर्णी, उदय म्हैसकर, नीना कुलकर्णी अशा अनेक अभिनय निपुण कलाकारांची एक अख्खी नवीकोरी फळी त्यांच्या कुशल दिग्दर्शकीय हातातून तयार झाली. ‘संध्याछाया‘ मधील परदेशस्थ पुत्राच्या विरहाने झुरणारी प्रेमळ कुटुंबवत्सल नानी असो वा ‘बॅरिस्टर‘ मधील केशवपन केलेली आलवण नेसलेली भावनेच्या कोंड माऱ्याने घुसमटणारी मावशी असो किंवा ‘हमीदाबाईची कोठी‘ मधील कोठी संस्कृतीतील गायकी परंपरेचा ऱ्हास असहाय्यपणे पहाणारी हमीदाबाई असो अथवा ‘वाडा चिरेबंदी‘ मधील पति निधनानंतर कोसळणारी नाती व वाड्याचं ढासळणारं गतवैभव पचवणारी विधवा आई असो बाईंनी मात्र समोर हाती आलेल्या भूमिकेला केवळ न्याय आणि संपूर्ण न्यायच दिला.
गोळीबंद संवादफेक, हवा तो परिणाम नेमका साधण्यासाठी संवादांतील लयीवर आणि प्रसंगी शब्दविरामांवर देखील दिलेला भर, चेहऱ्यावर पसरलेले अस्सल हावभाव आणि अचूक देहबोली यातून व्यक्तिरेखा नेमकी पकडून प्रत्ययकारक पणे जिवंत उभी करण्याकडे त्यांचा कटाक्ष दिसून येतो. भारत सरकारने विजया मेहता यांना ‘पद्मश्री‘ देऊन गौरव केला. याचबरोबर त्यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार‘, ‘कालिदास सन्मान‘, ‘तन्वीर सन्मान‘, ‘विष्णुदास भावे सुर्वणपदक‘, महाराष्ट्र शासनाचा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार‘, ‘नाट्यदर्पण पुरस्कार‘, चतुरंग प्रतिष्ठानाचा ‘जीवनगौरव पुरस्कार‘, ‘रावसाहेब‘मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय फिल्म पारितोषिक, एस.एन.डी.टी विद्यापीठाची डॉक्टररेट, इचलकरंजी मराठी नाट्य संमेलनाध्यक्षपद असे अनेक सन्मान किताब मानमरातब मिळाले आहेत.
विजया मेहता यांनी ‘एन.सी.पी.ए‘ च्या संचालकपदाची धुरा तब्बल सतरा वर्षे सांभाळली. नाटकांच्या प्रयोगांच्या कारणाने त्यांचे होत असलेले झंझावाती आंतरराष्ट्रीय दौरे विशेषतः युरोपमधील अथक भ्रमंती पहाता, मराठी साहित्य कलाजगतातील कोणालाही न सोडता आपल्या निखळनिर्विष विनोदाने कोपरखळ्या मारणाऱ्या ठणठणपाळाने त्यांचे ‘विजयोस्की मेहतोविच‘ असे नामकरण केले.
‘झिम्मा : आठवणींचा गोफ‘ हे मा.विजया मेहता यांचे आत्मचरित्रपर पुस्तक आहे. यात १९५१ सालापासून ते आजतागायत नाटकासाठी रंगभूमीसाठी आयुष्य वेचलेल्या बाईंच्या आणि रंगभूमीच्याही अनेक स्थित्यंतरांतून घडलेल्या रंगयात्रेचा हा सफरनामा या पुस्तकात आहे.
तसेच
बाई : एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास.
विजया मेहता यांच्या नाट्य कारकिर्दीचा आणि व्यक्तित्वाचा वेध घेणारं हे आणखी एक पुस्तक. विजयाबाईंच्या शिष्य मंडळींनी, सुहृदांनी त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. बाईंची गॅंग या नावानं ओळखले जाणार्या महेश एलकुंचवार, नाना पाटेकर, दिलीप कोल्हटकर, विक्रम गोखले, सुहास जोशी, रिमा, विजय केंकरे, नीना कुलकर्णी, अमृता सुभाष अशा अनेकांनी विजया मेहता यांचं व्यक्तिचित्र तयार केलं आहे. वेगवेगळ्या कलाकृती तयार होतानाची प्रक्रिया, बाईंचं कौशल्य, त्या-त्या वेळचे अनुभव अशा गोष्टी त्यामुळे उलगडतात. विजया राजाध्यक्ष, महेश एलकुंचवार यांनी घेतलेल्या एका मुलाखतीचा पुस्तकात समावेश आहे. भास्कर चंदावरकर यांनी लिहिलेल्या एका लेखाचा अनुवादही या पुस्तकात समाविष्ट आहे. याशिवाय पु. ल. देशपांडे, श्री. पु. भागवत, दामू केंकरे, डॉ. श्रीराम लागू, भक्ती बर्वे अशा दिग्गजांनी बाईंबद्दल यापूर्वी लिहिलेल्या लेखांचं संकलनही पुस्तकात आहे. अंबरीश मिश्र यांनी संपादन केलं आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
प्राचीन मराठी वाङ्मयाचे संशोधक पांडुरंग नारायण कुलकर्णी यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला.
“संशोधन धारा” या ग्रंथातून त्यांनी प्राचीन कवींच्या कवितांवर तोपर्यंत झालेल्या संशोधनातील चुका दाखवून निर्णायक मत व्यक्त केले. याशिवाय “नागेशमाहात्म्य” चे संपादन त्यांनी केले.
Pandurang Narayan Kulkarni
मीना कुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी एका सुन्नी मुस्लीम परिवारात झाला. आधीच खुर्शीद नावाची मुलगी असल्याने मुलगा व्हावा, अशी तिच्या आई-वडिलांची अपेक्षा होती. पण मुलगी जन्माला आल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यावेळी तर त्यांच्याकडे डॉक्टरांचे बिल देण्यासाठीही पुरसे पैसे नव्हते. म्हणून जन्मल्यानंतर लहानग्या महजबीनला मुस्लीम समाजाच्या अनाथालयात सोडण्याचे तिच्या जन्मदात्यांनी ठरवले. मात्र अनाथालयाच्या पायरीवर तिला सोडून जात असताना ऐनवेळी तिच्या वडिलांचे हृदयपरिवर्तन झाले आणि माघारी परतून महजबीनला छातीशी घट्ट कवटाळले. तसेच जमेल तसे तिचे पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला.
मीना कुमारी यांना कलेचा वारसा तिच्या आई-वडिलांकडूनच मिळाला. त्यांचे वडील अली बक्ष हे चित्रपट तसेच पारसी रंगभूमीवरील एक कलाकार होते. काही चित्रपटांत संगीतकार म्हणूनही त्या काळी त्यांनी काम केले होते. आई इक्बाल बानो, पूर्वाश्रमीची प्रभावती देवी ही एक प्रसिद्ध नृत्यांगना होती. कामिनी या नावाने ती रंगभूमीवर अभिनय करत असे. पंडित रवींद्रनाथ टागोर यांच्या परिवाराशी त्यांचे जवळचे नातेसंबंध होते. मीना कुमारीला यांच्या परिवारात त्यांना ‘मुन्ना’ या नावाने संबोधले जात असे. चौथ्या वर्षापासूनच तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. विजय भट्ट यांचा ‘लेदर फेस’ हा त्यांचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट. खरंतर त्यांना शिकायची खूप इच्छा होती. पण चित्रपटांत अभिनय करून त्यांना लहानवयातच कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागली. अधुरी कहानी, फरजद ए हिंद, लाल हवेली, अन्नपूर्णा, तमाशासारख्या वीस चित्रपटांत त्या बाल कलाकार ‘बेबी मीना’ म्हणून चमकली. नायिका म्हणून अभिनय केलेला ‘बच्चों का खेल’ हा पहिला चित्रपट. त्यावेळी मा.मीना कुमारी अवघी चौदा वर्षाची होती. सुरुवातीला त्यांनी पौराणिक चित्रपटांतून अभिनय केला. नर्गिस, निम्मी, सुचित्रा सेन, नूतनसारख्या नव्या दमाच्या अभिनेत्रींचा तो काळ होता. ‘महल’ या चित्रपटाच्या यशानंतर एका चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक कमाल अमरोही यांना तिने अभिवादन केले असता त्यांनी तिच्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. मा.मीना कुमारी नायिका म्हणून यशस्वी ठरल्यानंतर कमाल अमरोही यांच्याकडूनच तिला त्यांच्या ‘अनारकली’ चित्रपटात काम करण्याबाबतचा प्रस्ताव आला. मागील अनुभव चांगलाच लक्षात असल्याने मा.मीना कुमारीने प्रस्ताव नाकारला. त्यामागचे कारण समजल्यानंतर कमाल अमरोही यांनी समक्ष भेटून तिचा गैरसमज दूर केला. त्यानंतर मीना कुमारीने सदर चित्रपट करण्यासाठी होकार दिला. दरम्यानच्या काळात मीना कुमारी यांना अपघात झाला. तिच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्या कालावधीत कमाल अमरोही तिला ससून हॉस्पिटलला नियमित भेटावयास येत असत. ‘अनारकली’ चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेबाबत तिने अमरोही यांना विचारले असता तिच्या हातावर ‘मेरी अनारकली’ असे लिहीत. त्या भूमिकेसाठी अन्य कुणाच्या नावाचा विचारही करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले. अपघातात हाताला इजा झाल्यामुळे मीना कुमारीला कायमस्वरूपी बँडेड लावावे लागले. साडी अथवा ओढणीत तो हात तिला लपवावा लागत असे. पुढे ‘अनारकली’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होऊनही आर्थिक बाबींमुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. मात्र त्या दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अमरोही यांना मा.मीना कुमारी ‘चंदन’ तर अमरोही तिला ‘मंजू’ या नावाने संबोधत असत. वडिलांच्या संमतीशिवाय निकाह करण्यास मीना कुमारी तयार नव्हती. आधी लग्न करू आणि मग घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांची संमती मिळवू, असे अमरोही यांनी पटवून दिल्याने मा.मीना कुमारी राजी झाली. १४ फेब्रुवारी १९५२ रोजी मीना कुमारीला वडिलांनी तिची लहान बहीण महलिकासह फिजिओथेरपी उपचारासाठी एका दवाखान्यात सोडलेले असताना रात्री ८ ते १० वाजताच्या दरम्यान प्रथम शिया आणि सुन्नी पद्धतीने मोजक्या साक्षीदारांसह दोघांचा निकाह झाला. पुढे वडिलांना समजल्यावर ते संतापले. तलाक व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी दोघांच्या भेटीगाठींवर निर्बंध आणले. मीना कुमारी यांना पती, कमाल अमरोहीच्या ‘डेरा’ चित्रपटात अभिनय करायची इच्छा होती. मात्र अली बक्ष यांनी मेहबूब खान यांच्या ‘अमर’ या चित्रपटात अभिनय करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. त्या चित्रपटाचे चार-पाच दिवसांचे चित्रीकरण झालेले असताना मेहबूब खान यांच्याशी मतभेद झाल्याने मीना कुमारी ‘अमर’ चित्रपटाचे चित्रीकरण अर्धवट सोडून पती कमाल अमरोही यांच्या ‘डेरा’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निघून गेली. या कारणामुळे वडिलांनी रात्री घरात न घेतल्याने पयार्याने मा.मीना कुमारी यांना कमाल अमरोही यांच्या घरी जावे लागले. मा.अमरोही यांना पहिल्या पत्नीपासून तीन अपत्ये होती. त्यामुळेच खूप इच्छा असूनही मीना कुमारीला मूल होऊ न देण्याचा निर्णय त्यांचेकडून तिच्यावर लादला गेला.
परिणिता, दिल अपना और प्रीत पराई, दायरा, एक ही रास्ता, शारदा, दिल एक मंदिर, साहिब बिवी और गुलाम, काजल, फूल और पत्थर हे मा.मीना कुमारी यांनी अभिनय केलेले काही उल्लेखनीय चित्रपट. ‘परिणिता’ या चित्रपटापासून तिला भारतीय नारीच्या भावुक भूमिकाच मिळत गेल्या. फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली मा,मीना कुमारी ह्या पहिली अभिनेत्री. १९५३ साली फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन्ही वर्षी ‘बैजू बावरा’ आणि ‘परिणिता’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. पुढे ‘साहिब बिवी और गुलाम’ आणि ‘काजल’ चित्रपटांतील भूमिकांसाठी असे एकूण चार फिल्मफेअर पुरस्कार तिला मिळाले. दहाव्या फिल्मफेअर पुरस्कारावेळी ‘मैं चुप रहूंगी’, ‘आरती’ आणि ‘साहब बिवी और गुलाम’ चित्रपटांसाठी सवरेत्कृष्ट नायिकेच्या पुरस्कारासाठीची नामांकने तिलाच मिळालेली होती. मा.मीनाकुमारी ही अभिनेत्रीबरोबरच गायिका तसेच कवयित्रीदेखील होती. मात्र आपल्या रचना प्रकाशित करण्याचा फारसा प्रयत्न तिने कधीच केला नाही. ‘नाझ’ या नावाने तिच्या काही उर्दू रचना प्रकाशित आहेत. मा.मधुबाला ह्या मीना कुमारीच्या आवाजाची चाहती होती. दिलीप कुमार तिच्यासमोर नि:शब्द होत असे तर राजकुमार आपले संवाद विसरून जात असे. अभिनेता भारतभूषण तिच्या एकतर्फी प्रेमात होते. मा.मीना कुमारी यशाचे शिखर काबीज करत होती. मात्र कमाल अमरोही यांना तिच्या यशाचा हेवा वाटू लागला होता. सोहराब मोदी यांनी एका चित्रपटाच्या प्रीमियरवेळी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल यांना कमाल अमरोही यांचा परिचय लोकप्रिय अभिनेत्री मीना कुमारी यांचे पती असा करून दिला होता. तेव्हा ‘मी कमाल अमरोही व ही माझी पत्नी मीना कुमारी’ असे नमूद करत अमरोही त्या कार्यक्रमातून निघून गेले. मीना कुमारीने अभिनय करणे सोडून द्यावे, असे त्यांना वाटत असे. मात्र मीना कुमारीने नकार दिल्याने त्यांनी काही अटींवर तिला अभिनय कारकीर्द सुरूठेवण्यास अनुमती दिली. चित्रीकरण आटोपून साडेसहा वाजण्याच्या आत घरी परतणे. मेकअपरूममध्ये मेकअपमनशिवाय अन्य कुणाशी संवाद न साधणे. स्वत:च्याच वाहनाने प्रवास करणे, अशा त्या अटी होत्या. मात्र मीना कुमारीने त्या निमूटपणे स्वीकारल्या. तरी त्यांच्या वैवाहिक संबंधात दुरावा येत होता. पुढे ते विभक्त राहू लागले. मीना कुमारी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अभिनेता धमेंद्र हा चित्रपटांत जम बसवण्यासाठी धडपडत होता. मीना कुमारीच्या यशाचा धमेंद्रला मोठया प्रमाणावर फायदा झाला. दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू असल्याची जोरदार चर्चा होती. त्यावेळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि मीना कुमारीची विमानतळावर भेट झाली असता त्यांनी तिच्याकडे धमेंद्रबाबत विचारणादेखील केली होती. पुढे मात्र ‘फूल और पत्थर’ चित्रपटानंतर धमेंद्रने तिच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे ती अत्यंत व्यथित झाली. तिची प्रकृतीही दिवसेंदिवस खालावत होती. डॉक्टरांनी झोप येण्यासाठी तिला एक पेग ब्रँडी घेण्याची सूचना केली. पण एक पेगचे दोन, दोनचे चार असे पेग वाढतच गेले आणि मीना कुमारी पुरती नशेच्या आहारी गेल्या. चित्रीकरणावेळी, प्रवासात सगळीकडे तिच्यासोबत पर्समधे मदिरेची छोटी कुपी असायची. ‘साहिब बिवी और गुलाम’मधील ‘छोटी बहू’ हे पात्र आपल्या वास्तव जीवनाशी साधम्र्य असल्याचे मीना कुमारी सांगत असत. त्यानंतरच्या काळात कमाल अमरोही त्यांच्या महात्त्वाकांक्षी ‘पाकिजा’ चित्रपटाची निर्मिती करत असताना आर्थिक संकटांना तोंड देत होते. त्या चित्रपटात मा.मीना कुमारी केवळ अभिनयच करत होती, असे नाही तर तिने तिची सर्व मालमत्ता अमरोही यांच्या चित्रपटासाठी पणाला लावली होती. तरीही ‘पाकिजा’चे चित्रीकरण अनेक वर्षे रखडले गेले. सुनील दत्त आणि नर्गिस यांनी पुढाकार घेऊन पुन्हा चित्रीकरण केले. ३ फेब्रुवारी १९७२ रोजी ‘पाकिजा’ प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला सुरुवातीला फारसा प्रतिसाद फारसा मिळाला नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांनंतरच मा.मीना कुमारीचे निधन झाले. मीना कुमारी यांचे ३१ मार्च १९७२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / श्रीराम वाघमारे
मीनाकुमारी यांची काही गाणी, पाकिजा चित्रपट, बायोग्राफी
https://youtu.be/0R04XbzDNjU
https://youtu.be/qkD39k9xaVQ
https://youtu.be/XtdGZd7vR-U
https://youtu.be/jNdVm0W7Vtc
https://youtu.be/TnM5g4eTYUI
https://youtu.be/Q2X6u0Zg8P8
संख्याशास्त्रात कारकीर्द करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राम प्रधान यांनी वर्गमित्र स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन थेट वरिष्ठ पदावर विराजमान झाल्यानेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि १९५२ साली भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) प्रवेश केला.
मुख्यमंत्री झाल्यानंतर अंतुले यांची कारकीर्द अवघ्या १८ महिन्यांची असली तरी, त्यांनी दूरदृष्टीचे अनेक निर्णय घेतले आणि ते घेतानासुद्धा गरीब माणसाला समोर ठेवले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळजवळ ६० टक्के गाण्यात कावस, केरसी व बजी या लॉर्ड फॅमिलीचं योगदान आहे. एकट्या केरसीचीच पंधरा हजार गाणी आहेत.
भय्यूजी महाराज यांचे खरे नाव उदयसिंह देशमुख. राष्ट्रसंत म्हणून ओळख असणारे भय्यूजी महाराज यांचा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मोठा अनुयायी वर्ग होता. २०१६ मध्ये भय्यूजी महाराज यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती जाहीर केली होती. त्यांचा इंदूर येथे आश्रम असून, त्याच्या महाराष्ट्रातील अन्य शहरांतही शाखा आहेत.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा प्रथम वापर त्यांनी जादूमध्ये आणला. ते त्या काळी एलईडी दिव्यांचा कोट वापरीत. भूत व ड्रॅगन यांची फाईट हा त्यांच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे. ‘डोळे बांधून मोटारसायकल चालविणे’ हा गाजलेला प्रयोग, ही त्यांची खासीयत होती.
Copyright © 2025 | Marathisrushti