जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कुंजालाल गांगुली व गौरी देवी हे त्यांचे आई-वडील. जेष्ठ कलाकार अशोक कुमार यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला. १९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैय्या, या चित्रपटात मा.अशोक कुमार यांनी पहिल्यांदा काम केले. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त ते इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकले.
वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणार्यान या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हीरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमार यांनी वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमार यांनी अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही.
दादामुनींच्या बाबतीत दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे.
शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती. सुमारे सहा दशकं त्यांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाने भुरळ पाडली. या काळात त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतीय चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी भारत सरकारने १९८८ मध्ये अशोक कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने व १९९८ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले.
अछुत कन्या, किस्मत, परिणीता, चलती का नाम गाडी, आशीर्वाद, छोटी सी बात, मिली, खुबसुरत, खट्टा मीठा, मि. इंडिया हे अशोक कुमार यांचे गाजलेले चित्रपट. रेल गाडी रेल गाडी हे बॉलिवूडमधील पहिले रॅप गाणे त्यांनीच गायले आहे. अशोक कुमार यांचे १० डिसेंबर २००१ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचे शालेय शिक्षण मिरज येथेच इयत्ता पहिलीपर्यंत झाले. त्यांचा जन्म १ जानेवारी १९०९ मिरज येथे झाला. वडील लक्ष्मणरावांना संगीताची आवड होती. संगीताचे भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांकडे ते थोडीफार गायकी शिकले होते. गणपतरावांना २ भाऊ आणि ५ बहिणी. मोठा बळवंत हा बळवंतराव मराठे यांच्या ‘हिंदी नाटक मंडळीत’ बालनट होता. मधला शंकर हा जनुभाऊ निमकरांच्या ‘स्वदेश हितचिंतक मंडळीत होता. पुढे लक्ष्मणरावांनी शंकर आणि गणूला संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’मध्ये दाखल केले. ललितकलादर्शच्या ‘शापसंभ्रम’ मध्ये गणूने महाश्वेताच्या मैत्रिणीचे काम केले. मराठी संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या किर्लोस्कर संगीत मंडळीतील दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांनी ‘किर्लोस्कर’मधून बाहेर पडून नवीन नाटय़संस्था काढण्याचे ठरविले. १८ जानेवारी १९१८ रोजी बोरिवली येथे या नवीन ‘बलवंत संगीत मंडळी’ची स्थापना झाली. या तीन प्रमुख कलाकारांबरोबरच अन्य कलाकारांचीही संस्थेला आवश्यकता होती.
शंकर आणि गणू या बालनटांची कीर्ती ऐकून कृष्णराव कोल्हापुरे यांनी त्यांना ‘बलवंत’मध्ये आणले. ज्या बलवंत संगीत मंडळीने गणूचे आयुष्यच बदलून टाकले, उजळून टाकले त्या कंपनीत गणू वयाच्या दहाव्या वर्षीच दाखल झाला.
नाटय़ाचार्य अण्णासाहेब (बळवंत) किर्लोस्कर आणि लोकमान्य टिळक यांच्या नावाचा सार्थ अभिमान बाळगणारी बलवंत कंपनी राष्ट्रकार्यातही अग्रेसर होती. कंपनीच्या स्थापनेनंतर लगेचच लोकमान्य टिळकांच्या होमरूल चळवळीच्या फंडासाठी आयोजित केलेल्या ‘पुण्यप्रभाव’ या नाटकाच्या प्रयोगाला स्वत: लोकमान्य टिळक हजर होते. या नाटकात युवराजाची भूमिका करताना गणूच्या ‘भुलूनिया खलजनालापा’ ‘दुर्दैवे हेतू झाला’ ‘अंतरि खेद भरे’ या पदांना आणि भूमिकेला श्रोत्यांची भरपूर दाद मिळाली. पदांना ‘वन्समोअर’ मिळाले. मध्यंतरात लोकमान्यांनी गणूचे विशेष कौतुक करताना म्हटले,‘युवराजाची सुंदर भूमिका करणऱ्या या मुलाचे कौतुक करावेसे वाटते. याला काहीतरी द्यायला हवे. पण मी हा असा! काय देऊ या मुलाला?’
टिळक असे म्हणताहेत तोच त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या गृहस्थांनी आपली सोन्याची अंगठी काढून टिळकांच्या हातात दिली. ‘‘या सद्गृहस्थांनी दिलेली ही अंगठी मी या मुलाला बक्षीस देतो,’’ असे म्हणून टिळकांनी ती अंगठी गणूच्या बोटात घातली.
पुढे १९३१ मध्ये झालेल्या बलवंतच्या स्वातंत्र्यवीर सावरकरलिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकाच्या वेळीही नलिनीच्या अप्रतिम भूमिकेबद्दल स्वातंत्र्यवीरांनी त्यांचे कौतुक केले. शासकीय पुरस्कारांकडून सदैव उपेक्षित राहिलेल्या गणपतरावांना लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीरांनी केलेले हे कौतुक कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे वाटत असे.
१९१८ ते १९४० या बलवंत कंपनीच्या कार्यकाळात गणपतरावांनी कंपनीचे मुख्य कलाकार दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्याबरोबर प्रामुख्याने स्त्री भूमिका केल्या. शारदा, उग्रमंगल, भावबंधन, राजसंन्यास, संन्यस्त खड्ग, ब्रह्मकुमारी इ. नाटकातील त्यांच्या भूमिका रसिकांना पसंत पडल्या. दीनानाथांच्या सहवासात आणि त्यांच्याकडून मिळालेल्या संगीत शिक्षणाने गणपतरावांची कला बहरली. बलवंत कंपनीच्या मालकांनी कपंनी बंद करून ‘बलवंत पिक्चर्स’ ही चित्रपटनिर्मिती संस्था काढली. दीनानाथांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही तरी ‘कृष्णार्जुन युद्ध’, ‘ठकीचं लग्न’, ‘भक्त पुंडलिक’, ‘अंधेरी दुनिया’ या चित्रपटातील गणपतरावांच्या भूमिका रसिकांना भावल्या. यातील काही चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले. दीनानाथांच्या अकाली निधनानंतर त्यांनी मो. ग. रांगणेकराच्या ‘आशीर्वाद’, ‘कुलवधू’ इ. नाटकात प्रमुख भूमिका केल्या. अत्रे पिक्चर्सच्या ‘पायाची दासी’ या चित्रपटाच्या वेळी आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘मा.अविनाश’ हे नाव दिले आणि तेच पुढे रूढ झाले. मास्टर अविनाश यांचे मंगेशकर कुटूंबियांशी त्यांचे घनिष्ठ सबंध होते. दिनानाथ मंगेशकरांच्या पडत्या काळात त्यांनीच हात दिला. दीनानाथांनंतर ह्रदयनाथ, लतादीदींना त्यांनी आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं. दीनानाथांचेही गणपतराव हे प्रिय शिष्य सहकारी होते. १९४२ साली दीनानाथांच्या निधनाच्या वेळी गणपतराव पुण्यात नव्हते. दीनानाथांनी मृत्यूपूर्वी आपल्या या प्रिय शिष्याची आठवण काढताना,
‘इतुके कळवि आजि माझ्या गुरुला’
‘मरताही भय नाही शिवले कचाला’
या विद्याहरण नाटकातील पदात थोडा पदल करून
‘इतुके कळवि आजि माझ्या गणूला
मरताही भय नाही शिवले दिनाला’
असा निरोप गणूसाठी ठेवला.
संगीत आणि नाटय़क्षेत्रातून अकाली, अकारण निवृत्ती घेतलेल्या गणपतरावांनी १९५३-५७ मध्ये तळेगाव दाभाडे येथे ‘अशोक सहकारी शेतकरी संघा’च्या माध्यमातून सामुदायिक शेतीचा प्रयोग केला. त्यानंतर मात्र सांगली येथे जाऊन वानप्रस्थ जीवन ते व्यतीत करू लागले. सांगलीकरांनी त्यांचा योग्य तो सन्मान करताना ‘‘विष्णुदास भावे पुरस्कार’, ‘सांगली भूषण’ हे पुरस्कार त्यांना दिले. तरी शासकीय सन्मान त्यांच्या योग्यतेनुसार मिळणे आवश्यक होते ते त्यांना मिळाले नाहीत. शासनदरबारी त्यांची उपेक्षा झाली हे शल्य त्यांच्या मित्रपरिवाराला आणि चाहत्यांना अस्वस्थ करणारे आहे. मास्टर अविनाश हे संगीत आणि नाटय़क्षेत्राचा चालताबोलता इतिहास आणि शतकाचा साक्षीदार होते. मास्टर अविनाश यांचे निधन ३ एप्रिल २००९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ डॉ. रवींद्र घांगुर्डे
जलाल आगा हे सुप्रसिद्ध विनोदी नट आगा यांचे चिरंजीव. उच्च शिक्षणानंतर पुण्यातील F.T.I मध्ये शिक्षण घेतले. मा जलाल आगा यांनी मुगल-ए-आझम या चित्रपटातल्या बालपणातल्या जहांगीराची भूमिकेद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. जलाल आगा यांनी १९६७ साली के.ए.अब्बास यांच्या बंबई रात की बाहो में या चित्रपटा द्वारे हिरो म्हणून पदार्पण केले. त्यांचे शोले मधील गाणे मेहबुबा मेहबुबा अजुन ही लक्षात आहे. त्यांनी ज्युली, घर घर की कहानी, थोडीशी बे वफाई, दिल आखीर दिल है,गांधी अशा चित्रपटातुन १९९० च्या दशकापर्यंत विनोदी व चरित्र अभिनेता म्हणून हिंदी, तसेच काही इंग्लिश चित्रपटांतून अभिनय केला.
सई परांजपे यांनी सांगीतलेली जलाल आगा यांची F.T.I मधील आठवण.
उच्च शिक्षण झालेला, हुशार, मिश्किल आणि महाद्वाड. एकसारखे काही ना काहीतरी करून वर्गाला आणि मलाही तो हसवायचा. एकदा मी मुलांना एक उतारा लिहून घ्यायला सांगत होते. मधला मजकूर गाळायचा होता. तेव्हा मी म्हटलं, ‘या वाक्यानंतर काही टिंबे टाका. म्हणजे काही भाग गाळला आहे, हे लक्षात येईल.’ हात वर करून जलाल उभा राहिला. गंभीर चेहरा करून त्याने विचारले, ‘दीदी, किती टिंबं टाकायची?’ एकदा मी त्याच्यावर फारच रागावले. त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याचे ठरवून त्याच्याकडे अजिबात न पाहता मी वर्ग घेऊ लागले. दोन दिवसांच्या या उताऱ्यानंतर तो मला भेटला आणि म्हणाला, ‘मला रागवा, उभे करा; पण प्लीज, माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. नटाला ती फार कठोर शिक्षा आहे. मी यापुढे शिस्त पाळीन.’ त्यानंतर दोन-चार दिवस तो बरा वागला. जलाल आगा यांचे ५ मार्च १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कोकणचा इतिहास अभ्यासताना अभ्यासकर्त्याला दापोली तालुकातल्या एका व्यक्तीची दखल घेणे अत्यंत अनिवार्य आहे, ती व्यक्ती म्हणजे कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक, अचूक टायमिंग साधणाऱ्या सहजस्फूर्त नर्मविनोदी शैलीतील लेखन करणारे ‘श्री.अनंत धोंडू शिरगावकर’ म्हणजेच ‘अण्णा शिरगावकर.’ अण्णा शिरगावकर म्हणजे कोकणचा चालताबोलता ज्ञानकोश आहेत.
उज्वल निकम यांच्या कडे भारतातील हाय प्रोफाईल केसेस असतात. त्यामुळे त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. झेड सुरक्षा असलेले उज्वल निकम हे भारतातील एकमेव वकील आहेत. उज्वल निकम यांच्या सभोवताल ४७ शस्त्रधारी कमांडो नेहमी असतात.
आशुतोष गोवारीकर यांनी उमेदवारीच्या काळात सी.आय.डी.मालिकेतून शिवाजी साटम यांच्या साहाय्यकाचे काम केले. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. अमोल पालेकरच्या 'कच्ची धूप' या मालिकेतून आशुतोष अभिनेता म्हणून लोकांना प्रथम दिसले. पुढे तो 'होली', 'गूँज', 'कभी हां कभी ना', 'सलीम लंगडे पे मत रो' सारख्या सिनेमांत काम केले. पण त्यांना अभिनय-कारकिर्दीत घट्ट मुळे रोवता आली नाहीत. मग दिग्दर्शन क्षेत्रातले पदार्पण असलेला त्यांचा 'पहला नशा' हा त्याचा चित्रपट दणकून आपटला. त्याच्या, आमीर खान नायक असलेल्या 'बाजी'च्या दिग्दर्शनानेही बाजी मारली नाही. त्यामुळे 'लगान' हा त्याचा जीवन-मरणाचा प्रश्न बनला होता. आणि 'लगान' ने त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ते दिग्दर्शक व अभिनेता म्हणून अनेक आव्हानांना खंबीरपणे सामोरा गेले.
आशुतोष गोवारीकर यांनी २००१ मध्ये 'लगान' तयार केला. त्यानंतर भारतात क्रीडाविषयक चित्रपटांची लाट आली. आशुतोष गोवारीकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. १९९८ सालच्या सरकारनामा ह्या मराठी चित्रपटामध्ये त्याने भूमिका केली होती. बॉलिवूडमधील दिग्दर्शनासाठी त्याला आजवर फिल्मफेअर सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००१ मध्ये लगानला फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट व २००८ मध्ये जोधा अकबर या चित्रपटाला फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार व फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार मिळाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
वयाच्या बाविसाव्या वर्षी दादांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या पाठशाळेत भगवद्गीतेवर प्रवचनं द्यायला सुरुवात केली.१९५४ मध्ये जपान येथे झालेल्या दुसर्या धार्मिक परिषदेत त्यांनी वेद आणि भगवद्गीतेवरील तत्त्वज्ञानावर भाषण केले.
विजय हजारे यांची कसोटी कारकीर्द काहीशी उशिरा म्हणजे ३१व्या वर्षी सुरू झाली. त्यामुळे त्यांच्या वाटयाला ३० कसोटी सामनेच आले. तरीही त्यांनी छाप पाडली.
लोकमान्य टिळकांनी १८९५ साली म्हणजे १२५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या सरकार्यवाहपदाची जबाबदारी मागील दहा वर्षांपासून पांडुरंगजींवर आहे.
देवधर, देबू
मराठी चित्रपटांनी अलीकडे तांत्रिकदृष्टय़ा आणि आशयदृष्टय़ा कात टाकली असली तरी गेली अनेक वर्षे मराठी चित्रपटांची प्रतिमा, तंत्राच्या दृष्टीने दरिद्री, अशीच होती. ‘कॅमेरा एकाच ठिकाणी ठेवून चित्रीत करण्यात आलेल्या नाटकांचे स्वरूप,’ बहुतांश मराठी चित्रपटांचे असे, हे नाकारता येत नाही.या आरोपातून मराठी चित्रपटांना ‘मुक्ती’ देण्यासाठी धडपडणारी जी मूठभर माणसे मराठी, चित्रपटसृष्टीत होती त्यात छायाचित्रकार देबू देवधर यांचे नाव महत्त्वाचे होते. चित्रपटांच्या चौकटी देखण्या असाव्यात,
त्यांची मांडणी, प्रकाशयोजना यामागे काहीतरी विचार असावा, केवळ प्रसंग चित्रीत करण्याऐवजी, त्या प्रसंगांला, अर्थाला त्या दृश्यांतून उठाव मिळावा आणि एकूण चित्रपटाच्या परिणामात त्याने भर घालावी, यासाठी या सगळ्यांची जाण असलेले छायाचित्रकार आणि दिग्दर्शक असावे लागतात. त्यामुळेच देबू देवधरांना ‘छायालेखक’ हा शब्द फार आवडत असे. ‘छाया-प्रकाशा’च्या मदतीने पडद्यावर चित्र काढणारा अथवा चित्रचौकटींच्या भाषेत आपले लिखाण करणारा तो छायाचित्रकार, अशी व्याख्या देबूदा करीत. त्यांच्या या वैचारिक स्पष्टपणामुळे आणि कलात्मक भूमिकेमुळेच, ‘पाटय़ा टाकू इच्छिणारे’ निर्माते-दिग्दर्शक त्यांच्याकडे येण्याचे टाळत असत आणि मोजक्या परंतु मनाजोगत्या कामावर स्वत: देबूदाही खूश होते, त्यामुळेच तीन दशकांच्या वाटचाली त्यांच्या चित्रपटांची संख्या मोजकी राहिली. देबूदांचे वडील फोटोग्राफर होते व त्यांच्या स्टुडिओतच देबूदांनी ‘स्थिरचित्रणाचे’ पहिले धडे घेतले. त्यातूनच त्यांना ‘हलत्या चित्रणा’चे अर्थात मुव्ही कॅमेऱ्याचे आकर्षण निर्माण झाले व पुढे त्यांनी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमध्ये छायाचित्रणाच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. या संस्थेतून तांत्रिक पदवी मिळविणाऱ्या बहुसंख्य तंत्रज्ञांचा व्यावसायिक चित्रपटांमधील तंत्रज्ञांकडे, प्रशिक्षण न घेता केवळ अनुभवाच्या शिदोरीवर या क्षेत्रात येणाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुच्छतेचा असतो, देबूदा हे त्याला अपवाद होते. प्रशिक्षण हा केवळ पाया असतो, अनुभवातून येणारे शहाणपण कलेच्या क्षेत्रात फार महत्त्वाचे असते, याची जाण त्यांच्या वागण्या-बोलण्यात सतत असे. चित्रपटांसोबत दूरचित्रवाणी क्षेत्रातही ‘कॅमेरामन’ म्हणून काम करताना त्यांनी त्या क्षेत्राची गरज ओळखून आपल्या तंत्रात सहज बदल केला. अर्थात तिथेही त्या माध्यमाकडे गंभीरपणे पाहणाऱ्या जाणत्या लोकांसोबतच काम करण्याचे व्रत त्यांनी कसोशीने पाळले आणि त्या माध्यमाला कमी लेखण्याची वृत्तीही कधी दाखवली नाही. १९७८ च्या सुमारास ते छायालेखक ए. के. बीर यांच्याकडे साहाय्यक म्हणून रुजू झाले, चित्रपट होता ‘दूरियाँ’ (दिग्दर्शक भीमसेन यांचा हा सुंदर चित्रपट, संगीतकार जयदेव यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘मेरे घर आना जिंदगी’, ‘जिंदगी में जब तुम्हारे गम नही थे’ अशा गाण्यांमुळे अविस्मरणीय ठरला.) त्यानंतर स्वतंत्रपणे छायाचित्रकार म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता ‘नागीण’ (मराठी) परंतु देबूदांच्या वेगळेपणाची पहिली मुद्रा उमटली ती अमोल पालेकर दिग्दर्शित, विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या ‘आक्रित’ या चित्रपटामुळे. त्या काळी गाजलेल्या मानवत खून खटल्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या एकूण ‘डार्क मूड’ला अधिक उठाव देणारे, त्यातील व्यक्तिरेखांच्या मनोव्यापारांना, कृतींना अधिक गहिरे करणारे छायाचित्रण देबूदांनी केले होते. ‘आक्रित’ने एक चित्रपट म्हणून मराठी चित्रपटसृष्टीला अर्थपूर्ण कलात्मकतेचा, नव्या सिनेमाचा स्पर्श दिला आणि छायाचित्रणाचा नवा विचारही दिला. देबू देवधर त्याच्या केंद्रस्थानी होते. जानेमाने, ज्येष्ठ छायाचित्रकार गिरीश कर्वे यांनी देबूदांच्या चित्रणाचे मर्म त्यांच्या ‘डाक्युमेण्ट्री स्टाइल’मध्ये आहे, असे म्हटले आहे. म्हणजे वास्तवाचा वेध घेणारे छायाचित्रण ही त्यांची खासियत होती, असे त्यांना म्हणावयाचे आहे. त्यांची पत्नी श्रावणी देवधर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सरकारनामा’ या चित्रपटाची, त्याच्या बजेटची खूप चर्चा झाली. देबूदांनी या चित्रपटाद्वारे ‘डिजिटली शूट’ केलेल्या दृश्यांचा, अर्थात आधुनिकतेच्या आणखी एका अंगाचा मराठीला परिचय करून दिला. त्यांनी मुख्य धारेतील हिंदी चित्रपटही केले, उदाहरणार्थ सचिन यांनी सुभाष घईंसाठी दिग्दर्शित केलेला ‘प्रेम दिवाने,’ श्रावणी देवधरांचा ‘सिलसिला है प्यार का’ परंतु जिथं नृत्यदिग्दर्शक, फाइट मास्टर पन्नास टक्के चित्रपट करतात तिथं छायाचित्रणाला कितीसा ‘स्कोप’ असेल, असे ते म्हणत. त्या त्या प्रसंगांची प्रकाशयोजना अर्थात ‘लाइटिंग’ करण्यात छायाचित्रकाराचे कसब असते. अनेकदा नुसत्या डोळ्यांनी दिसणारा एखादा ‘स्पॉट’ कॅमेऱ्यातून पडद्यावर येतो तेव्हा खूपच वेगळा, अपरिचित वाटतो. ती किमया छायाचित्रकाराची असते. ‘लाइटिंग’ हे देबूदांचे एक खास वैशिष्टय़ होते. चित्रपट जेव्हा एका दृश्याकडून दुसऱ्या दृष्याकडे सरकतो तेव्हा ‘जर्क’ जाणवू नये, ‘जोडकाम’ दिसू नये यालाच चित्रपटाच्या भाषेत ‘स्मूथ मुव्हमेण्ट’ म्हणतात, त्यात देबूदा ‘दादा’ होते. प्रेक्षकांनी कॅमेऱ्याने चित्रपट पाहू नये तर त्यांचे डोळेच ‘कॅमेरा’ व्हायला हवेत. त्यांना कॅमेऱ्याचे अस्तित्वच जाणवू नये हे छायाचित्रकाराचे खरे कसब असते याचा वस्तुपाठ देबू देवधरांच्या चित्रपटांमधून अनेकदा येतो. त्यामुळेच त्यांचे अनेक चित्रपट हे, तो चित्रपट आवडो न आवडो देबूदांच्या कामगिरीमुळे डोळ्यांना ते मेजवानी देत. अर्थात पटकथा, दिग्दर्शक, विषय, निर्मिती संस्था, माणसे हे सगळे पारखूनच देबूदांनी बहुतेक चित्रपट केले. त्यांनी अखेरचे चित्रीकरण केले ते ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ची वाटचाल सांगणाऱ्या माहितीपटाचे. सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या व रघुवीर कूल यांनी दिग्दर्शित केलेल्या या माहितीपटाचे चित्रीकरण संपले त्याच दिवशी देबूदांना प्रथम पाठीचे दुखणे जाणवले. त्यानंतरच्या १० महिन्यांत दुखणे विकोपाला गेले आणि देबूदांची ‘छाया’ ‘प्रकाशात’ विलीन झाली!
Copyright © 2025 | Marathisrushti