जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
श्री विद्याधर अनास्कर व्यवसायाने कर सल्लागार आहेत. ते सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक तज्ज्ञ अभ्यासक आहेत.
ठाण्यातील एक हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणारं पहिलं कॉल सेंटर सुरु करुन डॉ. निरगुडकरांनी एक नवा वस्तुपाठच घालून दिला आहे. तसेच संपूर्ण भारतातील ६०,००० अर्धशिक्षित तरुणांना स्वयंरोजगारासाठी क्षमतावृद्धीचे शिक्षण देऊन रोजगारासाठी समृद्ध केलं.
श्रीविद्या प्रकाशनचे श्री मधुकाका कुलकर्णी.
गेली कित्येक वर्षे, अनेक दर्जेदार ग्रामीण कवी व नवोदित लेखकांचे आर्थिक चणचणींमुळे अंधारात राहिलेले साहित्य आकर्षक व सुबक रूपांमध्ये प्रकाशित करून ते नावारूपास आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. स्थानिक ग्रामीण कवी व लेखकांना ओळख मिळवून देण्यात मधुकाकांचा मोलाचा वाटा आहे.
कोणत्याही जादा अपेक्षांचे ओझे साहित्यिकांवर न लादता त्यांनी अनेकजणांना या क्षेत्रात आर्थिक भरभराट व सुबत्ता मिळवून दिली. उपेंद्र कुलकर्णींचे विपूल व दर्जेदार साहित्य त्यांनी पुस्तकरूपांत आणले आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
आज हार्मोनियम वादक,अभिनेते व संगीतकार,पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक,गोविंदराव टेंबे यांची पुण्यतिथी.
जन्म :- ५ जून १८८१
मा.गोविंदराव टेंबे ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक, होते. त्यांनी ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटात हरिश्चन्द्राची भूमिका करून ते भारतभर गाजलेले नट होते. संगीत नाटकांचे लेखक, ‘मानापमान’ नाटकाचे संगीतकार व त्याच नाटकात धैर्यधराच्या भूमिकेने मराठी रंगभूमि गाजवणारे गायक नट, ‘माझा संगीत विहार’ व ‘माझा जीवन विहार’ या आत्मचरित्रपर रसाळ ग्रंथांचे लेखक अशीही मा. गोविंदराव टेंबे यांची ओळख सांगता येईल. ’अयोध्येचा राजा’, ’अग्निकंकण’, ’मायामच्छिंद्र’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. हार्मोनियम या साथीच्या वाद्याला त्यांनी स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. पेटीचे सूर महाराष्ट्रात कायमचे उमटून ठेवणारे मा.गोविंदराव टेंबे यांची यांची खूप माहिती इंटरनेट वर नाही.
‘माझा जीवन विहार’ या ग्रंथात गोविंदराव टेंबे यांनी आपल्या आयुष्याचा आढावा पुढील शब्दात घेतलेला आहे.
” मी आज यावेळी माझ्या आयुष्याचा आढावा घेत असतांना मला असे दिसून येत आहे की लाभ, हानि, सुख, दुःख, यशापयश इत्यादी महत्वाच्या प्रसंगापासून तो नित्याच्या क्षुल्लक गोष्टीपर्यंत प्रत्येक बाबतीत यशाच्या शैल शिखरावरून मी निराशेच्या खोल गर्तेत आदळायचे आणि अचानक तेथून पुन्हा मला कोणीतरी अज्ञात शक्तीने शिखरावर आणून बसवायचे, अशा सतत अनुभवांमुळे बुद्धीच्या टोचणीविरुद्ध देखील माझा परमेश्वरावरील विश्वास अढळ राहिला आहे. आचारात मी नास्तिकातला नास्तिक आहे आणि विचारामध्ये भावी पिढीच्याही पुढे आहे. मात्र पुरातन आचार विचारांना केवळ पुरातन म्हणून लाथाडायचे ही माझी वृत्ती नाही. परमेश्वर आहे की नाही, या विषयीची मी पंचाईत करत नाही. पण तो मजेने मला खाली पाडतो, माझी धडपड पाहतो आणि मी हताश झाल्यावर कारुण्याच्या एका कटाक्षाने मला वर काढतो ही एकच भावना माझ्यात दृढमूल झालेली आहे, आणि कोणत्याही कारणाने ती मुळातून यत्किंचितही सुटलेली नाही. अर्थात या विश्वासामुळे मी कोणत्याच गोष्टीचा विधीनिषेध मानीत आलो नाही. जे जे प्राप्त होईल ते ते भोगायचे; त्याच्या परिणामाचा विचार करावयाचा नाही — मग तो परिणाम इष्ट असो वा अनिष्ट असो. यामुळे कोणाचेही बरे केले हा अहंभाव नाही व कोणाचे वाईट व्हावे व माझे बरे व्हावे ही आतून रुखरुखही नाही. मनात आलेली गोष्ट योग्यच असणार तेव्हा ती करायची; मग ती बरी असो के वाईट असो. वाईट असेल तर त्यातून ईश्वरेच्छेने आपोआप मुक्तता होईलच; तोपर्यंत ती मला मानवतेच. चांगल्या वस्तूला मी मुकलो तर त्याहीपेक्षा अधिक चांगली वस्तू मला मिळणार आहे अशीही खात्री ठेवायची ; आणि ती केवळ अंधविश्वासाची खात्री नव्हे, तर अनुभवाची खात्री. या मीमांसेनंतर माझ्या वरवर दिसणा-या बेपर्वा व बेगुमान बेछूट वृत्तीची तरफदारी करण्याचे क्वचितच कारण पडेल. मा.गोविंदराव टेंबे यांचे ९ ऑक्टोबर १९५५ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.गोविंदराव टेंबेयांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- स. ह. मोडक
दिव्या भारती हे चित्रपटसृष्टीला पडलेलं एक स्वप्न होतं असं म्हटलं तर अतिशोयक्ती वाटू नये. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ रोजी झाला.कारण वयाच्या अवघ्य़ा १९ वर्षीच तिनं सर्वांची मनं जिंकली होती. विश्वात्मा हा हिंदीतला तिचा पहिला सिनेमा. राजीव राय यांनी तिला या चित्रपटातून हिंदीत ब्रेक दिला. यातलं “सात समंदर पार तेरे ” या दिव्यावर चित्रित केलेल्या गाण्यानं तर धमालच केली होती. त्यानंतर शोला और शबनमनं तिच्या विजयात आणखी भर घातली. दिव्या आणि गोविंदा जोडी झाली होती. तर शाहरुख खान ऋषी कपूरबरोबरच दिवानानं तर तीनं सर्व अभिनेत्रींना मागं टाकलं. शाहरुख खान बरोबरच्या या चित्रपटानं तिला यश तर दिलच पण त्यावेळी ती सर्वात मोठी स्टारही झाली होती. दिवानानंतर दिव्याचं मानधन २५ लाखांवर गेलं होतं असं सांगितलं जातं. म्हणजे त्यावेळी टॉपवर असलेल्या श्रीदेवी, माधुरी यांच्यापेक्षा जास्त मानधन ती घेऊ लागली. त्यातच दिवानाची गाणी आणि चित्रपटानं सगळ्यांच्या ह्रदयाचा गेमच केला होता. कॉलेजमधली तरुणाई तर “ऐसी दिवानगी देखी नही कही..” या शाहरुख आणि दिव्याच्या गाण्यावर फिदा झाली होती..शाहरुख आणि दिव्या हीच चर्चा त्यावेळी होत होती. दिवाना रिलीज झाला ते वर्ष होतं १९९२ त्यावर्षी सगळीकडं दिव्याचा बोलबाला होता..दिव्यानं हिंदीत जवळपास १३-१४ चित्रपट केले. त्यातले काही सुपर डुपर हिट झाले तर काही जेमतेम चालले..पण तीनं त्यावेळच्या सर्व प्रस्थापित अभिनेत्रांनी धक्का दिला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर दिव्यानं तेलुगु चित्रपटातून आपलं करिअर सुरु केलं होतं. तेलुगुतले प्रसिद्ध निर्माता डी रामानायडू यांनी मुलगा व्यंकटेश याच्याबरोबरच्या “बोब्बीली राजा ” या चित्रपटातून हिरोईन म्हणून दिव्याला पुढं आणलं. दिव्याचा अभिनेत्री म्हणून पहिलाच सिनेमा हिट झाला आणि बघता बघता तिनं तेलुगु चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केलं. त्यावेळी तेलुगुतली यशस्वी अभिनेत्री विजयाशांती हिच्या नंबर एकच्या स्थानाला तिनं आव्हान दिलं होतं. त्यानंतर तिचा प्रवास हिंदीत झाला.. पण बोब्बीला राजा च्या अगोदर दिव्यालाही मोठ्या दिव्यातून जावं लागलंय. तिचा चित्रपटसृष्टीतला प्रवेशच खूप त्रासदायक झालाय. वयाच्या अवघ्या १४ वर्षी तीला चित्रपटासाठी विचारण्यात येत होतं. त्यावेळची सुपरस्टार श्रीदेवी हिच्या चेह-याशी थोडीफार मिळती जुळती असल्यामुळे तिला मागणी होत होती. नंदू तोराणीनं तिला गुनाहों का देवता साठी विचारलं होतं. त्यानंतर गोविंदाचा भाऊ किर्तीकुमार यानं दिव्याला घेऊन राधा का संगम करण्याचं ठरवलं…पण काही दिवसाच्या शुटींगनंतर दिव्याला तो सिनेमा सोडावा लागला. त्यानंतर सुभाष घई यांनी दिव्याला सौदागरमध्ये अमिर खानबरोबर घेतलं होते. पण तिथंही माशी शिंकली आणि सुरवातीचं काही शुट झाल्यानंतर दिव्याला काढून टाकण्यात आलं. त्यानंतर तिला शेखर कपूर, शबनम कपूर, यांनीही विचारणा केली होती..पण तिचा कोणताच चित्रपट सुरु होत नव्हता. मुंबईत आपली डाळ शिजत नाही असं समजल्यानंतर तीनं हैदराबाद गाठलं. तोपर्यंत तिला शाळा अर्धवटच सोडावी लागली होती. त्यामुळे पुन्हा शाळेत जाणं शक्य नव्हतं. त्याचवेळी तिला डी. रामानायडूंचा बोब्बीली राजा मिळाला आणि तिचं नशिब बदललं. बोब्बीली राजा नंतर तिला विश्वात्मा मिळाला आणि त्यानंतर दिव्या भारती हिंदीत पुन्हा झोकात आणि धडाकेबाज यश मिळवत आली.. साजीद नाडीयादवालाशी तीनं लग्न केलं होतं. पण त्यातही काही वाद होते असं म्हणतात. त्यावेळच्या लाखो ह्रदयाची धडकन होती दिव्या भारती. अभिनेत्री म्हणून हिट ठरलेली दिव्या तिचा जिवनाचा प्रवास सुरु करण्याअगोदरच सर्वांना सोडून गेली. दिव्या भारती यांचे ५ एप्रिल १९९३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दिव्या भारतीची गाणी
कोकणचा इतिहास अभ्यासताना अभ्यासकर्त्याला दापोली तालुकातल्या एका व्यक्तीची दखल घेणे अत्यंत अनिवार्य आहे, ती व्यक्ती म्हणजे कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक, अचूक टायमिंग साधणाऱ्या सहजस्फूर्त नर्मविनोदी शैलीतील लेखन करणारे ‘श्री.अनंत धोंडू शिरगावकर’ म्हणजेच ‘अण्णा शिरगावकर.’ अण्णा शिरगावकर म्हणजे कोकणचा चालताबोलता ज्ञानकोश आहेत.
अनेक अंध व्यक्तींचे जीवन प्रकाशमय करणारे डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा होणारा दृष्टिदान दिवस आज साजरा होत आहे. डोळ्यात दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधारातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तींना नेत्रदानाच्या माध्यमातून हे जग सुंदर आहे़ याची प्रचिती देण्याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. शासकीय सेवेत नेत्रचिकित्सक म्हणून अहोरात्र झटणाऱ्या डॉ. रामचंद्र यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर आहे.
कर्तृत्व आणि परिश्रम या गुणांच्या बळावर सामान्यातील सामान्य माणूस देखील यशस्वी होऊ शकतो हे आर. आर. पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
बुजुर्ग रंगकर्मी पं. सत्यदेव दुबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुठल्याही पुरस्कारासाठी किंवा मानसन्मानासाठी त्यांनी कधीच काही केलेले नाही. नाटक या एकमेव वेडाने झपाटलेले हे झाड मध्य प्रदेशातील बिलासपूरहून मुंबईत प्रथम आले ते चक्क क्रिकेटमध्ये करीअर करण्यासाठी! परंतु हिंदी चित्रपट दिग्दर्शक विजय आनंद यांनी त्यांना मुंबईतल्या नाटय़सृष्टीशी परिचय करून दिला आणि दुबे क्रिकेट सोडून रंगभूमीकडे वळले.
इब्राहिम अल्काझी या नाटय़क्षेत्रातील भीष्माचार्याकडे त्यांनी नाटकाचे पहिले धडे गिरविले. त्यांच्या ‘थिएटर युनिट’ या संस्थेत साहाय्यक म्हणून दुबेंनी शागिर्दी पत्करली आणि पुढे अल्काझी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये गेल्यावर त्यांच्या थिएटर युनिटची सूत्रे दुबेंच्या हाती आली. विजया मेहता आणि दुबे हे दोघेही अल्काझींचे शिष्योत्तम असले आणि दोघांनीही प्रायोगिक-समांतर रंगभूमी हीच आपली कर्मभूमी मानली होती तरी त्यांच्या दिशा मात्र वेगवेगळ्या राहिल्या. पाच दशकांत दुबेंनी आपली समांतर रंगभूमीशी असलेली नाळ कधीच तोडली नाही. दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’शी (NSD) समांतर असे ‘नॅशनल स्कूल ऑफ दुबे’ (NSD) देशभरात अस्तित्वात आहे. त्यांची शिष्यमंडळी केवळ मराठी, हिंदी आणि इंग्रजी नाटय़सृष्टीतच नाहीत, तर बॉलिवूडमध्येही आहेत. तरूण रंगकर्मीचा घोळका त्यांच्याभोवती कायम असतो. दुबे हिंदीभाषिक असले तरी त्यांनी अनेक मराठी नाटके दिग्दर्शित केली आहेत. कणकवली नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करावी, असा आग्रह संमेलनाच्या संयोजकांनी धरला होता. परंतु नाटय़ परिषदेच्या त्यावेळच्या धुरिणांनी कोत्या वृत्तीचे दर्शन घडवत हा आग्रह अव्हेरला होता. दुबेंचे मराठी रंगभूमीवरील मौलिक योगदान त्यांना ज्ञात नव्हते, ही वस्तुस्थिती होती. विजय तेंडुलकर, गो. पु. देशपांडे, महेश एलकुंचवार, श्याम मनोहर, चं. प्र. देशपांडे, चेतन दातार आदींची मराठी नाटके त्यांनी केली. कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारीत ‘आयुष्यात पहिल्यांदाच’ हा आगळा रंगाविष्कारही त्यांनी सादर केला. ‘आधेअधुरे’, ‘अबे बेवकूफ’, ‘संभोग से समाधी तक’, ‘अंधायुग’, ‘एज्युकेटिंग रिटा’, ‘हयवदन’, ‘डॉन जॉन इन हेल’ अशी अनेक नाटके त्यांनी केली. नाटककाराच्या संहितेवर दिग्दर्शकीय कुऱ्हाड चालवून तिचे आपल्या पद्धतीने अर्थनिर्णयन करण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यामुळे अनेक लेखक त्यांच्यावर नाराज झाले. पण त्यांनी लेखकांच्या नाराजीची कधीच पर्वा केली नाही. दुबे हे भणंग, कलंदर, अवलिया रंगकर्मी आहेत. त्यांच्या व्यवहाराची काळजी नेहमी त्यांच्या शिष्य व हितचिंतकांनीच वाहिली. त्यांच्या कार्यशाळांतून अनेक लेखक घडले. सत्यदेव दुबे हे मूळचे रा. स्व. संघाचे. पण ही विचारधारा त्यांनी कलेच्या क्षेत्रात आणली नाही. गो. पु. देशपांडेंसारख्या डाव्या नाटककाराची नाटकेही त्यांनी तितक्याच आत्मीयतेने सादर केली. हिंदुत्वाचा पुरस्कार ते त्यांच्या वक्तव्यांतून करीत असले तरी त्यात कडवेपणा आढळत नाही. हिंदुत्ववादी भाजपच्या कथनी व करणीत अंतर दिसल्यावर त्यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवायलाही त्यांनी कमी केले नाही. त्यांनी काही नाटकेही लिहिली. त्यातून त्यांचे आयुष्य तुकडय़ा-तुकडय़ांत समजून घेण्यास मदत होते. त्यांच्या मतांवर नेहमीच जोरदार चर्चा, वादविवाद होत असतात. ‘थिएटर मर रहा है’ असे म्हणणारे दुबे दुसरीकडे सातत्याने नाटके करतच असतात. कारण ते त्याशिवाय जगूच शकणार नाहीत.
मराठी रंगभूमीवरील व चित्रपटातील एक प्रसिध्द गायक-नट म्हणून गोविंद पंत यांची ख्याती होती. आपल्या आयुष्यातील बहुतांश कार्यकाळ पंत यांनी मराठी रंगभूमीचं संवर्धन करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. “मृच्छकटिक”, “संगीत सौभद्र”, “लग्नाची बेडी” ही नाटके रंगभूमीवर आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
चित्रपट निर्माते व दिग्दर्शक व्ही.शांताराम यांच्या “अमरभूपाळी” या चित्रपटात होनाजी बाळाची भूमिका गोविंद पंतांनी साकारली होती. तसंच लता मंगेशकर यांच्याबरोबर “घनः श्याम सुंदरा” या गाण्यावर आपल्या पहाडी स्वरांचे साज चढवून ही भूपाळी अविस्मरणीय केली. भावमधुर आवाज, तल्लीनता, हे त्यांच्या गायनातील उल्लेखनीय गुण होते.
Copyright © 2025 | Marathisrushti