(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कूचिपूडि, भरतनाट्यम् नर्तकी मल्लिका साराभाई

    मल्लिका साराभाई या नर्तकी मृणालिनी साराभाई व वैज्ञानिक विक्रम साराभाई यांची कन्या. समांतर सिनेमा पासून आपल्या करीयरची त्यांनी सुरवात केली. त्यांचा जन्म ९ मे १९५४ रोजी झाला.

    मल्लिका साराभाई यांनी पीटर ब्रुक यांचे नाटक महाभारत मध्ये द्रोपदी ची भूमिका केली होती. याच नाटकावर नंतर चित्रपट बनवला गेला होता. मल्लिका साराभाई यांनी भारतात व परदेशात अनेक कार्यक्रमात भाग घेतला आहे. मल्लिका साराभाई यांनी हर्ष मन्दर यांच्या पुस्तकावर आधारित अनसुनी या नाटकाची पटकथा लिहिली आहे. मल्लिका साराभाई या दर्पणा अकादमी ऑफ आर्टस् (अहमदाबाद) च्या निदेशक आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह

    व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, विरोधामुळे सदर विषय बराच वादग्रस्त ठरला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने काही फेरबदलांसह मंडल आयोग संमत केल्यामुळे व्ही. पी. सिंह यांची लोकप्रियता वाढली.

  • बॉलिवूड अभिनेता अभिजित चव्हाण

    अभिजीत चव्हाण यांनी रंपाट,गोजिरी,सायकल आणि बऱ्याच मराठी सिनेमात लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. अगली, रॉकी हँडसम आदी हिंदी सिनेमात सुद्धा त्यांनी उत्तम काम केले आहे. तसेच पु.ल. देशपांडे ह्यांच्यावर आलेल्या “भाई” ह्या बायोपिक मध्ये आचार्य अत्रे ह्यांची भूमिका अभिजीत सरांनी केली आहे.

  • नाट्यअभिनेते डॉ. केशवचंद्र मोरेश्वर ऊर्फ दाजी भाटवडेकर

    दाजी भाटवडेकर मूळचे मुंबईचे. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १९२१ रोजी झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात दाजींचे आजोबा मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर होते. त्याकाळी त्यांना मुंबईचे महापौरपदही मिळाले होते. त्यांचे घराणे संपन्नत असले तरी घरांत धार्मिक आणि संस्कृती जपणारे वातावरण होते.दर एकादशीला घरात कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम होत असे. दर पंधरवड्याला होणार्या असल्या कार्यक्रमातील नाट्याचा आणि कथानकांचा दाजींच्या मनावर खोल परिणाम झाला. ते कीर्तनकार बुबांच्या आवाजाची आणि बोलण्याच्या ढंगाची हुबेहूब नक्कल करीत असत. भरदार आवाजाची देणगी मिळालेल्या दाजींनी संगीत नाटकांत भूमिका करायला सुरुवात केली.

    दाजींच्या दुर्दैवाने पुढे मराठी संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. संभाषणात नाटकी अभिनिवेशाने बोलण्याच्या जागी वास्तव शैलीने बोलायची पद्धत पडू लागली. मग दाजींनी आपला मोहरा संगीत रंगभूमीकडे वळवला. दाजी स्वतः उच्चशिक्षित आणि संस्कृत नाटकांचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना संस्कृत रंगभूमीची चळवळ सुरू करायला फारशी अडचण पडली नाही.. मुंबईच्या ब्राह्मण सभेत त्यांनी १९५० ते १९८० या काळात दर वर्षाला एक नवे संस्कृत नाटक रंगभूमीवर आणले. कालिदास महोत्सवाच्या काळात दाजींनी ’अभिज्ञान शाकुंतल’ या संस्कृत नाटकाचा प्रयोग भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अन्य सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत सादर करून वाहवा मिळवली. संस्कृत नाटकांनाही पुढे प्रेक्षक मिळेनासे झाले. मात्र, ही नाटके सादर करताना काय काय अनुभव आणि अडचणी आल्या यावर दाजींनी लिहिलेला प्रबंध मुंबई विद्यापीठाने स्वीकारून त्यांनी डॉक्टरेट दिली.

    दाजींच्या संस्कृत रंगभूमीवरील योगदानाबद्दल भारतरत्न महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे यांनी त्यांच्या एका ग्रंथातील परिशिष्टात खास उल्लेख केला आहे. मराठी रंगभूमीबरोबरच इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी रंगभूमीवरही त्यांनी काम केले. दाजी भाटवडेकर यांचे २६ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    दाजी भाटवडेकर यांचा अभिनय असलेली नाटके आणि त्यातील त्यांची भूमिका
    एकच प्याला (सुधाकर), कृष्ण द्वीप (हिंदी), दुर्गा (जिवाजीराव), मानापमान (लक्ष्मीधर, विलासधर), मृच्छकटिक (शकार), बॉर्न येस्टरडे (इंग्रजी, दिग्दर्शक - हर्बर्ट मार्शल), भाऊबंदकी (तुळोजी, राघोबा, सखाराम बापू), भावबंधन (घनश्याम, धनेश्वर, मोरू), म्युनिसिपालिटी (पांडोबा), लग्नाची बेडी ( कांचन, गोकर्ण, तिमिर), शारदा ( कांचनशेट, भद्रेश्वर), संशयकल्लोळ (फाल्गुनराव, वैशाखशेठ), सौभद्र (बलराम)
    स्वयंवर (रुक्मी).

  • चंडिकादास अमृतराव देशमुख

    क्रांतिसिंह नाना पाटील हे मराठी सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी समाजास आत्मनिर्भर बनविण्यासाठी अथक प्रयत्न केले. भारतीय शासनाने त्यांना त्यांच्या कार्यासाठी पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

  • गीतकार पी. एल. संतोषी

    पी.एल. संतोषी फक्त गीतकार नव्हते तर ते दिग्दर्शकही होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. उत्कृष्ट लेखकही होते. म्युझिकल कॉमेडी हा प्रकार त्यांनी लोकप्रिय केला केला. तसेच 'अनोखे बोल' हा गीतप्रकार 'टिका लई कली दई' (चित्रपट - शिनशिनाके बुबला बु) यासारख्या गाण्यातून रूढ केला. 'कोई किसीका दिवाना ना बने' (सरगम), 'महफिल में जल उठी शमा' (निराला), 'तुम क्या जानो तुम्हारी याद में' (शिनशिनाके बुबला बु) यांसारखी तरल भावकाव्यं त्यांच्या लेखणीतून झरली होती.

    पी.एल.संतोषी हे एक अफलातून व्यक्तिमत्त्व होते. ते उत्तम गीतकार होते. मग ते पटकथाकार बनले. मग दिग्दर्शक. यानंतर त्यांना चित्रपट निर्माता होण्याची दुर्बुद्धी झाली आणि त्यापायी ते कफल्लक बनले. या माणसाने दोन्ही हातांनी पैसा कमावला व दहा हातांनी तो उधळला. नटीच्या प्रेमात पडले व तिच्यावर सारी संपत्ती ओवाळून टाकली. जवळ मोटारीन्चा ताफा असलेला माणूस बसच्या रांगेत उभा राहिलेला जगाने पाहिला. हिंदी सिनेमाचे जग कसे मोहमयी असते याचे जबरदस्त उदाहरण म्हणजे संतोषी यांचे आयुष्य.

    संतोषी यांनी १९५२ मध्ये 'शिनशिनाकी बबला बु' या नावाचा चित्रपट निर्माण केला. त्याचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते व गीतकार तेच होते. संगीतकार होते त्यांचे खास मित्र-सी. रामचंद्र. हा चित्रपट म्हणजे त्यांच्या काव्यप्रतिभेचा एक उत्तम नमुना होता. या सिनेमात एकीकडे त्यांनी 'अरे बाबा, ये हसी बाबा, ये खुशी बाबा, खा बाबा, पी बाबा, ' अशी निरर्थक गाणी लिहिली आणि दुसरीकडे मनाची व्याकुळता अतिशय आर्तपणे व्यक्त करणारे उत्कट गीतही लिहिली.

    रेहाना नावाची नटी, संगीतकार, सी.रामचंद्र आणि पी. एल. संतोषी या त्रिकुटाने चित्रपटसृष्टीत एकेकाळी धमाल उडवून दिली होती. 'शहनाई', 'खिडकी', सरगम' हे या त्रिकुटाचे चित्रपट हाऊसफुल्लचा ठरले होते. पी. एल. संतोषीच्या 'हम पंछी एक डालके' या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले होते. पी.एल.संतोषींबरोबर सी. रामचंद्र यांचे टयुनिंग बराच काळ जमले होते. अनेक वेळा त्यांच्या संगीतातील बरीच गाणी पी.एल.संतोषी आणि राजेंद्र कृष्ण या दोनच गीतकारापैकी एकाची तरी आढळतात.

    पी.एल.संतोषी यांचे निधन ७ सप्टेंबर १९७८ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. श्री.पद्माकर पाठक

  • गीता दत्त

    गीता दत्त (पूर्वाश्रमीची गीता घोष रॉय चौधरी) यांचा जन्म बंगालमधील जमीनदार घराण्यात झाला. गीता दत्त यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९३० रोजी झाला. १९४६ साली ललिता पवार यांचे पती हनुमानप्रसाद यांनी प्रथम गीता दत्त यांना गाण्यासाठी पहिला ब्रेक दिला. गीता दत्त यांनी १९४६ मध्ये भक्त प्रल्हाद या चित्रपटातील गीतापासून आपल्या पार्श्वगायनाच्या कारकीर्दीचा प्रारंभ केला. १९४६ ते १९६६ या २० वर्षाच्या काळात गीता दत्त यांनी अनेक प्रकारची, वेगवेगळय़ा ढंगाची, मूडची आणि बाजाची गाणी गायिली. त्यांच्या आवाजात मादकता होती, पण संयत अन् जीवघेणी.

    ‘बाबूजी धीरे चलना’सारख्या गाण्यांनी तर काळजाचा ठोका चुकावा, पण तोच मादक, मदिर आवाज ‘मै तो प्रेम दिवानी’, ‘मेरा दर्द न जाने कौन’ किंवा ‘घुंघट के पट खोल तोहे पिया मिलेंगे’ अशा भजनांमध्ये तितकाच लीन-तल्लीन होताना दिसतो. गीता दत्त यांनी पुरुष गायकांसोबतही तितक्याच आत्मविश्वासाने गाणी गायिली. ‘खयालो में किस के इस तरह आया नहीं करते’ हे ‘बावरे नैन’मधलं गीत मुकेशबरोबर गाताना त्याच्या दमदार आवाजाला ताकदीने साथ दिली. तशीच ‘न ये चाँद होगा ना तारे रहेंगे’ गाताना हेमंतकुमारच्या भारदस्त आवाजापुढे ती दबली किंवा कोमजली नाही. ‘हम आप की आँखो को इस दिल में बसा ले तो’ या महंमद रफीबरोबरच्या गाण्याला खेळकर साथ देणारी गीता दत्त असते. गीता दत्त यांनी मराठी गाणीसुद्धा गायिली आहेत, ‘मुक्या मनाचे बोल सजना, बोल झाले फोल’ किंवा ‘जा सांग लक्ष्मणा सांग रामराजाला, म्हणावे न्या तुझा सीतेला’ ही मराठी गाणी गाणारी गीता दत्तच होत्या यावर विश्वास बसत नाही.

    गीता दत्त यांनी संगीतविश्वात आपल्या सुरांनी चौफेर सैर केली. गाण्याच्या आशयाला आपल्या वैविध्यपूर्ण सुरावटींनी न्याय दिला. आपल्या विशिष्ट आवाजाची छाप संगीतक्षेत्रात उमटवली होती. असं असूनही तिच्या वाटय़ाला फार प्रसिद्धी आली नाही. दिग्दर्शक गुरू दत्त यांच्याशी त्यांनी विवाह केला. गुरुदत्त नावाच्या शोकांतिकेचा गीतादत्त ही एक हिस्सा होती. ‘जिन्हे नाझ है हिंदपर वो कहाँ है’ असं म्हणणारा गुरुदत्त, स्त्रीजीवनाचं वास्तव आपल्या कॅमे-याच्या तीक्ष्ण डोळ्यांतून टिपणारा गुरुदत्त गीताला स्वत:च्या चित्रपटांखेरीज इतरत्र गाऊ देत नव्हता, हे वास्तव नाकारता येत नाही. संगीतक्षेत्रात आणि व्यक्तिगत आयुष्यातही गीतादत्तच्या वाटय़ाला उपेक्षाच आली. ज्या मधूर-मदिर आवाजावर लुब्ध होऊन गुरुदत्तने गीता दत्तशी प्रेमविवाह केला होता, त्याच गीताला गुरुदत्तने वहिदा आयुष्यात आल्यानंतर दुरावलं होतं. गीता दत्त यांचे २० जुलै १९७२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    https://www.youtube.com/watch?v=KsMrpO0YuxY

  • बापूजी आत्माराम मोकाशी

    पेणच्या मांगरुळ गावच्या इनामदारांपैकी एक. सन १९०८ साळी श्री.धारकर यांच्या बंगल्यावरील हत्यारे चोरुन नेण्याचा आरोप त्यांचे बंधू दामोदर आत्माराम मोकाशी व प्रभू समाजांतील इतर तरुणांवर आला होता.

  • घुंगरु, अभिनय, कॅमेरा- कल्पिता राणे-सावंत

    सशक्त अभिनेत्री, अभ्यासू भरतनाटय़म नृत्यांगना ते व्हिएतनाम येथे पार पडलेल्या ‘मिसेस इंडिया वर्ल्डवाईड 2017’ या सौंदर्यवतींच्या स्पर्धेमध्ये टॉप 50मध्ये बाजी मारणारी प्रतिभावान स्पर्धक तर याच स्पर्धेमध्ये ‘मिसेस टॅलेंटेड’ हा बहुमान पटकावणारी सन्मानमूर्ती म्हणजे कल्पिता राणे-सावंत. अभिनय, नृत्य आणि मॉडेलिंग अशा तिहेरी कलांवर अधिराज्य गाजवणारी हुशार कलावती म्हणून कल्पिताची ओळख जगाला आहे. मध्यमवर्गीय घरात जन्मलेली आणि घरी कोणतीही कलेची पार्श्वभूमी नसताना, या क्षेत्रात कोणताही गॉडफादर नसताना कल्पिताने मिळवलेलं हे यश नेहमीच कौतुकास पात्र ठरलं आहे. मात्र तिचा हा प्रवास तितकाच खडतर आणि धैर्याचा होता, हे तिच्याशी बोलताना नेहमीच जाणवतं.

    कल्पिता एक उत्तम नृत्यांगना आणि कलासक्त अभिनेत्री तर आहेच, शिवाय ती बोलक्या चेहऱयाची मॉडेलदेखील आहे, हेच हेरून तिचे ‘फोटोंच्या गोष्टी’ या सदरासाठी फोटोशूट करायचं असं मी ठरवलं. सुरुवातीला भरतनाटय़म नृत्यप्रकारात आपला वेगळा ठसा उमटविलेल्या या नृत्यांगनेचा तिच्या नृत्यमुद्रा टिपण्याबाबत तिच्याशी मी बोललो. त्यानुसार तिचं कॉस्च्युम, मेकअप, हेअर हे करण्यात आलं. विजू माने प्रॉडक्शनच्या ‘स्टुडिओ 108’मध्ये तिचं हे फोटोशूट आयोजित करण्यात आलं होतं. भरतनाटय़म हा नृत्यप्रकार आणि म्हणूनच त्यातील भाव, मुद्रा, नृत्य करतानाची ऊर्जा हे सारं काही लाइव्ह शोच्या वेळी नीट टिपता येईल हे माहीत असूनही हे फोटोशूट करण्याचं मी ठरवलं. त्याचं कारण म्हणजे अनेकदा लाइव्ह शोमध्ये छायाचित्रकाराला हवी ती लायटिंग करता येतंच असं नाही. शिवाय यावेळी कलाकार त्याच्या कलेत गुंतलेला असल्याने त्याच्या मुद्रा या कॅमेऱयाच्या अँगलमध्ये नीट बंदिस्त करता येतात असं नाही. शिवाय कलाकाराच्या चेहऱयावर आलेला घाम, थकवा यामुळे ते फोटो फ्रेश वाटतातच असं नाही. या लाइव्ह शोच्या वेळी टिपता येतात ते कॅण्डीड फोटोज. मात्र मला ठरवलेले, पोज केलेले फोटो टिपायचे होते.

    सुरुवातीला फ्लॅट लायटिंग (मॉडेलच्या उजव्या आणि डाव्या बाजूला समान तीव्रतेचा प्रकाश टाकून केलं जाणारं छायाचित्रण) करून काही फोटो मी टिपले. यानंतर कल्पिताच्या विविध भावमुद्रा त्याच कल्पकतेने टिपण्यासाठी मी ड्रमॅटिक लायटिंग केली. ही लायटिंग करत असताना कधी प्रकाशाचा एक स्रोत तर कधी प्रकाशाचे दोन स्रोत वापरून तिच्या विविध नृत्यछटा, भावमुद्रा मी कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो. कल्पिताची प्रचंड ऊर्जा, तिचा भरतनाटय़मचा अभ्यास आणि याच्या जोडीला तिच्यात लपलेली सशक्त अभिनेत्री आणि मॉडेल या साऱयाचा उपयोग मला फोटोशूटसाठी झाला. साधारणपणे दोन अडीच तास हे शूट चाललं.

    कल्पिताने गेली अनेक वर्षे नृत्यक्षेत्रात आपला वेगळा दबदबा निर्माण केला आहे. अभिनय आणि मॉडेलिंग या क्षेत्रातही तिचं नाव अदबीने घेतलं जातं. इयत्ता तिसरीत असताना कल्पिताला अभिनयाची गोडी लागली. पृथ्वी थिएटरमधून अभिनयाचे प्राथमिक धडे तिने गिरवले. इथे तिची ओळख प्रेमा साखरदांडे यांच्याशी झाली आणि त्यांनी तिला सुलभाताई देशपांडे यांच्या ‘आविष्कार’ चंद्रशाळेत जाण्यासाठी सांगितलं. याच चंद्रशाळेत कल्पितावर अभिनयाचे संस्कार झाले. पुढे या संस्थेतर्फे ‘दुर्गा झाली गौरी’ या नृत्यनाटिकेतून काम करण्याची संधी तिला मिळाली. पुढे तिची निवड ‘झाशीच्या राणी’ या मालिकेसाठी करण्यात आली. या मालिकेत तिने झाशीच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. तर यानंतर ‘हुंकार’, ‘मांगल्याचे लेणे’, ‘शंभूराजे’, ‘हे माझे नव्हे’ अशा अनेक व्यावसायिक नाटकांत आपल्या अभिनयाने रसिक मन जिंकलं.

    भारतीय विद्या भवनमधील गुरू विद्या राव यांच्याकडे भरतनाटय़मच कल्पिताने प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. तर सीसीआरटी स्कॉलरशिप मिळाल्याने पुढे गुरू तेजस्विनी लेले आणि गुरू दीपक मुझुमदार यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवण्याची संधी तिला मिळाली. भरतनाटय़म विशारद आणि दहावीची परीक्षा असं दोन्ही एकाच वेळी उत्तीर्ण होत पुढे नालंदा डान्स रिसोर्स सेंटर तिने नृत्याचं पुढील शिक्षण घेतलं. तर सध्या ती डॉ. अलका लाजमी यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवत आहे. आपल्याकडे असलेल्या नृत्य अभ्यासाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने कल्पिताने कल्पांगण सांस्कृतिक केंद्राची स्थापना 2001 साली केली आणि यंदा ही संस्था 18व्या वर्षात पदार्पण करत आहे हे विशेष. या संस्थेत आजवर 700 विद्यार्थ्यांनी विविध कलांचे धडे घेतले असून सध्या 90 विद्यार्थी इथे शिकत आहेत.

    अभिनय आणि नृत्य या दोहोंची सांगड घालत असतानाच कल्पिताला मॉडेलिंग क्षेत्रानं खुणावलं. मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या कल्पिताच्या घरी अभिनय, नृत्य आणि मॉडेलिंग यापैकी कसलीच पार्श्वभूमी नाही. एकत्रित कुटुंब पद्धतीचं तिचं माहेर. वडील एका कंपनीत नोकरीत रुजू तर आई गृहिणी. तिच्या लहानपणी अभिनय आणि नृत्य याला घरातून विरोध झालाही, परंतु कल्पिताच्या जिद्दीपुढे तो फार टिकला नाही. तर लग्नानंतर मॉडेलिंग क्षेत्रात उतरण्यास उलट तिच्या नवऱयाने प्रोत्साहन दिल्याचे ती सांगते. ‘मिसेस इंडिया वर्ल्डवाईड 2017’ या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत सहभागी झालेली कल्पिता 600 स्पर्धकांतून सर्वोत्कृष्ट 150 तर शेवटी टॉप 50च्या यादीत झळकली. व्हिएतनामला पार पडलेल्या विश्वविजेती या स्पर्धेसाठी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱया कल्पिताला यावेळी ‘मिसेस टॅलेंटेड’ हा किताब देऊन गौरवण्यात आले. घरच्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच हे यश मिळवता आल्याचं ती सांगते. अभिनय, नृत्य आणि मॉडेलिंग या तिघांवर एकत्रित स्वार होणाऱया कल्पिताने आपला आदर्श नव्या पिढीसमोर घालून दिला आहे.

    धनेश पाटील
    dhanauimages@gmail.com

  • अभिनेता शंतनू मोघे

    अभिनेता शंतनू मोघे यांचा जन्म २८ जुलैला झाला.

    तरुण आणि दमदार कलाकारांच्या यादीत अभिनेता शंतनू मोघे यांचं नाव आग्रहाने घेता येईल.

    शंतनू मोघे हे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे चिरंजीव होत. शंतनु महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईतून पुण्यात आले. त्यांनी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला होता. सिंहगड कॉलेजमध्ये शिकत असताना तिथल्या कला गृप मध्ये सामील झाले. मग पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक, कॉलेज फेस्टिवल आदी मध्ये सहभागी झाले. अभिनयाची आवड लहानपणापासून होती. श्रीकांत मोघे हे मोठे अभिनेते म्हणून घराघरांत पोहोचलेलं एक व्यक्तिमत्व होते कायम त्यांना काम करताना बघत मोठे झाले. तर काका सुधीर मोघे हे मनामनांत पोहोचलेले मोठे कवी. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मुंबईत आले. पण काही दिवस चांगलं काम काही मिळत नव्हतं. नंतर मग दोन वर्ष नोकरी करत ऑडिशन देत गेले. मग हळूहळू चांगल्या संधी मिळू लागल्या आणि ह्या क्षेत्रात पूर्ण वेळ काम सुरू केले. या सुखांनो या ही त्यांची पहिली व्यावसायिक सीरियल होती. पुढे शंतनू यांनी अनेक मराठी नाटकात आणि चित्रपटात अभिनय केले आहेत.

    ‘स्वराज्यरक्षक संभाजी’या मालिकेत त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका खूपच गाजली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेनंतर अभिनेता शंतनू मोघे प्रेक्षकांना पुन्हा एकदा चरित्र भूमिका साकारताना दिसले होते. विप्र एंटरटेनमेंट आणि दिशादिपा फिल्म्स निर्मित 'श्री राम समर्थ' सिनेमात शंतनू मोघे यांनी समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेत दिसले. आता शंतनू मोघे पुन्हा एकदा मालिकाविश्वात दिसत आहेत. स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत अविनाश देशमुख म्हणून त्यांचा प्रवेश झाला आहे.

    शंतनू यांना चरीत्रपटापेक्षा वेब सिरीजमध्ये काम करण्यास आवडते. शंतनु यांनी 'झी ५' वरील 'पॉयझन' या वेब सिरीजमध्ये काम केले आहे. शंतनू मोघे आणि प्रिया मराठे मराठीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. २०१२ मध्ये शंतनू मोघे यांनी अभिनेत्री प्रिया मराठे सोबत लग्न केले आहे.दोघेही मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असून आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. प्रियाने नाटक, मालिक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांद्वारे प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकून घेत तिने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. प्रियाने सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत सावित्रीबाई देशमुख उर्फ रायबागण ही ऐतिहासिक भूमिका साकारली होती.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.