जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
हिंदी चित्रपट संगीतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रभावी वापर करणाऱ्या संगीतकार नौशाद, यांनी लहान वयात वाद्याचे दुकानात नोकरी करताना वादनात हुकमत मिळवली तेव्हा दुकानाच्या मालकांनी - गुरबत अलींनी तिथली एक उत्तम हार्मोनियम त्या मुलाला भेट दिली. हाच मुलगा पुढे ‘संगीतकार नौशाद अली’ म्हणून नावारूपाला आला!
त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवर सहज दृष्टिक्षेप टाकला तर दिसून येईल की, त्यांचे जवळपास प्रत्येक गाणे कोणत्या ना कोणत्या रागावर आधारित आहे. उदाहरणादाखल आपण ‘बैजू बावरा’मधली गाणी बघू. ‘मोहे भूल गये सावरिया..’ या गीतातील आर्त भाव आणि विरहवेदना व्यक्त करण्यासाठी त्यांनी राग भैरव वापरला. तर ‘तू गंगा की मौज मैं..’ला त्यांनी राग भैरवीची डूब दिली. ‘ओ दुनिया के रखवाले..’साठी त्यांनी भारदस्त अशा राग दरबारी कानडाचा वापर केला, तर ‘मन तडपत हरी दर्शन को आज..’मधली व्याकुळता व्यक्त करण्यासाठी राग मालकंसचे सूर वापरले. ‘दूर कोई गाये..’ हे लोकगीताचा बाज असलेले गीत त्यांनी राग देसमध्ये बांधले. ‘आज गावत मन मेरो झूम के..’ या तानसेन आणि बैजू यांच्या जुगलबंदीसाठी, देसी या गोड रागाचा वापर त्यांनी केला. ‘घनन घनन घन..’साठी राग मेघ, तर ‘बचपन की मुहब्बत को..’साठी त्यांनी राग मांड वापरला. ‘झूले में पवन की आयी बहार..’ या युगुलगीतावर त्यांनी राग बसंत पिलू या जोडरागाचा साज चढविला.
‘बैजू बावरा’चं संगीत प्रचंड लोकप्रिय ठरलं. १९५२ मध्ये नुकतीच ‘बिनाका गीतमाला’ सुरू झाली होती. ३ डिसेंबर १९५२ रोजी सादर झालेल्या ‘बिनाका’ कार्यक्रमात पहिलं वाजलेलं गीत होतं- ‘बैजू बावरा’मधील ‘तू गंगा की मौज मैं जमुना का धारा..’!
‘बैजू बावरा’नंतर १९६० मध्ये मोठय़ा थाटामाटात प्रदर्शित झालेल्या के. असिफच्या ‘मुघल-ए-आझम’चं संगीतही प्रचंड लोकप्रिय ठरलं. त्यातील ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे..’ या ठुमरीसाठी त्यांनी राग ‘गारा’चा वापर केला. या गाण्याच्या म्युझिक पीसमध्ये केवळ एकच सतार वाजत नाही, तर अनेक सतारी झंकारतात. आणि लताबाईंच्या आवाजाबद्दल काय बोलावं! ‘कंकरिया मोहे मारी गगरिया फोर डाली..’नंतरची छोटीशी तान त्या इतकी सुरेख घेतात, की पुन:पुन्हा ती ऐकत राहावी. ‘ये दिल की लगी कम क्या होगी..’ हे ‘मुघल-ए-आझम’मधील आणखी एक वैशिष्टय़पूर्ण गाणं! जयजयवंती रागातील या गाण्याचा प्रत्येक अंतरा वेगळ्या चालीत आहे. ‘बेकस पे करम कीजिए..’मधली आर्तता त्यांनी राग केदारच्या सुरांतून साकारलीय, तर ‘खुदा मेहेरबाँ हो तुम्हारा..’साठी यमन! नौशादजींनी संगीतबद्ध केलेल्या ‘मधुबन में राधिका नाचे..’ या ‘कोहिनूर’मधील राजदरबारातल्या गीतासाठी त्यांनी राग हमीर या जोशपूर्ण रागाचा वापर केला. ‘दिल दिया दर्द लिया’ या चित्रपटातलं ‘सावन आये या न आये..’ हे युगुलगीत त्यांनी राग वृंदावनी सारंगमध्ये बांधलं, तर ‘कोई सागर दिल को..’ या गाण्यातली उद्विग्नता व्यक्त करण्यासाठी त्यांनी राग कलावतीचा वापर केला. ‘दिल दिया दर्द लिया..’साठी सदाबहार अशा यमनची सुरावट त्यांनी वापरली.
मारवा हा खरं तर हुरहूर लावणाऱ्या कातरवेळेचा राग. पण ‘साज और आवाज’मधील ‘पायलिया बावरी..’ हे सुंदर नृत्यगीत मारव्यामध्ये त्यांनी छान खुलवलंय. याच चित्रपटातलं ‘साज हो तुम आवाज हूँ..’ हे रफीसाहेबांनी गायलेलं आणखी एक सुंदर गीत पियानोच्या सुरात सुरू होतं. त्रितालात बांधलेलं हे गाणं राग पटदीपमध्ये आहे. पण ‘प्रेम तराना रंग पे आया..’ या दुसऱ्या अंतऱ्यात सुरावट बदलते, आणि ती मधुवंती-काफीच्या अंगाने पुढे जात पुन्हा पटदीपमध्ये येते. चित्रपटाचे शीर्षकच ‘साज और आवाज’ असल्याने यातल्या गाण्यांत नौशादसाहेबांनी जवळजवळ सर्व वाद्यांचा बहारदार वापर केलेला आहे. त्यांनी संगीत दिलेल्या ‘रतन’, ‘अंदाज’, ‘दीदार’, ‘उडन खटोला’, ‘गंगा जमुना’, ‘कोहिनूर’, ‘मेरे मेहबूब’, ‘साज और आवाज’, ‘बैजू बावरा’, ‘मदर इंडिया’ आणि ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटांतली सगळीच्या सगळी गाणी हिट् झाली. उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद आमीर खाँ आणि पं. डी. व्ही. पलुस्कर या शास्त्रीय संगीतातल्या दिग्गज गायकांकडून चित्रपटांसाठी गाऊन घेण्याची किमया नौशादजींनी ‘बैजू बावरा’ आणि ‘मुघल-ए-आझम’मध्ये करून दाखविली. नौशादजींनी चित्रपट संगीतकारास प्रतिष्ठा मिळवून दिली. ते उत्कृष्ट पियानिस्ट होते. पाश्चात्य स्वरांचंही त्यांना उत्तम ज्ञान होतं. ते वापरत असलेल्या प्रत्येक वाद्याची त्यांना सखोल माहिती होती. कोणत्या म्युझिक पीससाठी कोणतं वाद्य उचित ठरेल, हे त्यांना अचूक समजे. १९४९ मध्ये पडद्यावर आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटातील नायक दिलीपकुमार ‘तू कहे अगर जीवनभर..’, ‘हम आज कहीं दिल खो बैठे..’, ‘झूम झूम के नाचों आज..’ आणि ‘टूटे ना दिल टूटे ना..’ ही चारही गाणी पियानोवर बसून म्हणतो.
जन्म : २५ डिसेंबर १९१९
मृत्यू : ५ मे २००६
-- अनिल सांबरे
December 25, 2020
"हृदयी वसंत फुलताना' यांसारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी शांताराम नांदगावकर यांची ओळख होती. त्यांचा जन्म १९ आक्टोबर १९३६ रोजी झाला.सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर.
मूळचे कोकणातील नांदगावचे असलेल्या शांताराम नांदगावकर यांचे शालेय शिक्षण दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. 'पाहिले न मी तुला', 'प्रथम तुला वंदितो', 'ही नव्हे चांदणी', 'दाटून कंठ येतो', आदी त्यांची गीते विशेष गाजली. अष्टविनायक,'नवरी मिळे नवर्याला', 'बनवा बनवी', पैजेचा विडा आदी मराठी तसेच हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते. श्रोत्यांच्या ओठावर खेळतील अशा सहजसुंदर काव्यरचना हे त्यांचे वैशिष्ट्य होते. चित्रपटगीतांबरोबरच बालगीते, भावगीते व लोकगीतेही आणि भक्तीगीतेही लिहिली. 'ससा तो ससा' हे बालगीत आजही मुलांना वेड लावते.
शब्दांमधून जग आणि जगाची रीत उभी करण्याची मोठी ताकद त्यांच्यात होती, परंतु दुर्दैवाने त्यांच्या बहराचा काळ हा मराठी चित्रपट गीत-संगीताच्या दृष्टीनं अधोगतीचा होता. त्यामुळे अनेकदा ‘बिनडोक’ सिच्युएशन्ससाठी गाणी लिहिण्याचं ‘व्यावसायिक काम’ त्यांना करावं लागलं; तरीही जेव्हा केव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी गीतकार म्हणून आपल्या क्षमतेचा प्रत्यय आणून दिला. गीतकार म्हणून त्यांचा प्रवास भावगीताच्या प्रांतात सुरू झाला, तेव्हा चित्रपटसृष्टीत ग.दि.मा., सुधीर फडके, राम कदम, जगदीश खेबुडकर ही समीकरणे ऐन भरात होती. त्यानंतरच्या पंधरा वर्षांत सर्व काही बदलले. या दरम्यान नांदगावकर यांनी भावगीतांच्या प्रांतात मुशाफिरी केली. ‘रामप्रहरी राम गाथा’सारखे त्यांचे गाणे पूर्वसूरींशी आणि मराठी भक्तीगीतांच्या सुरेल परंपरेशी नाते सांगणारे होते. याच दशकात सांस्कृतिक अभिरुची सांधा बदलत होती.
अर्थवाही शब्द, भाषेचा डौल, कल्पनांची भरारी हे सर्व एका विशिष्ट वर्गाच्या सांस्कृतिक अभिरुचीसाठी लिहिले जात होते. हा पांढरपेशा मध्यमवर्ग विस्तारला तसा मराठीतील गीत, संगीत, चित्रपट, नाटक या सगळ्यांचाच बाज बदलला. १९८० नंतरचा जवळपास दोन दशके मराठी चित्रपट उथळ पाण्यात गटांगळ्या खात होता. शांताराम नांदगावकर नेमके याच काळात गीतकार म्हणून वावरत होते. १९७९ साली ‘अष्टविनायक’ या चित्रपटात गाणी लिहून नांदगावकर खऱ्या अर्थानं ‘मेन स्ट्रिम’मध्ये आले. परंतु, त्यांनी चित्रपटाबाहेर जशी गाणी लिहिली, उदाहरणार्थ, ‘सजल नयन नितधार बरसती’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात’ तशी त्यांना चित्रपटात लिहिण्याची संधी क्वचितच मिळाली.
एक आठवण नांदगावकरांची.
१९९५-९६ च्या सुमारास ‘तू सुखकर्ता’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीची पत्रकार परिषद होती. चित्रपटाचे गीतकार शांताराम नांदगावकर पार्टीला आपल्या सूनबाईला घेऊन आले होते आणि प्रत्येकाकडे ते तिच्या आवाजाचं कौतुक करत होते. त्या चित्रपटात बहुधा तिने एक गाणे गायले होते. त्यांच्या प्रसन्न मूडमध्येच त्यांना कोणीतरी विचारले, ‘तुमचा चष्मा डोळ्यांवर कधीच नसतो, तो कायम कपाळाच्याही वर डोक्यावर असतो. असं का?’ नांदगावकर मिश्किल हसले आणि म्हणाले, ‘कवी नेहमी डोक्याने जगाकडे पाहतो, त्यामुळे मी केवळ लिहिताना चष्मा डोळ्यांवर सरकवतो. एरवी जगाकडे पाहताना तो डोक्यावर ठेवतो.’ गमती गमतीत ते एक मोठे सत्य सांगून गेले होते.
‘अष्टविनायक’नंतर सचिनच्या बऱ्याच चित्रपटांची गाणी त्यांनी लिहिली आणि संगीतकार अनिल अरुण सोबत त्यांची ‘वेव्हलेंग्ध’ चांगलीच जुळली, परंतु ‘धुमधडाका’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ नंतर सचिन- महेश- अशोक- लक्ष्या यांची लाट आली. त्यात गीत संगीताला फार वाव नव्हता. त्यातल्या त्यात सचिनच्या काही चित्रपटांत त्यांना बरी गाणी देता आली. ‘गंमत जंमत’साठी किशोरकुमार यांना मराठी गाणे द्यायचे ठरले, तेव्हा मराठीतल्या ‘ळ’चा उच्चार करता येत नाही आणि ‘च’चा उच्चार आपण ‘च्य’ असा हिंदी पद्धतीने करतो, असे कारण सांगून ते गाण्यासाठी राजी होईनात. पण ही अडचण आव्हान म्हणून स्वीकारत नांदगावकर यांनी, ‘प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं’ अशी सोपी शब्दरचना केली आणि किशोर कुमार यांनी धमाल उडवून दिली. गाणं अतिशय लोकप्रिय झालं. मात्र बऱ्याचदा ‘दोन रुपये दे मला, खर्चाला पानसुपारीला.’ असे शब्द जोडण्याची व्यावसायिक मजबुरी शांताराम नांदगावकर यांना स्वीकारावी लागली. १९९६ नंतर ते हळूहळू यापासून दूर गेले. अनेकदा प्रथितयश गीतकार बहुजनांच्या गीत- संगीतापासून फटकून राहतात, परंतु मुळातच निर्भय स्वभावाच्या नांदगावकरांनी स्वत:ला कधी अशा चौकटींमध्ये बंदिस्त केले नाही. त्यामुळे एका बाजूला ‘दलितांचा राजा भीमराव माझा.. त्यानं माणसाला माणुसकी दावली’ अशी गाणी लिहिताना दुसरीकडे सुनील गावस्करच्या खासगी अल्बमसाठी शब्द पुरवत तितक्याच उत्साहाने ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला’ असे खेळाचे तत्त्वज्ञान सांगून गेले.
क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटलेले, 'या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला...?' हे गीतही त्यांचेच. मा.शांताराम नांदगावकर १९८५ मध्ये शिवसेनेतर्फे विधान परिषदेवर निवडून गेले होते. शांताराम नांदगावकर यांचे ११ जुलै २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपीडीया
शांताराम नांदगावकर यांची काही गाणी
पहिले ना मी तुला
रजनीगंधा
रुपेळी वाळूत
हरी नाम मुखी रंगते
श्रीरंग सावळा तु
November 1, 2017
अत्यंत तर्कनिष्ठ व वस्तुनिष्ठ विचार मांडणारे नरहर कुरुंदकर हे एक प्रभावी वक्ते सुद्धा होते. त्यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी झाला. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्य होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.
प्रा. नरहर कुरुंदकर यांचे ‘इसापनीती’ हे भाषण आणीबाणीच्या काळात खूप गाजले. मनुस्म्रुतीवरच्या पुस्तकात मा. नरहर कुरुंदकर लिहितात, मध्ययुगीन जगात सर्वच देशात विषमता होती. अमेरिका, युरोप ते अरबस्तानापर्यंतचा इतिहास गुलामिच्या आणी स्त्री छळाच्या काळ्या शाइने लिहिला आहे. पण ह्या गुलामिचे आपल्या धर्माने ज्या प्रमाणात समर्थन केलेले आहे, तेव्हढे जगाच्या पाठीवर कोठेही आढळणार नाही. कर्म करत रहा, फळ अत्ता मागू नकोस, पुढल्या जन्मी तुला ते मिळेलच. त्यानुसार तुझी जात ठरेल अन त्यावरून लायकी; ही धार्मीक शिकवण हिंदूना घातक ठरली. देशाला दुर्बल करणार्या . ह्या धार्मीक व्यव्स्थेचे समर्थक आजाही अस्तित्वात आहेत. ही कुरुंदकरांची खरी खंत होती. मनुस्म्रुतीत शुद्राला कर नाही असे मनुसमर्थक म्हणतात. पण त्याचवेळी शुद्राला धनसंचयाचा अधिकारच मनू देत नाही. तर तो कर भरणार कोठून ? अशा बाबी डोळ्याआड करतात. केवळ ग्रंथप्रामाण्यातून हे घडत नाही पण जातीचा दंभ मनूच्या उच्चवर्णीय समर्थकाना बौद्धीक गुलामगिरीत ढकलतो हे कुरुंदकर दाखवून देतात. परंपरेची बौद्धीक गुलामी अमान्य करणार्या उच्चवर्णीयांनाही मनू शूद्राचीच वागणूक देतो असे प्रतिपादून मनूच्या उच्चवर्णीय समर्थकानाही ते चक्रावून टाकतात. सुभाषबाबूंचे आकलन करताना मा.कुरुंदकर लिहितात - जे सशस्त्र क्रांतीकारक आहेत, ते सगळे अहिंसाविरोधी. जे अहिंसाविरोधी ते सर्व गांधीविरोधी आणी जो गांधीविरोधी तो हींदुत्ववादी अशी सोयीची समजूत मध्यमवर्गीयांनी केलेली आहे. सुभाषबाबूंनी त्यांच्या आझाद हिंद रेडीओवरच्या भाषणातून गांधीचा उल्लेख राष्ट्रपिता असाच केला होता. बंगाल मधल्या दास पॅक्ट नुसार ५२ % मुसलमानाना ६०% जागा मिळणार होत्या आणी सुभाषबाबू ह्या करारात सामील होते हे पटवून देत कुरुंदकर सुभाषबाबूंचे मुस्लीम प्रेम दाखवून देतात. स्वतःला गांधीवादी म्हणवणारे कुरुंदकर महात्मा गांधीचे अमक्या विषयावरचे विचार साफ चूक आहेत असे म्हणायला कचरत नाहीत. फाळणीच्या वेळी गांधीजींनी मुस्लीमांचे लांगुलचालन केले होते असा आरोप हिंदुत्ववादी करतात. त्याला उत्तर देताना कुरुंदकर म्हणतात " एका मुसलमानाला तीन मतांचा अधिकार देउन; लखनौ कराराच्या वेळी कोंग्रेस मधील मुस्लीम लांगुलचालनाचा पाया; खुद्द लोकमान्य टिळकांनी घातलेला आहे. हे हिंदुत्ववादी का विसरतात ?" श्रोत्यांच्या प्रस्थापित कल्पनांना तडाखे हाणत त्यांना संपूर्णतः नव्याने विचार करायला शिकवणे हे कुरुंदकरांचे वैशिष्ट्य होते. क्लिष्ट विषयांवर धक्कादायक भाष्ये करताना कुरुंदकरांची भाषा मार्मिक, प्रवाही तरी विचारप्रवर्तक अशी होती.
बाबा आमटे यांनी मा.कुरुंदकरांवर लिहिलेल्या ओळी वास्तवाच्या जाणीवांना वाचा यावी; तस बोलायचास प्रज्ञेच्या दाहक हुंकारासारखा. काळोख उजळत येणाऱ्या किरणांसारखा यायचा तुझा शब्द; नीतीच्या वाटा प्रकाशत,आयुष्याचे अर्थ दाखवत. त्यातून दिसायचे नवे प्रश्न नव्या दिशा; कुणाला गवसायचा प्रकाश कुणाला संधी, तर कुणाला सापडायचे ते स्वत:च.
कुरुंदकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदेड शहरात त्यांच्या नावाचे ’नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’ स्थापन झाले आहे. या प्रतिष्ठानने २०१० साली, नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या आणि काही विद्यार्थ्यांच्या मदतीने सोसायटीच्याच स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्रात नरहर या अभ्यास केंद्रातर्फे कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र सुरू केले आहे. या अभ्यास केंद्रातर्फे वेगवेगळ्याक्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांना त्यांच्या प्रकल्पासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मा. ऩरहर कुरुंदकर यांचे निधन १० फेब्रुवारी १९८२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
February 10, 2017
एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी-हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल-अरुण अर्थात अनिल मोहिले व अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आहे. मराठीतले शंकर-जयकिशन अशी ओळख असणाऱ्या या संगीतकार जोडीची कारकीर्द विलक्षण गाजली.
November 1, 2019
जळगावातील कलाशिक्षक आणि चित्रकार राजू बाविस्कर.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्यावरचं लासूर हे त्यांचं गाव. घरची गरिबी सतत चिंतेत पाडणारी. पण हातात पडलेले कलेचे दान त्यांना लहानपणीच उमगले आणि शाळेत असतानाच त्यांनी आधी गंजलेल्या काळ्या पत्र्यावर, तर नंतर गावातील लग्नघरांच्या भिंतींवर चित्रं काढायला सुरुवात केली. लग्नघरातील या कामाचे त्यांना पाच-दहा रुपये मिळू लागले. हेच पैसे त्यांच्या शिक्षणाच्या आणि घरच्याही उपयोगी पडू लागले. इथूनच सुरू झाला त्यांचा खरा कलाप्रवास. यातून त्यांना त्यांच्या कलेचे 'मोल'ही कळले. मग हळूहळू ते गावात-पंचक्रोशीत कलेची कामे घेऊ लागले. त्यातूनच त्यांनी कलाशिक्षण पूर्ण केले.
औरंगाबादमधून बॅचलर ऑफ फाइन आर्टचे शिक्षण घेतल्यावर बाविस्कर जळगावात ड्रॉइंगमास्तर म्हणून रुजू झाले. एके दिवशी शाळेतले शिक्षक व कवी नीळकंठ महाजन यांनी त्यांची रेखाटनं पाहिली आणि ती 'हंस' मासिकाकडे पाठवायला सांगितली. बाविस्करांनी ती पाठवली. त्यानंतर प्रकाशन व्यवसायात त्यांचा मुक्त वावर सुरू झाला. पॉप्युलर, पद्मगंधा, शब्दालयसारख्या नामांकित प्रकाशकांकडून त्यांच्या रेखाटनांना, मुखपृष्ठांना मागणी येऊ लागली. त्यांची रेखाटनं आणि मुखपृष्ठं पाहून त्यांना भालचंद्र नेमाडेंपासून ना. धों. महानोरांपर्यंत आणि रंगनाथ पठारेंपासून राजन गवस यांच्यापर्यंत अनेकांची दाद मिळाली. हा प्रवास सुरू असतानाच बाविस्करांना अचानक जाणवलं की रेखाटनांत रेषांची खूप गर्दी होतेय. मग त्यांनी जाणीवपूर्वक रेषा कमी केल्या. चित्रांतील आकार कमी करत गेले आणि त्यांना आपल्याच चित्रांत निराकारातून आकार साकारत असल्याचे लक्षात आले. आता त्यांच्या रेखाटनांचा-चित्रांचा प्रवास अमूर्ताच्या दिशेने सुरू आहे.
राजू बाविस्कर यांना सांगलीचा प्रतिष्ठेचा 'चित्रकार पंत जांभळीकर स्मृती पुरस्कार' देण्यात आला. या पुरस्काराने एकप्रकारे बाविस्कर यांच्या प्रयोगशीलतेवरच शिक्कामोर्तब केले. कारण देवदेवतांच्या चित्रां-पासून सुरू झालेला बाविस्कर यांचा कलाप्रवास आता अमूर्ताकडे सुरू झाला आहे. आकार, रेषा यांच्यात न अडकता त्यांचा कुंचला आता निराकारात आकार शोधू लागला आहे. अलीकडेच मुंबईच्या जहांगीर कलादालनात भरलेल्या त्यांच्या अमूर्त शैलीतील चित्रप्रदर्शनाला मिळालेला जाणकारांचा प्रतिसाद, ते योग्य वाटेवर असल्याचेच दर्शविणारा आहे. मात्र बाविस्कर यांचा इथवरचा प्रवास हा एकप्रकारे कोणत्याही यशस्वी व्यक्तीसारखाच संघर्षाचा आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 9, 2017
हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट विनोद वीरांमध्ये केश्टो मुखर्जी यांचे नाव येते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९०५ रोजी झाला.बहुतेक चित्रपटांमध्ये केश्टो मुखर्जी यांनी मद्यपीची भूमिका साकारली होती, परंतु आपल्या जीवनात त्यांना कसलेही व्यसन नव्हते. केश्टो मुखर्जी व ऋत्विक घटक यांची मैत्री होती.
ऋत्विक घटक यांच्या अनेक लहान, पण महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. केश्टो मुखर्जी यांनी हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘मुसाफिर’या चित्रपटात भूमिका केली होती, यात मुख्य भूमिका होत्या दिलीप कुमार आणि सुचित्रा सेन यांच्या आणि या चित्रपटाने हिंदी चित्रपटात केश्टो मुखर्जी यांना ब्रेक दिला होता.
केश्टो मुखर्जी यांनी अनेक चित्रपटात मद्यपी म्हणून काम केले असले तरी ते बासु चटर्जी यांच्या ‘खट्टा मीठा’ मधील शिक्षक भूमिका किंवा ‘अजरिक’ मध्ये वेड्याची किंवा ‘नागरिक’ मध्ये चरित्र भूमिकेत दिसले होते. जंजीर मध्येही केश्टो मुखर्जी यांनी वाईट व्यक्तिरेखा साकारली होती. केश्टो मुखर्जी यांनी बंगाली दिग्दर्शकांबरोबर सर्वाधिक हिंदी चित्रपट केले, ज्यात हृषिकेश मुखर्जी, शक्ती सामंता आणि बासु चटर्जी यांचा समावेश आहे.
बॉलिवूड मध्ये केश्टो मुखर्जी यांनी ९९ हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. केश्टो मुखर्जी यांचे काही चित्रपट 'आपकी कसम',‘खट्टा मीठा’, 'जंजीर' 'माँ और ममता' आणि 'शोले'. केश्टो मुखर्जी यांचे २ मार्च १९८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
August 7, 2021
दहा वर्षं छायाचित्र पत्रकार म्हणून कार्यरत असलेले आनंद शिंदे यांनी विधी क्षेत्रात पदवी मिळवली आहे. आपल्या छायाचित्रणाच्या छंदाला व्यवसायात बदलून त्यांनी आजवर हिंदुस्तान टाईम्स, महाराष्ट्र टाईम्स, डी.एन.ए., दैनिक भास्कर या वृत्तपत्रांसाठी आणि चित्रलेखा आणि यू.एस.पी. एज या मासिकांसाठी छायाचित्रण केलं आहे.
May 24, 2014
पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला. एम्.ए.च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले. त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयांतून मराठीचे अध्यापन केले. बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक नाटके, ध्वनी मुद्रिका, चित्रपटांसाठी त्यांनी विपुल गीतलेखन केले. ’तोच चंद्रमा’, ’कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ’चित्रगीते’ ही त्यांची गीतसंकलने प्रसिद्ध आहेत. शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे. महाकवी कालिदासाचे ’मेघदूत’, ’चौघीजणी’ त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखन सुद्धा खूप सुंदर आणि मनाला पकडून ठेवणारे आहे. वाचायला घेतले की सोडवत नाही त्यांची पुस्तके. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंब-या प्रसिद्ध आहेत.
शांता शेळके यांची भाषाशैली आणि काव्यशैली पहिल्यापासूनच ओघवती, लालित्यपूर्ण; पण त्याचं सगळं श्रेय त्या आचार्य अत्रे यांना देत असत. ‘नवयुग’मध्ये त्या काम असताना मा.अत्रे एकदा त्यांना म्हणाले होते, ‘शांता, तुला शब्दांचा सोस फार आहे. लहान मुलं ज्याप्रमाणं रंगीबेरंगी खडे गोळा करतात त्याप्रमाणं तू शब्द गोळा करतेस. बोलण्यातला ओघ आपल्या लेखनात आला पाहिजे.’ अत्र्यांचं हे वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृतप्र्रचुर भाषाशैली बदलली. मा.शांता शेळकेंनी साधेपणा आयुष्यभर जपला. निसर्गाविषयी मात्र त्यांना विलक्षण ओढ होती. निसर्गाच्या सांनिध्यात त्या तहानभूक विसरून तासन्तास बसत. निसर्ग हाच त्यांचा खरा सखा सोबती होता. निसर्गाच्या अनेक छटा त्यांनी त्यांच्या अनेक गीतांतून व्यक्त केल्यात. धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपणाबद्दलच्या त्यातील आठवणी तर आपल्याला हेवा करायला लावतात. तसेच ’पावसाआधीचा पाऊस’, ’आनंदाचे झाड’, ’वडीलधारी माणसे’ हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच गाजलेले आहेत. भाषांतर हे शांताबाईंच्या दृष्टीनी फक्त अर्थार्जनाचे साधन नव्हते तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारेपण होते. त्यातील अत्यंत गाजलेले भाषांतर म्हणजे जपानी हायकुंचे.
जपान मधील हा काव्यप्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे ’पाण्यावरच्या पाकळ्या’ नावानी ठेवला आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात. जरी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले असले तरी, कविता लेखन हा शांताबाईंच्या विशेष आवडीचा साहित्य प्रकार. ’असेन मी नसेन मी’ , ’वर्ष’, ’रूपसी’, ’गोंदण’, ’अनोळख’, ’जन्माजान्हवी’ ही त्यांच्या कविता संग्रहांची काही नावे. ’मुक्ता आणि इतर गोष्टी’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ’स्वप्नतरंग’ ही त्यांची पहिली कादंबरी; तर ’शब्दांच्या दुनियेत’ हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह. त्यांनी उत्तम अनुवादही केले. “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश” सारखी भक्ती गीते लिहिली. “शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या सारख्या चित्रपट गाण्यांनी अनेकांना स्फुरण दिलंय. वास्तविक शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आजी. नातवंडांसाठी "किलबिल किलबिल पक्षी बोलती", "विहीणबाई विहीणबाई" अश्या अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणा-या मा.शांता शेळके यांनी अनेक वर्षे नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केले. १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलानाच्या त्या अध्यक्षा होत्या. संतांचे अभंग व ओव्या, तसेच पारंपरिक स्त्रीगीते, लोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतात. गीतांचे लावण्या, कोळीगीते असे विविध प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले.
शांता शेळके यांचे ६ जून २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
शांता शेळके यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=cjmmEnmf5IQ
चुकवू नये अशा शांता शेळके यांच्या वरील नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रमाची लिंक
https://www.youtube.com/watch?v=Uu2aB9LY-AE&list=PLqhKd63J-s6FKAZgFh9i9EdWtfdRgmH0n
https://www.youtube.com/watch?v=nPvJrSERxXA
https://www.youtube.com/watch?v=MYdiWHCAvUQ
https://www.youtube.com/watch?v=g7MDSoFFJxQ
https://www.youtube.com/watch?v=2xA9mMiEO6g
https://www.youtube.com/watch?v=QJCggfj3gRs
https://www.youtube.com/watch?v=XSUlZIQxPWI
https://www.youtube.com/watch?v=ORaa2x980fY
https://www.youtube.com/watch?v=6CF8BWBj5WI
https://www.youtube.com/watch?v=5paqPYi6sM4
https://www.youtube.com/watch?v=iSGWoHWcZmw
June 7, 2017
बॉलीवुड चे प्रसिध्द निर्माते दिग्दर्शक ज्योति प्रकाश दत्ता उर्फ़ जे.पी.दत्ता यांचा जन्म ३ आक्टोबर १९४९ रोजी झाला. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता ओ.पी.दत्ता हे जे.पी.दत्ता यांचे वडील.
५ डिसेंबर १९७१, लोंगेवालाची लढाई या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारीत जे.पी.दत्ता यांनी "बॉर्डर" हा चित्रपट अतिशय रोमांचकारी आणि स्फ़ूर्तीदायक असाच बनवला होता. असेच कारगीलचे युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.स. १९९९च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादितयुद्ध होते.एल.ओ.सी कारगीलहा जे.पी.दत्ता यांचा चित्रपट कारगील युद्धात मरणपावलेल्या हुतात्म्यांच्या जीवनावरआधारित आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
October 3, 2017
डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले.
April 14, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti