जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
तलम, तरल, रेशमी आवाजाचा गायक तलत महमूद यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९२४ रोजी झाला.
तलत या नावातच एक तलम, तरल, रेशमी अनुभव मिळतो. तलत यांचा दु:खाचा आवाज होता. त्याही पेक्षा आपल्या मनातल्या प्रत्येकच नाजूक, तरल भावनेचा तो आवाज होता. तलत यांच्या आवाजाला मर्यादा होत्या. तरी देखील जगभरातल्या चाहत्यांचा विचार केला तर या सर्व गायकांपेक्षा तलतच्या चाहत्यांची संख्या काकणभर जास्तच भरेल. कारण बाकी सर्व आवाज हे गायकांचे होते पण तलत यांचा आवाज हा सर्वसामान्य माणसाचा होता. त्यामुळे सानुनासीक, किंचीत कापरा आवाज ही त्याची मर्यादा न ठरता तोच त्यांचा सर्वोत्तम गुण ठरला. त्याच्या आवाजाचा टोन हा सर्व गाण्यांसाठी सारखाच राहीला. सुरुवातीच्या काळात तलत महमूद पार्श्वगायक म्हणून नव्हे तर गायक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात होते. त्यांना त्या काळी प्रतिसैगल म्हणूनच ओळखत होते. तलत अगदी लहानपणापासूनच सैगलचा वेडा होते. लखनौतील सनातनी वृत्तीच्या त्यांच्या वडिलांना हे गाण्याचे वेड बिलकुल पसंत नव्हते. तलत मात्र सैगलची गाणी, गझला पाठ करायचा व हुबेहूब सैगलप्रमाणे गायचे. मुकेश, रफीच्या सुरुवातीच्या जमान्यातील हे तलत स्वत:च्या चाहत्यांचा एक वर्ग निर्माण करू शकले. मुळात तलत हे एक गझलगायक होते.
गझल व गीत ही दोन्ही भावगीतेच व तलत हा भावपूर्ण आवाजात गाणारा गायक. गझल गाताना कवीच्या मूळ शब्दांची संगत तो कधीच सोडत नसे. तेथे तडजोड नव्हती. आपल्या येथील जगजितसिंग, राजेंद्र मेहता ह्या गझल गायकांनी पाकिस्तानी गझलगायक मेहदी हसनची शैली उचलली आहे. याच मेहदी हसनला ‘पाकिस्तानचा तलत महमूद’ म्हणून ओळखायचे. तलतचा आवाज हा मुळातच निर्मळ प्रीतीचा आवाज होता. वासनेचा लवलेशही त्यात दिसत नसे. अभिनेता म्हणूनही त्यांनी एकुण १३ चित्रपटात काम केलं. त्यापैकी नऊ चित्रपटात त्यांनी नायकाची भुमिका केली. "दिल-ए-नादान", " एक गांव की कहानी", "लालारुख" आणि "सोने की चिडीया" ही त्यातली काही नावे. मा.तलत महमूद यांनी दोन मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली. त्यापैकी "पुत्र व्हावा ऐसा" या चित्रपटातले "यश हे अमृत झाले" हे गाणे लोकप्रिय ठरले. तलत यांच्या गाण्यामध्ये मधुरतेबरोबरच शोकात्मतेचाही सूर होता. तलत यांनी बॉलीवूड मध्ये जवळपास सर्वच संगीतकारांकडे सारखेच काम केले. त्यांचे उर्दु उच्चार हे इतर कुठल्याही गायकापेक्षा जास्त स्वच्छ होते. मजरुह सुलतानपूरी, साहीर यांचे सुरवातीच्या काळातले खास उर्दू काव्य, त्याला खरा न्याय तलतनेच दिला.
"शाम-ए-गम़ की कसम" हे त्याचेच एक उदाहरण आहे. तलत महमूद यांनी एकूण ७४७ गाणी गायली ज्यात ४८१ फिल्मी आणि तब्बल २६६ गैरफिल्मी गीतांचा समावेश आहे. एकूण २९३ चित्रपटांसाठी पार्श्वगायन त्यांनी केले. तरीही एकाही चित्रपटासाठी त्यांना पार्श्वगायनाचा फिल्मफेअर पुरस्कार काही मिळाला नाही. काही संगीतकारांनी त्याच्यातील मधुरतेला झुकते माप दिले, तर काहींनी शोकात्मतेला. शंकर-जयकिशन, सचिन देव बर्मन, अनिल बिश्वास, या संगीतकारांनी तलत यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसविले व सामान्य लोकांना त्याची गाणी गुणगुणायला लावली. भारत सरकारने त्यांना पद्मभुषण देऊन गौरवले होते. तलत महमूद यांचे ९ मे १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
तलत महमूद यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=QL9alA089fs
https://www.youtube.com/watch?v=DJcXtkNEHkM
तलत महमूद व लता मंगेशकर यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=p3H5VbLNhpA
इफ्तिखार हे १९४० ते ५० च्या काळात बॉलिवूडचे अतिशय बिझी अभिनेता होते. जसे कडक पोलीस अधिकारी या भूमिकांसाठी ते प्रसिध्द होते. तसेच नंतर च्या काळात वडील, काका, मोठा काका, आजोबा, पोलीस आयुक्त न्यायाधीश आणि डॉक्टर या भुमीकेत ते दिसून आले. बंदिनी, खेल खेल में, एजंट विनोद या चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका केल्या होत्या.
विश्राम बेडेकरांच्या ‘ वाजे पाऊल आपले ‘ मध्ये त्यात त्यांनी डॉक्टर ऐनापुरे यांची भूमिका त्यांनी केली . ते त्यांचे पहिले व्यावसायीक नाटक. त्या वेळी त्यांना ४० रुपये नाईट मिळाली.
हृदयनाथ मंगेशकर यांच्या बद्दल मा.लता दिदींच्या भावना.
हृदयनाथ आमच्या पेक्षा लहान असला तरी कर्तृत्वाने तो खूप मोठा आहे. त्याचा संगीताचा अभ्यास प्रचंड आहे. अर्थात त्यासाठी त्याने अपार कष्ट घेतले आहेत. त्यातूनच त्याने संगीत क्षेत्रात आपले स्वत:चे स्वतंत्र स्थान व वेगळी शैली निर्माण केली आहे. आमिर खॉं साहेबांचा गंडा त्याने लहानपणीच बांधला. आमचे बाबा गेले ते तेव्हा तो अवघा चार वर्षांचा होता. सतत आजारी असायचा. त्यातच त्याच्या पायाला गंभीर आजार झाल्याने आम्ही सगळेच तेव्हा खूप काळजीत होतो. पुण्याच्या सर्व निष्णात डॉक्टरांना दाखविले. त्याचा पाय कापावा लागेल, तो चालूच शकणार नाही, असे सांगून डॉक्टरांनी आम्हाला घाबरवून सोडले होते. दरम्यान पुण्याहून आम्ही कोल्हापूरला राहायला गेलो होतो. दुखऱ्या पायाचा त्याला प्रचंड त्रास व्हायचा, धड चालता यायचे नाही, आशाच त्याला उचलून घेऊन जायची. अशात जडीबुटी व झाडपाल्याचा उपयोग करून औषधोपचार करणाऱ्या एका खेडवळ दिसणाऱ्या माणसाशी आमची भेट झाली. आम्ही बाळला त्याला दाखविले. त्याने कसलासा पाला औषध म्हणून दिला आणि पाण्यात गरम करून तो त्याच्या पायावरील जखमेवर बांधायला सांगितला. त्या उपायाने त्याचा पाय बरा झाला, पण पायात थोडासा दोष राहिला.
हृदयनाथने संगीतबद्ध केलेली अनेक गाणी मी गायले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांना चालीत बांधून ते अभंग त्याने लोकांपुढे आणले. त्यातील ‘मोगरा फुलला’ या अभंगाची त्याने केलेली चाल, त्या अभंगाचा समजावून दिलेला अर्थ यामुळे मी त्याला माझा ‘गुरू’ मानायला लागले. ‘मोगरा फुलला’ गात असताना तो माझ्यापाशी आला व तो अभंग मला समजावून सांगितला. हा अभंग लिहिताना ज्ञानेश्वर त्यांच्यावर झालेला अन्याय, समाजाने त्यांना दिलेली वागणूक, केलेला छळ हे सगळे विसरून गेले होते. त्यांचे मन, सारा देह आणि विचार हे पूर्णपणे निर्विकार झाले होते असा विचार मी या अभंगाचा केला आहे. जी अवस्था ज्ञानेश्वरांची होती तसा निर्विकार भाव या अभंगातून व्यक्त व्हावा, दीदी ते तुझ्या गळ्यातून यावे, असे बाळने मला समजावून सांगितले. आज इतक्या वर्षांनंतरही या अभंगाची आणि ज्ञानेश्वरांच्या अन्य अभंगांची गोडी कमी झालेली नाही. यातील ‘घनू वाजे रुणझुणा’ सह सर्व अभंग आजही लोकप्रिय आहेत. यात ज्ञानेश्वरांच्या शब्दांचा सर्वात मोठा वाटा आहेच, पण अभंगांच्या चालीचे व संगीताचेही महत्त्वाचे योगदान आहे. बाळने केवळ अभंगांना चाल लावली नाही तर त्याने या सगळ्या अभंगांचा वेगळ्या पद्धतीने विचार केला, त्याचा अर्थ लावला. पुढे आम्ही ‘श्रीमद्भगवद्गीता’ केली. यातील श्लोकांना त्याने भूप, यमन आदी वेगवेगळ्या रागात बांधले. संत मीरा, कबीर, सुरदास यांचेही अभंग आम्ही केले. तसेच हृदयनाथने गालिबही तितक्याच ताकदीने केला. त्याचा गालिब पाकिस्तानातही लोकप्रिय आहे. हे सर्व करताना त्याने प्रचंड वाचन, अभ्यास केला आणि त्या सगळ्यासाठी मी त्याला माझा ‘गुरू’ मानते.
‘भावसरगम’ करण्यापूर्वी हृदयनाथ मराठी/हिंदी गाण्यांचा एक कार्यक्रम करायचा. त्यावेळी या कार्यक्रमात उषा, मीना ही गायल्या आहेत. हृदयनाथबरोबर तेव्हा प्यारेलाल, त्याचा भाऊ गोरख, आनंद, लक्ष्मीकांत आणि इतर मंडळी या कार्यक्रमात असायची. एकदा एका कार्यक्रमाला मी गेले होते. कार्यक्रम सुरू असताना हृदयनाथने मला व्यासपीठावर बोलाविले आणि एक गाणे गायला सांगितले त्याच्या विनंतीला मान देऊन मी त्या वेळी एक गाणे म्हटलेही. त्यांच्या एका कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार नौशाद आले होते. नौशाद यांनी संगीतबद्ध केलेल्या एका गाण्याची धून हृदयनाथने अगदी बरोबर वाजविली की नौशादजींनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला दाद दिली. पुढे हृदयनाथने हाच गाण्यांचा कार्यक्रम ‘भावसरगम’ या नावाने सुरू केला. आज या कार्यक्रमाचेही सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.
हृदयनाथची गाणी म्हणायला सोपी वाटत असली तरी प्रत्यक्ष गाताना ती किती कठीण असतात ते कळते. त्याचा जास्त ओढा कठीणतेकडेच आहे. त्याच्याकडे मी अनेक गाणी गायली आहेत. प्रत्येक गाणे गाताना मला खूप भीती वाटायची, आपली फजिती तर होणार नाही ना, असे वाटायचे. ‘मी डोलकर डोलकर’, ‘माझ्या सारंगा’ ही गाणी तशी सोपी आहेत पण ‘ मालवून टाक दीप’, ‘घन तमी शुक्र बघ राज करी’ ही व अन्य गाणी गायला कठीण आहेत. त्याला रागाचे, तालाचे आणि सुराचे ज्ञान खूप चांगले आहे. प्रत्येक गाणे संगीतबद्ध करताना त्याने या सगळ्याचा पुरेपूर वापर केला आहे. त्यामुळे विविध शैलीतील गाणी त्याने दिली असून ती सर्व गाणी इतक्या वर्षांनंतरही लोकांच्या गळ्यात आणि ओठावर आहेत. कोणत्या चांगल्या कवितेचे उत्तम गाणे होऊ शकते याची नेमकी जाण त्याला आहे. त्यामुळे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज, ग्रेस, सुरेश भट यांच्या चांगल्या कविता ही उत्तम गाणी म्हणून रसिकांपुढे आली. संगीत या कलेबरोबरच त्याच्याकडे उत्तम लेखनकलाही आहे. तो छान लिहितो.
मी, आशा, मीना, उषा आम्हा सगळ्या बहिणींचा तो लाडका भाऊ आहे. आम्हा सर्व बहिणींसाठी तो सर्वस्व आहे.
लता मंगेशकर
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
हृदयनाथ मंगेशकर यांची अजून काही गाणी.
ये आखें देख कर.
ही वाट दूर जाते.
उष्काल होता होता.
मी डोलकर डोलकर दर्याचा राजा
चांदण्यात फिरताना.
आनंदवन भुवनी.
ने मजसी ने.
पारसी समाजाचे भारतीय क्रिकेटला मोठे योगदान आहे. पॉली उम्रीगर, नरी काँट्रॅक्टर हे दोन कर्णधार भारताला दिले ते पारशानीच. अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान हे सुद्धा पारशी. मंगेश पाडगावकरांसारखा जाड चष्मा आणि दाढी असलेले हे एक महान समालोचक होते. बॉबी तल्यारखाननी एकदा तंत्रशुद्ध फलंदाज विजय़ मर्चंटची खिल्ली उडवली होती.
मध्यप्रदेशातील बांधवगड संस्थानातील ईरची या गावी महाराजांचा जंन्म झाला. सेना महाराजांचे वडील देविदास बांधवगडच्या राजाकडे नाभिकाचे काम करीत असत. आई प्रेमकुंवरबाई सात्विक स्वभावाची गृहिणी होती. वडील देविदासानंतर परंपरेनुसार राजाकडील नाभिकाचे काम सेना महाराजांकडे आले. सेना महाराजांचा लहानपणापासूनच भक्तीमार्गाकडे ओढा होता. त्यांच्या हिंदी मातृभाषेतून ते भक्तीरचना सुध्दा करु लागले. कालांतराने महाराष्ट्रातील त्या काळच्या संतांची माहिती सेना महाराजांना मिळाली. त्या संतांच्या व पंढरपूरच्या विठ्ठल भेटीसाठी ते आतूर झाले. तिर्थयात्रा करित करीत ते इकडे आले संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव व इतर त्यांचे समकालीन संत होते. या महान संतांच्या सान्निध्यात येऊन ते महाराष्ट्राच्या पावनभूमीत रममाण झाले.
त्यांनी मराठी भाषा आत्मसात करुन मराठी भाषेवर इतके प्रभूत्व मिळविले की मराठी भाषेत त्यांनी अनेक उत्कृष्ट अभंगांची निर्मिती केली. भागवंत संप्रदायातील वारकरी भक्तीरसात त्यांनी स्वतःला झोकून दिले.
एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्रातील भक्तांना जरासुध्दा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरुन सिध्द होते.
चमत्कारांनी साधुसंतांचे मोठेपण दर्शविणार्या लोकांना खोडच जडलेली आहे. ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली, रेडयाच्या तोंडून वेद म्हणवून घेतले. अशा प्रकारच्या अनेक दंतकथा ज्याप्रमाणे अनेक संतांच्या बाबतीत सांगितल्या जातात तशीच दंतकथा सेना महाराजांच्या बाबतीतही सांगितली जाते. राजाची हजामत करण्यासाठी राजाचा माणूस सेना न्हाव्याकडे निरोप सांगावयास जातो. परंतु भगवंताच्या नामस्मरणात दंग असलेल्या सेना न्हाव्याला निरोप ऐकू जात नाही. उशीर झाल्यामुळे राजा क्रोधीत होऊन सेना न्हाव्याला शिक्षा होईल म्हणून स्वतः भगवंतच धोपटी घेऊन राजाची हजामत करुन जातात.
नामदेव, तुकाराम, सेना न्हावी, गोरा कुंभार, चोखामेळा अशा अनेक संतांनी त्यांच्या अभंगवाणीतून समाज प्रबोधन केले. संसारात राहून सुध्दा ईश्वर भक्ती करुन परमार्थ साधला जाऊ शकतो हे लोकांना सांगितले. कर्मठ उच्चवर्णियांनी निर्माण केलेली उच्चनीच, जातीभेद ही परंपरा मोडीत काढण्यासाठी उपदेश केला. स्वतःही तसे वागले. त्यांनी निर्माण केलेले काव्य, अभंग, यांचाच जनतेवर इतका प्रचंड प्रभाव पडला की इतर काही चमत्कारांनी त्यांचे मोठेपण सिध्द करण्याची काहीच गरज नसावी.
नंतर महाराष्ट्रातील वास्तव्य संपवून सेना महाराज पुन्हा त्यांच्या जन्मभूमीस तीर्थाटन करीत निघून गेले. त्यांच्या हिंदी भक्तीरचना उत्तरेकडील सर्व हिंदी प्रदेशातून म्हटल्या जातात. महाराजांनी काही रचना पंजाबी भाषेत सुध्दा केल्या आहेत.
व. पु. काळे हे सर्वांचे लेखक होते . कुठेतरी क्षणभर नवीन पिढीला ते विचार करायला प्रवृत्त करतात.
कवि दत्त यांची अलीकडच्या संदर्भात ओळख करून द्यायची झाल्यास ती अशी करून देता येईल. त्यांचा जन्म २७ जून १८७५ रोजी झाला. ज्येष्ठ साहित्यिक वि. द. घाटे यांचे ते वडील. कवयित्री अनुराधा पोतदार यांचे आजोबा आणि कवी प्रियदर्शन पोतदार यांचे पणजोबा!
महाराष्ट्रकवी यशवंत दिनकर पेंढरकर यांनी दत्त यांच्या काव्यगुणांचे रसग्रहण करणारा लेख लिहिला होता. कवीचे अकाली जाणे आणि त्याचे काव्यवैभव यांची सांगड घालणे कसे अयोग्य आहे, ते एका इंग्लिश वचनाच्या आधारे त्यांनी त्या लेखात स्पष्ट केले होते.
यशवंतांनी म्हटले होते : 'एज डजंट मॅटर. नो. यू आर नॉट टू यंग; पिट वॉज प्राईम मिनिस्टर ऍट 23, नो. यू आर नॉट टू ओल्ड; ग्लॅडस्टन वॉज प्राईम मिनिस्टर ऍट 83. ' पाश्चात्यांच्या इतिहासातील अनन्यसाधारण दाखल्यानी वयोमानाची निरर्थकता जशी या उताऱयांत व्यक्त केली आहे, तशी ती आपल्याकडील दाखल्यांनीही करता येईल. सारांश इतकाच की, वयाची आडकाठी कर्तृत्वाला येत नाही.
हे सांगतानाच यशवंतानी हेही स्पष्ट केले होते की, 'दत्तांच्या कवितेत असे पुष्कळ गुणधर्म सापडत नाहीत की, ते व्यक्त व्हायला त्यांना अधिक अनुभव, समृद्ध आयुष्याची आवश्यकता होती. ' असे असले तरी दत्त यांना लाभलेल्या आयु्ष्याच्या अवकाशात जी काही कविता लिहिली ती कसदार आहे, हे निश्चित.
कवी दत्त हे मूळचे नगर जिल्ह्यातील. श्रोगोंदे हे त्यांचे गाव. कवी दत्त यांचे शिक्षण अहमदनगर येथील मिशन हायस्कूलमध्ये झाले, महाविद्यालयीन शिक्षण विल्सन कॉलेज, मुंबई आणि ख्रिश्चन कॉलेज, इंदूर येथे झाले. कलकत्ता विद्यापीठातून बी. ए. ही पदवी मिळाल्यावर पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला लागले. रेव्हरंड ना. वा. टिळक आणि कविवर्य चंद्रशेखर यांच्याशी दत्त यांचे विशेष सख्य होते. तिघांमध्ये खास जिव्हाळा होता.
कवी दत्त म्हटले की आठवते ती 'बा नीज गडे' ही कविता. या कवितेवरूनच ते ओळखले जातात.
कवी दत्त यांच्या बहुसंख्य कविता १८९७ व १८९८ या काळातील आहेत. त्या काव्यरत्नावली, मनोरंजन, सुविचार समागम, बालबोध मेवा, करमणूक इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. एकूण एक्कावन्न कविता आज उपलब्ध आहेत. त्यांपैकी ४८ कवितांचा संग्रह त्याचे शिक्षणतज्ज्ञ चिरंजीव कवी वि.द. घाटे यांनी इ.स. १९२२ साली दत्तांची कविता या नावाने प्रसिद्ध केला. ’नवे पान’ या डॉ. मा.गो. देशमुख संपादित संग्रहात मात्र त्यांच्या सर्व कविता आहेत. मा.दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे १३ मार्च १८९९ रोजी निधन झाले.
दत्त यांची कविता
.......................................
निज नीज माझ्या बाळा (ही रचना १८९७ मधील आहे.)
.......................................
बा नीज गडे नीज गडे लडिवाळा
निज नीज माझ्या बाळा
रवी गेला रे सोडुनी आकाशाला । धन जैसे दुर्भाग्याला ।।
अंधार वसे चोहिकडे गगनात । गरिबांच्या जेवी मनात ।।
बघ थकुनी कसा निजला हा इहलोक । मम आशा जेवी अनेक ।।ध्रृ।।
खडबड हे उंदिर करिती ।
कण शोधायाते फिरती ।
परी अंती निराश होती ।
लवकरी हेही सोडतील सदनाला । गणगोत जसे आपणाला ।। ध्रृ ।।
बहू दिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती । कुजुनी त्या भोके पडती ।।
त्यांमधुनी त्या दाखविती जगताला ।दारिद्य्र आपुले बाळा ।।
हे कळकीचे जीर्ण मोडके दार । कर कर कर वाजे फार ।।
हे दुःखाने कण्हुनी कथी लोकांला । दारिद्य्र आपुले बाळा ।।
वाहतो फटींतून वारा ।
सुकवीतो अश्रूधारा ।
तुज नीज म्हण सुकुमारा ।
हा सूर धरी माझ्या ह्या गीताला । निज नीज माझ्या बाळा ।।ध्रृ।।
जोवरती हे जीर्ण झोपडें अपुले। दैवाने नाही पडले ।।
तोवरती तू झोप घेत जा बाळा । काळजी पुढे देवाला ।।
तद्नंतरची करू नको तू चिंता । नारायण तुजला त्राता ।।
दारिद्य्र चोरिल कोण? ।
आकाशा पाडिल कोण? ।
दिग्वसना फाडिल कोण? ।
त्रैलोक्यपती आता तुजला त्राता । निज निज माझ्या बाळा ।।ध्रृ।।
तुज जन्म दिला सार्थक नाही केले । तुज काही न मी ठेविले ।।
तुज कोणी नसे, छाया तुज आकाश । धन दारिद्य्राची रास ।।
या दाही दिशा वस्त्र तुला सुकुमारा । गृह निर्जन रानीं थारा ।।
तुज ज्ञान नसे अज्ञानाविण काही ।भिक्षेविण धंदा नाही ।।
तरी सोडुं नको सत्याला ।
धन अक्षय तेच जिवाला ।
भावें मज दीनदयाळा ।
मग रक्षिल तो करुणासागर तुजला । निज नीज माझ्या बाळा ।।ध्रृ।।
मराठी भाषेतील कवी दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ दत्त (27-Jun-2017)
#Datta #DattatrayKondoGhate
ठाण्यातील पत्रकार या नात्याने श्रीया शिंदे यांनी एक नविन उपक्रम सुरु करुन ठाण्यातील माता आणि बालकांचे छायाचित्रण केले व ह्या छायाचित्रणाला नवीन दिशा केली आहे.
वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या रम्य ही स्वर्गाहून लंका या गाण्याचा इतिहास
चित्रपट : स्वयंवर झाले सीतेचे (१९६४)
संगीतकार : वसंत देसाई
पार्श्वरगायक : पं. भीमसेन जोशी
गीत : ग. दि. माडगूळकर
संगीतकार सुधीर फडके यांनी गीत रामायणातील सर्वच्या सर्व ५६ गीतांना अतिशय समर्पक चाली लावल्या होत्या. व त्यांनी गीत रामायणाचे असंख्य कार्यक्रम केले, पुण्यातील त्यांचा प्रत्येक कार्यक्रम अतिशय भक्तिभावाने बघणारा एक तरुण विद्यार्थी- अरुण पाटणकर! अरुण हा संगीतप्रेमी तर होताच, पण त्याचा "रामायणा'चा चांगला अभ्यासही होता. एका कार्यक्रमाच्या वेळी त्याने सुधीर फडके यांची भेट घेतली. म्हणाला, "गीत रामायणात अनेकांच्या तोंडी गाणी आहेत आणि ती योग्यही आहेत, पण संगीताविषयी प्रेम असणारा व संगीताचा जाणकार "रावण', याच्या तोंडी एखादे गीत का नाही?' यावर बाबूजी (सुधीर फडके) चतुराईने म्हणाले, "अहो, मी फक्त गीतांना स्वरबद्ध केलंय आणि ती गातोय एवढंच! हा प्रश्नय तुम्ही गीत रामायण लिहिणाऱ्या ग. दि. माडगूळकरांना विचारा.
लवकरच तोही योग आला. गीत रामायणाच्या २५० व्या कार्यक्रमाला ग. दि. माडगूळकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्या ठिकाणी हजर असलेल्या अरुणने पुन्हा तोच प्रश्नम गदिमांना विचारला. ते काही बोलले नाहीत. कदाचित भोवती असलेल्या चाहत्यांच्या गराड्यामुळे त्यांनी उत्तर दिले नसेल!
मात्र अरुणच्या त्या प्रश्ना ने गदिमांना नक्कीच विचार करायला लावलं होतं. कारण त्याच सुमारास होमी वाडिया या हिंदीतील प्रसिद्ध निर्मात्याने "स्वयंवर झाले सीतेचे' नावाचा चित्रपट काढायचं ठरवून त्याची कथा- पटकथा- संवाद व गीतांची जबाबदारी ग. दि. माडगूळकरांवर सोपवली. त्यांनी या चित्रपटात रावणाला गाणे गायला लावले. रावण हा दुष्ट खरा, पण तो कलाशौकिन होता. यासाठी चित्रपटाच्या सुरवातीला रावण वीणा घेऊन एक शास्त्रोक्त गाणे गात असल्याचे त्यांनी दाखवले होते.
पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातील हिंडोल बहार रागातील "रम्य ही स्वर्गाहून लंका' हे गाणे ऐकताना श्रोते तल्लीन होत. या गाण्यातील "या लंकेचे दासीपद तरी, कमला घेईल का?' अशा उन्मत्त सवालातून रावणाचा गर्विष्ठ स्वभाव दिसून येतो, तर त्यातील ताना- मुरक्याा व आलापींमुळे त्याची संगीताची जाण लक्षात येते. या गाण्याचे ध्वनिमुद्रण "बॉम्बे लॅब'मध्ये झाले होते. संगीतकार मा.वसंत देसाई यांनी ध्वनिमुद्रणानंतर पंडितजींची गाण्याची मैफल ठेवली होती. त्या दिवशी टेकमध्ये गाणे ओके व अतिशय छान झाल्यामुळे पंडितजींची तबियत खूष होती आणि मग त्या खुशीतच त्यांनी आपल्या रसिक चाहत्यांसाठी एक तासभर झकास मैफल रंगवली!
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ मधू पोतदार
Copyright © 2025 | Marathisrushti