जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
श्रीराम ताम्रकर हे त्यांच्या चाहत्यांमध्ये ‘चित्रपटसृष्टीचा विश्वकोश’ म्हणून लोकप्रिय होते. मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाने २०१० मध्ये दादासाहेब फाळके अकादमीचा ‘ज्येष्ठ चित्रपट पत्रकार पुरस्कार’ आणि ‘बेस्ट फिल्म क्रिटिक’ पुरस्कार यांच्यासह त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
वयाची ऐंशी गाठलेले ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि गानगुरू पंडित शरद साठे यांच्यासाठी शनिवारी, २४ रोजी मुंबईत होणारा सोहळा केवळ सहस्रचंद्रदर्शनाचा वा त्यानिमित्त होणाऱ्या सत्काराचा नाही.. त्यांच्या तीन सीडींचे प्रकाशन आणि मग सतारनवाज्म अब्दुल हलीम ज्माफर खान आणि सारंगीसम्राट रामनारायण यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार,
त्यानिमित्ताने साठे यांना गुरू मानण्याचा ‘टप्पा’ गाठलेल्या अनेक गायक-शिष्यांचीही उपस्थिती, असे हे स्वरमय वातावरण असेल. ग्लॅमरची मातबरी- ज्यापुढे आजचे अनेक गायक शरण जातात- तशी साठे यांना कधी वाटली नव्हती आणि याही सोहळय़ात, प्रसिद्धीपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची मानणाऱ्यांची मांदियाळी असेल. ही गुणवत्तेची बैठक साठेंना वयाच्या १७व्या वर्षी मिळाली, ती थेट पं. द. वि. ऊर्फ बापूराव पलुस्कारांकडून!
अगदी १९५५ पर्यंत, पलुस्करांच्या अकाली निधनापर्यंत ही तालीम सुरू होती. त्यानंतर साठे मुंबईत, बी. आर. देवधरांच्या विद्यालयात शास्त्रशुद्ध बैठक पक्की करत गेले.. पण फर्गसनमध्ये असताना ऐकलेले काही काहीशा नकलेचा दोष पत्करून गळय़ात घटवलेले फय्याजखाँ, मास्टर कृष्णराव, हिराबाई बडोदेकर अशांच्या गायकीत अंगभूत असलेले मोकळेपणही त्यांना भावत होते. त्याची स्वत:शी गाठभेट करून घेण्याचा क्षण साठेंना बहुधा, पं. शरश्चंद्र आरोलकरांच्या मठीत गवसला असावा.
ग्वाल्हेर गायकीतील ‘टप्पा’ हा गानप्रकार शिकायला आरोलकरांकडे साठे गेले आणि तिथे रमले. पुढे विद्यापीठीय स्तरावर टप्पा गायकीचे प्राध्यापक परीक्षक म्हणून काम करणारे पं. साठे यांची ‘यमनकल्याणा’सारख्या रागांवरही इतकी घरंदाज हुकमत आहे की, या गायनाचे जतन अव्वल देशी संस्थांखेरीज वॉशिंग्टन विद्यापीठानेही केले. आयटीसी- संगीत संशोधन संस्थेचा पुरस्कार (२००६), काशी संगीत समितीतर्फे ‘संगीतरत्न’ (२००७) हे सत्तरीनंतर मिळालेले सन्मान वगळता, ‘आकाशवाणीचे ए ग्रेड आर्टिस्ट’ ही साठे यांची ओळख होती, पण त्याबद्दल खंतखेद बाळगणाऱ्यांपैकी साठे नव्हेत. ‘डीव्ही पलुस्करांवरील लघुपटासाठी आवाज वापरला गेला’ या समाधानाचे मोल मात्र साठेंकडून जाणावे!
कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्मय, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात मुक्तपणे संचार करणार्या लेखिका शिरीष पै. ‘गेल्या दहा हजार वर्षांत असं व्यक्तिमत्त्वं झालं नाही’ अशा व्यक्तिमत्त्वाच्या आचार्य अत्रे यांची शिरीष पै ही कन्या.
ग.प्र . प्रधान यांनी अनेक वृत्तपत्रातून लिखाण केले. तसेच ते निस्पृह कार्यकर्ता , विचारवंत म्हणून ते समाजात वावरले. ग. प्र . प्रधान यांना ‘ लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक ‘ या पुस्तकासाठी राज्य शासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. मराठी मध्ये लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक , आगरकर लेख संग्रह , महाराष्ट्राचे शिल्पकार – ना. ग. गोरे . साता उत्तरांची कहाणी , सत्याग्रही गांधीजी , माझी वाटचाल , डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत , भाकरी आणि स्वातंत्र्य , काजरकोट , सोनार बांगला ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली. तर इंग्रजीत लोकमान्य टिळक – अ बायोग्राफी , इंडियाज फ़्रीडम स्ट्रगल, ऍन एपिक ऑफ सॅक्रिफाइस अँड सफरिंग , लेटर टु टॉलस्टॉय , परस्यूट ऑफ आयडियल्स ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली..
देविका राणी चौधरी हे मा.देविका राणी यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ३० मार्च १९०८ रोजी झाला.रवींद्रनाथ टागोरांच्या भगिनी सुकुमारीदेवी या त्यांच्या आजी. देविका राणी जेव्हा लंडनमध्ये स्थापत्यशास्त्र शिकत होत्या तेव्हा त्यांचा परिचय तेथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या मा.हिमांशु रॉय यांच्याशी झाला. हिमांशु रॉय यांना नाटक आणि चित्रपटांत अतिशय रस होता. त्यांनी देविका राणीला आपल्या 'लाइट ऑफ एशिया' या चित्रपटाच्या नेपथ्यासाठी बोलावले. नंतर त्यांनी लंडनमध्ये असतानाच देविका राणींना घेऊन 'करमा' नावाचा हिंदी-इंग्रजी चित्रपट बनवला. तो प्रदर्शित झाल्यावर 'स्टार लंडन'च्या समीक्षकाने लिहिले होते की, "देविका राणी यांचे सौंदर्य आणि इंग्रजीचे उच्चारण याला चित्रपटसृष्टीत तोड नाही". नंतर हिमांशु रॉय देविका राणीला घेऊन जर्मनीत गेले आणि त्यांनी तिथे रंगमंचांवर भूमिका केल्या. पुढे लग्नही केले. लंडन आणि बर्लिन येथे नाव मिळवल्यावर हिमांशु रॉय मुंबईत आले. लंडनहून चित्रपटाच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेऊन मायदेशी परतलेल्या हिमांशु रॉय, राजनारायण दुबे आणि देविका राणी यांनी १९३४ मध्ये "बॉंबे टॉकिज' या संस्थेची स्थापना केली. बॉंबे टॉकिजच्या मुंबईतल्या स्टुडिओत चित्रपट निर्मितीसह ध्वनिमुद्रण, संकलन, कपडेपट, यासह सर्व सुविधा होत्या. या संस्थेच्या तिन्ही संस्थापकांनी चित्रपट हे समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, याचे भान कायम ठेवून सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांची निर्मिती केली. त्या काळात चित्रपटात चांगली कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या घरातल्या मुलींनी चित्रपटात काम करणे हे सामाजिक अप्रतिष्ठेचे लक्षण मानले जाई. गरीब घरातल्या गरजू मुली अभिनेत्रीचे काम करीत. पण त्यांच्याबद्दलही समाजात चर्चा होत असे. मुलांना तर चित्रपट पहायला परवानगीच नव्हती. अशा काळात बॉंबे टॉकिजने चित्रपटसृष्टीला वैभव मिळवून दिले. चित्रपटाबद्दलची जनतेची नजरही बदलून टाकली. प्रेक्षक वर्ग चित्रपटांकडे वळवला. देविका राणी या संस्थेच्या चित्रपटात भूमिका करीत. नंतर त्यांनी हिमांशु रॉय यांच्याशी विवाह केला. "बॉंबे टॉकिज' ही संस्था फक्त चित्रपट निर्मितीचा स्टुडिओ नव्हता. या संस्थेने हिंदी आणि अन्य भाषातल्या चित्रपटसृष्टीला शेकडो कलाकार, तंत्रज्ञ, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री दिल्या. दिलीपकुमार, देवआनंद, केदार शर्मा, सत्यजित रे यांच्यासह अनेक दिग्गजांचा चित्रपटसृष्टीतला प्रवेश याच संस्थेत झाला. या संस्थेत सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ हे मासिक वेतनावर काम करीत असत. हिमांशु रॉय आणि राजनारायण दुबे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या कर्तबगारीने आणि दर्जेदार चित्रपट निर्मितीने प्रतिष्ठा मिळवून दिली. अछूत कन्या, बंधन, किस्मत, हम सब एक हैं, जिद्दी यासह सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती याच संस्थेत झाली. अशोक कुमार यांची भूमिका असलेला "किस्मत' हा चित्रपट लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. मुंबईतल्या एकाच चित्रपटगृहात सलग ३५० दिवस तो चालला होता. त्या संस्थेत शशधर मुकर्जींचे नातेवाईक अशोक कुमार गांगुली, फिल्म लॅबॉरेटरीत काम करीत होते. सन १९३३ मध्ये प्रदर्शित झालेल्या कर्मा या चित्रपटात अभिनेत्री देविका राणी व अभिनेता हिमांशू राय यांनी चार मिनिटांचे चुंबनाचे दृष्य दिले होते. (खऱ्या खुऱ्या आयुष्यात ते पती-पत्नी होते). हे हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिले चुंबन दृश्य असावे. मा.देविका राणींनी सुचवल्यामुळे हिमांशु रॉय यांनी अशोक कुमार आणि देविका राणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'अछूत कन्या' नावाचा हिंदी चित्रपट १९३६ मध्ये केला. ब्राम्हण तरुण आणि हरिजन युवती यांची कथा असलेला हा चित्रपट अतिशय गाजला. त्या वेळी हिमांशु रॉय यांचा मुख्य तंत्रज्ञ जर्मन होता. दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाल्यामुळे त्या तंत्रभारत सोडून जावे लागले. त्यामुळे हिमांशु रॉय यांना आपले अर्धवट राहिलेले चित्रपट पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागली. त्यांतच त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि सर्व जबाबदारी देविका राणींवर पडली. संस्थेचे भागीदार शशधर मुखर्जी यांनी, हिमांशु रॉय यांचे समाज प्रबोधन विषयांवरील चित्रपट करण्याचे धोरण बदलून गल्लाभरू चित्रपट करण्याचे ठरवले. हे देविका राणींना आवडले नाही, त्यांनी चित्रपट संस्थेतून आपली भागीदारी काढून घेतली. त्यांनी पुढे रशियन चित्रकार सोव्हित्सलाव्ह रोरिच यांच्याशी विवाह केला आणि ते दोघे बंगलोरमध्ये स्थायिक झाले. १९७० साली देविका राणींना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पहिलाच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. मा.देविका राणी यांचे ८ मार्च १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
पुण्यात छोटा गंधर्वाचं आणि पं.तुळशीदास बोरकर यांचं घर जवळच होतं. ते दर रविवारी त्यांच्याकडे तालमीसाठी जाऊन बसत असे. त्यांचा रियाज चालू असायचा.
घाणेकर, प्र. के.
ध्यास आणि वेड या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. एखाद्या गोष्टीच्या ध्यासापायी सारे आयुष्य वेचणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात काही कमी नाही. त्यामध्ये प्र. के. घाणेकर यांचे नाव आता अग्रेसर ठरते आहे. स्नेहल प्रकाशनच्या वतीने या वर्षीचा ‘स्नेहांजली’ पुरस्कार त्यांना देण्यात आला, तेव्हा त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना, मित्रांना आणि विद्यार्थ्यांनाही कमालीचा आनंद झाला.
गेल्या चाळीस वर्षांच्या काळात जे कुणी घाणेकर सरांच्या सान्निध्यात आले, ते त्यांच्या परिवाराचे सदस्य बनले. किल्ले हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक व्यवच्छेदक भाग आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांनी या नव्या संस्कृतीचा उगम घडवताना ज्या अनेक गोष्टी विचारात घेतल्या होत्या, त्यांपैकी पर्यावरण आणि वनस्पती याही महत्त्वाच्या बाबी होत्या, याची जाणीव घाणेकर यांना अगदी महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच झाली. कारण त्यांच्या अभ्यासाचा विषय होता, वनस्पतिशास्त्र. प्रा. हेमा साने या त्यांच्या अध्यापक. त्यांच्या मते वनस्पतिशास्त्र वर्गात शिकता येत नाही, त्यासाठी निसर्गातच जायला हवे. म्हणून किल्ले, दुर्ग अशा ठिकाणी अभ्यास सहली जाऊ लागल्या. घाणेकरांच्या मनात वनस्पतींबरोबरच त्या किल्ल्यांच्या इतिहासाबद्दलही कुतूहल जागृत झाले आणि मग त्यांनी त्या इतिहासाकडे आपला मोर्चा वळवला. ३८ वर्षे वनस्पतिशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र या विषयाचे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी इतक्या व्यापक परिसरात भ्रमण केले, की एका माणसाला एका आयुष्यात एवढे सगळे कसे करता येईल, अशी आपल्याला चिंता वाटावी. ज्या काळात पर्यावरण हा विषय चर्चेतही नव्हता, तेव्हा म्हणजे १९८२ मध्ये प्रा. घाणेकर यांनी त्यावर पहिले पुस्तक लिहिले. ‘इतिहास घडवणाऱ्या वनस्पती’ या त्यांच्या पुस्तकात वनस्पतींमुळे घडलेल्या इतिहासाची रोचक कहाणी आहे. म्हणजे भारतात मसाल्याच्या वनस्पती पिकत असल्यानेच भारतावर आक्रमण झाले आणि पारतंत्र्य आले, असे त्यांचे म्हणणे. इतिहास समजून घेण्यासाठी किल्ले पाहायचे, तर त्यात भटकंतीचाही आनंद मिळवता आला पाहिजे. त्यामुळे त्यांनी भटकंती या विषयावरही अर्धा डझन पुस्तके लिहिली. ५६ पुस्तकांचे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेतच, परंतु हिमालय, वृक्ष, निसर्ग, किल्ले या विषयांवर त्यांनी सादर केलेल्या ‘स्लाईड शो’चे किमान पाचशे कार्यक्रम झाले आहेत. देशभरात हजारांहून अधिक ठिकाणी त्यांनी या अनेक विषयांवर व्याख्याने दिली आहेत आणि हा वाचायज्ञ अजूनही तेवढय़ाच दमदार रीतीने सुरू आहे. त्यांच्याकडे सातवाहन कालापासूनच्या नाण्यांचा अमूल्य संग्रह आहे. अनेक प्रकारच्या जीवाश्मांचे, शंख-शिंपल्यांचे एक उत्तम संग्रहालयच त्यांच्या घरी आहे. त्याशिवाय त्यांच्या आवडीच्या विषयांवरील किमान पंधरा हजार कात्रणांचा संग्रहही त्यांनी तयार केला आहे. एवढे सगळे घडताना आपल्याला आयुष्यात नेहमी उत्तम गुरू मिळाले, याचे समाधान ते नेहमीच व्यक्त करतात. त्यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला सलामच आहे.
आज २१ सप्टेंबर
शब्दास्वरांचे जादुगार महान हार्मोनियम व ऑर्गन वादक पं.गोविंदराव पटवर्धन यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२३ रोजी झाला.
गोविंदराव पटवर्धन बोटात विलक्षण जादू असलेला कलाकार! हार्मोनियमवर ज्या सफाईने त्यांची बोटं फिरत, त्यात ते स्वरालयीची जी कामगत करत ते केवळ दैवी म्हणावं लागेल.
जन्मताच सूर,ताल व लय यांची निसर्गदत्त देणगी लाभलेले गोविंदराव यांनी आपल्या मुंजीत हार्मोनियम वाजवून आपल्या सुप्त गुणाची चुणूक दाखवली होती. आपल्या वयाच्या १४ व्या वर्षी संगीत वेणुनाद या नाटकाच्या प्रयोगाला ऑर्गन ची साथ केली होती.
विशेष हार्मोनिअमच्या साडेतीन सप्तकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या गोविंदराव यांनी वादनाचं कोणतंही तांत्रिक शिक्षण घेतलेलं नव्हतं, ते स्वतः उत्तम तबला वादकही होते. त्यामुळे लय, ताल यावर त्यांचे प्रभुत्व होते.
१९४० साली मुंबईला आल्यावर पं गोविंदराव साहित्य संघाच्या संगीत नाटकांना ऑर्गनची साथ करू लागले. त्या वेळी देवधर स्कूल ऑफ म्युझिक व मनहर बर्वे यांच्या विद्यालयात पं. कुमार गंधर्व व पं.राम मराठे यांची ओळख झाली, तेव्हा पासून अखेर पर्यत पं गोविंदराव यांनी त्यांना साथ केली. कोणत्या स्वरासाठी कोणतं बोट वापरायचं, असं विचारलं तर ते म्हणायचे - मी फक्त वाजवतो. बाकीचं काही मला माहीत नाही. त्यातून मला आनंद मिळतो असं ते सांगायचे.
पेटीवादन हे दोन प्रकारे केलं जातं. एक म्हणजे प्रत्येक स्वर सुटासुटा वाजवणं आणि दुसरा म्हणजे जोडून वाजवणं. गोविंदराव या दोन्ही पध्दतींनी वाजवायचे. हार्मोनियम व ऑर्गन वादनातला सफाईदारपणा हे त्यांच्या वादनाचं वैशिष्टय होतं. अतिशय जलद आणि सफाईदार पलटे ते वाजवत असत. त्यांची दुसरी खासियत म्हणजे ते पद वाजवताना त्यातले शब्द ऐकू आले पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. ते आपल्या शिष्यांना शिकवतानाही ते त्याच पध्दतीने शिकवायचे.
गोविंदराव पटवर्धन यांना पेटीवर्धन पण म्हणत असत. त्यांना गोविंदराव असे म्हणलेले रुचत नसे, ते नम्रतेने म्हणत गोविंदराव म्हणायच्या योग्यतेचे एकच पं गोविंदराव टेंबे मला नुसतेच गोविंदा म्हणा, खरेतर आपल्या गुहाघरवासीयांनी गोंद्या म्हणून हाक मारलेले त्यांना आवडायचे. अनेक संगीत कार्यक्रमांमधून, संगीत नाटकांतून त्यांनी साथसंगत केली. आलापी, तान वाजवण्यातली सफाई होती. आयुष्यभर रामभाऊ मराठे, कुमार, वसंतराव, छोटा गंधर्व यांसारख्या दिग्गज कलाकारांना साथ करून करून वादनातलं हे गायकी अंग गोविंदरावांनी आत्मसात केलं होते, व स्वत:त अक्षरश: मुरवलं होते.
गोविंदराव पटवर्धन यांच्या एकसष्ठी सत्कारात पु.ल नी त्यांच्या बरोबर हार्मोनियम वादन केले होते, तेव्हा पु.ल मार्मीकतेने म्हणाले होते, पोटात व पोटरीत गोळा येतो हे माहिती होते पण बोटातही गोळा येतो हे आज प्रथम समजले.
पं. गोविंदराव पटवर्धन यांचे पट्टशिष्य म्हणून डॉ.विद्याधर ओक यांना ओळखले जाते. त्याच्या इतर शिष्यांमध्ये पं. विश्वनाथ कान्हेरे, मकरंद कुडले, विघ्नेश्र्वर जोशी, अशी नावे घेता येतील. आदित्य ओक तर लहानपणापासून गोविंदराव पटवर्धन यांचे हार्मोनियम वादन ऐकत आला आहे. तो पण त्यांचाच शिष्य.
पं. गोविंदराव पटवर्धन यांचे ३० जानेवारी १९९६ रोजी निधन झाले.
गोविंदराव पटवर्धन एक हार्मोनियम बरोबरच उत्कृष्ट ऑर्गनवादक होते. त्यांच्यासंबधी काही प्रसंग
एकदा कोकणात काही वर्षापूर्वी एक नाटक होतं साथीला गोंविंदराव होते आणि वयाच्या पंच्याहत्तरीत असलेले छोटा गंधर्व गायला आले होते तेव्हा एका पदाच्या वेळी गोविंदराव आणि तबलजी गंधर्वाँधा कैक वेळ समेवर यायलाच देत नव्हते त्यावर छोटा गंधर्व गोविँदरावांना म्हणाले, "अरे गोविंदा माझं वय पंच्याहत्तर आहे आता मी दमलोय आता थांब" गंधर्वाँची ही वाक्य गोविंदरावानी ऑर्गनवर जशीच्या तशी उतरवली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
पूर्वी नाटकं उघड्यावर आणि बत्तीच्या उजेडात होत. असंच एका उत्सवाच्या प्रसंगी नाटकाचं आयोजन करण्यात आलं साथीला गोविंदराव होते साधारण दहाचं नाटक पण साडेनवाच्या सुमारास अचानक पाऊस सुरु झाला सहाजीकच नाटक रद्द झालं त्यावर कोणीतरी म्हणालं गोविंदराव "तुमचा ऑर्गनवादनाचा कार्यक्रम देवळात होऊ दे" ते गोविंदरावानी मान्य केलं आणि हा त्यांचा कार्यक्रम तब्बल पहाटे साडेतीन वाजेपर्यँत रंगला.
पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त पु.ल.देशपांडे यांनी केलेले भाषण.
http://www.marathisrushti.com/mvideos/speeches-by-pu-la-deshpande-about-pt-govindrao-patwardhan/
पं. गोविंदराव पटवर्धन यां चे व्हिडीओ
www.youtube.com/watch?v=0JWkKjxNGNc
www.youtube.com/watch?v=5qXM9L3bjBA
www.youtube.com/watch?v=_c-JWigeh3I
https://www.youtube.com/watch?v=JM1jtZJRLxE
https://www.youtube.com/watch?v=eYjUcsXukMY
https://www.youtube.com/watch?v=m8KcijSZvEY
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे सुमती गुप्ते. त्यांचा जन्म १९१९ रोजी वाई येथे झाला. वाईत जन्मलेल्या सुमतीबाईंचे बालपण मात्र बडोद्यासारख्या कला-संस्कृतीच्या माहेरघरात व्यतीत झाले. साहजिकच त्यांचा कलाक्षेत्राकडे, विशेषत: सिनेमाकडे ओढा होता. पदवी शिक्षण प्राप्त केल्यानंतर चित्रपटक्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्या ‘प्रभात’मध्ये दाखल झाल्या. तिथे ‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटात त्यांना पहिले काम मिळाले. त्यानंतर त्यांना बाबासाहेब तोरणेंच्या ‘नवरदेव’ चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन भालजी पेंढारकरांनी त्यांना ‘थोरातांची कमळा’ या ऐतिहासिक चित्रपटात संभाजीच्या प्रेयसीची कमळेची मध्यवर्ती भूमिका दिली. त्यापाठोपाठ त्यांच्या ‘सूनबाई’नेही रौप्यमहोत्सवी यश मिळविले आणि सुमतीबाईंचे नाव एक उत्तम अभिनेत्री म्हणून सर्वतोमुखी झाले. पुढे त्यांनी विनायकांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये ‘चिमुकला संसार’, ‘माझं बाळ’ यासारखे काही चित्रपट केले.
‘चिमुकला संसार’चे दिग्दर्शक वसंतराव जोगळेकर यांच्या रूपाने त्यांना जीवनाचा जोडीदारही इथेच लाभला. वसंतराव जोगळेकर यांच्या साथीने त्यांनी मीरा पिक्चर्स या संस्थेची स्थापना करून त्या बॅनरखाली ‘शेवटचा मालुसरा’, ‘जानकी’, ‘हा खेळ सावल्यांचा’ आदी चित्रपटांची निर्मितीही केली. अभिनयाबरोबरच 'हा खेळ सावल्यांचा', 'जानकी' आणि 'शेवटचा मालुसरा' या चित्रपटांची निमिर्ती आणि लेखनही सुमतीबाईंनी केले होते. दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांच्या त्या पत्नी. ‘ऊनपाऊस’, ‘थोरातांची कमळा’, ‘चिमुकला संसार’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘जानकी’ यांसारखे गाजलेले मराठी चित्रपट, तसेच ‘मौसी’, ‘उर्वशी’, ‘हमारा संसार’, ‘वक्त’, ‘एक मंझिल, दो राहें’ इत्यादी हिंदी चित्रपटांतून आणि ‘संशयकल्लोळ’, ‘उद्याचा संसार’, ‘संन्यस्त खड्ग’, ‘लग्नाची बेडी’, ‘विकारविलसित’ आदी नाटकांतून सुमती गुप्ते यांनी संस्मरणीय भूमिका केल्या. त्यांना रसरंगचा दादासाहेब फाळके पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी-सखी-माता पुरस्कार, शासनाचा व्ही. शांताराम पुरस्कार, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचा ‘चित्रभूषण’ जीवनगौरव पुरस्कार मिळाले होते. नाटककार अच्युत वझे हे त्यांचे जावई आहेत. मा.सुमती गुप्ते यांचे ३१ ऑक्टोबर २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti