जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
प्रतिभावान संगीतकार व गायक श्रीधर फडके (Shridhar Phadke) यांचा जन्म ९ सप्टेंबर १९५० रोजी झाला.
मराठी संगीतातील सुधीर फडके तथा बाबूजी या अजरामर नावाचा वारसा समर्थपणे पेलणारे गायक आणि संगीतकार म्हणजे श्रीधर फडके. गीत-कवितेतील अर्थाला, शब्दांतील सौंदर्याला अधोरेखित करण्याची सुधीर फडके यांची गायनशैली श्रीधर फडके यांनी जाणीवपूर्वक आत्मसात केली असली तरी त्यांनी स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांना घरचा समृध्द वारसा असला तरी संगीतकार किंवा गायक व्हायचं असं काही त्यांनी ठरवलेलं नव्हतं. पितृसहवास हा मौलिक ठेवा असला तरी त्यांच्या लहानपणी गाण्याशी त्यांचा संबंध ऐकण्यापुरताच होता. आधी शिक्षण पुरं कर असं वडिलांनीच बजावलं होतं. मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातून फिजिक्स व इलेक्ट्रॉनिक्स या विषयांत एम.एस्सी. केल्यावर ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले व त्यांनी न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटर सायन्स या विषयात एम.एस. पदवी संपादन केली. त्यांच्या संगीत-प्रवासाला आरंभ झाला अमेरिकेतच. कॅम्लिन कंपनीच्या मालती दांडेकर अमेरिका भेटीवर आल्या होत्या. त्यांनी श्रीधर फडके यांना हरिपाठाचं पुस्तक दिलं व 'देवाचिया व्दारी, उभा क्षणभरी....' या अभंगाला चाल लावण्याची विनंती केली. त्याप्रमाणे मा.श्रीधर फडके यांनी चाल बांधली व तेथेच, कोलंबिया विद्यापीठातील कार्यक्रमात खुद्द सुधीर फडके यांनी त्या चालीवर तो अभंग गायला. 'तो आपल्या आयुष्यातील जपावासा वाटलेला क्षण' असं श्रीधर फडके म्हणतात.
लक्ष्मीची पाऊले या चित्रपटातील “फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश” हे गीत त्यांनी लावलेल्या चालीमुळे लोकप्रिय झालं. सुधीर मोघे यांनी लिहिलेलं हे गीत ’बाबुजी’ (सुधीर फडके) व आशा भोसले यांनी गायलं होतं. संगीत हा श्रीधर फडके यांचा व्यवसाय नसल्यानं त्यांनी कधी तडजोड केली नाही. सवंगपणाला बळी पडून त्यांनी कधी रतीब घातला नाही किंवा चालींच्या जिलब्या पाडल्या नाहीत. त्यांना कवितेची सखोल जाण आहे. ‘मन मनास उमगत नाही ’ ही ग्रेस यांची कविता. त्यांनी पहिल्या चार ओळींना चाल लावली. पण पुढील ओळींचा अर्थ उमगेना. तेव्हा त्यांनी आपल्या चालीचं घोडं तसंच पुढ दामटलं नाही तर त्यांच्या आवडत्या कवीपैकी एक असलेले सुधीर मोघे यांना आपली अडचण सांगून चाल लावलेल्या ओळी ऐकवल्या आणि 'तुम्हाला या ओळींच्या आधारे काही सुचलं तर पाहा' असं सुचवलं. मा.सुधीर मोघे सिध्दहस्त कवी, त्यांनी श्रीधर फडके यांची विनंती मान्य केली व पुढील ओळी लिहून दिल्या.
स्वप्नातील पदर धुक्याचा
हातास कसा लागावा
आधार कसा शोधावा
मन मनास उमगत नाही.
श्रीधर फडके यांच्या तळमळीला मोघे यांनी सृजनात्मक प्रतिसाद दिल्यानं एका सुरेल गीताचा जन्म झाला. कवितेवर असं कलम करून घेण्याची किमया मा.श्रीधर फडके यांनी आणखी एकदा घडवून आणली. वैद्य यांच्या पुढील ओळी श्रीधर फडके यांना फार भावल्या त्या अशा...
कुठे जातात भेटून
कशा होतात ओळखी
आणि आपली माणसे
कशी होतात पारखी
या ओळीदेखील फडके यांनी सुधीर मोघे यांना ऐकवल्या व पुढील ओळी लिहून देण्याची विनंती केली. त्यानुसार मोघें यांनी पुढील ओळी रचल्या....
कुण्या देशाचे पाखरू
माझ्या अंगणात आले
त्याचे पंख परदेशी
परी ओळखीचे डोळे
श्रीधर फडके यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नसले तरी त्यांच्या अनेक चाली रागांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ ओंकार स्वरूपा (बैरागी भैरवी),ऋतू हिरवा(चारुकेशी), फिटे अंधाराचे जाळे(मिश्र भैरवी), सांज ये गोकुळी(पूर्वाकल्याण व यमनकल्याण), मी राधिका, मी प्रेमिका (मधुकंस).
एखादं गाणं आवडलं की चाल लावण्यासाठी झगडणं काही तासांपासून ते सहा महिन्यांपर्यंत असू शकतं असं श्रीधर फडके म्हणतात.‘ मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद ’ या एकनाथांच्या अभंगाला चाल सुचायला सहा महिने लागले. एकदा तर गंमतच झाली. कविवर्य ग्रेस यांच्या ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी ’ या कवितेला चाल लावायची होती. त्या दिवशी ते पुण्यात होते, दिवसभरात काही सुचलं नाही. पण मुंबईला परतायच्या प्रवासात पनवेलच्या आसपास चाल मनात दाटून आली. ती हरवू नये , सांडू नये म्हणून श्रीधर फडके ती चाल मुंबईला पोचेपर्यंत गुणगुणत राहिले. प्रत्येक चालीची कुंडली वेगळी असते असं सांगून फडके म्हणतात, “ अंतरा व मुखडा या प्रमाणे त्यांतील नि:शब्द जागाही एकाच लयीत गुंफण आवश्यक आहे. त्यामध्ये त्रुटी राहिल्या तर छोटया तुकड्या तुकड्यांत गाणं ऐकल्याचा भास निर्माण होतो. गाणं कसं असावं, चाल कशी बांधावी, उत्तम चाल कशी असावी हे मी बाबुजींकडून शिकलो.”
श्रीधर फडके यांनी सतरा ध्वनिफितींचे संगीत दिग्दर्शन केले आहे. त्यांपैकी मनाचे श्लोक , ओंकार स्वरूपा, अवघा विठ्ठलु, ऋतू हिरवा या ध्वनिफिती/ सीडीज यशस्वी झाल्या, त्याबद्दल त्यांना प्लॅटिनम डिस्क प्रदान करण्यात आली. स्वत:चं खास तंत्र व गायनशैली विकसित केलेल्या श्रीधर फडके यांनी अभंग, भावगीतं, भक्तिगीतं, विराण्या, गजल, नाट्य संगीताचा बाज असलेली गाणी असे अनेक प्रकार लीलया सादर केले आहेत. त्यांना ‘वारसा लक्ष्मीचा’ या चित्रपटासाठी ‘पुत्रवती’ या चित्रपटासाठी, ‘लेकरू’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. श्रीधर फडके यांनी आत्ता पर्यंत अठरा मराठी चित्रपटांचे व एका हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन, सतरा ध्वनिफितींचे संगीत दिग्दर्शन, ३ मराठी व ११ गुजराथी नाटकांचे व पाच दूरदर्शन मालिकांचे संगीत दिग्दर्शन केले आहे.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. अशोक जैन / थिंक महाराष्ट्र
श्रीधर फडके यांनी गायलेली, संगीत दिलेली काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=GKOEi9p_VaM
https://www.youtube.com/watch?v=BMNQF1OfHWQ
https://www.youtube.com/watch?v=AqH-TkK9NSk
https://www.youtube.com/watch?v=7T8PqtOGsLI&t=1096s
https://www.youtube.com/watch?v=1V2pB9KCidE&t=287s
September 9, 2017
स्काउट व गाईड्स या अवघ्या जगाला व्यापून टाकणाऱ्या विधायक चळवळीचे जनक लेफ्टनन्ट जनरल लाॅर्ड बेडन पावेल यांचा जन्म २२ फेब्रुवारी १८५७ रोजी लंडन येथे झाला.
त्यांचे पूर्ण नाव रॉबर्ट स्टीफन्स स्मिथ बेडन पॉवेल. लंडन मधील चार्टर औस ह्या शाळेत शिष्यवृती मिळवून त्यांनी शिक्षण केले. १८७६ साली लष्करात त्यांना कमिशन मिळाले. त्यानंतर त्यांनी दक्षिण अफ्रीका, अफगाणिस्थान, भारत अशा विविध ठिकाणी कामगिरी बजावली. आपल्या कर्तुत्वावर ते लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत पोचले.
१९०७ साली त्यांनी; बालवीर’ चळवळ सुरु केली.थोड्याच दिवसात हि चळवळ अनेक देशात पसरली. १९१० साली आपली बहिण ओंग्रेस हिच्या मदतीने त्यांनी मुलींसाठी ‘वीरबाला’ हि संघटना स्थापन केली.विवाहा नंतर ह्या संघटनेची जबाबदारी त्यांच्या पत्नीने लेडी-बोडन- पॉवेल यांनी सांभाळली संघटनेच्या स्थापने पासून ६-७ वर्षातच या संघटनेची पथके बेल्जियम, हॉलंड, अमेरिका, भारत, चीन, रशिया राष्ट्राने मध्ये सुरु झाली. संघटनेची पाहणी करण्या करीता. या पती-पत्नी ने सर्व देशाना भेटी दिल्या. त्यात भारतालाहि त्यांनी १९२१व १९३७ साली भेट दिली होती.
भारतात १९१७ साली पं. मदनमोहन मालवीय यांनी बॉइज स्काउट चळवळ सुरु केली. १९२१ साली लॉर्ड बेडन पॉवेल यांनी सर्व संस्था एकत्र केल्या व त्याचे नाव बाय स्काउट ठेवले.१९३८ हिंदुस्थानात स्काउट असोसीएेयन ची स्थापना केली. त्यात हिंदुस्थान स्काउट. बायस्काउट ,गर्ल गाईड हे भाग होते. ७ नोहेंबर १९५० मध्ये एकत्रित होऊन ‘ भारत स्काउट & गाईड ‘ असोशियन हे नाव दिले.
भारतीय मुलांना मातृभूमीचे उत्तम नागरिक बनविण्यात सहकार्य करणे हा उद्द्येश होय. ईश्वरा विषयी पूज्य भावना, स्वहितापेक्षा देशहित मोठे, शेजारी व इतराच्या विषयी सेवाभावाचे बीज रुजावे हा उद्देश होय. सर्वजगात बंधुभाव, ऐक्य , व शांतता नांदावी, समान ध्येयाच्या संस्थांशी मित्रत्व राहील हे धोरण स्काउट चे आहे. लॉर्ड बेडन पॉवेल यांचे ८ जानेवारी १९४१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 8, 2019
वनस्पती जीवतंत्रज्ञान आणि सुगंधी आणि औषधी वनस्पतींवर संशोधन
December 15, 2010
आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये, दर्जेदार व उद्योन्मुख तरूण दिग्दर्शकांच्या लांबलचक यादीमध्ये निपुण धर्माधिकारीचा क्रमांक नेहमी अव्वल असायचा.
August 18, 2011
ममता सपकाळ यांच्या जीवनाची कथा ही सर्वांच्या समोर आणायची झाली तर त्यावर एक भलं मोठं पुस्तक तयार होईल. सिंधुताई सकपाळांनी जेव्हा हजारो अनाथांच्या आयुष्यामध्ये सौख्याचे रंग भरण्यासाठी आपले आयुष्य वेचायचे ठरविले, तेव्हा त्यांच्या पोट्च्या गोळ्याचा, म्हणजेच ममताचे काय करायचे हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्न होता. तेव्हा केवळ ममताच्या समजुतदारपणामुळे व असामान्य त्यागशील स्वभावामुळे त्या हजारो अनाथांच्या जीवनातील कल्पवृक्षाचे काम करू शकल्या. माई या आपल्या जन्मदात्या असल्या तरी इतर अनाथ मुलांसाठी त्यांचा सहवास जास्त महत्वाचा आहे, व आपला जेवढा त्यांच्यावर,व त्यांच्या प्रेमावर जेवढा अधिकार आहे तेवढाच किंबहुना त्याहून थोडा जास्तच अधिकार भारतातल्या शेकडो मुला मुलींचा आहे हे सत्य त्यांनी कोवळ्या वयातच स्वीकारले होते.
August 16, 2011
१९६७ साली त्यांच्याच नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडविरूद्ध विदेशी भूमीवर सर्वप्रथम टेस्ट सिरीज जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली. १९६१ ते १९७५ या काळात ते भारतासाठी ४६ कसोटी सामने खेळले.
January 5, 2022
ठाण्यात चित्रकला क्षेत्रातील अनेक मातब्बर कलाकार वास्तव्य करतात. अशा कलाकारांमधीलच एक नाव म्हणजे सौ. माणिक राज शिंगे हे होय. चित्रकला आणि कला अध्यापक म्हणून काम करणार्या माणिक राज शिंगे यांनी फाईन आर्टमध्ये ए.टी.जी.डी. ही पदवी तसेच डीप.ए.एड. ही पदविका संपादन केली आहे.<
May 16, 2014
स्त्री शिक्षण ज्याकाळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य मानली जात होती अश्या परिस्थितीत शिक्षणासाठी पुढाकार घेणारी महिला म्हणजे रमाबाई महादेव रानडे.
May 7, 2014
“पॉयझंड ब्रेड’ या त्यांनी संपादित केलेल्या दलित साहित्यविषयक ग्रंथाचा जागतिक साहित्य क्षेत्रातही नावलौकिक झाला. दक्षिण आफ्रिकेचे तेव्हाचे अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी, १९९८ मध्ये अर्जुन डांगळे दक्षिण आफ्रिकेत गेले तेव्हा आपल्या आत्मचरित्राची प्रत सही करून दिली होती.
June 15, 2019
सयाजी शिंदे यांना खऱ्या अर्थे नाव आणि ओळख मिळाली ती रामगोपाल वर्मा याच्या “शूल’ या चित्रपटातील बच्चू यादवच्या भूमिकेमुळे. बिहारमधील हे पात्र सयाजी शिंदे यांनी इतक्या चांगल्यारीतीने वठवले, की देशभर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
January 13, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti