(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संगीत नाटककार बळवंत पांडुरंग किर्लोस्कर ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर

    पुणे येथे १८८० साली एका पारशी नाटक मंडळीचे ऑपेराच्या धर्तीवरील एक नाटक त्यांच्या पाहण्यात आले. तसे नाटक मराठीत करून दाखविण्याची इच्छा त्यांस होऊन त्यांनी कालिदासाच्या अमिज्ञानशाकुंतर या नाटकाचे भाषांतर केले. त्यामध्ये स्वतःची पदेही घातली आणि उत्तम नटसंच मिळवून ते १८८० साली रंगभूमीवर आणले.

  • कोण्णूर सर ( कोल्हापूर)

    मी बँकेत टाइपिस्ट म्हणून नोकरीला लागलो. दोन तीन महिने झाले असावेत. एकदा साहेबांनी टाइपिंगला दिलेल्या पत्रात मला व्याकरणाची एक चूक आढळली. मी ती दुरुस्त केली. पत्रावर सही करण्यापूर्वी साहेबांनी मला बोलावून तीच दुरुस्ती चुकीची असल्याचे सांगितले. त्यांनी does च्या पुढे क्रियापदाला s प्रत्यय लावला होता. मी चटकन म्हणालो, ’साहेब does च्या पुढे मेलं तरी s लागत नाही’. साहेबांनी किंचित रागानेच माझ्याकडे पाहिले. ’ सॉरी सर, हे आमच्या कोण्णूर सरांच वाक्य डोक्यात इतक फिट झालं आहे की चुकून तुमच्यासमोर मी ते तसच बोललो’. आपली चूक साहेबांच्या लक्षात आली. पण हे ’मेलं तरी’ त्याना फारस रुचल नव्हत.

    कोण्णूर सरांच्या हाताखाली शिकलेल्या एकूण एक हजारो विद्यार्थ्यांच्या तोंडात किंवा डोक्यात हे वाक्य असच फिट झाल आहे. कोण्णूर सरांची भाषाच अशी जगावेगळी होती. जरा व्याकरणाकड लक्ष दिल तर SSC ला इंग्रजीत आंद्या परिटाचं गाढव सुद्धा पास होईल, अडचण एवढीच आहे की ते तीन तास एके ठिकाणी बसत नाही. इंग्रजीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना ते गर्दभाच्या असे जवळ उभे करायचे. जशी भाषा वेगळी तसेच विद्यार्थ्यांना मारण्याची पद्धतही वेगळी. डोक्यावर किंवा हाताच्या ढोपराच्या मागे हाडावर डस्टरने खाटकन मारायचे. जीव कळवळायलाच पाहीजे. आणखी अस्त्र म्हणजे एक वेताची छडी होती. हात झणझणण म्हणजे काय ते कोण्णूर सरांची छडी खाल्ल्यावरच कळायचे. मुलींना सुद्धा सर मारायचे हे आम्हाला तेव्हां खूप छान वाटायच.

    कोण्णूर सर कोल्हापूरात न्यू हायस्कूलच्या कागलकर वाड्यात इंग्रजीचे शिक्षक होते. अतिशय कडक शिक्षक म्हणून त्याना ओळखले जायचे. पांढरे शुभ्र दुटांगी धोतर, खादीचा कुडता त्यावर खादीचेच जाकीट आणि डोक्यावर टोकदार कडक इस्त्रीची गांधी टोपी असा त्यांचा पोशाख असायचा.
    चार चौघात पटकन उठून दिसतील असेच त्यांचे व्यक्तिमत्व होते. शाळेव्यतिरिक्त ते स्वत:चे खाजगी क्लासेस घ्यायचे. कोण्णूर सरांमुळे इंग्रजी सुधारले पण त्यापेक्षा जास्त महत्वाचा वाटतो सरांसारख्या भन्नाट माणसाचा सहवास लाभल्याचा आनंद.

    कोल्हापुरातल्या मंगळवार पेठेतील त्यांच्या घरातल्या पहिल्या मजल्यावर काही महिन्यांपूर्वी मी त्यांच्या कुटुंबियांना भेटायला गेलो होतो तेव्हां ती खोली पाहून या खोलीत आम्ही ६५/७० मुले तेव्हां कशी काय बसत असू याचे खूपच आश्चर्य वाटले. मुली खिडकीत बसायच्या. दाटी वाटीने जागा करून देण्यासाठी सर मुलांना बजावयाचे ’जे नुसत हलवल्या सारख करतोयस ते बूड प्रत्यक्ष हलव’. साधी, सोपी, सरळ, नेहमीची भाषा सरांना त्यांच्या आईने शिकवलीच नसावी. वर्गात बसून मागच्या बाजूला कोणी बडबड करायला लागला की सर म्हणायचे ’ए बोडकी, रामाच्या पारावर बसून वाती वळायला आलायस काय ?’ अंबाबाईच्या देवळात राम मंदिराच्या मागे प्रवचन ऐकायला जाणाऱ्या विधवा बायकांसाठी वापरला जाणारा शब्द बोडकी. कोण्णूर सरांनी कुठून कुठून हे शब्द संग्रहात साठवले होते ते कळत नाही.

    चहाचे त्यांना अत्यंतिक व्यसन होते. टेबलावर चहाचा एक थर्मास अखंड भरलेला असायचा. आम्हालाच कोणालातरी कपात अर्धाच कप चहा भरायला सांगत. भुरका मारून चहा प्यायचे. थर्मास रिकामा झाला की घरात हाक द्यायचे. सर पूर्वी धूम्रपानही करायचे. पुढे डॉक्टरांनी त्यावर बंदी घातली.

    फक्त ५०/६० मिनिटांच्या शिकवणीने इंग्रजी सुधारणार नाही म्हणून घरी सराव करण्यावर त्यांचा भर होता. रोज भरपूर गृहपाठ द्यायचे. म्हणजे जितका वेळ शिकवणे त्यापेक्षा जास्त वेळ वह्या तपासण्यात जायचा. त्या वह्या एका कोनाड्यात रचून ठेवलेल्या असायच्या. एकदा एका बहाद्दराने कोणाची तरी वहीच चोरली. वही गायब झाल्याने चोरी झाल्याचे कळले तरी चोर सापडण्यासारखा नव्हता. त्या दिवशी सरांनी न भूतो न भविष्यति अशा शिव्या हासडल्या. रोज रात्री दोन अडीच पर्यंत जागून सर वह्या तपासायचे याचा शोध आम्हाला त्या दिवशी लागला. सरांचा सात्विक संताप खरा होता. त्यापूर्वी किंवा त्यानंतरही सरांना इतके चिडलेले मी कधीच पाहीले नाही.

    कोण्णूर सरांचा सारा भर व्याकरण शिकवण्यावर होता. पहिले चार पाच महिने फक्त काळ शिकवायचे. नंतर पाठ्यपुस्तक शिकवतानाही मुख्य भर व्याकरणावर. परीक्षेच्या दृष्टीने पुस्तकाची तयारी ज्याची त्याने करावी. पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करताना पोहणाऱ्याला हात द्यावा त्या पद्धतीने शिकवायचे. म्हणजे प्रत्यक्ष पोहण्यासाठी हातपाय तुम्हीच मारले पाहीजेत. इंग्रजी वाक्य घटक पद्धतीने शिकवायचे. घटक दोन प्रकारचे. पहिले जे वाक्यात असलेच पाहीजेत, आणि दुसऱ्या प्रकारात असतीलही. पहिल्या प्रकारातील घटक दोन, कर्ता आणि क्रियापद. ह्या दोनही घटकांशिवाय वाक्य पूर्णच होऊ शकत नाही. दुसऱ्या प्रकारात कर्ता, क्रियापद, कर्म शिवाय ह्या साऱ्या विषयीची अधिक माहिती सांगणारी विशेषणे इत्यादी.कोणी काही चूक केली की ’शेण खाल्लं’ हे त्यांच आवडीच ठरलेल वाक्य होत. साठ मिनिटात किमान पाच सहा वेळां ते शेणावर घसरायचे. वर्गात दोशी नावाचा मुलगा होता. रोज त्याच्या वाट्याला बुट्टीभर शेण यायच. एकदा तर दोशीच्या वाट्याला जे शेण आलं ते आम्ही कोणीच विसरू शकणार नाही.पाहिजेतच असे घटक कर्ता-क्रियापद. कर्ता-दोशी, क्रियापद – खातो. त्यावर विशेषणे जोडता जोडता अखॆर ते वाक्य इतकं मोठ झाल…. दोशी शेण खातो. दोशी रोज सकाळी म्हशीचे बुट्टीभर, ताजे-ताजे शेण, फोडणी देऊन, मिटक्या मारत चवीने खातो . सरांच्या क्लासमधे शेण या शब्दाशिवाय दिवस उजाडायचा नाही, मावळायचाही नाही.वर्गात उशीराने येणाऱ्या मुलांचे स्वागतही खास शैलीत व्हायचे. ’इतक्या सकाळी उकिरडे फुंकत तरंगत कुठे गेला होतास अशा प्रश्नाबरोबरच वर एक छडी खायला मिळायची. कोण्णूर सरांवर तरीही सर्वांच प्रेम होत. त्यांनी मारलेल्या छड्या, दिलेल्या शिव्या गोडच लागायच्या. कारण त्यांनी आमचे इंग्रजी सुधारण्याची जी जादू आमच्या जीवनात केली होती त्याच्यापुढे या साऱ्या गोष्टी किरकोळ वाटायच्या.

    एकदा मात्र सरांनी मारलेली छडी माझ्या हाताबरोबरच मनावरही कायमचा ठसा उमटवून गेली. सर वर्गातल्या हुशार विद्यार्थ्यांना फारसे प्रश्न विचारायचे नाहीत. कोणीच उत्तर देऊ शकले नाही तर मग त्यांच्या मते हुशार मुले जी होती त्यांना शेवटी विचारायचे. सुदैवाने माझा नंबर बहुदा शेवटचा असायचा. खरतर माझ्यापेक्षा जास्त हुशार काही जण होते. पण माझ्या भावाने बोर्डाच्या परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे सरांचे माझ्यावर जरा जास्तच प्रेम होते. मला मारायचेही नाहीत. इतर मुलांची त्याबद्दल तक्रारही असायची. इतकच काय ते मला सरळ कात्रे या नावाने हाक मारायचे बाकी कोणालाही त्यांनी सरळ नावाने हाक मारल्याचे माझ्या स्मरणात नाही. सबनीसला सबन्या, मानेला मान्या, पाटीलला पाटल्या अशीच नावे घ्यायचे. सान्या (साने) तुला सांगतो कळंब्याच पाणी पिऊन इंग्रजी येत नाही, हे त्यांच्या आवडीचे विधान होते. कळंबा तलावातून कोल्हापूर शहराला पिण्याचे पाणी पुरवले जाई. म्हणजे इंग्रजी शिकण्याच काम कोल्हापूरवाल्यांच नव्हे हे ते खास त्यांच्या स्टाईलने ऐकवायचे ते ऐकायला जाम मजा यायची. तर एकदा त्यांनी काहीबाही प्रश्न विचारला. मी सरांच्या जवळ त्यांच्या स्टूललगत अगदी पायाशीच बसलो होतो. खुर्ची असती तरी स्टूल हे त्यांचे आवडते आसन होते. प्रश्न विचारतच त्यांनी माझ्याकडे पाहीले. याचे उत्तर वर्गात कोणालाही येणार नाही अशी त्यांची अटकळ होती. त्यामुळे आता बऱ्याच जणांना मार देता येईल असा काहीसा मिष्किल भाव त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. आजपर्यंतचा माझा अनुभव असा होता की माझ्यापर्यंत प्रश्न यायचाच नाही. एखाद्याने तरी उत्तर देलेले असायचे. म्हणून मी उत्तर ठाऊक असल्याचा भाव चेहेऱ्यावर ठेवला. वास्तविक मलाही त्याचे उत्तर ठाऊक नव्हते. जवळ जवळ बारा चौदा जणांना हा प्रश्न विचारूनही माझ्या दुर्दैवाने कोणालाच त्याचे उत्तर देता आले नाही. माझ्या चेहेऱ्यावरील भाव प्रदर्शनामुळे शेवटी सर म्हणाले Yes, now you. पण मला उत्तर येतच नव्हते. हे पाहिल्यावर सर जाम भडकले. ’भोसडीच्या, मला फसवतोस ? म्हणत त्यांनी वेताच्या छडीने जी सपकन माझ्या हातावर लगावली की पुढे पूर्ण एक तास माझ्या हातातून झिणझिण्या येत होत्या. आज कात्रेने मार खाल्ला यामुळे सारे सुखावले. चुकीचे भाव नजरेत ठेवून मी त्यापुढे आयुष्यात कधीही आणि कुणाच्याही सामोरा गेलो नाही. असा प्रसंग आला तर मला प्रथम कोण्णूर सरांची आठवण येते. ती छडी आठवते. आणि ती शिवी सुद्धा, भोसडीच्या मला फसवतोस ?

    एकदा मी क्लासला थोडा उशीरा पोचलो. पाहतो तर आज क्लास नव्हता. सुट्टी दिली होती. नेहमी वर्गात बनियन किंवा कधीकधी फक्त धोतर नेसून वर उघडेबंब बसणारे सर आज त्यांच्या पूर्ण पोशाखात एकदम टापटीप दिसत होते. मला थांबवून त्यांनी एक पेढा खायला दिला. सर कसला पेढा अस विचारल्यावर माझ्या एकसष्ठीचा अस सरळ उत्तर ते देऊ शकले असते. पण एकसष्ठी असली म्हणून काय झाल ? ते कोण्णूर सरच होते. कसला पेढा या माझ्या प्रश्नावर त्यांनीच मला प्रतिप्रश्न केला ’पेपर वाचतोस की नाही’ ? मी गप्पच. मग त्यांनी पुढारीमधे आलेली बातमीच मला दाखवली. त्यांच्या फोटोखाली त्यांच्या एकसष्ठीची बातमी होती.

    भाषांतर हा कोण्णूर सरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. एका भाषेतील विचार दुसऱ्या भाषेतील विचार व्यक्त करण्याच्या पद्धतीप्रमाणे व्यक्त करणे ही त्यांची भाषांतराची सोपी सुटसुटीत व्याख्या होती. कुठल्याही वाक्याचा केवळ शव्दार्थ सांगणे म्हणजे भाषांतर नव्हे यावर त्यांचा सतत जोर असायचा. Oh, God ! म्हणजे फक्त हे देवा नव्हे. माणूस परमेश्वराला साद घालताना काय काय म्हणेल ते सगळ लिहायला सांगायचे. उदा: परमेश्वरा, भगवंता, विठ्ठला पांडुरंगा, अरे रामा इ. इ. एकदा त्यांनी भाषांतर करायला सांगितलेले मराठीतील वाक्य खूप लांबलचक होते. एक मुलगा म्हणाला सर खूप मोठ आहे वाक्य. त्यावर म्हणाले घे छोट वाक्य – विद्या विनयेन शोभते किंवा शेणखाऊ गप्प बस. काय भाषांतर करणार ? कोणी चांगल्या मराठीत भाषांतर केले की खूष होऊन शाबासकी द्यायचे. रागावताना भरपूर शब्दांचा वापर करणारे सर शाबासकी मात्र शक्यतो नजरेतूनच द्यायचे. आम्ही त्यावर खूष असायचो.

    त्यांनी सांगितलेली एका वाक्याची विविध भाषांतरे माझ्या चांगलीच लक्षात राहीली आहेत. मूळ इंग्रजी वाक्य होते The old man called his son and said my boy I am going to die now यातील I am going to die now चे भाषांतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे असे केले होते. बाळा, मला आता त्याचे बोलावणे आले आहे. मुला, मला आता पैलतीर दिसू लागला आहे. बाबारे, मी म्हणजे पिकले पान, कधीही गळून पडेन. माझे काही आता खरे नाही. आता मी चीरनिद्रा घेणार आहे. मला बाहेर रेडा उभा दिसतो आहे. मृत्यु कुणाला चुकलाय, मी आता चाललो. मृत्यु आता अगदी समीप येऊन ठेपला आहे तो कधीही झडप घालेल. बाबा, मला यमाने निरोप धाडला आहे, आता गेलेच पाहीजे. माझा इहलोकीचा प्रवास संपला, आता मी तिकडे चाललो. माझे आता शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत, अगदी ताससुद्धा. गंगेचा टाक आहेना रे घरात ?

    कोण्णूर सरांनी नुसते इंग्रजी शिकवले नाही. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी दिली. भाषांतराची ही गंमत चाखण्याची चव दिली. मराठी भाषेचा बाज आणि साज दाखविला. अमृताते पैजा जिंकणारी आमची मातृभाषा कशी समृद्ध आहे त्याचे ज्ञान करून दिले.

    SSC परीक्षेत माझ्याकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. दुर्दैवाने त्या मी पुऱ्या करू शकलो नाही. माझी अकरावीची परीक्षा झाल्यावर सर स्वत: माझ्या घरी आले होते. माझ्या पेपरची सगळी चौकशी करून मला इंग्रजीत ८१ गुण मिळतील असा त्यांचा अंदाद होता. प्रत्यक्षात ६१ च गुण मिळाले. त्यावेळी माझ्यापेक्षाही कांकणभर जास्तच दु:ख कोण्णूर सरांना झाले हे मी त्यांच्या चेहेऱ्यावर पाहिले.

    कोणतीही गोष्ट करण्यामधे एकप्रकारची मनस्विता त्यांनी नेहमी जोपासली. माझ्या काही कविता लिहिलेली डायरी एकदा मी त्यांना पहायला दिली होती.माझी डायरी ’छान आहे’ एवढा ढोबळ शेरा मारून ती ते परत करू शकले असते. पण कोण्णूर सरांच्या ते स्वभावात बसणारे नव्हते. ठलेच
    काम त्यांनी Lightly घेतले नाही. माझ्या सगळ्या कविता त्यांनी व्यवस्थित वाचल्या. पुढच्या रविवारी निवांत वेळी मला घरी बोलावले. सरांचा अभिप्राय ऐकायला मी उत्सुक होतो. सर्वसाधारणपणे दहावी अकरावीतला कोणी मुलगा काही तरी लिहितो आहे याच नेहमी कौतुकच व्हायचे. मात्र सर म्हणाले, ’काहीतरी लिहिण्य़ापूर्वी प्रथम खूप वाचल पाहीजे. मग लिहायला लाग’. मी थोडासा नाराजच झालो. पण आज त्या संपूर्ण गोष्टीकडे मी वेगळ्या नजरेने पाहू शकतो. किती मोलाचा सल्ला सरांनी दिला होता. मुख्य म्हणजे माझ्यासाठी भरपूर वेळ काढून अत्यंत आत्मीयतेने मला एक मंत्रच दिला होता.

    पुढे कोण्णूर सरांना भेटण्याचा एक दोनदाच योग आला. माझ्या एका मित्राला इंग्रजीमुळे परीक्षेत यश मिळत नव्हते. त्याला तीन चार महिने व्याकरण समजून घ्यायला मदत केली. तो पास झाला. त्या आनंदात पेढे घेऊन मी सरांना भेटायला गेलो होतो. नंतर काही भेटण्याचा योग आला नाही. अचानक कोण्णूर सरांच्या निधनाची बातमी पेपरमधे वाचली. आम्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वेगळी बाग फुलविणारे, इंग्रजी कशाशी खातात त्याचे ज्ञान करून देणारे, तिरकस आणि शिव्यांनी युक्त भाषा वापरूनही प्रेमाचे झरे पाझरविणारे कोण्णूर सर इहलोकीचा प्रवास संपवून परलोकी गेले. कळंब्याच पाणी वहात वहात हडसन पर्यंत जाऊन मिळाल तरी कात्र्या कळंब्याच पाणी पिऊन इंग्रजी येत नाही हे त्यांच वाक्य अजूनही कानात घुमत आहे.

    -- श्री.संजय कात्रे

  • मुंबईचे निवृत्त पोलीस सहाय्यक आयुक्त मधुकर झेंडे

    जवळजवळ ४० वर्षे पोलिस दलासाठी कार्यरत असताना, मधुकर झेंडे यांनी त्यांच्या काळात खतरनाक गुन्हेगार चार्ल्स शोभराज, हाजी मस्तन आणि करीम लाला यांना जेल मध्ये टाकले.

  • ज्येष्ठ बल्लवाचार्य विष्णू मनोहर

    मार्च २०२१ मध्ये शेफ विष्णू मनोहर यांनी पुण्यात ७ तासात ७ हजार किलो मिसळ शिजवण्याचा आणि ३ तासात ३००० सामाजिक संस्थांमार्फत ३० हजार गोरगरिब, गरजू लोकांपर्यंत ही मिसळ पोहोचवण्याचा विश्वविक्रम केला गेला आहे.

  • दिनकर देशपांडे

    दिनकर देशपांडे यांच्या निधनामुळे विदर्भाच्या साहित्य आणि पत्रकारितेतील एक कलंदर व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. आपल्या दिनकर या नावापुढे ‘राव’ हे विशेषण स्वत:च लावणारे अस्सल आणि स्वत:च ते उच्चारत मिरवणारे वैदर्भीय मोकळेढाकळे, वेगळेपण स्वभावात असणारे दिनकरराव आयुष्यभर कलंदरीवृत्तीने जगले. शासकीय सेवेत चांगली ग्रामसेवकाची नोकरी सुमारे ५० वर्षांपूर्वी त्यांना चालून आली आणि त्यांनी ती स्वीकारलीही. मात्र, त्या नोकरीत मन रमले नाही आणि बालनाटय़ाच्या क्षेत्रात लक्षवेधी धडपड करण्याच्या उर्मीने दिनकरराव नागपुरात परतले.

    महाराष्ट्र, लोकमत, नागपूर पत्रिका अशा विविध दैनिकात पत्रकारिता करत विशेषत: बालनाटय़ लेखनाच्या क्षेत्रात दिनकररावांनी अजोड कामगिरी बजावली. सुधा करमरकर यांच्या लिटल थिएटर्सनी दिग्दर्शित केलेले दिनकररावांचे ‘हं हं आणि हं हं हं’, हे बालनाटय़ सत्तरीच्या दशकात खूपच गाजले. ‘बहरले झाड सोन्याचे’, ‘देव भावाचा भुकेला’, ‘जंगलातील वेताळ’ आणि ‘बं बाबू हो बं बाबू’ या त्यांच्या बालनाटय़ांनी त्या काळात बालरंगभूमी अक्षरश: उजळून टाकली होती. बालनाटय़ हा दिनकररावांचा खऱ्या अर्थाने श्वास होता.

    बालनाटय़ाच्या रंगमंचावर लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, अभिनय आणि लहान मुलांची मानसिकता अशा विविध पैलूंचा दिनकरराव साकल्याने विचार करत असत. आणि त्याप्रमाणे सादरीकरण करवून घेत. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात बालनाटय़कार म्हणून त्यांची कामगिरी अतुलनीय समजली जाते. त्यांच्या या कामगिरीचा सन्मान म्हणूनच ठाण्यात भरलेल्या अखिल भारतीय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली होती. बालनाटय़ लेखनासाठीचा राज्य शासनाचा राम गणेश गडकरी हा वाङ्मय पुरस्कार दोन वेळा मिळवणारे दिनकरराव हे एकमेव बालसाहित्यिक होते.

    सुमारे १०० बालनाटय़ांसह मोठय़ांसाठीही त्यांनी कथा, कादंबऱ्या अशी विपुल साहित्य निर्मिती केली. नागपूर पत्रिका या दैनिकात वऱ्हाडी शैलीत त्यांनी रंगवलेली ‘इब्लिस माणसं’ आजही वाचकांच्या स्मरणात आहेत. पत्रकार म्हणून दिनकर देशपांडे यांनी लौकिक प्राप्त केला तो त्यांच्या निष्कपट स्वभावामुळे. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक माणसाची खास वऱ्हाडी इब्लिश शैलीत दिनकररावांनी सातत्याने भोचक फिरकी घेतली मात्र, पत्रकारिता करताना त्यांनी कधीही कुणाला दुखावले नाही. तो त्यांचा स्वभावच नव्हता आणि त्यामुळेच समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचा अफाट असा लोकसंग्रह होता.

    समाजाच्या कोणत्याही क्षेत्रातील नेत्याने मन मोकळे करताना एका अर्थाने दिलेल्या कबुलीजबाबाचा साधा उच्चारही कधी दिनकरराव देशपांडे यांनी केला नाही. पत्रकारितेत अतिशय परोपकारी सहकारी म्हणून ते ओळखले जात. सहकारी पत्रकारांच्या अडीअडचणीच्या, दु:खाच्या क्षणी धावून जाणे हे दिनकररावांचे जणू व्रतच होते. त्यामुळे अनेक पत्रकारांच्या कौटुंबिक आयुष्यातही दिनकररावांना मानाचे स्थान होते.

    अत्यंत लोकप्रिय बालनाटककार, यशस्वी साहित्यिक आणि हेवा करावा असा अफाट लोकसंग्रह असणारा पत्रकार अशी श्रीमंती असणारे दिनकरराव अतिशय साधेपणाचे जीवन जगले. लौकिकाधारित श्रीमंतीच्या भरवशावर त्यांनी ना कधी कोणाकडून कशाची अपेक्षा ठेवली किंवा कोणाकडून काही तरी मागणी कोणा नेत्या वा श्रीमंत परिचिताकडे केली. नाटय़लेखनावर आटोकाट निष्ठा ठेवत आणि कलंदरी वृत्तीने पत्रकारिता करत जगण्याचा हा साधेपणा दिनकररावांनी व्रतस्थपणे शेवटपर्यंत जपला.

  • मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी भा. रा. तांबे

    मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी भा. रा. तांबे यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८७४ रोजी मध्य प्रदेशातील मुगावली येथे झाला.

    भा.रा.तांबे हे मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी म्हणून प्रसिद्ध होते. केशवसुत यांच्यानंतरचे मराठीतील महत्वाचे कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. भा.रा.तांबे यांचे संपूर्ण नाव भास्कर रामचंद्र तांबे असे होते. ते ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी होते. म्हणून राजकवी तांबे या नावानेही ते ओळखले जातात. भा.रा. तांबे यांच्या कवितेचे वैशिष्ठय म्हणून आपणास त्यातील गेयता व भावमधुरता या गुणांचा उल्लेख करता येतो. त्यांनी आपल्या कवितांमधून जीवनाचे निर्दोष व आनंदी असे वर्णन केले आहे. म्हणून त्याच्या कवितेस संतुष्ट कविता असे यथार्थतेने संबोधता येईल.
    बालगीत व नाटयगीत हे काव्यप्रकारही त्यांनी तितक्याच समर्थपणे हाताळले व लोकप्रिय केले.

    त्यांच्या ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ‘मधु मागशी माझ्या सख्या परी’ ‘कळा ज्या लागल्या जीवा’ ‘रुद्रास आवाहन’ ‘रुणझुणू ये’ यांसारख्या कविता स्मरणात राहतील अशाच आहेत. भा.रा.तांबे यांचे निधन ७ डिसेंबर १९४१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • आग्रा घराण्याचे गायक पं.दिनकर कैकिणी

    वयाच्या सातव्या वर्षी दिनकर कैकिणी यांनी एका संगीत सोहळ्यात उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद फैय्याज खान व उस्ताद अब्दुल करीम खाँ या तीन संगीत दिग्गजांचे गाणे ऐकले. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला. उस्ताद फैय्याज खानांचे गाणे ऐकल्यावर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तिथेच संगीत कलेची साधना करण्याचा व फैय्याज खानांच्या गायनशैलीला आत्मसात करण्याचा निश्चय केला.

    त्यांचे प्रथम संगीत गुरू पतियाळा घराण्याचे पं. के. नागेश राव हे होते. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे ग्वाल्हेर घराण्याच्या पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडे संगीत शिक्षण घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी लखनौच्या मॉरिस कॉलेजात (भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयात) प्रवेश घेतला. तिथे त्यांना पं. विष्णू नारायण भातखंडे व उस्ताद फैय्याज खान यांचे शिष्य पं. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. ह्या अतिशय कठीण प्रशिक्षणात एस. सी. आर. भट्ट, चिदानंद नगरकर, के. जी. गिंडे यांसारख्या आपल्या अन्य सहाध्यायांबरोबर कैकिणींनी संगीताचा कसून अभ्यास केला. त्याचा परिणाम म्हणूनच की काय, इ.स. १९४३ मध्ये त्यांना संगीतातील पदवीसोबत ख्याल गायनासाठी मानाचे समजले जाणारे भातखंडे सुवर्णपदक प्राप्त झाले.

    त्यांनी १९४६ साली आपले संगीत कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. एक गायक व संगीत प्रशिक्षक म्हणून त्यांनी देशोदेशींचे दौरे केले. संगीत क्षेत्रात त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली. इ.स. १९५४ सालापासून त्यांनी आकाशवाणीवर सुरुवातीस रचनाकार व नंतर निर्माता म्हणून काम पाहिले. ते भारताच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या प्रबंध विभागाचे सहायक संचालक होते. त्यानंतर ते दीर्घ काळासाठी मुंबई येथील भारतीय विद्या भवन च्या संगीत व नृत्य शिक्षापीठाचे प्राचार्य पदी नियुक्त होते. अनेक वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांचा समावेश होता, तसेच विविध परीक्षा मंडळांतही त्यांचा सहभाग होता. १९७४ साली भारत सरकारतर्फे त्यांना युगोस्लाव्हिया आणि पूर्व जर्मनी येथे पारंपरिक भारतीय संगीत या विषयाचे अभ्यासक म्हणून पाठवण्यात आले होते. तेथील विद्यापीठांमध्ये तसेच सांस्कृतिक केंद्रांमध्ये त्यांनी आपली कला सादर करण्याबरोबरच व्याख्यानेही दिली होती.

    कैकिणींनी ख्याल, ध्रुपद, धमार, ठुमरी व भजन शैलींत शेकडो नवीन रचना केल्या व अनेक नवे राग बांधले. त्यांनी समूह गायनासाठीही विविध रचना बांधल्या, 'मीरा' (१९७९) या चित्रपटात पार्श्वगायन केले, तसेच पंडित रविशंकर यांच्या सहयोगाने 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' ह्या बॅले नृत्यनाटिकेला संगीत दिले.

    त्यांनी बंदिशींवर 'रागरंग' नावाचे पुस्तकही लिहिले आहे. स्वरचित राग आणि बंदिशींवरील त्यांच्या ध्वनिमुदिकाही प्रकाशित झाल्या आहेत. संजीवनी भेलांडे, आरती अंकलीकर-टिकेकर, उदित नारायण, निषाद बाक्रे, सुधींद भौमिक यांसारखे शिष्य त्यांनी घडवले आहेत. गायक, संगीतकार आणि गुरू अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या. मा.कैकिणींचे सर्व कुटुंब संगीत साधनेत आहे. त्यांच्या पत्नी शशिकला ह्या नभोवाणी गायिका होत्या व भवन्स संगीत व नृत्य महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाल्या. त्यांचे धाकटे पुत्र योगेश साम्सी हे नामवंत तबला वादक असून त्यांच्या कन्या आदिती कैकिणी उपाध्या या शास्त्रीय संगीत गायिका आहेत. सुप्रसिध्द गायक पं. दिनकर कैकिणी यांचे सुपुत्र असलेले योगेश सम्सी यांनी उस्ताद अल्लारखॉं यांचेकडे २३ वर्षे तबल्याची तालीम घेतली आहे. आजवर अनेक ज्येष्ठ गायकांना यशस्वी साथ संगत केली आहे. तसेच अनेकवेळा स्वतंत्र तबदा वादनाचे कार्यक्रमही केले आहेत.पं.दिनकर कैकिणी यांचे २३ जानेवारी २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • रशियन टेनिस स्टार अ‍ॅना कुर्निकोव्हा

    अ‍ॅना कुर्निकोव्हाची गणना सर्वाधिक ग्लॅमरस खेळाडूंमध्ये होते. वयाच्या १५ व्या वर्षीपासूनच तिचे लाखो चाहते आहेत. एकही सिंगल्स किताब जिंकू न शकलेली अ‍ॅना तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत होती. अर्थात डबल्सची दोन ग्रँडस्लॅम तिच्या नावावर आहेत.

  • मजरुह सुलतानपुरी

    आझमगड गावात एक तरुण हकिमीचा व्यवसाय करायचा. याला शायरीची मनापासून आवड. अडल्यानडल्या रुग्णांची सेवा करताना याची शायरी सुरूच असायची. याच्या शायरीच्या जादूने रुग्णाचा निम्मा आजार कमी व्हायचा. या शायरीच्या वेडातूनच हसरालूल हसन पुढे मजरुह सुलतानपुरी झाला. मजरुह म्हणजे जखमी किंवा घायाळ करणारा. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी सुलतानपूर उत्तर प्रदेश येथे झाला. मजरुहच्या गीतांनी रसिकांना प्रेमळ जखमा दिल्या. त्याच्या गीताच्या जादूने कर्णसेनांना घायाळ केले. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ए. आर. कारदार यांनी एका मुशायर्याात हसन यांची शायरी ऐकली. त्या वेळी ते ‘शहाजहान’ चित्रपटाच्या निर्मितीत होते. त्यांनी हसन ऊर्फ मजरुह सुलतानपुरीला गीतलेखन करण्याची ऑफर दिली. मजरुह यांनी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मजरुहने लेखणी उचलली आणि कागदावर शब्द उमटवले... ‘गम दिये मुस्तकिल, कितना नाजूक है दिल... ये न जाना... हाये हाये ये जालिम जमाना.’ ‘शहाजहान’चे संगीतकार नौशाद यांनी वाहवा केली. नौशाद यांनी त्या खुशीतच चाल बांधली. पुढे कुंदनलाल सैगल यांच्या दर्दभर्या. आवाजाने मजरुह यांच्या शब्दाला आगळे गहिरेपण दिले. मजरुह यांच्या या पहिल्या गीतरूपी रेशमी बाणाने रसिकांना घायाळ केले. हे कमी की काय, म्हणून मजरुहने पुढील गाण्यांची सुरुवात केली, ‘जब दिल ही टूट गया, हम जी कर क्या करे...’ तिच्या एका नकाराने, सर्वस्व हरपल्याची भावना मजरुह यांनी अशी व्यक्त केली. सैगलच्या आवाजातला या शब्दांतला दर्द काळीज पिळवटणारा ठरला. मजरुह यांच्या घायाळ करणार्यां कारकीर्दीचा प्रारंभच असा धडाक्यात झाला. साध्या, सोप्या परंतु काळजाला भिडणार्याय शब्दांची सुरेख गुंफण ही मजरुह यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये. पर्शियन शब्दांचा समर्पक वापर त्यांनी चपखलपणे केला. याच वैशिष्ट्यांमुळे चार पिढ्या त्यांच्या गीतांच्या चाहत्या बनल्या. मजरुह यांच्या ‘शायराना’ स्वभावामुळे जवळपास सर्वच संगीतकारांबरोबर त्यांचे सुरेल नाते जमले. ‘शहाजहान’मध्ये काळीज चिरणारे वर्णन करणारी त्यांची लेखणी ‘आरपार’च्या वेळी मात्र प्रेमळ आणि हळवी झाली. तो आणि ती यांच्या नजरेच्या भाषेला, ‘कभी आर कभी पार लागा तीर ए नजर...’ असा रेशमी बाणाचा उपमात्मक आविष्कार झाल्यानंतर ‘बाबूजी धीरे चलना...’मधून प्रेमात कशी जपून पावले टाकायची, याची एवढी मधाळ जाणीव मजरुहच देऊ जाणे. मग ओपींचे ठेकेदार संगीत आणि मजरुह यांचे शब्द यांची कानसेनांना भुरळ पाडणारी जुगलबंदी सुरू झाली. ‘सीआयडी’मध्ये याचा प्रत्यय आला. ‘लेके पहला पहला प्यार...’ अशी प्रेमाची ग्वाही असो, ‘कहीं पे निगाहे कहीं पे निशाना...’मधली सूचकता असो, ‘आँखों ही आँखों में इशारा हो गया...’मधला जीवन जगण्याचा मार्ग असो; मजरुह यांच्या गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यानंतर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या ‘दोस्ती’ला मजरुह यांच्या गीतांनी जो अर्थ प्राप्त झाला, त्याला तोडच नव्हती. ‘चाहूंगा मैं तुझे साँज सबेरे’, ‘मेरी दोस्ती मेरा प्यार...’, ‘राही मनवा दुख की चिंता...’ या गाण्यांनी इतिहास रचला. त्यानंतर मजरुहची जोडी जमली ती चतुरस्र आरडी बर्मनबरोबर. ‘ओ मेरे सोना...’, ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा...’(तीसरी मंजिल), ‘पिया तू अब तो आजा...’, ‘चढती जवानी...’, ‘कितना प्यारा वादा...’, ‘दिलबर दिल से प्यारे...’, ‘गोरिया कहां तेरा देस रे...’(कांरवा), ‘चुरा लिया है...’, ‘लेकर हम दीवाना दिल...’, ‘आपके कमरे मे...’, ‘मेरीसोनी...’(यादों की बारात), ‘क्या हुआ तेरा वादा...’, ‘बचना ए हसीनों...’, ‘चांद मेरा दिल...’, ‘ए लडका हाय अल्ला...’

    (हम किसीसे कम नहीं), ‘निसुल्ताना रे...’, ‘तुम बिन जाऊं कहां...’(प्यार का मौसम),
    ‘होगा तुम से प्यारा कौन...’, ‘पूछो ना यार क्या हुआ...’(जमाने को दिखाना है) ही या कॉम्बिनेशनची कामगिरी.

    आनंद-मिलिंद, जतीन-ललित यांच्या संगीताने नटलेली मजरुह यांची अनेक गाणी गाजली.अष्टपैलुत्व हे त्यांच्या लेखणीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. चित्रपटातील सिच्युएशननुसार गीतलेखन करण्यात मजरुह यांचा हातखंडा. ‘तेरे मेरे मिलन की रैना...’(अभिमान)मधला भाव वेगळा, तर ‘जाइए आप कहां जायेंगे...’(मेरे सनम)मधला लडिवाळ गोडवा पुन:पुन्हा ऐकावासा वाटणारा. ‘रात अकेली है...’(ज्वेल थीफ)मधले आव्हान कानाला सुखावणारे, तर ‘रहे ना रहे हम...’(ममता) मधले औदासीन्य विचार करायला लावणारे. प्रत्यक्ष आयुष्यात ते नौशाद यांचे व्याही होते, पण सिनेमाच्या सुवर्णयुगात या दोघांनी एकत्र काम केलेच नाही. अंदाज (१९९४) नंतर तब्बल २० वर्षांनी साथी (१९६९) मध्ये ते एकत्र आले. कारकीर्दीच्या प्रारंभीच्या काळात कम्युनिस्ट चळवळीत भाग घेणार्याब मजरुह यांनी एकदा पंडित नेहरूंबद्दल अनुदारात्मक काव्य केले. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासही झाला. मजरुह सुलतानपुरी हे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे पहिला गीतकार! मजरुह सुलतानपुरी यांचे २४ मे २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मजरुह सुलतानपुरी यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=-I30pxUvaX0
    https://www.youtube.com/watch?v=due-RD_qP9o

  • डॉ. प्रभाकर भानुदास मांडे

    लेखक, समीक्षक आणि लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर भानुदास मांडे यांचा जन्म १६ डिसेंबर १९३३ रोजी झाला.

    लोककथा व लोकगीते यांचा विपुल संग्रह असणार्‍या मांडे यांनी “लोकसाहित्याचे अंत:प्रवाह, गावगाड्याबाहेर, सांकेतिक आणि गुप्त भाषा, परंपरा व स्वरुप, दलित साहित्याचे निराळेपण” या पुस्तकांसह “महानुभवीय पद्यपुराण, लोकरंगकला आणि नागर रंगभूमी अशी संपादने केली.

    ## Dr Padmakar Bhanudas Mande