जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मराठी संगीतातील सुधीर फडके तथा बाबूजी या अजरामर नावाचा वारसा समर्थपणे पेलणारे गायक आणि संगीतकार म्हणजे श्रीधर फडके. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९५० रोजी झाला. गीत-कवितेतील अर्थाला, शब्दांतील सौंदर्याला अधोरेखित करण्याची सुधीर फडके यांची गायनशैली श्रीधर फडके यांनी जाणीवपूर्वक आत्मसात केली असली तरी त्यांनी स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांना घरचा समृध्द वारसा असला तरी संगीतकार किंवा गायक व्हायचं असं काही त्यांनी ठरवलेलं नव्हतं. पितृसहवास हा मौलिक ठेवा असला तरी त्यांच्या लहानपणी गाण्याशी त्यांचा संबंध ऐकण्यापुरताच होता. आधी शिक्षण पुरं कर असं वडिलांनीच बजावलं होतं.
मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातून फिजिक्स व इलेक्ट्रॉनिक्स या विषयांत एम.एस्सी. केल्यावर ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले व त्यांनी न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटर सायन्स या विषयात एम.एस. पदवी संपादन केली. त्यांच्या संगीत-प्रवासाला आरंभ झाला अमेरिकेतच. कॅम्लिन कंपनीच्या मालती दांडेकर अमेरिका भेटीवर आल्या होत्या. त्यांनी श्रीधर फडके यांना हरिपाठाचं पुस्तक दिलं व 'देवाचिया व्दारी, उभा क्षणभरी....' या अभंगाला चाल लावण्याची विनंती केली. त्याप्रमाणे मा.श्रीधर फडके यांनी चाल बांधली व तेथेच, कोलंबिया विद्यापीठातील कार्यक्रमात खुद्द सुधीर फडके यांनी त्या चालीवर तो अभंग गायला. 'तो आपल्या आयुष्यातील जपावासा वाटलेला क्षण' असं श्रीधर फडके म्हणतात.
लक्ष्मीची पाऊले या चित्रपटातील “फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश” हे गीत त्यांनी लावलेल्या चालीमुळे लोकप्रिय झालं.
सुधीर मोघे यांनी लिहिलेलं हे गीत ’बाबुजी’ (सुधीर फडके) व आशा भोसले यांनी गायलं होतं. संगीत हा श्रीधर फडके यांचा व्यवसाय नसल्यानं त्यांनी कधी तडजोड केली नाही. सवंगपणाला बळी पडून त्यांनी कधी रतीब घातला नाही किंवा चालींच्या जिलब्या पाडल्या नाहीत. त्यांना कवितेची सखोल जाण आहे. ‘मन मनास उमगत नाही ’ ही ग्रेस यांची कविता. त्यांनी पहिल्या चार ओळींना चाल लावली. पण पुढील ओळींचा अर्थ उमगेना. तेव्हा त्यांनी आपल्या चालीचं घोडं तसंच पुढ दामटलं नाही तर त्यांच्या आवडत्या कवीपैकी एक असलेले सुधीर मोघे यांना आपली अडचण सांगून चाल लावलेल्या ओळी ऐकवल्या आणि 'तुम्हाला या ओळींच्या आधारे काही सुचलं तर पाहा' असं सुचवलं. सुधीर मोघे सिध्दहस्त कवी, त्यांनी श्रीधर फडके यांची विनंती मान्य केली व पुढील ओळी लिहून दिल्या.
स्वप्नातील पदर धुक्याचा
हातास कसा लागावा
आधार कसा शोधावा
मन मनास उमगत नाही.
श्रीधर फडके यांच्या तळमळीला मोघे यांनी सृजनात्मक प्रतिसाद दिल्यानं एका सुरेल गीताचा जन्म झाला. कवितेवर असं कलम करून घेण्याची किमया मा.श्रीधर फडके यांनी आणखी एकदा घडवून आणली. वैद्य यांच्या पुढील ओळी श्रीधर फडके यांना फार भावल्या त्या अशा...
कुठे जातात भेटून
कशा होतात ओळखी
आणि आपली माणसे
कशी होतात पारखी
या ओळीदेखील फडके यांनी सुधीर मोघे यांना ऐकवल्या व पुढील ओळी लिहून देण्याची विनंती केली. त्यानुसार मोघें यांनी पुढील ओळी रचल्या....
कुण्या देशाचे पाखरू
माझ्या अंगणात आले
त्याचे पंख परदेशी
परी ओळखीचे डोळे
श्रीधर फडके यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नसले तरी त्यांच्या अनेक चाली रागांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ ओंकार स्वरूपा (बैरागी भैरवी),ऋतू हिरवा(चारुकेशी), फिटे अंधाराचे जाळे(मिश्र भैरवी), सांज ये गोकुळी(पूर्वाकल्याण व यमनकल्याण), मी राधिका, मी प्रेमिका (मधुकंस).
एखादं गाणं आवडलं की चाल लावण्यासाठी झगडणं काही तासांपासून ते सहा महिन्यांपर्यंत असू शकतं असं श्रीधर फडके म्हणतात.‘ मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद ’ या एकनाथांच्या अभंगाला चाल सुचायला सहा महिने लागले. एकदा तर गंमतच झाली. कविवर्य ग्रेस यांच्या ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी ’ या कवितेला चाल लावायची होती. त्या दिवशी ते पुण्यात होते, दिवसभरात काही सुचलं नाही. पण मुंबईला परतायच्या प्रवासात पनवेलच्या आसपास चाल मनात दाटून आली. ती हरवू नये , सांडू नये म्हणून श्रीधर फडके ती चाल मुंबईला पोचेपर्यंत गुणगुणत राहिले. प्रत्येक चालीची कुंडली वेगळी असते असं सांगून फडके म्हणतात, “ अंतरा व मुखडा या प्रमाणे त्यांतील नि:शब्द जागाही एकाच लयीत गुंफण आवश्यक आहे. त्यामध्ये त्रुटी राहिल्या तर छोटया तुकड्या तुकड्यांत गाणं ऐकल्याचा भास निर्माण होतो. गाणं कसं असावं, चाल कशी बांधावी, उत्तम चाल कशी असावी हे मी बाबुजींकडून शिकलो.”
श्रीधर फडके यांनी सतरा ध्वनिफितींचे संगीत दिग्दर्शन केले आहे. त्यांपैकी मनाचे श्लोक , ओंकार स्वरूपा, अवघा विठ्ठलु, ऋतू हिरवा या ध्वनिफिती/ सीडीज यशस्वी झाल्या, त्याबद्दल त्यांना प्लॅटिनम डिस्क प्रदान करण्यात आली. स्वत:चं खास तंत्र व गायनशैली विकसित केलेल्या श्रीधर फडके यांनी अभंग, भावगीतं, भक्तिगीतं, विराण्या, गजल, नाट्य संगीताचा बाज असलेली गाणी असे अनेक प्रकार लीलया सादर केले आहेत. त्यांना ‘वारसा लक्ष्मीचा’ या चित्रपटासाठी ‘पुत्रवती’ या चित्रपटासाठी, ‘लेकरू’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे .मा.श्रीधर फडके यांनी आत्ता पर्यंत अठरा मराठी चित्रपटांचे व एका हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन, सतरा ध्वनिफितींचे संगीत दिग्दर्शन, ३ मराठी व ११ गुजराथी नाटकांचे व पाच दूरदर्शन मालिकांचे संगीत दिग्दर्शन केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. अशोक जैन / थिंक महाराष्ट्र
श्रीधर फडके यांनी गायलेली, संगीत दिलेली काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=GKOEi9p_VaM
https://www.youtube.com/watch?v=BMNQF1OfHWQ
https://www.youtube.com/watch?v=AqH-TkK9NSk
https://www.youtube.com/watch?v=7T8PqtOGsLI&t=1096s
https://www.youtube.com/watch?v=1V2pB9KCidE&t=287s
September 9, 2018
स्वातंत्र्यसैनिक सौ. कुमुद नाचणे ही ठाण्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर कै. बाळासाहेब गुप्ते ह्यांची कन्या. त्यांनी समाजवादी महिला सभेचे काम पुष्कळ वर्षे केले
June 1, 2010
उपेक्षित स्त्रियांचे शिक्षण व स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार आणि अनिष्ठ रूढी विरोधात अखंड संघर्ष करणार्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक, दलितांचे उद्धारक व सत्यशोधक समाजाचे नेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्या धर्मपत्नी. १८४० साली त्यांच्या वयाच्या ८ व्या वर्षीच त्यांचा ज्योतिबांशी विवाह झाला.
February 2, 2010
वैजयंतीमाला यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरवात तामिळ भाषेतील ” वड़कई ” या चित्रपटापासून केली.
August 30, 2021
त्यांनी अभिनयासोबत काही चित्रपटांचे दिग्दर्शक व निर्माती पण केली होती. त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. त्यांनी बंगाली भाषेमधील चित्रपटांशिवाय काही हिंदी चित्रपटांमधूनही त्याने अभिनय केला. १९५३-१९७५ या काळात बंगाली चित्रपटांत उत्तम कुमार यांची सुचित्रा सेन यांच्यासोबत त्यांची जोडी चांगली जमली होती आणि या जोडीचे अनेक चित्रपट गाजले. अभिनेते उत्तमकुमार यांच्यासमवेत सुचित्रा सेन यांनी ३० चित्रपट केले होते.
उत्तम कुमार यांनी २५० हून अधिक चित्रपटांत अभिनय केला. अमानुष, छोटीसीमुलाकात,आनंद आश्रम हे त्यांचे हिंदी चित्रपट खूप गाजले.चित्रपटातील योगदानासाठी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला. उत्तमकुमार यांचे २४ जुलै १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
September 3, 2017
एकापेक्षा अधिक परिचितांचे आकस्मिक मृत्यू एकाच दिवशी घडावेत हा कुयोग अलीकडच्या काळात परवाच्या मंगळवारी दुसऱ्यांदा घडून आला. दीनदयाळ शोध संस्थानचे संस्थापक नानाजी देशमुख आणि रा. स्व. संघाचे भूतपूर्व बौद्धिक विभाग प्रमुख डॉ. श्रीपती शास्त्री गेले तेव्हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात पहिल्यांदा, आणि ज्येष्ठ गायक कै. सुधीर फडके यांच्या पत्नी ललिता फडके आणि ज्येष्ठ पत्रकार वि. ना. देवधर यांचे निधन झाले तेव्हा दुसऱ्यांदा.
देवधर लोकसत्ता परिवाराला जवळचे होते, कारण ज्येष्ठ सहसंपादक या नात्याने त्यांनी आपल्या वृत्तपत्र कारकीर्दीतली काही वर्षे ‘लोकसत्ता’त व्यतीत केली होती. देवधर तसे मूळचे पुण्याचे, शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांचा वृत्तपत्र व्यवसायाशी संबंध आला तो वृत्तपत्राचे गठ्ठे पोचवण्याच्या निमित्ताने. लेखनाची आवड असल्याने आणि श्री. म. माटे यांच्याकडे लेखनिक म्हणून उमेदवारी केली असल्याने लेखणीला आणि भाषेला जे वळण लागले होते, त्याच्याच आधाराने देवधर बातमीदारीत आले. ‘दैनिक भारत’ आणि ‘केसरी’त त्यांनी बातमीदारी सुरू केली आणि त्याच अनुभवावर मुंबईतून ‘महाराष्ट्र टाइम्स’ सुरू होताच देवधर तिथे रुजू झाले.
आर्थिक आणि राजकीय विश्लेषण ही देवधरांच्या बातमीदारीतली खासियत राहिल्याने काही काळ मुंबईत विधिमंडळाचे आणि नंतर दिल्लीत संसदेचे रिपोर्टिग त्यांनी केले. ‘राजधानीतून’ हे त्यांचे दिल्लीच्या बातमीदारीविषयीचे लेखन गाजले. त्याने दिल्लीच्या बातमीदारीचा एक नवा पायंडा पाडला. देवधर राजकीय विश्लेषण जेवढे निष्पक्षपणे आणि मार्मिक करीत, तेवढेच ते पडद्यामागच्या घटनांवर, बातमीमागच्या बातमीवर तिरकस आणि खोचक शैलीत लिहीत. ‘भेळ-शहाळी’ हे त्यांचे सदर त्यामुळेच अनेकांच्या स्मरणात राहिले. आणीबाणी उठताच देवधर ‘महाराष्ट्र टाइम्स’ सोडून पुण्याच्या ‘तरुण भारत’मध्ये संपादक म्हणून रुजू झाले.
अवघ्या पाच वर्षांच्या तिथल्या कारकीर्दीत त्यांनी आपल्या समर्थ लेखणीने जनसामान्यांवर ‘तरुण भारत’चा वेगळाच ठसा उमटवला. देवधर हिंदुत्ववादी होते, पण त्यांचे हिंदुत्व हिंदुत्ववादी विचारधारेबाहेरच्या वाचकालाही मोहित करीत राहिले. देवधर हिंदुत्वाच्या विचारधारेत वाढले, आपल्या विचारांशी, निष्ठांशी आयुष्यभर घट्ट राहिले, त्या विचारधारेतल्या मुखंडांनी त्यांची अवहेलनाही केली. स्वाभाविकपणेच त्यांच्याशी मतभेदही झाले, पण तरीही त्यांनी ध्येयवादावरची अतूट निष्ठा मात्र ढळू दिली नाही. विचारधारेचे, चळवळीचे पुरस्कर्तेपण त्यांनी जपले, पण ते जपताना बातमीचे, लेखणीचे पावित्र्य कुठेही कमी होऊ दिले नाही. सरकारी सवलती उपटणे, बातमीच्या पाटय़ा टाकणे, गोट गाठणे, कार्बन कॉपी जर्नालिझम करणे या वाटांना देवधरांची पत्रकारिता जाणे शक्यच नव्हते.
अभ्यासू वृत्ती जोपासत, व्यासंगाची सवय राखत, बातमीचे पावित्र्य जपत देवधरांनी, पत्रकारिता धर्माचे पालन केले. पत्रकार संघटनांमध्येही देवधरांनी काम केले. देवधरांची पत्रकारिता गतिमान होती, अष्टावधानी होती. निवृत्तीनंतरही देवधर पत्रकारितेतच सक्रिय राहिले आणि अन्य वृत्तपत्रांकरिता स्तंभलेखन, अग्रलेख लेखन करीत राहिले. प्रकृतीने साथ दिली असती तर पत्रकारितेच्या अध्यापनाबरोबरच नव्या पिढीतील पत्रकारही ज्ञानी, कृतिशील आणि बहुआयामी बनावेत यासाठी ते कार्यरत राहिलेले दिसले असते.
यशवंतराव चव्हाणांच्या एका पत्रकार परिषदेत केवळ त्यांना आलेल्या दूरध्वनीवरून देवधरांनी शोधून काढलेली यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री होणार असल्याची बातमी, त्यांच्या निरीक्षण, विश्लेषण क्षमतेचे कौशल्य दाखवणारी ठरली होती. ती बातमी देणारे ते पहिलेच मराठी पत्रकार ठरले होते. पत्रकार परिषदेदरम्यान आलेला तो दूरध्वनी सुरू असताना देवधरांनी टिपलेले चव्हाणांच्या मुद्रेवरचे भाव, चव्हाणांनी दूरध्वनीवरूनच दिलेली मोघम उत्तरे, त्यांची देहबोली, त्यांच्या बोलण्यात आलेला ‘संरक्षण’ हा एकमेव शब्द यावरूनच देवधरांनी बेधडकपणे यशवंतराव संरक्षणमंत्री होऊ घातले असल्याचा अंदाज वर्तवला होता आणि तो अचूक ठरला होता. अशी अचूक निष्कर्षशक्ती असणाऱ्या देवधरांनी नुकतेच ८१ व्या वर्षांत पदार्पण केले होते.
प्रकृती साथ देत नव्हती, पण प्रकृती अशी एकाएकी दगा देईल असेही वाटत नव्हते, अशा क्षणीच त्यांचे जाणे झाले आहे. ते खचितच धक्का देणारे आहे.
September 26, 2018
झैल सिंग यांना ब्रिटिश शासनाने तुरुंगात डांबले. सुटका झाल्यानंतर ते भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी फरीदकोट संस्थानात समांतर शासन स्थापन करून शेतमजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चळवळही उभी केली.
October 29, 2023
८० च्या दशकातील लोकप्रिय टीवी मालिका ‘महाभारत’ सुरु होताना महेंद्र कपूर यांच्या आवाजातील ‘महाभारत’चे टाइटल सॉंग व नंतर ‘मैं समय हूं’ हा आवाज हरीश भिमाणी यांचा होता. ‘मैं समय हूं’ हे इतके लोकप्रिय झाले होते मालिका सुरु होताना लहान मुले ही हे सुरात म्हणत असत.
February 15, 2022
लेखक, समीक्षक डॉ. अक्षयकुमार मल्हारराव काळे यांचा जन्म २७ जुलै १९५३ रोजी झाला.
“स्वातंत्र्योत्तर मराठी काव्यातील प्रवाह” या विषयावर त्यांनी पी.एच.डी. मिळवली असुन “सूक्तसंदर्भ”, “गोविंदाग्रज समीक्षा” ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याखेरीज, त्यांचे सुमारे १०० समीक्षालेख विविध ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत.
## Dr. Akshaykumar Malharrao Kale
July 31, 2017
आपलं ठाणे बहुआयामी व्यक्तीमत्वांची मांदियाळीच! अशी अनेक व्यक्तीमत्व आपल्या ठाण्यात आहेत ज्यांनी आपल्या कार्यातनं आणि कर्तृत्वातनं आपली वेगळी ओळख जगासमोर ठेवली. असंच ठाण्यातलं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त जनसंपर्क अधिकारी
November 17, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti