(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • स्मिता पाटील

    स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुणे इथे झाला. रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील हिचं चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटीलने विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या.

    स्मिता पाटील ह्यांचा झाला. राष्ट्रसेवादलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिताने दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील 'बातमीदार' या नात्याने केली. छोटया पडद्यावरुन या भूमिकेवरुन तिचे सुप्त गुण हेरुन श्याम बेनेगल या समर्थ दिग्दर्शकाने तिला 'निशांत' आणि 'चरणदास चोर' या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या मंथन' आणि 'भूमिका' या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. यातील कसदार अभिनयामुळे स्मिताला कलात्मक चित्रपट सृष्टीत मान्यता मिळालीच आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला.

    'मंथन मधून स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला. त्याचप्रमाणे हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित 'भूमिका ' मधून तिने पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणार्यात स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या. वास्तविक हिंदी चित्रपटांमधुन प्रामुख्याने पारंपारिक स्त्री प्रतिमाच चितारल्या गेल्या. तरीही स्मिता पाटीलच्या उदयापूर्वी वहिदा रेहमान, नुतन , सुचित्रा सेन यांनी या चाकोरी पलीकडल्या काही प्रतिमा उभ्या केल्या.

    स्मिता पाटीलने ही धारा आपल्या अभिनय सामर्थ्याने दृढ केली आणि पुढेही नेली. दलित, शोषित स्त्रियांच्या, बंडखोर स्त्रियांच्या, आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या. याबाबतीत शबाना आझमी या तिच्या समकालीन अभिनेत्रीनेही योगदान केलं आहे. या अभिनेत्रींनी प्रेयसीच्या रुढ झालेल्या प्रतिमांना पर्यायी अशा प्रतिमा सक्षमतेने आविष्कृत केल्या. वेगळया मूल्यचौकटी व निष्ठा घेऊन जगणार्याय अशा व्यक्तिरेखांना या अभिनेत्रींनी एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली. पण मृत्यूनंतरही मास्को, न्यूर्यॉक, फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये तिच्या चित्रपटांचं 'सिंहावलोकन ' झालं.

    आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळणारी ती पहिलीच भारतीय व मराठी अभिनेत्री ठरली. फ्रान्स मध्ये ला रॉशेला शहरातील हाऊस ऑफ कल्चरमध्ये त्यांच्या चक्र, बाजार, मंथन, भूमिका ह्या चित्रपटांचा महोत्सव (रिट्रॉस्पेक्टिव्ह) भरविण्यात आला होता. सत्यजित रायनंतर हा बहुमान स्मिता यांना मिळाला होता. मराठी रंगभूमीवर काम करणारे मा.नाना पाटेकर बॉलीवूडमध्ये आपल्या येण्याचे श्रेय दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिला देतात. मा.नाना पाटेकर म्हणतात हिंदी चित्रपटातील प्रवेश स्मिता पाटील हिच्यामुळेच झाला.

    मी मराठी रंगभूमीवर काम करत होतो. तेथे मी खूश होतो. पण स्मिताने मी हिंदीत प्रवेश करावा म्हणून प्रयत्न केले. मला हिंदीत काम करण्यासाठी प्रवृत्त केले. तिनेच माझे नाव रवी चोप्रा यांना सुचविले आणि मला ‘आज की आवाज’ हा चित्रपट मिळाल्याचे नाना पाटेकर यांनी नुकतेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. स्मिताने केलेल्या ‘फोर्स’मुळे मी इंडस्ट्रीत आलो. ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिच्याबरोबर मी ‘अवाम’ आणि ‘गीद्ध’ या चित्रपटात काम केले होते. स्मिता पाटील यांचे १३ डिसेंबर १९८६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    स्मिता पाटील यांचे काही चित्रपट
    https://www.youtube.com/watch?v=7_IAjinodPo
    https://www.youtube.com/watch?v=TxRk-jbUrrk
    https://www.youtube.com/watch?v=GC6XmwlNwhE
    https://www.youtube.com/watch?v=tuo6F5qUu00
    https://www.youtube.com/watch?v=8L4oq6VKA2U
    https://www.youtube.com/watch?v=gskP5p2Oknc

  • (डॉ.) अनंत फडके

    फडके, (डॉ.) अनंत

    प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ. अनंत फडके यांचे नुकतेच निधन झाले आणि त्यांच्या रूपाने देशातील भूशास्त्रीय वैशिष्टय़ांची जगाला ओळख करून देणारा एक अवलिया आपल्याला सोडून गेला. भारतात अनेक वैशिष्टय़पूर्ण नैसर्गिक, भौगोलिक गोष्टी असल्या तरी त्यांची जागतिक पातळीवर ओळख असतेच असे नाही. कारण आपल्यालासुद्धा त्यांची नेमकेपणाने माहिती नसते, मग जगाची गोष्ट तर लांबचीच! पण काही माणसांच्या प्रयत्नांमुळे ही माहिती जनसामान्यांपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचविणे शक्य झाले.

    भूशास्त्राबाबत हे महत्त्वाचे काम डॉ. फडके यांनी शेवटपर्यंत सुरू ठेवले होते. महाराष्ट्रातील काळय़ा पाषाणाची (बेसॉल्ट) एक ओळख म्हणजे त्यातील पोकळय़ांमध्ये आढळणारी वैशिष्टय़पूर्ण खनिजे! त्यापैकी सर्वात महत्त्वाचा गट म्हणजे ‘झिओलाईट्स’ खनिजांचा! रंगाने, आकाराने आणि एकमेकांमध्ये गुंतलेल्या वैशिष्टय़पूर्ण रचनेने ही खनिजे अतिशय आकर्षक दिसतात. त्यांचे हे आकर्षक स्वरूप जगापर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्यांमध्ये डॉ. फडके यांचा समावेश होता. पण तेवढय़ावरच न थांबता त्यांनी या खनिजांचे संशोधन करून त्याचे गुणधर्म शोधण्याचे आणि वर्गवारी करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यांचे हे कार्य जगभरातील भूशास्त्रज्ञांचे या खनिजांकडे लक्ष वेधण्यास उपयुक्त ठरले. काही दशकांपर्यंत ब्राझीलमधील अशा खनिजांना जगभरातून मागणी होती, पण आता त्यांच्या तोडीस तोड अशी महाराष्ट्रातील अशा खनिजांची गणना केली जाते. त्यांच्या अशा प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी दोन खनिजे नव्याने जगाला माहिती करून दिली. त्याबाबतकाही तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत, पण त्यांची काही वैशिष्टय़े त्यांनी वेगळेपणाने दाखवून दिली. त्यातील एक म्हणजे- केळकराईट! आपले गुरू डॉ. के. व्ही. केळकर यांच्या विषयी आदर व्यक्त करण्यासाठीच त्यांच्या नावावरून या नव्या खनिजाला त्यांनी हे नाव दिले. पुण्यातील वाघोली येथे आढळणारे निळय़ा रंगाचे आकर्षक ‘कॅव्हेन्झाईट’ हे खनिज भारतात आढळत असल्याची पहिली नोंदही त्यांनी केली. नागपूरजवळील ‘सौसर’ नावाच्या रूपांतरित खडकांच्या सखोल अभ्यासाचे श्रेय, तसेच गुजरातमधील राजपिपळा, गरुडेश्वर येथे आढळणाऱ्या माशांचे ठसे शोधून काढण्याचे श्रेयसुद्धा त्यांच्याच नावावर आहे. आपल्याकडील गोष्टींना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इग्लंड अशा अनेक देशांमधील भूशास्त्राच्या परिषदांमध्ये भाग घेतला आणि तिथे अनेक संशोधन प्रबंध वाचले. याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय नियतकालिकांसाठी संशोधनपर लेखनही केले. विविध देशांमधील प्रसिद्ध भूशास्त्रांसोबत एकत्रितपणे काम करूनही त्यांनी आपला हा उद्देश साध्य केला. महाराष्ट्रात आढळणाऱ्या खनिजांचा औद्योगिक वापर करता येईल का, यासाठीसुद्धा डॉ. फडके यांनी संशोधन केले. शीतीकरणाच्या (रेफ्रिजरेशन) प्रक्रियेत ‘क्लिनोप्टोलाईट’चा वापर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशा प्रकारच्या संशोधनात मोठे यश मिळाले नसले, तरी खनिजांच्या या बाजूकडे लक्ष वेधण्यास त्यांचे कार्य निश्चितपणे उपयुक्त ठरले. भूशास्त्रातील खनिजशास्त्र, भूरचनाशास्त्र आणि ज्वालामुखीविज्ञान यांसारख्या विषयांतही त्यांचे योगदान मोठे आहे. १९५०च्या दशकात या विषयांमध्ये संशोधनाला विशेष वाव नसताना त्यांनी धडपड करून हे काम केले. संस्थात्मक पातळीवरही त्यांनी योगदान दिले. पुणे विद्यापीठात भूशास्त्र विभाग वाढविण्यात त्यांचा वाटा होताच, त्याचबरोबर अनेक विद्यार्थी घडविण्यातही त्यांनी हातभार लावला. निवृत्तीनंतरही आयुष्याच्या अगदी शेवटच्या आठवडय़ापर्यंत (वयाच्या ७४व्या वर्षांपर्यंत) ते सक्रिय होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी ‘डेक्कन व्होल्कॅनोलॉजिकल सोसायटी’ची स्थापना केली. त्याद्वारे भूशास्त्र हा विषय सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ते करत होते. त्या दृष्टीने लोणारच्या विवरासंबंधी विस्तृत परिषद भरवून त्यांनी त्याच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. परदेशात तेथील छोटी छोटी भूशास्त्रीय वैशिष्टय़े जपली जातात आणि त्यांची उत्तम प्रकारे नोंद केली जाते. याबाबत आपल्याकडे असलेली उणीव दूर करण्याच्या कामाला डॉ. फडके यांनी सुरुवात केली होती. त्यांच्या निधनामुळे हे कार्य अपूर्ण राहिले आहे. भूशास्त्रातील संशोधक व विद्यार्थ्यांनी हे कार्य पुढे सुरू ठेवले तर तीच खऱ्या अर्थाने डॉ. फडके यांना श्रद्धांजली ठरेल.

  • शॉटगन म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा

    शॉटगन म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म ९ डिसेंबर १९४५ रोजी झाला. शत्रुघ्न सिन्हा हे बिहारच्या उच्च शिक्षित कुटुंबातील सदस्य आहेत. चारही बंधूंची नावे राम, भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण अशी आहेत. वडिलांची इच्छा नसतानाही ते पुण्याला आले होते. फिल्म्स & टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटची प्रवेश परीक्षा तो उत्तीर्ण झाला होते. या संस्थेत राजकपूर भेट द्यायला आले होते. भेटीचा कार्यक्रम उरकल्यावर जाताना त्यांनी शत्रूला त्याच्या मित्रांसह मुंबईला शुटींग पाहण्यासाठी बोलवले. ते तिथे जाऊन त्यांना भेटले. जुहूमधील मा.शत्रुघ्न यांच्या बंगल्याचे नावही ‘रामायण’ आहे. त्यांच्या मुलांची नावे लव आणि कुश आहेत.

    शत्रुघ्न सिन्हा यांनी १९६९ मध्ये `साजन’ चित्रपटाद्वारे सिनेमासृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यांनी आतापर्यंत २०० हिंदी चित्रपटांसह बंगाली आणि पंजाबी चित्रपटांतही काम केले आहे. त्यांच्या सिनेमामधील अनेक डॉयलॉग आजही प्रसिद्ध आहेत. कालीचरण, विश्वनाथ, ब्लॅकमेल, दोस्ताना, शान आणि काला पथर हे त्यांची काही नावाजलेले सिनेमे आहेत. चित्रपटात काम केल्यानंतर सध्या ते राजकारणात कार्यरत असून सध्या बिहार तालुक्यात पाटणा साहिब क्षेत्राचे लोकसभेचे खासदार होते. अभिनेता म्हणून लोकप्रिय झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी राजकारणातही जगन्मैत्री टिकवण्याचा प्रयत्न केला. पत्रकार भारती प्रधान यांनी सुमारे सात वर्षांपर्यंत विविध शहरांमध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांशी चर्चा करून शत्रुघ्न सिन्हा यांच्या जीवन, प्रेम आणि करिअरवर ‘एनिथिंग बट खामोश’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. शत्रुघ्न एका चित्रपटात आपल्या भारदस्त आवाजामध्ये ‘खामोश’ म्हणाले होते. तेव्हापासून ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जनतेच्या आग्रहाखातर ‘खामोश’ हा डायलॉग म्हणतात.

    सिनेस्टार काही प्रमाणात आपल्या प्रयत्नातून आणि काही प्रमाणात चाहत्यांच्या सहकार्याने स्वत:ची प्रतिमा तयार करतो. शत्रुघ्नसारख्या बडबड्या व्यक्तीच्या प्रतिमेसोबत ‘खामोश’ शब्द कसा काय जोडला गेला, हे कुणालाही कळालेले नाही. आपल्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात एकमेकांचे घनिष्ठ मित्र राहिलेल्या शत्रुघ्न आणि अमिताभ यांच्यात नंतर कटुता आली. त्यांनी यश जोहर यांचा पहिला चित्रपट ‘दोस्ताना’मध्ये एकत्र काम केले होते.

    शत्रुघ्न यांनी रिना रॉयसोबत प्रेमप्र करण गाजले होते, पण लग्न पूनम यांच्यासोबत केले. १९६८ मध्ये पूनम या मिस यंग इंडिया म्हणून निवडली गेल्या होत्या. पूनम यांनी जोधा-अकबर’मध्ये तिने बादशहाच्या आईची भूमिका अत्यंत विश्वासार्हतेने साकारली आहे. शत्रुघ्न यांचा स्वभाव बडबड्या असला, तरी पूनम शांत स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जातात.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट.

  • प्रकाशक श्री पु भागवत

    मराठी साहित्यातील मानदंड ठरलेले त्यांचे सत्यकथा हे मासिकही अत्यंत लोकप्रिय होते. त्यातील कथांची निवड भागवतांकडून अतिशय तावून सुलाखून व्हायची व मगच त्या कथा छापखान्याकडे जायच्या.

  • साने गुरुजी यांचा `श्यामची आई’

    साने गुरुजी यांचा `श्यामची आई’ हा चित्रपट प्रथम चित्रपटगृहात चौसष्ठ वर्षापुर्वी ६ मार्च १९५२ रोजी दाखवला गेला.
    साने गुरूजींच्या अजरामर `श्यामची आई’' पुस्तकावर आधारित त्याच नावाचा व तितकाच अनमोल चित्रपट प्रदर्शित झाल्याला आज ६५ वर्षे झाली. पण या चित्रपटाची गोडी व आकर्षण आजही कायम आहे. 'श्यामची आई'चे दिग्दर्शन व निर्मिती मा.आचार्य अत्रे यांनी केले होते. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची त्यांची ही पहिलीच वेळ होती. पण तरीही त्यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मितीचा राष्ट्रीय पुरस्कार लाभला. प्रत्येकाची आई `श्यामची आई’प्रमाणेच असावी, असे हा चित्रपट पाहिल्यावर प्रत्येकालाच वाटते. दिग्दर्शक मा.आचार्य अत्रे यांचे सृजनशील दिग्दर्शन, तर वनमाला, दामूअण्णा जोशी, माधव वझे, हे सर्वच कलाकार आपल्या अभिनय कौशल्याच्या सामर्थ्यावर श्यामच्या आईच्या माध्यमातून प्रकाशझोतात आले. मराठीतील सर्वोत्कृष्ट क्लासिक चित्रपटापैकी एक असणाऱ्या श्यामची आई मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरला. प्रेमळ पण योग्यवेळी कडक असणाऱ्या श्यामच्या आईची भूमिका अभिनेत्री वनमाला यांनी चपखलतेने बजावली की त्यांच्या शिवाय अन्य कोणत्याही अभिनेत्रीचा विचार करत येणार नाही. अवखळ, पण गोंडस आणि आईवर मनस्वी प्रेम करणाऱ्या श्यामची भूमिका माधव वझे यांनी लीलया साकारली. आई-मुलाचे निःस्वार्थी प्रेम, शिकवण, संस्कार, त्याग या सर्व भावना दिग्दर्शक मा. आचार्य अत्रे यांनी सुंदरतेने मांडल्या आहेत. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक मा.वसंत देसाई यांचे छडी लागे छम छम… आणि भरजरी ग पितांबर… ही गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठावर असतात. श्यामची आई हा चित्रपट मराठीतच नव्हे तर अमराठी रसिकांमध्ये इतका लोकप्रिय आहे की, गेल्या वर्षी मदर्स डे ला आंध्र प्रदेशातील आंध्र ज्योती या वर्तमानपत्राने याचे तेलगु व इंग्रजी सबटायटल करून हा चित्रपट आंध्र प्रदेश येथे सर्वत्र झळकावला. तर पंजाब येथील प्रीती लाहिरी या मासिकेच्या संपादिका पूनम सिंघ यांनीही हा चित्रपट भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या पंजाबच्या खेडय़ांमध्ये झळकावला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    या चित्रपटाची लिंक
    https://www.youtube.com/shared?ci=WZnZCqE5Jg8

  • हार्मोनिअम, ऑर्गन वादक आदित्य ओक

    हार्मोनिअम, ऑर्गन वादक आदित्य ओक यांचा जन्म २० डिसेंबर १९७७ रोजी झाला. आदित्य ओक हे वादन क्षेत्रातलं एक आघाडीचं नाव. हार्मोनिअम, ऑर्गन वादनात यांचा हातखंडा आहे. अनेक सिनेमांचं संगीत संयोजनही त्यांनी केलं आहे. खूप लहान वयात पं. गोविंदराव पटवर्धन या हार्मोनिअम वादन क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तीकडून शिकण्याचं भाग्य ओक यांना लाभलं. आदित्य ओक यांचे वडिल डॉ. विद्याधर ओक गोविंदरावांकडे शिकायचे. त्यांना शिकवायला दर शुक्रवारी ते घरी यायचे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून पुढे आठ वर्षं आदित्य ओक यांना गोविंदरावांकडे प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळाली.

    पं. गोविंदराव पटवर्धन शिकवणीबद्दल आदित्य ओक म्हणतात,''बाबांच्या इच्छेमुळे मी पेटी शिकायला लागलो. वादनाच्या क्षेत्रातलं गुरुजींचं ज्ञान, त्यांची शैली, त्यांचा आवाका संपूर्ण जगाला माहितीये. पण शिक्षक म्हणूनही तितकेच श्रेष्ठ होते. त्यांनी मला शाळेत शिकवतात तसं पुस्तकी पध्दतीने कधी शिकवलंच नाही. ते स्वतः एखादी सुरावट पेटीवर वाजवून दाखवायचे. नाही समजली तर पुन्हा पुन्हा आपल्याला समजेपर्यंत वाजवून दाखवायचे. ती विशिष्ट सुरावटीची जागा त्यांच्यासारखी येईपर्यंत आपण वाजवायची. यामुळे एखादी जागा वाजवून बघायची सवय आपोआप लागली. पुन्हा पुन्हा वाजवायचा कधीतरी फारच कंटाळा यायचा, तेव्हा ते म्हणायचे - ''येईपर्यंत वाजव, म्हणजे कंटाळा निघून जाईल.'' यामुळे न कंटाळता रियाज करायची मला सवय लागली.

    माझं शिकण्यातलं कुतूहल कायम टिकून राहण्यात या सवयीचा भाग मोठा होता. एखादी सुरावट येईपर्यंत मला तिच्याविषयी कुतूहल वाटत राहायचं. बऱ्याचदा रात्री उशिरा ते संगीत नाटकाचा प्रयोग संपवून यायचे आणि त्यानंतर मला शिकवायचे. कधीकधी इतका उशीर व्हायचा की मला झोप अनावर होत असे. मी झोपायला जायचो तेव्हा त्याचं वादन सुरू असायचं. अपरात्री कधीतरी मला जाग यायची, तेव्हाही ते वाजवतच असायचे. त्यांना निद्रानाशाचा विकार होता. पण झोप येत नाही किंवा दमलोय म्हणून त्यांना नुसतंच रिकामं बसलेलं कधी पाहिल्याचं आठवत नाही. जेव्हा जेव्हा मला कंटाळा येतो, तेव्हा गुरुजींचं हेच रूप मी डोळयासमोर आणतो.''

    काही व्यक्तींनी हार्मोनिअमच्या क्षेत्रात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलंआणि त्या व्यक्तींचंच पुढे घराण तयार झालं, अशांपैकीच एक म्हणजे पं. गोविंदराव पटवर्धन आणि त्यांचे तिसऱ्या पिढीतले आपण वारसदार आहोत याचा अत्यंत अभिमान असल्याचं आदित्य ओक सांगतात. ''आपली शैली येणाऱ्या प्रत्येक पिढीकडे संक्रमित होत जाण्यातूनच पुढे घराणे तयार होतं. माझे बाबा डॉ. विद्याधर ओक, मी आणि आता माझी पुढची पिढी गोविंदराव पटवर्धन नावाच्या एका घराण्याचा वारसा पुढे नेत आहोत.''

    आदित्य ओक यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे, तसंच अनेक चित्रपटांचं संयोजनही केलं आहे. 'बालगंधर्व'सारख्या चित्रपटाचं संगीत संयोजन केले आहे. हार्मोनिअम हे या वाद्याचे मूळ नाव असले तरी भारतात बाजा आणि महाराष्ट्रात पेटी या नावाने ते ओळखले जाते. या वाद्यांची जन्मकथा आदित्य ओक 'जादूची पेटी हा कार्यक्रम अतिशय रंजक पणे सादर करतात.
    आज अनेक विद्यार्थी आदित्य यांच्याकडे शिकायला येतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • संगीतकार स्नेहल भाटकर

    एच. एम . व्ही. कंपनीने त्यांना हार्मोनियम वादक म्हणून ४० रुपये पगारावर नोकरीला ठेवले. ही नोकरी त्यांना वयाच्या विसाव्या वर्षी मिळाली.

  • बाळ गाडगीळ

    गाडगीळ, बाळ

    मराठी साहित्यातील एक समृद्ध प्रांत म्हणून विनोदाला नेहमीच महत्व मिळाले आहे. विनोदी साहित्याची मराठीतील परंपराही फार मोठी आणि संपन्न. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून ते आचार्य अत्र्यांपर्यंत, आणि पु. ल. देशपांडय़ांपासून ते श्रीकांत बोजेवारांपर्यंत विनोदाच्या नाना तऱ्हा मराठी साहित्यात उमटल्या. ‘टवाळा आवडे विनोद’ अशी संभावना करणाऱ्या मराठी भाषेतच विनोदी वाङ्मयाला एवढा बहर आला आहे की, कुणाही परभाषेला (त्याबाबतीत तरी!) मराठीचा अक्षरश: हेवा वाटावा.

    अशा एका परंपरेत योगदान देणाऱ्या बाळ गाडगीळ यांच्या निधनाने मराठी विनोदाला काही क्षण तरी गंभीर व्हावे लागले आहे. अर्थशास्त्र हा अभ्यासाचा विषय, आवड अध्यापनाची आणि वेड लेखनाचे अशा वेगळ्याच मुशीत तयार झालेल्या बाळ गाडगीळांनी मराठी साहित्यात आपल्या साहित्याने वेगळेपण जपले. गाडगीळ लिहायला लागले, तेव्हाही मराठी साहित्यात विनोदाचे झाड बहरलेले होते. पण पूर्वसूरींच्या खांद्यावर बसूनही समकालीन लेखकांचा कोणताही प्रभाव पडू न देता आपले वेगळेपण जपणारे गाडगीळ हे आगळे साहित्यिक होते. गॉगलच्या काचांचा चष्मा, नीटनेटके राहणीमान- चेहऱ्यावरून हा माणूस विनोदी लेखक असू शकेल, असे जराही वाटणार नाही. अशी जरब प्राचार्य किंवा उपकुलगुरू म्हणून काम करताना या अशा बाह्य़ व्यक्तिमत्त्वाचा आधार घेणाऱ्या बाळ गाडगीळ यांच्या स्वभावात मात्र एक प्रकारचा खटय़ाळपणा होता. फग्र्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून सात वर्षे आणि प्राचार्य म्हणून अकरा वर्षे काम करताना अध्यापनाच्या बरोबरीने व्यवस्थापनाचे कामही त्यांनी चोखपणे बजावले. सभोवतालच्या परिस्थितीचे बारीक निरीक्षण करण्याच्या क्षमतेचा वापर लेखनात करण्याची सिद्धहस्तता फार थोडय़ा लेखकांकडे असते. मध्यमवर्गीय जीवनशैलीतील अनेक वैचित्र्यपूर्ण विसंगती तीच जीवनशैली जगत असताना पाहण्याचे कसब गाडगीळांकडे होते. असे कसब आत्मसात केलेल्या आणि समाजाचे असे चित्रण करणाऱ्या लेखकांचीही मराठीमध्ये एक मोठी परंपरा आहे. मराठी विनोद मुख्यत: प्रासंगिक आणि माणसांची स्वभाववैशिष्टय़े टिपणारा असल्याचे सांगितले जाते. मनुष्य स्वभावाच्या अनेक पदरी कथा त्यामुळे विनोदी पद्धतीने साकारलेल्या आपल्याला दिसतात. गुदगुल्या करून हसवणारा विनोद मराठीत फारच कमी. मिश्किल शैली हे तर मराठीचे खास वैशिष्टय़. गाडगीळांचा विनोद पोट धरून हसायला लावणारा नाही, पण वाचताना मन प्रसन्न करणारा आणि गालातल्या गालात हसायला लावणारा असा हा विनोद गाडगीळांनी मनोभावे जपला, त्याची निगराणी केली आणि त्याला स्वाभाविकपणे फुलू दिले. ‘लोटांगण’ या त्यांच्या पहिल्याच विनोदी लेखसंग्रहाला १९६१ मध्ये राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराची मजा अशी की तो पु. ल. देशपांडे यांच्या ‘अपूर्वाई’ या पुस्तकाबरोबर विभागून देण्यात आला होता. पहिल्याच फटक्यात बाळ गाडगीळांनी अशी सिक्सर मारल्यामुळे त्यांचा त्यानंतरचा खेळ दिमाखदार होणे क्रमप्राप्त होते. ‘सिगरेट आणि वसंतऋतू’ या प्रवासवर्णनाबरोबरच ‘शिरसलामत’, ‘खिल्ली’, ‘कुणालाही थोडक्यात पाडून घेऊ’, ‘हसो हसो’, ‘दुसरा चिमणराव’ यासारख्या सुमारे तीस पुस्तकांचे धनी होण्याचे भाग्य बाळ गाडगीळांच्या वाटय़ाला आले. व्यक्तिचित्रे, नवनीती कथा, विनोदी कादंबरी, प्रवास वर्णने, बालवाङ्मय यासारख्या साहित्य प्रकारांबरोबरच गाडगीळांनी अन्य विषयांवरही विपुल लेखन केले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात आंबेडकर’ हा संपादित ग्रंथ, ‘विनोद तत्त्वज्ञान’ हा टीकाग्रंथ, ‘मिसिसिपीवरील मुशाफिरी’ हा मार्क ट्वेनच्या आत्मवृत्ताचा अनुवाद, ‘अर्थशास्त्राचे शिल्पकार’ हा अनुवादित ग्रंथ हे त्यातील काही निवडक. बाळ गाडगीळांचे मराठी भाषेबरोबरच इंग्रजीवरही प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी गंगाधर गाडगीळांच्या बरोबर आधुनिक मराठी कथांचे भाषांतरही पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. राजेंद्र बनहट्टी यांच्या ‘अखेरचे आत्मचरित्र’ या लघुकादंबरीचा इंग्रजी अनुवाद त्यांनी केला. अध्यापन आणि लेखन हाच शेवटपर्यंत ध्यास असलेल्या बाळ गाडगीळ यांनी सिम्बायोसिससारख्या संस्थेत राहून आपल्या शैक्षणिक अनुभवाचा उपयोगही केला. बाळ गाडगीळांच्या निधनाने एक चांगला साहित्यिक, अध्यापक आणि प्रशासक निवर्तला आहे.

  • मराठी अभिनेते यशवंत दत्त

    प्रत्येक नटाला मोह पडावा अशी भूमिका म्हणजे “नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकरांची..“ती वयाच्या चाळीसाव्या वर्षी इतकी सहजगत्या साकारली की प्रेक्षकांनी या व्यक्तीरेखेला अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यानंतर यशवंत दत्त यांनी “गगनभेदी” नाटक केले.

  • अमेरिकन कादंबरीकार डॅन ब्राऊन

    डॅन ब्राऊन’ यांच्या आजवर गाजलेल्या चार प्रमुख कादंबऱ्या हा- ‘द दा विंची कोड’, ‘एंजल्स अ‍ॅन्ड डिमेन्स’, रिसेप्शन पॉइंट’, ‘डिजिटल फॉरेस्ट. यातील ‘द दा विची कोड ही कादंबरी खूप गाजली. २००३ साली प्रसिद्ध झालेली ही कादंबरी पहिल्या आठवड्यातच बेस्ट सेलर ठरली. २००६ पर्यंत जगभर या कादंबरीच्या ६ कोटी प्रती खपल्या.