(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • यशवंत चकोर

    आपल्या पहाडी आवाजाने महाराष्ट्राला दणाणून सोडणारे गोवा मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सेनानी शाहीर यशवंत चकोर.

    १९४२ च्या स्वातंत्र्य-लढ्यात जयप्रकाश नारायण यांच्या सभेची सुरुवात करण्याची संधी शाहीर चकोर यांना मिळाली होती. १९४७ मध्ये क्रांतिवीर नाना पाटील यांच्या सभेत त्यांनी स्वातंत्र्यगीते गायली. पुढे शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे अशा ज्येष्ठ शाहिरांसोबत त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला.

    त्यावेळी मुंबई प्रांत सरकारविरोधात प्रचार केल्यामुळे त्यांना रेल्वेची नोकरी गमावावी लागली. आचार्य अत्रे यांना हे कळल्यानंतर त्यांनी 'दैनिक मराठा' नाशिक जिल्ह्याची एजन्सी त्यांना दिली. पुढे चकोर १० वर्षे मनमाड नगरपालिकेत नगरसेवक होते. लोककलेतून जनजागृती करणार्‍या या कलाकारावर आचार्य अत्रे प्रचंड खुश होते. सभेपूर्वी ते 'जय देव जय देव जय मंगलमूर्ती' हे गीत शाहीर चकोर यांना म्हणायला सांगत.

    स्वातंत्र्यापासून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कार्यरत राहणार्‍या आणि अनेक वर्षे पुरोगामी पक्षाबरोबर जनजागृतीचे काम करणार्‍या या शाहिराच्या वाट्याला अखेरपर्यंत उपेक्षाच आली. निळू फुले, राम नगरकर यांच्यासोबतीने पुण्यात कलापथकात काम करणारे शाहीर केवळ आईच्या आग्रहास्तव पुन्हा मनमाडला आले. त्यानंतर त्यांनी मनमाड सोडले नाही.

    पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहाच्या उदघाटनाप्रसंगी पहिले गाणे शाहीर चकोरांनी सादर केले. त्या गाण्याला चाल व संगीत पु. ल. देशपांडे यांनी दिले. अशा कितीतरी आठवणींवर शाहीर शेवटपर्यंत चिरतरुण होते. त्यामुळेच उपेक्षित जगण्याची त्यांनी कधीही खंत व्यक्त केली नाही.

    गोवामुक्ती संग्राम स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्यांचा अखेरच्या टप्प्यातील प्रवास खडतर झाला होता. जागा मराठा, आम जमाना बदलेगा, उठा है जो तुफान, वह आखिर बंबई लेके दम लेगा अशी महाराष्ट्र गीते, पोवाडे आणि शौर्यगीते गाऊन एकेकाळी महाराष्ट्राला वेड लावणारे शाहीर चकोर अखेरच्या क्षणी स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळविण्यासाठी दारोदार भटकत होते. उदरनिर्वाहासाठी अल्पबचत एजंट म्हणून घरोघरी पैसे गोळा करण्याचे काम करणार्‍या शाहिरांनी अखेरपर्यंत काम केले.

    त्यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. अखेरपर्यंत चकोर हे शाहीर म्हणून मिळणारे तुटपुंजे मानधन व पतसंस्थेचे कमिशन यावर गुजराण करत होते.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • उपेन्द्र लिमये

    उपेन्द्र लिमये हे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक आहेत. २००९ साली प्रदर्शित झालेल्या “जोगवा” मधील “तायप्पा”च्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोकृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

  • प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार भालचंद्र नेमाडे

    भालचंद्र नेमाडे यांचे उच्च शिक्षण, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून, व डेक्कन कॉलेजातून झाले. नंतर त्यांनी इंग्रजी साहित्यात मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले. नेमाडे यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे. त्यांचा जन्म २७ मे १९३८ रोजी सांगवी, खानदेश येथे झाला. १९७४ पासून औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात व शेवटी ते मुबई विद्यापीठात तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासाठी स्थापन झालेल्या गुरुदेव टागोर आसनावरून निवृत्त झाले. नेमाडे हे गोवा विद्यापीठातही इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख होते.

    'कोसला' हे पुस्तक त्यांच्या वयाच्या २५ व्या वर्षी प्रकाशित झाले. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते... ' भालचंद्र वनाजी नेमाडे यांच्या कोसला' या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला होता. कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी बिढार (१९६७), जरीला (१९७७) व झूल(१९७९) या "चांगदेव पाटील" या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबर्यार लिहिल्या. हिंदू नावाची कादंबरी नेमाडे लिहिली. कादंबर्यां्शिवाय त्यांचे 'देखणी' आणि 'मेलडी’(१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत. टीकास्वयंवर या टीकाशास्त्रावरच्या पुस्तकासाठी नेमाडे यांना १९९० साली साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच २०१३ साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कारही त्यांना देण्यात आला. नेमाडेंनी कादंबरी, कविता व समीक्षा ग्रंथांची निर्मिती या सर्व क्षेत्रांत साहित्यिक कामगिरी केली.

    रंजनवादी मूल्यांना कडाडून विरोध करतानाच परंपरेविषयी चिकित्सक असण्याकडे त्यांचा कल आहे. मराठीवरील इंग्रजी साहित्याचा प्रभाव, शैलीशास्त्रीय दृष्टीने अभ्यास ही वैशिष्ट्ये असणार्याल नेमाडेंनी इंग्रजीतूनही साहित्यनिर्मिती केली. "साहित्याची भाषा‘ हे त्यांचे भाषाविज्ञानविषयक तात्त्विक स्वरूपाचे पुस्तक वाचकांना वेगळी दृष्टी देते.

    नेमाडेंनी आपल्या साहित्यात बोलीभाषेला अधिकाधिक वाव दिला. कोकणी, गोंयची, हिंदीमिश्रित उर्दू आणि वैदर्भीय या बोलींमध्ये त्यांनी कविता लिहिल्या.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ विकिपीडिया.

  • मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक विश्राम बेडेकर

    विश्राम बेडेकर आज मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांची पुण्यतिथी

    विश्राम बेडेकर यांचा जन्म १३ ऑगस्ट १९०६ रोजी झाला.

    नाटककार, कादंबरीकार, चित्रपट दिग्दर्शक म्हणून आजही ज्यांचे नांव आदराने, सन्मानाने घेतले जाते, त्या विश्राम बेडेकरांचे हे वयाच्या पंचविसाव्या वर्षी लेखनास प्रारंभ केला आणि नव्वदाव्या वर्षापर्यंत ते लिहीत राहिले असले तरी त्यांचे लेखन मोजकेच आहे. चित्रपट क्षेत्रात कारकीर्द सुरु करताना देखील अनेक अपयशांना सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी दिग्दर्शित केलेले सगळेच चित्रपट यशस्वी झाले आहेत. चित्रपट तंत्राच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले आणि आल्याआल्याच त्यांच्या हातून 'रणांगण' सारख्या उत्कृष्ट कलाकृतीची निर्मिती झाली. रणांगण नंतर त्यांनी केलेली अनेक नाटय रुपांतरे रंगभूमीवर आली. मात्र 'वाजे पाऊल आपुले' आणि 'टिळक आणि आगरकर' या रंगभूमीवर गाजलेल्या त्यांच्या अजोड कलाकृती. चरितार्थासाठी नाटक आणि चित्रपट हे क्षेत्र निवडले अणि तेथेही ते पटकथा लेखक तर कधी दिग्दर्शक म्हणून यशस्वी ठरले. माझं बाळ, वासुदेव बळवंत, चूल आणि मूल या श्रेष्ठ पटकथा त्यांनी दिल्या. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' ही त्यांची एक सर्वोत्तम कथा.

    अर्थगर्भ आणि अजोड कलाकृती देऊन विश्राम बेडेकरांनी एक आदर्श उभा केला आहे. मराठी रंगभूमीवरील विख्यात नट चिंतामणराव कोल्हटकर व श्रेष्ठ गायक नट मास्टर दीनानाथ हयांनी सुरू केलेल्या ‘बलवंत पिक्चर्स’ ह्या संस्थेच्या कृष्णार्जुन युद्ध ह्या चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणून बेडेकर प्रथम चित्रपटव्यवसायात आले. तत्पूर्वी मास्टर दीनानाथांच्या ‘बलवत संगीत नाटक मंडळी’साठी ब्रह्मकुमारी हे नाटक त्यांनी लिहिले होते. ह्या नाटकातील ‘मी लोपले मधुमीलनात या’ हे पद अत्यंत लोकप्रिय ठरले. बलवंत पिक्चर्स ही संस्था बंद झाल्यानंतर, १९३५ साली बेडेकरांनी कृष्णार्जुन युध्दाचे आणखी एक सहदिग्दर्शक वा. ना. भट ह्यांच्या सहकार्याने ‘भट-बेडेकर प्रॉडक्शन्स’ ही चित्रसंस्था स्थापन केली. राम गणेश गडकरी आणि चि.वि. जोशी ह्यांच्या अनुक्रमे ‘ठकीचे लग्न ‘आणि ‘ सत्याचे प्रयोग’ ह्या विनोदी कथांवर त्यांनी बोलपट तयार केले. मराठी चित्रसृष्टीतील हे पहिले विनोदी बोलपट होत. त्यानंतर लक्ष्मीचे खेळ हा आणखी एक विनोदी बोलपट त्यांनी निर्माण केला. प्रभातच्या शेजारी ह्या गाजलेल्या चित्रपटाची पटकथा व संवादत्यांनीच लिहिले होते. तसेच रामशास्त्री बोलपटाचे निम्म्यापेक्षा अधिक भागाचे दिग्दर्शन व लेखनही त्यांनी केले. १९४२ साली ‘न्यू हसं पिक्चर्स’ चा पहिला पाळणा हा तुफान विनोदी बोलपट त्यांनी दिग्दर्शित केला. ह्या चित्रपटाच्या कथा संवादांचेही लेखन केले. राजकमलच्या अमर भूपाळीची (१९५१) कथाही त्यांचीच. फिल्म डिव्हिजनसाठी लोकमान्य टिळक व विनोबा भावे ह्यांच्यावरील अनुबोधपटही त्यांनी तयार केले. चित्रपटमाध्यमाची अत्यंत मार्मिक जाण त्यांनी लिहिलेल्या नेमक्या, नीटस संवादातून जाणवते. १९५१ नंतर बेडेकर चित्रपटव्यवसायात फारसे वावरले नाहीत. १९५१ ते १९८१ह्या तीन दशकांत त्यांनी फक्त दिग्दर्शन केले आणि तेही अवघ्या सहा चित्रपटांचे. त्यात वासुदेव बळवंत आणि रुस्तुम सोहराब यांचा समावेश होतो. याच काळात त्यांनी प्रसिद्ध क्रांतिकारक भगतसिंग ह्यांच्यावरील चित्रपटाचे व ‘प्रभात’ साठी लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील चित्रपटाचे बरेचसे काम केले पण ते प्रयत्न अपूर्ण राहिले. ह्या काळात ते पुन्हा नाट्यलेखनाकडे वळले. त्यांनी नरो वा कुंजरो वा (१९६१),वाजे पाऊले आपुले (१९६७) टिळक आणि आगरकर(१९८०) ही नाटके लिहिली. तथापि रणांगण (१९३९) ह्या कांदबरीमुळे बेडेकरांची वाङ्मयीन कीर्ती अनेक अर्थानी मराठीत अपूर्व ठरली. १९३८ साली बेडेकरांना सिनेमॅटोग्राफीच्या अभ्यासार्थ इंग्लंडला जाण्यासाठी एक निमसरकारी शिष्यवृत्ती मिळाली. तिथे त्यांनी फावल्या वेळात हस्ताक्षरतज्ञ म्हणून डिप्लोमा मिळवला. भारतात परत येताना बोटीवर काही निर्वासित जर्मन-ज्यू मंडळींचे जीवन त्यांना फार जवळून बघायला मिळाले. त्या अनुभवातून रणांगण या कादंबरीचा जन्म झाला. चक्रधर नावाचा एक मराठी तरुण आणि ज्यूद्वेष्ट्या नाझी हुकुमशाहीखाली जिचे जीवन अंतर्बाह्य उद्ध्वस्त झाले अशी एक जर्मन ज्यू तरुणी हॅर्टा ह्यांच्या असफल प्रेमाची ही कहाणी आहे. जेनोआहून निघालेल्या एका इटालियन बोटीवर त्या दोघांची भेट होते आणि दहा दिवसांच्या सागरी प्रवासात ती दोघे उत्कटपणे परस्परंच्या जवळ येतात. चक्रधर आधी एका प्रेमप्रकरणात फसलेला असतो, तर हॅर्टा आपला पराक्रम सोडून परागंदा होण्यापूर्वीच आपल्या जर्मन ख्रिश्चन प्रियकराला मुकलेली असते. चक्रधराला पाहून तिला अपल्या प्रियकराची आठवण येते आणि चक्रधरही तिच्या प्रेमाने भारावून जाऊन तिच्याशी विवाह करावयास तयार होतो. तथापि हॅर्टापाशी जर्मन पासपोर्ट असल्यामुळे तिला चक्रधराबरोबर मुंबईस उतरता येत नाही. बोट चक्रधराला सोडून निघून जाते आणि विफल प्रेमाचा दुसरा आघात असह्य झालेली हॅर्टा हाँगकाँगपर्यंत गेल्यावर समुद्रात उडी मारून आत्महत्या करते. ह्या कांदबरीचा विषय, तीत असलेली विरोधवादाची पार्श्वभूमी, तिच्यातील सूक्ष्म, अभिजात कलात्मकता, तीतून व्यक्त झालेला संवेदनस्वभाव, तिची अनेकसंदर्भसूचकता हे सारेच मराठी कांदबरीत अपूर्व होते. मराठीतील मोजक्या, उत्कृष्ट कादंबऱ्यात बेडेकरांच्या रणांगणाची गणना केली जाते. १९८६ साली विश्राम बेडेकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होते. मराठी लेखिका मालती बेडेकर (माहेरच्या बाळूताई खरे) या त्यांच्या पत्नी होत. विश्राम बेडेकर यांचे निधन ३० ऑक्टोबर १९९८ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • विष्णुदास अमृतराव भावे

  • डॉ. तारा भवाळकर

    लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांचं वर्णन ‘माय’वाटेवरची प्रवासिनी असंच करावं लागेल. कारण ‘लोकसंस्कृती’ ही व्यापक अर्थाने ‘माय’ म्हणजेच ‘मातृपरंपरा’ असल्याचं त्यांनी आपल्या लेखनातून वारंवार सिद्ध केलं आहे. ताराबाईंचं आजवरचं लोकसाहित्यविषयक लेखन वाचल्यावर महाराष्ट्रीय किंवा एकूणच भारतीय स्त्रीमन नव्यानं उलगडतं. बाईंनी लोकसाहित्याचे संशोधन करताना संकलित केलेल्या लोकगीत-लोककथांचा अन्वय लावून त्यांनी या सार्‍यांची सैध्दंतिक मांडणी करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच त्यांना मिळालेली ‘महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळा’ची सन्मानवृत्ती योग्यच आहे.

  • अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर

    कार्व्हर चित्रकलेत आणि पियानो वाजवण्यात निष्णात होते. त्यांनी काढलेलं चित्र पॅरिसच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेलं आहे. जर त्यांनी ठरवलं असतं तर जगात सर्वश्रेष्ठ चित्रकार म्हणून प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळवता आला असता. पण या मार्गाने समाजाचा आणि मुख्यतः आपल्या निग्रो बांधवांचा जीवनोद्धार करता येणार नाही म्हणून ‘ध्येय’ क्षेत्र निवडलं – शेती , केमर्जी आणि मायकोलोजी.

  • केसरी टुर्स च्या संचालिका झेलम चौबळ

    केसरीच्या संचालिका असलेल्या झेलम यांना फायनान्स, टिकिटिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशन या विभागांमध्ये विशेष रुची आहे. मात्र, पर्यटनाच्या नवनवीन योजना आखण्यात त्यांचा हातखंडा आहे. नेहमीच्या ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांना पर्यटनाबरोबरच शेती आणि शेतीपूरक व्यवसायासंबंधी नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून ॲग्रो टुरिझम, विद्यार्थ्यांसाठी ‘नासा’ टूर आणि कार्पोरेट क्षेत्रात विशेष लोकप्रिय असलेली माईस (MICE) अशा पूर्णपणे भिन्न आणि लोकप्रिय योजना आखण्याचे श्रेय ‘झेलम’ यांचेच.

  • मराठी व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक राजा बारगीर

    ’सुखाचे सोबती’, ’बोलकी बाहुली’, ’देवा तुझी सोन्याची जेजुरी’, ’मानाचा मुजरा’, ’करावं तसं भरावं’, ’दीड शहाणे’, ’ठकास महाठक’, ’गडबड घोटाळा’, ’तुझी माझी जमली जोडी’ अशा अनेक मराठी व हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. राजा बारगीर यांचे १८ डिसेंबर १९९३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अभिनय, दिग्दर्शनाचा “राजा’ राजा परांजपे

    राजा परांजपे यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला तो मात्र नट वा सहायक दिग्दर्शक म्हणून नव्हे तर संगीत विभागात ‘ऑर्गन वादक’ म्हणून! राजाभाऊंना लहानपणपासून संगीताचं उपजतच वेड होतं. त्यांचा जन्म २४ एप्रिल १९१० रोजी झाला. हा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून लाभला. विद्यार्थी दशेतच ‘भारत गायन समाजा’च्या कै. बापूराव केतकरांनी त्यांच्या संगीतवेडाला चांगलं वळण दिलं. नवनवी नाटके आणि सिनेमा बघण्याचे वेड त्यांना लागले. पण रोज रोज नाटक, सिनेमा पाहायचं म्हटलं तर पैशाची चणचण त्यांना भासू लागली. पण त्यासाठी त्यांच्या संगीतवेडातूनच त्यांना एक नवीन मार्ग सापडला. राजा परांजपे यांची अभिनयातील समज पाहून तिथेच त्यांना "लपंडाव' या नाटकात अचानक संधी मिळाली. या नाटकातील एक कलाकार अचानक नाटक सोडून गेला. दात्ये यांयांनी त्याच्या जागी राजा परांजपे ना संधी दिली, त्या संधीचे त्यांनी चीज केले. पुढे केशवराव दात्ये यांनीच त्यांना "सावकारी पाश' या चित्रपटातील भूमिका मिळवून दिली. त्यानंतर ते भालजी पेंढाकर यांच्याकडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. भालजींच्याच काही चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला. "सावकारी पाश'मधील भूमिकेनंतर ते छोटी मोठी कामे करत होते; पण खऱ्या अर्थाने ते दिग्दर्शक झाले ते १९४८ मध्ये "बलिदान'च्या माध्यमातून आणि यशाची बरसात झाली ती "जिवाचा सखा' या चित्रपटाने. मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील सर्वांत यशस्वी त्रयी म्हणजे राजा परांजपे, सुधीर फडके आणि ग. दि. माडगूळकर होय. ग. दि. माडगूळकर यांच्या पटकथेवर राजाभाऊ आपल्या दिग्दर्शन कौशल्याचा असा काही प्रभाव पाडत, की तो चित्रपट वेगळाच होऊन जाई. शब्दप्रभू माडगूळकरांयांनी राजा परांजपे ना परिसाची उपमा दिली होती. तुमच्या पटकथेवर इतरांना राजा परांजपे च्याइतके यश का नाही मिळवता आले, असे त्यांना एकदा विचारले असता गदिमा म्हणाले राजाभाऊ हे परिसासारखे आहेत, त्यामुळे त्यांच्यासारखी किमया इतरांना कशी जमेल? राजा परांजपे यांनी केवळ मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले असे नाही, तर त्यांयांनी दिग्दर्शित केलेल्या चार हिंदी चित्रपटांनाही चांगले यश मिळाले. त्यातील "दो कलियॉं' हा चित्रपट तर प्रचंड यशस्वी ठरला होता. आज आपण अनेक दिग्दर्शकांच्या वैविध्यपूर्ण शैलींबद्दल बोलत असतो; पण कोणताही गाजावाजा न करता राजाभाऊ वेगवेगळ्या प्रकृतीचे चित्रपट त्याकाळात दिग्दर्शित करत होते आणि यश मिळवत होते. "पुढचं पाऊल', "ऊन पाऊस', "देवघर' यासारखे कलात्मक चित्रपट राजा परांजपे यांनी यशस्वी करून दाखवले होते. राजा परांजपे यांनी दिग्दर्शन केले आणि ज्यामध्ये त्यांयांनी स्वतः काम केले अशा "हा माझा मार्ग एकला' या चित्रपटाची सगळीकडेच वाहवा झाली, त्याचबरोबर या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदकही मिळाले होते. अर्थात, हा बहुमान त्यांना दोनदा मिळाला होता. "पाठलाग' या रहस्यप्रधान चित्रपटालाही राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड मानला जातो. त्याचबरोबर या चित्रपटाचे यश पाहून हिंदीमध्येही त्याचा रीमेक केला गेला. "मेरा साया' नावाने हा चित्रपट हिंदीत आला. नाटकात उत्तम भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या राजा परांजपे चा अभिनेता म्हणून रसिकांच्या मनावर ठसा उमटला होता, तरी दिग्दर्शन हाच त्यांच्यासाठी सर्वांत यशाचा भाग ठरला. भूमिका कोणतीही असो, मग ती विनोदी असो की कौटुंबिक अथवा कारुण्यमयी, राजाभाऊ त्या भूमिकेला आपला रंग देत असत. हेच कौशल्य त्यांयांनी चित्रपट दिग्दर्शित करताना ठेवले, त्यामुळे एकाच वेळी भिन्न प्रकृतीच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करूनही त्यांयांनी त्यामध्ये लक्षणीय यश मिळवले. व्ही. शांताराम यांनी त्यांची तुलना करताना त्यांना सत्यजित रे यांच्यापेक्षा अधिक गुण दिले होते. कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना ते त्या चित्रपटाचेच होऊन जात असत, त्या वेळी दुसरा विचारच त्यांना सुचत नसे. २७ चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या या माणसाचे पाय शेवटपर्यंत जमिनीवर होते. अनेकांना चित्रपटसृष्टीत उभे केलेल्या या दिग्दर्शकाने आपल्या काळात अक्षरशः राजासारखे राज्य केले. शरद तळवलकर, सीमा आणि रमेश देव, राजा गोसावी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर व सचिन पिळगावकर यांच्यात एक समान बाब कोणती असे विचारले, तर चटकन सांगता येईल ती म्हणजे, ही सर्व मंडळी एका स्कूलची आहेत. स्कूल अर्थातच राजा परांजपे यांचं. या मंडळींच्या कारकिर्दीला सर्वाधिक आकार दिला तो राजा परांजपे या कसबी दिग्दर्शकाने. राजा परांजपे यांचे ९ फेब्रुवारी १९७९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट