जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
काही संगीतकारांच्या मनात काही राग हे कायमचे वस्तीला आलेले असतात आणि त्यांचे प्रारूप, त्यांच्या स्वररचनांमधून आपल्याला सारखे जाणवत असते. खैय्याम यांच्याबाबत हे विधान काहीसे ठामपणे करता येईल. "पहाडी" सारखा लोकसंगीतातून स्थिरावलेला राग, त्यांच्या गाण्यांतून बरेचवेळा डोकावत असतो, अर्थात चालींचे वेगळेपण राखून. काहीवेळा त्यांच्यावर टीका देखील झाली परंतु एखाद्या रागावर अनन्वित श्रद्धा असेल तर त्याच रागातून किती छटा दाखवता येतात आणि आपले बुद्धिकौशल्य मांडता येते, याचे सुंदर उदाहरण म्हणून खैय्याम यांचे नाव घ्यावेच लागेल.
संस्कारक्षम काळात पंडित अमरनाथ यांच्याकडे शागिर्दी केली आणि आपला कलासंगीताचा पाया घोटवून घेतला. याचे फायदा पुढे जेंव्हा चित्रपटसृष्टीत यायचे ठरविले तेंव्हा तिथे आधीच कार्यरत असलेले पंडित अमरनाथ आणि त्यांचे बंधू - हुस्नलाल/भगतराम यांना साथ करणे क्रमप्राप्तच ठरते. त्याचबरोबरीने विख्यात कवी फैझ-अहमद-फैझ यांच्या संगतीने काव्याचा अभ्यास करून घेतला. याचा पुढे हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत होताना, निश्चित फायदा झाला असणार . अर्थात एकूण कारकिर्दीकडे नजर टाकल्यास, एकूण ५० एक चित्रपटांना संगीत रचना करणे, हे काही प्रचंड कार्य नव्हे परंतु जे चित्रपट केले, त्याच्यावर स्वतः:ची नाममुद्रा उमटवली, हे विशेष म्हणायला लागेल.
"शामे गम की कसम' सारखे गाणे कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात देऊन, त्यांनी स्वतः:ची ओळख जगाला करून दिली. त्यांनीच एकेठिकाणी म्हटल्याप्रमाणे, गाण्यात कुठलेही पारंपरिक तालवाद्य वापरले नसून, "डबल बेस" आणि "स्पॅनिश गिटार" सारख्या स्वरिक वाद्यांकडून ताल पुरवला गेला. या रचनेने, खैय्याम विशेष प्रसिद्धीस आले. असे म्हणता येईल.
काही मूल्यमापन करायचे झाल्यास, १) मोठा वाद्यवृंद वापरानेवा वाद्यांचा हात राखून उपयोग करणे. वरील गाणे - शामे गम की कसम", "कहीं एक मासूम लडकी" किंवा " आज बिछडे है" ही गाणी ऐकताना आपल्याला प्रत्यय येईल. यांत वाद्य गदारोळ नाही, संगीत आणि शब्द दोन्ही आपल्या मनात झिरपत जातात आणि त्याचबरोबर एक शांत भाव. कदाचित याच सांगीत काटकसरीमुळे असेल पण तलतचा नाजूक स्वरकंप किंवा भूपिंदर सिंगचा मृदू गणोच्चार मनात ठसतो. २) याच संदर्भात एक आणखी बारकावा विचारात घ्यावासा वाटतो. काही अपवाद वगळता त्यांनी छेडण्याची तंतुवाद्ये आणि पियानो यांच्या माध्यमातून दीर्घ सुरावटीचे आकृतिबंध विणण्यावर भर दिला. उदाहरणार्थ "जीत लेंगे बाझी हम तुम" या रचनेत महत्वाचा गीतारंभ फक्त पियानोवर सोपवला आहे. तसेच पहाडी रागावरील "बहारो मेरा जीवन भी संवारो" या गाण्यात सतार इत्यादी वाद्ये दीर्घ आणि आवाहक स्वरबंध निर्माण करतात.
एक आश्चर्याची बाब - समान स्वरबंध त्यांनी काही गाण्यात सहजपणे वापरले आहेत. "कभी कभी मेरे दिल में" आणि " सिमटी हुई ये घडिया" किंवा "परबतो के पेडो पर" आणि "बहारो मेरा जीवन भी संवारो" तसेच "फार छिढी रात" आणि "आयी झंजीर" ही गाणी आलटून, पालटून स्वरसाम्यासाठी तपासावीत. खैय्याम यांना सुरावटीच्या नाविन्याची अप्रूप नाही, असे नाही. कारण सुरांची समानता ज्या गीतांत जाणवते त्या गीतांत देखील ते सूक्ष्म बदल करीतच असतात. परंतु कदाचित आशय-सुरावट यांच्या दरम्यान एक अतूट नाते असते, यावर त्यांचा गाढा विश्वास असावा.
खैय्याम यांना खरी अमाप लोकप्रियता मिळाली ती "उमराव जान" चित्रपटाच्या संगीताने. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च अढळ असे स्थान. त्यामुळे गझल हे त्यांचे मर्मस्थान होय, असे विधान करता येऊ शकते. एक प्रकारची तीव्र अकर्मण्यता किंवा अक्रियाशीलता, काहीतरी मूल्यवान हरपले आहे याचे दाट दु:ख आणि संयमित शृंगार या आणि अशा भावतरंगाना त्यांचा अंगभूत प्रतिसाद असतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे, या चित्रपटातील गाण्यांत छेडण्याच्या वा गजाने ध्वनित होणाऱ्या वाद्यांचा आवाहक वापर आहे. त्यामुळे मुजरा नृत्ये असूनही त्यात एक आदबशीर शृंगार अवतरलेला आहे. "दिल चीझ क्या" या गीतांत बिहाग रागातील भावस्पर्शी सुरावट आढळते. "इन आँखो की मस्ती" या गाण्यात तर भूप रागाचा तिरोभाव अतिशय मनोरमपणे सादर केला आहे. असाच प्रयत्न त्यांनी "जिंदगी जब भी" या गीतात गौडसारंग रागापासून दूर सरकत साधला आहे. सांगीतदृष्ट्या प्रदर्शन न करता, आमच्या कर्तृत्वाकडे पहा असे गर्जून न सांगता ही गीते आपला भाव-परिणाम सिद्ध करतात. मानसिक किंवा भावनिक आशयाबरोबर हातात हात घालून चालू शकेल असा सांगीत अवकाश निर्माण करा, अशी गझलची मागणी असते. त्याचा नेमका प्रत्यय या स्वररचनेतून अनुभवायला मिळतो.
मोजका वाद्यमेळ आणि संयत गायन, याच्या साहाय्याने रचनासंबद्ध निश्चितता सादर करण्याची कामगिरी सर्वांनाच जमत नाही. खैय्याम यांना ते जमले आहे याचा सहज प्रत्यय येतो आणि हेच खैय्याम यांचे खरे यश.
- अनिल गोविलकर
राजा बढे हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती. शाहीर साबळे यांनी तर त्यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे अजरामर ‘ महाराष्ट्र गीत ‘ गायले.
महाराष्ट्राची तरुण पिढी १९२० ते १९५०-५५ पर्यंत ज्यांनी वैचारिकदृष्ट्या घडविली, बुद्धिवादाचे आणि त्याचबरोबर नैतिकतेचे संस्कार ज्यांनी तिच्यावर केले, आणि तिला ध्येयप्रवण बनविले अशा विचारवंतांमध्ये आचार्य शं.द. जावडेकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. महाराष्ट्रातील बहुतेक सर्वसमाजवादी नेते, कार्यकर्ते त्याचप्रमाणे राष्ट्रसेवा दलाचे हजारो सैनिक जावडेकर यांच्या वैचारिक शिदोरीवर पोसले गेले.
‘मेरा कलम तो अमानत है मेरे लोगों की, मेरा कलम तो अदालत मेरे जमीर की है’ किंवा ‘अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों में मिले, जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले’ लिहिणारे शायर अहमद फराज. ऊर्दू शायर अहमद फराज यांचा जन्म १२ डिसेंबर १९३१ रोजी नौशेहरा (पाकिस्तान) येथे झाला. प्रेमातील मिलन, विरह, प्रतीक्षा यावरचे तरल संवेदनशील शेर ही त्यांच्या शायरीची खासियत. त्याची गज़ल सुसंस्कृत व प्रगल्भ बुद्धिवान कवीची गज़ल संबोधली जाते.
त्याच्या शायरीवर फैज व अहमद नदीम कासमीच्या भावुक व संवेदनशील शैलीचा प्रभाव होता. सामाजिक संदर्भ त्यांच्या गज़लेपेक्षा कवितेत प्रकर्षांने साकारतात. ग़जलेत प्रणयाचा रंगछटा तरल शब्दशैलीत उमलतात. त्याची गज़ल सुसंस्कृत व प्रगल्भ बुद्धिवान कवीची गज़ल संबोधली जाते.
अहमद फराज यांचे वडील सय्यद मोहम्मदशाह परख पेशावर विद्यापीठात प्राध्यापक होते. फराजच्या काव्यलेखनाचा आरंभ असा झाला. ते दहावीत शिकत असताना त्यांनी पहिला शेर रचला अन् तो वडिलांच्या उशाशी ठेवला.
जब कि सब के वास्ते लाये है कपडे सेल से
लाये है मेरे लिए कैदी के कंबल जेल से
१९५१ मध्ये फराज पेशावरहून कराचीला आले. एक वर्ष कराची रेडिओवर कार्यक्रम करीत होते. ती नोकरी सुटली. अन् पेशावरला परतले. अन् १९५४ साली बी. ए. करतानाच त्यांचा ‘तनहा- तनहा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांनी फारसीमध्ये एम.ए. केलं. अन् ते पेशावर रेडिओवर निर्माते झाले. अन् वडील सेवानिवृत्त होताच पेशावर विद्यापीठात लेक्चरर झाले. पाकिस्तान नॅशनल सेंटर इस्लामबादचे डायरेक्टरही झाले. १९८२ ला त्यांना हद्दपार करण्यात आलं तेव्हा ते लंडनला राहिले. सरकार बदलल्यावर ते पाकिस्तानात परतले. त्यांनी पाच-सहा नाटकंही लिहिली. जानाँ’, ‘बे-आवाज गली-कूचों में’ ‘नाबीना शहर में आईना’, ‘असासा’.
अहमद फराजच्या शायरी संग्रहाची नावे अशी, ‘दर्द-आशोब’,‘तनहा-तनहा’, ‘शब खून’, ‘नायाफ्त’, ‘जानाँ. ज्येष्ठ उर्दू समीक्षक शमीम हनफीच्या मते फराजच्या भाषेवर व कथनशैलीवर फारसी व क्लासिकल उर्दू गजलचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. प्रेमातील मिलन, विरह, प्रतीक्षा इत्यादीचे शेर फराजच्या गज़लांचे वैशिष्टय़ होते.
रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोडम्के जाने के लिए आ
अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों में मिले
जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले
‘दर्द-आशोब’ या फराजच्या पहिल्या संग्रहातील गज़ला मेहदी हसनने गाऊन जगभर पोहचवून लोकप्रिय केल्या. मेहदी हसन मात्र गज़ला गाताना शायराचे नाव अवश्य नमूद करत असत.
अहमद फराज यांचे २५ ऑगस्ट २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :-लोकसत्ता/ डॉ. राम पंडित
त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९६४ रोजी पुणे येथे झाला. डोंबिवली फास्ट’मुळे माधव आपटे म्हणून घराघरात पोहोचलेले संदीप कुलकर्णी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पंडित सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी अभिनयाला सुरवात केली होती. मराठी चित्रपट सृष्टीला वेगळे वळण देणाऱ्या "श्वास" आणि "डोम्बिवली फास्ट" या चित्रपटांमध्ये त्यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या भूमिकांसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 'अवंतिका' मालिकेत त्यांनी काम केले होते. मराठी चित्रपटाला अंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ते उत्तम चित्रकार ही आहेत.
बेधुंद, 'मी बाप', 'मेड इन चायना ' आणि 'साने गुरुजी' या चित्रपटात त्यांचा उत्कृष्ठ अभिनय बघायला मिळाला. २००८ मध्ये नायजेरियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये कुलकर्णी यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आजही महाराष्ट्रातल्या न्यायालयात जेव्हा एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ लावण्याची वेळ येते तेव्हा मोल्सवर्थने दिलेला अर्थ न्यायाधीश प्रमाण मानतात.
‘मानवी संस्कृतीचा इतिहास’, ‘मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी’, ‘कोशकार केतकर’ असे ग्रंथ रचले. ज्ञानवंत, विचारवंत, व चिकित्सक अशा चिंतामणी गणेश कर्वे यांनी कोशनिर्मितीचे प्रचंड काम केले. महाराष्ट्रीय विद्वत्तेचा आदर्श म्हणून त्यांच्या शब्दकोशाकडे पाहिले जाते.
इंदिरा संत यांची कविता पहिली की आपण एक वेगळ्याच विश्वात जातो , तिथे फक्त शब्द असतात आणि मनाला मिळणारी अनुभूती.
भारताचे सातवे पंतप्रधान सामाजिक कार्यकर्ते व राजनीतिज्ञ विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्म २५ जून १९३१ रोजी झाला. भारताचे सातवे पंतप्रधान म्हणून असली तरी त्यांचे वडील राजे बहादूर रामगोपाल हे अलाहाबाद जिल्ह्यातील एका लहान संस्थानचे अधिपती विश्वनाथ प्रताप सिंग होते. वयाच्यापाचव्या वर्षी मंडाच्या संस्थानाधिपतींनी (ते सिंग यांचे चुलते होते) त्यांना दत्तक घेतले आणि योग्य ते शिक्षण दिले. त्यांचे दत्तकपिता १९४१ मध्ये वारले आणि व्ही. पी. सिंग मंडाचे अकराव्या वर्षीच राजे झाले.
संस्थान विलीन होईपर्यंत ते महाराजा होते. त्यांनी उच्चशिक्षण पुणे व अलाहाबाद विद्यापीठांत घेऊन बी.ए., बी.एस्सी. व एल्एल्.बी. पदव्या संपादन केल्या. विद्यार्थिदशेत ते वाराणसीतील उदयप्रताप महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते . त्यांचा विवाह सीताकुमारी या शाही घराण्यातील युवतीशी झाला . त्यांना दोन अपत्ये आहेत. विनोबा भावेंच्या भूदान आंदोलनात त्यांनी सहभाग घेऊन आपल्या अखत्यारीतील पसाना हा ग्रामीण परिसर भूदान चळवळीस दान केला.त्यानंतर ते सक्रिय राजकारणाकडे वळले. ते १९६० मध्ये काँग्रेस पक्षात प्रविष्ट झाले. सुरुवातीस त्यांच्याकडे उत्तर प्रदेशातील उपचिटणीस, चिटणीस अशी पदे देण्यात आली. पुढे ते काँग्रेसतर्फे विधिमंडळावर निवडून आले. तसेच ते अलाहाबाद विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे सभासद होते.
त्यांच्याकडे १९७०-७१ मध्ये काँग्रेसचे प्रतोदपद देण्यात आले. पुढे केंद्रीय मंत्रिमंडळात ते उपवाणिज्य मंत्री, नंतर त्याच खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. या दरम्यानत्यांची राज्येसभेवर नियुक्ती करण्यात आली . त्यानंतर त्यांची लोकसभेवर निवड झाली. मध्यंतरी त्यांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून श्रीमती इंदिरा गांधींनी निवड केली. त्यांनी काही काळ उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले (१९८४). त्यांची काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीवर निवड झाली आणि पुन्हा ते लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ(१९८४–८६) आणि संरक्षण ही खाती कार्यक्षम रीत्या सांभाळली. तथापि पंतप्रधानांशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर ‘तुमचे शासन अत्यंत भ्रष्टाचारी आहे’, असा आरोप केला. परिणामतः त्यांना काँग्रे स पक्षातून बाहेर पडण्याचा आदेश देण्यात आला.
त्यांनी जनमोर्चा या नवीन पक्षाची स्थापना केली. पुढे त्याचे विसर्जन जनता दलात करुन ते जनता दलातील एक प्रभावी नेते झाले. त्यानंतर समाजवादी जनता दल असे संयुक्त पक्षाचे नामकरण करण्यात आले (१९८८–९०). या पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस यश मिळविले; पण स्वबळावर शासन स्थापण्याइतपत त्यांच्याकडे संख्याबळ नव्हते. म्हणून भा. ज. प. व कम्युनिस्ट पक्ष यांच्या सहकार्याने नॅशनल फ्रंट (राष्ट्री य आघाडी) स्थापण्यात आली. तिचे निमंत्रक व्ही. पी. सिंग होते. या आघाडीने त्यांना नेतृत्व दिले आणि व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले . त्यांनी अनेक सामाजिक सुधारणांच्या योजना मांडल्या. त्यांपैकी मंडल आयोगाने १९८० मध्ये इतर मागासवर्गीय समाजासाठी आरक्षण सुचविलेल्या २७ टक्क्यांचा समावेश होता. याविषयी काही नेत्यांनी व्ही. पी. सिंग यांची बाजू घेतली; पण काँग्रेससह अनेक पक्षांनी या विधेयकाला संसदेत विरोध केला.
उत्तर भारतात विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश येथे अनेक विद्यार्थी नाराज झाले. शिवाय भा. ज. प. अध्यक्ष अडवानी यांना रथयात्रेच्या निमित्ताने अटक करण्यात आली होती. त्यामुळे भा. ज. प.ने व्ही. पी. सिंगांचा पाठिंबा काढून घेतला. परिणामी व्ही. पी. सिंग यांचे सरकार गडगडले आणि त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. अखेर मंडल आयोगाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अन्वयार्थ आणि निर्णय यांकरिता प्रविष्ट झाले. सर्वोच्च न्यायालयाने १६ नोंव्हेंबर १९९२ रोजी व्ही. पी. सिंग यांचा या संदर्भातील सुधारणा ठराव काही फेरबदलांसह संमत केला. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली; तथापि प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते राजकारणातून अलिप्त राहिले. मंझिलसे जादा सफर हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्घ आहे विश्वनाथ प्रताप सिंग यांचे २७ नोव्हेंबर २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
ज्येष्ठ आंबेडकरी नेते आणि माजी मंत्री दादासाहेब_रुपवते यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९२५ रोजी अकोले, अहमदनगर येथे झाला.
दामोदर तात्याबा तथा दादासाहेब रुपवते यांचे प्राथमिक शिक्षण अकोलेत व पुढील शिक्षण नाशिकला झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ कॉलेजमधून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले.प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत अर्थात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून दादासाहेब रुपवतेनी विद्यार्थी वर्गाने वसा घेतला. डॉ.आंबेडकरांच्या विचाराने दादासाहेब रूपवते प्रेरीत झाले होते. त्यांनी मुंबई विद्यापीठाची पदवी संपादन केली.
ज्या वेळी दादासाहेब रूपवते शिक्षण घेत होते त्याचवेळी डॉ. आंबेडकरांनी दादासाहेबांच्या अंगचे गुण ओळखून मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे रेक्टर म्हणून त्यांची नेमणूक केली. बाबासाहेबांचा जवळून सहवास लाभला व शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्राकडे ओढले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक कार्याची प्रेरणा घेऊन त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकत्यांच्या मदतीने दलित समाज सेवा संघ शैक्षणिक संस्था स्थापन केली. अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून वसतिगृहांची व विद्यालयाची निर्मिती केली. संगमनेर - अहमदनगर व पुणे येथे माध्यमिक विद्यालय केले. दलित व आदिवासी समाजातील मुला मुलींना शिक्षणाची संधी देण्यासाठी नगर मध्ये जिल्ह्यातील तालुक्यात वसतिगृहांची स्थापना केली. शिक्षणातून बाहेर पडणाऱ्या तरुण तरुणी आत्मकेंद्रित, मध्यमवर्गीय बनवू नयेत. असे दादासाहेबांना वाटत असे. सतीगृहे समाजपरिवर्तनाची क्रांतिकारी दृष्टी देणारी आणि सामाजिक बांधिलकीची दीक्षा देणारी स्फूर्तिस्थाने बनावी म्हणून प्रयत्न केले. शिक्षण क्षेत्रात जी दृष्टी घेऊन आले होते त्याची झलक त्यांनी वसतीगृहांना अर्थपूर्ण नावे दिली. त्यात श्रीरामपूरच्या वसतीगृहाला शंभूक नेवासे वस्तीगृहाला नागसेन, म.ज्योतिबा फुले व संगमनेर सिद्धार्थ विद्यालय व अ.नगर येथे संबोधी विद्यालय नावे दिली, कृती, शिक्षण, संस्कृती आणि परिवर्तना बदलची संम्यक दृष्टी यांची नावे साक्ष देतात. डॉ. आंबेडकरांची प्रेरणा घेऊन त्यांनी बहुजन शिक्षण संघ या संस्थेची स्थापना केली. २२ वसतीगृह ५ विद्यालय, २ कनिष्ठ महाविद्यालय, अने…केली.
दादासाहेबांच्या मुळगावी म्हणजे अकोलेत महाविद्यालयीन शिक्षणाची सोय नव्हती. अकोले तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी संगमनेर - नाशिक नगर पुणे जनतेला जावे लागे. दादासाहेबांनी पुढाकार घेऊन अकोले एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.अकोले येथील महाविद्यालयाचे दादासाहेब रुपवते विज्ञान अगस्ती वाणीज्य कला महाविद्यालय असे नामकरण करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण यांच्या सल्ल्यानुसार मराठी विश्वकोश निर्मितीच्या कार्यात लक्ष्मणशास्त्री जोशी यांना संपादक म्हणून संकलनास दादासाहेबांनी सहकार्य केले. त्यासाठी ते वाई येथे येऊन राहिले होते. पाली आणि संस्कृतसारख्या प्राचीन भाषांचे सार जतन करून, तत्कालीन राजकीय आणि सामाजिक समस्यांचे विवेचनात्मक विश्लेषण आणि त्याचे दस्तावेजकरण करून त्यांनी आपली बौद्धिक जबाबदारी पार पाडली. बौद्धधर्माच्या प्रसारात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी योगदान दिले. दादासाहेबांनी आंतरराष्ट्रीय मंचांवर भारतातील दलित आणि अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व केले.
१९६८ ते १९७८ या दहा वर्षांच्या कालावधीत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. १९७२ ते १९७५ आणि १९७७ ते १९७८ या कालावधीत दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. त्यावेळी त्यांच्याकडे समाज कल्याण, गृहनिर्माण, सांस्कृतिक, मत्स्यव्यवसाय, झोपडपट्टी इत्यादी खात्यांचा कार्यभार होता. ते विनोदी पण स्पष्टवक्ते होते. दादासाहेब रुपवते यांचे २३ जुलै १९९९ रोजी निधन झाले.
संजीव_वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Copyright © 2025 | Marathisrushti