जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
द्रमुकचे संस्थापक, तमिळनाडूचे राजकारणी व मुख्यमंत्री सी.एन. अण्णादुराई तथा कोंजीवरम नटराजन अण्णादुराई यांचा जन्म १५ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. तमिळ भाषेतील एक निष्णात लेखक असलेले अण्णादुराई आपल्या भाषणशैलीसाठी देखील प्रसिद्ध होते. पेशाने प्रथम शाळा शिक्षक व नंतर पत्रकार असलेल्या अण्णादुराईंचा पेरियार ह्या द्रविडी चळवळकर्त्या नेत्यास पूर्ण पाठिंबा होता. अण्णादुराईंनी १९३७ साली पेरियारच्या द्रविडर कळघम ह्या पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षामध्ये झपाट्याने प्रगती करताना अण्णादुराई व पेरियार ह्यांमधील मतभेद वाढीस लागले. १९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य पेरियारच्या मते द्रविड लोकांसाठी वाईट बातमी होती परंतु अण्णादुराई ह्यांनी स्वातंत्र्याचे स्वागत केले.
अखेर १९४९ साली अण्णादुराईंनी आपल्या द्रविड मुन्नेत्र कळघम ह्य नव्या पक्षाची स्थापना केली. प्रामुख्याने ब्राह्मणविरोधी धोरणे व हिंदी भाषेचा तिटकारा असलेल्या अण्णादुराईंनी १९५३ साली स्वतंत्र तमिळनाडूची मागणी करण्याचे ठरवले होते परंतु १९५६ सालच्या राजकीय पुनर्रचनेदरम्यान मद्रास राज्यामध्ये केवळ तमिळ भाषिक जिल्हेच राहिले व स्वतंत्र तमिळनाडू देशाची मागणी मागे पडली. वाढत्या लोकप्रियतेमुळे १९६७ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये द्रमुक पक्षाच्या आघाडीने २३७ पैकी १७९ जागांवर विजय मिळवून दणदणीत बहुमत मिळवले व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची येथील सत्ता संपुष्टात आणली.
सी.एन. अण्णादुराई यांचे ३ फेब्रुवारी १९६९ रोजी निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या सुमारे १.५ कोटी लोकांच्या गर्दीची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली होती. चेन्नईमधील मरीना बीच येथे त्यांचे स्मारक असून शहरामधील अण्णा सलाई हा सर्वात वर्दळीच्या रस्त्याला, अण्णा नगर ह्या भागाला, अण्णा विद्यापीठ ह्यांना त्यांचेच नाव देण्यात आले आहे. अण्णादुराईंच्या मृत्यूनंतर द्रमुकमध्ये फूट पडून एम.जी. रामचंद्रनने स्थापन केलेल्या अण्णा द्रमुक पक्षाला देखील त्यांचेच नाव दिले गेले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
रामानंद रसागर यांचा जन्म लाहोर जिल्ह्य़ातील असलगुरूके या गावी झाला. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९१७ रोजी झाला. त्यांचा मूळ परिवार पेशावर येथील. पेशावर सोडून ते काश्मीर येथे स्थायिक झाले. त्यांचे पणजोबा लाला शंकरदास चोप्रा, मूळचे श्रीमंत- आजोबा लाला गंगाराम यांनी आयात निर्मात व्यवसायांत अथक परिश्रम घेऊन एवढे उच्चस्थान प्राप्त केले की, समाजातील लोक त्यांना नगरश्रेष्ठ म्हणून संबोधत. रामानंद यांचे मूळ नाव चंद्रमौली होते, ते त्यांचे मामा सागर यांना दत्तक गेले. दत्तक विधानानंतर त्यांचे नाव रामानंद ठेवले गेले. मामाच्या घरी गरिबी असल्यामुळे लहान वयात ट्रक क्लिनर, ऑफिस कार्यालयात शिपायाचे काम अशी विविध कामे त्यांनी केली. मुळात साहित्याची आवड असल्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी ‘प्रितम प्रतीक्षा’ हे काव्य काश्मीर येथील प्रताप कॉलेजच्या मासिकासाठी लिहिले. पंजाब युनिव्हर्सिटीने त्यांना ‘मुन्शी फझल’ असा पर्शियन किताब व सुवर्णपदक बहाल केले.
१९३३ पासून साहित्य-काव्य-लेखन कार्यात ते मग्न झाले. वृत्तपत्रांतून स्तंभ लेखनाचे काम मिळाले. त्यांच्या लेखणीतील एक निराळी जादू लोकांना प्रभावित करू लागली. पंजाबमधील ‘मिलाप’ या वृत्तदैनिक पत्रिकेमध्ये पत्रकार म्हणून नियुक्ती झाली. ३२ कथा, ३ प्रदीर्घ कथा, २ नाटके, कादंबरी, दूरदर्शन मालिकांसाठी लिखाण केले. १९४२ मध्ये त्यांना क्षयरोगाने पछाडले. त्यातून ते संपूर्ण बरे झाले. स्वत:च्या अनुभवावरून ‘एका क्षयरोग्याची डायरी’ हे लिखाण केले. आयुष्याला वेगळं वळण मिळावं म्हणून कुटुंबासह ते मुंबईला आले. बरेच दिवस मुंबईत त्यांचा जम बसत नव्हता. त्या हालाखीच्या दिवसांत त्यांनी ‘और इन्सान मर गया’ हे उर्दू, हिंदी भाषेत अप्रतिम वास्तव चित्रण सादर केले. या पुस्तकाला अमाप लोकप्रियता लाभली. १९४२ मध्ये प्रकाशित झालेला दिलीपकुमारचा प्रथम चित्रपट ‘ज्वारभाटा’ याचे कथा लेखन केले. तेव्हापासून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत लेखन निर्मितीला सुरुवात केली आणि भारतीय चित्रपटसृष्टीत एखाद्या तळपत्या ताऱ्यासारखे ते चमकत राहिले. त्या आधी लाहोर येथे तयार केलेल्या ‘रायडर ऑफ द रेल रोड’ या मूकचित्रपट निर्मितीच्या वेळी क्लॅपर बायचे कामही त्यांनी केले. कुठलेही काम करण्यात कमीपणा मानायचा नाही असा त्यांचा स्वभाव होता. १९४९ मध्ये आर के निर्मित ‘बरसात’ चित्रपटाचे कथानक संवादलेखन केल्यामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. त्या आधी पृथ्वी थिएटरच्या नाटकासाठी त्यांनी लेखन केले होते.
१९५० मध्ये सागर आर्टस्’ या चित्रपटसंस्थेची स्थापना केली. १९५१ मध्ये ‘मेहमान’, ‘बाझूबंद’, १९५० मध्ये ‘बडी बहू’, १९५३ मध्ये ‘संगदिल’, १९५५ मध्ये ‘इन्सानियत’, १९५८ मध्ये ‘पैगाम’, ‘राजकुमार’, ‘कोहिनूर’ या चित्रपटासाठी लेखन केले. तसेच १२ दूरदर्शन मालिका चित्रित केल्या. १९६० ते १९६४ या कालावधीत ‘घुंघट’, ‘जिन्दगी’ या चित्रपटासाठी लेखन, दिग्दर्शक, प्रोडय़ुसर म्हणून काम केले. मद्रास येथील जेमिनी या चित्रपटसंस्थेला आर्थिक सहाय्य केले होते. १९८६ सालापर्यंतच २५ चित्रपटांची निर्मिती केली. २९ चित्रपटांसाठी कथानक लेखन केले- त्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. ‘आरझू’, ‘ललकार’, ‘चरस’, ‘बगावत’ या चित्रपटांनी सुवर्ण महोत्सवाचे यश प्राप्त केले. २५ चित्रपटांना सिल्व्हर ज्युबिलीचे यश लाभले. सागर आर्टस्च्या जवळपास २५ यशस्वी चित्रपटांचे सरासरी एकत्रित यश एकटय़ा ‘रामायण’ व ‘श्रीकृष्ण’ मालिकेला मिळाले. दूरदर्शनच्या माध्यमातून डॉक्टर रामानंद सागर यांनी निदर्शनास आणून या माध्यमातून ते उत्कृष्ट वापर करून जनसामान्यांपर्यंत पोहोचू शकतात व ज्ञान, मनोरंजन पुरवू शकतात हे दाखवून दिले. चित्रपटांमधून व्यावसायिक यश मिळविल्यानंतर १९८७ मध्ये रामानंद सागर छोटय़ा पडद्याकडे वळले व त्यांना धार्मिक मालिकेचे युगप्रवर्तक अशी संज्ञा प्राप्त झाली. १९८५ ते २००२ या कालावधीत सुमारे २००० तासांचे चित्रीकरण त्यांनी दूरदर्शन मालिकांसाठी केले.
‘रामायण’ या मालिकेचे डॉ. रामानंद सागर यांनी भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचे सृजनात्मक पद्धतीने सादरीकरण करून सर्वसामान्य जनमानसात मानाचे स्थान मिळविले. रामायणाची संकल्पना कल्पनेने सादर करून, लेखन, दिग्दर्शन, निर्माता या नात्याने तिन्ही आघाडय़ा यशस्वीरीत्या सांभाळून धार्मिक मालिकेचे युगप्रवर्तक अशी संज्ञा त्यांना प्राप्त झाली. तद्नंतर ‘श्रीकृष्ण’ ही महामालिका दूरदर्शनसाठी केली. ‘रामायण’, ‘अलिफ लैला’, ‘जय गंगा मय्या’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. फ्रान्स, जपान, लंडन बी. बी. सी.वर त्यांच्या कथांचे वाचनही झाले. भारत सरकारने २००१ मध्ये त्यांना पद्मश्री किताब देऊन गौरविले. त्याआधी १९९७ मध्ये डॉक्टर ऑफ लिटरेचर (डि.लिट.) जम्मू युनिव्हर्सिटी, ‘साहित्य वाचस्पती’ हिंदी साहित्य संमेलन प्रयाग-अलाहाबाद यांनी पदवी प्रदान करून गौरविले. मा.रामानंद सागर यांचे १२ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ शरद मेहेत्रे.
संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांवर असामान्य प्रभुत्व, असलेले मदनमोहन मालवीय निष्णात कायदेपंडित आणि प्रसिद्ध वकील होते. अखिल भारतीय कांग्रेस पक्षाची स्थापना १८८५ रोजी झाली. त्यावेळी ते काँग्रेसचे सर्वात तरुण संस्थापक सदस्य होते. त्यांची विद्वतप्रचुरता लपून राहिली नाही.
२७ जुलै १९७३ साली 'अभिमान' चित्रपट प्रदर्शीत झाला त्याला २७ जुलै २०१७ रोजी ४४ वर्षे झाली.
हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक उल्लेखनीय चित्रपटांपैकी एक मानल्या जाणाऱ्या काही चित्रपटांपैकी एक म्हणजे, १९७३ साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'अभिमान'. सांगितिक बहर असलेल्या या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी मूख्य भूमिका साकारल्या होत्या. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात बिंदू, असरानी यांसारख्या कलाकारांनीही उल्लेखनीय व्यक्तीरेखा साकारल्या होत्या.
दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्या कारकिर्दीतील लक्षणीय चित्रपटांमध्ये अनेक सिनेरसिकांनी 'अभिमान' या चित्रपटालाही पसंती दिली होती. 'अभिमान' चित्रपटाच्या लोकप्रियतेचे आणखी जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचे संगीत. एस. डी. बर्मन यांच्या संगीताने परिपूर्ण अशा या चित्रपटातील गाण्यांनाही सिने व संगीत रसिकांनी फार पसंत केले होते.
चित्रपटाचे कथानकच मुळात संगीतावर आधारलेले असल्यामुळे आजही 'अभिमान'ची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठीत गीतकार मजरुह सुलतानपुरी यांच्या लेखणीने शब्दबद्ध केलेली ही सुमधुर गीते लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार या नामवंत आणि पट्टीच्या गायकांनी गायली होती.
'तेरे मेरे मिलन की ये रैना', 'पिया बिना' या गाण्यांसह चित्रपटातील इतर सर्वच गीते आणि अमिताभ व जया यांच्या जोडीने साकारलेल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. 'अभिमान' मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी अभिनेत्री जया बच्चन यांना 'फिल्मफेअर'तर्फे 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अभिमान चित्रपटाची गाणी
https://www.dailymotion.com/video/x3gknt8
टाटा मोटर्स या नामांकित कंपनीसाठी सरपोतदार यांनी अनेक जाहिराती आणि माहितीपट (डॉक्युयमेंटरी) तयार केले. अजय सरपोतदार यांनी आपल्या विविधांगी कारकिर्दीत हैदराबाद येथील जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीत अनेक वर्ष वरिष्ठ निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली.
मराठीबरोबरच प्रादेशिक वाहिन्यांचे काम त्यांच्याकडे देण्यात आले होते. आपले वडिल विश्वा स सरपोतदार आणि आजोबा नानासाहेब सरपोतदार यांच्या पावलावर पाऊल टाकत चित्रपट क्षेत्रात काम करू लागलेले अजय सरपोतदार १९९५ मध्ये "पैंजण' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरले.
आजोबा नानासाहेब सरपोतदार यांनी १९१९ साली स्थापन केलेल्या आर्यन फिल्म कंपनीचे त्यांनी पुनरूज्जीवन केले. या कंपनीच्या बॅनरखाली सरपोतदार यांनी अलिकडेच कोटींचे बजेट असलेल्या उलाढाल या चित्रपटाची निर्मिती केली होती. बॉलिवूडमधील चित्रपटांच्या तोडीसतोड असे तांत्रिक पाठबळ वापरून हा चित्रपट तयार करण्यात आला होता. त्याचे चित्रिकरण मॉरिशसमध्ये करण्यात आले.
अजय सरपोतदार यांनी मॉरिशसमध्ये झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन केले.
अजय सरपोतदार यांच्यावरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
# Sarpotdar, Ajay
अभीनेते प्रदीपकुमार हे बंगाली नट. देवकी बोस यांच्या ‘अलकनंदा’ या बंगाली चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आले. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९२५ रोजी झाला. त्याचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश फिल्मिस्तानच्या ‘आनंदमठ’ या चित्रपटाने झाला. या चित्रपट संस्थेचे त्याची भूमिका असलेले ‘अनारकली’ व ‘नागिन’ हे चित्रपट तुफान गाजले. या बाबतीत ते फिल्मीस्तानचे सर्वेसर्वा शेठ तोलाराम जालन यांचे ऋण मानीत असे. कारण चित्रपट तयार झाल्यानंतर तो प्रदर्शित होण्यासाठी अनेक शहरांतून वितरण व्यवस्थादेखील जालन यांनी केली होती. त्याच्या ‘दीप प्रदीप’ या चित्रपट संस्थेने ‘पुलीस’, ‘एक झलक’,‘एक शोला’ हे चित्रपट प्रदर्शित केले. नंतरच्या काळातदेखील प्रदीप कुमार यांचा नर्गिसबरोबरचा ‘अदालत’, मीनाकुमारीबरोबरचा ‘आरती’ व बीना रॉय नायिका असलेला ‘ताजमहल’ हे चित्रपट रौप्य महोत्सवी ठरले. प्रदीपकुमार यांचे २७ ऑक्टोबर २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
प्रदीपकुमार यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=QnwWhCg_QZE
डॉ. सुरेंद्र शिवराम बारलिंगे हे महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष होते. १३ मराठी, सहा हिंदी व आठ इंग्रजी पुस्तके त्यांनी लिहिली.
निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१, श्रीशिवछत्रपती इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता.
गीता दत्त (पूर्वाश्रमीची गीता घोष रॉय चौधरी) यांचा जन्म बंगालमधील जमीनदार घराण्यात झाला. गीता दत्त यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९३० रोजी झाला. १९४६ साली ललिता पवार यांचे पती हनुमानप्रसाद यांनी प्रथम गीता दत्त यांना गाण्यासाठी पहिला ब्रेक दिला. गीता दत्त यांनी १९४६ मध्ये भक्त प्रल्हाद या चित्रपटातील गीतापासून आपल्या पार्श्वगायनाच्या कारकीर्दीचा प्रारंभ केला. १९४६ ते १९६६ या २० वर्षाच्या काळात गीता दत्त यांनी अनेक प्रकारची, वेगवेगळय़ा ढंगाची, मूडची आणि बाजाची गाणी गायिली. त्यांच्या आवाजात मादकता होती, पण संयत अन् जीवघेणी.
‘बाबूजी धीरे चलना’सारख्या गाण्यांनी तर काळजाचा ठोका चुकावा, पण तोच मादक, मदिर आवाज ‘मै तो प्रेम दिवानी’, ‘मेरा दर्द न जाने कौन’ किंवा ‘घुंघट के पट खोल तोहे पिया मिलेंगे’ अशा भजनांमध्ये तितकाच लीन-तल्लीन होताना दिसतो. गीता दत्त यांनी पुरुष गायकांसोबतही तितक्याच आत्मविश्वासाने गाणी गायिली. ‘खयालो में किस के इस तरह आया नहीं करते’ हे ‘बावरे नैन’मधलं गीत मुकेशबरोबर गाताना त्याच्या दमदार आवाजाला ताकदीने साथ दिली. तशीच ‘न ये चाँद होगा ना तारे रहेंगे’ गाताना हेमंतकुमारच्या भारदस्त आवाजापुढे ती दबली किंवा कोमजली नाही. ‘हम आप की आँखो को इस दिल में बसा ले तो’ या महंमद रफीबरोबरच्या गाण्याला खेळकर साथ देणारी गीता दत्त असते. गीता दत्त यांनी मराठी गाणीसुद्धा गायिली आहेत, ‘मुक्या मनाचे बोल सजना, बोल झाले फोल’ किंवा ‘जा सांग लक्ष्मणा सांग रामराजाला, म्हणावे न्या तुझा सीतेला’ ही मराठी गाणी गाणारी गीता दत्तच होत्या यावर विश्वास बसत नाही.
गीता दत्त यांनी संगीतविश्वात आपल्या सुरांनी चौफेर सैर केली. गाण्याच्या आशयाला आपल्या वैविध्यपूर्ण सुरावटींनी न्याय दिला. आपल्या विशिष्ट आवाजाची छाप संगीतक्षेत्रात उमटवली होती. असं असूनही तिच्या वाटय़ाला फार प्रसिद्धी आली नाही. दिग्दर्शक गुरू दत्त यांच्याशी त्यांनी विवाह केला. गुरुदत्त नावाच्या शोकांतिकेचा गीतादत्त ही एक हिस्सा होती. ‘जिन्हे नाझ है हिंदपर वो कहाँ है’ असं म्हणणारा गुरुदत्त, स्त्रीजीवनाचं वास्तव आपल्या कॅमे-याच्या तीक्ष्ण डोळ्यांतून टिपणारा गुरुदत्त गीताला स्वत:च्या चित्रपटांखेरीज इतरत्र गाऊ देत नव्हता, हे वास्तव नाकारता येत नाही. संगीतक्षेत्रात आणि व्यक्तिगत आयुष्यातही गीतादत्तच्या वाटय़ाला उपेक्षाच आली. ज्या मधूर-मदिर आवाजावर लुब्ध होऊन गुरुदत्तने गीता दत्तशी प्रेमविवाह केला होता, त्याच गीताला गुरुदत्तने वहिदा आयुष्यात आल्यानंतर दुरावलं होतं. गीता दत्त यांचे २० जुलै १९७२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=KsMrpO0YuxY
डॉ. श्रीकृष्ण लक्ष्मण कर्वे (जन्म १६-०८-१९३४) मुंबई विद्यापीठाचे बी.कॉम (स्टॅट.) एल.एल.बी., एम.ए. (भाषाविज्ञान) पीएच.डी. फेलो, इन्शुरन्स इन्स्टिट्यूट्स ऑफ इंडिया राष्ट्रभाषा प्रवीण, हिंदी शिक्षक बंद, मराठी साहित्य विशारद, मराठी साहित्य भूषण, वंग भाषा कोविद, तामिळ पदविका, फ्रेंच पदविका, अनेक वर्षे सामाजिक जाणीवेतून हिंदी प्रचारक.
Copyright © 2025 | Marathisrushti