जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं.वी.जोशी यांचा जन्म १९ जानेवारी १८९२ रोजी झाला. 'सुधारक' या पत्राचे संपादक वि. रा. जोशी हे त्यांचे वडील. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण. फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. (१९१३), एम्.ए. (१९१६) झाले. पाली भाषेचा विशेष व्यांसग. १९२० पासून बदोद्यात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य. प्रथम आठ वर्षे बडोदा कॉलेजात पाली, इंग्रजी आणि मराठी या भाषांचे प्राध्यापक. १९२८ पासून बडोदा सरकारचे दप्तरदार. १९४९ मध्ये निवृत. बडोद्याच्या वास्तव्यात गुजराती भाषेशी त्यांचा उत्तम परिचय झाला.निवृत्तीनंतर पुण्यास आल्यावर मराठी साहित्य परिषदेच्या कार्यात सहभाग.
बडोद्याच्या 'सहविचारिणी सभे' च्या विद्यमाने निघणा-या 'सहविचार' ह्या नियतकालिकाचे ते एक संपादक होते. 'अ मॅन्युअल ऑफ पाली सध्दम्मप्पकासिनि' (संपादन), 'पाली कंकॉर्डन्स' (कोश), 'जातकांतील निवडक गोष्टी... (१९३०)', 'शाक्यमुनि गौतम' (१९३५), 'बुध्दसंप्रदाय व शिकवण' (१९६३) , ही त्यांची ग्रंथनिर्मिती त्यांच्या पालीच्या व्यासंगाची द्योतक आहे; पण याहीपेक्षा चाळीसांवर पुस्तके लिहून त्यांनी मराठी विनोदाच्या क्षेत्रात जी कामगिरी बजावली ती विशेष महत्त्वाची होय.
विनोदी लेखनाची प्रेरणा त्यांना कोल्हटकर-गडक-यांच्या कोटित्वयुक्त लेखनातून मिळाली व त्याचा ठसा आपणास त्यांच्या प्रारंभीच्या 'एरंडाचे गु-हाळ... (१९३२)' मधील लेखन व 'चिमणरावांचे च-हाट... (१९३३)', मधील विवाहविषयक लेख यांवर स्पष्ट दिसतो. या मराठी लेखकांबरोबरच मार्क ट्वेन, डब्ल्यू. डब्ल्यू. जेकब्स, जेरोम के जेरोम, हर्बर्ट जेकिन्स, स्टीफन लीकॉक यांच्या विनोदी लेखनाचे संस्कार त्यांच्यावर झाले.
पूर्वीच्या विनोदकरांप्रमाणे त्यांनीही चिमणराव व गुंडयाभाऊ अशी मानसपुत्रांची जोडगोळी जन्मास घातली आणि तिला विविध लोकव्यवहारांतून फिरवून आणले. पण त्यांच्या चित्रणात अतिशयोक्तीपेक्षा स्वभावोक्तीवर आणि समाजसुधारणेच्या मंडनापेक्षा मानवी स्वभावातील साध्यासुध्या विसंगतींच्या दर्शनावर भर राहिला. त्यांची निवेदनशैलीही मर्मभेदक कोटित्वापेक्षा मार्मिक व स्वभाविक संवादानी नटलेली आहे.
त्यामुळे त्यांचे लेखन निबंधरूप होण्या ऐवजी त्याला ललित कथेचा घाट प्राप्त झाला व त्यातून मध्यमवर्गीयांचे एक अस्सल व स्वयंपूर्ण विश्व साकार झाले. वर उल्लेखिलेल्या पुस्तकांशिवाय वायफळाचा मळा' (१९३६), आणखी चिमणराव (१९४४), ओसारवाडीचे देव (१९४६), गुंडयाभाऊ (१९४७), रहाटगाडगं (१९५५), हास्यचिंतामणी (१९६१), बोरीबाभळी (१९६२), हे त्यांचे विनोदी लेखसंग्रह प्रसिध्द आहेत. 'चिमराव स्टेट गेस्ट' ह्या त्यांच्या एका कथेवरुन काढण्यात आलेला 'सरकारी पाहुण' हा चित्रपट महाराष्ट्रात विलक्षण गाजला होता. चिं.वी.जोशी यांचे निधन २१ नोव्हेंबर १९६३ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२२३०१७३३
संदर्भ. ग्लोबल मराठी
अंगावर सरसरून काटा येईल अशी शैली आणि मांडणी हे नारायण धारपांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य.
‘जिनका घर शिशों का होता है, वो दुसरों पर पत्थर फेंका नही करतें’ अशा दमदार डायलॉगबाजीने प्रेक्षकांच्या टाळय़ा घेणाऱ्या राजकुमार उर्फ भूषण पंडित यांची ओळख विशिष्ट शैलीतील संवादफेक गोष्टींसाठी म्हणून अधोरेखित झाली.
गणेश वासुदेव मावळणकर हे १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते.
मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. १८४० साली जोतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. फुले परिवार हा मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्यााच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला.
जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्यांतनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
१ मे १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.१ जानेवारी १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी मिशनर्या्नी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या.
त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा २०१६ सालीही चालू आहे. (मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे १८४७ मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी १८४९ मध्ये पहिली Co-ed शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.)
सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचेकेशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणार्याध मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणार्यात बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्नींचचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही. सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला.
हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. सावित्रीबाई फुले यांचे १० मार्च १८९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
तमाशापटांतील ’नाच्या’च्या भूमिकांमधील अभिनयाबद्दल ते ओळखले जात. त्यांचा जन्म १९१९ रोजी कोल्हापुर येथे झाला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बालपणीच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून, फुले-खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरता आर्थिक हातभार लावावा लागला. अशा परिस्थितीतदेखील कोल्हापुरात त्या काळी चालणाऱ्या रामायणाच्या खेळांत ते हौसेने अभिनय करीत. रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बऱ्याचदा सीतेची भूमिका वठवली.
दरम्यान राजा गोसावी यांच्याशी मा.पाटलांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून पाटलांचा मास्टर विनायकांच्या शालिनी सिनेटोनमध्ये प्रफुल्ल पिक्चर्समार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी सुतारकाम, रंगभूषा साहायकाची कामे केली. मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापुरास परतले. त्या सुमारास पाटलांना राजा परांजप्यांच्या ’बलिदान’ व राम गबाल्यांच्या ’वंदे मातरम्’ चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय-कारकीर्द फुलवणारी भालजी पेंढारकरांच्या ’मीठभाकर’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका मिळाली. चित्रपटांबरोबरीनेच पाटील नाटकांतही अभिनय करीत. जयशंकर दानवे यांच्या ’ऐका हो ऐका’ या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची - म्हणजेच ’नाच्या’ची - आव्हानात्मक भूमिका त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली. ’जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली. पाटलांनी अभिनीत केलेल्या नाच्याच्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन कृष्णा पाटलांनी ’वाघ्या मुरळी’ चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली. या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनयकौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटांत दृढावत गेले. गणपत पाटील यांच्या जीवनावर आधारीत नटरंग हा चित्रपट खूप गाजला. गणपत पाटील यांचे २३ मार्च २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
स्वातीने कळत नकळत, कुंकू, वादळवाट, विवाहबंधन, पुढचं पाऊल, पारिजात अशा अनेक मालिकांमध्ये उत्तम अभिनय केला आहे. तसेच तिने ‘वन टू का फोर’ या नाटकात देखील उत्तम अभिनय केला आहे. विशेष म्हणजे केवळ मराठीच नाही तर स्वातीने हिंदी मालिकांमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे.
के. आर. नारायणन यांना केवळ देशातच नव्हे तर विदेशातही अनेक मानसन्मान मिळाले. साहित्यातही त्यांची विशेष रुची होती. शालेय स्तरापासूनच त्यांनी विशेष श्रेणी मिळवली होती. परिवारातील बंधूत त्यांचा चौथा क्रमांक होता.
बॉलिवूडची 'उलाला गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. तिचा जन्म १ जानेवारी १९७८ रोजी झाला.विद्या बालन लहानपण मुंबई मध्ये गेले. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.
एकदा तिने माधुरी दीक्षितला टीव्हीवर 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' या गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना बघितले आणि तेव्हाच निश्चय केला, की ती अभिनेत्रीच होणार. विद्या डान्स आणि गायन शिकली. मात्र विद्याने अभिनेत्री व्हावे, अशी तिच्या पालकांची इच्छा नव्हती. मात्र पालकांच्या इच्छेविरुद्ध कॉलेजमध्ये गेल्यानंतर विद्या अभिनय करायला लागली. सिनेमात पदार्पण करण्यात अपयशी ठरलेल्या विद्याने जाहिरातीत काम करण्यास सुरुवात केली. 'हम पांच' या टीव्ही शो मिळेपर्यंत तिने खूप संघर्ष केला. समाजशास्त्रमध्ये मास्टर डिग्री मध्ये करण्यापूर्वी तिने जवळपास ९० जाहिरातीत काम केले होते. समाजशास्त्रमध्ये एम.ए केल्यानंतर विद्याला मोहन लाल यांच्या मल्याळम सिनेमात ब्रेक मिळाला. परंतु मोहन लाल आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये वाद झाला आणि सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले. मोहन लाल आणि दिग्दर्शक कमालने त्यापूर्वी आठ सुपरस्टार सिनेमे दिले होते, म्हणून या वादासाठी विद्या बालनला दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर विद्याने जेवढे मल्याळम सिनेमे साइन केले होते, त्यामधून तिला काढून टाकण्यात आले.
त्यामुळे विद्या स्वतःला कमनशिबी समजू लागली होती. विद्याला नंतर प्रदीप सरकारने त्यांच्या एका अल्बमसाठी साइन केले. 'यूफोरिया' हा त्याकाळचा गाजलेला अल्बम होता. विद्याने नैराश्य बाजुला सारुन या अल्बममध्ये काम केले आणि तिला नशीबाची साथ मिळाली. प्रदीप सरकारने तेव्हा तिला सांगितलं होते, की 'मी तुझ्यासोबत एक सिनेमा बनवेल.' यामुळे विद्याचा आत्मविश्वास वाढला. त्यांच्या वचनाच्या आधारे सरकारने तिला 'परिणीती' सिनेमासाठी साइन केले.'परिणीती'नंतर विद्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. या सिनेमात तिने उत्कृष्ट अभिनय केला. पहिल्याच सिनेमासाठी विद्याला अनेक पुरस्कार मिळाले आणि विद्या बॉलिवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये सामील झाली. परिणीतासाठी विद्याला २००५ मध्ये सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर विद्याने 'मुन्ना भाई MBBS', 'कहानी', 'द डर्टी पिक्चर', 'कहानी' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. साऊथ इंडियन असूनदेखील विद्याचे बंगालसोबत खास कनेक्शन आहे. तिला बंगालीत बोलायला आवडते.
प्रथम सलग चार वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवण्याचा विक्रम तिने केला आहे. विद्याची प्रत्येक भूमिका एक नवीन ठसा उमटवते. प्रेक्षकांना तिची प्रशंसा करायला भाग पाडणारा तिचा अभिनय सर्वांनाच आकर्षित करतो. परंतु विद्याला हे यश इतक्या सहजासहजी मिळालेले नाहीये. यासाठी तिने खूप मेहनत केली. ४० स्क्रिन टेस्ट, १७ मेकअप शूट दिल्यानंतर तिला 'परिणीता' मिळाला होता. विद्या बालनने ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. ‘द डर्टी पिक्चर’, ‘कहानी’ सारखे चित्रपट विद्या बालनने केले तेव्हा त्या भूमिका साकारण्याचं धाडस कोणी केलं नव्हतं. विद्याने ते आव्हान पेललं, आणि साहजिकच तिला ‘हिरो’ हे बिरुद चिकटलं. तिथून पुढे येताना या बदलाचा चेहरा असलेल्या विद्याला लोक ‘लेडी आमिर खान’ म्हणू लागले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
जवळजवळ ४० वर्षे पोलिस दलासाठी कार्यरत असताना, मधुकर झेंडे यांनी त्यांच्या काळात खतरनाक गुन्हेगार चार्ल्स शोभराज, हाजी मस्तन आणि करीम लाला यांना जेल मध्ये टाकले.
Copyright © 2025 | Marathisrushti