जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
आज ७ नोव्हेंबर... प्रतिभावान संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी यांची पुण्यतिथी. जितेंद्र अभिषेकी यांचे निधन ७ नोव्हेंबर १९९८ रोजी झाले.
त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले.
ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊनही त्यांचे मित्र मात्र समाजाच्या सर्व थरांतले होते. नाव जितेंद्र पण मंगेशीतले सर्वजण त्यांना ‘गंपू’ म्हणून हाक मारायचे. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण २१ गुरु केले व प्रत्येक गुरुकडून नेमकं तेवढंच घेतलं. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही.ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते.संस्कृतपासून ते उर्दु शेरोशायरी पर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते. सुस्पष्ट उच्चार,लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेऊन मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं मर्म होतं. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म. अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे.विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवित झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळे. या नाटकातल्या पदांचं संगीत अभिषेकींचे होतं. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. ‘मत्स्यगंधा’ नाटकातील सुरूवातीची नांदी ही पंडितजींची शब्दरचना व चाल होय. एकाच गाण्यात अनेक राग व ताल हा एक वेगळा प्रयोग त्यांनी ‘कटयार’ मधील ‘सुरत पियाकी’ या रागमालेत केलेला दिसतो. ‘घेई छंद मकरंद’ या पदासाठी दोन घराण्यातील गायन शैली तर दिग्दर्शन ही एक ईश्वरी देणगीच आहे हे ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या पदावरून प्रत्ययास येते. हे पद म्हणजे नाटयसंगीतातील पसायदान होय. ‘काटा रूते कुणाला’ ‘रती रंगी’ ‘कैवल्याच्या’ ‘हे सुरांनो’ ‘हे बंध रेशमाचे’ ‘साद देती हिमशिखरे’ इ.अनेक प्रासादिक रचना त्यांनी केल्या. पंडितजींनी ‘मत्स्यगंधा’ ते ‘महानंदा’ मराठी संगीत नाटकांचे ‘अभिषेकी युग’ त्यांनी तयार केले व गाजवले आणि मोठी क्रांती घडवून आणली. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्राया नाट्य प्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारं होतं. अभिषेकींनी जसं स्वत: संगीत दिलं तसं दुसर्यां च्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणी साठी केलेल्या बिल्हण या संगीतिकेत पु.लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती.
आकाशवाणी वर असतांना त्यांनी अनेक कोकणी गाण्यांनाही संगीत दिलं. पंडीतजी कोकणी नाटकात कामे केली होती. पं. अभिषेकी बोरकर संपादित ‘पोरजेचो आवज’ या नियतकालिकात लेखन करीत असत. ‘वैशाख वणवा’ या चित्रपटासाठी चित्रपटाचे लेखन पं.महादेवशास्त्री जोशी यांच्या सांगण्यावरून केले होते. पंडीतजीनी ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा’ हे कोकणी नाखवा गीत गायले होते. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेले हे त्यांचे एकमेव चित्रपट गीत.
नाटयसंगीत भक्तीगीत अभंग भावगीत हिन्दी भजन यांना लावलेल्या चालींची संख्या १०० ते १५०च्या दरम्यान जाते. जवळजवळ १७ नाटकांचे दिग्दर्शन केले.
पं. अभिषेकी १९७० साली पं.रविशंकर यांचे बरोबर प्रथम अमेरिकेस गेले. तेथे विद्यादानाचे काम केले. त्यामध्ये संगीत देवनागरी लीपी भारतीय भाषा हेही शिकवीले. दोन वर्षांनी स्वतंत्रपणे अमेरिकेत कार्यक्रम केले. भारतात व परदेशात पंडितजींनी अनेक संगीत मैफिली गाजविल्या. पंडीतजी गवैये तसे खवैयेही होते. एखादी गोष्ट आवडली की ते त्याचा मनमुराद आनंद लुटत. एकदा तर त्यांनी ४० ते ५० पाणीपुर्या खाल्या होत्या असे सांगतात, त्यांच्यात पहेलवानी मस्ती सुद्धा होती.
१९९५ मध्ये पंडितजींनी नाटय संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. ‘गोवा कला अकादमी’च्या व ‘संगीत नाटक अकादमी’च्या जनरल कौन्सिलचे ते मेंबर होते.
जितेंद्र अभिषेकी यांचे निधन ७ नोव्हेंबर १९९८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अतुल कुलकर्णी हे मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते आहेत. त्यांना हे राम चित्रपटातील श्रीराम अभ्यंकर या व्यक्तिरेखेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय पेज थ्री व रंग दे बसंती व नटरंग या चित्रपटांतील त्यांच्या भुमिकांनाही चिकित्सकांकडून दाद मिळाली. विविध मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.
जगातील केवळ चारच लोकांना १११ वर्षे वयाचे जीवनभाग्य लाभलेले आहे. पालघर (माकूणसार) येथील रघुनाथ जीवन राऊत हे त्यापैकी एक होऊ शकले असते. मात्र वयाचे १११ वे वर्ष पूर्ण होण्यास केवळ सहा दिवस बाकी असताना त्यांचे निधन झाले.
साहित्य क्षेत्रातील ठाण्यातलं एक अग्रगण्य नाव म्हणजे निलीमा पालवणकर IM.A.M.Phil (मराठी साहित्य) या विषयातून करुन त्यांनी एक वर् मराठीची प्राध्यापिका म्हणून आचार्य मराठे महाविद्यालयात अध्यापनाचं कार्य केलं. १८ महिने “वृत्तमानस” मध्ये दर पंधरा दिवसांनी एक, कवितेवर आधारित रसग्रहण पद्धतीचे स्तंभलेखनही त्यांनी केलं.
दाक्षिणात्य चित्रपटात त्याने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून अभिनयाची हुकूमत गाजवली.त्यांनी जोडी नंबर १ आणि सरकार राज सारख्या अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केले आहे. त्यांनी बिग ब्रदर, जॅकपॉट,देवधर गांधी, दिशा, वास्तुशास्त्र, परवाना,दानव, लाल सलाम अशे अनेक हिट सिनेमे आपल्या अभिनयाने गाजवले.
हेमू अधिकारी हे नावाजलेले क्रिकेट खेळाडू होते. ते ऊजव्या हाताने फलंदाजी करत असत तसेच आवश्यकता असल्यास लेग-स्पिन गोलंदाजीही करत.
रविंद्र मंकणी यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच झाशीची राणी या ऐतिहासिक हिंदी मालिकेतही त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
चॅरिटी बिगिन्स अॅट होम हा मंत्र अंगी बाणवून डॉ. रवी वानखेडे यांनी स्वत:च्या दोस्तासाठी किडनी दान केली. आधी भूदल, पुढे हवाई दलाची सेवा, नंतर परदेशात वैद्यकसेवा आणि त्यानंतर जागतिक दर्जाच्या रक्तपेढीचा ध्यास घेतल्यानंतर आता अवयव दानाचे महत्त्व पटवून देण्यात ते व्यग्र आहेत.
आधी केले मग सांगितले !
चित्रपटांची संपूर्ण दुनिया ग्लॅमरभोवती फिरते त्यामुळे अनेकदा पुरस्कारांवर प्रमुख नट-नटय़ांचीच नावे कोरली जातात आणि चरित्र अभिनेते त्यापासून वंचित राहतात. पी. सावळाराम पुरस्कारांमध्ये शुभा खोटेंचे नाव येणे हे त्यामुळे चकित आणि आनंदित करणारे आहे. पावणेदोनशे चित्रपटांमध्ये आणि अनेक टी.व्ही. मालिकांमध्ये तसेच इंग्रजी रंगभूमीवर सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या शुभा खोटे यांच्या अभिनय प्रतिभेचे खरे तर कधीच गांभीर्याने विश्लेषण झाले नाही.
अनेकदा अभिनेते प्रसिद्धीकडे गांभीर्याने पाहत नाहीत आणि प्रसार माध्यमांचेही डोळे कायम प्रमुख अभिनेत्यांकडेच लागलेले असतात. शुभा खोटे यांनी अगदी सुरुवातीला नायिका, सहनायिका म्हणून काही चित्रपट केले; परंतु त्याची कारकीर्द खरी गाजली ती चरित्रनायिका अथवा विनोदी अभिनेत्री म्हणून. किंबहुना विनोदी अभिनेत्यांच्या प्रभावळीत स्वत:चे असे स्वतंत्र स्थान मिळवू शकलेल्या काही मोजक्या अभिनेत्रींमध्ये शुभा खोटेंचे नाव अव्वल क्रमांकावर आहे. क्रीडाक्षेत्रात मनापासून रमत असलेल्या किशोरवयीन शुभा खोटेचे एक छायाचित्र पाहून निर्माता-दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांनी तिला ‘सीमा’ या चित्रपटात भूमिका दिली. १९५५ साली आलेल्या या चित्रपटात शुभा खोटे कॉलेज कन्यका म्हणून सायकल चालविताना दिसल्या. शुभा खोटेंच्या विनोदी शैलीत सांगायचे झाले तर ‘सीमा’नंतर त्यांची अभिनयक्षेत्रातील वाटचाल ‘सायकल’ सारखीच झाली. म्हणजे नायिकेसारखी ‘मोटरगाडी’ची कारकीर्द तिच्या वाटय़ाला आली नाही. अर्थात शुभा खोटेंनी स्वत:ला अगदी सुरुवातीपासूनच वैविध्याची चटक लावली.
‘पेईंग गेस्ट’मध्ये त्यांनी चक्क खलनायिका साकारली होती. परंतु आपली ही व्यक्तिरेखा पडद्यावर पाहण्याची त्यांची स्वत:चीच हिंमत झाली नाही. १९५७ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट शुभा खोटेंनी १९८० नंतर कधीतरी व्हिडीओवर पाहिला म्हणतात. १९५९ साली प्रदर्शित झालेला एल. व्ही. प्रसाद यांचा ‘छोटी बहन’ हा चित्रपट शुभाबाईंच्या अभिनय कारकीर्दीतला खरा ‘टर्निग पॉईंट’ म्हणावा लागेल. मेहमूद, शुभा खोटे आणि धुमाळ ही धमाल ‘तिकडी’ किंवा ‘त्रिकूट’ याच चित्रपटापासून जन्माला आले आणि पुढील जवळपास दोन दशके त्यांनी संगीतमय प्रेमपटांमध्ये धमाल उडविली. शुभा खोटे आणि मेहमूद यांची प्रेमकथा आणि शुभाच्या वडिलांच्या भूमिकेत धुमाळ. धुमाळ सतत या दोघांच्या पाळतीवर, अशी ‘हमखास हास्यकथा’ त्यात असे. ससुराल, दिल एक मंदिर, दिल तेरा दिवाना, भरोसा, जिद्दी अशा अनेक चित्रपटांमध्ये प्रेमाची ही लपवाछपवी रंगली. त्यातूनच ‘मै तेरे प्यार मे क्या क्या न बना दिलवर’ सारखी धमाल गाणी जन्माला आली. चित्रपटाच्या मुख्य कथानकातले ताण-तणाव सुसह्य करण्याचे काम या तिघांनी चोख बजावले.
नर्स, शेजारीण, आई, मैत्रिण, ख्रिश्चन शेजारीण, शाळेची मुख्याध्यापक, मुलींच्या वसतीगृहाची प्रमुख अशा अक्षरश: शेकडो व्यक्तिरेखा शुभा खोटेंनी १९७० नंतरच्या शंभरेक चित्रपटांमधून साकारल्या. परंतु त्यात लक्षात राहिली ती ‘एक दुजे के लिये’मधली ‘सपना’ची अर्थात रती अग्निहोत्रीची प्रेमद्वेष्टी आई. वासूनं पाठवलेली चिठ्ठी सपनाची आई जाळून टाकते, तेव्हा त्या पत्राची राख कॉफीत घालून सपना ती कॉफी पिऊन टाकते. तेव्हा ‘सपनाची आई’ म्हणून शुभा खोटेंनी दिलेला ‘लूक’ केवळ अवर्णनीय म्हणावा लागेल. चित्रपटांमधील भूमिकांचा वेग मंदावल्यावर शुभा खोटेंनी मराठी चित्रपट निर्मितीचाही प्रयत्न करून पाहिला. १९६७ साली ‘चिमुकला पाहुणा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही शुभा खोटे यांनी केले. अर्थात एकाच चित्रपटात ही मोहीम थंडावली आणि नंतरच्या काळात शुभा खोटेंनी इंग्रजी रंगभूमीकडे मोर्चा वळविला.
भरत दाभोळकर यांच्या अनेक ‘हिंग्लीश’ नाटकांमध्ये ‘देशी विनोद’ करणाऱ्या व्यक्तिरेखा त्यांच्या वाटय़ाला आल्या. दरम्यानच्या काळात दूरचित्रवाणीवर विनोदी मालिकांचा सुकाळ झाला त्यातही त्यांनी अनेक व्यक्तिरेखा साकारल्या. परंतु गेली काही वर्षे त्या सवयीने आणि सरावाने भूमिका साकार करीत आहेत. आजही शुभा खोटेंचे नाव घेतले की, संगीतमय प्रेमकथांचा हिंदी चित्रपटांचा जमाना डोळ्यांपुढे येतो. धुमाळच्या ‘संरक्षणाखाली’ खोलीत बंद असलेली उपनायिका शुभा खोटे आणि तिच्या वियोगात ‘ऊर बडवीत’, ‘प्यार की आग मे तनबदन जल गया’ म्हणणारा मेहमूद. त्या सर्व मनोरंजक क्षणांसाठी आपण शुभाजींचे ऋणी आहोत!
वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्री म्हणून एक तपाची कारकीर्द स्थैर्य व गतिमान विकास यासाठी उल्लेखनीय ठरली. दोन युद्धे, तीन मोठी राज्यव्यापी अवर्षण यासारख्या संकटांना तोंड देतानाच त्यांनी शेतीचा अमूलाग्र विकास करुन महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत जवळजवळ स्वयंपूर्ण बनविला; म्हणूनच त्यांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते मानले जाते.
Copyright © 2025 | Marathisrushti