जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
भारत सरकारमध्ये मानव संसाधन मंत्रालयाचा (Human Resources Development) कार्यभार सांभाळणारे श्री प्रकाश जावडेकर हे एक लोभस व्यक्तिमत्त्व. सतत हसतमुख असणं हे त्यांच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्यच आहे. त्यांचा जन्म ३० जानेवारी १९५१ रोजी पुणे येथे झाला.
पुणेकर असलेले श्री जावडेकर हे गेली कित्येक वर्षे भाजपा, जनसंघ आणि रा.स्व. संघाचे कट्टर कायकर्ते आहेत. आाणिबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. त्यांचे वडील केशव कृष्ण जावडेकर हे हिंदू महासभेचे कार्यकर्ते आणि नेते होते.
प्रकाश जावडेकर यांनी पुणे विभागातून दोन वेळा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व केले. ते महाराष्ट्र सरकारच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्षही होते. महाराष्ट्र भाजपाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी अनेक वर्षे सांभाळल्यानंतर त्यांना केंद्रात बोलावून घेण्यात आले आणि केंद्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली. ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. तब्बल तीन निवडणूकांमध्ये त्यांनी पक्षप्रवक्त्याची जबाबदारी सांभाळली.
२०१४ मध्ये मोदी सरकारमध्ये त्यांचा समावेश झाला. त्यांच्याकडे पर्यावरण आणि माहिती नभोवाणी खात्यांचे स्वतंत्र पदभार असलेले राज्यमंत्रीपद सोपविण्यात आले. सध्या ते केंद्रात पर्यावरण मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
कोणत्याही प्रकारचा राजकीय गॉडफादर त्यांच्या पाठीशी नसतानाही एक सामान्य कार्यकर्ता ते केंद्रात मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्यांची निष्ठा, तळमळ आणि चिकाटी यांचे दर्शन घडवितो.
यापूर्वी त्यांच्याकडे पर्यावरण खात्याचा स्वतंत्र कारबार होता. पर्यावरण मंत्री या नात्याने महाराष्ट्राची अनेक वर्षे रखडलेली अनेक प्रकल्यांच्या मंजूरीची कामे त्यांनी मार्गी लावली. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीत त्यांचा मोठा सहभाग आहे आणि महाराष्ट्र त्यांच्याकडे नेहमीच आदराने पहात राहील.
स्टीव्ह बकनर हे वेस्ट इंडीज अनुभवी पंच. स्टीव्ह बकनर यांनी डिकी बर्ड यांचा विक्रम २००२ मध्ये मागे टाकून २००५ मध्ये कसोटीत १०० सामन्यात पंचगिरी करणारे ते पहिले पंच ठरले होते. बकनर यांनी १९९२, १९९६, १९९९, २००३ व २००७ च्या वर्ल्ड कप फाइनल मध्ये अम्पायरिंग केले होते. हे एक रेकॉर्ड आहे.
प्रसिद्ध बासरीवादक, संगीतज्ञ, संहितालेखक, जाहिरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक अजित सोमण यांचा जन्म ६ ऑगस्ट १९४७ रोजी झाला.
अजित सोमण यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होते. तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालय, तसेच स.प. महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे इंग्रजी तसेच रानडे इन्स्टिट्यूट येथे पत्रकारिता, तर सिम्बायोसिस येथे अजित सोमण यांनी Creative writing and Mass communication अशा विषयांचे अध्यापन केले.
पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ अप्लाईड म्युझिक, म्युझिक ॲप्रीसिएशन हे विषय शिकवले. या अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तक म्हणून वापरल्या जाणाऱ्या 'संगीत' या पुस्तकाचे ते सहलेखक होते. सोमण यांनी लिहिलेल्या अनेक जिंगल्स व जाहिराती प्रसिद्ध झाल्या. "ऊंचे लोग ऊंची पसंद", "चवीनं खाणार त्याला केप्र देणार", " या वर्षी पु.लंची दिवाळी तुमच्या घरी ", "सकाळ घरात आला की, आजोबांपासून नातवापर्यंत सासूपासून सुनेपर्यंत सगळ्यांचा स्वार्थ एकदम जागा होतो", " प्रत्येक कुटुंबासाठी-कुटुंबातील प्रत्येकासाठी सकाळ" या काही त्यांच्या गाजलेल्या जाहिराती आहेत.
बासरी वादक म्हणून अजित सोमण यांनी अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केले. सुधीर फडके, यशवंत देव, पं.हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके, आनंद मोडक, सुधीर मोघे, पं. बिरजू महाराज, पं. कालीचरण महोपात्र, पंडिता रोहिणी भाटे, प्रभा मराठे, डॉ.सुचेता चापेकर, मनीषा साठे, पार्वती दत्ता, रोशन दात्ये यांच्याबरोबर विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी बासरीची साथ केली. 'सखी मंद झाल्या तारका', 'ही वाट दूर जाते ' यांसारख्या अनेक प्रसिद्ध गाण्यांमध्ये किंवा इंडो जॅझ ग्रुपच्या अँटीग्रॅव्हिटी, बुगी फॉर हनुमान या मध्ये अजित सोमण यांनी बासरी वाजवली आहे. अजित सोमण यांनी अनेक लघुपटांसाठी पार्श्वसंगीत दिले आहे.
युजीसीच्या अंतर्गत तयार केलेल्या "राग रंजन" या मालिकेच्या आखणीपासून ते संहितालेखनापर्यंत सर्व काम अजित सोमण यांनी केले होते. या मालिकेला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. सोमणांच्या चाहत्यांत बिरजू महाराज, प्रभा मराठे, रोहिणी भाटे पार्वती दत्ता तसेच संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश होता. स्वरानंद, सुगम, आशा पब्लिसिटी अशा संस्थांचे अजित सोमण यांनी विश्वस्त अध्यक्ष म्हणून काम पाहिले. दिग्दर्शक अजित सातभाई यांनी अजित सोमण यांच्यावर एक लघुपट केला आहे. अनेक औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सांगीतिक लघुपटांसाठी तसेच अनेक दृकश्राव्य कार्यक्रमांसाठी सोमण यांनी संहिता लिहिल्या आहेत.
त्यांनी 'राऊ' सारख्या मालिकेसाठी आणि 'देवी अहिल्याबाई' या चित्रपटासाठी गीतलेखन केले. 'एक होता विदूषक' चित्रपटातील तराणा अजित सोमण यांनी लिहिला होता.
'टोकन नंबर', 'या आमुच्या हसऱ्या घरात' सारख्या मालिकांचे शीर्षकगीत व NDA चे स्फूर्तिगीत सोमण यांनी लिहिले होते. 'लाखाची गोष्ट', 'गुळाचा गणपती', 'गाभारा' या गाजलेल्या चित्रपटांची इंग्रजी उपशीर्षके सोमण यांची होती. अजित सोमण यांनी कथक नृत्यासाठी अनेक बॅले, ठुमऱ्या लिहिल्या आहेत. संगीत, जाहिरात, शिक्षण, साहित्य अशा क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करून ठसा उमटविणारे बासरीवादक अजित सोमण यांच्या स्मृत्यर्थ विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सोमण परिवारातर्फे दरवर्षी स्वरशब्दप्रभू पुरस्काराने सन्मान करण्यात येत असतो. तसेच उदयोन्मुख कलाकाराला त्यांच्या नावाची शिष्यवृत्तीही देण्यात येते.
आजवर हा पुरस्कार सुधीर गाडगीळ, अरुण काकतकर, मनीषा साठे, रमाकांत परांजपे, सुधीर मोघे, श्रीधर फडके यांना मिळाला आहे. तसेच अजित सोमण यांच्या स्मृत्यर्थ ललित कला केंद्रातील सर्वोत्तम विद्यार्थी किंवा विद्यार्थीनीचा सोमण परिवारातर्फे दरवर्षी 'स्वरशब्दप्रभू’ शिष्यवृत्ती देऊन सन्मान करण्यात येतो. अजित सोमण यांचे २ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
कीर्ती शिलेदार ह्या जयराम व जयमाला शिलेदार यांच्या कन्या. त्यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५२ रोजी झाला. आपल्या आई, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताची आराधना केलेल्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. त्यांचे शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे झाले. कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४००० हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले.
संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली.
संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे केली आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थाने बिनीच्या शिलेदार आहेत. रंगभूमीवर भूमिका रंगवताना त्यांनी नेहमी अभ्यासपूर्ण सौंदर्यशोध घेतला. त्यामुळेच त्यांच्या सर्व भूमिका आगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे.
संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्ताने भारतभर तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे. संगीत स्वरसम्राज्ञी हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून जे तीनपात्री सौभद्र सादर करतात.
कीर्ती शिलेदार यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कीर्ती शिलेदार यांची गाजलेली नाटके
‘अभोगी’, ‘एकच प्याला’, ‘कान्होपात्र’, ‘द्रौपदी’, ‘भेटता प्रिया’, ‘मंदोदरी’, ‘मानापमान’, ‘मृच्छकटिक’, ‘ययाति आणि देवयानी’, ‘रंगात रंगला श्रीरंग’, ‘रामराज्यवियोग’, ‘रूपमती’, ‘विद्याहरण’, ‘शाकुंतल’, ‘शारदा’, ‘श्रीरंग प्रेमभंग’, ‘संशयकल्लोळ’.
पेणच्या मांगरुळ गावच्या इनामदारांपैकी एक. सन १९०८ साळी श्री.धारकर यांच्या बंगल्यावरील हत्यारे चोरुन नेण्याचा आरोप त्यांचे बंधू दामोदर आत्माराम मोकाशी व प्रभू समाजांतील इतर तरुणांवर आला होता.
संत एकनाथांनी समाजमनाची नस ओळखली आणि भारुडांच्या माध्यमातून समाजातील अपप्रवृत्तींवर हल्लाबोल केला. नाथांच्या याच सामाजिक प्रबोधनाचा वारसा सांगत चंदाबाई तिवाडी या लोककलावंत सध्या महाराष्ट्रभर भ्रमंती करत आहेत. भारुडाच्या माध्यमातून समाजातील दुष्प्रवृत्तींवर कडाडून हल्ला चढवत आहेत.
आज ११ नोव्हेंबर..आज हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याचे प्रवर्तक अब्दुल करीम खाँ यांची जयंती.
अब्दुल करीम खाँ यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८७२ रोजी झाला.
अब्दुल करीम खाँ यांचे वडील काले खान हे गुलाम अलींचे नातू होत. अब्दुल करीम खाँ साहेबांनी आपले काका अब्दुल्ला खान व वडील काले खान यांचेकडे सांगीतिक शिक्षण घेतले. त्यांचे दुसरे काका नन्हे खान यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. गायनाबरोबरच त्यांनी सारंगी, सतार, वीणा व तबलावादनात नैपुण्य प्राप्त केले. अब्दुल करीम खाँ साहेबांना म्हैसूर राज दरबारात गायनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तिथे त्यांची गाठ कर्नाटकी संगीतातील अनेक सुप्रसिद्ध गायक प्रभृतींशी पडली. त्यांच्या गायनाचा प्रभाव अब्दुल करीम खाँ साहेबांच्या गायकीवरही पडला. त्यांनी कर्नाटकी संगीताचा कसून अभ्यास केला. कर्नाटकी संगीतातील अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या गायकीतही दिसून येत असत. ते फक्त उत्तर भारतातच नव्हे तर दक्षिण भारतातही आपल्या गाण्यासाठी लोकप्रिय होते. दक्षिण भारतात त्यांना अनेक ठिकाणांहून गाण्याचे कार्यक्रम करण्यासाठी खास बोलाविले जाई. त्यांनी दाक्षिणात्य कवी त्यागराजयांच्या कृतीही ध्वनिमुद्रित केल्या आहेत.. अनेकदा लोक तिथे त्यांच्या गळ्यात मोठमोठे हार घालून त्यांचे स्वागत करण्याबरोबर त्यांची मिरवणूकही काढत असत. खाँ साहेब वैयक्तिक आयुष्यात मात्र अतिशय साधे होते. म्हैसूर राज दरबारी ते नित्य नियमाने हजेरी लावत असत. त्यांना तिथे 'संगीत रत्न' उपाधी देऊन गौरविण्यात आले. म्हैसूरच्या वाटेवर ते धारवाडला आपल्या भावाकडे मुक्काम करत असत. तिथेच त्यांनी आपले ख्यातनाम शिष्य सवाई गंधर्व यांना गाणे शिकविले. इ.स. १९०० मध्ये आठ महिने त्यांनी सूरश्री केसरबाई केरकर यांनाही गाणे शिकविले. पुढे केसरबाईंनी गायन क्षेत्रात खूप नाव कमावले. १९१३ मध्ये अब्दुल करीम खाँ साहेबांनी पुणे येथे आर्य संगीत विद्यालयाची स्थापना केली. येथे ते भविष्यातील गायक तयार करू लागले. अब्दुल करीम खाँ साहेबांना वाद्यांविषयीही कमालीचा जिव्हाळा होता. ते वाद्ये दुरुस्त करण्यात पटाईत होते. त्यांच्याजवळ वाद्ये दुरुस्तीसाठी लागणारी सामग्री सदैव असे. मिरज येथील नामवंत सतार व तानपुरा बनविणारे कारागीर देखील त्यांचा सल्ला शिरोधार्थ मानत व अनेकदा त्यांचे मार्गदर्शन घेत असत. आर्य संगीत विद्यालयाची दुसरी शाखा १९१७ मध्ये मुंबई येथे सुरू झाली. परंतु ती दोन - तीन वर्षांपलीकडे जास्त टिकली नाही. नंतर ते मिरज येथे स्थायिक झाले.
अब्दुल करीम खाँ साहेबांच्या शिष्यांत सवाई गंधर्व, सुरेशबाबू माने, बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी, दशरथबुवा मुळे, रोशन आरा बेगम, हिराबाई बडोदेकर इत्यादी प्रतिभावंत गायकांचा समावेश होतो.
त्यांच्या 'जमुना के तीर', 'गोपाला करुणा क्यूं नही आवे', 'पिया के मिलन की आस', 'नैना रसीले', 'पिया बीन नही आवत चैन' यांसारख्या अजरामर ध्वनिमुद्रणांनी आजही ते रसिकांच्या हृदयात घर करून आहेत. दर वर्षी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऑगस्ट महिन्यात मिरज येथे मोठा संगीत महोत्सव साजरा होतो. भारतातील नामी कलावंत तेव्हा येऊन आपली कला सादर करतात व उस्तादांच्या प्रती आपला आदर व्यक्त करतात. *मा.अब्दुल करीम खाँ * यांचे २७ ऑक्टोबर १९३७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आज २६ ऑक्टोबर आज आज संत नामदेव यांची जयंती.
संत नामदेव यांचा जन्म शिवाजी महाराजांच्याही जवळपास चारशे वर्षं आधी, २६ ऑक्टोबर १२७० रोजी झाला. तेव्हा उत्तरेत मुस्लिम सत्ता स्थिर झाली होती. दक्षिणेत त्याचा पायरव ऐकू येत होता. धर्माच्या नावाने हिंदू धर्म मार्तंड आणि मुस्लिम शासक बहुसंख्य भारतीयांना दुय्यम दर्जाचं जिणं जगण्यास भाग पाडत होते. त्याविरुद्ध संतपरंपरेनं मोठी क्रांती घडवली. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या या क्रांतीचं नेतृत्व नामदेवांनी केलं.
ते एका शिंपी परिवारात जन्मले. त्यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी गावात किंवा पंढरपुरात झाला. वडील दामाशेटी. आई गोणाई. आऊबाई बहीण. अकराव्या वर्षी लग्न झालं ते राजाईंशी. नारायण, महादेव, गोविंद, विठ्ठल ही चार मुलं. लिंबाई मुलगी. लाडाई, गोडाई, येसाई, साखराई या सुना. असा छान बहरलेला संसार त्यांनी केला. त्यांच्या देवपिसे होऊन केलेल्या भक्तीला सुरुवातीला विरोध झाला. पण नंतर त्यांनी सगळ्यांना आपलं बनवलं. या सगळ्या परिवारानेच नामदेवांच्या प्रभावात अभंगरचना केली आहे.
अगदी लहानपणापासूनच नामदेव विठ्ठलमय झाले होते. पांडुरंगच त्यांचं सर्वकाही होता. आई बाप सोयरा सखा गुरू देव स्वामी तोच होता. विठ्ठलाशी ते संवाद साधत. या बालभक्ताच्या हट्टापायी विठ्ठलाने दुधाचा नैवेद्य सेवन केला, अशी स्रर्वात प्रसिद्ध कथा आहे. पुढे दगडाचा देव बोल नाही, अशी आपल्या अभंगातून ग्वाही देणा-या नामदेवांनी लहानपणीच अध्यात्मिक क्षेत्रात मोठाच अधिकार प्राप्त केला होता, एवढं मात्र यातून नक्कीच म्हणता येईल. पण नामदेवांची दुसरी कथा यापेक्षाही महत्त्वाची आहे. सुकी भाकरी पळवून नेणा-या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन जाणारे नामदेव, देवाला दूध पाजणा-या नामदेवांपेक्षा महत्त्वाचे आहे. ते लहान वयातच सर्वांभूती भगवंत पाहू शकत होते, हे महत्त्वाचं. नामदेवांनी सत्य समजून घेण्यासाठी वेदज्ञ, शास्त्रज्ञांकडे हेलपाटे घातले. पण ज्ञातिहीन नामदेवांना कोण उभं करणार? त्यामुळे त्यांनी भक्तीतून म्हणजे थेट भगवंतालाच आधार मानून स्वतःच बुद्धीचा कस लावत विश्वाचे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून ते लंगोटी नेसून चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन करत सद्विचारांचा प्रसार करू लागले होते. ही वाट स्वतःच शोधायची होती. त्यातून साधनेची नवीनवी साधनं निर्माण होऊ लागली. श्रोत्यालाही सामावून घेणारी वारकरी सामूहिक कीर्तन भजनाची मुहूर्तमेढही त्यांनीच रोवली. त्यासाठी त्यांनी अभंग या छंदाची निर्मिती केली. अभंग हा छंद गाळला, तर मराठी वाङमयात काय उरतं, याचा विचार केलेला बरा.
नामदेवांनीच वारक-यांचा लाडका काल्याचा सोहळाही सुरू केला. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी नुकतीच भगवद्गीतेची गंगा मराठीत आणली होती. त्यातून नामदेवांना आपल्या कामासाठी तत्त्वज्ञानाचं अधिष्ठानच मिळालं होतं. कुशल संघटक असणा-या निवृत्तीनाथांना आणि नामदेवांना एकत्र यावसं वाटणं स्वाभाविकच होतं. त्यासाठी वयाने आणि कर्तृत्वाने ज्येष्ठ असून नामदेव स्वतः आळंदीला गेले. तिथे संत गोरा कुंभारांच्या नेतृत्वात झालेल्या संतसंमेलनांमधल्या चर्चांमधून नामदेवांना भगवद्कार्यासाठी अधिक ज्ञान मिळवण्याची गरज लक्षात आली. त्यासाठी त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून देवाच्या सगुण निर्गुण रूपाविषयी स्पष्टता मिळवली. याच देवळात कीर्तन करताना त्यांचा पुरोहितांनी केलेला अपमानही त्यांच्यासाठी विचारांचा टर्निंग पॉइंट ठरू शकेल इतका ताकदीचा आहे, हे देखील लक्षात ठेवायला हवं.
नामदेव ज्ञानदेव भेटीतून विचारांचा नवा प्रवाह उदयाला येत होता. ज्ञान आणि भक्तीचा हा संगम होता. त्यातून कीर्तनाच्या रंगी नाचत देशभर ज्ञानदीप लावण्यासाठी दोघांच्याही प्रभावातली सगळी संतमंडळी एकत्र झाली. त्यांची एकत्र तीर्थयात्रा सुरू झाली. महाराष्ट्र पिंजून गुजरात, राजस्थान आणि पंजाबापर्यंत हे संत गेले. माणसाला माणूस बनवण्याची ही धडपड होती. नामदेव कीर्तन करत. चोखामेळ्यासारखे अस्पृश्यही टाळकरी बनून त्यांना साथ देत. जनाबाईंसारखी जातीने अतिशूद्र असणारी स्त्री कीर्तनाचं संचलन करत. ज्ञानदेव अभंग सूचवत. अशा जातीपातीच्या भिंती तुटत होत्या. गोरा कुंभार, सावता माळी, परिसा भागवत, चोखा महार आणि त्यांचा परिवार, जगन्मित्र नागा, नरहरी सोनार, दासी जनी सगळेच त्यात होते. पंजाबातून जाल्हण सुतारही पंढरपुरापर्यंत सोबत आले. हे संत म्हणजे टाळकुटे विरक्त नव्हते तर त्या त्या समाजांचे धार्मिक, वैचारिक आणि सामाजिक नेतेच होते. या ऐतिहासिक तीर्थयात्रेचं उद्यापन पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटावर झालं. स्पृश्य अस्पृश्य, उच्च नीच असे सगळे भेदाभेद सहभोजनात गळून पडले. धर्माच्या नावाखाली चालणा-या नीच जातिभेदांना दिलेला हा मोठा धक्का होता. पुढे नामदेवांनी पंढरपुरातल्या विठ्ठलमंदिराच्या दारात उभी केलेली चोखोबांसारख्या अस्पृश्याची समाधी त्यांच्या खंबीर क्रांतिकारत्वाचा पुरावाच आहे.
यानंतर लवकरच ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. त्याचा अत्यंत हृदयद्रावक आंखो देखा हाल नामेदवांनी लिहून ठेवलाय. पुंडलिकापासून जनाबाईंपर्यंतच्या भक्तांचं चरित्र लिहून नामदेवांनी या क्रांतिकारक चळवळीचं मोठंच डॉक्युमेंटेशन करून ठेवलंय. ते महाराष्ट्रातले सगळ्यात महत्त्वाचे चरित्रकार मानायला हवेत आणि ते आद्य आत्मचरित्रकारही आहेत. त्यांनी एक कोटी अभंग लिहिले, असं मानलं जातं. याचा अर्थ त्यांनी विपुल संख्येने साहित्यरचना केली असा घ्यायला हरकत नाही. त्यांच्या साहित्याची भाषा खूपच सोपी आहे. ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, चांगदेव या त्यांच्या समकालीनांच्या तुलनेत आज आपल्याला त्यांची भाषा लगेच कळते. त्यांनी कायम अत्यंत सर्वसामान्यांसाठी लिहिलं. त्यात संवाद आणि नाट्य आहे. लोककलांचे विविध फॉर्म त्यांनी हाताळलेत. श्रीकृष्णाच्या लीला सांगताना त्यांनी मराठीतल्या पहिल्या बालकविताही लिहिल्यात.
मराठीतल्या गझलेची पहिलं पावलं शोधतानाही संशोधक त्यांच्यापर्यंत पोहोचतात, इतकं त्यांचं लिखाण वैविध्यपूर्ण आहे. तरीही त्यांचं खूपच कमी साहित्य आज उपलब्ध आहे.
ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतरही नामदेवांनी तीर्थयात्रा करून रामेश्वरापासून मुलतानपर्यतचा भारत पालथा घातला. जिथे गेले तिथले बनले. लोकभाषांतून काव्य केलं. हिंदी साहित्याला नवं भान दिलं. त्यांच्या कामातूनच पुढे रामानंद, कबीर, नानक, दादू दयाळ, मीरा, नरसी मेहता, मलूकदास अशी संतांची मांदियाळी देशभर उभी राहिली. पंजाबात तर ते दोन दशकांहून अधिक काळ राहिले. तिथे त्यांनी केलेल्या मशागतीतून शीख धर्माचा वटवृक्ष उभा राहिलाय.
नारायण आणि नामदेव एकच आहे असं मानणा-या शीख परंपरेच्या गुरू ग्रंथसाहेबातही नामदेवांची ६१ पदं आहेत. नामदेवांचा देशभरावरचा प्रभाव आजही पाहता येतो. महाराष्ट्र आणि पंजाबाबरोबरच राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश या राज्यांत त्यांची मंदिरं आहेत. तामिळनाडूपासून जम्मूपर्यंतचे लाखो लोक त्यांचं नाव एकतर आडनाव म्हणून किंवा जातीची ओळख म्हणून अभिमानाने मिरवतात.
नामदेवांनी ३ जुलै १३५० रोजी अत्यंत समाधानाने आपला देह ठेवला. त्यांची एक समाधी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर आहे. तर दुसरी पंजाबमधील घुमान येथे आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट /सचिन परब
नामदेवांच्या काही रचना.
तू माझी माऊली मी ग तुझा.
भावे तुझे चरण.
काय सांगू देवा.
कासा देस प्राण.
गेल्या वीस-पंचवीस वर्षांतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक-राजकीय बदलांचा आडवा-उभा वेध घेणारी प्रवीण बांदेकर यांची ‘चाळेगत’ ही कादंबरी कोकणातील सद्यस्थितीची हुबेहूब सावली ठरली आहे. आधी ‘विभावरी पाटील’ आणि आता सोलापूरचा मानाचा ‘भैरुरतन दमाणी’ पुरस्कार मिळवून बांदेकरांच्या या कादंबरीने समकालातील आपलं वेगळेपण अधोरेखित केलं आहे. अर्थात हे वेगळेपण केवळ कादंबरीच्या विषयात नाही, तिच्या मांडणीतही आहे. लेखकाने स्वत:शीच बोलावं, किंवा दशावतारातील शंकासुराने कथा सांगावी, असा कादंबरीचा साचा आहे आणि हा साचा कोकणातल्या मातीतूनच त्यांच्यात रुजलेला आहे. कारण बांदा-सावंतवाडीचं तळकोकण हीच बांदेकरांची जन्मभूमी, कर्मभूमीही आणि स्वप्नभूमीही. त्यामुळेच या स्वप्नभूमीत गेल्या काही वर्षांत झालेल्या बदलांनी (अर्थात वाईट बदलांनी) त्यांचं मन हळहळलं नसतं, तरच नवल होतं! ‘चाळेगत’ ही प्रवीण बांदेकर यांची पहिलीच कादंबरी!
राजीव गांधीच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अमेरिकन नागरिकत्व सोडून ते पंतप्रधानांचे मुख्य तंत्रज्ञान सल्लागार बनले. हे काम त्यांनी तब्बल दहा वर्षे दरसाल अवघा एक रुपया नाममात्र वेतन घेऊन केले. वीस वर्षांपूर्वी भारतात सुरू झालेल्या ‘पीसीओ ‘ क्रांतीचे पित्रोडा शिल्पकार ठरले. आज गावोगावी , गल्लोगल्ली दिसणाऱ्या ‘ पब्लिक टेलिफोन बूथ ‘ च्या मागे दूरभाष सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठीची पित्रोडा यांची कल्पकता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राबलेल्या तंत्रज्ञांच्या पलटणींचे परिश्रम आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti