जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
रामदास पाध्ये हे भारतामध्ये तसेच परदेशामध्येही या कलेमुळे नावाजले गेलेले हाडाचे कलाकार आहेत. त्यांनी बनविलेले व जीवंत केलेले अनेक बाहुले जगभरच्या रसिकांनी आपलेसे केले आहेत. टेलिव्हीजन मालिका, जहिराती, सिनेमे यांच्यातून सुध्दा ते आपल्या मनोरंजनासाठी भेटीस आले आहेत. आपल्या बाहुल्यांच्या कार्यक्रमांमधून बालविवाह, बालशिक्षण, ड्रग्स ची समस्या, जागतिक तापमानवाढ अशा महत्वाच्या मुद्दांवर ते नेहमीच भाष्य करतात. त्यांच्या जादुई बोटांचा स्पर्श झाला की त्या निर्जिव जीवांना नवं जीवनं मिळतं, ते रसिक जनांशी संवाद साधतात, त्यांना कधी हसवतात, रिझवतात, हास्याच्या कल्लोळामध्येही त्यांच्या जाणीवांचे पडदे खुले करून जातात. त्यांना प्रेम शिकव तात, संवेदनशिलतेचा मुलामा लावतात. मग तो लिज्ज्त पापड जहिरातीमधला बनी असो किंवा ‘दिल हे तुम्हारा’ मधील सर्वांना हवाहवासा वाटणारा बाहुला असो अशा निरनिराळ्या बाहुल्यांद्वारे रामदास पाध्ये प्रत्येक प्रयोगाला एखाद्या नवीन विचारांची, व कल्पनांची कुपी प्रेक्षकांसमोर उघडत असतात.
July 30, 2011
भालचंद्र पेंढारकर शिस्तीचे भोक्ते होतेच परंतु त्यांची रंगभूमीवर अमाप श्रद्धा होती. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच होणार आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरु करणारा एकमेव निर्माता आणि अभिनेते ते होते. मुबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवली आहेत.
December 9, 2021
भारतीय शास्त्रीय संगीत गायन परंपरेतील एक अग्रगण्य नाव. श्रीयुत यशवंत वैद्य यांचा जन्म १५ जून १९३२ रोजी झाला. १९५३ ते १९६० दरम्यान त्यांचे गुरु कै. भास्करबुवा फाटक यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. १९७२ साली गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली.
March 28, 2013
‘कथालक्ष्मी’ नावाचे मासिकही ते चालवत असत. त्या मासिकाचे तब्बल वीस वर्षे त्यांनी संपादन केले. या मासिकाच्या निमित्ताने त्यांनी मराठी कथाविश्वाला अनेक नव्या लेखकांचा परिचय करून दिला. त्या मासिकासाठी त्यांनी भालबा केळकर, केशवराव भोळे यांनाही लिहिते केले.वाटवे हे मुलाखतकार म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी घेतलेल्या शरद तळवलकर, प्रभाकर पणशीकर, राजा गोसावी, विवेक, लालन सारंग यांच्या मुलाखती विशेष गाजल्या. त्यांची अनेकांशी मैत्री होती. चित्रपट क्षेत्राबाबतच्या गप्पांमध्ये ते रंग भरत, जुने किस्से सांगत.
July 9, 2022
निंबाळकर, वामन
‘शिका आणि संघटित व्हा,’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश शिरोधार्ह मानून तो प्रत्यक्षात आणणाऱ्या पहिल्या पिढीला विद्रोहाचा हुंकार देण्यासाठी एकोणिसाव्या शतकातील साठोत्तरी दशक उजाडले. या पिढीने विद्रोहाचा हुंकार दिला आणि साहित्य-समाजकारण-राजकारण अशा विविध क्षेत्रात मानवतावादी परिवर्तनाच्याही मशाली पेटल्या.
विद्रोहाचे धुमारे प्रज्वलित करणाऱ्या आघाडीवरील गटात वामन निंबाळकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. बुलढाणा जिल्ह्य़ातील लांजुळ येथे १३ मार्च १९४३ रोजी जन्मलेल्या वामन निंबाळकर नावाची मशाल आंबेडकरी प्रेरणांच्या अदृश्य इंधनावर अखेरच्या क्षणापर्यंत कोणतीही तडजोड न स्वीकारता तेवत राहिली. औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरात पदव्युत्तर शिक्षण घेता-घेता त्यांच्या गावकुसाबाहेरच्या कवितांनी वेदनेचा आणि विद्रोहाचाही एक वेगळा हुंकार मराठी साहित्यात उमटवला. गावकुसाबाहेरची ती वेदना हा काही व्यक्तिगत अनुभव नव्हता तर ते एक विद्रोहाचे समूहगान होते. जाणिवा पक्व होण्याच्या त्या काळापासून ते परवा, अखेरचा श्वास घेईपर्यंत वामन निंबाळकर तीच वेदना, तोच हुंकार आणि तोच विद्रोह समंजस एकनिष्ठतेने व्यक्त करत राहिले. इतिहास आणि हिंदी या दोन विषयात एम.ए.ची पदवी घेतल्यावर आंबेडकरांची विचारधारा हीच त्यांची जीवननिष्ठा राहिली. याच विषयात त्यांनी एम.ए.ची तिसरी पदवी संपादन केली आणि मराठी कवितेतून घडणाऱ्या आंबेडकर दर्शनावर संशोधन करून पीएच.डी.ची सन्माननीय पदवी संपादन केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात आंबेडकर विचारधारा विभागात १३ वर्ष विद्यादान केल्यावर आंबेडकर विचारांचा पूर्णवेळ प्रचारक होण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि अखेरच्या श्वासापर्यंत प्रचारकाची ही भूमिका अविरतपणे निभावलीही. प्रचारकाची भूमिका स्वीकारल्यावर त्यांनी कविता टोकदार केली तशीच स्वत:तला समीक्षकही जोपासला. या समीक्षकाने नवोन्मेषाचे अंकुर जोपासण्याची सर्जनशील आणि संवेदनशील भूमिका स्वीकारली. त्यामुळे मराठीत नवे कवी-लेखक मिळाले तसेच, मराठी साहित्यात तोवर अव्यक्त राहिलेल्या वेदनेची वेगवेगळी रूपेही उमटली. समीक्षकाच्या भूमिकेतून ते प्रकाशकाच्याही भूमिकेत शिरले आणि त्यांच्या प्रबोधन प्रकाशनाने अनेकांना प्रसिद्धीचा मार्ग दाखवला. साप्ताहिक ‘आजचे प्रबोधन’ आणि ‘परिचारक’ यातून संपादक म्हणून पत्रकाराचाही रोल निभावला. दिवसेंदिवस आणि वर्षोगणती त्यांच्या कवितेतला अनुभव विराट सामूहिक होत होता.
भारतात प्रत्येक माणसाची
एक जात असते
येथे आग लावणारी
ती हमखास वात असते
सामूहिक स्वप्नभंगाचे विशाल दु:खही ते अशा संयत शब्दात नेमकेपणाने व्यक्त करत होते. निंबाळकरांचे ‘गावकुसाबाहेरच्या कविता’ नंतर ‘धर्मयुद्ध’ आणि ‘वाहत्या जखमांचा प्रदेश’ असे आणखी दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले. कवितेसोबतच अन्य ठाशीव लेखनही ते अनेक वर्ष सातत्याने करत होते. हे नुसतेच लेखन नव्हते तर त्यातून नवी माहिती देण्याची निंबाळकरांची ओढ कशी तीव्र होती, यासाठी ‘सामाजिक लोकशाहीचे प्रणेते डॉ. आंबेडकर’ आणि प्रा.म.भि. चिटणीस समग्र वाङ्मयाचा आढावा घेणारा ‘सामाजिक क्रांतीची दिशा’ या दोन ग्रंथांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांना बंदिस्त करण्यात आलेल्या जात व धर्माच्या बंधनापलीकडचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कसे होते, हे आंबेडकरांवरील ग्रंथातून पुरेसे स्पष्ट होते. वामन निंबाळकर व्यक्ती न राहता ते एक संस्था झाले होते. मात्र, या संस्थेचे आपण सर्वेसर्वा आहोत, याचा भ्रम न बाळगता मनस्वीपणे वामन निंबाळकर संचार करत राहिले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यातली या मनस्वी विद्रोहाची एक मशाल विझली आहे.
August 5, 2017
देशात एक काळ असा होता की प्रत्येक मध्यम वर्गातील कुटुंब बिग बाजारच्या सेलची वाट पाहायचा. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९६१ रोजी राजस्थानात झाला. कारण या सेलमध्ये महत्त्वाच्या वस्तूंवर मोठी सवलत मिळायची. 'सबसे सस्ता, सबसे अच्छा', कंपनीची टॅगलाइनची घरा घरात पोहोचली होती.बिग बाजार हे किशोर बियाणी यांचा ब्रांड होता.
रिटेल किंग म्हणून ओळख असलेल्या किशोर बियाणी हे KB या नावाने प्रसिद्ध आहेत. किशोर बियाणी यांचा जन्म राजस्थानमधील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा एकेकाळी राजस्थानहून धोती आणि साड्यांचा व्यवसाय करण्यासाठी मुंबईत आले होते. वयाच्या १४- १५ व्या वर्षी किशोर बियाणी हे मुंबईच्या सेंचुरी मार्केटमध्ये जाऊ लागले होते. अभ्यासात फारसे चांगले नव्हते. वडील आणि दोन चुलतभावांबरोबर काम करायचे, पण किशोर यांना त्यांचा कामाचा अप्रोच आवडला नाही. मग स्वत: ची गिरणी लावून स्टोनवॉश विकायला सुरुवात केली. ते मुंबईतील छोट्या दुकानात विकत असत. त्या काळी, त्यांच्या स्टोअरचा देखील ट्रेड बॉडीत समावेश केला जात नव्हता.
वयाच्या २२ व्या वर्षी मुंबईत किशोर यांनी ट्राऊजर बनवायला सुरुवात केली, जे चालूच होते. १९८७ साली त्यांनी पॅटलूनची सुरूवात केली होती. मॅनस वेअर प्रा. लि. मध्ये पॅटलूनच्या नावावर कपडे विकले जात होते. पॅटलून हे नाव निवडले गेले कारण ते उर्दू शब्द पतलून जवळ होते. ते केवळ निवडक स्टोअरमध्ये विकले गेले.१९९१ मध्ये गोव्यात पहीले पॅटलून दुकान सुरू केले आणि १९९२ मध्ये शेयर मार्केटमधून पैसे जमवले आणि एक ब्रँड तयार केला. पण पैसे कमी पडू लागल्याने २०१२ साली हा व्यवसाय आदित्य बिर्ला ग्रुपला विकला. पॅटलून आणि बिग बाजारची सुरुवात कोलकातामधून झाली होती. २००१ साली बियानी यांनी संपूर्ण देशात बिग बाजार स्टोअर सुरू केले.
किशोर बियानी यांनी गेल्या अनेक वर्षांत सातत्याने कर्ज घेतले आहे. त्यामुळे फ्यूचर रिटेल 105 कोटी रुपये कर्जाचे व्याज परतफेड करू शकले नाही, त्यानंतर या कंपनीच्या डिफॉल्टचा धोका वाढला आहे. 30 सप्टेंबर 2019 रोजी फ्यूचर ग्रुपच्या लिस्टेड कंपन्यांचे कर्ज 12,778 कोटी रुपयांवर गेले होते, जे 31 मार्च 2019 पर्यंत 10,951 कोटी रुपये होते. काही थकीत देयके देण्यासाठी बियाणी यांच्याकडे मार्चपर्यंतची मुदत होती, पण रिझर्व्ह बँकेच्या बंदीने फ्यूचर समूहाला थोडा दिलासा दिला. फेब्रुवारी 2020 च्या मध्यावर, बियाणी यांची कर्जे फेडण्याची क्षमता नसल्याची बाजारात चर्चा होऊ लागली, त्यानंतर कंपनीच्या शेयरमध्ये जोरात घसरण सुरू झाली. यानंतर बियाणी यांच्याकडे कर्जदात्यांनी कर्जाच्या बदल्यात जास्त शेयर मागण्यास सुरवात केली. किशोर बियाणी यांनी त्यांचा रिटेल व्यवसाय सप्टेंबर २०२० मध्ये रिलायन्सला विकला.
रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुपमध्ये झालेल्या या कराराची अनेक दिवस चर्चा सुरू होती. हा व्यवहार झाल्यानंतर त्याबद्दल चर्चा सुरूच आहे. पण बियाणी आणि अंबानी यांच्यात झालेल्या या व्यवहारातील एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दोघांच्यात झालेल्या करातानुसार किशोर बियाणी आता पुढील १५ वर्ष रिटेल व्यवसाय करू शकणार नाहीत. किशोर बियाणी यांची एक कंपनी आहे ज्याचे नाव Praxis Retail असून ती होम रिटेलचा व्यवसाय करते. Home Town स्टोअर याच कंपनीचे उत्पादन आहे. बियाणी आणि कुटुंब या व्यवसाय करू शकते. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये होम टाऊनचा महसूल ७०२ कोटी रुपये इतका होता. रिलायन्स सोबतच्या व्यवहारात फ्यूचर ग्रुपने रिटेलमधील या कंपनीला मात्र विकले नाही. त्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 9, 2021
दिलीप वेंगसरकर यांचा जन्म ६ एप्रिल १९५६ रोजी महाराष्ट्र राज्यात राजापूर येथे झाला. भारतीय क्रिकेट खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या काळात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण शैली असलेले फलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते. अतिशय तडाखेदार आणि उत्तम फटके मारणारे फलंदाज म्हणून ते गौरविले गेले होते.
February 4, 2010
लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते, हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे झाला. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते. लक्ष्मण शास्त्री जोशी यांची ओळख मुख्यत: `मराठी विश्वकोषाचे शिल्पकार' अशी असली, तरी ती ओळख अपुरी म्हणावी लागले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते थोर स्वातंत्र्य सैनिक, साहित्यिक, समाजसुधारक, हिंदू धर्माचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, अशी अनेक विशेषणे तर्कतीर्थांच्या नावापुढे लावणे शक्य आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे बिरुद म्हणजे त्यांना मिळालेली `तर्कतीर्थ' ही पदवी!
हिंदू धर्माच्या अभ्यासासाठी ते वयाच्या चौदाव्या वर्षी घराबाहेर पडले आणि सातारा जिह्यातील कृष्णाकाठच्या वाई येथे स्थायिक झाले. त्यांच्या तारुण्यात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात होती. त्या काळातील संवेदनशील तरुणांच्या ज्या भावना असत, त्याच भावना तर्कतीर्थांच्याही होत्या. त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत सक्रीय सहभाग घेतला. वयाच्या २९व्या वर्षी, म्हणजे १९३२ साली त्यांना तुरुंगात जावं लागलं. या वयापर्यंत तर्कतीर्थांनी संस्कृत भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळवलं होतं. हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. चारही वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलायला लागले होते. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते. आचार्य विनोबा भावे जेव्हा केवलानंद सरस्वती यांच्याकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी वाई येथे मुक्कामाला होते, तेव्हा तर्कतीर्थांचा विनोबाजींबरोबरचा सहवास वाढला. विनोबाजींनी त्यांना इंग्रजी शिकविले. त्याच दरम्यान एक घटना घडली. महात्मा गांधींचे पुत्र देवीदास यांचा सी. राजगोपालाचारी (स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल) यांच्या मुलीशी आंतरजातीय विवाह करण्याचा मनोदय होता. पण हिंदू पंडितांचा त्याला विरोध होता. हा पेच सोडविण्यासाठी तर्कतीर्थांना पाचारण करण्यात आले. त्यांनी आपल्या तर्कबुद्धीची चुणूक दाखवून असे विवाह हिंदू धर्माविरुद्ध नाहीत हे पटवून दिले. त्यामुळे गांधीजींनी खूश होऊन त्यांनाच लठाचे विधी करण्याचा मान दिला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर तर्कतीर्थांना अनेक पुरोगामी बुद्धिवाद्यांचा सहवास लाभला. एम. एन. रॉय हे त्यांपैकीच एक. १९५१ साली सरदार वल्लबभाई पटेल यांनी सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. जीर्णोद्धारानंतर मंदिर अस्पृश्यांसहित सर्वांना खुले करण्यात येणार होते. नेमके याच गोष्टीमुळे काशीच्या कर्मठ पंडितांनी मूर्ती प्रतिष्ठापनेचे धार्मिक विधी करण्यास नकार दिला. या काळातही तर्कतीर्थांनी आपल्या तर्कशुद्ध बुद्धीने पंडितांना पटवून दिले की, असे करण्यात कोणताही धर्मलोप नाही, उलट हाच खरा हिंदू धर्माचा विचार आहे.
१९५१ साली त्यांनी पुणे विद्यापीठात सहा प्रदीर्घ व्याख्याने दिली. त्या व्याख्यानांवर आधारीत `वैदिक संस्कृतीचा विकास' हा ग्रंथ त्यांनी लिहिला. या ग्रंथाद्वारे त्यांनी भारतीयांना वैदिक धर्मावर आधारीत जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. भौतिक सुख आणि अध्यात्म यांच्या कात्रीत भारतीय समाज सापडला आहे. त्यामुळे तो गोंधळलाही आहे, असे त्यांनी अतिशय तर्कशुद्ध रितीने प्रतिपादन केले. हा ग्रंथ अतिशय प्रभावी झाला. १९५५ साली या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. अर्थातच त्यांचे विचार काही कर्मठ पंडितांना पटण्यासारखे नव्हते. त्यामुळे तर्कतीर्थांना अशा तथाकथित पंडितांच्या वर्तुळात स्थान नव्हते. पण महाराष्ट्राचे द्रष्टे नेते यशवंतराव चव्हाण यांनी मात्र तर्कतीर्थांच्या विचारांवर संपूर्ण विश्वास टाकला. १९६० साली दोन अतिमहत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम तर्कतिर्थांवर सोपविण्यात आले. पहिला म्हणजे मराठी `विश्वकोषा'ची निर्मिती, तर दुसरा `धर्मकोषा'ची निर्मिती. ही दोन्ही कामे अतिशय अवघड अशी होती. `विश्वकोष' आणि `धर्मकोष' यांसारख्या ग्रंथांची निर्मिती करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले, त्याचे कारणही तसेच होते. त्यांनी त्याआधीसुद्धा अनेक महाकाय ग्रंथ लिहिले होते.
`शुद्धिसर्वस्वम्' हा त्यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ संस्कृत भाषेत होता, आणि तो १९३४ साली प्रकाशित झाला. त्याच वर्षी त्यांनी `धर्ममोक्ष' या ग्रंथाचे अठराशे पानांचे सहा अध्याय लिहिले. `हिंदू धर्माची समीक्षा', `वैदिक संस्कृतीचा विकास', `आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा', इत्यादी अनेक उत्तमोत्तम ग्रंथांची निर्मिती करून त्यांनी मराठी भाषेतील साहित्य समृद्ध करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांनी अठरा प्रमुख उपनिषदांचे मराठीत भाषांतरही केले. प्राचीन वैदिक धर्माचे समर्थक असूनही तर्कतीर्थ यांना वास्तवाचे भान होते. आधुनिक शास्त्रे, इंग्रजी भाषा, भारताची औद्योगिक प्रगती यांबाबत त्यांचे विचार अतिशय पुरोगामी होते. त्यामुळे तर्कतीर्थ हे अनेक जणांचे प्रेरणा स्थान राहिले. भारत सरकारने तर्कतीर्थांना १९७६ साली `पद्मभूषण', तर १९९२ साली `पद्मविभूषण' पुरस्कार देऊन गौरव केला होता. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी यांचे २७ मे १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 27, 2017
December 15, 2010
काही माणसं विशिष्ट ध्येय-उद्दीष्ट घेऊनच जन्माला येतात. त्यांच्या नावातच त्यांची ओळख समावून जाते. सतीश जकातदार हे व्यक्तिमत्व त्यातलंच! सतीश जकातदार आणि चित्रपट, सतीश जकातदार आणि आशय फिल्म क्लब ही ओळख अगदी पक्की होऊन गेलीय.
November 2, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti