(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे

    आपल्या अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला.

    अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले विनय आपटे गेली चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. विजय बोंद्रे यांनी त्यांना रंगभूमीवर आणले. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी ‘मेन विदाऊट शॉडो’ हे नाटक केले. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली. ‘थिएटर ऑफ अॅीव्हेलिबिलटी’ आणि नंतर ‘बहिष्कृत’ या एकांकिकामध्ये समुहाचा नेपथ्य म्हणून वापर करून त्यांनी आगळा प्रयोग केला.

    नाट्यदिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनदेखील प्रसिद्ध होते. मा.विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. मुंबईत दूरदर्शनची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष नाटक विभाग सांभाळला. दूरदर्शनसाठी त्यांनी ‘गजरा’सारख्या अनेक कार्यक्रमांचीही निर्मिती केली. नाटके, युववाणी अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते.

    महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी यांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती. ‘मी नथुराम बोलतोय’ या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्राची गोष्ट’ ‘अॅनन्टीगनी’ या प्रायोगिक नाटकांतूनही त्यांनी अभिनय केला होता. त्यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’मधील त्यांची बाबाची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेत ते काम केले होते. तसेच त्यांनी ‘गांधी’, ‘सत्याग्रह’, ‘चांदनी बार’, ‘धमाल’, ‘आंदोलन’ यासारख्या हिंदी चित्रपटात व काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.

    ‘दुसरा सामना’, ‘वन रूम किचन’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रानभूल’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘डॅडी आय लव्ह यू’ ही त्यांनी काम केलेली काही गाजलेली नाटके होती, तर ‘कुसुम मनोहर लेले’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ सारख्या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले. ‘रानभूल’ या नाटकात त्यांनी फिरत्या रंगमंचाचा वापर केला होता. नाटककार प्र. ल. मयेकर यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी जमली होती. ‘गणरंग’ ही व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी संस्थाही स्थापन केली होती. अखिल मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. गंगाराम गवाणकर यांच्या ‘करायचं ते दणक्यात’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. मा.विनय आपटे यांचे ७ डिसेंबर रोजी २०१३ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    त्यांची गाजलेली नाटके
    रानभूल, डॅडी आय लव्ह यू, तुमचा मुलगा करतो काय?, कबड्डी कबड्डी, शुभ बोल तो नाऱ्या, अफलातून.

    गाजलेले चित्रपट
    एक चालीस की लास्ट लोकल, सत्याग्रह, आरक्षण, राजनीती, जोगवा.

  • प्रदीप साठे

    प्रदीप साठे हे व्यक्तिमत्त्वच तसे वेगळे होते. छोटीशी मूर्ती, लहान शरीरयष्टी, जाड तपकिरी रंगाचा चष्मा, हलक्या आवाजातले बोलणे आणि हातात सिगारेट. ‘आवाज’ दिवाळी अंकातली ‘खिडकी चित्रे’ हे त्यांचे वैशिष्टय़ होते. त्या अनोख्या चित्रांसाठीच अनेक लोक त्यांना ओळखत होते. त्यांच्या या ‘खिडकी चित्रांचा’ एक मोठा चाहता वर्ग तयार झाला होता. अशा प्रकारची विनोदी चित्रे काढणारा हा माणूस बोलताना विनोदी असेल अशी जर तुमची समजूत असेल तर ती खोटी म्हणावी लागेल.

    साठे यांचे बोलणे हलक्या आवाजातले असले तरी ते ठाम असायचे आणि बहुतेक वेळा ते गंभीर विषयावरच बोलत. लोकांच्या समजुतीत ‘विनोदी’ असलेल्या या माणसाने आपला अंत मोठा दुर्दैवी करावा ही बाब मनाला चटका लावणारी होती. प्रदीप साठे यांनी आत्महत्या केल्याची बातमी आली आणि या बातमीवर कुणाचा विश्वासच बसेना. कदाचित आयुष्यात आलेल्या अनेक कठोर प्रसंगांवर मात करणे त्यांना कठीण गेले असावे. यातूनच त्यांच्यासारख्या एका कलाकार माणसाला हे जीवन संपविण्याचा विचार आला असावा. साठेंचे बालपण अतिशय चांगल्या स्थितीत गेले. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगलीच होती.

    मुंबईत मोठी जागा, वडिलांच्या मालकीची कंपनी. त्यामुळे घरात लक्ष्मी पाणी भरत होती. त्यांच्या वडिलांना प्राण्यांची फार आवड होती. त्यामुळे त्यांनी घरात मासे, पोपट, कुत्रे, कासव, मांजर इतकेच नव्हे तर माकड, अजगर आणि अगदी बिबळ्याचा बछडासुध्दा त्यांनी पाळला होता. अशा या प्राणी-पक्ष्यांच्या सहवासात प्रदीप वाढले. त्यांच्याशी हसत खेळत प्रदीप रेखाटने काढू लागले. या वातावरणात ते चांगलेच रमले होते. पुढे त्यांच्या कलाकृतींमध्ये विविध प्राण्यांची अ‍ॅनाटॉमीयुक्त चित्रे दिसत. याला त्यांच्या बालपणातील प्राण्यांच्या सहवासाची पाश्र्वभूमी होती. अर्थातच त्यांनी आपल्या आवडीनुसार आर्टस्कूलला प्रवेश घेतला. परंतु वडिलांना त्यांचा हा निर्णय काही मान्य नव्हता. यातूनच त्यांच्याशी मतभेद झाले. शेवटी स्वत: पार्टटाइम नोकरी करून फीचे पैसे भरून या कलाकाराने शिक्षण पूर्ण केले.

    शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक मासिकांत त्यांची चित्रे प्रसिध्द होऊ लागली. देशातील विविध भाषांतल्या कॉमिक्ससाठी त्यांनी चित्रे काढली. याद्वारे त्यांनी कॉमिकमधील चित्रकलेला एक दर्जा प्राप्त करून दिला. अशी चित्रे काढीत असताना त्यांची प्रामाणिक भूमिका होती की, आपण ‘इलस्ट्रेटर’ आहोत, पण आपण व्यंगचित्रकार नाही. ‘निवडक मराठी व्यंगचित्रे’ या पुस्तकाचे संपादन करीत असताना त्यांनी हे वास्तव आपल्या मित्रपरिवारात मान्यही केले होते. त्यांचे हे प्रामाणिक मत असले तरी त्यांना विनोदाची चांगली जाण असल्याने तसेच चित्रकलेतील त्यांचे नैपुण्य यामुळे त्यांनी बरीच व्यंगचित्रे काढली. प्रामुख्याने ‘आवाज’ या दिवाळी अंकातली त्यांची ‘खिडकी चित्रे’ लोकप्रिय झाली आणि हा तेथून कलाकार खरे तर जनतेपुढे आला. या व्यंगचित्रांच्या जोडीला त्यांनी विनोदी कथांना पूरक अशी रिअलिस्टिक शैलीतील असंख्य चित्रे काढली. त्यांच्या चित्रातील बारकावे अस्सल होते. चित्रातील रंगसंगती व पात्रांच्या चेहऱ्यावरचे हावभाव इतके प्रभावी असत की एखादा जिवंत प्रसंग साकारल्याचा भास होई. त्यांनी देशभरात काढलेल्या कॉमिक्समधील चित्रांनी त्यांना देश पातळीवर प्रसिद्धी लाभली.

    कॉमिक्ससाठी चित्रे काढताना त्यांनी स्वत: काही पात्रे तयार केली. त्यांच्या गोष्टी रंगविल्या आणि केवळ मुलांमध्येच नव्हे तर सर्वच वयोगटातील वाचकांना त्या भावल्या. मुलांसाठी कॉमिक्स करताना प्राणी विज्ञान हा विषय त्यांनी मोठय़ा खुबीने, सचित्र सांगून मोठा चाहता वर्ग मिळविला. चेहऱ्यावरच्या हावभावांबरोबर प्रसन्न रंगसंगती हे त्यांचे वैशिष्टय़ होते. मध्यंतरी त्यांनी एका अर्कचित्र प्रदर्शनासाठी अभिनेत्री नंदा हिचे काढलेले अर्कचित्र विलक्षण होते. प्रत्यक्ष भेटीत विनोदी किस्से सांगताना त्यांच्या विनोदबुध्दीची झलक दिसे. चित्रकलेसारख्या एका क्रिएटिव्ह विश्वात रंगलेल्या या कलाकाराने व विनोदाची चांगली जाण असलेल्या या व्यक्तीने आयुष्याचा शेवट अशा रीतीने करावा हे दुर्दैवी, धक्कादायक आणि अनाकलनीयही!

  • वसुंधरा डांगे (पेशवे पार्कातली फुलराणी)

    पेशवे उद्यानातल्या फुलराणीचे उद्घाटन ८ एप्रिल १९५६ ला पुण्यातील पूर्व प्राथमिक शाळेतील तेव्हाची विद्यार्थिनी वसुंधरा डांगे हिच्या हस्ते झाले. (पुढे त्या वाचकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांच्या पत्नी झाल्या.) इंजिन आणि दोन डबे अशी ‘फुलराणी’ची रचना होती. या रेल्वेसाठी दोन फलाट, तिकीट विक्रीची खिडकी, तिकीट तपासनीस, सिग्नल अशी सारी व्यवस्था उभारण्यात आली होती. लहानग्यांच्या करमणुकीसाठी उद्यानात चालविल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये पुण्यातली ‘फुलराणी’ देशातली सर्वात जुनी रेल्वे आहे, हे विशेष.

  • ज्येष्ठ सिनेपत्रकार देवयानी चौबळ

    असे म्हणतात देवयानी चौबळ या अत्यंत फटकळ सिनेपत्रकार होत्या. तिच्या जिभेच्या तडाख्यात भलेभले सापडले होते. त्या बॉलीवूड मध्ये देवी या नावाने प्रसिद्ध होत्या. खरे तर त्यांना फिल्मस्टार व्हायचं होतं. घरात सगळे पोलीसखात्यात नोकरीला. त्यांचे वडील सुप्रसिध्द वकील होते. त्यांना हिरोईन म्हणून सगळीकडे मिरवायचं होतं. दिसायलाही त्या देखणी होती. छोट्या मोठ्या सिनेमात सहज काम मिळाले असते.

  • नारायण राणे

    मुख्यमंत्रीपदाच्या थोड्या काळातही त्यांनी महाराष्ट्रावर आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप पाडली आहे. राज्यातील शासकीय कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षांवरुन ५८ वर्षे करण्याचा महत्त्वपूर्ण व धाडसी निर्णय त्यांनी घेतला.

  • ज्येष्ठ अभिनेते डॉ.याकूब सईद

    याकूब सईद पुण्यात शाळेत शिकत असताना दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. त्यांच्या शाळेसमोर असलेल्या ‘शालिमार फिल्म स्टुडिओ’मध्ये शाळा शिकून ते काम करत असत. संध्याकाळी काम करायचे आठ आणे किंवा रुपया मिळत असे. हे झाल्यावर रात्री ‘शिरीन’, ‘अपोलो’,’ऑडियन’, ‘कॅपिटल’ या थिएटर्सवर चित्रपटांच्या ते गाण्यांची पुस्तकं विकत असत.‘बरसात एक आणा, बरसात एक आणा’असं करता करता ते एम.ए. झाले.

  • पांडुरंग श्रीधर आपटे

    गांधीवादी साहित्यिक पांडुरंग श्रीधर आपटे यांनी अनेक चरित्रे लिहिली. याशिवाय आपल्या पूर्वजांचा शोध (डार्विनवरून) आणि अलौकिक अभियोग (पशू, पक्षी, वनस्पती यांची मानवनिर्मित निसर्गर्‍हासाबद्दल फिर्याद) ही त्यांची पुस्तके आहेत.

    १९ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.

    Pandurang Shridhar Apte

  • चार नटसम्राटांची कावेरी – शांता जोग

    २३ डिसेंबर १९७० रोजी संध्याकाळी, बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे नटसम्राटचा पहिला प्रयोग झाला. गोवा हिंदू असोसिएशनने हे नाटक मंचावर आणले होते. संस्थेचा सुवर्णमहोत्सवातला हा प्रयोग होता. या नाटकाचे दिग्दर्शन केले होते श्री. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी. आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका केली होती डॉ. श्रीराम लागू यांनी; तर कावेरी साकारली होती शांता जोग यांनी. वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राटमध्ये बेलवलकरांच्या भूमिकेत असलेले श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी आणि चंद्रकांत गोखले या चारही नटसम्राटांच्या बरोबर, पत्नी कावेरी हिची भूमिका शांता जोग यांनी साकारली होती.

    शांता जोग यांचे नाव टिळकनगर, चेंबूर (मुंबई) येथील एका रस्त्याला दिले गेले आहे. ’शांता जोग करंडक’ हा एका नाट्यस्पर्धेत बालनाट्याला दिला जाणारा पुरस्कार आहे. ’महाराष्ट्र नाट्यवर्धक मंडळा’ने आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धेनंतर विजयी एकांकिकेस ’शांता जोग स्मृती करंडक’ दिला जातो.

    शांता जोग यांचा जन्म २ मार्च १९२५ रोजी झाला. शांता जोग यांचे १२ सप्टेंबर १९८० रोजी अपघाती निधन झाले.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ:- इंटरनेट

  • राजे मालोजीराजे नाईक निंबाळकर

    मालोजीराजे कोल्हापुरात शिकत असताना त्यांनी कोल्हापूर संस्थानातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी सुधारणांचा कारभार पहिला होता. समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेतील शिक्षणाचे महत्त्व त्यांनी जाणले होते.

  • कवयित्री आणि बालसाहित्यकार डॉ. लीला गणेश दीक्षित

    त्यांच्या पुस्तकांमध्ये कोकणातील निसर्ग केंद्रस्थानी होता. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३५ रोजी गुहागरमध्ये झाला. पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयातून मराठीच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केले होते. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या त्या माजी अध्यक्षा आणि गेली सुमारे वीस वर्षे विश्वस्त म्हणून काम पाहात होत्या. डॉ. दीक्षित यांनी ‘प्राचीन मराठी वाङ्मयातून दिसणारे स्त्री दर्शन’ या विषयावर पीएचडी प्राप्त केली होती. त्यांना चार राज्य पुरस्कार, भा. रा. तांबे पारितोषिक, ना. धों. ताम्हनकर पारितोषिक, वा. ल. कुळकर्णी पारितोषिक, दि. के. बेडेकर पारितोषिक आणि मसाप पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. बालसाहित्याशिवाय त्यांनी विविध विषयांवर संशोधनपर लेखन केले. ‘प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीचे दर्शन’ या त्यांच्या पुस्तकाला राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. परभणीला २००५ साली झालेल्या अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

    डॉ. दीक्षित यांची विविध विषयांवरील सुमारे ५० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यामध्ये ‘अंतरीचे धावे’, ‘बहाद्दर बल्लू’, ‘मुके मित्र’, ‘मैत्री मोलाची’ ‘आजोबांचं घर’, ‘आनंदयोगिनी’, ‘कोकण - विविध दिशा आणि दर्शन’, ‘गंमत गाव’, ‘गाणारं झाड’, ‘घर आमचं कोकणातलं’, ‘चंदनवेल’, ‘नाच रे मोरया’ ‘पंख नवे’, ‘पोपटाचं झाड’ आदी पुस्तके आहेत. ‘फुलांना मिळाले रंग’ हे बालनाट्य त्यांनी लिहिले. ‘स्वामी अपरान्ताचा’ ही कादंबरी त्यांनी लिहिली. डॉ. लीला गणेश दीक्षित यांचे १३ ऑक्टोबर २०१७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट