जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
१९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘दीदी’ या चित्रपटाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३९ रोजी बंगलोर येथे झाला. १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘टारझन गोज टू इंडिया’ या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी व्यक्तिरेखा साकारली होती. १९६५ साली प्रदर्शित झालेला ‘ऊँचे लोग’ हा चित्रपट त्यांचा पहिला ‘हिट’ चित्रपट ठरला. त्यानंतर आलेल्या ‘आरजू’ या चित्रपटातील भूमिकेने त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील स्थान पक्के केले आणि सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी फिरोझ खान यांना पसंती देण्यात येऊ लागली.
‘आदमी और इन्सान’मधील भूमिकेसाठी त्यांना पहिला सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ‘धर्मात्मा’ या १९७५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला खूप लोकप्रियता लाभली. सत्तर-ऐंशीच्या दशकात फिरोझ खान यांचा चाहतावर्ग तयार झाला. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘कुर्बानी’, ‘जाँबाज’ आणि ‘दयावान’ हे चित्रपटही हीट ठरले. १९९२ साली दिग्दर्शित केलेल्या ‘यल्गार’नंतर फिरोझ खान चित्रपटसृष्टीपासून दूर गेले होते. मा.फिरोझ खान यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्या काळात फिरोज खान आणि मुमताज यांची जोडी खूप लोकप्रिय झाली होती. मैत्रीसोबतचे दोघे व्याहीसुध्दा होते.
२००५ मध्ये फिरोज यांचा मुलगा फरदीनने मुमताज यांची मुलगी आणि बालपणीची मैत्रीण नताशासोबत लग्न केले. पुत्र फरदीन खानला ‘लॉँच’ करण्यासाठी १९९८ साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश लाभले नाही. २००३ साली त्यांनी फरदीनलाच घेऊन ‘जाँनशीन’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. याच चित्रपटाद्वारे त्यांनी मोठय़ा पडद्यावर पुनरागमन केले. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘आरडीएक्स’ची भूमिका लोकप्रिय झाली होती. मा.फिरोझ खान यांचे २७ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
व्यावसायिक मराठी संगीत रंगभूमीवर अभिनेता आणि गायक म्हणून स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे आपली नाममुद्रा केवळ नाटय़संगीतावरच नव्हे तर भावसंगीत, चित्रपट संगीत आणि लोकसंगीतावरही ज्यांनीतेवढय़ाच समर्थपणे उमटविली. ज्यांची गाणी आज इतक्या वर्षांनंतरही रसिकांच्या स्मरणात आणि ओठावर आहेत ते रामदास कामत. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३१ रोजी झाला.
रामदास कामत १९४९ ते १९५३ या काळात मी विल्सन महाविद्यालयात शिकत होतो. ते महाविद्यालयात दुसऱ्या वर्षांत शिकत असताना नाटकात काम करण्याबाबत सूचना लागली होती. ‘घराबाहेर’ हे नाटक बसवण्यात येणार होते. विजया जयवंत (आत्ताच्या विजया मेहता) त्यात काम करणार होत्या. मा.रामदास कामत यांना त्या नाटकात ‘पद्मनाभ’च्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली. नाटकाचे वाचन झाले. पण त्यांना मराठी नीट बोलता येत नाही, मराठीवर कोकणी भाषेची छाप आहे, असा आक्षेप घेऊन काम देता येणार नाही असे सांगण्यात आले. त्यांनी आपले मराठी बोलणे चांगले करायचे, असे त्याच वेळी ठरवले. विल्सन महाविद्यालयात प्रा. वा. ल कुलकर्णी हे मराठी विषय शिकवायचे. त्यांचा भाचा मा.रामदास कामत यांचा मित्र होता. त्यांच्या मुळे वालंच्या वर्गात मला मराठीच्या तासाला बसायला मिळाले. व सरांनी ते मान्य केले. ‘वालं’चे शिकविणे आणि मार्गदर्शन यामुळे ते चांगले मराठी बोलायला, वाचायला शिकले. मा.कामत यांचे घराणे मूळचे गोव्याचे. साखळी हे त्यांचे गाव. गावातील नाटकवेडय़ा मंडळींनी ‘बेबंदशाही’ हे ऐतिहसिक नाटक बसवले. गंमत म्हणजे या ऐतिहासिक नाटकात त्यांनी काही गाणीही टाकली होती. हे नाटक व गाणी बसविण्यासाठी सखाराम पांडुरंग बर्वे यांना बोलाविण्यात आले होते. या नाटकात त्यांनी छोटी भूमिका केली होती. त्या वेळी त्यांचे वय पाच-सहा वर्षांचे होते. पुढे पणजीच्या ‘पीपल्स हायस्कूल’मध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. तेव्हाची मॅट्रिक म्हणजे सातवीच्या परीक्षेनंतर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत मामांकडे (वैकुंठ नेवरेकर) आले. कामत यांच्या घरातच गाणे होते. आई-वडील दोघेही गात असत. जात्यावर दळताना त्या काळातील गाणी आई म्हणत असे. दोन्ही मोठे भाऊ व बहिणीही गाणाऱ्या होत्या. घरातून लहानपणीच त्यांच्यावर गाण्याचे संस्कार झाले. कामत यांनी गाण्याचे सुरुवातीचे सर्व शिक्षण त्यांचे मोठे बंधू उपेंद्र कामत यांच्याकडे घेतले. तर पुढे नाटय़संगीताचे धडे गोविंदराव अग्नी यांच्याकडे गिरवले. नाटय़संगीतातील ‘भीष्माचार्य’ अशी रामदास कामत यांची ओळख असली तरी आपण शास्त्रीय संगीत शिकलो नाही, अशी खंत आजही त्यांच्या मनात आहे. मा.कामत हे अर्थशास्त्राचे पदवीधर. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९५३ ते १९६० या काळात त्यांनी मुंबईत केंद्र सरकारच्या ‘अकाउंटंट जनरल’ ऑफिसमध्ये नोकरी केली. १९६० मध्ये ‘एअर इंडिया’मध्ये नोकरीला लागले व १९८९ मध्ये तेथूनच ‘व्यवस्थापक’ पदावरून निवृत्त झाले. संगीत रंगभूमीवर कामत यांनी अनेक नाटकांमधून काम केले. नोकरी सांभाळूनच त्यांनी नाटकांचे दौरे, तालमी केल्या. १९५६ मध्ये ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’च्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकाने संगीत रंगभूमीवर मा.रामदास कामत यांनी सुरुवात केली. या नाटकातील ‘साधू’च्या भूमिकेसाठी त्यांना बोलावले. नाटकाचे दिग्दर्शन गोपीनाथ सावकार तर संगीत दिग्दर्शन गोविंदराव अग्नी यांचे होते. भूमिका म्हटली तर छोटी असल्याने त्यांनी नाकारली. रागावूनच घरी आले तर मोठय़ा बंधूंनी, असे करू नकोस तू काम कर असा सल्ला दिला. भावाचे ऐकून मा. कामत दुसऱ्या दिवशी पुन्हा सावकार यांच्याकडे गेलो व काम करायला तयार असल्याचे सांगितले. नाटकाचा पहिला प्रयोग साहित्य संघ मंदिरात झाला. नाटकात त्यांनी गायलेल्या ‘हृदयी धरा हा बोध खरा’ या पदाला कडाडून टाळ्या मिळाल्या. संगीत रंगभूमीवर त्यांनी गायलेले हे पहिले नाटय़पद. पुढे याच नाटकात त्यांनी ‘अश्विनशेठ’ ही भूमिका दीर्घकाळ केली. १९६४ मध्ये वसंत कानेटकर लिखित ‘मत्स्यगंधा’ हे नाटक आले. यात मी ‘पराशर’ करत होतो. नाटकाचे संगीत दिग्दर्शन पं. जितेंद्र अभिषेकी यांनी केले होते. नाटकाचे वाचन झाल्यानंतर अभिषेकी यांनी हे ‘संगीत नाटक’ नको करू या, असे कानेटकर यांना सुचविले. त्यावर हे संगीत नाटक म्हणूनच करायचे असे कानेटकर यांनी ठामपणे सांगून संगीत नाटकाचे आव्हान स्वीकारा, असे अभिषेकींना सांगितले. अभिषेकी यांनी ते आव्हान स्वीकारले आणि लेखन, दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांच्या सहकार्याने मराठी संगीत रंगभूमीवर या नाटकाने इतिहास घडविला. १९६६ मध्ये सादर झालेल्या ‘ययाति आणि देवयानी’ या नाटकातील ‘प्रेम वरदान’ हे नाटय़पद सुरुवातीला ‘त्रिताल’मध्ये बांधले होते. संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी यांना याची चाल बदलण्याची विनंती मा.कामत यांनी केली तेव्हा ते चिडले, पण नंतर त्यांनी गाण्याच्या तालात बदल करून ते ‘झपताल’मध्ये केले.
नंतर मा.रामदास कामत यांनी ‘एकच प्याला’, ‘कान्होपात्रा’, ‘धन्य ते गायनी कळा’, ‘मदनाची मंजिरी’, ‘मानापमान’, ‘मीरा मधुरा’, ‘मृच्छकटिक’, ‘शारदा’, ‘संन्याशाचा संसार’, ‘सौभद्र’, ‘स्वरसम्राज्ञी’, ‘होनाजी बाळा’ आदी संगीत नाटकांतून कामे केली. ही सर्व नाटके आणि त्यातील गाणी गाजली. पण त्यातही ‘मत्स्यगंधा’ व ‘ययाति आणि देवयानी’ या नाटकांनी त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली. ‘मत्स्यगंधा’ नाटकात त्यांनी ‘पराशर’ तर ‘ययाति आणि देवयानी’ नाटकात ‘कच’ या भूमिका साकारल्या. या दोन्ही नाटकांतील ‘गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘नको विसरु संकेत मीलनाचा’, ‘साद देती हिमशिखरे’ (सर्व मत्स्यगंधा) तसेच ‘तम निशेचा सरला’, ‘प्रेम वरदान स्मरत राहा’ (ययाति आणि देवयानी) ही त्यांची नाटय़पदे गाजली. कामत यांनी गायलेली ‘अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला आहे’, ‘जन विजन झाले’, ‘बहुत दिनी नच भेटलो सुंदरीला’, ‘श्रीरंगा कमला कांता’ ही गाणीही रसिकांच्या स्मरणात आहेत. ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटासाठी त्यांनी गायलेल्या ‘प्रथम तुज पाहता जीव वेडावला’ या गाण्याची लोकप्रियता आजही तसूभर कमी झालेली नाही. या गाण्याविषयी बोलताना मा. कामत एका मुलाखतीत म्हणतात, गायक व संगीतकार सुधीर फडके यांचा मला दूरध्वनी आला आणि त्यांनी चित्रपटातील हे गाणे तुम्ही गावे असे सांगून रविवारी गाण्याचे ध्वनिमुद्रण करायचे आहे तर तुम्ही या, असे सांगितले. त्याच दरम्यान म्हणजे शनिवारी बार्शी येथे माझा गाण्याचा कार्यक्रम होता आणि रविवारी गाण्याचे ध्वनिमुद्रण करायचे असल्याने मी जमणार नाही म्हटले. पण सुधीर फडके यांनी कसेही करून हे जमवाच असा आग्रह धरला. मी त्यांना होकार दिला. शनिवारी बार्शीचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्रीच्या गाडीने मुंबईला परतायचे ठरवले. आरक्षण केलेले नसल्याने तिकीट काढून कसेबसे गाडीत चढलो. पुण्याला बसायला मिळाले. रात्रभर झोप झालेली नव्हती. माझा आवाज पार बसलेला होता. रविवारी दुपारी मुंबईत परतल्यानंतर फडके यांना मी आल्याचे सांगितले. गाण्याच्या ध्वनिमुद्रणासाठी गेलो. संगीतसाथीला वसंत आचरेकर (तबला), राम नारायण (सारंगी), प्रभाकर पेडणेकर (ऑर्गन) अशी मंडळी होती. माझा आवाज बसलाय, मी चांगले गाऊ शकणार नाही, असे सांगून पाहिले, पण ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी गाण्याचे ध्वनिमुद्रण करणे गरजेचे होते, कारण सोमवारी कोल्हापूरला त्या गाण्याचे चित्रीकरण होणार होते व त्यासाठी रविवारी रात्रीच ते गाणे कोल्हापूरला पाठवायचे होते. त्यामुळे गळ्याचे काही व्यायाम करून मी माझा बसलेला आवाज मोकळा केला आणि ते गाणे ध्वनिमुद्रित केले. ते गाणे आजही रसिकांच्या स्मरणात आहे. कामत यांनी नाटय़संगीतासह भावगीते, चित्रपट गीतेही गायली असून ‘एचएमव्ही’ कंपनीने त्यांच्या ६५ गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका आहेत. ‘मत्स्यगंधा’ नाटकातील ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ हे कामत यांचे ध्वनिमुद्रित झालेले पहिले गाणे. त्यांनी गायलेली ‘आकाशी फुलला चांदण्यांचा मळा’, ‘देवा तुझा मी सोनार’, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे’, ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’, ‘वाटे भल्या पहाटे यावे’, ‘हे आदिमा हे अंतिमा’, ‘विनायका हो सिद्ध गणेशा’, ‘हे गणनायक सिद्धिविनायक’, ‘हे शिवशंकर गिरिजा तनया’ आदी भावगीते, चित्रपट गीतेही लोकप्रिय आहेत. तसेच रावणकृत शिवतांडव स्तोत्र हे मा.रामदास कामत यांनी खड्या आवाजात गायलेले आहे. १९९७ साली त्यांनी रंगभूमीवरून 'निवृत्ती घेतली. आता वयाच्या ८६ व्या वर्षांत असलेले कामत आता वयोपरत्वे फारसे घराबाहेर पडत नाहीत किंवा जाहीर कार्यक्रमातूनही त्यांची उपस्थिती नसते. तरी ही या वयातही दररोज किमान एक तास तरी ते रियाज करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
कवी संजीव यांचे नाव कृष्ण गंगाधर दीक्षित. आपल्या लहानपणी वडिलांचे छत्र हरवलेले संजीव त्यांच्या काकांच्या घरी वाढले. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९१४ रोजी सोलापुराजवळील 'वांगी' गावात झाला.त्यांचे शालेय शिक्षण सोलापुरात झाले. पुढे कलाशिक्षणाकरता त्यांनी मुंबईच्या 'बाँबे स्कूल ऑफ आर्ट' या संस्थेत प्रवेश घेतला. तेथून १९३९ साली ते जी.डी. आर्ट पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले. मा.संजीव व्यवसायाने छायाचित्रकार व मूर्तिकार होते. त्यांनी काही काळ सोलापूर महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत कलाशिक्षकाची नोकरी केली. तात्यासाहेब श्रोत्रिय यांच्या संपर्कात संजीवांना काव्यशास्त्राची, वृत्तछंदांची गोडी लागली. सुरुवातीच्या काळात गणेशोत्सवाच्या मेळ्यांकरता त्यांनी पुष्कळ गाणी लिहिली. १९३०-३२ च्या सुमारास 'माझा राजबन्सी राणा कोणी धुंडून पहाना' हे कवी संजीव यांनी लिहिलेले आणि लोकप्रिय गायिका मेहबूबजान हिने गायलेले गाणे अतिशय लोकप्रिय झाले. १९३५ साली 'दिलरुबा' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९५०-६० सालांच्या दशकांत संजीवांनी मराठी चित्रपटांची गीतेही लिहिली. मा.संजीव यांचे २८ फेब्रुवारी १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आणीबाणीनंतर १९७७ साली झालेल्या निवडणुकीत राजनारायण यांनी इंदिरा गांधींचा त्यांचा बालेकिल्ला असलेल्या “रायबरेली” मतदारसंघात मोठा पराभव केला. जनता पक्षाकडून निवडणुक लढवणाऱ्या राजनारायण यांनी इंदिरा गांधींचा रुपात भारतातील सर्वात शक्तिशाली महिलेचा पराभव केला होता.
आशुतोष गोवारीकर यांनी उमेदवारीच्या काळात सी.आय.डी.मालिकेतून शिवाजी साटम यांच्या साहाय्यकाचे काम केले. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. अमोल पालेकरच्या 'कच्ची धूप' या मालिकेतून आशुतोष अभिनेता म्हणून लोकांना प्रथम दिसले. पुढे तो 'होली', 'गूँज', 'कभी हां कभी ना', 'सलीम लंगडे पे मत रो' सारख्या सिनेमांत काम केले. पण त्यांना अभिनय-कारकिर्दीत घट्ट मुळे रोवता आली नाहीत. मग दिग्दर्शन क्षेत्रातले पदार्पण असलेला त्यांचा 'पहला नशा' हा त्याचा चित्रपट दणकून आपटला. त्याच्या, आमीर खान नायक असलेल्या 'बाजी'च्या दिग्दर्शनानेही बाजी मारली नाही. त्यामुळे 'लगान' हा त्याचा जीवन-मरणाचा प्रश्न बनला होता. आणि 'लगान' ने त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ते दिग्दर्शक व अभिनेता म्हणून अनेक आव्हानांना खंबीरपणे सामोरा गेले. आशुतोष गोवारीकर यांनी २००१ मध्ये 'लगान' तयार केला. त्यानंतर भारतात क्रीडाविषयक चित्रपटांची लाट आली. आशुतोष गोवारीकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. १९९८ सालच्या सरकारनामा ह्या मराठी चित्रपटामध्ये त्याने भूमिका केली होती. बॉलिवूडमधील दिग्दर्शनासाठी त्याला आजवर फिल्मफेअर सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००१ मध्ये लगानला फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट व २००८ मध्ये जोधा अकबर या चित्रपटाला फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार व फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार मिळाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कॉंग्रेस पक्षातील ठाणे जिल्हा अध्यक्ष राहिलेल्या बाळकृष्ण पुर्णेकर यांचा लौकिक नेहमीच सामान्यांना सहज उपलब्ध होणारे, ठरविलेले काम पूर्ण करणे व सामाजिक संवादातून कल्पक विकासकार्य उभे करणे अशी ओळख पुर्णेकर यांनी मिळविली आहे. १९९७ पासून ठाणे जिल्ह्याचे युवाध्यक्ष पदापासून ते २०१४ पर्यंत ठाणे जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाच्या बळकटी करणासाठीचे त्यांनी प्रचंड मेहनत केली आहे.
झेंडा मार्च असो वा काँग्रेस इतिहासाचा इव्हेंट, अशा महत्वाच्या प्रसंगाना त्यांचे संघटनगुण व व्यक्तित्वाच्या विविध छटा नेहमी अधोरेखित झाल्या आहेत. ठाणे शहराचे नागरीकरण अत्यंत वेगाने वाढीत असून त्या अनुषंगाने शहरी लोकांनामहत्वाच्या व मूलभूत ठरणार्या गोष्टी त्यांना मिळवून देण्यासाठी वेळोवेळी त्यांनी शासनाकडे व ठाणे पालिकेकडे केलेला पाठपुरावा अत्यंत फलदायी ठरला आहे.
मध्यंतरीच्या काळात बाळकृष्ण पुर्णेकरांनी नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणार्या विविध दाखल्यांसंदर्भात मोठा व भव्य उपक्रम राबवून हजारो नागरिकांना दाखले मिळवून दिले होते. युवकांचा मोठा रोजगार मेळावा आयोजित करुन तब्बल ८५० बेरोजगारांच्या मुलाखती घेवून त्यांना खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत; यावरुन त्यांच्यातल्या सामाजिक बांधिलकी व तळमळीची पुरेपूर साक्ष देते.
महाश्वेता देवी यांचे वडील मनीष घटक एक कवी आणि कादंबरीकार होते. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९२६ रोजी ढाक्यात झाला. महाश्वेतादेवी किशोरवयीन असतानाच त्यांचे कुटुंबीय पश्चिम बंगालमध्ये स्थायिक झाले. तिथेच त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. लहान वयातच त्यांनी लिखाणाला सुरुवात केली होती. इंग्रजी विषयातून पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी शिक्षिका आणि पत्रकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. महाश्वेतादेवी यांच्या साहित्य व सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल त्यांना पद्मविभूषण, मॅगसेसे, साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले.
साहित्य संपदा ज्ञानपीठ, साहित्य अकादमी हे साहित्य क्षेत्रातील मानाचे पुरस्कार मिळवणा-या महाश्वेता देवी यांनी बंगाली भाषेतून लघुकथा, कादंब-या असे विपुल लिखाण केले आहे. त्यांच्या ‘झाँसी की रानी’, हजार चौराशीर की माँ, रुदाली या कादंब-या मैलाचा दगड ठरल्या. इतर ग्रंथसंपदेत ‘अरण्यार अधिकार, अग्निगर्भ, सिद्धू कनहुर दाके आदी साहित्य वाचकांच्या पसंतीस उतरले. यापैकी हजार चौराशीर की माँ, या त्यांच्या बंगाली भाषेतील कादंबरीवर आधारित गोविंद निहलानी दिग्दर्शित सिनेमा १९९८ साली रुपेरी पडद्यावर झळकला होता. या कादंबरीद्वारे महाश्वेता देवी यांनी नक्षलवादी चळवळीशी जोडला गेलेला मुलगा व त्याची आई यांची संघर्षकथा मांडली.
१९९३ साली कल्पना लाजमी यांनी महाश्वेता देवी यांच्या ‘रुदाली’ या कादंबरीवर आधारित चित्रपट बनवला होता. म्हादू हा मराठी चित्रपटही त्यांच्या कथेवर बनला आहे. महाश्वेता देवी यांचे २८ जुलै २०१६ रोजी निधन झाले. गुगलने महाश्वेता देवी यांच्या स्मृतीदिना निमित्त डुडल केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अप्पा पेंडसे हे लाला लजपत राय यांच्या स्काउट दलात होते, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्तेश्वर दलात १९३० मधे ते सामील झाले. १९३२ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले.
मराठी-हिंदी-गुजराती नाटक, टीवी मालिका व चित्रपट अशी अभिनयाची सर्वच क्षेत्रात आपल्या प्रसन्न अभिनयाने वावर करणारे सुनील बर्वे मागील २५ पेक्षा अधिक वर्ष मराठी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९६६ रोजी झाला.
सुनील बर्वे मुंबईतल्या पाटकर कॉलेजातून रसायनशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्सी. झाले. त्यांनी यू.एस. व्हिटॅमिन्स या कंपनीत एक महिना नोकरी केली, पण तिथे त्यांचे मन रमले नाही. आधीपासूनच ते तबल्याच्या आणि गाण्याच्या क्लासला जात असत. ते सात वर्षे तबला शिकले. गांधर्व महाविद्यालयाची मध्यमा ही संगीताची परीक्षा ते उत्तीर्ण झाले आहेत. हे सर्व करतानाच त्यांचा संबंध थिएटर ग्रुपशी झाला. त्यातूनच त्यांचा विनय आपटे यांच्या अफलातून या संगीत नाटकात शिरकाव झाला. त्यांना एका गाणाऱ्या पात्राची भूमिका मिळाली होती. या पहिल्या नाटकात सुनीलसोबत महेश मांजरेकर, अतुल परचुरे, सचिन खेडेकर यांनी काम केले होते.
त्यानंतर सुनील बर्वे यांनी "मोरूची मावशी", "कशी मी राहू तशीच", "वन रूम किचन", "चार चौघी", "म्हणून मी तुला कुठे नेत नाही", "ह्यांना जमतं तरी कसं", "असेच आम्ही सारे", "हेलो इन्स्पेक्टर", "श्री तशी सौ", "बायकोच्या नकळतच", "हिच तर प्रेमाची गंमत आहे", "मासिबा" आणि "ऑल द बेस्ट" अशा मराठी, गुजराती आणि इंग्लिश नाटकांमधून भूमिका केल्या. "सुबक" या संस्थेची स्थापना करून द्वारे ते नाट्य निर्मितीच्या क्षेत्रात उतरले. जुनी आणि गाजलेली काही निवडक मराठी नाटके पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर सादर करण्याचा आगळा प्रयोग अभिनेते सुनील बर्वे यांनी पाच वर्षांपूर्वी ‘सुबक’ या संस्थेतर्फे प्रत्यक्षात आणला.
‘हर्बेरियम’ या उपक्रमाअंतर्गत मराठी रंगभूमीवर नव्याने सादर झालेल्या या नाटकांना रसिक प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यांनी या कल्पनेचे स्वागत केले. या नाटकांमुळे नव्या पिढीला जुन्या नाटकांविषयी माहिती झाली तर जुन्या पिढीतील प्रेक्षकांसाठी ते ‘स्मरणरंजन’ ठरले. ‘हर्बेरियम’च्या पहिल्या पर्वात ‘सूर्याची पिल्ले’, ‘लहानपण देगा देवा’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘आंधळं दळतंय’ आणि ‘झोपी गेलेला जागा झाला’ ही वेगवेगळ्या शैलीतील जुनी नाटके नव्याने व नव्या कलाकारांच्या संचात सादर झाली होती.
सचिन पिळगावकर दिग्दर्शित ''आत्मविश्वास" हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर त्यांनी "सुगंध", "तू तिथे मी", "पाश", "आहुती", "लपंडाव", "जमल हो जमल", "आई", "तन्नू कि टिना", "निदान", "अस्तित्व", "दिवसेंदिवस", "आनंदाचे झाड", "सुर राहु दे", "गोजिरी", "तूच खरी घरची लक्ष्मी", "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं" "प्राइम टाइम" आणि "हायवे" या चित्रपटात अभिनय केला आहे. नाटक आणि चित्रपटांसोबतच अनेक मराठी, हिंदी आणि गुजराती मलिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे, या मलिकांमध्ये ''कुंकू", "कळत नकळत", "असंभव", "अभी तो मै जवान हु", "अधांतरी", "अवंती", "अवंतिका", "आवाज", "बोलाची कढी", "चाळ नावाची वाचाळ वस्ती", "छैल छबीला", "चतुराई", "गोष्ट एका आनंदची", "हे सारे संचीताचे", "इमारत", "जावई शोध", "झोका", "झुट्न जरीवाला", "ज्योति", "कर्तव्य", "कौन अपना कौन पराया", "कोई सुरत नजर नही आती", "कोरा कागज", "नायक", "प्रपंच", "प्रो. प्यारेलाल", "रिमझीम", "सप्तर्शी", "श्रीयुत गंगाधर टिपरे", "स्वयंम", "थरार", "त्रेधा तिरपिट" आणि "वाळवाचा पाऊस" या मालिकांचा समावेश आहे.
’तो हा मी सुनील बर्वे’ या एफ.एम. रेडियो ’सुरभी’वरती ते रेडियो जॅकी म्हणून सुद्धा ते कार्यरत होते.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मराठी चित्रपटांमधली यशस्वी “वुमन फिल्ममेकर” तसंच प्रतिभावान व संवेदनशील अभिनेत्री, दिग्दर्शक म्हणून ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते अश्या स्मिता तळवलकरांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात १९७२ साली दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून केली.
Copyright © 2025 | Marathisrushti