जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
गणितशास्त्र या विषयातील केंब्रिज विद्यापिठातील रँग्लर ही सर्वोच्च पदवी मिळवलेले कुशाग्रबुध्दीचे अभ्यासक.
March 11, 2015
कळीदार कपूरी पान’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशा दर्जेदार काव्य रचना करणारे कवि राजा बढे यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी... रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी म्हणजे राजा बढे. आजच्या पिढीला कदाचित राजा बढे हे नावसुद्धा माहीत नसेल. परंतु ज्यांच्या गीतांची सुदैवाने चिरफाड न होता त्यावर रिमिक्सचा मुलामा चढलेला नाही, अशी गीते राजा बढे यांच्या नावावर आहेत. राजा बढे यांचे जन्म नागपूरचा. प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले.
१९३५ मध्ये त्यांनी पंजाब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्याच्या दैनिक ‘सकाळ’ मध्ये संपादकीय विभागात त्यांनी नोकरी केली. नागपूरच्या दैनिक ‘महाराष्ट्र' मध्ये एक वर्ष ते सहसंपादक होते. त्याचवेळी ‘वागीश्वरी'च्या संपादक मंडळात ते कार्यरत होते. पुढे साप्ताहिक ‘सावधान' मध्ये मावकर-भावे यांच्यासोबत त्यांनी कार्य केले. दरम्यान कॉलेज करून पदवी प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न अपुरा राहिला. त्यांनी बरचसं स्फुटलेखन "कोंडिबा' या टोपणनावानं केलं. वयाच्या सतरा-अठरा वर्षांपासूनच कविता लिहू लागले. नवकवींच्या काव्यसंग्रहात राजा बढे यांच्या कवितांना विशेष स्थान असे. 'ओहोळ' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. कवितांची आवड जोपासणाऱ्या बढे आई-वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ म्हणून लहान भावंडांची जबाबदारी, पालनपोषण यातच सर्वस्व मानून स्वत: अविवाहित राहिले.
१९४० च्या आसपास चित्रपट व्यवसायात त्यांनी प्रवेश केला. ‘सिरको फिल्म्स' मध्ये दोन वर्ष त्यांनी कामे केली. १९४२ मध्ये ते "प्रकाश स्टुडिओ'त रुजू झाले आणि त्यांनी "रामराज्य' चित्रपटाची गाणी लिहिली. महेश कौल सोबत ‘अंगुरी' चित्रपटात काम केले. पुढं १९४४ मध्ये ते मराठी रंगभूमीकडं वळले. आळतेकर यांच्या "लिट्ल थिएटर्स'च्या "कलेसाठी सारस्वत' नाट्यप्रयोगात त्यांची भूमिका होती. ‘संत बहिणाबाई,' ‘गळ्याची शपथ' या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवर ‘निर्माता' म्हणून कार्यरत होते. आपल्या वाङ्मयीन अभिरुचीला पोषक ठरतील, अशा व्यवसायांसी धरसोड ते आयुष्यभर करीत राहिले, तरी आपले कवित्व ते सतत सांभाळून होते. "चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले', "दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी', "प्रेम केले काय हा झाला गुन्हा?' इत्यादी सुरेल भावगीतं त्यांनी लिहिली. स्त्रियांचे मनोभाव आकर्षकरीत्या शब्दबद्ध करण्यात बढे सिद्धहस्त होते. "वाट कशी चुकले रे', "कधी न पाहिले तुला', "होशी तू नामानिराळा', "काय कोणी पाहिले,' "मला मोहू नका' इत्यादी गीतांमधून व्याकुळता, विरहार्तता, मीलनातुरता असे मनोभाव त्यांनी नाट्यपूर्ण रीतीनं चितारले आहेत. संस्कृत काव्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. आपली भाषा अलंकृत करण्याची क्षमता त्यांच्यात असली तरी संस्कृत शब्दांच्या भाराखाली ती दडपली जाणार नाही, याचं भान बढे यांच्या गीतांमध्ये दिसतं.
बढे यांचा उर्दू शायरीचाही अभ्यास होता. त्या पद्धतीच्या भावाविष्काराचा ढंग आणि कल्पनाविलासाची पद्धत बढे यांनी त्यांच्या काही गझलसदृश भावगीतांमध्ये अंगीकारली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे बढे यांचं परमदैवत होतं. दिग्दर्शक विजय भट यांच्या 'रामायण' चित्रपटाकरिता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गीतकार म्हणून राजा बढे यांचे नाव सुचविले. या चित्रपटातील 'सृजनहो परिसा रामकथा, जानकी जीवन विरह व्यथा' हे बढे यांनी लिहिलेले गीत काळजाचा ठाव घेणारे ठरले. त्यानंतर महात्मा विदूर, गळ्याची शपथ अशी काही चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केले. हे करीत असताना व्यावसायिक हेतू त्यांनी कधीच ठेवला नाही. धोतर, कुडता असा वेष आणि वरण-भात प्रिय असणाऱ्या बढेंच्या लेखी पैशाला फारसे महत्त्व नव्हते. कामाला महत्त्व देणाऱ्या बढेंच्या अनेक भावगीतांमधून कवीच्या भावना हळुवार प्रकट होतात आणि मनाला विलक्षण आनंद देऊन जातात. म्हणूनच लता मंगेशकर, आशा भोसले बढे यांच्या गीतांवर प्रेम करीत. ‘हसताच नार ती अनार मनी फुले' ही बढे यांची गजानन वाटवे यांनी गायिलेली, ‘हसतेस अशी का मनी' लता मंगशकरांनी गायलेली, तर ‘चांदणे शिपीत जा' ही आशा भोसले यांनी गायिलेली गीतरचना , कुमार गंभर्वांनी ‘प्रेम केले काय हा झाला गुन्हा' ही बढे यांची गायिलेली रचना लोकप्रिय झाली. राजा बढे हे कट्टर हिदुत्ववादी होते. स्वा. सावरकर हे त्यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्या ‘क्रांतिमाला' या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २१ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत.
प्रत्यक्ष सावरकरांनी ‘प्रस्तावनेत' ‘‘आपण स्वत:च नामवंत, सुप्रतिष्ठित प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने, माझ्या प्रस्तावनेची गरज नाही'' असे गौरवोद्गार काढले आहेत. १९३५ ते १९५९ दरम्यानच्या सामाजिक-राजकीय घडामोडींचे पडसाद यात आहेत. ‘विस्मृतीत गुंफलेली क्रांतिमाला', ‘गगनात आज जो चंद्र सुखे मिरवावा । ते तेज घेऊनी करिती काजवे कावा । तो बाबू गेनू, कोतवाल उरलेले । विसरलो अनामिक किती बळी गेलेले', ‘सुजला सुफला देश आमचा', ‘हिमालय थिजला । थिजला धीरचा । गंगा सिधुतुनी वाहतो प्रवाह रुधिराचा' अशा सर्वच कवितांमध्ये मंगल पांडे, हुतात्मा फडके, चाफेकर, सेनापती बापट अशा क्रांतिवीरांची नावे गुंफून त्यांना विस्मृतीत टाकल्याचे दु:ख व्यक्त केले आहे. ‘घडू दे पुन्हा एकदा भारत' मधून सावरकरांच्या दिव्य देशभक्तीचा गौरव केलेला असून, ‘नवोन्मेषशाली कवींच्या कवे' असे सावरकरांना संबोधले आहे. राजा बढे यांनीच. १९६४ साली मुंबईत बढे यांच्या पुढाकाराने प्रथमच कथाकथनचा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे, गदिमा यांनी प्रथमच कथा कथन केल्या होत्या.
मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर बढे यांनी छोटे छोटे माहितीपट करून दिले. नंतर बंधू बबनराव यांच्या मदतीनं त्यांनी "स्वानंद चित्र' ही संस्था उभी केली आणि "रायगडचा राजबंदी' हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला. गीत, गझल याप्रमाणेच ‘चारोळी' हा रचनाप्रकार बढे यांनी हाताळला. ‘कोंडिबा' हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या... त्या मुंबईच्या ‘विविधवृत्त' साप्ताहिकातून प्रकाशित झाल्या होत्या. राजा बढे हे केवळ कवी नव्हते. काव्याखेरीज ‘किती रे दिन झाले,' ही पत्रमय कादंबरी; ‘स्वप्नगंधा',‘चतुर किती बायका,' ‘ही रात सवत बाई,' ‘पेचप्रसंग,' ‘अशी गंमत आहे' अशी पाच नाटके त्यांनी लिहिलीत... तरी बढेंची ओळख कवी म्हणूनच कायम राहिली. "गर्जा महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्रगीत म्हणजे कविवर्य राजा बढे यांच्या काव्यप्रतिभेचा परमोच्च बिंदू होय. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली. या विजयानिमित्त बढे यांच्या या रचनेची ध्वनिमुद्रिका "एचएमव्ही'नं तयार केली.
शाहीर साबळे यांच्या खड्या आवाजातील आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने महाराष्ट्राची थोरवी सातासमुदापार पोहोचवली.. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ठिकठिकाणी कार्यक्रमांत ऐकवलं जाणारं हे गीत आजही तितकंच ताजं, टवटवीत आहे. राजा बढे यांना पान खायची भारी हौस होती. याच पानावर त्यांनी 'कळीदार कस्तुरी पान' लावणी लिहिली. ती सुलोचना चव्हाण यांनी अशा ठसक्यात गायिली की, भल्याभल्यांना पानाचा मोह आवरायचा नाही. पण अनेकांना ती राजा बढे यांनी लिहिली आहे, हे माहित पण नसेल.
त्यांनी एक कविता स्वतःविषयीच लिहिली... ते दोन "राजां'चं वर्णन होतं.
तेव्हा आणि आता...
एक राजा -
टोपी किंचित उंच, नीट कलती बाजूस डोकावित
खासे धोतर, पायघोळ अगदी, टाचेवरी लोळत..
ओठांनी रसरंग फेकित सदा या मंगलाचे धडे
आहे काय म्हणुन काय पुसतां? तो हाच राजा बढे..
दुसरा राजा -
टोपी सोडून, मुंबईस फिरतो, आता सदा बोडखा
बंगाली डगला, न पालट दुजा, खाक्या जुना सारखा..
आहे तोच विडा, अजूनही तसे, ते मंगलाचे सडे
जैसा नागपुरात, आजही तसा, तो हाच राजा बढे..
ज्येष्ठ दिवंगत कविवर्य वा. रा. कांत यांनी बढे यांच्याविषयी म्हटलं आहे:-
"आपल्या कवितेचा धर्म ओळखून शेवटपर्यंत मनाला आल्हाद देणाऱ्या कविता लिहिण्याचं ‘चांद्रव्रत' त्यांनी निष्ठेनं पार पाडलं, यातच त्यांची थोरवी आहे....हा कवी जन्मभर चांदणं शिंपीत जगला आणि चांदणं शिंपीत शिंपीत अचानक निघून गेला. ह्या "चांद्रव्रती'ची आठवण विझणं अशक्य!!'' राजा बढे यांचे ७ एप्रिल १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 1, 2019
दत्तात्रेय व्यंकटेश केतकर हे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते. त्यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८९० रोजी झाला.
'जान्हवी टीकेसह ज्ञानेश्वरी' , ' जिज्ञासोद्यान (ज्ञानेश्वरीतील शब्दसंशोधन)', 'ज्ञानेश्वर - ५५ दुर्गम स्थलांचे अर्थ' ही पुस्तके, तसेच वडील ज्योतिषाचार्य व्यं. बा. केतकर यांचे चरित्र त्यांनी लिहिले.
## Dattatrey Vyankatesh Ketkar
July 31, 2017
हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट विनोद वीरांमध्ये केश्टो मुखर्जी यांचे नाव येते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९०५ रोजी झाला.बहुतेक चित्रपटांमध्ये केश्टो मुखर्जी यांनी मद्यपीची भूमिका साकारली होती, परंतु आपल्या जीवनात त्यांना कसलेही व्यसन नव्हते. केश्टो मुखर्जी व ऋत्विक घटक यांची मैत्री होती.
ऋत्विक घटक यांच्या अनेक लहान, पण महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. केश्टो मुखर्जी यांनी हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘मुसाफिर’या चित्रपटात भूमिका केली होती, यात मुख्य भूमिका होत्या दिलीप कुमार आणि सुचित्रा सेन यांच्या आणि या चित्रपटाने हिंदी चित्रपटात केश्टो मुखर्जी यांना ब्रेक दिला होता.
केश्टो मुखर्जी यांनी अनेक चित्रपटात मद्यपी म्हणून काम केले असले तरी ते बासु चटर्जी यांच्या ‘खट्टा मीठा’ मधील शिक्षक भूमिका किंवा ‘अजरिक’ मध्ये वेड्याची किंवा ‘नागरिक’ मध्ये चरित्र भूमिकेत दिसले होते. जंजीर मध्येही केश्टो मुखर्जी यांनी वाईट व्यक्तिरेखा साकारली होती. केश्टो मुखर्जी यांनी बंगाली दिग्दर्शकांबरोबर सर्वाधिक हिंदी चित्रपट केले, ज्यात हृषिकेश मुखर्जी, शक्ती सामंता आणि बासु चटर्जी यांचा समावेश आहे.
बॉलिवूड मध्ये केश्टो मुखर्जी यांनी ९९ हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. केश्टो मुखर्जी यांचे काही चित्रपट 'आपकी कसम',‘खट्टा मीठा’, 'जंजीर' 'माँ और ममता' आणि 'शोले'. केश्टो मुखर्जी यांचे २ मार्च १९८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
August 7, 2021
भारत सरकारतर्फे संगीत क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा तानसेन पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर यांना जाहीर झाला आहे.
त्यांचा जन्म १४ जानेवारी १९५५ रोजी पांढरकवडा नागपूर येथे झाला.
पंडित उल्हास कशाळकर यांची ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकुमत आहे. त्यांना संगीताचे सुरुवातीचे शिक्षण व्यवसायाने वकील असलेल्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या आपल्या वडिल नागेश दत्तात्रेय कशाळकर यांचेकडून मिळाले. कशाळकरांनी नागपूर विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. त्याच दरम्यान त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांचेकडे संगीताभ्यासास सुरुवात केली. पुढील काळात त्यांना राम मराठ्यांकडून आग्रा घराण्याची आणि गजाननबुवा जोशींकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळाली. जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर तथा बापुराव पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे.
उल्हास कशाळकरांनी दूरदर्शन व आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम केले असून आकाशवाणीच्या ठाणे येथील केंद्रात त्यांनी इ.स. १९८३ ते १९९० चे दरम्यान काम केले. इ.स. १९९३ मध्ये त्यांनी कोलकाता येथील आय टी सी संगीत संशोधन अकादमीत आचार्य पद स्वीकारले व आजवर ते तिथे ग्वाल्हेर घराण्याच्या गुरूपदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य झाले आहेत व तयार होत आहेत.
त्यांनी आजपर्यंत भारतात व परदेशांतील अनेक मोठ्या संगीत महोत्सवांत भाग घेतला असून ऑस्ट्रेलियामधील बहुसांस्कृतिक महोत्सवात २००६ मध्ये, तर अॅमस्टरडॅम - भारत महोत्सवात २००८ मध्ये ते सहभागी झाले होते. त्यांच्या गायनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 7, 2017
गजानन वाटवे यांनी अनेक नामवंत कवीच्या कविता घेऊन त्या कविता लोकांपर्यंत पोहोचवल्या . त्यांची रानात सांग कानांत , आपुले नाते मी भल्या पहाटे येते , दोन ध्रुवावर दोघे आपण , यमुना काठी ताजमहाल , आभाळीचा चांद माझा , चंद्रावरती दोन गुलाब , ती पहा बापूजींची प्राणज्योती , मी निरंजनातील वात , गाऊ त्यांना आरती , तू असतीस तर झाले असते उन्हाचे गोड चांदणे , मोहुनीया तुजसंगे नयन खेळले जुगार.. अशी त्यांची असंख्य गाणी त्यावेळी रसिकांना तोंडपाठ होती.
April 2, 2021
चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात स्वत:च्या अभिनयामुळे नावाजलेलं तरुण व्यक्तिमत्व म्हणजे चिन्मय मांडलेकर होय.
May 23, 2014
प्रेम धवन यांचे वडील ब्रिटीश सरकारच्या नोकरी मधे जेल सुपरिंटेंडेंट होते. पुढे मोठेपणी त्यांनी ला॑होरच्या कॉलेजमधे प्रवेश घेतला जिथे त्यांचे वर्गमित्र होते साहीर लुधीयानवी. त्यांचा जन्म १३ जून १९२३ रोजी झाला. साहीर यांच्या बरोबरीने प्रेम धवन यांनीही वेगवेगळ्या चळवळींमध्ये भाग घेतला. अनेक देशभक्तीपर कविता त्या दोघांनी लिहील्या. ते दोघेही बरोबरीने कम्युनिस्ट पार्टीमधे सामील झाले. पुढे मुंबईला आल्यावर त्यांनी "ईप्टा" मधे प्रवेश केला. ईथे त्यांनी वेगवेगळी नाटके, गाणी आणि नृत्याच्या माध्यमातून कम्युनिस्ट चळवळीला हातभार लावला. काही काळ ते पं. रवीशंकर यांच्याकडे शास्त्रीय संगीतही शिकले. याचाच फायदा त्यांना पुढे "शहीद" आणि ईतर काही चित्रपटांना संगीत देताना झाला. पं. रवीशंकर यांचे मोठे बंधू उदय शंकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचेही धडे घेतले. देशभक्तीपर गाणी लिहीताना प्रेम धवन यांच्या प्रतिभेस विशेष बहर येई. "छोडो कलकी बातें, कल की बात पुरानी" हे हम हिंदूस्थानी या चित्रपटातील गीत त्याचे आणखी एक उदाहरण. ऐ मेरे प्यारे वतन हे गाणे प्रेम धवन यांचेच साल १९६५ - निर्माता केवल कश्यप यांचे नाव पुढे करून मनोज कुमारने चित्रपट निर्मीती मधे उतरायचे ठरवले.
मनोज कुमारला या देशातल्या लोकांची मानसिकता अचुक पणे माहीती होती. त्यामुळे त्याने सरळ देशभक्तीपर चित्रपट बनवण्याचे योजले. कथा निवडली शहीद भगतसिंग यांची. रामप्रसाद बिस्मील यांच्या काही मुळ रचना त्याने चित्रपटात वापरायच्या ठरवल्या. बाकी गाण्यांचा प्रश्न होता. गीतकार पी.एल.संतोषी (राजकुमार संतोषी यांचे वडील) हे मनोजकुमारचे खास मित्र. त्यांनीच मनोज कुमारला प्रेम धवन यांचे नाव सुचवले. चित्रपट प्रदर्शित झाला. मोहम्मद रफी यांच्या आवाजातले रामप्रसाद बिस्मील यांचे "सरफरोशी की तमन्ना" लोकप्रिय झालेच. पण त्याहून लोकप्रिय झाले - "ऐ वतन, ऐ वतन, हमको तेरी कसम" आणि क्लायमॅक्सला असलेले "मेरा रंग दे बसंती चोला". या चित्रपटाचे संगीतही प्रेम धवन यांचेच होते. दस लाख या चित्रपटातले "गरीबोंकी सुनो, वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे, वो दस लाख देगा". या गीताचे गीतकारही प्रेम धवन हेच होते.
किशोर कुमार यांनी गायलेले पहिले गाणे - "मरनेंकी दुवाएं क्युं मांगू, जिने की तमन्ना कौन करे" हे प्रेम धवन यांनीच लिहीलं होतं. पण एवढे सगळे गुण असूनही, दर्जेदार काव्य रचूनही त्यांचे समकालीन शैलेंद्र, साहीर आणि हसरत जयपूरी यांच्याप्रमाणे स्वत:ची वेगळी ओळख बनवण्यात ते अपयशी ठरले. संगीतकारांमधे खेमचंद प्रकाश (यांनी त्यांना पहीली संधी दिली), अनिल विश्वास, सलील चौधरी, चित्रगुप्त आणि रवी यांच्याशी त्यांचे विशेष जमायचे. त्यातही सर्वात जास्त (लोकप्रिय) गीते त्यांनी रवी यांच्या संगीतामधे दिली. काव्याबरोबरच नृत्याचीही त्यांना विशेष आवड होती. काही चित्रपटगीतांचे नृत्यदिग्दर्शन त्यांनी केले. त्यात विशेष उल्लेख म्हणून नया दौर चित्रपटातील "उडें जब जब जुल्फे तेरी" चा उल्लेख करावा लागेल. या व्यतीरिक्त दो बिघा जमिन, धूल का फूल, गुंज उठी शहनाई, वक्त या आणि अशाच काही चित्रपटांचे सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले. गीतकार म्हणून कारकिर्द चालू असताना काही चित्रपटांना संगीतसुध्दा दिले. मनोजकुमार यांचा शहीद, रात के अंधेरे मे, पवित्र पापी अश्या काही मोजक्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन मा.प्रेम धवन यांनी केले होते.
प्रेम धवन यांचे निधन ७ मे २००१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 8, 2017
“स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला” , “पालखीचे भोई” अशा एकाहून एक सरस तसंच दर्जेदार काव्यरचनांची निर्मिती करणारे प्रसिध्द कवि व साहित्यिक शंकर वैद्य यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूरमध्ये १५ जून १९२८ रोजी झाला.
July 10, 2012
सुर्यकांत दाणेकर हे किर्ती प्रकाशन, या प्रसिध्द संस्थेचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. नवोदित लेखक व कवींना आपल्या प्रतिभेचे अविष्कार रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ही प्रकाशन संस्था नेहमी तत्पर असते. आजपर्यंत प्रख्यात लेखिका अनुराधा वैद्य, रेखा बैजल यासारख्या अनेक हौशी व अनुभवी लेखकांचे साहित्य त्यांनी आपल्या निखळ साहित्यप्रेमापोटी आग्रहाने प्रकाशित केले. व्यक्तिशः हिंडून फिरून आपल्या पुस्तकांचे वितरण करणार्या काही मोजक्या संपादकांपैकी ते त्यांचे नाव प्रथम घ्यायला हवे. साहित्य निवडण्यातील त्यांच्या चोखंदळपणामुळे त्यांनी आपल्या वाचकवर्गाला नेहमीच दर्जेदार वाड्मय प्रदान केले आहे.
January 12, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti