जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
विष्णु माधव घाटगे हे भारताला हवाई क्षेत्रामधील स्वयंसिध्दतेकडे घेवून जाणारे एक महान वैज्ञानिक, उद्योगपती, व कारखानदार अशा तिहेरी भुमिकेतील तारणहार होते. या तारणहार म्हणण्याला कारणही तसेच आहे, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा विमान निर्मीतीसारख्या मोठ्या, किचकट, व आधुनिकतेबरोबरच भक्कम आर्थिक पाठबळ लागणार्या उद्योगधंद्यात उतरायला कोणीच धजत नव्हते. तेव्हा या प्रचंड उर्जेच्या, व व्यावसायिक कौशल्यांनी ओतप्रोत भरलेल्या उद्योजकाने कुणाच्याही मदतीशिवाय या पठडीबाहेरच्या, व आव्हानात्मक क्षेत्रात उडी मारली होती. घाटगे यांनी त्यांच्या स्वप्नवत कारकीर्दीमध्ये अनेक प्रकारची विमाने बनविली व विकलीसुध्दा. आपल्या डोक्यातही येणार नाही अशा कितीतरी दैनंदिन गोष्टी विमानाच्या साहाय्याने सुसह्य व गतिमान कशा करता येवू शकतात हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले होते. जसे पिकांवर औषधे व किटकनाशके फवारण्यासाठी कृषक हे चालवण्यास अतिशय सहज सोपे, व खिशाला परवडणारे विमान त्यांनी सामान्य शेतकर्यांसाठी बनविले होते. घाटगे यांनी ज्याप्रमाणे बाहेरच्या देशांना भारत कशा प्रकारे राखेतून सुरूवात करून आपल्या कर्तुत्वाची सुंदर व कल्पक रांगोळी निर्माण करू शकतो हे दाखवून दिले होते, त्याचप्रमाणे त्यांनी असंख्य उद्योजक होऊ पाहणार्या नव-तरूणांना प्रेरणा व आत्मविश्वासाचे तेज दिले होते. गुलाम गिरीची पुटं कधीच झाडली गेली होती व एक नव तंत्रज्ञानाचं, व विज्ञानाचं लख्ख आभाळ भारताला साद घालत होतं, या सादेला सर्वप्रथम प्रतिसाद दिला तो या स्वप्नाळू, परंतु बेहद निश्चयी मराठमोळ्या तरूणाने.
कीर्ती शिलेदार ह्या जयराम व जयमाला शिलेदार यांच्या कन्या. त्यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५२ रोजी झाला. आपल्या आई, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताची आराधना केलेल्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. त्यांचे शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे झाले. कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४००० हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले.
संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली.
संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे केली आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थाने बिनीच्या शिलेदार आहेत. रंगभूमीवर भूमिका रंगवताना त्यांनी नेहमी अभ्यासपूर्ण सौंदर्यशोध घेतला. त्यामुळेच त्यांच्या सर्व भूमिका आगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे.
संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्ताने भारतभर तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे. संगीत स्वरसम्राज्ञी हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून जे तीनपात्री सौभद्र सादर करतात.
कीर्ती शिलेदार यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कीर्ती शिलेदार यांची गाजलेली नाटके
‘अभोगी’, ‘एकच प्याला’, ‘कान्होपात्र’, ‘द्रौपदी’, ‘भेटता प्रिया’, ‘मंदोदरी’, ‘मानापमान’, ‘मृच्छकटिक’, ‘ययाति आणि देवयानी’, ‘रंगात रंगला श्रीरंग’, ‘रामराज्यवियोग’, ‘रूपमती’, ‘विद्याहरण’, ‘शाकुंतल’, ‘शारदा’, ‘श्रीरंग प्रेमभंग’, ‘संशयकल्लोळ’.
बांगलादेशी पार्श्वगायिका रूना लैला यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९५२ रोजी सिलहट बांगलादेश येथे झाला. भूपिंदर आणि रुना लैला यांनी गायलेलं घरोंदा या चित्रपटातील दो दीवाने शहर में हे गाणं व दमादम मस्त क़लन्दर हे खूपच लोकप्रिय झाले होते. रूना लैला यांनी जयदेव, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल व भप्पी लाहिरी यांच्या बरोबर काम केले आहे.
त्यांची काही बंगाली 'साधेर लाऊ बनाईलो मोरे', 'शिल्पी आमी, तोमादेरी गान शोनाबो' ही पण लोकप्रिय आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
काही माणसं किती विलक्षण, चमत्कारिक असतात ना? ती लक्षात राहतात ती त्यांच्या गुणांमुळे नाही तर त्यांच्या चमत्कारिक वागण्यामुळेचं. मात्र ही जगाच्या दृष्टीने निरोपायागी, मुर्ख असतात. ‘दत्त्या’ हा अशांचपैकी एक.
चन्द्रशेखर टिळक हे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडमध्ये (एनएसडीएल) कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. गेली १३ वर्षे ते ‘एनएसडीएल’मध्ये कार्यरत आहेत, त्याशिवाय त्यांनी मुंबई शेअर बाजारात ८ वर्षे, सेबीमध्ये २ वर्षे आणि इंडसेकमध्ये २ वर्षे अशी गुंतवणूक क्षेत्रांशी संबंधीत नोकरी केली आहे. १ एप्रिल १९९२ साली त्यांची सेबीवर प्रतिनियुक्ती झाली. भारतीय स्टॉक एक्स्चेंजेसमधुन प्रतिनियुक्तीवर जाणारे सर्वात तरूण आणि पहिले महाराष्ट्रीय अधिकारी आहे. अनेक अर्थिक घोटाळ्यांची त्यांनी तपासणी अधिकारी म्हणून तपासणी केली आहे.
कर्वे यांच्या साहाय्याने तयार केलेला सुलभ विश्वकोश (१९४९–५१) सहा भागांत प्रसिद्ध झाला. महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश (२ खंड, १९४२, १९४७) आणि शास्त्रीय परिभाषा कोश (१९४८) ही याच द्वयीने निर्माण केलेली कोशसंपदा होय. दाते यांनी रा. त्र्यं. देशमुख ह्यांच्या सहकार्याने, १८१० ते १९१७ ह्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मराठी मासिकांची, त्यांतील लेखांची, तसेच मराठी ग्रंथांची आणि ग्रंथकारनामांची सूची महाराष्ट्रीय वाङ्मयसूची (१९१९) ह्या नावाने तयार केली. शंकर गणेश दाते ह्यांनी तयार केलेल्या प्रसिद्ध ग्रंथसूचीच्या पूर्वी तशा दिशेने झालेला एक उल्लेखनीय प्रयत्न म्हणून ही सूची महत्वाची.
हरिवंश राय बच्चन यांनी १९३८ मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम. ए केले आणि १९५२ पर्यंत अलाहाबाद विद्यापीठात नोकरी केली. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९०७ रोजी झाला. १९५२ मध्ये इंग्लंड मध्ये कैम्ब्रिज विश्वविद्यालय येथे अभ्यास करण्यास गेले. परत आल्यावर भारत सरकारने नियुक्त केले. १९२६ मध्ये हरिवंश राय यांनी श्यामा यांचेशी लग्न केले.त्यांच्या निधना नंतर १९४१ मध्ये, बच्चन यांनी सूरी यांचेशी विवाह केला. हरिवंश राय बच्चन काही काळ मानद राज्यसभा चे सदस्य होते. हरिवंश राय बच्चन यांना १९७६ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. १९६९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हरिवंश राय बच्चन यांच्या सुरवातीच्या काळातील 'उमर ख़ैय्याम' ही कविता खूप प्रसिद्ध झाली. प्रसिद्ध 'मधुशाला' ही 'उमर ख़ैय्याम' ने प्रेरित होऊन लिहलेली आहे. 'मधुशाला' मुळे हरिवंश राय बच्चन यांना खूप प्रसिद्धी मिळाली. मा.हरिवंश राय बच्चन यांचे १८ जानेवारी २००३ मध्ये निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हरिवंश राय बच्चन यांचे काही इतर काव्य संग्रह.
मधुबाला, मधुकलश, निशा निमंत्रण, एकांत संगीत, सतरंगिनी, विकल विश्व, खादी के फूल, सूत की माला, मिलन, दो चट्टानें व आरती और अंगारे
'मधुशाला' च्या काही काव्य पंक्ती.
मदिरा पीने की अभिलाषा ही बन जाए जब हाला,
अधरों की आतुरता में ही जब आभासित हो प्याला,
बने ध्यान ही करते-करते जब साकी साकार, सखे,
रहे न हाला, प्याला, साकी, तुझे मिलेगी मधुशाला।। ।
सुन, कलकल़ , छलछल़ मधुघट से गिरती प्यालों में हाला,
सुन, रूनझुन रूनझुन चल वितरण करती मधु साकीबाला,
बस आ पहुंचे, दुर नहीं कुछ, चार कदम अब चलना है,
चहक रहे, सुन, पीनेवाले, महक रही, ले, मधुशाला।। ।
जलतरंग बजता, जब चुंबन करता प्याले को प्याला,
वीणा झंकृत होती, चलती जब रूनझुन साकीबाला,
डाँट डपट मधुविक्रेता की ध्वनित पखावज करती है,
मधुरव से मधु की मादकता और बढ़ाती मधुशाला।।।
हरिवंश राय बच्चन
चारचौघींसारखं साधं व्यक्तिमत्त्व असूनदेखील शांता हुबळीकर यांनी तीस-चाळीसच्या दशकातील मराठी रुपेरी पडदा चांगलाच गाजवला. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९१४ रोजी झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी काही कानडी नाटकात त्यांनी कामं केली व गायन देखील.पण त्यामध्ये उत्पन्न कमी असल्याने त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी भालजी पेंढारकर दिग्दर्शित कालियामर्दन चित्रपटात अगदी छोटीशी भुमिका साकारली. याच दरम्यान कोल्हापूर सिनेटोनमध्ये चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके ,'गंगावतरण' हा चित्रपट बनवत होते. त्या चित्रपटातही शांता हुबळीकरांनी ,गंगेची भुमिका केली व एका गाण्यासाठी गायन देखील केले होते.
भालजी पेंढारकर यांच्या "कान्होपात्रा"या चित्रपटात शांताबाईंना सर्वप्रथम महत्वपूर्ण भूमिका मिळाली. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले."कान्होपात्रातील"भूमिकेमुळेच शांताबाईंना प्रभात फिल्म कंपनीत "माझा मुलगा","माणूस" या दोन चित्रपटात नायिकेच्या भूमिका मिळाल्या. या दोन्ही चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिकांचं कौतुक तर झालेच,पण त्यांनी गायलेली गाणीही लोकप्रिय झाली. "माणूस" चित्रपटातील "कशाला उद्याची बात" हे त्यांचे गाणे आजही श्रवणीय वाटते. दुर्गा खोटे निर्मित "सवंगडी" चित्रपटासाठीही शांता हुबळीकरांनी गाणी गायली. "प्रभात","घर की लाज","कुलकलंक","मालन", "घरगृहस्थी", "सौभाग्यवती भव:" इत्यादी हिंदी चित्रपटांत त्यांनी कामे केली व पुन्हा एकदा त्या मराठी चित्रपटांकडे वळल्या. विश्राम बेडेकर दिग्दर्शित"पहिला पाळणा" मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली. मातृभाषा कानडी असूनही शांताबाईंनी फक्त एकाच कानडी चित्रपटात काम केले. चित्रपटाचे नाव होते "घरसंसार". फिल्मिस्तानच्या "सौभाग्यवती भव" या सिनेमात पहिल्यांदाच चरित्र अभिनेत्रीची भूमिका साकारली. शांता हुबळीकर यांचे १७ जुलै १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-इंटरनेट
क्रीडा क्षेत्रातील दिग्गज पत्रकार व मराठीतील ज्येष्ठ समालोचक विष्णू विश्वनाथ करमरकर उर्फ वि.वि.करमरकर यांचा जन्म ११ ऑगस्ट १९३८ रोजी नाशिक येथे झाला.
वि. वि.करमरकर यांना मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक मानले जाते. खेळासाठी झोकून काम करणाऱ्या पत्रकार करमरकरांनी क्रीडा कार्यकर्त्यांची भूमिकाही बजावली. जे मनात घेतले तसे व्हायलाच हवे, हा हट्ट त्यांनी कायम धरला. वागण्यात कोणतीही लवचीकता न ठेवता ते सतत सत्याचा ध्यास धरत राहिले.
‘वि.वि.क.’ या नावाने प्रचलित असलेले विष्णू विश्वनाथ करमरकर मुळचे नाशिकचे. वि. वि.करमरकर यांचे शालेय व माध्यमिक शिक्षण नाशिकच्या न्यू हायस्कूलमध्ये झाले. पदवी परीक्षेपर्यंत ते नाशिकच्याच हंसराड प्रागजी ठाकरशी महाविद्यालयात शिकले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम.ए. झाले. वि. वि. करमरकरांचे वडील डॉ. वि. अ. करमरकर हे निष्णात डॉक्टर होते.
मुलानेही आपल्याच क्षेत्रात कार्यरत व्हावे अशी प्रत्येक पित्याची इच्छा असते. मात्र त्यांच्या वडिलांनी ‘विष्णू’चा बाळहट्ट पुरविला. वि. वि. करमरकरांनी निवडलेल्या क्षेत्रात त्यांना आडकाठी येऊ दिली नाही. शालेय जीवनात प्रा. ग. वि. अकोलकर, रि.पु. वैशंपायन व भट तर महाविद्यालयात प्रा. वसंत कानिटकर, प्रा. आचार्य, प्रा. सोहोनी, प्रा. राम बापट, मुंबई विद्यापीठात प्रा. दांतवाला, प्रा. कांता रणदिवे व प्रा. अप्पू नायर यांनी करमरकरांच्या आचार-विचारांना दिशा दिली. लोकशाही समाजवादी विचाराने क्रियाशील असलेल्या करमरकर यांनी डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, मधू लिमये यांना आपले आदर्श मानले.
पत्रकारिता करताना द्वा. भ. कर्णिक, गोविंद तळवलकर, दि. वि. गोखले, साखळकर, पुरुषोत्तम महाले, चंद्रकांत ताम्हाणे, दिनू रणदिवे यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात. पत्रकारितेची सुरुवात नाशिकचे रसरंग साप्ताहिक आणि मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते एस. एम. जोशी यांनी सहकारी तत्त्वावर चालवलेल्या दैनिक ‘लोकमित्र’मधून केली.
जून १९६२पासून ‘टाइम्स’ समूहाचे ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या क्रीडा विभागाचे प्रमुख व सहसंपादक या नात्याने खेळाच्या पानाचे यशस्वी संपादन केले. खेळाच्या बातम्या, समीक्षण व स्तंभलेखन याविषयी मराठी माणसाची अतृप्त, तहान-भूक भागवण्यास करमरकरांची क्रीडा पत्रकारिता पूरक ठरली आणि सर्व मराठी वृत्तपत्रांत क्रीडा पत्रकारांना मानाचे स्थान व हक्काचे पान उपलब्ध झाले.
क्रिकेट कसोटी मालिका, क्रिकेट विश्वचषक, ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यांची दैनंदिन क्रीडा समीक्षा करणारे वि. वि. करमरकर यांचे स्तंभलेखन वाचकांनी उचलून धरले. आजही वाचकांना त्यांच्या लेखणीची ओढ कायम आहे. खेळाचे हौशी स्वरूप झपाटय़ाने बदलत गेले.
पाश्चात्त्य दुनियेइतके अफाट प्रमाणात नसले तरीही भारतीय क्रीडा क्षेत्रात साधारणत: मध्यम स्वरूपाच्या उद्योग समूहाचे (इंडस्ट्री) रूप येत आहे. त्याचा वेध करमरकरांनी सर्वप्रथम घेतला. औद्योगिक समूहात अटळ असलेली स्टेडियम्स, क्रीडा संकुले यांची उभारणी-त्यावरील बेफाम खर्च, त्यातील भ्रष्टाचार यावर त्यांनी १९९३पासून झगझगीत प्रकाश टाकला.
१९८२च्या दिल्लीमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेच्या बांधकामात सुमारे १००पर्यंत अनामिक मजूर मृत्युमुखी पडले, त्याची कैफियत त्यांनी ‘रक्तरंजित’मधून मांडली. दक्षिण कोरिआ, क्युबा, केनिया आदी छोटय़ा देशांच्या तुलनेतील भारतीय खेळाडूंचे मागासलेपण या गोष्टी ते नेहमी मांडत राहिले. खेळ हा विषय कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही, ही व्यथा ते व्यक्त करतात.
खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ यांच्या सहभागाशिवाय खेळाचे पान कसदार होणार नाही. याची जाणीव करमरकरांना पहिल्यापासून होती. कितीतरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, संघटक, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ यांच्या जिवंत अनुभवाचे त्यांनी शब्दांकन स्वत: केले.
देशी व ऑलिंपिक खेळाच्या प्रचार-प्रसार आणि विकासासाठी त्यांनी पदरमोड करून कोकणात खेड्यापाड्यांत भटकंती केली. खेळांच्या स्पर्धाचे आयोजन एवढाच उद्देश न ठेवता खेळाडूंची बौद्धिक, मानसिक व शारीरिक जडणघडण व्हावी, त्यागी-निष्ठावान खेळाडू घडावेत, याचा अखंड ध्यास घेऊन 'महाराष्ट्र क्रीडा विकास संस्थे'ची त्यांनी निर्मिती केली. त्या संस्थेमार्फत ते सतत दहा वर्षे रत्ना गिरी, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांत देशी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करीत राहिले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी हा वसा अविरत चालू ठेवला.
बडय़ा क्रीडा स्पर्धांदरम्यान, विशेष पुरवण्यांनी क्रीडा पान सतत सजवले. आकाशवाणी, दूरदर्शन, विविध टी. व्ही. चॅनल्सवरील करमरकर यांनी केलेली सामन्यांची धावती समालोचने व समीक्षणे खूप गाजली. क्रिकेटप्रमाणे कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस आदी खेळांच्या मराठीतील धावत्या समालोचनाने मराठी समीक्षेतील उणीव समर्थपणे दूर केली. निवृत्तीनंतर अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लेखमाला लिहिल्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दशरथ पुजारी हे एक उत्तम संगीतकार आणि तितकेच उत्तम गायक होते.
Copyright © 2025 | Marathisrushti