जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
रघुनाथ दामोदर सबनीस, हे वसंत सबनीस यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी झाला. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतल्यावर महाराष्ट्र सरकारची नोकरी त्यांनी केली. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात झाले तर, पुणे येथील फग्यूर्सन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. पुण्यातल्या वास्तव्यात, पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. 'घरोघरी हीच बोंब', 'कार्टी श्रीदेवी', या नाटकांबरोबरच, 'विच्छा माझी पुरी करा' सारखे अप्रतिम नाटय, इथून सुरुवात होऊन, सोंगाडया, एकटा जीव सदाशिव, हे गाजलेले चित्रपट दादा कोंडके यांच्यासाठी त्यांनी दिले. व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट यामधे एक प्रतिष्ठित विनोद रूजविण्याचा सबनीसांनी केलेला प्रयत्न बराचसा यशस्वी झाला. ते हसविण्यासाठी कधीच स्वस्त झाले नाहीत. त्यांच्या अनेक कथांना राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत.
नाटककार राम गणेश गडकरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 'गेला माधव कुणीकडे' सारखे तब्बल १० वर्षे मराठी रंगभूमीवर हाऊस फुल्ल जाणारे, 'कलावैभव' संस्थेला यश देणारे नाटक, 'अशी ही बनवाबनवी', 'गंमत जंमत' सारखे चित्रपट त्यांची ही खासियत अधोरेखित करतात. 'घरोघरी हीच बोंब' ’निळावंत’, 'नाटक' नावाचेचे नाटक तसेच 'सौजन्याची ऐशी तैशी', 'विच्छा माझी पुरी करा', 'गेला माधव कुणीकडे', अशी एकापाठोपाठ एक यशस्वी नाटकांची मालिका श्री. सबनीस यांच्या श्रेयनामावलीमध्ये आहे. 'सबनिशी' हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह, 'थापडया', 'पखाल', हे विनोदी कथासंग्रह, तर 'माझेश्वरी' हे ब-यावाईट अनुभवांचे संकलन प्रसिध्द झाले आहे.
मराठी लोककलांच्या क्षेत्रात सबनीस लीलया वावरले. त्यांनी ’विच्छा माझी पुरी करा’ लिहीले तेव्हा तमाशा, वग आदि प्रकारांना पांढरपेषांच्या कलांत वा मनोरंजनात स्थान नव्हते. दादा कोंडके हे नावही 'विच्छा' मुळे घरा घरात पोहचले. राजा, परधानजी, कलावंतीण आणि शिपाई ही पात्रे शहरातही चमकू लागली. मुंबईतील रंगभवन आणि राणीच्या बागेतील रंगमंचावरून 'विच्छा'ने सरळ दादरच्या शिवाजी मंदिर, गिरगावच्या साहित्य संघ इ. नाटयगृहांमधे धडक मारली. कित्येकदा विच्छाच्या प्रयोगात वसंत सबनीस दादांबरोबर बतावणीला उभे राहिले होते. पु. लं. समवेत त्यांनी 'तुका म्हणे' मधेही काम केले होते. वग नाटय लेखनात सबनीसांची लेखणी विशेष खुलली. 'छपरी पलंगाचा वग', म्हणजेच 'विच्छा' हे नाटक, व त्याबरोबरच 'खणखणपूरचा राजा', 'एक नार चार बेजार', 'त्रिशूलाचा वग', 'तुम्ही माझं सावकार', 'आदपाव सुतार, पावशेर न्हावी, सव्वाशेर शिंपी' अशीही अनेक नाटके त्यांनी लिहीले.
४५ वर्षे सबनीसांच्या लेखणीने विनोद फुलविले. अनुभवापलिकडचे विनोद करण्याची त्यांच्यात जबरदस्त ताकद होती. वसंतरावांना पैशापेक्षा लेखन अधिक प्रिय होते. भालजी पेंढारकरांनी वसंतरावांची दादांबरोबर जोडी जमविली, आणि 'सोंगाडया' रूपेरी पडदयावर आला. 'एकटा जीव सदाशीव' सुध्दा वसंतरावांनी दादांसाठी लिहीला. मात्र नंतर द्वयर्थी संवादांच्या आग्रहामुळे दादांसाठी त्यांनी लिहीणेही नाकारले. साध्या साध्या गोष्टींमधून, खास कारण नसतानाही विनोदनिर्मिती करण्याची त्यांची अनोखी अदा अनेकांना मोहवून जाते. सचिन बरोबर त्यांचे 'नवरी मिळे नव-याला', 'गंमत जंमत', 'एकापेक्षा एक', 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', असे एकाहून एक धम्माल विनोदी आणि सुपरहिट चित्रपट पडदयावर आले. मा.वसंत सबनीस यांचे १५ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आपल्या आयुष्यात कोण याव हे बहुदा नियतीच्या हाती असाव . ते आपल्या हाती जरी असते तरी आपण , जी माणसे नियतीने आपल्या पदरात टाकलीत त्या पेक्षा उत्तम आपल्याला निवडता आली असती का नाही कोणास ठाऊक ?
एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी-हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल-अरुण अर्थात अनिल मोहिले व अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आहे. मराठीतले शंकर-जयकिशन अशी ओळख असणाऱ्या या संगीतकार जोडीची कारकीर्द विलक्षण गाजली.
शशीकांत कोनकर ह्यांच्या मते ठाणे हे जणू मुंबईजवळचे पुणे आहे. उद्याच्या ठाण्याकडे पाहताना ते म्हणतात की ते नितांत सुंदर, स्वच्छ व संस्कृती जपणारे असावे. ठाणे विद्येचे माहेरघर आहे असंही ते म्हणतात.
श्री शिरिष मराठे हे मुंबईतील एक संगणक व्यावसायिक आहेत
वाणी जयराम या दक्षिणच्या एक प्रतिभाशाली गायिका आहेत. वाणी जयराम यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४५ रोजी झाला. त्यांनी तमिळ, तेलुगू , कन्नड, मल्याळम हिंदी आणि मराठी , गाणी गायली आहेत आहेत. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारने तीन वेळा सन्मानित केले गेले आहे. त्याचे पार्श्वगायना मध्ये खूप योगदान आहे. वयाच्या ८ व्या वर्षी त्यानी आकाशवाणी वर गायन केले. कर्नाटक और हिंदुस्तानी शैली त्या शिकल्या नाहीत तर त्यांनी विशेष अभ्यास केला. लग्नानंतर मुंबईत आल्यावर प्रथम ब्रेक मिळाला तो संगीतकार वसंत देसाई यांनी १९७१ मध्ये 'गुड्डी' चित्रपटासाठी ३ गाणी गाऊन घेतली तेव्हा.
वाणी जयराम यांनी गायलेल्या "बोल रे पपीहरा" या गाण्याने त्यांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली. या गाण्याला त्यांना तानसेन सन्मान मिळाला. सन १९८० साली 'मीरा' या चित्रपटा साठी फ़िल्म-फ़ेयर पुरस्कार मिळाला. दाक्षिणात्य कलाकार असूनही गायिका वाणी जयराम यांचे मराठी नाटय़संगीत आणि भावगीतांमधील योगदान मोठे आहे.`संगीतकार वसंत देसाई यांना त्यांच्या आवाजातील व्याकुळता आणि पोत आवडला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिची सुरुवातीची वाटचाल इथे सुरू झाली. केवळ वसंत देसाई यांनी आपल्या आवाजावर आणि सांगितिक प्रतिभेवर घेतलेल्या परिश्रमांमुळे आपली कारकीर्द यशस्वी ठरली अशा शब्दांत वाणी जयराम याही कृतज्ञता व्यक्त करतात.
‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ हे एकमेव नाटय़पद सोडले तर वाणी जयराम यांची बाकी सर्व गाणी ही भाव आणि चित्रपट गीते आहेत. ‘प्रेम पिसे भरले अंगी’ यातून ईश्वराविषयी वाटणारी उत्कटता संत नामदेवांनी आपल्या या अभंगातून साकारली आहे. ‘टाळ मृदुंग उत्तरेकडे, आम्ही गातो दक्षिणेकडे’ असे या गीतांत नामदेव म्हणून जातात. उत्तर ही भोगाची दिशा आहे तर पश्चिम ही मुक्ती देणारी दिशा आहे. आध्यात्मात रंगलेल्या या संताला साहजिकच भोगाऐवजी मुक्तीची आस लागली आहे. कोरसमध्ये या गीताची मोहिनी काही विलक्षणच आहे.
‘प्रियतम दर्शन देई, तुजविण करमत नाही ‘पाहिलं का कुणी पाहिलं का’, देवाचे घर कुणी पाहिलं का? ‘दूर जाते ही वाट रात्र अंधारी दाट, अरे कान्हा रे मला जाऊ दे घरी’ हे उच्च पट्टीत त्यांनी बांधलेले गीत वाणी जयराम पुन्हा झकास रंगवून गेल्या आहेत. ‘यशोदा’ या चित्रपटातील ‘माळते मी माळते, केसात पावसाची फुले मी माळते’ आणि ‘जिवलग माझा नाही आला’ (परिवर्तन) ही संगीतकार दत्ता डावजेकर यांची गाणी आहेत, तर संगीतकार राम कदम यांची ‘उठा उठा हो सूर्यनारायणा’ ‘माठ पाण्यात बुडाला’ आणि ‘थांब जोडीदारा’ ‘माठ पाण्यात बुडला’ हे ‘भोळी भाबडी’ चित्रपटातील गीत.‘भोळी मात्र त्यातले ‘टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संगे’ हे रामभाऊंचे गाणे अधिक लोकप्रिय झाले होते.
‘जसा पाऊस उन्हात न्हाला’ आणि ‘झाले बेजार गर्दी ही दाटली’ दोन गाणीही चांगली गाजली होती. मा.वाणी जयराम यांची ही सर्व गाणी आता ती सहसा ऐकायला मिळत नाहीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट. https://www.youtube.com/watch?v=SPAjRbHvobs https://www.youtube.com/watch?v=NbchuCfqBls
इटावामध्ये करीमुद्दीन आसिफ उर्फ के. आसिफ यांचे वडील फाजल करीम हे डॉक्टर होते. त्यांचा जन्म १४ जून १९२२ रोजी झाला.चित्रपट क्षेत्रात करिअर करण्यासाठी के. असीफ नंतर मुंबईला गेले. तेथे त्यांनी फेमस फिल्म लॅब येथे नोकरी केली. त्यांच्या मनात चित्रपट काढण्याचे खूळ होते. या संस्थेचे मालक सिराज अली हकीम यांनी त्यांच्या गोष्टी ऐकून त्यास भांडवल द्यायचे कबूल केले. त्या वर त्यांनी फूल नावाचा एक चित्रपट काढला व त्या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. त्यानंतर त्याने आपले नाव के. आसिफ असे केले. त्याच्या वाचण्यात मुगल-ए-आझम नावाचे नाटक आले.
मुघल-ए-आझम’ या चित्रपटाचा इतिहास.
‘‘१९२२ साली इम्तियाझ अली ताज या लेखकाने लिहिलेलं ‘अनारकली’ हे नाटक लाहोरमध्ये सादर झालं. के. आसिफ यांनी ते पाहिलं आणि त्यानं ते एवढे भारावले, की यावर आपण सिनेमा बनवायचाच, या ध्यासानं त्यांना पछाडलं. पण मनात आलं म्हणून सिनेमा बनवता येत नाही. त्यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. १९४० मध्ये के. आसिफ यांचं हे स्वप्न सत्यात येईल अशी आशा निर्माण झाली. निर्माते शिराझ अली यांच्या साथीने त्यांनी या चित्रपटाचं काम सुरू केलं. मात्र, बॉम्बे टॉकिजमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू व्हायला प्रत्यक्षात १९४६ साल उजाडलं. चंद्रमोहन (अकबर), डी. के. सप्रू (सलीम) आणि नर्गिस (अनारकली) हे त्यात प्रमुख भूमिकेत होते. चित्रपट काहीसा मार्गी लागत असतानाच १९४७ साली भारत-पाकिस्तान फाळणी झाली आणि चित्रपटाचं काम थंडावलं. शिराझ अली पाकिस्तानला निघून गेले. त्यांनी के. आसिफ यांना सुचवलं, की तुम्ही उद्योगपती शापूरजी पालनजी यांना भेटा, ते या सिनेमाला फायनान्स करतील. खरं तर शापूरजी पालनजींचा सिनेसृष्टीशी काहीच संबंध नव्हता. परंतु तरीही त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली याचं कारण- त्यांचं इराणी कनेक्शन आणि अकबरबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी. म्हणून त्यांनी अट घातली की, चित्रपटाचं नाव ‘मुघल-ए-आझम’ ठेवायचं. खरं तर ही सलीम-अनारकली यांची प्रेमकहाणी; परंतु निर्मात्यांच्या आग्रहाखातर सिनेमाचं नाव ठेवलं गेलं- ‘मुघल-ए-आझम’!’’ ‘‘पण अडचणी इथंच संपल्या नाहीत. सिनेमातील कलाकार चंद्रमोहन यांचं दरम्यान निधन झालं. त्यामुळे हा चित्रपट डबाबंद करावा लागला. आणि पुन्हा नव्यानं दिलीपकुमार, मधुबाला, पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे आदी कलाकार घेऊन चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं. या सिनेमाच्या निर्मितीवर तेव्हा सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च झाले. प्यार किया तो डरना क्या या एकाच गाण्यासाठी त्यांनी ३५ लाख रूपयांचा सेट उभारला. या एका गाण्यावरच झालेल्या खर्चात तेव्हा एक सिनेमा निघाला असता असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या कारणास्तव हाही सिनेमा बरीच वर्षे रखडला. चित्रपटाच्या निर्मितीखर्चानं निर्माते मेटाकुटीस आले. पण के. आसिफना आपल्या भव्य-दिव्य स्वप्नापुढे कशाची तमा नव्हती. शेवटी एकदाचा चित्रपट तयार झाला. प्रदर्शितही झाला. पुढचा इतिहास सर्वानाच ज्ञात आहे. मुंबईत ५ ऑगस्ट १९६० रोजी मराठा मंदिर चित्रपटगृहात तो झळकताना अॅ डव्हान्स बुकिंगसाठीच्या प्रचंड धक्काबुक्कीत एकावर चाकूने हल्ला झाल्याचा किस्सा आजही रंगवून सांगितला जातो. फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी तर हत्तीवरून वाजत-गाजत प्रिंट आणत. मुळचा हा कृष्णधवल चित्रपट (अपवाद फक्त प्यार किया तो डरना क्याफ गाण्याचा) २००३ च्या दिवाळीत रंगीत स्वरूपात दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित करतानाही इरॉस चित्रपटगृहात त्याची प्रिंट अशीच हत्तीवरून आणली होती. मराठा मंदिरला सलग तीन वर्षे तो हाऊसफुल्ल गर्दी खेचत होता. ‘शोले’ येई तो ‘मुघल-ए-आझम’चा हा विक्रम अबाधित राहिला. त्याकाळी एकाच वेळी देशातल्या १५० चित्रपटगृहांत हा सिनेमा प्रदर्शित केला गेला. हाही तेव्हाचा विक्रम होता. उत्पन्नाचे नवे मापदंड ‘मुघल-ए-आझम’ ने निर्माण केले. हा चित्रपट पूर्ण झाला व एक अजरामर कलाकृती निर्माण झाली. मा.के. आसिफ यांच्या मा.सितारादेवी या पत्नी. मा.के.आसिफ यांचे ९ मार्च १९७१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
के.आसिफ यांचा मुघल-ए- आझम चित्रपट.
https://www.youtube.com/watch?v=WLKUdiTCrkg.
संन्यास घेण्याअगोदर ते पत्रकार होते. बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी भाग घेतला होता. तुरुंगवासही भोगला होता. स्वातंत्र्यानंतर २७ वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत होते. त्यांनी लिहिलेली अडीचशेवर पुस्तके याचीच साक्ष देतात.
अरुण कोलटकर हे महाराष्ट्रातील बहुभाषिक कवी होते. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी व इंग्लिश भाषेत कविता लिहिल्या आहेत.
इंदूरच्या रामूभैय्या दाते यांचा दरबार अत्यंत प्रतिष्ठेचा आणि तालेवार रसिकांचा मानला जाई. रामूभैय्या म्हणजे अरुण दाते यांचे वडील. अरुण दाते यांचा जन्म ४ मे १९३५ रोजी झाला. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे अगदी सुरुवातीला गाणे शिकले. पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. अरुण दाते यांचा आवाज जरासा पातळ आणि तलत मेहमूदच्या जातकुळीतला, पण त्यात अस्सल घरंदाज गायकीचे रंग मिसळलेले. घरात असताना दिवसभर गाणे कानावर पडत असल्याने कान तयार आणि संगीताची उत्तम जाण. असे गुण असलेला आपला मुलगा गायक व्हावा हे रामूभैय्यांचे स्वप्न अरुणने पुढे प्रत्यक्षात आणले. मा.अरुण दाते टेक्सटाइल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी मुंबईत रहात असताना ते पु.ल.देशपांडे यांना भेटत असत. पुलंनीच अरुण दाते हे उत्तम गात असल्याचे पाहून रामूभैय्या दातेंना तसे सांगितले. संगीतातले दर्दी, कलावंतांबद्दल असीम जिव्हाळा, आणि त्यांच्या कलेबद्दल अतीव आदर असलेले रामूभैय्या दाते हे ऐकून प्रसन्न झाले. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षीच्या पराक्षेत अरुण दाते नापास झाल्याचे समजल्यावर ते म्हणाले "टेक्स्टाइल इंजिनिअर होणारे अनेक जण आहेत, पण तुझ्यासारखे गाणे किती जणांना येते ते सांग". घरूनच असे प्रोत्साहन असल्याने, अरुण दाते यशस्वी टेक्सटाइल इंजिनिअरबरोबरच यशस्वी गायक झाले यात आश्चर्य नाही.
१९५५ पासून अरुण दाते आकाशवाणीवर गाऊ लागले. वयाच्या पन्नाझशीत म्हणजे १९८४ मध्ये अरुण दाते यांनी स्वत:ला पूर्णपणे भावगीताला वाहून घेतले. १९६२ मध्ये ’शुक्रतारा मंदवारा’ ह्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली आणि अरुण दाते यांना त्यानंतर जराही उसंत मिळाली नाही. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत दिग्दर्शक सतत तीन वर्षे त्यांच्या पाठीस लागले होते."मी हिंदी मुलखातला,माझे मराठी उच्चार धड नाहीत, मी, हेच काय पण कोणतेही मराठी गीत म्हणू शकणार नाही" असे म्हणणार्याु अरुण दाते यांनी शेवटी हे भावगीत म्हटले. इ.स.२०१०पर्यंत अरुण दाते यांचे ’शुक्रतारा’ या नावाने होणार्याा मराठी भावगीत गायनाचे २५००हून अधिक कार्यक्रम झाले आहेत. आणि हे सर्व कार्यक्रम हाउसफुल्ल होत आले आहेत. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक आल्बम आजही लोकप्रिय आहेत. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला परत झळाळी प्राप्त करून दिली असे म्हटले जाते. मा.अरुण दाते यांनी लता मंगेशकर,आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मलहोत्रा, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते गायली आहेत. आपल्या शुक्रतारा या नावाने ते करीत असलेल्या कार्यक्रमांत ते फक्त मुळात स्वत: गायलेली गीतेच सादर करतात.आणि श्रोत्यांना तीच तीच गाणी परत परत ऐकायला आवडतात. या बाबतीत ते गजाननराव वाटव्यांचे शिष्य आहेत.अरुण दाते यांनी "शतदा प्रेम करावे" या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अरुण दाते यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=uB8jKp6Ixkg
https://www.youtube.com/watch?v=W8baLzpGMtA
Copyright © 2025 | Marathisrushti