जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
आज ११ नोव्हेंबर..आज यशवंत दत्त यांची पुण्यतिथी.
आई - वडील यांच्याकडून आलेला अभिनयाचा वारसा, उपजत अभिनयकौशल्य या बळावर यशवंत दत्त या माणसाने मराठी नाटक आणि चित्रपट यांत आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. मराठीनंतर त्याला हिंदीतही चांगली संधी चालून आली होती. नकला हा यशवंत दत्त यांचा स्थायीभाव होता. शाळेत असल्यापासून ते शिक्षकांच्या इतक्यात हुबेहूब नकला करत असत, अर्थात, पुढे नकला करण्याची सवय त्यांच्या कामी आली. "थंडर्स' नावाच्या ऑर्केस्ट्रात ते काम करत असत. निवेदन आणि नकला करून ते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले होते. यशवंत दत्त या हरहुन्नरी अभिनेत्याची ती सुरवात होती. यशवंत दत्त यांच्या आई - वडिलांनी चित्रपटात व नाटकांत कामे केली होती. वडिलांनी तर "गरिबांचे राज्य' या नावाचा चित्रपट काढला होता; पण दुर्दैवाने या चित्रपटात त्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला. यशवंत दत्त यांना गरिबीचे चटके सोसावे लागले. आपल्याला आलेल्या आर्थिक अपयशामुळे वडिलांचा यशवंत दत्त यांनी नाटक व चित्रपटसृष्टीत जाण्यास विरोध होता; पण अखेर त्यांनी यशवंत दत्त यांना परवानगी दिली आणि मार्गदर्शनही केले. घरच्या गरिबीवर मात करताना यशवंत दत्त यांनी उडप्याच्या हॉटेलात नोकरी केली, पानाच्या गादीवर काम केले, अखेर "फिलिप्स' मध्ये ते कामगार म्हणून रुजू झाले. यशवंत दत्त यांनी आपल्या अभिनयक्षमतेच्या जोरावर या कंपनीला विविध एकांकिका आणि नाट्यस्पर्धांतून विविध प्रकारची बक्षिसे मिळवली. यशवंत दत्त यांच्यामुळे फिलिप्स कंपनीचे नाव कलाक्षेत्रात गाजत होते. राज्य नाट्यस्पर्धेत "अडीच घरं वजिराला' हे नाटक पुणे केंद्रातून निवडले गेले, मग मुंबईच्या नाट्यसंस्थांकडून त्यांना बोलवणी येऊ लागली. दत्ता भट यांच्यासारख्या नामवंत अभिनेत्याने त्यांना आपल्याबरोबर काम करण्यासाठी बोलावले. "गरिबी हटाव' या नाटकात यशवंत दत्त यांनी चुणूक दाखवून दिली. नंतर यशवंत दत्त यांची तीन नाटकं आली. यशवंत दत्त यांना नाव मिळवून दिले ते "नाथ हा माझा' या नाटकाने. या नाटकातील सुभानराव यशवंत दत्त यांनी इतका मस्त उभा केला, की लोकांची त्यांना प्रचंड दाद मिळत असे. हे नाटक अचानक बंद पडले, पुन्हा काही काळाने ते परतले ते "वेडा वृंदावन' या नाकातून. त्यानंतर सुरू झाला यशवंत दत्त यांचा चित्रपटक्षेत्रातील प्रवास. "सुगंधी कट्टा', "दगा'मध्ये त्यांनी खलनायक, नायक रंगवला. मराठी चित्रपटसृष्टीला तेव्हा एका चांगल्या नायकाची गरज होती, ती पोकळी यशवंत दत्त यांनी भरून काढली. "भैरू पैलवान की जय', "दौलत', "फटाकडी', "आपली माणसं', "आयत्या बिळात नागोबा', "पैजेचा विडा' आदी चित्रपटांतून त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. "शापित'मध्ये केलेल्या भूमिकेची दखल देशपातळीवर घेतली गेली.
चित्रपटात काम करून प्रसिद्धी मिळत असताना त्यांनी नाटक करणे सोडले नाही. प्रत्येक नटाला मोह पडावा अशी भूमिका म्हणजे "नटसम्राट'मधील गणपतराव बेलवलकरांची..“ती वयाच्या चाळीसाव्या वर्षी इतकी सहजगत्या साकारली की प्रेक्षकांनी या व्यक्तीरेखेला अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यानंतर यशवंत दत्त यांनी “गगनभेदी” नाटक केले. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचे नाटक म्हणजे “वादळ माणसाळतंय”. वसंत कानेटकर यांनी बाबा आमटे यांच्या आयुष्यावर लिहिलेले हे नाटक यशवंत दत्त यांनी अत्यंत प्रभावीरित्या केले. त्यानंतर सुध्दा वसंत कानेटकर यांच्याच “सोनचाफा” आणि जयवंत दळवींच्या “कालचक्र” या दोन्ही नाटकांमध्ये यशवंत दत्त यांनी अभिनय केला.त्याचप्रमाणे “सरकारनामा” चित्रपटातून त्यांनी रंगवलेला खलनायक अगदी हुबेहूब रंगवून प्रेक्षकांकडून दाद मिळवली; ती आजही अनेकांच्या स्मरणात आहे. यशवंत दत्त यांनी "शापित" तसंच "संसार" या चित्रपटातून साकारलेल्या भुमिकांना "राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
नाटक, चित्रपट यामध्ये मग्न असलेल्या यशवंत दत्त यांच्यामध्ये एक हळुवार कवी लपलेला होता. यशवंत दत्त यांनी मराठी चित्रपट आणि रंगभूमीला दिलेलं योगदान अतुलनीय आहे. मा.यशवंत दत्त यांचे ११ नोव्हेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आपल्या अफाट अष्टपैलू अभिनयाच्या गुणांनी नाट्य-चित्रसृष्टीवर कायमस्वरूपी ठसा उमटवणारे गंभीर प्रवृतीचे अभिनेते निळू फुले यांचा जन्म २५ जुलै १९३१ रोजी पुणे येथे झाला.
निलकांत कृष्णाजी फुले उर्फ निळूभाऊ सुरवातीच्या काळात वानवडीच्या लष्करी महाविद्यालयात माळीकाम करत असत. हे पिढीजात काम करताना त्यांना मनापासून आनंद मिळत होता. याच क्षेत्रात करिअर करायचा त्यांचा विचार होता. मात्र, आर्थिक अडचणीमुळं त्यांना नर्सरी उघडता आली नाही. तेव्हा मिळणाऱ्या ८० रुपये पगारातले दहा रुपये निळूभाऊ राष्ट्रसेवा दलाला देत होते.
१९५७ च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी निळूभाऊंनी सेवादलासाठी येऱ्यागबाळ्याचे काम नोहे हे नाटक लिहिलं. या नाटकामुळं निळूभाऊंचे नाव झालं. मग त्यांनी माळीकाम सोडून पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.
राम नगरकरांसोबत त्यांनी कथा अकलेच्या कांद्याची हे वगनाट्य गाजवलं. महाराष्ट्रभरात या दोघांचे नाव झालं. अनंत मानेंच्या एक गाव बारा भानगडी या तमाशापटात निळूभाऊंना सिनेमातील पहिला ब्रेक मिळाला. या सिनेमात त्यांनी साकारलेल्या झेले अण्णांच्या भूमिकेनं त्यांना मराठी चित्रसृष्टीची कवाडं खुली झाली.
पुढं १९७२ मध्ये निळूभाऊंनी विजय तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर या नाटकात काम केले आणि या नाटकानं इतिहास घडवला. त्यांना स्वतःलाही बाइंडर आणि दळवींच्या सूर्यास्तमधले अप्पाजी या भूमिका विशेष आवडायच्या. अप्पाजी ही भूमिका तात्त्विक दृष्ट्या त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील मूल्यांशी साधर्म्य सांगणारी होती, म्हणूनही असेल.
बाइंडर नंतर तेंडुलकरांच्याच सामनामध्ये निळूभाऊंना हिंदूराव धोंडे पाटील साकारण्याची संधी मिळाली.शांतारामबापूंच्या पिंजरामुळं डॉ. श्रीराम लागूंचं मोठं नाव झालं होतं. सामनात निळूभाऊंचा सामना त्यांच्याशीच होता. प्रेक्षकांना मात्र या दोन नटश्रेष्ठांची जुगलबंदी पाहण्याचा अपूर्व योग लाभला.
वास्तविक पिंजरात निळूभाऊ होतेच. त्यांची भूमिका छोटी होती. मात्र, मास्तरांकडं पाहून केवळ कुत्सितपणे हसणं एवढीच कामगिरी त्यांनी अशी जबरदस्त साकारली होती, की हे केवळ निळूभाऊच करू जाणे. मास्तर म्हणजे डॉ. लागू संतापून एकदा निळूभाऊंच्या जोरात मुस्कटात भडकावतात, हा प्रसंग म्हणजे त्या चित्रपटातील एक हायपॉइंट ठरला होता. निळूभाऊंच्या अभिनय सामर्थ्याची प्रचिती डॉ. लागूंना तेव्हाच आली होती. त्यामुळं सामना करताना दोघांनाही मजा आली. हिंदूरावची भूमिका निळूभाऊ अक्षरशः जगले. तेव्हा महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातून ग्रामीण भागात होत असलेले बदल आणि या साखरसम्राटांकडून सुरू झालेला सत्तेचा गैरवापर हा मुद्दा प्रभावी होता. तेंडुलकरांनी हिंदूरावची भूमिका जबरदस्त लिहिली होती. या भूमिकेला निळूभाऊंनी पुन्हा एकदा समर्थपणे न्याय दिला.
सामना चित्रपटानंतर निळूभाऊंकडं अशाच पद्धतीच्या भूमिकांची रांग लागली. सगळेच चित्रपट काही एवढे दर्जेदार नसायचे. निळूभाऊंचाही पोटापाण्याचा व्यवसाय असल्यानं येतील त्या भूमिका कराव्या लागायच्या. बहुतेक वेळा टिपिकल खलनायक रंगवावा लागे. त्यात मग नायिकेच्या पदराला हात घालण्याचा प्रसंग अनेक वेळा यायचा. एरवी अत्यंत सच्छिल असलेल्या निळूभाऊंना वारंवार नायिकेवर बलात्कार करण्याचा सीन शूट करावा लागायचा. मराठी सिनेमांतल्या नायिकाही त्याच त्या असायच्या. कोल्हापुरातल्या मुक्कामात शेवटी ते वैतागून दिग्दर्शकाला म्हणाले, अरे, गेल्या तीन सिनेमांत मी तेच करतोय आणि बाईही तीच. निदान या खेपेला बाई तरी बदला...
एक किस्सा सांगतात की एका मराठी कलाकाराने निळूभाऊंना घरी जेवायला बोलावलं होतं. त्या वेळी त्या कलावंताच्या आईनं, असल्या नालायक माणसाला मी जेवायला वाढणार नाही, असं म्हणून त्यांना जेवणही नाकारलं होतं. ही त्यांच्या भूमिकेची ताकद होती.
त्यांच्या या नेहमीच्या पठडीतून बाहेर काढून, त्यांना एकदम प्रोटॅगनिस्टची भूमिका देण्यासाठी पुन्हा जब्बार पटेल धावून आले. अरुण साधूंच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कादंबऱ्यांवर आधारित सिंहासन या चित्रपटात दिगू टिपणीस या पत्रकाराची भूमिका निळूभाऊंच्या वाट्याला आली. सत्ताकेंद्राच्या अत्यंत जवळ राहून, सिंहासनाचा सर्व खेळ तटस्थपणे पाहणाऱ्या दिगूची भूमिका निळूभाऊंनी समरसून केली. या चित्रपटाचा शेवट मंत्रालयाच्या बाहेर खदाखदा हसत सुटलेल्या दिगूवर होतो. निळूभाऊंनी त्या हसण्यात त्या व्यवस्थेविषयीची सर्व प्रतिक्रिया एवढी टोकदारपणे व्यक्त केली होती, की तो चेहरा आजही डोळ्यांसमोरून हलत नाही.
जब्बार पटेलांच्या बहुतेक सिनेमांत निळू फुले असायचेच. मग तो जैत रे जैत असो, की एक होता विदूषक असो.
निळू फुले यांनी थोडे-फार हिंदी सिनेमेही केले. 'कुली'मध्ये ते अमिताभसमोर तेवढ्याच ताकदीनं उभे राहिले. महेश भटच्या 'सारांश'मध्येही त्यांना खलनायक साकारायला मिळाला. पण निळू फुले हिंदीत फार रमले नाहीत. त्यांना आपल्या गावरान मराठी सिनेमांचा ठसकाच अधिक भावत असावा.
निळू फुले यांच्या व्यक्तित्वाचा आणखी एक विशेष म्हणजे ते निव्वळ अभिनेते नव्हते. त्याहीपलीकडं जाणारी,खऱ्या आयुष्यातली माणूस नावाची एक वास्तववादी भूमिका ते अगदी समरसून जगत होते. महात्मा फुल्यांचा वारसा सांगणारे एक सामाजिक अंग निळूभाऊंना होते. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेविषयी त्यांना कळवळा होता. शबनम, झब्बा अशा साध्या वेषात एरवी ते तसेही कार्यकर्ताच वाटत. राष्ट्रसेवा दल, डॉ राममनोहर लोहिया यांच्या विचारांची बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जपली. सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा विविध उपक्रमांना, संघटनांना त्यांचा सक्रिय पाठिंबा असे.
निळू फुले यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यात महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग ३ वर्षे साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार, 'सूर्यास्त' या नाटकाकरिता नाट्यदर्पण हा पुरस्कार,जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश आहे.
निळू फुले यांचे १३ जुलै २००९ रोजी निधन झाले.
निळू फुले यांची कारकीर्द
गाजलेली लोकनाट्ये
कथा अकलेच्या कांद्याची, कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची, वगैरे.
गाजलेले मराठी चित्रपट
अजब तुझे सरकार, आई (नवीन), आई उदे गं अंबाबाई, आघात, आयत्या बिळावर नागोबा, एक गाव बारा भानगडी, एक रात्र मंतरलेली, एक होता विदुषक, कडकलक्ष्मी, कळत नकळत, गणानं घुंगरू हरवलं, गल्ली ते दिल्ली, चटक चांदणी, चांडाळ चौकडी, चोरीचा मामला, जगावेगळी प्रेमकहाणी, जन्मठेप, जिद्द, जैत रे जैत, दिसतं तसं नसतं, दीड शहाणे, धरतीची लेकरं, नणंद भावजय, नाव मोठं लक्षण खोटं, पटली रे पटली, पदराच्या सावलीत, पायगुण, पिंजरा, पुत्रवती, पैज, पैजेचा विडा, प्रतिकार, फटाकडी, बन्याबापू, बायको असावी अशी, बिन कामाचा नवरा, भन्नाट भानू, भालू, भिंगरी, भुजंग, मानसा परीस मेंढरं बरी, मालमसाला, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, राघुमैना, राणीने डाव जिंकला, रानपाखरं, रावसाहेब, रिक्षावाली, लाखात अशी देखणी, लाथ मारीन तिथं पाणी, वरात, शापित, सतीची पुण्याई, सर्वसाक्षी, सवत, सहकारसम्राट, सामना, सासुरवाशीण, सोबती, सोयरीक, सिंहासन, सेनानी साने गुरूजी, सोंगाड्या, हर्या नार्या जिंदाबाद, हळदी कुंकू, हीच खरी दौलत.
गाजलेले हिंदी चित्रपट
कूली, जरा सी जिंदगी, दिशा, दुनिया, नरम गरम, प्रेम प्रतिज्ञा, मशाल, सारांश, सौ दिन सास के
गाजलेली नाटकं, जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे, सखाराम बाईंडर, सूर्यास्त.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
शांताराम आठवले यांचे वडील ग्वाल्हेरच्या सरदार शितोळे यांचे पुण्यातील कारभारी होते. त्यांचा जन्म २१ जानेवारी १९१० रोजी झाला. शांताराम आठवल्यांचे शिक्षण पुण्याच्या भावेस्कूल मध्ये झाले. “बेबंदशाही,“शिवसंभव” या सारख्या नाटकात अभिनय व दिग्दर्शन करुन ती क्षेत्रेही आठवल्यांनी शाळेत असतानाच गाजवली. सुप्रसिद्ध कादंबरीकार ह.ना.आपटे यांची व आठवलेंची पत्र मैत्री होती. त्यांच्या कवितांचा पहिला संग्रह “एकले बीज” या नावाने १९३८ साली म्हणजे ते प्रभातकवी झाल्यानंतर प्रसिद्ध झाला. त्या पाठोपाठ १९४० साली “बीजांकुर” हा दुसरा प्रसिद्ध झाला. “सकाळ”, “स्वराज्य” ”अश्या वर्तमानपत्रात तर “मनोहर”, “वांग्मयशोभा” यांसारख्या मासिकांमधून व “शालापत्रक” या लहान मुलांच्या मासिकात त्यांच्या कविता नेहमी प्रसिद्ध होत असत. “ प्रभात फिल्म कंपनी आपटे यांच्या 'भाग्यश्री' या कादंबरीवर आधारित चित्रपट तयार करू इच्छित होती. भेटीत त्या योजनेवर शिक्कामोर्तब झाले. चित्रपटाचे नाव ठरले “अमृतमंथन”.
शांताराम आठवलेंच्या साध्या सोप्या काव्यरचनेने आपटे खूपच प्रभावित झाल्यामुळे त्यांनी अमृतमंथन चित्रपटाची गीते लिहिण्यासाठी आठवले यांचे नाव सुचवले आणि सुदैव असे की ते मान्यही झाले. मा.शांताराम आठवले यांना प्रभातमध्ये गीतकार, पद्यलेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. 'अमृतमंथन' नंतर “संत तुकाराम”,“कुंकू”,“गोपालकृष्ण”,“माझा मुलगा”,“संत ज्ञानेश्वर”,“शेजारी”,“संत सखू”,“दहा वाजता” आणि “रामशास्त्री” या प्रभात चित्रपटांसाठी आठवले यांनी गीते लिहिली. काव्य, भाषेचा गोडवा, साधेपणा आणि सोपेपणा राखायचे अवघड काम शांताराम आठवले यांनी केल्या मुळेच त्यांचे स्थान “मराठी चित्रपटगीतांचे आद्यकवी” असे आहे. त्यांच्या अशा नाव लौकिकामुळे त्यांना, प्रभातच्या चालकांच्या परवानगीने, “भरतभेट”,“आपले घर” अशा काही प्रभात बाहेरच्या चित्रपटांसाठीही गाणी लिहावी लागली यामध्ये भाग्यरेखा”,“बेलभंडार”,“झंझावात”, “वहिनीच्या बांगडया”, “शेवग्याच्या शेंगा”,“आई मला क्षमा कर”,“पडदा”,“सुभद्राहरण”,“वावटळ” या चित्रपटांचा समावेश आहे.
शांताराम आठवले यांनी “शांतिचिया घरा”,“बकुळफुले”,“वनातली वाट”,“कुंडलीनी जगदंबा”,“सुखाची लिपी”,“ओंकार रहस्य” आणि “प्रभातकाल” या सारखी एकापेक्षा एक सरस पुस्तके लिहिली.याशिवाय त्यांच्या भाव कविता, चारोळ्या, बालगीते यासारखे वाङ्मय देखील लोकप्रिय ठरले आहेत. मा.शांताराम आठवले २ मे १९७५ रोजी यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ janasampark.com
शांताराम आठवले यांची अधिक माहिती वेब साईट http://www.shantaramathavale.com
श्री. चंद्रशेखर पी. परांजपे हे ठाणे येथील ठाणे भारत सहकारी बॅंकेचे संचालक आहेत.
टीव्ही आणि आकाशवाणीसाठी त्यांनी तब्बल पन्नासच्यावर सुंदर जिंगल्स लिहिल्या. १९७७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बन्या बापू’ या मराठी चित्रपटाची सर्व गीते प्रचंड गाजली. ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी’, ‘मी कशाला आरशात पाहू गं…’, ‘अरे ले लो भाई चिवडा लेलो’, ‘हे गर्द निळे मेघ, बिलगून जशी वीज’ ही चार गाणी उषा मंगेशकर, शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल यांनी गायलेली, तर संगीत दिले होते ऋषी-राज या संगीतकाराने.
ज्यांच्या समीक्षेचा दरारा संपूर्ण साहित्य विश्वाला वाटतो, त्या म. सु. पाटील यांची मुलगी असूनही नीरजा यांनी मात्र कवितेची निवडली. या वाटेवर त्यांनी केलेला प्रवास किती दमदार होता आणि आहे, हेच त्यांना नुकत्याच जाहीर झालेल्या केशवराव कोठावळे पुरस्काराने सिध्द झालं आहे.
सुनील गावस्कर हे डेरेक अंडरवुड यांची १२ वेळा ‘शिकार’ठरले होते. डेरेक अंडरवुड यांची गोलंदाजी इतकी सफाईदार होती की, त्यांनी आपल्या संपुर्ण क्रिकेट कारकिर्दीत एकही वाईड चेंडू टाकला नाही.
सीकेपी समाजातील अनेक महिला आज जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये अग्रणी राहून आपल्या समाजाला गौरवीत करत आहेत. खासगी संस्था ते मल्टिनॅशनल कोर्पोरेट्स, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पाककला, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रांत सुद्धा आपल्या महिलांचा वावर वाखाणण्याजोगा आहे. तलवार आणि लेखणीचा वारसा सांगणाऱ्या आपल्या या समाजात लेखणीचा उत्तम वापर करत साहित्य निर्मिती करणाऱ्या अनेक महिला आजही विविध माध्यमांतून आपले साहित्यिक योगदान देत असतात. योगायोगाने या वर्षी २२ मे रोजी पुणे येथे दुसरे सीकेपी साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर सीकेपी समाजातील शंभराहून अधिक लेखिका कवयित्रींना आणि अगदी पाकशास्त्रावरील पुस्तके लिहिणाऱ्या सुगरणींना तुमच्यासमोर आणायचा हा एक छोटासा प्रयत्न.
वनस्पतींनाही संवेदना असतात', याची जगाला जाणीव करून देणारे महान भारतीय वैज्ञानिक सर जगदीशचंद्र बोस यांचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ रोजी झाला.
बोस यांचा जन्म बांगला देशातील मैमनसिंग येथे झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बोस हे फरीदापूर जिल्ह्याचे उपदंडाधिकारी होते. भारतीय संस्कृती व परंपरा पाळणाऱ्या कुटुंबात त्यांचे बालपण गेले. रामायण व महाभारत या श्रेष्ठ महाकाव्यांचे त्यांच्यावर बालपणापासून संस्कार झाले होते. ही महाकाव्ये त्यांच्या जीवनप्रणालीचे प्रेरणास्रोत होती. सातत्याने कठोर परिश्रम केल्यास अपयशाचे परिवर्तन यशामध्ये होऊ शकते, यावर त्यांची वाढ श्रद्धा होती.
कोलकाता (कलकत्ता) येथील सेंट झेविअर्स शाळेत त्यांचे प्रारंभिक शिक्षण झाले. या शाळेत बहुसंख्य विद्यार्थी ब्रिटिश व इंग्रज प्रशासकीय सेवेतील भारतीय अधिकाऱ्यांची मुले होती. जगदीशचंद्र हे ग्रामीण भागातील असल्यामुळे इतर मुले या मुलाची थट्टा व छळ करीत असत. सुरुवातीस बोस यांनी त्यांची ही मस्ती व त्रास सहन केला. परंतु या वागण्यामुळे बोस यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला, तेव्हा त्यांनी त्या शहरी मुलांपैकी एका आडदांड मुलाला चांगलेच चोपले व खाली पाडले. त्यांच्या या प्रतिकारामुळे बरेच विद्यार्थी त्यांचे मित्र बनले व त्यांना मान देऊ लागले. या प्रकारानंतर मात्र त्यांना त्रास देण्याची हिंमत कोणी दाखवली नाही.
बोस यांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्ता येथील महाविद्यालयातच झाले. नंतर वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. तेथील वास्तव्यात पदार्थ विज्ञानाचे नामांकित तज्ज्ञ लॉर्ड रॅले यांचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की वैद्यकशास्त्र सोडून पदार्थविज्ञानाचेच अध्ययन त्यांनी सुरू केले. त्यासाठी केंब्रिजच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. १८८५ साली त्यांनीलंडन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली. याबरोबरच सृष्टिविज्ञान विषयातील ट्रायपॉस ही पदवी मिळवून ते भारतात परतले.
भारतात परतल्यानंतर ते कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्य करू लागले. हे उच्च पद धारण करणारे ते पहिले भारतीय होते. या उच्च पदावर काम सुरू केल्यानंतर त्यांना समजले की, ब्रिटिश प्राध्यापकांपेक्षा आपल्याला कमी वेतन देण्यात येत आहे. या अन्यायाचा प्रतिकार म्हणून, जरी काम केले तरी पगार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.
अशा प्रकारे, अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवणे हा सत्याग्रहाचाच एक प्रकार होता. त्यांच्या या सत्याग्रहाचा परिणाम होऊन शासनाने शेवटी त्यांची मागणी पूर्ण केली. त्यांना थकबाकीसह पूर्ण पगार देण्यात आला. महात्मा गांधींनी भारतात येऊन सत्याग्रहाच्या माध्यमातून अन्यायाचा प्रतिकार करता येतो याची जाणीव करून दिली होती. परंतु बोस यांनी त्यांच्याही अगोदर शांततापूर्ण मार्गाने अन्यायाच्या विरोधाचा हा प्रयोग यशस्वी केला होता.
प्रकाशाचा किरण स्फटिकातून जाताना मार्ग बदलतो, म्हणजेच त्याचे अपवर्तन (Refraction) होते. काही स्फटिकांतून दोन अपवर्तित किरणे आढळतात. या चमत्कृतीस 'दुहेरी अपवर्तन' म्हणतात. कोलकाता येथे परत आल्यानंतर बोस यांनी या दुहेरी अपवर्तनावर संशोधन सुरू केले. जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संशोधन नियतकालिकात या संदर्भातील त्यांचा पहिला शोधनिबंध प्रकाशित झाला. यानंतर त्यांनी 'विद्युत-चुंबकीय तरंग' या विषयावरील संशोधनाला सुरुवार केली. १ मिमी ते १ सेमी तरंगलांबी (Wavelength) असलेल्या विद्युत-चुंबकीय तरंगाची निर्मिती, संप्रेषण व ग्रहणक्षमता हे त्यांचे संशोधन क्षेत्र होते. त्या काळात अशा प्रकारच्या तरंगलांबीच्या क्षेत्राचे संशोधन कार्य हे अतिशय जटिल व गुंतागुंतीचे मानले जाई.
या कामासाठी त्यांना महाविद्यालयाकडून कोणतेही साधन, साहाय्य वा अन्य मदत मिळाली नाही. असे असूनही, स्थानिक मनुष्यबळाची मदत घेऊन, त्यांना मार्गदर्शन करून तीन महिन्यांत आवश्यक ती उपकरणे त्यांनी बनवून घेतली, त्यासाठी लागणारा खर्च त्यांनी स्वतः सोसला व ते संशोधनात गढून गेले. पदार्थांची अंतर्गत संरचना समजावी यासाठी प्रथमच त्यांनी सूक्ष्म तरंगांचा (Micro Waves) वापर केला व यात त्यांना यशही आले. त्यांनी बनवलेले हे उपकरण आज 'तरंग मार्गदर्शक' (wave Guide) या नावाने ओळखले जाते. लघुतरंगांच्या अर्धप्रकाशीय गुणधर्मासंबंधात. अनेक प्रयोग त्यांनी केले व इ.स. १८९५ साली या प्रयोगांच्या आधारे रेडिओ संसूचकांच्या प्रारंभिक रूप असलेल्या सुसंगतीत सुधारणा घडवून आणली. त्यामुळे स्थायू अवस्था पदार्थविज्ञानाच्या (Solid-state Physics) विकासाला चालना मिळाली.
बिनतारी संदेशवहनाच्या (Wireless Telegraphy) संशोधनाशी नाव निगडित असलेले इटलीतील प्रसिद्ध संशोधक व विद्युत अभियंते मार्कोनी यांनी या क्षेत्रात काम करण्यापूर्वीच बोस यांनी काम केले होते आणि यशही प्राप्त केले होते. इ.स. १८९५ मध्येच प्रा. बोस यांनी रेडिओ तरंग पक्क्या भिंतीतून परावर्तित करता येऊ शकतात हे जाहीरपणे प्रयोग करून दाखवून दिले. त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. लंडन येथील रॉयल इन्स्टिट्युटमध्ये लॉर्ड केल्विन व अन्य वैज्ञानिक यांच्या उपस्थितीत त्यांनी या प्रयोगाचे प्रात्यक्षिक पुन्हा दाखवले. नंतर या क्षेत्रातील प्रयोग थांबवून आपले खूप वर्षांनी मार्कोनी यांनी बिनतारी संदेशासंबंधित एकस्व अधिकार (पेटण्ट - Patent) प्राप्त केले. अनेक विदेशी ग्रंथांतून आज बिनतारी संदेश यंत्रणेचा संशोधक म्हणून मार्कोनीची प्रशंसा केली जाते; पण खरे श्रेय मात्र बोस यांनाच आहे.
इंग्रजांच्या काळात संशोधन हे भारतीय वैज्ञानिकांसाठी फारसे उमेदीचे काम नव्हते. उपकरणांची कमतरता होती, सोयी-सुविधा असलेल्या प्रयोगशाळांचा देखील अभाव होता. संदर्भसाहित्य व ग्रंथालायेही उपलब्ध नव्हती. शासनही प्रोत्साहन देत नसे. मान्यतेसाठी लंडनकडे डोळे लावून बसावे लागे. बोस यांच्या बौद्धिक क्षमतांमुळे अनेक इंग्रजी शास्त्रज्ञ प्रभावित झाले होते. लॉर्ड केल्विन व सर ऑलिव्हर लॉज यांना तर बोस यांच्याबद्दल विलक्षण आदर होता. त्यांनी असेही सुचवले होते की, बोस यांनी लंडन येथेच स्थायिक व्हावे व संशोधन करावे. परंतु स्वतःच्या देशावर प्रेम असणाऱ्या बोस यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही.
शतकाच्या अखेरच्या सुमारास बोस यांनी वनस्पती शारीरक्रियाशास्त्र (Plant Physiology) या विषयाच्या संशोधनावर आपले लक्ष केंद्रित केले. वनस्पती उत्तेजित झाल्यास त्यांच्यात सूक्ष्म हालचाली होतात, या बाबीचा अभ्यास करण्यासाठी बोस यांनी कल्पक पद्धत शोधून काढली. त्यांनी हे सिद्ध केले. वनस्पती उत्तेजित झाल्यास त्यांच्यात सूक्ष्म हालचाली होतात, या बाबीचा अभ्यास करण्यासाठी बोस यांनी कल्पक पद्धत शोधून काढली. त्यांनी हे सिध्द केले की, वनस्पतींना संवेदना असतात. माणसाप्रमाणेच सुख-दु:खाच्या प्रतिक्रिया त्या व्यक्त करू शकतात. मात्र माणून किंवा पशू यांच्याप्रमाणे आवाजाच्या माध्यमातून वनस्पती वेदना व आनंद व्यक्त करू शकत नाहीत; पण फुलून येऊन, कोमेजून वा वाळून त्या आपल्या भावना व्यक्त करतात. तसेच, अन्य सजीवांप्रमाणेच वनस्पतीही श्वासोच्छवास करतात.
१० मे, १९०१ रोजी लंडन येथील रॉयल सोसायटीचे सभागृह वैज्ञानिकांच्या उपस्थितीने गच्च भरले होते. जगदीशचंद्र बोस तेथे आपल्या एका महत्त्वपूर्ण प्रयोगाचे प्रात्यक्षिक सादर करणार होते. त्यांनी वनस्पतींची संवेदनशीलता तपासणारे 'क्रेस्कोग्राफ' या नावाचे अतिशय नाजूक उपकरण बनवले होते. ते उपकरण म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असा शोध होता. एका रोपट्याला ते उपकरण जोडले होते. नंतर ते रोपटे ब्रोमाइड या विषारी द्रव्याच्या पसरट भांड्यात बुडवण्यात आले. त्यामुळे वनस्पतीच्या सूक्ष्म स्पंदनांचे प्रक्षेपण वर्धित स्वरूपात पडद्यावर दिसत होते. थोड्या वेळाने त्या रोपट्याचे स्पंदन अनियमित होत होत अचानक थांबले. रोपटे जणू काही विषाला बळी पडले होते. वातावरण आश्चर्याने स्तब्ध झाले होते.
क्रेस्कोग्राफ : वनस्पतींची वाढ नोंदवणारे व सूक्ष्मातीसूक्ष्म हालचाल कोट्यांशपटींनी वर्धित करून दाखवणारे नाजूक उपकरण. या प्रयोगामुळे वनस्पती शरीरक्रिया जाणणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांना मुळीच आनंद झाला नाही. बोस हे पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ असून, विज्ञानाच्या अन्य क्षेत्रांवर त्यांनी अतिक्रमण करण्याचे धाडस केले, हे त्या शास्त्रज्ञांच्या रागामागील व आनंदित न होण्यामागील कारण होते. वनस्पती शरीरक्रिया शास्त्रातील वैज्ञानिकांनी प्रतिपादित केलेल्या गोष्टी चूक असल्याचे बोस यांनी सिद्ध केले होते. सभागृहातील वैज्ञानिक यामुळे इतके विचलित व प्रक्षुब्ध झाले की, रॉयल सोसायटीतर्फे बोस यांचे भाषण प्रकाशित करण्यास त्यांनी विरोध केला. परंतु खोटा पडेल इतका आपला प्रयोग तकलादू नाही, याबद्दल बोस यांना आत्मविश्वास होता. दोन वर्षे अथक परिश्रम करून त्यांनी एक प्रबंध (मॉनोग्राफ - Monograph) प्रकाशित केला. प्रबंधाचे शीर्षक होते 'सजीव व निर्जीव यांच्यातील प्रतिसाद प्रक्रिया' (Response in the Living and Non-living). आपला प्रयोग अचूक असून प्रयोगाचे फलित योग्यच आहे, हे सत्य स्वीकारण्यास पर्याय नाही; हे रॉयल सोसायटीला त्यांनी पटवून दिले. जे भाषण सुरुवातीस प्रकाशित झाले नाही, ते आता प्रकाशित देले गेले व जगभर वितरित करण्यात आले. बोस यांची शास्त्रज्ञ म्हणून जगभर ख्याती पसरली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. इ.स. १९२० साली रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. या पदासाठी निवड झालेले ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे मोल लक्षात घेऊन ब्रिटिश शासनाने इ.स. १९१७ मध्ये त्यांना 'सर' या किताबाने सन्मानित केले. तेव्हापासून ते 'सर जगदीशचंद्र बोस' या नावाने ओळखले जाऊ लागले.
बोस यांना जीवशास्त्रज्ञ म्हणून आता ओळखले जाऊ लागले. त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल प्रत्येक भारतीय सदैव ऋणी राहील. पाश्चिमात्यांनी मान्यता दिल्यानंतरच त्यांच्या देशातील लोकांनी बोस यांच्या संशोधनास मान्यता दिली व त्यांचे श्रेष्ठत्व ताणले. ३० नोव्हेंबर, १९१७ रोजी बोस यांनी 'बोस संशोधन संस्था' देशाला समर्पित केली.
कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर हे बोस यांचे मित्र होते. त्या काळात पाश्चिमात्यांना टागोरांविषयी माहिती नव्हती. बोस यांनी टागोरांच्या साहित्याचे भाषांतर करून ते प्रसिध्द केले. त्यामुळे टागोरांची प्रतिभा ज्ञात झाली. त्यांचे समकालीन भारतीय वैज्ञानिक सी.व्ही. रामन यांच्यापेक्षा बोस ३० वर्षांनी मोठे होते. योगायोग असा की, रामन ज्या वित्तीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेस बसले होते, त्या परीक्षेतील पदार्थविज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका बोस यांनी तयार केली होती. आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी बोस यांनी तयार केली होती. आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी बोस यांनी बोस संशोधन संस्थेच्या निदेशकास सांगितले होते की, मृत्यूनंतर माझी उरलीसुरली संपत्ती विकावी व त्यातून मिळणारे धन संशोधन व सामाजिक कार्यासाठी वापरले जावे. जगदीशचंद्र बोस यांचे २३ नोव्हेंबर १९३७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
प्रवीण कुमार सोबती हे ६० आणि ७० च्या दशकातील भारतातील प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक होते. हॅमर आणि डिसक्स थ्रोमध्ये त्यांनी दीर्घकाळ भारताचे प्रतिनिधित्व केले.
Copyright © 2025 | Marathisrushti