(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • किराणा घराण्याचे गायक सुरेशबाबू माने

    पंडित सुरेशबाबू माने ऊर्फ अब्दुल रहमान यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी रोजी झाला. ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व ताराबाईंना गाणे शिकवत होते. दोघांचे प्रेम जुळले व त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. परंतु ताराबाईंच्या मातापित्यांचा ह्या विवाहास विरोध असल्यामुळे अब्दुल करीम खाँ व ताराबाईंना संस्थान सोडावे लागले. त्यांनी मुंबईत संसार थाटला व यथावकाश पाच अपत्यांना जन्म दिला. त्यांच्या दोन पुत्रांची नावे सुरेश उर्फ अब्दुल रहमान व कृष्ण ही होती; तर मुलींची नावे चंपाकली, गुलाब आणि सकीना उर्फ छोटूताई अशी होती. पुढे ही भावंडे अनुक्रमे सुरेशबाबू माने, कृष्णराव माने, हिराबाई बडोदेकर, कमलाबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाई राणे या नावांनी प्रसिद्धीस पावली. सुरेशबाबूंना संगीताचे प्रारंभिक शिक्षण आपल्या वडिलांकडून मिळाले आणि नंतरचे शिक्षण त्यांनी वडिलांचे मेव्हणे व किराणा घराण्याचे ज्येष्ठ संगीतकर्मी उस्ताद अब्दुल वाहिद खान यांच्याकडून व सवाई गंधर्वांकडून प्राप्त केले. सुरेशबाबूंच्या गाण्यात उत्स्फूर्तता, माधुर्य व सौंदर्य होते. त्यांची लय व तालावरची पकडही उत्तम होती. ख्याल, ठुमरी, दादरा, मराठी नाट्य संगीत आणि भजन या गायन प्रकारांवर सुरेशबाबूंचे प्रभुत्व होते. त्यांनी अनेक मराठी नाटकांत व चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. अमृतमंथन, रजपूत रमणी आणि चित्रसेना हे त्यांचे चित्रपट. त्यांनी संन्यास-कल्लोळ नाटकात अश्विनशेठची आणि सुभद्रा नाटकात अर्जुनाची भूमिका केली होती. सावित्री, सच है आणि देवयानी या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन सुरेशबाबूंचे होते. मूक चित्रपटांच्या कारकिर्दीत सुरेशबाबू पडद्यामागे बसून हार्मोनियम किंवा तबला वाजवीत. त्यांच्या शिष्य परिवारात प्रमुखतः हिराबाई बडोदेकर व प्रभा अत्रे ह्या प्रख्यात गायिकांचा समावेश होतो. तसेच वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी, माणिक वर्मा यांनाही सुरेशबाबूंचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या शिष्या डॉ. प्रभा अत्रे यांनी मुंबईत, सुरेशबाबूंच्या नावाने 'सुरेशबाबू -हिराबाई स्मृति समारोह' या वार्षिक संगीत महोत्सवाच्या आयोजनाला १९९२ साली प्रारंभ केला. आता हा संगीत महोत्सव भारतातील नावाजल्या जाणाऱ्या प्रमुख संगीत महोत्सवांपैकी एक गणला जातो. याला मुंबईचा सवाई गंधर्व असे समजले जाते. “जोशेर का बच्चा है, वो शेर जैसाही बहादूर होगा,” असे उदगार उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब यांनी आपले चिरंजीव सुरेशबाबू माने यांच्या बद्दल काढले होते. सुरेश बाबू माने यांचे निधन १५ फेब्रुवारी १९५३ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा वाढदिवस.

    ‘एक डाव भुताचा’ या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली, आणि शेवटी ते अभिनयक्षेत्रात स्थिरावले. ’कुर्यात्‌ सदा टिंगलम्‌’ हे मोहन जोशी यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक. मोहन जोशी यांनी मराठी, हिंदीसह भोजपुरी आणि कन्नड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी आजपर्यंत २५० चित्रपटात काम केले आहे. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.

  • ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर

    शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. नाटकाप्रमाणे चित्रपटातदेखील शरद तळवलकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री अशा अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई आणि एकटी अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या.

  • कवी सौमित्र उर्फ किशोर कदम

    प्रेम आणि पाऊस या कवी सौमित्र यांच्या कवितेतील खास बाबी आहेत. त्याने गुलजार यांच्या अनेक कविता हिंदीतून मराठीत आणल्या. गुलजार यांनीदेखील त्याच्या कविता हिंदीत नेल्या.

  • गोव्यातील ओल्डचर्चमधील सेंट फ्रान्सिस झेविअर

    गोव्यात आल्यानंतर त्यांनी ख्रिस्ती धर्माच्या विस्ताराचं ‘न भुतो..’ असं कार्य करून धर्मविस्तार केला. त्यामुळेच त्यांना पुढे संतपद (सेंट) हे पद बहाल करण्यात आलं व त्यांना ‘गोंयचो सायब’ हे बिरूदही लागू झालं.

  • प्रदीप वसंत नाईक

    प्रदीप वसंत नाईक हे भारताचे एकोणीसावे वायुदल प्रमुख होते. अनेक सैनिकी कारवायांमध्ये व अतिरेक्यांच्या शोध मोहिमांमध्ये असाधारण अस शौर्य गाजवून आपल्या तिरंग्याची किर्ती अबाधीत राखल्यानंतर ते या सर्वोच्च पदावर आरूढ झाले. ही सर्व मराठी माणसांसाठी निश्चितच गौरवाची बाब आहे.

  • हिंदी व तमिळ अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री

    मीनाक्षी शेषाद्रीने हिंदी व तमिळ चित्रपटांमधून अभिनय केला आहे. मीनाक्षीने वयाच्या १७ व्या वर्षी १९८१ सालचा मिस इंडिया किताब जिंकला होता. मिस इंडिया किताब जिंकणारी ही सर्वांत तरूण होती.

  • भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगली वेंकय्या

    पिंगाली वेंकय्या.. हे नाव फारसे कुणाला माहीत नाही. भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना मांडली ती याच पिंगाली वेंकय्या यांनी. त्यांचा जन्म २ ऑगस्ट, १८७६ रोजी झाला. ध्वज कोणत्या रंगाचा असावा, त्यात किती आणि कोणते रंग असावेत, त्याचा आकार कसा असावा याचा सखोल अभ्यास करून त्यांनी तिरंगा साकारला. ते केवळ तिरंग्याचे निर्माते नव्हते तर जपानी भाषेचे शिक्षक, सिद्धहस्त लेखक आणि जिओफिजिसिस्टही होते.चिल्लापल्ली येथे प्राथमिक, तर मासुलीपटनम येथील हिंदू हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ते कोलंबोला रवाना झाले.

    देशभक्तीने भारावलेल्या पिंगाली यांनी वयाच्या १९ व्या वर्षी बोअर युद्धासाठी आपले नाव नोंदवले आणि ते सैन्यात भरती झाले. त्यानंतर आफ्रिकेत असताना त्यांची महात्मा गांधीजींशी भेट झाली आणि त्यांचे ऋणानुबंध जुळले. ते पुढे ५० वर्षे टिकून होते. भारतात परतल्यावर बंगलोर आणि मद्रास येथे त्यांनी रेल्वे गार्ड म्हणून काम केले आणि मग बेल्लारी येथील शासकीय सेवेत प्लेग अधिकारी म्हणून ते रुजू झाले. पण त्यांची देशभक्तीची आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षणाच्या ओढीने त्यांनी थेट लोहरमधील अँग्लोवेदिक महाविद्यालय गाठले आणि प्राध्यापक गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जपानी भाषा आणि इतिहासाचे शिक्षण घेतले.

    उत्तर भारतातील पाच वर्षांच्या वास्तव्यात ते राजकारणात सक्रिय झाले. ब्रिटिशांना देशातून हद्दपार करण्यासाठी क्रांतिकारकांच्या मदतीने ते योजना आखू लागले. १९०६ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत पिंगालींमध्ये दडलेला क्रांतिकारक दादाभाई नौरोजी यांनी हेरला. या ठिकाणीच पिंगाली यांची मुनगलाच्या राजाशी भेट झाली. त्यानंतर १९०६ ते १९११ ही पाच वर्षे मुनगला या ठिकाणी त्यांनी शेतीविषयक संशोधन केले. त्यांच्या या संशोधनामुळे आणि कंबोडिया कॉटनच्या शोधामुळे ते पट्टी वेंकय्या म्हणून ओळखले जाऊ लागले. ब्रिटिशांनाही त्यांच्या या संशोधनाचे कौतुक वाटले आणि त्यामुळेच पिंगाली यांना रॉयल अॅग्रिकल्चरल सोसायटी ऑफ ब्रिटनचे सन्माननीय सदस्यत्व देऊ केले.

    सरतेशेवटी पिंगाली मासुलीपट्टममध्ये परतले आणि त्यांनी स्वत:ला नॅशनल स्कूलच्या विकासासाठी वाहून घेतले. या ठिकाणी प्राथमिक सैन्यप्रशिक्षण, घोडेस्वारी, इतिहास आणि शेतीविषयी प्रशिक्षण देण्यात येत असे. ते केवळ पुस्तकी ज्ञानाने समाधानी होणारे नव्हते. त्यांच्या दैनंदिन आचरणातून त्यांचा उदारमतवादीपणा दिसत असे. १९१४ मध्ये आपल्या शेतावर ‘स्वेच्छापुरम’ ही संस्था स्थापन केली.
    १९१६-१९२१ या कालावधीत पिंगाली यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक आगळा पैलू सर्वाच्या दृष्टीस पडला. सुमारे ३० ध्वजांचा अभ्यास करून पिंगाली यांनी भारतीय ध्वजाची कल्पना मांडली. आपल्या तिरंग्याच्या सध्याच्या रूपाचे डिझाईन तयार करण्याचे श्रेय पिंगाली यांना दिले जात असले तरी भारतीय ध्वजाची पाळेपुळे ‘वंदे मातरम्’ चळवळीपर्यंत जातात. १ ऑगस्ट १९०६ रोजी कलकत्त्यातील पारसी बगान स्क्वेअर (ग्रीन पार्क) येथे पहिले ध्वजारोहण झाले. हा ध्वजही तीन रंगांत होता. वरील भागात लाल, मध्ये पिवळा आणि खालच्या बाजूला हिरवा, अशी या झेंडय़ाची रंगसंगती होती. लाल भागात पांढऱ्या रंगाची आठ कमळाची फुले कोरलेली होती. पिवळ्या भागात निळ्या रंगाने देवनागरी लिपीत ‘बंदे मातरम्’ असे लिहिले होते. मदाम कामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९०७ मध्ये पॅरिसमध्ये ध्वजारोहण केले होते. या झेंडय़ाची रंगसंगतीही पहिल्या ध्वजाप्रमाणेच होती. फरक एवढाच की, पहिल्या पट्टीमध्ये केवळ एकच कमळ होते आणि सप्तर्षी दर्शविणारे सात तारे होते.

    बर्लिनच्या समाजवादी बैठकीत हा ध्वज फडकविण्यात आला. १९१७ मध्ये जेव्हा राजकीय चळवळीने वेग घेतला, त्यावेळी अॅनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ध्वजारोहण केले होते. या ध्वजाच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात युनियन जॅकचा शिक्का होता. त्याचप्रमाणे पांढऱ्या आकाराचे अर्धवर्तुळ आणि ताऱ्याचे चिन्ह होते. त्यावेळच्या जनतेचे उद्दिष्ट दाखविणे हा त्यामागचा संकेत होता आणि सत्ता मिळविण्याची इच्छा प्रदर्शित करण्यासाठी युनियन जॅकचा शिक्का होता. पण त्या ध्वजावरील युनियन जॅकचे अस्तित्त्व ही राजकीय तडजोड असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे या ध्वजाचा स्वीकार करण्यात आला नाही. १९२१ मध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींकडे आले आणि त्याचवेळी तिरंग्याचे पहिले रूप जनतेसमोर आले.

    १९२१ ते १९३१ ही दहा वर्षे पिंगाली यांच्यादृष्टीनेच नव्हे तर आंध्र प्रदेशमधील स्वातंत्र्य चळवळीचा महत्त्वाचा कालावधी ठरला. ३१ मार्च आणि १ एप्रिल १९२१ या दोन दिवशी बेझवाडा येथे एआयसीसीच्या (ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने) ऐतिहासिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी पिंगाली वेंकय्या ध्वज घेऊन गांधीजींकडे गेले. भारतातील दोन प्रमुख धर्म दर्शविणारे लाल आणि हिरवा असे दोन रंग यात होते. अशाप्रकारे राष्ट्रध्वज अस्तित्वात आला, पण ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने तो अधिकृतपणे स्वीकारला नव्हता.

    गांधीजींनी तो स्वीकारल्यानंतर पुढील प्रत्येक कॉँग्रेस बैठकीमध्ये हा ध्वज फडकविण्यात येत असे. सामान्य माणसाच्या प्रगतीचे प्रतीक असलेल्या चरख्याचा या ध्वजामध्ये अंतर्भाव करण्यात यावा, अशी सूचना जालंधरचे हंसराज यांनी केली. त्यानंतर गांधीजींनी इतर अल्पसंख्यांकांचे अस्तित्व दर्शविणारी पांढरी पट्टी या ध्वजात समाविष्ट केली. १९३१ पर्यंत त्याला लोकमान्यता मिळाली नव्हती. ध्वजामधील रंगांचा अर्थ समजण्यावरूनही त्यावेळी जातीय तणाव निर्माण झाला होता. १९३१ मध्ये कराची येथे भरलेल्या कॉँग्रेसमध्ये यावरील अंतिम तोडगा काढण्यात आला. शौर्य दर्शविणारा भगवा, सत्य आणि शांती दर्शविणारा पांढरा आणि समृद्धी व विश्वास दर्शविणारा हिरवा असा या तीन रंगी ध्वजाचा अर्थ लावण्यात आला. चरखा आणि सूत यांच्याऐवजी ध्वजाच्या मध्यभागी अशोकचक्राचा समावेश करण्यात आला.

    राष्ट्रध्वजातील तीन रंगांचा अर्थ समजावताना सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितले की, राजकीय नेत्यांनी व्यावहारीक सुखांचा त्याग करणे हे भगवा रंग दर्शवतो, सत्याची वाट दाखवणे हे पांढरा रंग सांगतो तर हिरवा रंग आपले जमिनीशी असलेले नाते दर्शवितो आणि अशोकचक्र हे धर्माचे प्रतीक आहे.
    पिंगाली वेंकय्या यांचे ४ जुलै, १९६३ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / संजय पेठे

  • दिवाळी अंकांचे जनक काशिनाथ रघुनाथ आजगावकर

    रघुनाथ आजगावकर यांना बंगाली भाषा उत्तम येत होती आणि बंगाली संस्कृतीची चांगली माहिती होती. ते बंगाली साहित्याचे अनुवादक होते. त्यांनी १८९५ साली ‘मासिक मनोरंजन’ सुरू केलं आणि पुढे १९०९ साली ‘मासिक मनोरंजन’चा पहिला मराठी दिवाळी अंक काढला होता.

  • हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक मन्ना डे

    प्रबोधचंद्र डे असे मूळ नाव असलेल्या मन्ना डे यांचे काका के.सी.डे हे संगीतातील तज्ञ. त्यांचा जन्म १ मे १९१९ रोजी झाला. त्यांनी एस.डी. बर्मन यांना संगीताचे धडे दिले होते व अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले होते. मन्ना डे यांनी त्यांच्याकडून संगीताचे धडे ही त्यांना मिळाले.त्यामुळे लहानपणीही त्यांनी बालकलाकार म्हणून लौकीक प्राप्त केला होता. शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद अमान अली खान व उस्ताद अबदुल रहमान खान यांच्याकडून त्यांनी घेतले.

    पार्श्वगायनाची सुरवात त्यानी १९४२ मधील ’तमन्ना’या चित्रपटापासून केला.’तमन्ना’चे संगीत दिग्दर्शक के.सी.डे हेच होते मन्ना डे यांनी सुरैय्याबरोबर "जागो आयी उषा "हे युगलगीत गायिले होते. मन्ना डे ची खरी ओळख त्यांच्या "बसंत बहार " मधील "सुर ना सजे" मुळे तसेच "श्री चारसौबीस"मधील "प्यार हुआ "सीमा मधील"तू प्यारका सागर है""दो आंखे बारह हाथ"मधील "ऐ मालिक तेरे बंदे हम" किंवा "लागा चुनरीमे दाग" अश्या निवडक गीतातूनच झाली.राजकपूरसाठी त्यांचा आवाज काही चित्रपटातून वापरला गेला व तो योग्यही वाटला.

    शास्त्रीय संगीतावर आधारित गीते म्हणण्याविषयी कुशल अशी प्रसिद्धी असूनही मन्ना डे यांची अवखळ गीतेही तितकीच प्रसिद्ध झाली.विशेषत: रफी यांच्याबरोबर गायलेले परवरिश चित्रपटातील "मामा ओ मामा"किंवा चलतीका नाम गाडी"मधील "बाबू समझो इशारे" किंवा "पडोसन" मधील किशोरकुमारबरोबर गायलेले "एक चतुर नार" ही गीते त्याची साक्ष देतात. मन्ना डे यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली भाषेत गाणी गायली आहेत.

    मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्य गीतांची संख्या इतर कोणाही मराठी गायकाच्या (एक बाबूजी सोडले तर) तोडीस तोड आहे. त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत " अ आ आई म म मका, धुंद आज डोळे". त्याचबरोबर "घन घन माला नभी " ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते."घरकुल" चित्रपटातील "हाउस ऑफ बांबू"हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते. सर्व संगीत दिग्दर्शकांबरोबर गीते गायलेल्या मन्ना डे यांनी नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मात्र गायलेले दिसत नाही कदाचित मोहंमद रफी हे नौशाद यांचे आवडते गायक असण्याचा परिणाम असावा व त्यांच्यानंतर महेंद्र कपूर यांच्यावर नौशाद यांची भिस्त होती असे दिसते.

    मन्ना डे यांच्या गायनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा शास्त्रीय पाया. शास्त्रीय ढंगाची गाणी ते अशी काही खुलवत की काही विचारू नका. याबाबतीत ते एकमेवाद्वितीयच म्हणावे लागतील. लोकसंगीताचा बाज असणारी गाणीही ते तितक्याेच सहजतेनं, लीलया गात असत. फुलवत असत. मन्ना डे यांच्या आपल्या "ट्रेडमार्क‘ टोपी बद्दल मन्ना डे नी लिहिले आहे. एकदा ऐन डिसेंबर महिन्यात गाण्यांच्या कार्यक्रमासाठी काश्मीहरला गेलो होते. त्या वेळी केवळ थंडीच नव्हती, तर बर्फ देखील पडत होता.

    व्यासपीठावर आल्यानंतर कडाक्या च्या थंडीत गाणी म्हणायची कशी, असा प्रश्नल माझ्यापुढे उपस्थित राहिला. माझ्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहून चाहत्याने तत्काळ व्यासपीठावर येत त्याने मला आपली टोपी भेट दिली. चाहत्याच्या प्रेमाने मी भारावून गेलो. थंडी पळून गेली आणि कार्यक्रम सुरळीत पार पडला. मा.मन्ना डे यांचे २४ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मन्ना डे यांची गाजलेली काही गाणी
    प्यार हुआ..., दिल का हाल सुने... (श्री ४२०)
    तू प्यार का सागर है (सीमा)
    ना तो कारवॉं की तलाश है (बरसात की रात)
    लागा चुनरी में दाग (दिल ही तो है)
    ऐ मेरे प्यारे वतन (काबुलीवाला)
    जिंदगी कैसी है पहेली (आनंद)
    घन घन माला नभी दाटल्या (वरदक्षिणा, मराठी)
    अ आ आई (एक धागा सुखाचा, मराठी)
    यारी है ईमान मेरा (जंजीर)
    ए मेरी जोहराजबी (वक्त)
    यशोमती मैया से (सत्यम शिवम्‌ सुंदरम्‌)
    पुछो ना कैसे मैंने रैन बिताई (मेरी सूरत तेरी आँखे)
    ए भाय जरा देख के चलो (मेरा नाम जोकर)
    कसमे वादें प्यार वफा सब (उपकार)
    ये दोस्ती (शोले)
    चलत मुसाफिर मोह लियो रे (तिसरी कसम)
    चुनरी संभाल गोरी (बहारों के सपने)