जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
“शास्त्रीय मराठी व्याकरण‘ हा सुमारे एक हजार पृष्ठांचा ग्रंथ मोरो केशव दामले यांनी लिहिला. त्यांचे व्याकरण पुढील मराठी व्याकरणकारांस आधारभूत ठरले. त्यांच्या ग्रंथात असंख्य उदाहरणे, असंख्य शब्द गटवारीने उपलब्ध करून दिले आहेत. हे व्याकरणाच्या क्षेत्रातील मोठे काम म्हटले गेले.
तुमच्या दैनंदिन आयुष्यात अढळ स्थान पटकावलेले पण तुमच्या भावी पिढ्या संपवून टाकण्याची दाहकता जोपासणारे प्लॅस्टीक तुम्ही तुमच्या आयुष्यातून हद्दपार करू शकता?
‘प्लॅस्टीक’चे दुष्परिणाम आणि त्याला पर्याय' या विषयावर शेकडो व्याख्याने घेऊन अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या एका अवलियाला, ५८ वर्षाच्या तरुणाला, आज भेटूया, हे आहेत श्री. मिलिंद पगारे.
#Bharatiyans
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक गोष्ट आपल्या बरोबर नी:शब्दपणे वावरत असते. सणासुदीचे दिवस असो वा मुलांच्या शाळेची गडबड, भाजीला जायचे असो वा हॉटेलमधून पार्सल आणायचे असो, फ्रीजमध्ये भाज्या ठेवायच्या असो वा पिकनिक ला जायचे असो, प्रसंग काहीही असो, वाढदिवस, समारंभ, गणपती, दिवाळी एक वस्तू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे.
‘प्लॅस्टीक’
प्लॅस्टीकचा शोध १९ व्या शतकाच्या सुरुवातीला न्यूयॉर्क मध्ये लागला आणि काही दशकांमध्येच प्लॅस्टीकचा वापर आपल्या दैनंदिन व्यवहारात होऊ लागला. होऊ लागला आणि आता तर प्लॅस्टीक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालंय.
पण ह्या प्लॅस्टिकचे जसे उपयोग आहेत त्यापेक्षा शतपटीने त्याचे अनेक गंभीर दुष्परिणाम आज सायन्सच्या आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या लक्षात आले आहेत.
आजघडीस प्लॅस्टीकचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात आणि वारंवार होतो आहे की त्यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. आणि याचे अतोनात गंभीर परिणाम प्राणी आणि मनुष्याच्या आऱोग्यावर दिसून आले आहेत.
शासनाने प्लॉस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले असले तरी या आदेशाची सर्वत्र सर्रास पायमल्ली सुरू असून प्लास्टिकच्या अतिरेकी वापराने प्रदूषणात दिवसेंदिवस भयंकर वाढ होत आहे. अनेक नाल्या-गटारांमध्ये प्लॅस्टीक अडकून पडल्याने पावसाळ्यात सांडपाणी तुंबते आणि साचते. तसंच अनेकदा प्लॅस्टीकमधून शिळे खाद्य पदार्थ फेकण्यात येत असल्याने हे प्लॅस्टीक खाऊन गाय, म्हशीसारखी अनेक जनावरे सर्रास मृत्युमुखी पडत आहेत.
जितक्या सहजतेने प्लॅस्टिकने त्याचे जाळे पसरवले तितकेच कठीण होऊन बसले आहे त्याचे अस्तित्व मिटवणे आणि कमी करणे .
आज अनेक देशांनी प्लॅस्टिकवर काही अंशी बंदी आणली आहे. प्लॅस्टिकची गुणवत्ता ठरवून फक्त त्याच गुणवत्तेचे प्लॅस्टीक वापरण्याचे कायदेही निघालेत. प्लॅस्टीक अगदी माती, पाणी, हवा यांच्यातून थेट आपल्या रक्तात जाऊन मिसळले आहे.
मित्रानो, आज प्लॅस्टीकच्या या भस्मासुराने पृथ्वीला गिळायला सुरुवात केली आहे. अश्या प्लॅस्टीक विरोधी चळवळ उभारणारा, त्याचे दुष्परिणाम सांगून त्यावर पर्याय सांगणारा, जागृती करत फिरणारा ५८ वर्षाच्या मॅकेनिकल इंजिनिअर तरुण मिलिंद पांगारे.
“YES WE CAN” आपण करू शकतो, ह्या वाक्याने सुरुवात करत अफाट उत्साहाच्या जोरावर शेकडोहून अधिक व्याख्यान देत महाराष्ट्र पिंजून काढलाय यांनी आत्तापावेतो. गुजरात मधल्या जामनगर मध्ये मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून नोकरी करत असताना "प्लॅस्टीक हटाव, देश बचाव"चा नारा देत जनजागृती करता आहेत.
कॉलेज, कंपन्या, संस्थामार्फत आयोजित अनेक कार्यक्रमांत त्यांनी प्लॅस्टिकच्या दुष्परिणावर व्याख्याने केलीत ह्या व्याख्यानांसाठी ते पैसे घेत नाहीत. इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराथी ह्या भाषांमधून ते व्याखाने करतात.
ते म्हणतात, "माझ्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे एक माणूस जरी जागा झाला तरी माझ्या प्रयत्नांचे चीज झाले असे मी समजेन."
आपण टाकलेल्या किंवा केलेल्या कचऱ्याचे पुढे काय? हा सततचा भेडसावणारा प्रश्न घेऊन उत्तर शोधण्यासाठी त्यांनी काही गोष्टीवर अभ्यास केला. अशावेळी आश्चर्यकारक पण चिंता वाढवणारे आकडेवारी त्यांच्या हाती लागली .
प्लॅस्टिक खाऊन मुक्या प्राण्यांचे किती जीव जातात? गटारे तुंबतात, वाढत्या घाणींने आणि दुर्गंधीने किती लोकांचे आरोग्य धोक्यात येते? कोणतेही व्यसन नसलेल्या किती व्यक्तींना कॅन्सर झाला? त्याचे कारण काय? अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे शोधत असतांना धक्कादायक आकडेवारी पाहून मिलिंद पगारे विचलित झाले.
अशातच त्यांचा एक जवळचा निर्व्यसनी मित्र कॅन्सर मुळे हे जग सोडून गेला आणि सुरु झाले त्यांचे युद्ध प्लॅस्टीक विरोधी चळवळीचे.
मिलिंदजींनी सुरु केलेल्या ह्या चळवळीने अनेक कंपन्यांमध्ये प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला आहे. प्लॅस्टीकच्या बॉटल्स , चहाचे कप आणि प्लेट जाऊन त्या जागी स्टील किंवा काचेच्या चिनीमातीच्या कुठेकुठे अगदी मातीच्या वस्तूंचा पर्याय निवडला गेलाय. अनेक लोकांनी दैनंदिन वापरातील प्लॅस्टीकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून कापडाच्या पिशव्या, कागदाच्या पिशव्या वापरायला सुरुवात केलीय.
"भारतीयन्स"ने देखील जुन्या साड्यांपासून पिशव्या तयार करणाऱ्या महिलांची ओळख काही दिवसांपूर्वी एका लेखात करून दिली होती.
संशोधनाचा संग्रह, काही माहितपट, लॅपटॉप, प्रोजेक्टर असा लवाजमा घेऊन प्रवास करणारे किरकोळ शरीरयष्टीचे वार्धक्याकडे झुकलेले पण अंगी प्रचंड ऊर्जा असणारे मिलिंद पगारे.
मिलिंदजी म्हणतात, " एका माणसानं जरी स्वतःसाठी स्वतःपासून सुरुवात केली तर नजीकच्या काळात अनेक हात ह्या चळवळीत सहभागी होतील. चळवळ अखंडपणे टिकावी आणि निसर्गाला पर्यायाने स्वतःला वाचवायची वेळ आता आली आहे.
आपण सर्व ह्या चळवळीत सहभागी होऊ. दैनंदिन जीवनात किमान सहज टाळता येतील असे प्लॅस्टीक टाळू आणि त्याला सक्षम पर्याय शोधू.
मिलिंदजींच्या उत्साहाला आणि ह्या चळवळीला टीम भारतीयन्स’च्या शुभेच्छा.
आपण श्री. मिलिंद पगारे यांना व्याख्यानासाठी बोलावू इच्छित असाल तर संपर्क करा ७०१६२०४२७४ (7016204274)
वैशाली सागर- देवकर
टिम भारतीयन्स
यादो की बारात’ चित्रपटातून सगळयांच्या मनात घर करून बसणारी अभिनेत्री नीतू सिंह या एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जायच्या. हिंदी चित्रपटसृष्टीत नीतू सिंह यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
जन्म:१९३०
गीता बाली यांचे नाव हरकिर्तन कौर. गीता बाली यांनी वयाच्या १२ व्या वर्षीच फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. १९५० च्या दशकात त्या स्टारसुध्दा झाल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत मा. शम्मी कपूर यांचे सुध्दा नाव सामील आहे. १९५५ मध्ये शम्मी कपूर यांनी घरच्यांना न सांगता गीता बाली यांच्याशी लग्न केले होते. कारण आपले घरचे या लग्नाला परवानगी देणार नाही याची शम्मी कपूर यांना भिती होती. शम्मी कपूर गीता बाली यांना एका चाहत्याप्रमाणे पसंत करत होते, असे शम्मी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ते गीता यांच्यापेक्षा वयाने लहान होते, परंतु चार महिन्यांच्या भेटीने आणि बोलण्याने एकमेकांच्या प्रेमात पडले होते. शम्मीकपूर यांना भेटण्यापूर्वी गीता यांनी पृथ्वीराज कपूर आणि राजकपूर यांच्यासोबत काम केले होते. राजकपूर यांच्यासोबत त्यांनी 'बांवरे नैन' आणि पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत 'आनंदमठ' सिनेमात दिसल्या होत्या. मुलींनी किंवा सूनांनी सिनेमात काम करू नये असा कपूर कुटुंबातील नियम होता. परंतु गीता बाली यांनी शम्मीकपूर यांच्यासोबत लग्न केल्या नंतर सुध्दा सिनेमांत काम चालू ठेवले. गीता बाली यांचे मा. भगवान यांच्या सोबतचे खूप चित्रपट गाजले. त्यांचा शेवटचा सिनेमा १९६३ मध्ये आलेला 'जब से तुमको देखा है' होता. बोनी कपूर,अनिल कपूर व संजय कपूर यांचे वडील सुरेंद्र कपूर गीता बाली यांचे सेक्रेटरी होते. गीता बाली यांचे २१ जानेवारी १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपिडीया
‘मानवी संगणक’ असे नामाभिधान प्राप्त करणाऱ्या गणितज्ञ शकुंतलादेवी या अतिशय कठीण गणितीय आकडेमोडी क्षणार्धात करीत असत. ‘बालपणीच सर्वज्ञता वरी तयांते’ या वर्णनाची आठवण व्हावी अशी गणिती प्रतिभा आकडय़ांशी लीलया खेळणाऱ्या शकुंतलादेवींकडे होती. ‘मानवी संगणक’ असे त्यांना म्हटले जाई, एवढे त्यांचे आकडेमोडीवर प्रभुत्व होते. मोठमोठय़ा संख्यांचे गुणाकार, भागाकार आदी गणिती क्रिया त्या चटकन् करत. पण अचंबित करणारी गोष्ट म्हणजे त्यांचे शालेय शिक्षणही झालेले नव्हते.
“शास्त्रीय मराठी व्याकरण” हा सुमारे एक हजार पृष्ठांचा ग्रंथ मोरो केशव दामले यांनी लिहिला. त्यांचे व्याकरण पुढील मराठी व्याकरणकारांस आधारभूत ठरले. त्यांच्या ग्रंथात असंख्य उदाहरणे, असंख्य शब्द गटवारीने उपलब्ध करून दिले आहेत. हे व्याकरणाच्या क्षेत्रातील मोठे काम म्हटले गेले.
२७ जुलै १९७३ साली 'अभिमान' चित्रपट प्रदर्शीत झाला त्याला २७ जुलै २०१७ रोजी ४४ वर्षे झाली.
हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक उल्लेखनीय चित्रपटांपैकी एक मानल्या जाणाऱ्या काही चित्रपटांपैकी एक म्हणजे, १९७३ साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'अभिमान'. सांगितिक बहर असलेल्या या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी मूख्य भूमिका साकारल्या होत्या. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात बिंदू, असरानी यांसारख्या कलाकारांनीही उल्लेखनीय व्यक्तीरेखा साकारल्या होत्या.
दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्या कारकिर्दीतील लक्षणीय चित्रपटांमध्ये अनेक सिनेरसिकांनी 'अभिमान' या चित्रपटालाही पसंती दिली होती. 'अभिमान' चित्रपटाच्या लोकप्रियतेचे आणखी जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचे संगीत. एस. डी. बर्मन यांच्या संगीताने परिपूर्ण अशा या चित्रपटातील गाण्यांनाही सिने व संगीत रसिकांनी फार पसंत केले होते.
चित्रपटाचे कथानकच मुळात संगीतावर आधारलेले असल्यामुळे आजही 'अभिमान'ची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठीत गीतकार मजरुह सुलतानपुरी यांच्या लेखणीने शब्दबद्ध केलेली ही सुमधुर गीते लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार या नामवंत आणि पट्टीच्या गायकांनी गायली होती.
'तेरे मेरे मिलन की ये रैना', 'पिया बिना' या गाण्यांसह चित्रपटातील इतर सर्वच गीते आणि अमिताभ व जया यांच्या जोडीने साकारलेल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. 'अभिमान' मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी अभिनेत्री जया बच्चन यांना 'फिल्मफेअर'तर्फे 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अभिमान चित्रपटाची गाणी
https://www.dailymotion.com/video/x3gknt8
उत्कृष्ट वक्त्या व कथाकथनकार असणाऱ्या जोगळेकरांचा विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी रुची निर्माण करण्यात हातखंडा होता. संध्याकाळचा चेहरा व रंग अमेरिकेचे प्रवासिनी आदी त्यांची माहित्यकृती मराठी रसिकांच्या मनांत घर करून राहिली. ‘संध्याकाळचा चेहरा’ या कादंबरीला राज्य शासनाचे कथासंग्रहासाठीचे प्रथम पारितोषिक मिळाले. ‘लोकसत्ता’ मध्ये त्यांनी प्रवासवर्णनावर आधारीत ‘प्रवासिनी’ या लेखमालिकेचे लेखन केले होते. तुकारामांचे फ्रेंचमधील अभ्यासक फादर दलरी यांचे चरित्रही लिहीले.
माझे वडील पूज्य पंडित विष्णू चिंचोरे हे त्यांच्या काळातील नामवंत शिक्षक होते ! पुणे येथील डेक्कन जिमखान्यावरील भांडारकर रोडवर असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर शाळेचे, जून १९३६ ते ३१ मे १९६१ ह्या कालावधीमध्ये ते मुख्याध्यापक होते. पुढे १ जून १९६१ ते ३० सप्टेंबर १९७५ या कालावधीमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेचे ते मुख्याध्यापक होते !
"चिंचोरे गुरुजी" ह्याच नावाने ते ओळखले जायचे ! गोष्टीरूप इतिहास शिकवण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. गणित विषयाची भीती, मुलांच्या मनातून कायमची काढून टाकण्यात ते वाकबगार होते. भाषेचे धडे शिकविताना ते चित्ररूपी भाषेतील वर्णन करून सांगायचे तर प्रत्येक कविता ते चालीमध्ये म्हणून दाखवित असत, आपोआपच मुलांच्या कविता तोंडपाठ होत असायच्या. स्कॉलरशिपचे वर्ग ते वर्षानुवर्षे घेत होते !
चिंचोरे गुरुजींच्या शिकवण्याच्या हातोटीचे अनेक दाखले, त्यांचे विद्यार्थी ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे ह्यांनी त्यांच्या वपुर्झा, गुलमोहर, रंगपंचमी, ककचीक अश्या अनेक पुस्तकाद्वारे वाचकांसमोर दिले आहेत. तसेच १७ मार्च १९८२ रोजी मुंबई दूरदर्शन वरून सादर झालेल्या, "आमची पंचविशी" ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, व. पुंनी आपल्या लाडक्या चिंचोरे गुरुजींच्या अनेक हृद्य आठवणी साध्यंत कथन केल्या होत्या !
माझ्या वडिलांच्या काही विद्यार्थ्यांची नावेच पाहा ना, ज्यांनी आपल्या यशोगाथेचे सर्व श्रेय मुक्तकंठाने आपल्या चिंचोरे गुरुजींना आदरपूर्वक दिले आहे :
भारताचे एअर मार्शल भूषण गोखले, ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे, ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया, ब्रिगेडिअर विजय खांडेकर, ब्रिगेडियर सदाशिव जावडेकर, डायबेटीस स्पेशलिस्ट डॉ. सुभाष काळे, कँसरतज्ज्ञ डॉ. पुष्पाताई शिरोळे, विख्यात निर्माते व्ही.शांताराम ह्यांचा पुतण्या व्हणकुद्रे. रोहिणी भाटे, ज्योत्स्ना भोळे ह्यांचा मुलगा सुहास केशव भोळे, अभिनेते विक्रम गोखले, मनीषा साठे, डॉ ओतूरकर, विद्युत बापट, दिलीप जोशी, जयंत दामले (मॅनेजमेंट कन्सलटंट) डॉक्टर माधव कवडे, अल्हाद धर्माधिकारी, चारू रानडे, नीता, पुष्पा पुजारी भगिनी, मेधा पंडित, सुरेखा गायधनी-पेठे, दिलीप दाणी, जयंत मालशे, जयंत झेंडे, चंद्रशेखर म्हैसकर, ही यादी फार मोठी आहे ….
विशेष म्हणजे ह्या तमाम विद्यार्थीगणांनी आपल्या लाडक्या चिंचोरे गुरुजींना आजही लक्षात ठेवलेय, ते तसा आवर्जून उल्लेख करतात, ह्यामाध्येच चिंचोरे गुरुजींच्या पवित्र शिक्षकी पेशाचे चीज झाले, असे मी आदरपूर्वक म्हणतो, माझ्या सर्व ज्ञात-अज्ञात गुरु बंधू-भगिनींना माझा मनोभावे नमस्कार,
वरून कडक शिस्तीचे दिसणारे चिंचोरे गुरुजी आतून मात्र खूप हळवे होते. व. पु. काळे, उद्योगपती अरुण फिरोदिया, जेंव्हा माझ्या वडिलांच्या अखेरच्या आजारपणात भेटायला घरी आले, तेव्हां सर्वजण जुन्या आठवणीत रमले. त्यावेळी चिंचोरे गुरुजींनी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांच्या आठवणी नावासह सांगितल्या, संग्रहामधील जुने फोटो दाखविले, तेव्हां तर सर्वजण भावुक झाले होते. व पु काळे जेव्हां बोलत होते, तेव्हां मी म्हणालो, "बापू, "शिक्षक" शब्दाची व्याख्या अशी करता येईल कां ? शिकविण्याच्या क्षमतेचा कलावंत म्हणजे शिक्षक", माझे वाक्य पूर्ण होताच, व पुंनी मला टाळी दिली ! एअर मार्शल बी एन गोखले सर तर अभिमानाने सांगतात, "आम्हांला चिंचोरे गुरुजींनी घडवलं" डायबेटीस स्पेशलिस्ट डॉ. सुभाष काळे ह्या त्यांच्या विद्यार्थ्याने तर, चिंचोरे गुरुजींना एकवीस वर्षे विनामोबदला औषधोपचार केले, मी काही बोललो, कि ते म्हणायचे, "उपेंद्र, गुरुजींची सेवा, हीच माझी गुरुदक्षिणा आहे"! ज्येष्ठ उद्योगपती श्रीमान अरुण फिरोदिया ह्यांना पद्मश्री जाहीर होताच, त्यांनी मुलाखत कर्त्यांना आपल्या यशाचे श्रेय माझ्या आई वडिलांना आणि चिंचोरे गुरुजींना असल्याचे जाहीर केले. टीव्ही वर मी जेव्हां हे ऐकले, पाहिले तेव्हां माझे डोळे भरून आले. मी त्यांना लगेच फोन केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे घरी जाऊन नमस्कार केला, तेव्हां त्यांनी माझ्या वडिलांच्या अनेक आठवणी कथन केल्या होत्या. धन्य ते शिक्षक आणि धन्य ते कृतज्ञ विद्यार्थी !
मॅनेजमेंट कन्सलटंट जयंत दामले आणि मोहन कानडे, हे त्यांचे विद्यार्थी आजही साठ वर्षांपूर्वीच्या, चिंचोरे गुरुजींच्या शालेय सहल नियोजनाच्या आठवणी सांगतात ! डॉ उषा केळकर वय वर्षे फक्त सत्याऐंशी, चिंचोरे गुरुजींनी, गीतेचा पंधरावा अध्याय कसा पाठ करून घेतला, ह्याविषयी त्यांच्या लेखात सांगतात. डॉ सुमन करमरकर (सध्याचे वय ८७) ह्या चिंचोरे गुरुजींच्या शब्दसंग्रहाचे वर्णन करतात. हो, शब्दकोडी पटापट सोडविण्यात ते तरबेज होते. महाराष्ट्र कोश मंडळ लि. पुणे, ह्यांनी १९३५-१९३६ मध्ये सात खंड प्रसिद्ध केले होते. पीवायसी ग्राउंड जवळ राहणारे कर्नल के जि घारपुरे साहेबांनी ते सातही खंड त्याकाळी चिंचोरे गुरुजींना भेट दिले होते. आजही ते खंड म्हणजे माझा जीव कि प्राण आहेत ! ह्या कर्नल घारपुरे साहेबांचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे त्याकाळी शाळेच्या संमेलनाची अनेक छायाचित्रे त्यांनी स्वतः टिपलेली होती, जी आजही माझ्या संग्रहामध्ये आहेत, ह्या पोस्टवर टाकलेले छायाचित्र हे त्याचेच सर्वोत्तम उदाहरण आहे !
शिक्षणतज्ज्ञ वि वि चिपळूणकर सरांच्या हस्ते जेव्हां चिंचोरे गुरुजींचा "शिक्षक दिनी" सन्मान झाला, तेव्हां ते म्हणाले होते, "पंडित" हे नाव सार्थ करणारे "पंडित विष्णू चिंचोरे गुरुजी" ! महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालिका डॉक्टर चित्राताई नाईक ह्यांच्या शुभहस्ते चिंचोरे गुरुजींचा "आदर्श शिक्षक" हे बिरुद अर्पण करून पुणे येथे १७ ऑगस्ट १९७३ रोजी सन्मान करण्यात आला होता !
माझी आईनं त्याकाळी गाण्याचं नियमित शिक्षण घेतलं होतं ! आमचे नातेवाईक होसिंग काकांनी त्यांची बेल्ज्यियम सुरांची पेटी माझ्या आईला भेट दिली होती. चिंचोरे गुरुजीही पेटी वाजवायचे, "तुला रं गाड्या भीती कशाची" हे गाणं ते पेटीवर वाजवायचे आणि आम्ही भावंडं ते ऐकत, त्यांच्या पुढ्यात बसायचो !
तिथीने चंपाषष्ठीला आणि तारखेनी ३ डिसेंबर रोजी चिंचोरे गुरुजींची जयंती आहे, आज सात मे रोजी त्यांची ३३ वी पुण्यतिथी आहे,
-- उपेंद्र पंडित चिंचोरे
Copyright © 2025 | Marathisrushti