जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
गरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिद्ध असलेले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील "आरवली" हे गाव!!! मुंबईहुन गोव्याकडे जाताना चिपळुण हुन सुमारे ३१ किमी तर संगमेश्वर च्या अगोदर १६ किमी वर लागणारे आरवली गावाची २००८-२००९ नंतर नवीन ओळख तयार झाली.... गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ केल्यावर अंगावरची रोगराई पळुन जाते अस म्हणतात.... एका अर्थाने गावाची तीच परंपरा, तीच ओळख कायम ठेवणारा एक "मोदक" या गावात जन्माला आला.... आता गरम पाण्यात अंघोळ न करता आपल्या अजोड सुरेल गळ्यांने सुरांची बरसात करुन रसिकांना न्हाऊ घालणारा प्रथमेश उमेश लघाटे याच गावात २९ सप्टेंबर १९९४ साली जन्माला आला.....!!
सुमारे तीन हजार लोकवस्तीच्या या गावात पुर्वी मनोरंजनाची कोणतीही साधने ऊपलब्ध नव्हती.... तेंव्हा या गावातील ब्राह्मण वाडीतील ३०/३५ घरातील मंडळी रात्री गप्पा मारणे, पत्ते खेळण्यासाठी एकत्र जमा व्हायचे. या एकत्र येण्यातुनच कै. विष्णू विनायक लघाटे यांनी भजनाची संकल्पना मांडली.... आणि दर गुरुवारची भजन परंपरा सुरु झाली. साल होते १९२५!!! आजपर्यंत हि परंपरा यशस्वीपणे सुरु आहे. ह्या भजन परंपरेतुनच महाराष्ट्राला एक ऊमदा गायक मिळेल ह्याची ह्या भजनी मंडळींना स्वप्नात देखील कल्पना आली नसेल. ह्या परंपरेतुन प्रथमेशला बालपणीच गायनाची गोडी लागली. प्रथमेशच्या घरच्यांनी मग त्याच्या गायनाची आवड लक्षात घेऊन त्याला श्री सतिश कुंटे यांच्याकडे गायन वर्गासाठी पाठवले. प्रथमेशचा कल शास्त्रीय गायनाकडे होताच. त्यामुळे त्याला शिक्षण घेताना फार अडथळे आले नाहीत. पुढे २००८/०९ साली झी मराठी ह्या वाहिनीवर "सारेगमप" ची घोषणा झाली... आणि प्रथमेश पाय आपोआप तिकडे वळले.... त्यांने पहिल्या भागापासुनच आपलं स्वत:च असं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
बाबुजी आणि गदिमांचे गीतरामायण पुर्वी घरी थांबुन रेडिओ ला कान लाऊन ऐकायचे, पुढे दुरदर्शनच्या काळात रामायण, महाभारत या मालिकांच्या वेळेत रस्ते निर्मनुष्य असायचे.... झी सारेगमप (लिटल चॅम्प्स) च्या वेळी हा अनुभव पुन्हा आला..... यात सिंहाचा वाटा होता तो प्रथमेशचा!!! तोच या पर्वाचा विजेता ठरेल अशी रसिक वर्गाला अपेक्षा होती... निकाल मात्र वेगळाच लागला(त्याचा इतिहास सर्वश्रुत आहेच) परंतु रसिकांची मनं जिंकुन खरा विजेता ठरला तो प्रथमेशच!!!
आपल्या गावावर निस्सिम प्रेम करणारा प्रथमेश सध्या पुण्यात राहुन संगीत विषयात MA करतोय. मात्र त्याची गावची ओढ, गावावरचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. तो गावात असेल त्या दिवशी योगायोगाने गुरुवार असेल तर तो भजनाला हमखास हजर असतो.
प्रथमेशचा गळा हि त्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला परमेश्वराकडुन मिळालेली एक विलक्षण भेट आहे. या गळ्यातून सुरांची अखंड बरसात होत राहो. प्रथमेशला अमाप यश, किर्ती, सन्मान मिळो हिच आजच्या शुभदिनी परमेशाकडे प्रार्थना!!!
WhatsApp वरील संगीत संगीत व फक्त संगीत या ग्रुपवरुन..
डॉ.पंजाबराव देशमुख यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शामराव व आईचे नाव राधाबाई, हे त्यांचे पहिलेच अपत्य. राधाबाई अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. पण शिस्त फार कडक होती. त्यांना मुलांनी कसेही वागणे आवडत नसे त्यामुळे पंजाबराव यांना चांगले वळण लागले. पापळ ला १८७४ ला त्यांची शाळा सुरु झाली. १९०६ ला त्याना शाळेत टाकण्यात आले. तेव्हा ते ७ वर्षाचे होते. शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून त्यंच्या वडिलांनी घरीच एका शिक्षकाची राहण्याची व्यवस्था केली.
गोसावी गुरुजींचा त्यांच्यावर फार प्रभाव पडला. मराठी व्याकरण व गणित त्यांचे फार चांगले होते. ते कुशाग्र बुद्धीचे निग्रही होते. नियमितपणा, आज्ञाधारकपणा मनोनिग्रह त्यांच्या स्वभावात रुजू लागले. रेखीव पोषाखाची व निटनेटकेपणाची त्यांना गोडी होती. गावात तिसर्या वर्ग पर्यंत शाळा होती. नंतर चान्दुरातील शाळेत घालून चौथ्या वर्गाची परीक्षा पास केली. पुढील शिक्षण कारंजा लाड येथे झाले. असे अनेक अडचणींना तोंड देऊन १९१८ ला ते दहावी उच्च श्रेणीत पास झाले.
१९१८ साली २५जूनला त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. १९१८ साली पुण्याला प्लेगने कहर केला. या रोगा ने बर्याच लोकांचा बळी घेतला. त्यामुळे पुण्यातील शाळा कॉलेज बंद करण्यात आले. त्यामुळे त्याना पापळ ला परत यावे लागले. नंतर काही दिवसाने परत कॉलेज सुरु झाले. अभ्यास नियमित चालू झाले. आणि त्यांनी आपले इन्टरपर्यंत शिक्षण अत्यंत नेटाने पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी आपल्याला इंग्लंडला जायचे असे त्यांनी मनाशी पक्के ठरविले. इंग्रजीतून भाषण व लेखन करण्यासाठी त्यांनी अभ्यास केला.
पाश्चात्य संस्कृती, शिष्टाचार, चालीरीती व सभ्यता याचे सूक्ष्म अवलोकन केले. त्यांनी इंग्लड ला जाण्याची गोष्ट घरी काढली तेव्हा आई व काकांनी हि कल्पना उचलून घेतली त्यांना आपला मुलगा एवढा मोठा होतो कि परदेशात जातो. त्यांना फार अभिमान वाटला. पण त्या खर्चा साठी शामरावांना संपूर्ण शेती गाहाण टाकून पैसा उभा करावा लागला २१ ऑगष्ट १९२० रोजी पंजाबराव एस. मलोत्रा यांच्या बोटीने ७ सप्टेंबर १९२० ला इंग्लंडला पोचले. ते कॉलेज मध्ये प्राध्यापक व विध्यार्थ्यान सोबत फार जिव्हाऴयाने वागत. अत्यंत खडतर जीवन जगत पंजाबरावांनी अभ्यास करून उच्च विद्याविभुषीत होउन डॉ.पंजाबराव १५ जुलै १९२६ रोजी मुंबई गेट वे ऑफ ईंडीयावर उतरले.
अमरावती जिल्ह्याच्या ईतिहासात हि सुवर्ण अक्षराने लिहिणारी घटना होती. शामराव देशमुख या सामान्य शेतकर्याने आपला मुलगा सातासमुद्रापलीकडे पाठवावा आणि हा सहा वर्ष्यात विद्येचा डॉ. परत यावा यापेक्षा मातोश्री राधा बाई व शामरावाना कोणता आनंद हवा होता? डॉ. पंजाबराव देशमुख पापळला आले या बातमीने सारा वर्हाडचा आसमंत फुलला. ठिकठीकाणी त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले.
शिक्षणामुळे होणारी दैना,अज्ञांन, निरक्षरता हा शाप समाजाला आहे. हे त्यांनी ओळखून त्यांनी श्री शिवाजी मराठा हायस्कूल काढण्याचा निर्णय घेतला. १जुलै १९२५ हा दिवस अमरावतीचे ऎतिहासात अत्यंत महत्वाचा व सुवर्ण अक्षराने लिहावा असा ठरला. गोपाळराव देशमुखानच्या आवारात एका शेड खाली एक महिन्याच्या आतच सरकार मान्यता मिळाली,पण मराठा समाजात पदवीधर तरुणांचा तुटवडा असल्याने हे विद्यालय चालविणे फार कठीण बाब होऊन बसली होती. ह्या विद्यालयात एम.ए.ऑनर्स, डी फिल्ड, बार-ऑट-लॉ असा महामानव शिक्षक म्हणून विना वेतन काम करणारा लाभला. आपल्या अगाध ज्ञांनाचा उपयोग मराठा पिढीतील तरुणांना शिक्षणात प्रेम निर्माण करण्यात त्यांनी केला. त्यांनी श्रद्धानंद बोर्डींगची स्थापना केली. समाजातील बौद्ध, मांग, चांभार, मुसलमान असे सर्व विद्यार्थी त्यांनी बोर्डिंग मध्ये जमा केले. हे एक क्रांतिकारी पाउल होते.
सार्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण देऊन हजारो विद्यार्थी बाहेर पाठविले. हि त्यांची कितीतरी दैदिप्यमान क्रांती होती!
शिक्षणा सोबत विद्यार्थी मजबूत व सुदृढ बनावेत असे त्याना वाटे. या साठी त्यांनी १९२६ साली श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना केली.ते करते समाज सुधारक होते. १४ डिसेंबर १९३० ला नागपूर मंत्रीमंडळात मंत्री म्हणून त्यांची निवड झाली. डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या सारखा भारतिय कृषक आणि कृषी यावर प्रेम करणारा भूमिपुत्र कुणीच नव्हता. तो त्यांच्या जीवन निष्ठेचा मानबिंदू होता. शेतकर्यांच्या विविध प्रश्ना बद्दल ते जागरूक असत. मंत्रीमंडळात त्यांनी शेतकर्यांच्या हिताचे बरेच कार्य केले.
विद्यालय, महाविद्यालय, कृषी विद्यालय त्यांनी सुरू करून शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात नेली. राजकारणा सोबत समाजासाठी शैक्षणिक कार्य तसेच क्रांती चे हि पाउल ते टाकीत. स्वतंत्र भारताचे कृषीमंत्री म्हणून त्यांची झालेली निवड हि एका भूमी पुत्राच्या कार्याचा गौरव ठरली. हे शेतकर्यांचे नायक ठरले.
भारतात वाघिणीचे दुध पिउन आलेला हा नवा क्रांतिकारक सामाजिक, धार्मिक, आर्थिक राजकीय क्ष्रेत्रात प्रस्थापितांचे विरुद्ध बंद पुकारून पुढे येत होता. जीवनात प्रत्येक क्षेत्रांत क्रांती करनार्या या महा पुरुषाने जगभर भ्रमण केले. इटली, रोम, जर्मनी मध्ये प्रवास केला. भारताच्या संसदेत अमरावती जिल्ह्याचे नाव रोशन केले. प्रत्येक क्ष्रेत्रांत विचार पूर्वक पाउल टाकले.सतत चिंतन,मनन, व देशातील सामान्य माणसाच्या उद्धारासाठी झटणारे त्यांचे मन होते. पंजाबराव देशमुख यांचे निधन १० एप्रील १९६५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ज्येष्ठ हिंदी व गुजराथी नाटकातील अभिनेत्री दिना पाठक यांचा जन्म ४ मार्च १९२२ रोजी झाला. दिना पाठक पूर्वाश्रमीच्या नी गांधी. त्या महिला अॅक्टीवेटीस्ट देखील होत्या आणि 'भारतीय महिला नॅशनल फेडरेशन' (NIFW) अध्यक्ष राहिल्या होत्या. हिंदी आणि गुजराती चित्रपटात दिना पाठक यांनी सहा दशकांत १२० चित्रपटांत अभिनय केला.
त्यांचे मीरा गुजराथी हे नाट्य भवाई लोकनाट्य शैली मध्ये अनेक वर्षे यशस्वीपणे चालू होते. त्यांच्या गोल माल आणि खूबसुरत मधील संस्मरणीय भूमिका प्रसिध्द आहे. त्यांनी कोशिश, उमराव जान, मिर्च मसाला आणि मोहन जोशी हाजीर हो चित्रपटात महत्वाच्या भूमिका केल्या. दिना पाठक यांचे ११ ऑक्टोबर २००२ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकी पिडीया
लौकिक अर्थाने म्हणाल, तर शालेय शिक्षण नाही, व्यवसाय भिक्षुकीचा. वास्तव अगदी आडखेड्यात. त्यांचा जन्म ८ जुलै १९२८ रोजी वाडा, सिंधुदुर्ग येथे झाला.पण पंचेचाळीस र्वष निष्ठेने साहित्यसेवा, चोपन्न कादंब-या, तेराशे कथा अशी थक्क करणारी कामगिरी करणारे लेखक म्हणजे श्रीपाद काळे. वडिलांचा पारंपरिक भिक्षुकीचा व्यवसाय त्यांनी निष्ठेने सांभाळला. वडिलांनी घरीच भिक्षुकीचं प्राथमिक शिक्षण दिलं. मात्र, पुढील शिक्षण साता-याच्या वेदपाठशाळेत झालं.
दशग्रंथी ब्राह्मण म्हणून ख्याती मिळविली. तशी घरीच गरिबीच, थोडीशी शेती अन् आंब्याची चार झाडं. पण मुळातच काटकसर आणि काटेकोर असणा-या माणसाला काहीही कमी पडत नाही हेच खरं. भिक्षुकी या व्यवसायाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली ती आपल्या वागण्यातून अन् व्यवसायातल्या निष्ठेतून. पारंपरिक कथांमधून असणारी ‘गरीब, बिचारा ब्राह्मण’ ही विशेषणं त्यांच्या मनाला रुचत नसत. स्वच्छ धोतर, पांढरा अंगरखा, काळी टोपी असा साधा पोशाख.
पण रस्त्याने जात तेव्हा लोक आदराने नम्र होत. अत्यंत मृदुभाषी, मितभाषी. पण त्यांच्या सहवासात यायला, त्यांचा सहवास मिळावा यासाठी माणसं आतुर होत. व्रतस्थपणे साहित्यसेवा करणा-या अण्णांशी ओळख व्हावी, जवळीक असावी असं प्रत्येकाला वाटत असे. भिक्षुकीला जाताना ते नेहमी चालत जात. वाड्यातून देवगड-दाभोळपर्यंत तर गिर्ये विजयदुर्गपर्यंत यजमान्याने सांगितलेल्या वेळेत हजर.
पूजाविधी, मंत्रविधी करताना कोणतीही काटछाट, शॉर्टकट्स त्यांना बिलकुल मान्य नसे. करायचं ते काम नीटनेटकं, मनापासून. भिक्षुकीचा व्यवसाय तरुणांनी करावा, यासाठी ते त्यांना प्रोत्साहन देत. पुढील पिढीपर्यंत हे ज्ञान पोहोचावं, ही परंपरा टिकून राहावी, तरुणांनी या व्यवसायात यावं यासाठी त्यांनी त्यांच्या घरी वाड्याला वेदपाठशाळा सुरू केली.
कुणाकडून एक आणासुद्धा न घेता आपल्याकडचं हे धन मुक्तपणे पुढच्या पिढीच्या हवाली केलं. आज कितीतरी तरुण त्यांची ही परंपरा पुढे चालवत आहेत. ब्राह्मण तरुणांना उदरनिर्वाहाचं एक उत्तम साधन त्यांनी मिळवून दिलं. बरेच लोक त्यांना अण्णा म्हणत. अण्णांना रिकामं बसलेलं कुणी कधीच पाहिलं नसेल. कधी माडाच्या झावळय़ांपासून हीर काढणं, जानवी करण्यासाठी सूत कातणं, जानवी, वाती तयार करणं, द्रोण-पत्रावळी बनवणं, होमासाठीची तयारी समिधा, दर्भ वगैरे जमा करणं, काहीना काही उद्योगात ते असतच असतं. श्रीपाद काळे मानसन्मान, गर्दी, माणसं यांपासून जरा दूरच असत. लेखन साधं,
व्यक्तिमत्त्व साधं म्हणूनच तर अनेक मान्यवर व्यक्ती मुद्दाम त्यांना भेटायला येत असत. दोन दोन दिवस राहत असत. पत्नी इंदिराबाईंची उत्तम साथ, त्याही नीटनेटक्या, चौथीपर्यंत शिकलेल्या. आलेल्या पाहुण्याचं आदरातिथ्य करण्याची हौस. यामुळेच अण्णांच्या घरी आलेली माणसं तिथे रमत. श्रीपाद काळेंची ‘रानपाणी’ ही कादंबरी वाचून गो. नि. दांडेकर त्यांच्या घरी आले. चांगले दोन दिवस राहिले. येताना त्यांनी पेरूच्या दोन करंड्या आणल्या होत्या.
अण्णांच्या घराजवळ असलेलं पेरूचं झाड त्या बियांपासून तयार झालंय, असं वामन काळे सांगतात. त्यांचे हे धाकटे बंधू आकाशवाणी सांगली केंद्रावर निवेदक म्हणून कार्यरत होते. आता सेवेतून निवृत्त झाले आहेत.
थोर साहित्यिक रवींद्र पिंगेंशी तर अण्णांची गाढ मैत्री. या दोघांना एक त्र बघून खूप गंमत वाटे; यासाठी की रवींद्र पिंगे बोलघेवडे अन् श्रीपाद काळे मितभाषी. रवींद्र पिंगेंच्या पुस्तकात श्रीपाद काळेंविषयी लिहिलंय, अगदी तसेच होते ते जगदीश खेबूडकर, शं. ना. नवरे, शंकर वैद्य यांसारख्या थोर व्यक्तींनी या गावात पायधूळ झाडली ती केवळ अण्णांना भेटण्यासाठी.
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक तर कितीतरी वेळा येत. वाडा या छोटेखानी गावात वाचनालयातर्फे एक साहित्य संमेलन जवळजवळ २५-३० वर्ष भरत आहे. अण्णांनी याची सुरुवात केली. नामवंत व्यक्ती या साहित्य संमेलनाला आवर्जून हजर असतात. रेणू दांडेकर, वृंदा कांबळी, वैशाली पंडित, उषा परब, प्रा. तरुजा भोसले या माहेरच्या ओढीने वाड्याला येत. रेणू दांडेकरांशी तर त्यांचे कौटुंबिक संबंध जुळून आले.
श्रीपाद काळेंच्या कथा काय किंवा कादंब-या काय, विषय अगदी साधे, वाचकाच्या अवतीभवती घडणारे, नित्य अनुभवातले. त्यामुळे समजायला सोपे. गूढ, गर्भीत अर्थाची रचना नाही. शब्दांचा खेळ नाही. साधीसुधी भाषा, अगदी आपल्याशी कुणी बोलतंय. आपल्याला काही सांगतंय अशी. म्हणूनच ती वाचकांना भावली. ब-याचशा कथा कोकणच्या पार्श्वभूमीवरच्या, वर्तमान स्थितीतल्या.
स्वातंत्र्यानंतरच्या या मध्य कोकणातल्या कौटुंबिक, सामाजिक स्थितीचा अंदाज आपल्याला देणा-या आहेत. सभोवतालच्या जीवनात जे भलंबुरं दिसत होतं त्यांना त्यांनी कथारूप दिलं. कोकणातल्या दुर्गम भागात जगणारी माणसं, पोटापाण्याची जुळवाजुळव करताना वाट्याला आलेला अपमान, कष्ट सामाजिक संकेतांचं पालन करताना करावी लागणारी धडपड, सामाजिक संकेतांचं दडपण, सुख आणि दु:ख याचा पाठशिवणीचा खेळ, दैवाधिनता हे सर्व डोळसपणानं पाहिलं आणि कथाबीज फुलत गेलं.
‘प्रथा’ या कथेतील गोदाक्कावर गोठय़ाच्या कोप-यावर काही मारायचं या प्रथेचा पगडा असतो. आयुष्यभर ही प्रथा गोदाक्काला छळत राहते आणि प्रथेचं पालन पुढच्या पिढीकडून व्हावं म्हणून घरातल्यांना ती छळत राहते. गोदाक्का ही कोकणच्या संस्कृतीत जगणारी एक प्रातिनिधिक स्त्री.
श्रीपाद काळेंच्या कथेतल्या स्त्रिया कमालीच्या सोशीक आहेत. नव-याने दिलेली अपमानकारक वागणूक, सासरच्या माणसांकडून झालेला छळ त्या सोसतात, मुलांसाठी खस्ता खातात आणि त्यांच्याकडून होणारी प्रतारणा सहन करतात. त्यासाठी प्रारब्धाला दोष देतात, दैवावर हवाला ठेवतात. तुळशीला पाणी घालणं, सांजवात लावणं, अतिथींचं स्वागत करणं, व्रत नेमधर्म पाळणं हे त्यांचे कार्यक्षेत्र. त्या मनापासून सांभाळतात. आजच्या स्त्रीमुक्तीच्या काळात हे सर्व कालबाहय़ वाटतं. पण उंब-याची मर्यादा सांभाळणा-या या नायिकांनी घरातल्या प्रसन्नतेला तडा जाऊ दिला नाही.
बंड करण्याची, पेटून उठण्याची ऊर्मी मनात दाबून ठेवली. तेच त्यांचं ‘स्वत्त्व’ होतं. ते त्या स्त्रिया जपत राहिल्या. घरासाठी त्याग करणारी, पतीबरोबर फक्त सात पावलंच नव्हे तर अंतापर्यंत चालत राहणारी, संसार होमात आपल्या इच्छा-आकांक्षांना आहुती देणारी स्त्री. खरं तर हा प्रकृतीकडून पुरुषत्वाकडे वाटचाल करण्याचा हा मार्ग. भारतीय अध्यात्मशास्त्राचा भक्कम आधार या विचारात सापडतो.
श्रीपाद काळे यांनी आपल्या कथा-कादंब-यांतून निसर्गाची लोभस वर्णने रेखाटली आहेत. पाऊस लाल लाल पाणी, वहाळ, परे, पाणंद, गारगार वारा, समुद्र, खाड्या, पाखरं, जनावरं, खुरटलेल्या वेली, सूर्याची किरणं, चांदणी रात्र, निळंकाळं आकाश,
बहरलेली शेतं. आंब्या-फणसाची झाडं असे अनेकानेक संदर्भ सहजपणे येतात. ते वगळून कथानक पुढे सरकत नाही. त्या कथाबीजाला पूरक वातावरण हे संदर्भ देत राहतात.
पौषातली अमावास्या होऊन गेली तरी हाती काही लाभलंच नाही – खार मोठय़ा फणसावर जाऊन जिवाच्या आकांतानं चिवचिवत राहिली.
कथा प्रथा, ‘पाणी एकसारखे वाढत होते आणि केसुनानांच्या जिवाचा थरकाप वाढत होता..’ त्या उधाणाला पाण्याबरोबर माडाच्या सावल्या वाहत होत्या. लाकडाचे ओंडके बेगुमानपणे पाणी नेत होते. कथा चुटपूट कोकणच्या जीवनाला हा निसर्गही कधी साथ देतो कधी उग्र रूप धारण करून होत्याचे नव्हते करून टाकतो. कोकणातला सामान्य माणूस निसर्गाच्या या लहरीपणाचा मारा सहन करत ताठ उभं राहतो हे त्यांच्या कथांतून जाणवत राहतं.
भिक्षुकी हा व्यवसाय करत असताना माणसांशी त्यांचा अगदी जवळून संबंध आला. विविध दैविक कृत्य करताना त्यांच्यातला साहित्यिक जागा असायचा. माणसांचे विविध नमुने त्यांना भेटत. ते सांगत ब-याचशा कथा त्यांना तिथेच सुचत. चालत येताना, जाताना मनात त्या विषयाची जुळणी होई. दिवसभराच्या व्यापातून मुक्त झाल्यावर रात्री शांतवेळी त्या कथा कागदावर उतरत असत. वीज आली नव्हतीच, कडू तेलाच्या दिव्याच्या उजेडात, कंदिलाच्या उजेडात त्यांचं लेखनकार्य चालू असायचं हे एक वेगळंच यज्ञकर्म घडत होतं. साध्यासुध्या, प्रासादिक भाषेत श्रीपाद काळेंनी मानवी जीवनातल्या व्यथा, सुखदु:ख, चढउतार टिपले आहेत. लेखनातल्या मार्मिकतेने वाचनीयता वाढवली आहे. सोप्या मारलेल्या अनेक गाठी बघून आपल्याला कोडं पडावं, पण एक सूत ओढताच आपल्याला सगळय़ा गाठींचं रहस्य उमजून यावं, तसं माझं झालं आहे.
वांझोट्या झाडाला अचानक केव्हा तरी फूल दिसावं ना, तसं कैक दिवसांनी त्यांच्या मुद्रेवर हास्य उमललं- सहानुभूती. अशी वाक्यांची सुरेख पखरण त्यांच्या कथांतून आहे. श्रीपाद काळेंच्या कितीतरी कथांचे नुसते प्रारंभ, शेवट पाहिले तरी त्यांच्या प्रतिभाशक्तीचा प्रत्यय येतो. अण्णांना आपल्या मर्यादा ठाऊक होत्या. आपलं शालेय शिक्षण झालं नाही, याची त्यांना खंत वाटत असे, ते ती बोलून दाखवत. पण लेखनसेवेत खंड पडला नव्हता. मानसन्मान यांपासून दूर असणा-या श्रीपाद काळेंकडे मानसन्मान स्वत:हून चालत आले. ‘पिसाट वारा’ या कादंबरीला राज्य पुरस्कार मिळाला. गुजराती, कानडी, हिंदी भाषांतून त्यांच्या कादंबरीची भाषांतरे झाली.
कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरीतर्फे त्यांच्या या साहित्यसेवेबद्दल पावस येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. १९९६ मध्ये लोकमान्य टिळक स्मृती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. श्रीपाद काळे यांचे निधन १८ जून १९९९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / संजीवनी फडके
श्रीपाद काळे यांच्या काही ठळक कादंब-या पिसाटवारा, रानपाणी, एक काळ, एक वेळ,माया, अभुक्त, उमा, काळोखाची वाट, तुटलेले पंख
कथासंग्रह : संकेत, संधीकाळ
आपण जयंत राळेरासकर यांना अवलिया म्हणू शकतो. जयंत राळेरासकर हे सोलापूरचे. शिक्षण बी. एस्सी. (ऑनर्स) असूनही त्यांची तब्बल ३० वर्षे नोकरी झाली ती सेंट्रल बँक ऑफ इंडियात. २००१ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. नोकरी करता करता त्यांनी छंद जोपासला तो संगीताचा त्या मुळे १९९२ पासून सोसायटी आॕफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर मुंबई च्या संपर्कात राहिले.
महानतम गायिका ‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ यांचे खरे नाव 'अल्लाह वसई होते. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२६ पेशावर येथील संगीतकार मदद अली यांच्या परिवारात झाला.
संगीतकार परिवारात जन्म झाल्याने नूरजहाँ यांना लहानपणा पासून संगीताची आवड निर्माण झाली. नूरजहाँ यांनी वयाच्या पाचव्या वर्षी गाणे शिकायला सुरवात केली होती.
नूरजहाँ यांचा परिवार १९३० मध्ये कलकत्ता येथे आला. तेथे नूरजहाँ यांना नृत्य व गाणे शिकायला मिळाले. नूरजहाँ यांच्या गाण्यावर प्रभावित होऊन संगीतकार गुलाम हैदर यांनी पंजाबी चित्रपट ‘शीला’ उर्फ ‘पिंड दी कुड़ी’ मध्ये बाल कलाकाराची भूमिका दिली. हा चित्रपट पंजाब मध्ये गाजला. त्या काळी पंजाब म्हणजे लाहोर पण होते. १९३० च्या दशकात लाहोर मध्ये अनेक स्टूडियो स्थापन झाले. गायकाची वाढती मागणी लक्षात घेऊन नूरजहाँ यांचा परिवार १९३७ मध्ये परत लाहोरला आला. तेथे डलसुख एल पंचोली यांनी बेबी नूरजहाँ यांचे गाणे बघून ‘गुल-ए-बकवाली’ या चित्रपटात भूमिका दिली.
या नंतर त्यांचा यमला जट, ‘चौधरी’ चित्रपट प्रदर्शित झाला. यातील गाणी ‘कचियां वे कलियाँ ना तोड़’ व ‘बस बस वे ढोलना की तेरे नाल बोलना’ ही खूप लोकप्रिय झाली.
१९४२ मध्ये नूरजहाँ यांनी आपल्या पुढील बेबी हा शब्द काढला. त्याच वर्षी ‘खानदान’ चित्रपटातून त्यांनी लोकांचे ध्यान वेधून घेतले. याच चित्रपटाचे निर्देशक शौकत हुसैन रिजवी यांच्या बरोबर लग्न केला. १९४३ मध्ये नूरजहाँ मुंबईला आल्या. आजही जुन्या पिढीतील लोक त्यांच्या ‘लाल हवेली’, ‘जीनत’, ‘बड़ी माँ’, गाँव की गोरी और मिर्जा साहिबाँ, अनमोल घडी या चित्रपटासाठी नूरजहाँ यांची आठवण काढतात. अनमोल घड़ी चे संगीत नौशाद यांनी दिले होते त्यातील ‘आवाज दे कहाँ है’, ‘जवाँ है मोहब्बत’ और ‘मेरे बचपन के साथी’ ही गाणी आजही लोक आवडीने एैकतात.
नूरजहाँ फाळणी नंतर मुंबईहून लाहोरला आल्या. त्यांचे पती रिजवी यांनी शाहनूर स्टूडियो चालू केला. शाहनूर प्रोडक्शन नी ‘चन्न वे’ ची निर्मिती केली ज्याचे निर्देशन नूरजहाँ यांनी केले होते. त्यातील ‘तेरे मुखड़े पे काला तिल वे’ हे गाणे लोकप्रिय झाले.
नूरजहाँ यांची शेवटचा चित्रपट ‘बाजी’ होता त्यांनी पाकिस्तातात १४ चित्रपट बनवले त्यातील १० उर्दू होते. काही कारणाने त्यांना अभिनय सोडावा लागला पण त्यांनी गाणे चालू ठेवले.
पाकिस्तानात पार्श्वगायिका म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘जान-ए-बहार’ होता. यातील ‘कैसा नसीब लाई’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या फिल्मी करियर में उर्दू, पंजाबी व सिंधी भाषात अनेक गाणी गायली.
त्यांना पाकिस्तान मधील सर्वोच्च सम्मान ‘तमगा-ए-इम्तियाज’ मिळाला होता.
नूरजहाँ यांचे २३ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कुष्ठरोगाचं निर्मूलन व्हावं, कुष्ठरोग्याला समाजात मानाचं स्थान मिळावं ही महात्मा गांधींची इच्छा होती. डॉ. सामंत यांनी गांधीजींचा हा संदेश आपल्या कामात उतरवला. त्यांच्या कामाचा भारतीयांना गर्व असेल,’ हे उद्गार आहेत, भारताचे उपराष्ट्रपती अन्सारी यांचे. डॉ. जगदीश सामंत यांना मानाच्या अशा, ‘ गांधी इंटरनॅशनल अवॉर्ड ‘ ने गौरवण्यात आलं आहे.
बाबा कदम यांचे खरे नाव वीरसेन आनंद कदम होते. त्यांचे वडिल अक्कासाहेब महाराजांचे स्वीय सचिव होते. संस्थांनी वातावरणातच बाबांचे बालपण गेले. त्यांचा जन्म ४ मे १९२९ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झाला. त्यांचे वडिल रेसकोर्सवर अधिकारी म्हणूनही कार्यरत असत. त्याचाच परिणाम बाबांच्या कथालेखनात झाला. त्यांच्या कथा, कादंबर्यानत मात्र ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थानिक गढ्या, वाडे, सरंजामी सदर बोली भाषा, पोलीस, कायदा, कोर्ट, रेसकोर्स इ. हमखास असे. त्यांची `अजिंक्यतारा' कथा रेसकोर्सच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या बालपणातच वडिलांचे निधन झाले. प्राथमिक शिक्षण वसतिगृहात राहून झाले. स्वावलंबी जीवनाचे धडे त्यांनी आश्रमातच घेतले. इथेच त्यांची चित्रकलेशी ओळख झाली. पुढे ते राजाराम कॉलेजमधून पदवीधर झाले. याच काळात बाळ गजबरांचाही परिचय झाल्याने चित्रकलेचे संस्कार त्यांच्यावर झाले. घरच्या परिस्थितीमुळे पुढे त्यांनी एस. टी. महामंडळात काही काळ सेवाही करतानाच शिक्षणाची ओढ त्यांना गप्प बसू देत नव्हती. ते १९५४ मध्ये एल.एल.बी.झाले. फौजदारी वकील डी.एस.खांडेकर यांच्याकडे ते काम करु लागले १९५९ साली ते सरकारी वकील म्हणून नियुक्त झाले. १९५९ ते १९८७ पर्यंत सरकारी वकील म्हणून २८ वर्षे काम करुन ते १९८७ साली सेवानिवृत्त झाले. याच त्यांच्या न्यायालयीन कामकाजाचाही त्यांच्या लेखनावर प्रभाव पडलेला दिसतो. १९६५ साली त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. `प्रलय' याच कादंबरीवर पुढे `देवा शपथ खरं सांगेन' हा चित्रपटही निघाला. १९६६ ला इन्साफ या कादंबरीवर ही `अधिकार' हा चित्रपट निघाला.
भालु, सन्ना, ज्योतिबाचा नवस, पाच नाजूक बोटे, बिनधास्त, गर्लफ्रेंड, डेझर्ट क्वीन, डार्लिंन, निष्पाप बळी, गजरा, बॉंबे पोलीस, रमी, ज्वालामुखी, दगा, न्याय, रिवॉर्ड अशा सुमारे ८० च्या आसपास कादंबर्यास त्यांनी लिहिल्या. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा हात लिहिता राहिला. व्यक्तिचित्रण करणार्याय लेखमाला ही त्यांनी वृत्तपत्रातून चालविल्या. कोणत्याही वेळी, कुठेही असतांना माझ्याजवळ लिखाणाची वही जवळ असते. एकटाकी लिखाण करतो अगदी न्यायालयात एखादा तास मिळाला की, मी लिहित बसायचो, शेवट जास्तीत जास्त प्रभावी कसा होईल याबाबत मनात संघर्ष सुरु होतो. हातात एखादा घेतलेली कादंबरी संपल्याशिवाय खाली ठेवायला मला नको वाटते, असे ते सांगतात. त्यामुळेच त्यांच्या कादंबर्यां च्या तीन-तीन प्रती सार्वजनिक ग्रंथालयात घेऊन देखील वाचकांची मागणी पुरविणे ग्रंथपालांना अशक्य होते. विषयातही विविधता असल्याने कादंबऱ्या वाचकप्रिय झाल्या. सन्ना ही सिखसेकापू तरुणीवरील, अजिंक्य ही रेसवरील, राजधानी ही संस्थानिकांवरील `शोभा' ही वेश्येवरील, वसंतदादा व शालिनीताईंच्या जीवनावरील `निर्मला' पद्मा चव्हाण यांच्यावरील `अभिनेत्री' बापू बिरु वाटेगांवकरांच्या जीवनावर `दगा' स्वत:च्या बालपणाच्या आठवणीवर `शाळा सुटली पाटी फुटली' अशा कितीतरी वेगवेगळ्या विषयावर त्यांनी लिहिले. लिहितांनाही त्यांनी आपल्या मनातला कलाकार जपला. निसर्ग जसा आहे तसाच चित्रित करण्याचा माझा प्रयत्न असतो असे ते म्हणतात. नवरा-बायको ह्या पु.ल.देशपांडे यांच्या कथेवरील चित्रपटातही त्यांनी काम केलं. शिकारीचा छंद ही त्यांनी जोपासला. लाखेपासून पक्षी बनवणे व फौंटनपेनापासून विमाने बनविण्याचा रिकामपणातील उद्योग करत असत. तीन हजार चित्रांचा चित्रकार वाचकांच्या मनातही रंगाची उधळण करीतच राहिला. बाबा कदम यांचे निधन ९ ऑक्टोबर २००९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ विजय बक्षी
कुमार गंधर्व यांचा बेळगावजवळच्या सुळेभावी खेड्यात कानडी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९२४ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली. लहान वयातच त्यांनी आपल्या गायकीची चमक दाखवली. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने त्यांनी रसिकांवर अक्षरशः गारुड केले. घराणेशाहीच्या चौकटीत बंदिस्त व्हायला त्यांनी साफ नकार दिला. त्याऐवजी आपली स्वतःची गानशैली जनमानसात रुढ केली. १९३० आणि १९४० च्या दशकात पंडित बी. आर. देवधर यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारले. त्यावेळीच कुमार जींच्या नावाचा दबदबा भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात निर्माण झाला. एप्रिल १९४७ मध्ये भानुमती कंस यांच्याशी कुमार जींचा विवाह झाला आणि ते मध्य प्रदेशातील देवासमध्ये स्थायिक झाले. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर आकस्मिक आघात केला. त्यांना टीबीची बाधा झाली. या दुखण्याने त्यांची फुफ्फुसे खालसा केली. असं म्हणतात की, या दुखण्यात त्यांचं एक फुफ्फुस कायमस्वरुपी निकामी झालं. पत्नी भानुमती यांनी याकाळात त्यांची सेवाशुश्रुषा केली. त्या आधी देवधरबुवांकडे आणि नंतर कुमारजींकडेच गाण्याचे शिक्षण घेत होत्या. त्यांच्याच मदतीने पंडितजी आजारातून बरे झाले आणि १९५३ मध्ये आजारानंतरची त्यांची पहिली मैफल रंगली. परंतु या दुखण्याने त्यांच्या स्वरराज्याला चांगलाच हादरा दिला होता. १९६१ मध्ये बाळंतपणात पत्नी भानुमतीचे निधन झाले. त्यानंतर कुमार जींनी वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला. त्याही देवधरबुवांच्या शिष्या होत्या. कुमार जी आणि वसुंधराबाईंची कन्या कलापिनी ही अनेकदा गाण्याच्यावेळी तानपु-यावर त्यांना साथ द्यायची. माळव्याची लोकगीतं, निर्गुणी भजन, नवरागनिर्मिती यांवर कुमारजींचा मोठा व्यासंग होता. कुमारजींची लोकप्रियता अफाट होती. संगीतातील जाणकार मंडळी त्यांच्या गायकीवर जीव ओवाळून टाकायची. त्यामध्ये महाराष्ट्रीय मंडळींची संख्या मोठी होती. पुणे आणि मुंबईच्या उपनगरातील रसिकांच्या हृदयावर कुमार जींनी अधिराज्य गाजवले. याचठिकाणी त्यांच्या गाण्याच्या मैफली रंगायच्या. चेंबूरसारख्या परिसरात शाळांमध्ये त्यांच्या मैफली व्हायच्या. अगदी फुकट. खरेखुरे संगीताचे दर्दी या मैफलींना हजेरी लावायचे आणि कुमार जींच्या गाण्याची हरएक तान कानात जपून ठेवायचे. कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून मा.कुमारजींना आश्चर्य वाटले. पंडितजींनी जब्बारना विचारले, कॅमेरात किती मोठा रोल आहे ? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे ? जब्बार यांनी सांगितले, पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले. १९९० साली कुमार गंधर्व यांचा पद्म विभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरव केला.
कुमार गंधर्व यांचे १२ जानेवारी १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कुमार गंधर्व यांचे ऋणानुबंधाच्या
https://www.youtube.com/watch?v=K0CXNZyGVeU
कुमार गंधर्व यांचे रागदारी
https://www.youtube.com/watch?v=PCpMcvWkNy4
कुमार गंधर्व यांची निरगुणी भजन
https://www.youtube.com/watch?v=6CAFRYsNXXM
संगीतकार सी. रामचंद्र अर्थात 'अण्णा' यांच्याबद्दलचे सुप्रसिद्ध पण विखुरलेले किस्से एकत्र गुंफले की एक विलक्षण असं मिश्रण तयार होतं. वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळ्या झाडांवरची फुलं एका गुच्छात बांधली की त्याचं बहुरंगीपण जसं आकर्षक होतं तसंच !
"पतंगा" या चित्रपटाची गाणी तयार होत असताना 'राजेंद्रकृष्ण' यांनी एक ओळ लिहीली, 'ओ दिलवालॊ दिलका लगाना अच्छा है' ! खरं म्हणजे किती छान आणि सरळ अर्थ होता या ओळीचा! पण शेजारी बसलेल्या अण्णांना गंमत करायची लहर आली . ही ओळ एेकून, हातातल्या ग्लासकडे पहात, अण्णा खट्याळपणे म्हणाले, "पर कभी कभी! मग काय विचारता? गाण्याचा सगळा नूरच एकदम पालटून गेला ... "किसीकी खातिर जान जलाना अच्छा है - पर कभी कभी!" "दिलमें किसीका प्यार बसाना अच्छा है - पर कभी कभी" ...... अण्णांच्या चेष्टेखोर स्वभावामुळे एका धमाल गाण्याचा जन्म झाला.
"चित्रपटाची सगळीच्या सगळी गाणी (आणि पार्श्वसंगीत) दहा दिवसात तयार झाली पाहिजेत" या "आजाद"च्या निर्मात्याच्या 'आदेशा'चं पालन करण्यासाठी सी. रामचंद्र व राजेंद्रकृष्ण मद्रासला रवाना झाले खरे पण या दोघांनी पहिले नऊ दिवस 'आवडत्या छंदा'त बुडवले ! निर्माते टेन्शनमधे ! मग शेवटच्या दिवशी (म्हणजे रात्री) जोडी 'बसली'! नऊ सुंदर गाणी जन्मली ! निर्माते टेन्शनमधून 'आजाद' आणि श्रोते गाण्यांच्या माधुर्यात कायमचे "कैद!"
बरं अश्या 'बिनधास्त- 'हॅपी-गो-लकी'- वृत्तीच्या माणसाला 'perfection' शी काय देणं घेणं असं आपल्याला वाटतं . पण इथं अण्णा आपल्याला चकवतात.
मोहोब्बत ही न जो समझे या तरल गाण्याचं रेकॉर्डिंग, तलतच्या तलम आवाजात पूर्ण झालं होतं. शूटिंग मात्र नंतर होतं. सी रामचंद्र सहज सेटवर गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा सेट गाण्याच्या चालीशी पूर्णपणे विसंगत आहे. शांतारामबापूंनी तर सेटवर बराच पैसा खर्च केला होता. सेट बदलायचा तर त्यांचा पैसा वाया जाणार होता. पण सी रामचंद्रनी गाण्याची चाल व सेट यातली विरुपता "बापूंना" पटवली आणि पूर्ण सेट बदलायला लावला.
कधी कधी 'खट्याळ युक्त्या' योजून ते स्वतःला हवं ते साध्य करत. "साजन" या चित्रपटातली गाणी नायक 'अशोककुमार'ने म्हणू नयेत असं त्यांना मनापासून वाटत होतं. पण अशोककुमार पडला सुपरस्टार! त्याला ही गोष्ट सांगायची कोणाची हिंमत नव्हती. शेवटी अण्णांनी शक्कल लढवली. 'अशोककुमार'च्या वेगवेगळ्या शूटिंगच्या तारखा मिळवल्या आणि गाण्याची रेकॉर्डिंगज् बरोबर त्याच तारखांना ठरवू लागले . रेकॉर्डिंगला दरवेळी 'नाही' म्हणणं अशोककुमारला अवघड वाटू लागलं तेव्हा तो वैतागून म्हणाला, 'दुसऱ्या कोणाकडून तरी गाऊन घ्या'. अण्णांना हेच हवं होतं. त्यांनी 'आज्ञाधारकपणे' रफीच्या आवाजात गाणी रेकॉर्ड केली.
पण हा कलंदर माणूस 'आतून' खूप हळवा होता. नौशादजी गंभीर आजारी होते तेव्हा सी रामचंद्र त्यांना म्हणाले, 'तुम्ही लवकर बरे ह्वावं म्हणून मी रोज आमच्या देवाला प्रार्थना करतो'. तेव्हा नौशाद म्हणाले की त्यापेक्षा मी लवकर 'जावं' अशी प्रार्थना करा म्हणजे माझी वेदनांतून सुटका होईल आणि त्याचबरोबर तुमची 'competition' सुद्धा कमी होईल. अण्णा म्हणाले, अहो पण तुम्ही आहात म्हणून तर आमच्या हातून काही चांगली निर्मिती होते - तुमच्या समोर टिकाव लागावा म्हणून ! तुम्ही गेलात तर आम्ही आळशी होऊ!' हे ऐकून नौशाद गहिवरले !
लताबरोबर वितुष्ट आल्यावर सी रामचंद्र यांच्या अनेक मित्रांनी त्यांना सुचवलं की त्यांनी लताशी 'समझोता' करावा. 'जी गोष्ट एस् डी बर्मन आणि शंकर यांनी केली ती अण्णांनी का करु नये?' पण अशा वेळी त्यांचा 'मोडेन पण वाकणार नाही' हा बाणा जागृत व्हायचा आणि ते उसळून म्हणायचे, 'समझोता तर तिने केला पाहिजे . मी तह करायला तिनं मला घडवलेलं नाही - मी तिला घडवलयं!' कदाचित, लता किती उंचीवर पोहोचली आहे हे त्यांना कळूनही वळलं नसावं.
या ब्रेकअप नंतर काही वर्षांनी घडलेला प्रसंग :
अनिल बर्वे एका संध्याकाळी अण्णांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. अण्णा एकटेच बसले होते. समोर टेबलावर त्यांची आवडती 'बॅगपाईपर' होती. पण ते नेहमीच्या मूडमधे नव्हते. उदास वाटत होते. बर्वेनी विचारलं, 'अण्णा, काय झालं ?' तेव्हा म्हणाले, 'अरे गळ्याच्या उपचारांसाठी लता लंडनला गेलीय. खूप काळजी वाटतेय रे ! या जगात गाणारे गळे खूप आहेत पण शहनाईचा स्वर फक्त लताच्या गळ्यात आहे !' अण्णांमधल्या सच्च्या कलावंताचं दर्शन घडवणारे हे उद्गार आहेत !
लता-सी रामचंद्र वितुष्टाचा 'फायदा' मिळावा या हेतूने एका मासिकाचे उपसंपादक अण्णांकडे आले व म्हणाले, 'लतापेक्षा आशा श्रेष्ठ आहे' यावर मी एक फीचर करत आहे, तुम्ही बोला त्यात'!
तेव्हा, 'तुम्हाला संगीतातलं काडीइतकं सुद्धा समजत नाही' असं म्हणून अण्णांनी त्यांची बोळवण केली.
अण्णा 'साई-सावली' मध्ये रहायला आल्यावर प्रभाकर मोने गमतीने म्हणाले, "अहो तुमचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर ! जिना अरुंद , लिफ्ट नाही! वर माणूस मेला तर 'बॉडी' खाली आणणं पण अवघड".
अण्णा नेहमीच्या 'श्टाईल'मधे म्हणाले, "पर भैय्या हम तो बाहर के बाहरही मरके जानेवाले है" .. आणि त्यांनी आपला शब्द पाळला. डिसेंबर 1981 च्या शेवटच्या आठवड्यात, के.ई.एम्. मध्ये अॅडमिट झालेल्या अण्णांनी 5 जानेवारी 1982 या दिवशी हॉस्पिटलमधेच प्राण सोडला. त्यांचं शव अंत्यदर्शनासाठी साई-सावलीत खालीच ठेवलं आणि हजारो चाहत्यांचा सोबतीनं सरळ 'चंदनवाडी'कडे रवाना झालं.
-- धनंजय कुरणे
कोल्हापूर
9325290079
Copyright © 2025 | Marathisrushti