जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
शून्यातून उद्योग सुरू करून त्यांनी गरवारे मोटर्स, गरवारे नायलॉन्स, गरवारे प्लॅस्टिक्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन, गरवारे वॉल रोप्स अशा अनेक कंपन्या त्यांनी स्थापन केल्या.
गड-किल्ले, आपली मराठी संस्कृती, मराठी भाषा याविषयी त्यांना खूप वाटे. त्यांच्याच अविरत परिश्रमाने रायगडावर मेघडंबरी बसविली गेली. गड-किल्ल्यांच्या आजच्या अवस्थेमुळे ते अस्वस्थ होत. ‘सरकारवर विसंबून न राहता एकेका गिर्यारोहक मंडळाने एकेक किल्ला दत्तक घेऊन तो जतन करावा,’ असे त्यांचे सांगणे होते.
त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथांपैकी अमृतानुभव भावार्थमंजिरी, पासष्टीभावार्थदीपिका, श्रीगुरूचरित्र सारामृत, श्रीगोदा महात्म्य, श्रीगौडपादकारिका, श्रीईशावास्य भावार्थबोधिनी व मंत्रार्थप्रकाशिका, श्रीनागझरी महात्म्य, श्रीनारद-भक्तिसूत्र-बोधिनी, श्रीमध्वविजय, श्रीमांगीशमाहात्म्य, श्रीशनिप्रताप, श्रीशंडिल्यभक्तिसूत्र भावदीपिका हे प्रमुख ग्रंथ त्यांच्या उत्तुंग काव्यप्रतिभेची साक्ष पटवितात.
रमाकांत देसाई हलकाच रनअप घेऊन क्रीझपाशी आल्यावर आपली करामत दाखवत असत. हनीफ मोहम्मद यांच्यासारख्या नावाजलेल्या फलंदाजाला एकाच मालिकेत देसाईंनी चार वेळा तंबूत धाडले होते. १९६०-६१च्या त्या मालिकेत पाकिस्तानच्या गोटात देसाईंनी खळबळ उडविली होती. एवढेच नव्हे तर हनीफ यांना ‘देसाईंचा बकरा’ म्हणून हिणवले जाऊ लागले.
मधुकर तोरडमल यांना नाट्यसृष्टीत मामा म्हणत असत. प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मधुकर तोरडमल यांच्या अभिनयाची सुरुवात मुंबईत शाळेपासून झाली. नाटय़शिक्षणाचे प्राथमिक धडे त्यांनी तिथेच गिरवले.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेल्या ‘अग्निपथ’ चित्रपटामधील खलनायकी भूमिकेमुळे शिर्कें यांच्या कारकीर्दीला गती मिळाली. ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘घनचक्कर’, ‘धडाकेबाज’, ‘अफलातून’, ‘शेम टू शेम’, ‘अबोली’, ‘रात्र आरंभ’, ‘मराठा बटालियन’, ‘व्हेंटिलेटर’ हे त्यांचे महत्त्वाचे मराठी चित्रपट. ‘तिरंगा’, ‘वंश’, ‘जुडवा’, ‘खुदा गवाह’, ‘जय किशन’, ‘जीत’, ‘काला साम्राज्य’, ‘इश्क’, ‘भाई’, ‘टारझन द वंडर कार’ हे त्यांचे उल्लेखनीय हिंदी चित्रपट.
संगणक व त्याच्याशी संबंधित लहानमोठी उपकरणे आता आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहेत. कॉम्पॅक्ट डिस्क- अर्थात ‘सीडी’ ही त्यातीलच एक.
रेकॉर्ड प्लेअरची जागा टेप रेकॉर्डरने घेतली आणि पुढे काही काळातच कॅसेट कालबाह्य़ ठरून त्यांची जागा ‘सीडीं’नी घेतली. संगीत साठवणे आणि ऐकणे हा ‘सीडी’चा केवळ एक उपयोग झाला. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही माहितीचा साठा संग्रहित करण्यापासून तो दुसर्याला हस्तांतरित करण्यापर्यंतच्या प्रचंड व्यवहारात ‘सीडी’ हे महत्त्वाचे माध्यम ठरले.
१९८२ साली सोनी कंपनीने पहिली सीडी बनवून वितरित केली तेव्हा हाताच्या एका पंजात मावेल अशी ही तबकडी कालांतराने धनाढ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांसाठी दैनंदिन वापराच्या वस्तूचे स्थान पटकावेल असे कोणालाही वाटले नसेल. मात्र फार थोडय़ा व्यक्तींना याची जाणीव असेल, त्यातीलच एक म्हणजे ‘सोनी’ या जगप्रसिद्ध उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष नोरिओ ओगा !
नोरिओ ओगा हे दूरदृष्टीच्या व्यावसायिक नेतृत्वापैकी एक होते. ‘सोनी’ची ध्वजा जगभर फडकविणार्या नोरिओ ओगा यांच्या कर्तृत्वाचा आलेख प्रचंड मोठा असला तरी त्यांची चटकन पटणारी ओळख कॉम्पॅक्ट डिस्क- अर्थात ‘सीडी’चा जनक अशी करून देता येईल. आपल्या उद्योगातून तयार होणारे कोणतेही उत्पादन हे मुख्यत: ग्राहकाला सहजतेने हाताळता आले पाहिजे हा ओगा यांचा आग्रह असे आणि या ध्यासातूनच त्यांनी या क्रांतिकारी तबकडीला जन्म दिला होता.
१९५३ साली ‘त्सुशिन क्योगो’ मध्ये आलेले नोरिओ ओगा तेव्हा फाइन आर्ट्स व संगीताचे शिक्षण घेत होते. ऑपेरा सिंगर होण्याचे त्यांचे स्वप्न होते. प्रत्यक्षात घडले ते वेगळेच. या तरुणाची ध्वनी व विद्युत अभियांत्रिकीची जाण आपल्याला फायद्याची ठरेल हे सोनीच्या संस्थापकांनी हेरले आणि ओगा हे रीतसर या उद्योगात रुजू झाले. तिशी गाठण्याआधीच ओगा अधिकारपदी पोहोचले. सर्वसाधारणपणे जपानी उद्योगात एवढय़ा अल्प काळात असे पद मिळणे दुर्लभ असते.
१९५८ साली ‘त्सुशिन क्योगो’चे नामकरण ‘सोनी कॉर्पोरेशन’ असे झाले. ही कंपनी जगातील पहिला टेपरेकॉर्डर बनविण्याच्या खटपटीत होती. अल्पावधीतच ते साध्य झाले आणि पुढे वर्षभरात ओगा हे कंपनीच्या टेपरेकॉर्डर विभागाचे सरव्यवस्थापक बनले.
ओगा यांचे स्वप्न त्यापुढचे होते. कॅसेटची एक बाजू वाजवून झाली की ती उलटी करून पुन्हा चालू करावी लागे. संगीत ऐकणार्यांसाठी ही एक ‘कटकट’ होती. एखाद्या गायकाचे गाणे ऐन रंगात आले आहे आणि तेवढ्यात टेप संपल्यामुळे रसभंग झालाय हे चित्र तेव्हा नेहमीचेच. त्यामुळे जास्त काळ, विना-व्यत्यय संगीताचा आस्वाद घेण्यासाठी एखादे नवे साधन शोधून काढता येईल काय, यावर त्यांचे विचारचक्र सुरू झाले.
त्यांचा आवडता संगीतकार बिथोवेन याची नववी सिंफनी ७५ मिनिटांची होती. ही पूर्ण सिंफनी सलग ऐकता येईल अशी १२ सेंटिमीटर व्यासाची कॉम्पॅक्ट डिस्क बनवण्याचा ध्यास त्यांनी घेतला.
१९८२ साली सोनीची पहिली सीडी बाजारात आली. अवघ्या पाच वर्षांतच सीडींच्या खपाने लॉंग प्लेईंग (LP) रेकॉर्ड्सना मागे टाकले. सीडीमध्ये सुधारणा होऊन १९९२ मध्ये मिनी डिस्क (एमडी) आली. त्यानंतर सीडीच्याच आकारात अधिक साठा करण्याच्या क्षमतेच्या ‘डीव्हीडी’ तयार होऊ लागल्या.
शिक्षण घेताना त्यांनी ऑपेरा सिंगर होण्याचे स्वप्न बाळगले होते, त्यानुसार स्वत:चा वाद्यवृंद बनवण्याची त्यांची मनीषाही पूर्ण झाली. ‘टोकियो फीलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा’ चे ते प्रमुख होते.
२००० साली निवृत्त झाल्यानंतरही ओरिओ नोगा यांनी सोनीच्या सल्लागारपदाची धुरा अखेपर्यंत सांभाळली. एप्रिल २०११ मध्ये वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि ‘सोनी’ची ध्वजा जगभर फडकविणारे एक सक्षम व खंदे नेतृत्व लुप्त झाले.
एखाद्या उद्योगसमूहाची कीर्ती देशाच्या सीमा ओलांडते... जगभर पसरते... खरे तर त्या उद्योगाला लाभलेले कल्पक आणि दूरदृष्टीचे नेतृत्व यासाठी कारणीभूत असते हेच खरे !
-- निनाद प्रधान
श्री गजानन महाराज पट्टेकर ह्यांचे मूळ आडनाव गुप्ते. त्यांच्या पूर्वजांकडे श्री शिवरायाच्या काळात महाराष्ट्रांतील नाशिक, नगर, ठाणे ह्या सरहद्दीवरील किल्ला “पट्टा”, त्याच्या आसपासचा औंढा पट्टा या परिसराचे अधिपत्य होते. तेव्हांपासून पट्टेकर हे आडनाव प्रचलित झाले.
दादासाहेब फाळके यांनी सिनेमा कलेला जन्म दिला. त्यांचा जन्म २ जून १८९० रोजी झाला. पण त्या कलेचे संगोपन करून ती फुलवली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी! ‘बाबूराव’ करवीर नगरीतील म्हणजे त्या काळच्या कोल्हापूर संस्थानातील एक असामान्य कलावंत! बाबूरावांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री. लाकूडकाम, मूर्तिकला आणि चित्रकलेतील त्यांचे असामान्य कौशल्य पाहून कोल्हापुरातील चाहत्यांनी त्यांचे नामकरण बाबूराव पेंटर केले. ते एक चतुरस्र् कलाकार होते. कलाव्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी मुंबईत १९०८-०९च्या सुमारास फोटोग्राफीचा स्टुडिओ सुरू केला. पुढे केशवराव भोसले, बालगंधर्व यांच्या नाटकांसाठी पडदे रंगवले, इतकेच नव्हे तर त्यांनी ‘गंधर्व कंपनी’ला वेशभूषा, अलंकार, आभूषणे इत्यादींची डिझाइन्सही करून दिली. स्मारक-शिल्पे करण्यात तर त्यांचा हातखंडा होता. ज्या काळात चित्रपटनिर्मितीसाठी लागणा-या मूलभूत सुविधा, यंत्रसामग्रीही उपलब्ध नव्हती, त्या काळात बाबूरावांनी चित्रपटनिर्मितीचे साहस केले. १९१७ मध्ये कोल्हापूरला त्यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ स्थापन केली व जवळजवळ २६ चित्रपटांची निर्मिती केली. ‘सावकारी पाश’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. हा चित्रपट चित्रपटनिर्मितीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड समजण्यात येतो. झुंजारराव पवार, व्ही. शांताराम, बाबूराव पेंढारकर, अनसूयाबाई आदींनी त्यात भूमिका केल्या होत्या.
बाबूराव हे स्वत: उत्तम इंजिनीअर व संकलक होते. आपल्याला चित्रीकरणासाठी लागणारा हवा तसा कॅमेरा त्यांनी स्वत: बनवून घेतला होता. ते सिनेमाचे पोस्टर, फोटो पाहूनच आपले आगामी सिनेमाविषयीचे मत बनवणार, हे गृहीत धरून बाबूरावांनी आपल्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’च्या ‘सिंहगड’ (१९२३) या चित्रपटाची लक्षवेधक पोस्टर्स तयार करून ग्रँट रोडचे ‘नॉव्हेल्टी थिएटर’ असे काही सजवले-नटवले की, त्या काळी अर्धी मुंबई खास ‘नॉव्हेल्टी’ पाहायला तिथे लोटली होती. त्यांचे ‘सिंहगड’चे पोस्टर काळाच्या ओघात नष्ट झाले; पण त्यांच्या ‘सतिसावित्री’, ‘कल्याण खजिना’, ‘सावकारी पाश’ (सर्व मूकपट, काळ : १९२१ ते १९२७), ‘शाहीर रामजोशी’ आदी चित्रपटांची पोस्टर्स, ‘उषा’ चित्रपटांचे बुकलेट आजही पाहायला मिळते, ही सर्व चित्रे म्हणजे दुर्मीळ कलेक्टर्स आयटम्स आहेत. आपल्या स्टुडिओत चित्र रंगवण्यासाठी चित्रफलकाच्या आधारासाठी लागणारा ईझल त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने डिझाइन केला होता. त्या ईझलसमोर एका जागेवर बसून चित्रकर्त्यांला काम करता येई. त्यांनी चित्रफलक वर-खाली करण्यासाठी व कोणत्याही उंचीवर स्थिर करण्यासाठी ईझलमध्ये पायाने दाबण्याच्या पॅडलची व्यवस्था केली होती. अशी सुविधा असलेला ईझल कुठल्याही पेंटरकडे नव्हता. बाबूराव उत्तम मोटार मेकॅनिकही होते. बोलपटांचे आगमन झाल्यावर ध्वनीने, दृश्यकलेवर आक्रमण केले असे समजून बाबूराव पेंटरांनी सिनेउद्योगातून निवृत्ती पत्करली. पण त्याआधी त्यांनी व्ही. शांताराम, बाबूराव पेंढारकर, दामले, फत्तेलाल, धायबर असे शिष्योत्तम तयार केले.सतत कलेचा ध्यास आणि नावीन्याचा शोध घेण्यात बाबूरावांनी आपली उभी हयात घालविली. मा.बाबूराव पेंटर यांचे १६ जानेवारी १९५४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ :- इंटरनेट
राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. पेशावरहून मुंबईत वडिल पृथ्वीराज कपूरसोबत आलेल्या राजकपूर यांना पृथ्वीराजनी सल्ला दिला होता, की त्याने करिअरची सुरुवात खालच्या स्तरावरुन करावी, तरच तो वरिष्ट पातळी गाठू शकेल. वडिलांचा हा सल्ला मानत १७ वर्षीय राज कपूर यांनी 'रंजीत मुव्हीकॉम' आणि 'बॉम्बे टॉकीज' फिल्म प्रॉडक्शनमध्ये 'स्पॉट बॉय' म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याकाळातील नामांकित दिग्दर्शक केदार शर्मा यांच्याकडे ते 'क्लॅप बॉय' म्हणून कामाला सुरुवात लागले. एका शॉटच्यावेळी राज कपूरने क्लॅप इतक्या जोरात मारली की नायक अभिनेत्याच्या दाढीचे केस त्यात अडकले आणि त्याची नकली दाढीच निघाली. यामुळे चिडलेल्या केदार शर्मा यांनी राज कपूरच्या श्रीमुखात लगावली. त्याच दिग्दर्शक केदार शर्मा यांनी पुढे जाऊन निलकमल या सिनेमाचा नायक म्हणून राज कपूरला घेतले.
राज कपूरचे वडिल पृथ्वीरीज हे त्याकाळातील नामवंत रंगकर्मी आणि अभिनेता होते. राज कपूर यांना अभिनयाचा वारसा त्यांच्याकडूनच मिळाला. राज कपूर त्यांच्यासोबत नाटकात काम करीत असत. त्यांच्या अभिनयाची सुरुवात तेथूनच झाली होती. राज कपूर यांचे पूर्ण नाव 'रणबीर राज कपूर' असे होते. 'रणबीर' हे आता त्यांचा नातवाचे म्हणजेच ऋषि - नितू कपूर यांच्या मुलाचे नाव आहे.
राज कपूर लहानपणी पांढरी साडी नेसलेल्या एका स्त्रीवर मोहित झाले होते. त्यानंतर त्यांचे पांढऱ्यासाडीचे आकर्षण कधीच कमी झाले नाही. त्यांनी आपल्या अनेक अभिनेत्रींना (नर्गिस, पद्मिनी, वैजयंतीमाला, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापुरे, मंदाकिनी) पांढऱ्या साड्या नेसायला भाग पाडले. इतकेच नाही तर त्याच्या घरी पत्नी कृष्णा नेहमी पांढरी साडी नेसायच्या. राज कपूर यांच्या गाजलेल्या सिनेमामध्ये मेरा नाम जोकर', 'श्री ४२०','आवारा', 'बेवफा', 'आशियाना', 'अंर', 'अनहोनी', 'पापी', 'आह', 'धुन', 'बूट पॉलिश' इत्यादीचा समावेश होतो. भारत सरकारने त्यांना १९७१ साली हिंदी सिनेमातील त्यांच्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. १९८७ साली त्यांना हिंदी सिनेमातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. याशिवाय त्यांना १९६० मध्ये 'अनाडी' आणि १९६२ मध्ये 'जिस देश में गंगा बहती है' या सिनेमांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा 'फिल्म फेय़र' पुरस्कार मिळाला होता. १९६५ मध्ये 'संगम,' १९७० मध्ये 'मेरा नाम जोकर' आणि १९८३ मध्ये 'प्रेम रोग' या सिनेमांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा फिल्म 'फेय़र पुरस्कार' मिळाला होता. भारतीय सिनेमातील राज कपूर यांचे योगदान केवळ त्यांच्यापुरते मर्यादित नाही. त्यांच्या चार पिढ्यांनी हा वारसा कायम राखला आहे. कपूर परिवारात दादासाहेब फाळके पुरस्कार दोनदा आला. राज कपूर यांच्यासह हा पुरस्कार पृथ्वीरीज कपूर यांना १९७२ मध्ये मिळाला होता. त्यांनी ‘बरसात’, ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’, ‘बॉबी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेमरोग’, ‘राम तेरी गंगा मैली’ यांचे दिग्दर्शन केले होते. त्यांना पद्मभूषण पुरस्कार, चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार , फिल्म फेअर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. मा. राज कपूर यांचे २ जून १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti