(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • काव्यनायक गजानन वाटवे

    ‘वारा फोफावला’, ‘गगनी उगवला सायंतारा’ आणि ‘यमुनाकाठी ताजमहाल’ यांच्या लोकप्रियतेची कल्पना आज एकविसाव्या शतकात करता येणं अशक्य. गजानन वाटवे यांनी मराठीतील अनेक कवितांना सुंदर चाली लावून प्रथम भावगीताचा प्रकार लोकांपर्यंत नेला. आणि त्यांच्या या प्रयत्नाला लोकांनी एवढा प्रचंड प्रतिसाद दिला की, पुढे बराच काळ वाटवे म्हणजे भावगीत हे समीकरण झाले.

  • दिलीप दांडेकर

    दांडेकर, दिलीप

    मराठी उद्यमशीलता वाढविण्या-जोपासणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या कुटुंबांमध्ये दांडेकरांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. स्वदेशी चळवळीतून प्रेरणा घेऊन काकासाहेब दांडेकरांनी गिरगावातील एका छोटय़ा खोलीत ‘उंट’ छाप शाई तयार करण्याच्या व्याप सुरू केला. १९३० सालचा काळ. महिन्याकाठी ४५ ते ५० रुपये मिळत. आज त्यांनी लावलेले हे रोपटे ४०० कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या आणि बहुराष्ट्रीय पसारा असलेल्या उद्योगवृक्षाच्या रूपात फोफावले आहे.शालोपयोगी स्टेशनरी आणि रंगसाहित्याची विविध २००० उत्पादने आणि देशभरात ५० हजाराहून अधिक विक्रेत्यांचे जाळे असलेल्या आजच्या ‘कॅम्लिन’चा भार अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या नात्याने दिलीप दांडेकर सांभाळत आहेत.

    औद्योगिक संस्कृतीची उपासना करताना गुणवत्ता, प्रामाणिकता, पारदर्शकता, नम्रता अशा सुसंस्कृतपणाची जपणूक करणे, असा मेळ आजच्या उद्योगसंस्कृतीत विरळाच आढळतो. उद्योगजगताची शिखर संघटना इंडियन मर्चंट्स चेंबरच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड म्हणजे त्यांच्या उद्योजकीय कर्तबगारीबरोबरीच त्यांच्या संयमी व शांत नेतृत्वगुणाची घेतली गेलेली स्वाभाविक दखल होय. घरचा उद्योग असतानाही दिलीप दांडेकर यांनी कॅम्लिनमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून नोकरी करीत आपली कारकीर्द सुरू केली. त्यांनाही इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे महिन्याकाठी त्याच श्रेणीचे वेतन मिळत असे. कॅम्लिनच्या सर्व विभागांमध्ये अशा तऱ्हेने रीतसर प्रशिक्षण पूर्ण करून, कामाचे बारकावे शिकून मगच अधिकारपदाची सूत्रे हाती घेतली, असे ते अभिमानाने सांगतात. दिलीप दांडेकर यांनी कंपनीचा मार्केटिंग विभाग सांभाळायला घेतला आणि कॅम्लिन या ब्रॅण्डला खऱ्या अर्थाने बहर आला. नवनवीन उत्पादने, तीही बडय़ा बहुराष्ट्रीयकंपन्यांशी स्पर्धा करीत बाजारात आणणे आणि विविध उपक्रमांद्वारे ग्राहकांच्या नजरेसमोर सतत भिरभिरत राहणे ही कॅम्लिनच्या यशाची गुरुकिल्ली त्यांच्याच कल्पकतेतून पुढे आली. बालचित्रकारांपासून, व्यावसायिक चित्रकारांपर्यंत सर्वांपर्यंत पोहचता येईल अशी कमावलेली सर्वसमावेशक ब्रॅण्ड इक्विटी मग कार्यशाळा, स्पर्धा, प्रदर्शने या माध्यमातून उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेली. आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या झंझावातात स्पर्धेचे आव्हान ज्यांना पेलता आले ते टिकून राहिले. अन्यथा अनेक नावाजलेले उद्योग आणि ब्रॅण्ड्स पाल्यापाचोळ्यासारखे उडून गेले. अनेकांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांशी हातमिळवणी केली. स्पर्धेत मारले जाण्यापेक्षा मोठय़ा प्रवाहात सामील होऊन जिवंत राहण्याचा हा पर्याय कॅम्लिनपुढेही आला होता. पण खुल्या आर्थिक धोरणाने निर्माण केलेल्या स्पर्धेला आव्हान नव्हे तर संधी मानून दिलीप दांडेकर यांनी वाटचाल सुरू ठेवली. कॅम्लिनशी स्पर्धेत उतरलेल्या बडय़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्याच देशात जाऊन आव्हान निर्माण करणारा आक्रमक बाणाही त्यांनी दाखविला. आज कॅम्लिनच्या उत्पादनांची निर्यात युरोप-अमेरिकेत सातत्याने वाढत आहे, तर देशांतर्गत बाजारातही किंमत व गुणवत्तेत ती बिनतोड ठरली आहेत. चीन आणि कोरियातून २० टक्के कमी खर्चात उत्पादने घेऊन बाजारपेठेत टिकाव धरून राहण्याची किमया खुलीकरणाच्या धोरणामुळेच शक्य झाली, असे तेच सांगतात. पिढीजात उद्योगाची धुरा वाहत असताना, काळानुरूप बदल वेळच्या वेळी स्वीकारणे किती आवश्यक आहे, याचा वस्तुपाठच त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, फिक्की, इंडियन र्मचट्स चेंबर आणि अन्य अनेक उद्योगसंघटनांच्या व्यासपीठांवरून काम करताना, त्यांनी नवउद्योजकांना प्रेरक असा उद्योगशीलतेचा कानमंत्र दिला आहे. वाळवंटातही अथक प्रवास करणे हा उंटाचा गुणधर्म, आपल्या उत्पादनांसाठी उंट छाप निवडताना काकासाहेबांनी डोळ्यासमोर ठेवला होता. भरपूर मेहनत, सचोटीचा व्यवहार आणि प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगण्याची निश्चयी वृत्ती या पायावर दांडेकर कुटुंबीयांच्या प्रत्येक पिढीने हा व्यवसाय वाढवीत नेला. भविष्यातही कॅम्लिनच्या विस्ताराच्या योजना तयार आहेत, दांडेकर कुटुंबाची तिसरी पिढी राजीव, दीपक, श्रीराम व आशीष त्या साकारायला समर्थ आहे.

  • चार नटसम्राटांची कावेरी – शांता जोग

    २३ डिसेंबर १९७० रोजी संध्याकाळी, बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे नटसम्राटचा पहिला प्रयोग झाला. गोवा हिंदू असोसिएशनने हे नाटक मंचावर आणले होते. संस्थेचा सुवर्णमहोत्सवातला हा प्रयोग होता. या नाटकाचे दिग्दर्शन केले होते श्री. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी. आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका केली होती डॉ. श्रीराम लागू यांनी; तर कावेरी साकारली होती शांता जोग यांनी. वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राटमध्ये बेलवलकरांच्या भूमिकेत असलेले श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी आणि चंद्रकांत गोखले या चारही नटसम्राटांच्या बरोबर, पत्नी कावेरी हिची भूमिका शांता जोग यांनी साकारली होती.

    शांता जोग यांचे नाव टिळकनगर, चेंबूर (मुंबई) येथील एका रस्त्याला दिले गेले आहे. ’शांता जोग करंडक’ हा एका नाट्यस्पर्धेत बालनाट्याला दिला जाणारा पुरस्कार आहे. ’महाराष्ट्र नाट्यवर्धक मंडळा’ने आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धेनंतर विजयी एकांकिकेस ’शांता जोग स्मृती करंडक’ दिला जातो.

    शांता जोग यांचा जन्म २ मार्च १९२५ रोजी झाला. शांता जोग यांचे १२ सप्टेंबर १९८० रोजी अपघाती निधन झाले.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ:- इंटरनेट

  • भास्कर सोमण

    दादरच्या जडणघडणीत, विशेषतः तिथल्या सामाजिक घडणीत काही मंडळींचा वाटा आहे. त्यांत एक भागोजी कीर हे आहेत. आज भागोजी कीर असते तर त्यांचा उल्लेख ‘मॅनेजमेंट गुरू’ असा झाला असता. त्यांची पुस्तकं निघाली असती. आयआयएममध्ये त्यांना लेक्चर देण्यासाठी पाचारण केलं गेलं असतं.

  • ठुमरी क्वीन गिरिजादेवी

    धृपद, ख्याल, टप्पा, ठुमरी- दादरा, चती, कजरी, होरी, सावनी, झूला हे सर्व प्रकार उत्तम गाणाऱ्या, ज्यांना ‘ठुमरीक्वीन’ असेही म्हटले जात असे त्या विदुषी गिरिजादेवी यांचे वडील उत्तम हार्मोनियम वादक होते व ते संगीताच्या शिकवण्या घेत असत. त्यांचा जन्म ८ मे १९२९ रोजी वाराणसी येथे झाला. त्यांच्याकडून गिरिजादेवींनी गाण्याचे धडे घेतले. वयाच्या पाचव्या वर्षापासून गायक व सारंगी वादक सर्जू प्रसाद मिश्रा यांच्याकडून त्या ख्याल व टप्पा शिकल्या. गायनाबरोबर वडिलांनी त्यांना अनेक भाषा, मर्दानी खेळ हेही सर्व शिकवले. त्यामुळे त्या बहुश्रुत झाल्या, साहित्याच्या जाणकारही झाल्या.

    वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी एका चित्रपटात भूमिका केली व आपले संगीत शिक्षण त्यांनी श्री चंद मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू ठेवले. गिरिजादेवींनी १९४९ मध्ये अलाहाबाद आकाशवाणी केंद्रावर आपला पहिला संगीत कार्यक्रम केला. त्यांनी अशा प्रकारे बाहेरचे कार्यक्रम करण्यास त्यांच्या आई व आजीचा विरोध होता. तेव्हाच्या समजुतीनुसार उच्चवर्गीय स्त्रिया गाण्याचे सार्वजनिक कार्यक्रम करत नसत. गिरिजादेवींनी त्या कोणतेही खासगी संगीत कार्यक्रम करणार नाहीत हे मान्य केले.

    १९६० पर्यंत त्या आपले गुरू श्री चंद मिश्रा यांच्याकडे शिकत होत्या. १९४९ मध्ये त्यांचा अलाहाबाद रेडिओवर पहिला जाहीर कार्यक्रम झाला, त्यानंतर १९५१ मध्ये आराह, बिहार येथे पहिली जाहीर मफल झाली. १९९० च्या दरम्यान बनारस हिंदू विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. आपला सांगीतिक वारसा जपण्यासाठी संगीत अध्यापन करून अनेक नवीन विद्यार्थ्यांना तयार करताना गिरिजादेवींनी २००९ पर्यंत आपले संगीत दौरे चालू ठेवले होते. गिरीजा ‌देवी यांनी बनारसचं स्पेशल पान खाल्लं की त्यांच्या गळा खुलून जात असे. तोंडात अस्सल बनारसी पान ठेवून, त्या बनारसी पानापेक्षाही अधिक रंगतदार अशी विदुषी गिरिजादेवींची ठुमरी, चती, ख्यालही ऐकण्याचे भाग्य अनेकांना मिळाले आहे. त्या एका मुलाखतीत म्हणल्या होत्या, 'आमच्या घरी सर्वचजण पान खायचे. त्यामुळे मलाही वयाच्या दहाव्या वर्षापासून पान खायची सवय लागली. हळूहळू ती वाढली. 'इतर गायक-गायिका गाताना गळा खुलावा म्हणून गरम पाणी किंवा कॉफी घेतात, पण माझ्या या खास बनारसी मेघाई पानाच्या रसामुळे माझा गळा खुलतो.'

    गिरिजादेवी बनारस घराण्याच्या परंपरेत गातात आणि त्या परंपरेतील पूरबी अंग शैलीच्या ठुमरीचे सादरीकरण करत असत. त्यांची सुरेलता उच्च दर्जाची होती. कजरी, चैती, होरी, ख्याल गायकी, टप्पा, लोकसंगीत अशा विविधांगी व उपशास्त्रीय गायन प्रकारांवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. आवाजाचे वेगवेगळे लगाव, व्हॉइस मोडय़ुलेशन्सचा वापर यांमुळे सूक्ष्म स्वरस्थाने लागतात, ती लोकसंगीतातून आल्याने आजकाल तर फारच अभावाने ऐकण्यास मिळतात. त्यांच्या ठुमरीची लय संथ होती. ख्यालासारखी भारदस्तपणे त्यांच्या ठुमरीची बढत असे संथ बोलबनावांनंतर माफक हरकती मुक्र्या त्या घेत असत. कल्पनाविलास भरपूर, पण भावदर्शन संयमित अशी त्यांची ठुमरी सजत असे. वेधक, माफक आणि रागाला साजेसे असे रागमिश्रण त्या करत असत. उदा.- भरवी ठुमरीत त्या बिलासखानी तोडीचे मिश्रण करतात. धृपद, ख्याल, टप्पा, ठुमरी- दादरा, चती, कजरी, होरी, सावनी, झूला हे सर्व प्रकार त्या उत्तम गात असत.

    पं. सामता प्रसाद, किशन महाराज, उस्ताद अल्लारखाँ, झाकीर हुसन अशा सर्व कसलेल्या तबलजींबरोबर त्या गायल्या होत्या. सवाई गंधर्व महोत्सवातल्या त्यांच्या मैफलीं गाजल्या होत्या. वाग्गेयकार आणि मैफलींखेरीज त्यांचे इतरही काम महत्त्वाचे आहे. लोकगीतांचे अनेक प्रकार आता हळूहळू नष्ट होत चालले आहेत असे त्यांना वाटत असे, म्हणूनच अठराव्या शतकात काशीमध्ये होणाऱ्या ‘गुलाबबारी’ गान महोत्सवासारख्या काही जुन्या परंपरा त्यांनी पुनरुज्जीवित केल्या होत्या. त्यात भारतरत्न भीमसेन जोशी, विदुषी शोभा गुर्टू अशा किती तरी मोठय़ा कलाकारांनी आपले गायन पेश केले होते. आपल्या समकालीन कलाकारांविषयी गिरिजादेवी अत्यंत आदराने बोलत असत. त्यांचे स्वतचे कर्तृत्व मोठे असून त्या नम्रपणे म्हणत असत की, ठुमरी म्हटलं की तीत सिद्धेश्वरीदेवींसारखी कोणी श्रेष्ठ नाही.

    गुरू म्हणूनही त्यांची कारकीर्द भरीव आहे. कोलकात्याच्या संगीत रिसर्च अकादमीत दोनदा त्या गुरू म्हणून नियुक्त झाल्या होत्या. ठुमरीशिवाय श्रीचंद मिश्रांकडून शिकलेले गुल, बत, नक्ष, रुबाई, छंद- प्रबंध, धारू असे प्रकारही आपल्या शिष्याना शिकवले होते. आता अस्तंगत होत जाणारा गानप्रकार जागता ठेवण्याचे आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यातील गायकी, अलंकरण, भावदर्शन, लयभाव, सूक्ष्म स्वरदर्शन, आवाजाचे लगाव हा भारतीय संगीताचा अमूल्य ठेवाही जपला जात असे. आपल्या शिष्यांना त्या सांगत असत घरकाम करताना, चहा करताना, भाजी कापताना, टेबल सजवताना राग, अलंकार, पलटे, बंदिशी गुणगुणणे सतत चालू ठेवावे.त्यांचा हा वारसा त्यांच्या शिष्या शुभा जोशी, धनश्री पंडित राय, अश्विनी टिळक, शुभा मुद्गल या जपत आहेत. भारत सरकारने १९७२ मध्ये पद्मश्री पुरस्कार, १९८९ मध्ये पद्मभूषण पुरस्कार,२०१६ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. तसेच ‘द न्यू ग्रोव्ह ऑफ म्युझिक’ मध्ये त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख आहे.

    तानसेन सन्मान, गुजरात सरकारचा ताना- रीरी पुरस्कार, अनेक संस्थांकडून डी लिट्., संगीत नाटक अकादमीची फेलोशिप आणि पुरस्कार, कोलकात्याचा डोव्हर लेन म्युझिक फेस्टिव्हलचा संगीत सन्मान पुरस्कार, दिल्ली सरकारकडून लाइफ टाइम अचीव्हमेंट अॅवॉर्ड असे किती तरी पुरस्कार मिळाले होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर

    त्यांच पहिलं नाटक “जयद्रथ विडंबन” हे १९०४ मध्ये प्रकाशित झाल. हे एक संगीत नाटक होत. या नाटकातील पदे तत्कालीन टीकाकारांनी उचलून धरली. त्यांच दुसरे नाटक “दामिनी” हे १९१२ मध्ये प्रसिद्ध झाल. हे नाटक केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श या कंपनीने रंगमंचावर आणले. अशाप्रकारे हिराबाई या पहिल्या महिला नाटककार बनल्या.

  • बोरगुले अभिजीत

    टोलनाकयावरील बिलिंगचे अचूक टेलिकास्ट करण्याचे सॉफ्टवेअर कोल्हापूरच्या कागल तालुक्यात हमीदवाड्यामध्ये लहानाचे मोठे झालेल्या अभिजीत बोरगुले याने तयार केले आणि जळगावमधील राष्ट्रीय सॉफ्टवेअर प्रदर्शनात त्यास पहिला क्रमांक मिळाला. सॉफ्टवेअरच्या जोरावर त्याला आता दक्षिण कोरियात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही मिळाली आहे.

    अभिजीत बोरगुले यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला एन्टर आणि कमांड हा लेख पुढील पानावर वाचा.

    अभिजीत बोरगुले यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला एन्टर आणि कमांड हा लेख वाचा.

    borgule-abhijit-modified

  • फिल्म इंडस्ट्रीमधील जेष्ठ कलाकार ‘कॅब्रे क्विन’ हेलन

    फिल्म इंडस्ट्रीमधील जेष्ठ कलाकार 'कॅब्रे क्विन' हेलन यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३९ रोजी बर्मा मध्ये झाला. आपल्याला जरी त्या फक्त 'हेलन' म्हणून माहीत असल्या तरी त्यांचे पूर्ण नाव हेलन जयराग रिचर्डसन आहे व त्या जन्माने अॅग्लो बर्मीज. ती बॉलिवुड मध्ये त्यांच्या अनेक विवीध भुमिकांमुळे व विशेष करून नृत्याविष्कारामुळे 'हेलन' या भरपूर गाजल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांच्या वडीलांचा मृत्यू झाल्याने १९४३ मध्ये हे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले. मुंबईत स्थायिक झाल्यावर हेलनच्या आई नर्स म्हणून काम करत असे पण मिळणार्या पगारात कुटुंब चालवणे कठिण झाल्याने त्यांच्या व स्वत:च्या चरितार्थासाठी हेलन यांनी शाळा सोडून देऊन नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली. त्यांची एक कुटुंब स्नेही अभिनेत्री कुकू ही त्यावेळी बॉलिवूड मधली एक अग्रगण्य नर्तिका म्हणून ओळखली जायच्या, त्यांच्या ओळखीने हेलन यांना अतिशय लहान वयातच चित्रपटात कोरस डान्सर म्हणून काम मिळाले. हेलनचं अॅंग्लो व बर्मिस सौंदर्य हे चित्रपटातील मुख्य अभिनेत्री बनण्याच्या मार्गातला मोठा अडथळा ठरले. त्या काळी आयटम नंबरसाठी ओळखल्या जाणा-या हेलन यांनी हावडा ब्रिज या सिनेमापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

    त्यांचे सौंदर्य, शार्प लुक्स आणि चमकणारे डोळे हे मुख्यत्वे करून चित्रपटातल्या 'भारतीय नारी रोल'च्या विरूद्ध बऱ्याचदा 'हायलायटींग' म्हणून वापरले जायचे. त्यामुळे चंद्रशेखर ते अमिताभ बच्चन यांसारख्या 'लिडींग' हिरोंबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून काम करून सुद्धा हेलन यांना खरे नाव व प्रसिद्धी ही त्यांच्या अनेक 'व्हॅम्प' व 'निगेटिव्ह' रोल्सनीच दिली. हेलन या त्यांच्या काळात जबरदस्त प्रसिद्ध होत्या. रस्त्यावरून जाताना त्यांना कधीही उघड चेहऱ्याने बाहेर फिरता आले नाही. कायम काहीतरी मुखवटासदृश घालून वावरावे लागे. १९५८ च्या 'मेरा नाम चिं चिं चू' पासून ते १९७० च्या दशकातील 'ये मेरा दिल प्यार का दिवाना' पर्यंत हेलन यांनी चित्रपटसृष्टीवर 'कॅब्रे क्विन' म्हणून अधिराज्य गाजवले. १९७० च्या दशकात नवीन प्रवेश झालेल्या नट्यांनी शरिरप्रदर्शनाची तयारी दाखवली तेव्हा हेलन यांची प्रसिद्धी बरीच खालावली व त्या आर्थिक अडचणीतही सापडल्या. त्या वेळी त्यांना साथ लाभली ती प्रसिद्ध लेखक सलिम खान यांची.

    जावेद अख्तर यांच्या बरोबर लिहित असलेल्या २ चित्रपटात उदा. इमान धरम, डॉन यात त्यांनी हेलन यांना चांगली भूमिका देऊ केली. हेलनच्या गाजलेल्या सर्व गाण्यांच्या यशात गाणाऱ्या गायिकांचे ही महत्व तितकेच आहे. 'मेरा नाम चिं चिं चू' व इतर बरीच गाणी गीता दत्त यांनी, तर साठ च्या दशकात व सत्तर च्या दशकाच्या सुरवातीला आशा भोसले यांनी ही हेलनसाठी पार्श्वगायन केले. 'तिसरी मंझिल' चित्रपटातील 'ओ हसिना जुल्फोवाली जानेजहाँ...' हे गाणं 'रॉक अॅलन्ड रोल' या संगीत प्रकारावर आधारलेलं होतं आणि ते प्रचंड गाजलं. या व्यतिरिक्त 'शोले' चित्रपटातलं "मेहबूबा मेहबूबा..." 'इन्तेकाम' मधलं "आ जानेजा...पुढे त्या सलिम खान यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. सलिम खान हे आधीपासून विवाहीत होते. आजचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा त्यांचा मुलगा. आजच्या आघाडीच्या अभिनेत्र्या सुद्धा अजूनही तिची गाजलेली गाणी व त्यावरचे डान्स हे इंटरनॅशनल स्टेज शोज मध्ये सादर करतात.

    हेलन यांच्या विग पासून ते हेवा वाटावा अश्या तिच्या वॉर्डरोबपर्यंत सर्व काही अत्यंत प्रभावी होतं आणि त्याचा प्रभाव आजही चित्रपटसृष्टीवर आणि तिच्या चाहत्यांवर आहे. भारत सरकारने हेलन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • जेष्ठ गायिका माणिक वर्मा

    अमृताहुनी गोड स्वर यांचा देवा, क्षणभर उघड नयन देवा, तुझा नि माझा एक पणा, निघाले आज तिकडच्या घरी, झुलवू नको हिंदोळा अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. त्यांचा जन्म १६ मे १९२६ रोजी झाला.माणिक वर्मा यांचा जन्म पुण्याचा. सेवासदन शाळेत त्यांचे शिक्षण झाले. लहानपणी त्यांनी गाणं भरपूर ऐकलं. शास्त्रीय संगीत, भावगीतं, भजनं नेहमीच कानांवर पडत. त्यांच्या आईनंच त्यांचं गाणं जागवलं आणि मग त्यांच्या अवघ्या आयुष्याचंच सुंदर गाणं झालं.

    सुरुवातीच्या काळात गाणं सादर करताना इतरांचं अनुकरण केलं जाई. पण माणिक वर्मा यांच्या आई हिराबाई दादरकर ''यांनी त्यांचं गाणं ख-या अर्थाने विकसित केलं आणि नंतर त्या किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी संगीत शिकल्या. त्यातून मग गणेशोत्सवातून सुगम संगीताचे कार्यक्रम होऊ लागले.

    पदवी प्राप्त केल्यानंतर शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण सुरू झालं. सुरुवातीला जगन्नाथबुवा पुरोहित, नंतर इनायत खाँसाहेब, ‘भारत गायन समाज’चे अप्पासाहेब भोंपे यांसारख्या दिग्गजांकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. त्यानंतर सुरेशबाबू माने यांनी माणिकताईंचा किराणा घराण्याशी परिचय करून दिला.

    दरम्यान पुण्यासारख्या चोखंदळ रसिकांसमोर शास्त्रीय संगीत सादर करण्याची त्यांना संधी मिळाली. पुढे तर सुरतलाही त्यांनी आपली कला पेश केली. यानंतर मात्र सार्वजनिक कार्यक्रम, मैफिली यांची मालिकाच सुरू झाली. लांबलांबचे दौरे आखले जाऊ लागले आणि माणिक वर्मा हे नाव संगीतविश्वात गाजू लागले. गाण्यांच्या मैफिलींसाठी हिराबाई बडोदेकर तर चित्रपट संगीतासाठी सुधीर फडके त्यांचे आदर्श होते. किराणा घराण्याची स्वरप्रधानता, आग्रा घराण्याची तालप्रधानता त्याचबरोबर इतर घराण्यांचीही गायकी आत्मसात करून त्यांनी स्वत: ची स्वतंत्र शैली निर्माण केली.

    किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत त्यांनी मराठी भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत आणि चित्रपटगीतांना स्वरसाज चढवला. ग. दि. मांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांचे संगीत लाभलेल्या 'गीत रामायण'चे साप्ताहिक प्रक्षेपण पुणे आकाशवाणीवर सुरू झाले, तेव्हा त्यात माणिक वर्मांनी अनेक गीते गायली. ती लोकप्रियही झाली. मराठी भाषेतील अनेक गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. चेहऱ्यावर मंद स्मित असे आकर्षक व घरंदाज व्यक्तिमत्व लाभलेल्या माणिक वर्मांनी अनेक कठीण चालींची गाणी इतक्या सहजतेने गायली की घराघरातील बायका ती गाऊ लागल्या.

    'घननीळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा', हे 'ळ'चा प्रास असलेले तशाच नागमोडी वळणाचे गाणे गदिमांनी रचले व फडकेंनी स्वरबद्ध केले. ते तितक्याच लडिवाळ आवाजात माणिक वर्मा यांनी गायलेलुद्धा. भक्ति व भावगीतांमध्ये रमलेल्या मा.माणिक वर्मा यांनी एकच लावणी गायली. गदिमांची 'जाळीमंदी पिकली करवंद' ही लावणी 'पुढचं पाऊल' या चित्रपटात हंसा वाडकर यांच्या अदाकारीसह चित्रित झाली. मा.बाळ कोल्हटकरांच्या 'वाहतो ही दुर्वांची जुडी' या नाटकातील त्यांनी गायलेले 'आली दिवाळी दिवाळी' हे ह्रदयस्पर्शी गीत खूपच गाजले होत. माणिकबाईंचा विवाह फिल्म्स डिव्हिजनमधील मा.अमर वर्मा यांच्याशी झाला. लग्नाची बातमी जेव्हा संगीत जगतात पसरली, तेव्हा काहींनी माणिकताईंचे अभिनंदन केले. काहींनी नाराजी व्यक्त केली. पण या विवाहामुळे जी खळबळ माजली होती, त्यावर पु. लं.च्या एका वाक्याने फुलांची चादर पसरली.

    ‘अमर वर्मा यांच्याशी माणिक दादरकर यांचा विवाह होत आहे,’ असे पु.लं.ना जेव्हा सांगण्यात आले. तेव्हा पु.ल. पटकन म्हणाले, ‘माणिकने वर्मावर घाव घातला की..’ आणि मग माणिक दादरकर-अमर वर्मा यांच्या लग्नाच्या पत्रिका निघाल्या. त्या पत्रिकांवर त्या काळाला अनुसरून त्या काळातील समाजाची दैवते असलेले महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस यांचे फोटो होते. मा.माणिक वर्मा यांची चार रत्न म्हणजे राणी वर्मा, भारती आचरेकर वंदना गुप्ते आणि अरुणा जयप्रकाश...राणी वर्मा यांनी आईचा म्हणजे मा.माणिक वर्मा यांच्या संगीताचा वारसा पुढे चालवला तर वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर अभिनयाच्या क्षेत्रात चमक दाखवताना दिसल्या. गायिका सुनीता खाडिलकर या माणिकबाईंच्या कनिष्ठ भगिनी.

    १९७४ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव केला. माणिक वर्मा यांच्या स्वरांचा सन्मान संगीत नाटक अकादमी पुरस्कार, यांसारख्या पुरस्कारांनी करण्यात आला. माणिक वर्मा यांनी आयुष्यभर सुरेल आराधना केली आणि त्यांचा हा स्वर अमृताहूनी गोड असाच होता, आहे आणि रसिकांच्या हृदयात चिरंतन राहील. दर वर्षी रंगशारदा महोत्सव योजने अंतर्गत १९९८ सालापासून मे महिन्यात तीन दिवसांचा माणिक वर्मा संगीत महोत्सव साजरा होतो. माणिक वर्मा यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. माणिक वर्मा यांचे ‘किती रंगला खेळ’ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या स्वरांइतकेच आनंद देते. माणिक वर्मा यांचे १० नोव्हेंबर १९९६ रोजी निधन झाले.

    माणिक वर्मा यांची वेबसाईट
    http://www.manikvarma.com
    माणिक वर्मा यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=EfM1M0SW-DA
    'जाळीमंदी पिकली करवंद' ही लावणी
    https://www.youtube.com/watch?v=C4x27eCejpQ
    हसले मनी चांदणे
    https://www.youtube.com/watch?v=0cRSC3AAdHU

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • गोविंद बल्लाळ देवल

    जन्मः १३ नोव्हेंबर १८५५
    मृत्यूः १४ जून १९१६

    गोविंद बल्लाळ देवल हे आद्य मराठी नाटककार होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेली नाटके - दुर्गा (१८८६), मृच्छकटिक (१८८७), विक्रमोर्वशीय (१८८९), झुंजारराव (१८९०), शापसंभ्रम (१८९३), संगीत शारदा (१८९९), आणि संशयकल्लोळ (१९१६). पैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे.

    गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म कोकणातला, त्यांचे बालपण सांगली जिल्ह्यात गेले आणि शालेय शिक्षण बेळगाव येथे झाले आणि तेथेच ते प्रख्यात नाटककार व अभिनेते बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संपर्कात आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर (१८७९) देवल त्याच शाळेत शिक्षक म्हणून काम करीत. बेळगाव येथे असतांनाच देवल यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत जाण्यास सुरूवात केली होती. त्यांना त्या नाटक कंपनीत भूमिकाही मिळत गेल्या तसेच किर्लोस्कर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही देवल काम करू लागले. १८८५ साली किर्लोस्कर यांच्या निधनानंतरही देवल त्याच संस्थेत दिग्दर्शक म्हणून काम करीत राहिले. काही वर्षांनी (१८९४) मग देवल पुणे येथील शेतकी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. मूळ स्वभाव नाटककाराचा असल्याने देवल यांनी पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. १९१३ साली देवल बाल गंधर्व यांच्या गंधर्व नाटक मंडळीत गेले.

    गोविंद देवल बल्लाळ यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

    गोविंद बल्लाळ देवल (14-Jun-2017)

    महान मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल (1-Apr-2019)