(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • वेंकट नरसिंहराव

    भारताचे माजी पंतप्रधान, जेष्ठ काँग्रेस पक्षाचे नेते पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव यांना मरोणत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. यांचा जन्म दि. २८ जून १९२१ रोजी झाला.

    जन्म. पी.व्ही.नरसिंहराव यांचा अल्पपरिचय.

    कमी पण, ठाम बोलणारा, एकाच वेळी अर्थकारण आणि प्रशासन यात गति असणारा, बहुपेडी जातीव्यवस्था असणाऱ्या भारतारख्या देशाची नस ओळखणारा आणि जागतिक परिस्थितीचे भान असणारा नेता असे पी.व्ही.नरसिंहराव यांच्याविषयी कौतुकाने बोलले जात असे. बहुभाषाज्ञान आणि सांस्कृतिक भान असणारा शिवाय उत्तम कवी असल्याने -‘काँग्रेसचे अटलबिहारी वाजपेयी’ ही पी.व्ही.नरसिंहराव यांची प्रतिमा होती. ‘राजकारणातील संन्यासी’ असा त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्यांचे शिष्योत्तम मनमोहनसिंग यांनी अनेक वेळा केलेला आहे.

    नरसिंहराव यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील करीमनगर जिल्ह्यातील वंगारा या गावी झाला. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ अश्या तीन विद्यापीठांमध्ये झाले. त्यांचे मातृभाषा तेलुगू बरोबरच इंग्लिश, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदी भाषा या भाषाही अवगत होत्या. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. सर्वप्रथम ते १९६२ साली केंद्रीय मंत्री झाले. ते १९७१पर्यंत केंद्रात मंत्री होते. १९७१ ते १९७३ या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर परत ते केंद्रीय राजकारणात उतरले. त्यानंतर त्यांनी गृह, परराष्ट्र आणि संरक्षण यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते पराभूत झाले. पण राव हनामकोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते १९८४ आणि १९८९च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी १९९१ ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. मात्र निवडणुक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केंद्रात सरकार बनविण्याच्या स्थितीत होता. पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी २१ जून १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. नरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी मनमोहन सिंग या निष्णात अर्थतज्ञाची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळवणे गरजेचे होते. आणि त्यासाठी रुपयाचे अवमूल्यन आणि खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे जनतेत लोकप्रिय नसलेले निर्णय सरकारला घ्यावे लागले. नरसिंह राव सरकारने सत्तेवर आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दहशतवादग्रस्त पंजाब राज्यातील निवडणुका फेब्रुवारी १९९२ मध्ये घेतल्या. त्यानंतर बियंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त सरकार अधिकारारूढ झाले. त्या सरकारने १९९२ आणि १९९३ सालांदरम्यान दहशतवादाविरूद्ध कठोर पावले उचलून राज्यात शांतता निर्माण केली.

    तसेच अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी फेब्रुवारी १९९२ मध्ये परकीय गुंतवणुकीला पोषक अर्थसंकल्प सादर केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र मे, १९९२ मध्ये हर्षद मेहता आणि इतर काही शेअर दलालांनी केलेला हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीला आला. त्यानंतर उद्योगात आणि शेअर बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला. नरसिंह रावांनी राजीनामा दिला. काँग्रेसला एच्.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा लागला. सत्तेवरून पायउतार झाल्यावर रावांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तीन खटल्यांना सामोरे जावे लागले. त्यात अनिवासी भारतीय लखुभाई पाठक यांना फसविल्याबद्दल एक खटला होता. त्याचप्रमाणे जुलै, १९९३ मधील अविश्वास प्रस्तावाविरोधात मत देण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच देणे आणि सेंट किट्स प्रकरण या इतर दोन खटल्यांनाही त्यांना सामोरे जावे लागले. लखुभाई पाठक फसवणुक प्रकरणी न्यायालयाने आरोप निश्चित केल्यानंतर रावांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी सीताराम केसरी यांची अध्यक्षपदी निवडणुक झाली. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यानंतर ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले. पी.व्ही.नरसिंहराव यांचे २३ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.

    -संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • तबलावादक पं. सामताप्रसाद

    प्रसिद्ध तबलावादक पं. सामताप्रसाद हे बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक.

  • जर्मन भौतिकशास्त्रज्ञ डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट

    तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते असे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट यांचा जन्म १४ मे १६८६ रोजी झाला.

    डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट हे जरी जन्माने जर्मन असलेतरी शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य नेदरलँड्स देशात गेले.
    इटलीचे भौतिकशास्त्रज्ञ इव्हान्जेलिस्टा टोरीसेली यांनी १६४३ साली हवेचा दाब मापणाऱ्या एका साध्या यंत्राचा अर्थात वायूदाबमापकाचा शोध लावला. लवकरच असे लक्षात आले की हवामानात जसजसे बदल होतात तसतसा हवेतील दाबही चढतो व उतरतो; सहसा दाबात घट झाल्यास वादळ येण्याचा संभव असतो. वातावरणातील आर्द्रतेचे मापन करणारे यंत्र अर्थात आर्द्रतामापक १६६४ साली तयार करण्यात आले. मग १७१४ साली डॅनियल फॅरनहाइट यांनी पाऱ्याचा तापमापक शोधून काढला. या उपकरणाच्या साहाय्याने अचूक तापमान मोजणे शक्य झाले.

    आजही आपण अंगातील ताप मोजण्यासाठी वापरतो त्या तापमापीवर सेल्सियस सह फॅरनहाइट ची पट्टी असतेच पण बोलण्यात नेहमी गृहित धरले जाते ते फॅरनहाइट या एककाचे तापमान. (उदा. १०० डिग्री ताप)
    डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट यांचे १६ सप्टेंबर १७३६ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • संगीतकार गुलाम मुस्तफा दुराणी उर्फ जी.एम. दुराणी

    संगीतकार गुलाम मुस्तफा दुराणी उर्फ जी.एम. दुराणी हे लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक, अभिनेता व संगीतकार होते. त्यांचा जन्म १९१९रोजी झाला. सुधीर फडके यांचा पहिला चित्रपट हा हिंदीच होता आणि त्याचे नाव होते गोकुल. ज्याची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली होती. या चित्रपटातील जी. एम. दुराणी यांनी गायलेले ‘कहां हमारे श्याम चले’ हे अतिशय सुंदर गीत होते.

    मोहम्मद रफी, यांनी आपली गायन शैली जी.एम.दुराणी यांच्या कडून प्रेरणा घेऊन केली असे बोलले जाते.मा.जी.एम. दुराणी यांचे ९ सप्टेबर १९८८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • अरुणा इराणी

    साठ च्या दशकात गंगा जमुना या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या अरुणा इराणी यांनी तीनशेहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. त्यांचा जन्म ३ मे १९५२ रोजी झाला. १९६१ मध्ये गंगा जमुना या सिनेमात काम करणा-या अरुणा यांचे त्यावेळी वय केवळ नऊ वर्षे होते. 'जहां आरा', 'फर्ज', 'उपकार', 'आया सावन झूम के', 'कारवां' यांसारख्या हिट सिनेमांमध्ये मा.अरुणा इराणी यांनी काम केले. कारवां या सिनेमातील मा.अरुणा इराणी यांच्या कामाचे विशेष कौतुक झाले. या सिनेमातील 'चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी', आणि 'दिलबर दिल से प्यारे' ही गाणी अरुणाच्या डान्समुळे लोकप्रिय झाली. १९७२ मध्ये मा.अरुणा यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह 'बॉम्बे टू गोवा' या सिनेमात स्क्रिन शेअर केली. या सिनेमात महमूदसुद्धा होते.

    अरुणा यांचे नाव त्याकाळी महमूद यांच्यासोबत जुळले होते. त्यांनी महमूद यांच्यासह 'औलाद', 'हमजोली', 'नया जमाना', 'गरम मसाला' आणि 'दो फूल' या सिनेमांमध्ये काम केले.
    'थोड़ा रेशम लगता है', 'चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी', 'दिलबर दिल से प्यारे', 'मैं शायर तो नहीं' हे ही जी सुपरहिट गाणी आहेत, ती मा.अरुणा इराणी यांच्या डान्समुळे आणखीनच प्रसिद्ध झाली. मा.अरुणा यांनी इंडस्ट्रीत येणा-या नवोदित अभिनेता-अभिनेत्रींना खूप मदत केली. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या काही कलाकारांच्या बाबतीत अरुणा इराणी खूप ‘लकी’ ठरल्या आहेत. ज्यांनी आपल्या पदार्पणातील चित्रपटात अरुणा इराणी यांच्यासोबत काम केले ते पुढे ‘स्टार’ झाले आहेत. जीतेंद्र (फर्ज), ऋषी कपूर व डिम्पल कपाडिया (बॉबी), शबाना आझमी (फकिरा), जयाप्रदा (सरगम), कुमार गौरव (लव्हस्टोरी), संजय दत्त (रॉकी). या सर्व चित्रपटात अरुणा इराणी यांनी काम केले होते. त्यांनी 'फर्ज'मध्ये जितेंद्र, 'बॉबी'मध्ये ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया, 'सरगम'मध्ये जयाप्रदा, 'लवस्टोरी'मध्ये कुमार गौरव आणि 'रॉकी'मध्ये संजय दत्तची बरीच मदत केली. मात्र हे सर्व सुपरस्टार बनले आणि दुर्दैवाने अरुणा इराणी या सहायक अभिनेत्रीच राहिल्या. 'पेट प्यार और पाप' आणि 'बेटा' या सिनेमातील उत्कृष्ट अभिनयासाठी अरुणा यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहायक अभिनत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. आपल्या करिअरमध्ये अरुणा यांनी मराठी सिनेमांमध्येही अभिनय केला. शिवाय छोट्या पडद्यावरही त्यांचे दर्शन घडले. १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चंगूमंगू’मध्ये अरुणा इराणी यांनी काम केले होते. २००० साली 'जमाना बदल गया' या मालिकेद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठमोळे चित्रकार वासुदेव गायतोंडे

    वासुदेव गायतोंडे हे भारतातील सर्वाधिक नावाजलेले अमूर्ततावादी चित्रकार होते. अमूर्त घटनांना दृश्यरुप देण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १९२४ रोजी नागपूर येथे झाला.

    झेन फिलॉसॉफी आणि आध्यात्मिक शिकवणुकीने प्रेरित झालेले ख्यातकिर्त, मराठमोळे भारतीय वासुदेव गायतोंडे यांचा गोव्यातील एका खेडेगावात जन्म झाला. त्यांचे घरातील टोपणनाव ‘बाळ’ होते आणि मित्रांमध्ये ‘गाय’ ह्या नावाने ते प्रसिद्ध होते.

    म्हापसा शहराजवळील उस्कुई गावचे हे मूळ कुटुंब. गायतोंडे यांचे वडील बोल्टन प्रेसमध्ये सहाय्यक व्यवस्थापक होते. त्यांच्या वडिलांचे प्रेसशी संबंधित काम असूनही विज्ञानापासून कायद्यापर्यंत आणि ज्योतिषापासून आयुर्वेदापर्यंत त्यांचा दांडगा अभ्यास होता. घरातच ग्रंथसंग्रह असल्याने वासुदेवास वाचनाची गोडी लहानपणीच लागली. गायतोंडे कुटुंबातील कुणीतरी एक गावातील देवळाच्या भिंतींवर चित्रे काढायचा. ते बघून छोट्या वासुदेवास चित्र काढावेसे वाटू लागले. त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. वासुदेव गायतोंडे मुंबईत सुरुवातीला महापालिका शाळेत शिकले व नंतर गोखले हायस्कूलमधून मॅट्रिक झाले. त्यांचे चित्रे काढणे चालूच होते. थोड्याच दिवसांत ते मुंबईतील कलाप्रदर्शनांना हजेरी लावू लागले. घरून ह्या संदर्भात त्यांना प्रोत्साहन मिळाले नाही.‘वाटेल त्या’ मुलांबरोबर मिसळायला त्यांना परवानगी नसे, त्यामुळे लहानपणापासून आपसूकच ते एकटे होत गेले.

    त्यांनी १९४३ मध्ये एका खाजगी आर्ट स्कूलमध्ये नाव दाखल केले व त्या तयारीमुळे १९४५ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना थेट तिसर्याख वर्षात प्रवेश मिळाला. जे.जे.च्या भव्य परिसराचा त्यांच्यावर चांगला परिणाम झाला. जगन्नाथ अहिवासी हे त्यांना रचनाचित्र शिकवत. अडूरकर पेन्सिल ड्रॉइंग आणि भोंसुले मास्तर जलरंगचित्रण व व्यक्तिचित्र शिकवत. अहिवासी आणि भोंसुले मास्तरांचे गायतोंडे हे लाडके विद्यार्थी होते.

    आर्ट स्कूलच्या काळातच गायतोंडे यांनी बौद्ध वाङ्मय, जपानी चित्रकला, मृद्पात्रे (पॉटरी), कविता यांचाही अभ्यास या काळात केला. निसर्गदत्त महाराज, रमण महर्षी, सोयरोबानाथ अंबिये, संतवाङ्मय, कला, साहित्य, तत्त्वज्ञान असे विविध विषय त्यांच्या वाचनात होते. त्या काळात जे.जे.च्या पटांगणात दरवर्षी जे. कृष्णमूर्ती हे तत्त्वज्ञ आपली प्रवचने देण्यास येत. ह्या प्रवचनांचा फार मोठा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला.

    गायतोंडे यांना १९४८ मध्ये जे.जे.मधून पदविका मिळाली व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे फेलोशिपही मिळाली. त्यांनी १९४९/५० या काळात जे.जे.मध्ये साहाय्यक शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी केलेली ही एकमेव नोकरी होती. काही मतभेद होऊन त्यांनी १९५० मध्ये ही नोकरी सोडली व पूर्णवेळ चित्रकार म्हणून जगण्यास सुरुवात केली.

    हुसेन, सूझा, रझा, आरा, गाडे आणि बाकरे ह्यांनी १९४८ मध्ये ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’ स्थापन केला. नंतर गायतोंडे त्यात सहभागी झाले. ह्या ग्रूपतर्फे १९४९ मध्ये भरवलेल्या समूह प्रदर्शनात त्यांचा सहभाग होता. त्यानंतर काही चित्रकारांनी ‘बॉम्बे ग्रूप’ स्थापन केला, त्यातही गायतोंडे होते. ह्या ग्रूपचीही काही प्रदर्शने झाली. ह्या साऱ्यांत होणाऱ्या कलाविषयक चर्चा, वादविवादांत गायतोंड्यांचा सक्रिय सहभाग असे आणि त्यांच्या मताला सहकलाकारांमध्ये मान होता.

    मुंबईत १९५७/५८ मध्ये वॉर्डन रोडवर भुलाभाई देसाई मेमोरिअल इन्स्टिट्यूट सुरू झाली. संगीत, चित्रकला, नाट्यक्षेत्रातील कलाकारांच्या कलासाधनेसाठी इथे उत्तम वातावरण होते आणि कलावंतांना तिथे अतिशय स्वस्तात स्टूडिओ मिळण्याची सोय होती. गायतोंडे यांनी तिथे काम करण्यास सुरुवात केली. ह्या इन्स्टिट्यूटसमोरच्या बाकावर बसून समुद्राकडे पाहत गायतोंडे तासन्तास चिंतन करत. नाट्य, नृत्य, चित्र अशा सर्व कलांमध्ये काहीतरी नवीन करू पाहणार्याह कलाकारांचा इथे राबता असे आणि परस्परांत संवादही असे. गायतोंडे इथेच अल्काझी, विजया मेहता इत्यादींच्या संपर्कात आले.

    १९६४ साली मिळालेल्या रॉकफेलर शिष्यवृत्तीद्वारे गायतोंडे न्यूयॉर्कला गेले. तिथे त्यांनी अमेरिकेतील विविध चित्रशैलींचा अभ्यास केला. त्यानंतर ते जपानला गेले. जपानमध्ये त्यांच्यावर झेन तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडला.१९७२ मध्ये ते भारतात परतले आणि शेवटपर्यंत त्यांनी दिल्लीत वास्तव्य केले.

    दिल्लीत १९७४ च्या आसपास त्यांची ओळख ममता सरन ह्या चित्रकर्तीशी झाली. त्यांची मैत्री आणि सोबत गायतोंडेंना अखेरपर्यंत लाभली. ममता यांनी त्यांची शेवटपर्यंत काळजी घेतली. ते १९९७ ते २००१ ह्या काळात ममताबरोबर गुडगाव येथे एकत्र राहिले. अॅरबस्ट्रॅक्ट आर्ट म्हणजेच अमूर्त कला त्यांनी आत्मसाद केली होती आणि त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. कलाविश्वात गायतोंडे या नावाचं तयार झालेलं गूढ पाहता त्यांच्या चित्रांना नेहमीच चढ्या भावानं बोली लागते. वर्ष २०१५ मध्ये क्रिस्टी या सुप्रसिद्ध संस्थेने मुंबईत वासुदेव गायतोंडे यांच्या ऑईल पेंटिंगचा लिलाव केला होता.मार्च २०२१ मध्ये चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रांनी पुन्हा एकदा रेकॉर्ड बनवले.१९६१ साली बनविलेले त्यांची एक निळ्या रंगाची ऑईल पेंटिंग्स ३९.९८ कोटी रुपये म्हणजेच ५५ लाख अमेरिकन डॉलर्सना विकली गेली.

    हे कोणत्याही भारतीय कलाकाराच्या आतापर्यंतच्या सर्वात महागड्या चित्रांपैकी एक ठरले आहे. वासुदेव गायतोंडे यांनी स्वत: चा विक्रम मोडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये गायतोंडे यांनी १९७४ मध्ये तयार केलेली ऑईल पेंटिंग सुमारे ३६ कोटींमध्ये विकली गेली होती. जेव्हा जग कोरोना साथीच्या विरुद्ध लढा देत होते, तेव्हा ही किमया त्यांच्या चित्रानं साधली होती.

    सतीश नाईक यांनी 'गायतोंडे' हा मराठीत ग्रंथ संपादित केला आहे. सतीश नाईक यांनी संपादित केलेल्या 'गायतोंडे' या ग्रंथाचे जानेवारी २०१६ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. गायतोंडे यांच्यावरील एक इंग्लिश पुस्तक 'सोनाटा ऑफ सॉलिट्युड: वासुदेव संतू गायतोंडे या नावाने आहे. दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना दरवर्षी ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ राज्य शासन प्रदान करते. वासुदेव गायतोंडे यांचे १० ऑगस्ट २००१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ सतीश नाईक/ नितीन दादरावाला/दीपक घारे

  • त्यांच्या प्रतिभेला सलाम !!

    १९७६ साली कराडला साहित्य संमेलन झाले त्याचे मावळते अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे आणि उगवत्या अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत. संध्याकाळी एक कवी संमेलन होतं आणि सूत्रसंचालक होते पु.ल. आणि त्यामुळेच, त्या कवी संमेलनात एक खेळीमेळीचं वातावरण होतं.

    त्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतले एक मोठे कवी साहीर लुधियानवी मंचावर आले. ते म्हणाले- "अभी मैं जो हिंदी कविता सुनाने जा रहा हुँ उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताए।"

    पु.ल. नी समोरच बसलेल्या माडगूळकरांना वर बोलावलं. आणि म्हणाले, "साहीरजींनी आत्ता काय सांगितलं ते तर तुम्ही ऐकलंच, पण ह्या मराठी रूपांतरात माझी एक अट आहे. ह्या रूपांतरात एक असा मराठी शब्द हवा ज्याला भारतातल्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही". असा विश्वास होता पुलंचा मित्रावर.

    मग साहीरजींनी तो शेर ऐकवला -

    "एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,
    एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,
    रातभर रहिओ, सबेरे चले जइयो जी।
    सेजिओ पे दिया जलाना हराम हैं,
    खुशियों में, जलनेवालों का क्या काम है?
    अँधेरे में रेह के जड़ाओ, मजा पियो जी,
    रातभर रहिओ सबेरे चले जइयो जी।"

    आणि साहीरजींचा शेवटचा "जी" पूर्ण होईपर्यंत माडगूळकरांचं पूर्ण मराठी रुपांतर झालं होतं.

    "एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,
    एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी
    ओ रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी
    सेजेशी समई मी लावू कशाला?
    जुळत्या जीवालागी जळती कशाला?
    अंधाऱ्या राती इष्काची मजा घ्यावी जी,
    रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी".

    ह्यातील 'झुंझुरता' ह्या शब्दाला इतर कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही… ह्याला म्हणतात प्रतिभा.

    आणि हा किस्सा इथेच संपत नाही. ह्याच्याही वरची कडी म्हणजे पु.ल. नी त्याचवेळी तिथे पेटी मागवली, तिथल्या तिथे ह्या कवितेला चाल लावली आणि तिथल्यातिथे ती गाउन दाखवली.

  • ज्येष्ठ गायक पं.जगन्नाथबुवा पुरोहित

    ज्येष्ठ गायक पं.जगन्नाथबुवा पुरोहित हे आग्रा घराण्याचे गवई, बंदिशकार, तबलावादक. पं.जगन्नाथबुवा पुरोहित हे 'गुणीदास' या टोपणनावाने बंदिशी करत असत.

    पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांचा जन्म १२ मार्च १९०४ रोजी झाला.

    पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांचे उस्ताद विलायत हुसेन खान हे यांचे गुरू. पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या शिष्यांच्या मध्ये राम मराठे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर, जितेन्द्र अभिषेकी, सी.आर्.व्यास, यशवंतबुवा जोशी, वसंतराव कुलकर्णी, लीलाताई करंबेळकर, मनोरमा वागळे, मोहनतारा अजिंक्य, जी.एन्.जोशी, मन्ना डे, आणि तबल्यातील भाई गायतोंडे, नाना मुळे! अशी अनेक दिग्गजाची नावे होती.

    पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या बद्दला पु.ल देशपांडे म्हणत असत, या साऱ्यांच्या गाण्यातून बुवा सुगंधासारखे भेटतात आणि तो सुगंध फक्त जाणकारांनाच येतो!

    पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांनी राम मराठे यांना शिकवण्याचा एक किस्सा तबला वादक मा. मोहनराव कर्वे यांना सांगितला होता तो होता,

    एके दिवशी मोहनराव रामभाऊंबरोबर बुवांकडे शिकवणीला गेले. दुपारी अडीच तीनचा सुमार. बुवांनी मारव्यातील विलंबित चीज सुरु केली : माई मोहे काहुही कहाॅं परी

    ताल आडाचौताल. ठेक्याला बसले मोहनराव कर्वे.

    बुवांनी एक उपज काढायची, रामभाऊंनी ती पुरी करायची आणि समेला यायचं. लगेच बुवांनी पुढची उपज काढायची आणि रामभाऊंनी ती पुरी करायची.

    हे असं अडीच तीन तास विनाखंड चाललं. तीच चीज, तोच ताल आणि तीच लय!

    शेवटी बुवांनी थांबवलं. बुवा उठले, मोहनरावांचे कौतुक केले आणि दमला असशील म्हणत स्वतः खांदे रगडून दिले! खाऊ घातलं आणि आज्ञा केली, राम, जा, याला पुण्याच्या गाडीत नीट बसवून दे आणि परत ये!

    पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांचे निधन १९६८ साली झाले.

    श्री.संजीव, वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांचे गायन.

    https://www.youtube.com/shared?ci=wO2htNMSaQI

    https://www.youtube.com/shared?ci=4v9Orf4pAUU

  • सुनील खांडबहाले

    पारंपरिक पुस्तकी शब्दकोशाच्या मर्यादा तंत्रज्ञानाच्या आधारे होता होईतो कमी करायच्या आणि त्याचा लाभ अधिकाधिक जणांपर्यंत पोहचवायचा संकल्प नाशिकच्या सुनील खांडबहाले याने वयाच्या अवघ्या तिशीतच पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे जगात प्रथमच कॉम्प्युटरवर ‘मराठी डिक्शनरी’, पहिली ‘ऑनलाइन मराठी डिक्शनरी’ व आता पुन्हा एकदा सर्वप्रथम भारतीय भाषेतील ‘मोबाइल डिक्शनरी’ प्रत्यक्षात आणणारा सुनील आजही आपल्या गावातल्या मातीशी निष्ठेने इमान राखून आहे.

    आपल्या अभिनव आणि वैविध्यपूर्ण उपक्रमांमुळे आजमितीस दररोज लाखभराहून अधिक जणांना आपल्या वेबसाइटकडे आकर्षित करणाऱ्या सुनीलची पाश्र्वभूमी अत्यंत सामान्य.

    नाशिकजवळच्या महिरावणी या खेडेगावात टिपिकल जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या सुनीलने पहिल्यांदा नाशिक पाहिले ते दहावीच्या परीक्षेसाठी आणि प्रथम मुंबई पाहिली तीदेखील एकविसाव्या शतकातच. जात्याच बुद्धिमान असणारा सुनील कोश वाङ्मयासारख्या अत्यंत किचकट क्षेत्राशी बांधला गेला तो जीवनाची गरज म्हणून. दहावीला चांगले मार्क मिळविल्यावर त्याने अहमदनगरच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये इन्स्ट्रमेंटल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला, पण खेडय़ातल्या मराठी शाळेत झालेल्या शिक्षणामुळे त्याला तेथे माध्यमाची आणि भाषेची चांगलीच अडचण जाणवू लागली. अगोदरच मराठीऐवजी इंग्रजी माध्यम आणि त्यातही संपूर्ण अपरिचित अशा तांत्रिक शब्दांचा भरणा. कुणाला विचारण्याची सोय नाही.

    अशा वातावरणात सगळा अभ्यास त्याच्या डोक्यावरून जाऊ लागला. त्याने मग वर्गात न समजलेले इंग्रजी शब्द वहीत उतरवून घ्यायचे आणि रूमवर आल्यावर त्याचे ‘डिक्शनरी मिनिंग’ जाणून घ्यायचे, असा परिपाठ सुरू केला. त्यामुळे त्याची ‘व्होकॅबिलिटी’ समृद्ध होऊ लागली आणि प्रथम वर्षांला ६० पैकी जे केवळ चौघे उत्तीर्ण झाले, त्यातही अव्वल म्हणून स्थान पटकावत त्याने बाजी मारली. तीन वर्षांंत त्याच्याकडे तब्बल २० हजार शब्द जमले. त्याचा आपल्याला फायदा झाला, तसाच हजारो-लाखो तरुणांनाही तो व्हावा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याच्या वापरात सुलभता यावी, या उद्देशाने सुनीलने याच क्षेत्रात काम करायचे ठरवले. अनेकांची मदत व मार्गदर्शन घेत अत्यंत चिकाटीने त्याने वर उल्लेखलेले एक-एक उपक्रम अथक मेहनतीने पूर्ण केले.

    सुनीलच्या घरची पाश्र्वभूमी शिक्षणाची अजिबातच नाही. वडील केवळ चौथीपर्यंत शिकलेले, तर आई निरक्षरच. सुनील आणि त्याच्या भावांनी आईला चांगली अक्षर ओळख करून दिल्याने ती वाचू लागली आहे. नाशिकच्या महात्मानगर परिसरात त्याने सध्या आपले कार्यालय सुरू केले असले तरी आजदेखील त्याचे वास्तव्य आहे ते महिरावणी गावातील शेतातल्या घरातच. त्यामुळेच त्याच्या सामाजिक जाणिवा अजूनही घट्ट आहेत. तो गावाकडच्या मुलांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. हजारो रुपये फी भरण्याची ऐपत नसल्याने संगणकाच्या अधिकृत अभ्यासक्रमापासून आपल्याला वंचित राहावे लागले, तसे इतरांना लागू नये, ही त्याची मनस्वी इच्छा आहे. त्यातूनच त्याने ‘मराठी मोबाइल डिक्शनरी’ विकसित केल्यावर आपल्या गावातील मुलांवर एक प्रयोग केला. अर्धवट शाळा सोडावी लागलेल्या वा शिक्षण थांबवून शेतीकडे वळलेल्या काही तरुणांच्या मोबाइलवर त्याने ही डिक्शनरी लोड करून दिली व महिन्याभराने त्यांच्या इंग्रजी शब्दसंग्रहाची चाचणी केली. यामध्ये त्याला सकारात्मक प्रतिसाद आला आणि मग हुरूप वाढवून त्याने हा उपक्रम तडीस नेला. आता अन्य भारतीय भाषांवरही त्याचे अशाच स्वरूपाचे काम सुरू आहे.

    शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख अजय बोरसे यांनी सुनीलच्या ‘मराठी मोबाइल डिक्शनरी’चा उपक्रम उचलून धरत तरुणांसाठी अशा पाच हजार डिक्शनरी पुरस्कृत केल्या आहेत. त्याला अर्थातच उत्तम प्रतिसाद मिळतोय, पण शासनस्तरावरून मात्र या बाबतीत अजूनही ‘सारे कसे शांत शांत’ अशीच स्थिती आहे.

  • हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा

    १९९४ मध्ये महेश भट्ट यांच्या ‘स्वाभिमान’ मालिकेतील ‘त्यागी’ या पहिल्याच भूमिकेतून सर्वांचे लक्ष वेधणारा अभिनेता आशुतोष राणा पुढे ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’सारख्या चित्रपटांतून दज्रेदार आणि प्रभावी खलनायकाच्या भूमिकेत दमदारपणे उभा राहिला. दुश्मन सिनेमातील दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.