(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • मराठी चित्रपटसृष्टीचे मामा अशोक सराफ

    मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म ४ जुन १९४७ रोजी मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले.त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’मधील इरसाल पोलीस, ‘राम राम गंगाराम’मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. दादा कोंडकेंबरोबर पांडू हवालदार , कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा केली. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, दे दणा दण यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन’ व ‘एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर’पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले. आपली पत्नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून ‘टन टना टन’ (मराठी) व काही हिंदी मालिका बनवल्या. हम पांच या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी ‘दामाद’ या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले.

    ‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘येस बॉस’, ‘जोडी नं.१’ हे अशोक सराफ अभिनीत काही हिंदी उल्लेखनीय चित्रपट केलेले आहे. अशोक सराफ यांची खरी ओळख एक विनोदी अभिनेता म्हणून असली तरी मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या इतका हरहुन्नारी भूमिका साकारणारा कलाकार दुर्मिळच आहे. क्रूरकर्मा खलनायक ते उत्तम बंडू तुपे यांच्या भस्मवर आधारित चित्रपटातील भस्म्याच्या भूमिकेबरोबरच त्यांच्या विनोदी भूमिकाही प्रचंड लोकप्रिय झालेल्या आहेत. अशोक सराफ-दादा कोंडके, अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ-सचिन, अशोक सराफ-महेश कोठारे या जोड्या मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेलेल्या आहेत. अशोक सराफ यांच्या नावावर प्रेक्षक आजही चित्रपट पाहायला जातात कारण प्रेक्षकांना पूर्णपणे ठाऊक असते की त्यांचा चित्रपट पैसे वसूल करून देणारा असतो. अशोक सराफ यांना “अशोकमामा’ या नावानेच अनेकजण ओळखतात, संबोधतात. मात्र, हे नाव कसे आणि कुणी दिले, हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. हे नाव आपल्याला कसे पडले, याचा उलगडा खुद्द अशोक सराफ यांनीच केला. अशोकमामाचे बारसे कसे झाले, याविषयीचा किस्सा सांगताना, अशोक सराफ म्हणतात, “काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाच्या कॅमेरामनबरोबर त्यांची मुलगी येत असे. सेटवर आली की ती विचारत असे, हे कोण? त्या कॅमेरामनने सांगितले, हे अशोक सराफ.. पण त्यांना तू अशोकमामा म्हणायचे. आणि झालं, तिने अशोकमामा म्हणायला सुरवात केली आणि त्यानंतर काही दिवसातच सेटवर जो कोणी येईल, ते सर्वजण मला अशोकमामा म्हणूनच हाक मारू लागले. अशोकमामाचे नामकरण अशा पद्धतीने झाल्याचा किस्सा खुद्द अशोक सराफ यांनीच सांगितला. आता एखाद्या सुंदर मुलीने मामा म्हणून हाक मारल्यावर तितकाच हिरमोडही होतो, अशी मिश्किाल टिप्पणी ते लगेच करुन टाकतात. मला थेट “अशोक’ अशी हाक मारणारे तसे कमीच. “अशोकजी’ असे कुणी म्हटले, तर ते माझी मलाच झेपत नाही. तर अशोक सर वगैरे माझ्या प्रकृतीतच बसत नाही. सेटवर किंवा इतरत्र गर्दीच्या ठिकाणी चाहत्यांमधून येणाऱ्या “अशोकमामा’, या हाकेतला गोडवाच आपल्याला अधिक भावतो. मा.अशोक सराफ यांना अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळाले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    अशोक सराफ याची कारकीर्द
    मराठी चित्रपट.
    आई नं. वन , आत्मविश्वास, नवरी मिळे नवऱ्याला , गंमत जंमत , भुताचा भाऊ , माझा पती करोडपती, एक उनाड दिवस ,अफलातून , गोंधळात गोंधळ, अशी ही बनवाबनवी, एक डाव भुताचा , सगळीकडे बोंबाबोंब , आयत्या घरात घरोबा , कुंकू ,बळीराजाचं राज्य येऊ दे , घनचक्कर , तू सुखकर्ता ,नवरा माझा नवसाचा , वजीर, अनपेक्षित, एकापेक्षा एक, चंगू मंगू , शुभमंगल सावधान, नवरा माझा ब्रम्हचारी ,आमच्या सारखे आम्हीच ,बाळाचे बाप ब्रम्हचारी, प्रेम करू या खुल्लम खुल्ला ,गोष्ट धमाल नाम्याची, पांडू हवालदार, राम राम गंगाराम,अरे संसार संसार , कळत नकळत, आपली माणसं, धूमधडाका ,एक डाव धोबीपछाड,आयडियाची कल्पना.

    हिंदी चित्रपट.
    कुछ तुम कहो कुछ हम कहें , बेटी नं. वन , कोयला , गुप्त, संगदिल सनम, जोरू का गुलाम, खूबसूरत, येस बॉस, करण अर्जुन ,सिंघम .
    नाटके.
    हमीदाबाईची कोठी,अनधिकृत, मनोमिलन, हे राम कार्डिओग्राम, डार्लिंग डार्लिंग, सारखं छातीत दुखतंय दूरदर्शन मालिका
    टन टना टन (ई.टीव्ही मराठी) , हम पांच (झी वाहिनी), डोन्ट वरी, हो जाएगा (हिंदी), छोटी बडी बाते.

  • अभिनेता सुनील बर्वे

    मराठी-हिंदी-गुजराती नाटक, टीवी मालिका व चित्रपट अशी अभिनयाची सर्वच क्षेत्रात आपल्या प्रसन्न अभिनयाने वावर करणारे सुनील बर्वे मागील २५ पेक्षा अधिक वर्ष मराठी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९६६ रोजी झाला.

    सुनील बर्वे मुंबईतल्या पाटकर कॉलेजातून रसायनशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्‌सी. झाले. त्यांनी यू.एस. व्हिटॅमिन्स या कंपनीत एक महिना नोकरी केली, पण तिथे त्यांचे मन रमले नाही. आधीपासूनच ते तबल्याच्या आणि गाण्याच्या क्लासला जात असत. ते सात वर्षे तबला शिकले. गांधर्व महाविद्यालयाची मध्यमा ही संगीताची परीक्षा ते उत्तीर्ण झाले आहेत. हे सर्व करतानाच त्यांचा संबंध थिएटर ग्रुपशी झाला. त्यातूनच त्यांचा विनय आपटे यांच्या अफलातून या संगीत नाटकात शिरकाव झाला. त्यांना एका गाणाऱ्या पात्राची भूमिका मिळाली होती. या पहिल्या नाटकात सुनीलसोबत महेश मांजरेकर, अतुल परचुरे, सचिन खेडेकर यांनी काम केले होते.

    त्यानंतर सुनील बर्वे यांनी "मोरूची मावशी", "कशी मी राहू तशीच", "वन रूम किचन", "चार चौघी", "म्हणून मी तुला कुठे नेत नाही", "ह्यांना जमतं तरी कसं", "असेच आम्ही सारे", "हेलो इन्स्पेक्टर", "श्री तशी सौ", "बायकोच्या नकळतच", "हिच तर प्रेमाची गंमत आहे", "मासिबा" आणि "ऑल द बेस्ट" अशा मराठी, गुजराती आणि इंग्लिश नाटकांमधून भूमिका केल्या. "सुबक" या संस्थेची स्थापना करून द्वारे ते नाट्य निर्मितीच्या क्षेत्रात उतरले. जुनी आणि गाजलेली काही निवडक मराठी नाटके पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर सादर करण्याचा आगळा प्रयोग अभिनेते सुनील बर्वे यांनी पाच वर्षांपूर्वी ‘सुबक’ या संस्थेतर्फे प्रत्यक्षात आणला.

    ‘हर्बेरियम’ या उपक्रमाअंतर्गत मराठी रंगभूमीवर नव्याने सादर झालेल्या या नाटकांना रसिक प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यांनी या कल्पनेचे स्वागत केले. या नाटकांमुळे नव्या पिढीला जुन्या नाटकांविषयी माहिती झाली तर जुन्या पिढीतील प्रेक्षकांसाठी ते ‘स्मरणरंजन’ ठरले. ‘हर्बेरियम’च्या पहिल्या पर्वात ‘सूर्याची पिल्ले’, ‘लहानपण देगा देवा’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘आंधळं दळतंय’ आणि ‘झोपी गेलेला जागा झाला’ ही वेगवेगळ्या शैलीतील जुनी नाटके नव्याने व नव्या कलाकारांच्या संचात सादर झाली होती.

    सचिन पिळगावकर दिग्दर्शित ''आत्मविश्वास" हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर त्यांनी "सुगंध", "तू तिथे मी", "पाश", "आहुती", "लपंडाव", "जमल हो जमल", "आई", "तन्नू कि टिना", "निदान", "अस्तित्व", "दिवसेंदिवस", "आनंदाचे झाड", "सुर राहु दे", "गोजिरी", "तूच खरी घरची लक्ष्मी", "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं" "प्राइम टाइम" आणि "हायवे" या चित्रपटात अभिनय केला आहे. नाटक आणि चित्रपटांसोबतच अनेक मराठी, हिंदी आणि गुजराती मलिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे, या मलिकांमध्ये ''कुंकू", "कळत नकळत", "असंभव", "अभी तो मै जवान हु", "अधांतरी", "अवंती", "अवंतिका", "आवाज", "बोलाची कढी", "चाळ नावाची वाचाळ वस्ती", "छैल छबीला", "चतुराई", "गोष्ट एका आनंदची", "हे सारे संचीताचे", "इमारत", "जावई शोध", "झोका", "झुट्न जरीवाला", "ज्योति", "कर्तव्य", "कौन अपना कौन पराया", "कोई सुरत नजर नही आती", "कोरा कागज", "नायक", "प्रपंच", "प्रो. प्यारेलाल", "रिमझीम", "सप्तर्शी", "श्रीयुत गंगाधर टिपरे", "स्वयंम", "थरार", "त्रेधा तिरपिट" आणि "वाळवाचा पाऊस" या मालिकांचा समावेश आहे.
    ’तो हा मी सुनील बर्वे’ या एफ.एम. रेडियो ’सुरभी’वरती ते रेडियो जॅकी म्हणून सुद्धा ते कार्यरत होते.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक विश्राम बेडेकर

    नाटककार, कादंबरीकार, चित्रपट दिग्दर्शक म्हणून आजही ज्यांचे नांव आदराने, सन्मानाने घेतले जाते, त्या विश्राम बेडेकरांचे हे वयाच्या पंचविसाव्या वर्षी लेखनास प्रारंभ केला आणि नव्वदाव्या वर्षापर्यंत ते लिहीत राहिले असले तरी त्यांचे लेखन मोजकेच आहे. चित्रपट क्षेत्रात कारकीर्द सुरु करताना देखील अनेक अपयशांना सामोरे जावे लागले. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९०६ रोजी झाला. तरीही त्यांनी दिग्दर्शित केलेले सगळेच चित्रपट यशस्वी झाले आहेत. चित्रपट तंत्राच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले आणि आल्याआल्याच त्यांच्या हातून 'रणांगण' सारख्या उत्कृष्ट कलाकृतीची निर्मिती झाली. रणांगण नंतर त्यांनी केलेली अनेक नाटय रुपांतरे रंगभूमीवर आली. मात्र 'वाजे पाऊल आपुले' आणि 'टिळक आणि आगरकर' या रंगभूमीवर गाजलेल्या त्यांच्या अजोड कलाकृती. चरितार्थासाठी नाटक आणि चित्रपट हे क्षेत्र निवडले अणि तेथेही ते पटकथा लेखक तर कधी दिग्दर्शक म्हणून यशस्वी ठरले. माझं बाळ, वासुदेव बळवंत, चूल आणि मूल या श्रेष्ठ पटकथा त्यांनी दिल्या. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' ही त्यांची एक सर्वोत्तम कथा.

    अर्थगर्भ आणि अजोड कलाकृती देऊन विश्राम बेडेकरांनी एक आदर्श उभा केला आहे. मराठी रंगभूमीवरील विख्यात नट चिंतामणराव कोल्हटकर व श्रेष्ठ गायक नट मास्टर दीनानाथ हयांनी सुरू केलेल्या ‘बलवंत पिक्चर्स’ ह्या संस्थेच्या कृष्णार्जुन युद्ध ह्या चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणून बेडेकर प्रथम चित्रपटव्यवसायात आले. तत्पूर्वी मास्टर दीनानाथांच्या ‘बलवत संगीत नाटक मंडळी’साठी ब्रह्मकुमारी हे नाटक त्यांनी लिहिले होते. ह्या नाटकातील ‘मी लोपले मधुमीलनात या’ हे पद अत्यंत लोकप्रिय ठरले. बलवंत पिक्चर्स ही संस्था बंद झाल्यानंतर, १९३५ साली बेडेकरांनी कृष्णार्जुन युध्दाचे आणखी एक सहदिग्दर्शक वा. ना. भट ह्यांच्या सहकार्याने ‘भट-बेडेकर प्रॉडक्शन्स’ ही चित्रसंस्था स्थापन केली. राम गणेश गडकरी आणि चि.वि. जोशी ह्यांच्या अनुक्रमे ‘ठकीचे लग्न ‘आणि ‘ सत्याचे प्रयोग’ ह्या विनोदी कथांवर त्यांनी बोलपट तयार केले. मराठी चित्रसृष्टीतील हे पहिले विनोदी बोलपट होत. त्यानंतर लक्ष्मीचे खेळ हा आणखी एक विनोदी बोलपट त्यांनी निर्माण केला. प्रभातच्या शेजारी ह्या गाजलेल्या चित्रपटाची पटकथा व संवादत्यांनीच लिहिले होते. तसेच रामशास्त्री बोलपटाचे निम्म्यापेक्षा अधिक भागाचे दिग्दर्शन व लेखनही त्यांनी केले.

    १९४२ साली ‘न्यू हसं पिक्चर्स’ चा पहिला पाळणा हा तुफान विनोदी बोलपट त्यांनी दिग्दर्शित केला. ह्या चित्रपटाच्या कथा संवादांचेही लेखन केले. राजकमलच्या अमर भूपाळीची (१९५१) कथाही त्यांचीच. फिल्म डिव्हिजनसाठी लोकमान्य टिळक व विनोबा भावे ह्यांच्यावरील अनुबोधपटही त्यांनी तयार केले. चित्रपटमाध्यमाची अत्यंत मार्मिक जाण त्यांनी लिहिलेल्या नेमक्या, नीटस संवादातून जाणवते. १९५१ नंतर बेडेकर चित्रपटव्यवसायात फारसे वावरले नाहीत. १९५१ ते १९८१ह्या तीन दशकांत त्यांनी फक्त दिग्दर्शन केले आणि तेही अवघ्या सहा चित्रपटांचे. त्यात वासुदेव बळवंत आणि रुस्तुम सोहराब यांचा समावेश होतो. याच काळात त्यांनी प्रसिद्ध क्रांतिकारक भगतसिंग ह्यांच्यावरील चित्रपटाचे व ‘प्रभात’ साठी लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील चित्रपटाचे बरेचसे काम केले पण ते प्रयत्न अपूर्ण राहिले. ह्या काळात ते पुन्हा नाट्यलेखनाकडे वळले. त्यांनी नरो वा कुंजरो वा (१९६१),वाजे पाऊले आपुले (१९६७) टिळक आणि आगरकर(१९८०) ही नाटके लिहिली. तथापि रणांगण (१९३९) ह्या कांदबरीमुळे बेडेकरांची वाङ्मयीन कीर्ती अनेक अर्थानी मराठीत अपूर्व ठरली.

    १९३८ साली बेडेकरांना सिनेमॅटोग्राफीच्या अभ्यासार्थ इंग्लंडला जाण्यासाठी एक निमसरकारी शिष्यवृत्ती मिळाली. तिथे त्यांनी फावल्या वेळात हस्ताक्षरतज्ञ म्हणून डिप्लोमा मिळवला. भारतात परत येताना बोटीवर काही निर्वासित जर्मन-ज्यू मंडळींचे जीवन त्यांना फार जवळून बघायला मिळाले. त्या अनुभवातून रणांगण या कादंबरीचा जन्म झाला. चक्रधर नावाचा एक मराठी तरुण आणि ज्यूद्वेष्ट्या नाझी हुकुमशाहीखाली जिचे जीवन अंतर्बाह्य उद्ध्वस्त झाले अशी एक जर्मन ज्यू तरुणी हॅर्टा ह्यांच्या असफल प्रेमाची ही कहाणी आहे. जेनोआहून निघालेल्या एका इटालियन बोटीवर त्या दोघांची भेट होते आणि दहा दिवसांच्या सागरी प्रवासात ती दोघे उत्कटपणे परस्परंच्या जवळ येतात. चक्रधर आधी एका प्रेमप्रकरणात फसलेला असतो, तर हॅर्टा आपला पराक्रम सोडून परागंदा होण्यापूर्वीच आपल्या जर्मन ख्रिश्चन प्रियकराला मुकलेली असते. चक्रधराला पाहून तिला अपल्या प्रियकराची आठवण येते आणि चक्रधरही तिच्या प्रेमाने भारावून जाऊन तिच्याशी विवाह करावयास तयार होतो. तथापि हॅर्टापाशी जर्मन पासपोर्ट असल्यामुळे तिला चक्रधराबरोबर मुंबईस उतरता येत नाही.

    बोट चक्रधराला सोडून निघून जाते आणि विफल प्रेमाचा दुसरा आघात असह्य झालेली हॅर्टा हाँगकाँगपर्यंत गेल्यावर समुद्रात उडी मारून आत्महत्या करते. ह्या कांदबरीचा विषय, तीत असलेली विरोधवादाची पार्श्वभूमी, तिच्यातील सूक्ष्म, अभिजात कलात्मकता, तीतून व्यक्त झालेला संवेदनस्वभाव, तिची अनेकसंदर्भसूचकता हे सारेच मराठी कांदबरीत अपूर्व होते. मराठीतील मोजक्या, उत्कृष्ट कादंबऱ्यात बेडेकरांच्या रणांगणाची गणना केली जाते. १९८६ साली मा.विश्राम बेडेकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होते. मा.विश्राम बेडेकर यांचे निधन ३० ऑक्टोबर १९९८ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • रघुवेल लुक्स जोशी उर्फ र. ल्यु. जोशी

    रघुवेल लुक्स उर्फ र. ल्यु. जोशी यांनी काव्यलेखनाला तुलनेने खुप उशीरा सुरूवात केली. ताप येण्याचे निमित्त झाले आणि त्या काहिलीत काव्यलेखनाची स्फूर्ती होऊन त्यांनी खंडकाव्यच लिहून पूर्ण केले! त्यांच्या लेखनाची सुरूवात बायबलच्या विषयातून झाली. दांभिकपणा, पारतंत्र्य, राष्ट्रप्रेम, मायबोलीचे प्रेम ह्या विषयांवर त्यांनी सहजस्फूर्तीने, आवेशपूर्ण आणि भावपूर्ण लेखन केले आहे. वामन टिळकांना ते गुरूस्थानी मानत होते.

  • हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार लालजी पांडे उर्फ अंजान

    आज १३ सप्टेंबर....हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार मा.लालजी पांडे उर्फ अंजान यांची पुण्यतिथी
    लालजी पांडे उर्फ अंजान यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९३० रोजी झाला. लालजी पांडे उर्फ अंजान हे एक प्रतिभावंत गीतकार. आपल्या अद्वितीय गीतरचनांमुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. प्रारंभीच्या काळात छोट्या चित्रपटांतून गीतलेखन करणा-या अंजान यांच्या गीताने सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित गाण्यांतून आपली श्रेष्ठ काव्यप्रतिभा सिद्ध केली. त्यानंतरच्या काळात गरिबांचा अमिताभ म्हणून ओळख असणा-या मिथुन चक्रवर्ती यांच्या चित्रपटांतील अंजान यांची गीतांनी रसिकांच्या मनावर राज्य केले. सुपरस्टार्सच्या कारकिर्दीला आपल्या गीतांनी फुलवणारा गीतकार म्हणून अंजान यांची ओळख आहे.
    अंजान यांना लहानपणांपासूनच हिंदी भाषेची प्रचंड आवड. त्या गोडीतूनच उर्दू साहित्याचा अभ्यास त्यांनी केला. त्यांच्या काव्यप्रतिभेला नवा आयाम मिळाला. प्रेमनाथ त्या वेळी फार्मात होता. त्याने आपल्या एका चित्रपटासाठी या तरुण लालजी पांडे उर्फ अंजान यांची निवड केली. 1953 मध्ये पडद्यावर झळकलेला ‘प्रिझनर ऑफ गोवळकोंडा’ हा तो चित्रपट. यातील शहिदों अमर है तुम्हारी कहानी आणि लहर ये डोले कोयल बोले ही दोन गीते अंजान यांनी लिहिली. त्यानंतर अंजान यांनी ब-याच छोट्या चित्रपटांसाठी गीतलेखन केले. जी. एस. कोहली या संगीतकाराबरोबर त्यांचे सूर त्या काळात जुळले. प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित ‘गोदान’ चित्रपटासाठी पंडित रवी शंकर यांच्या संगीताने नटलेली अंजान यांची गाणी विशेष गाजली. ओ. पी. नय्यर यांच्या संगीताने सजलेले अब के हसीन रुख पे (बहारे फिर आएंगी) हे त्या काळी गाजलेले गाणेही अंजान यांचेच. त्यानंतर कल्याणजी-आनंदजी या संगीतकारांबरोबर त्यांची वेव्हलेंथ जुळली. मग मात्र अंजान यांनी मागे वळून पाहिले नाही. अमिताभ त्या वेळी चित्रपटांत स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. अमिताभचा ‘जंजीर’ हिट झाला आणि सारे समीकरण बदलले. प्रकाश मेहरांनी मग अमिताभ आणि अंजान अशी टीम जुळवली. त्यातूनच पुढे इतिहास घडला. खून पसीना, हेरा फेरी, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, नमक हलाल, शराबी ही काही उदाहरणे. चंद्रा बारोटच्या डॉनची गाणीही अंजान यांचीच. कल्याणजी-आनंदजी यांचे संगीत, अंजान यांची गीते आणि पडद्यावर अमिताभ या सूत्राने मग रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले.
    अमिताभप्रमाणेच मिथुन चक्रवर्तीच्या गाजलेल्या चित्रपटांची गाणी अंजान यांचीच आहेत. डिस्कोच्या जमान्यातही गीतांतील शब्दांचे महत्त्व अंजान यांनी कुठेही कमी होऊ दिले नाही. उलट अर्थपूर्ण शब्दरचनांनी डिस्कोला प्रतिष्ठा मिळवून दिली. गंगा नदी आणि भोजपुरी भाषा यांचा वापर अंजान यांनी अनेक गाण्यांतून केला. मानो तो मै गंगा माँ हूँ, ना मानो तो बहते पानी (गंगा की सौगंध), खैके पान बनारसवाला (डॉन) यातून त्यांचे बनारसशी असलेले नाते अधिकच दृढ होते. उपमांचा समर्पक वापर हे अंजान यांच्या लेखणीचे आगळे वैशिष्ट्य. सलाम ए इश्क (मुकद्दर का सिकंदर) मधला प्रेमभाव असो, की छू कर मेरे मन को (याराना)मधली प्रेमळ झुळूक; अंजानची गाणी कायम मनात रुंजी घालत राहतात. कहना ही क्या ये नैन एक अंजान से मिले(बॉम्बे)मधली ओढ दिल तो है दिल(मुकद्दर का सिकंदर)मध्ये अधिकच गहिरी होते. जिधर देखूँ तेरी तस्वीर नजर आती है(महान)मधले नैराश्य, इंतेहा हो गयी इंतजार की (शराबी) विरहाची परिसीमा गाठते, तेव्हा अंजानच्या शब्दाने त्यातील गोडी अधिकच श्रवणीय होते. ही अंजान यांच्या शब्दांची जादू होती.
    अमिताभ यांच्या कारकिर्दीत त्यांच्या गाण्यांचा वाटा खूप मोठा आहे. ही बहुतेक गाणी अंजान यांची आहेत. गीतकार समीर हे अंजान यांचे चिरंजीव. मा. अंजान यांचे १३ सप्टेंबर १९९७ निधन झाले.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.Kajaykulkarni / divyamarathi.bhaskar.com
  • केशव निवृत्ती कासार

    ठाणे शहरातील ख्यातनाम चित्रकारांपैकी एक नाव म्हणजे केशव निवृत्ती कासार. चित्रकलेतील आपल्या वेगळ्या शैलीनं समस्त कला वर्तुळात आपला वेगळा ठसा केशव कासार यांनी उमटवला. पॉटरी, सिरॅमिक, लॅंडस्केप, पेंटींग, टेराकोटा, शिल्पकला ही त्यांची वैशिष्ट्ये होत.<

  • माजी पंतप्रधान राजीव गांधी

    भारताला वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे महत्त्वाचे काम राजीवजींनी केले. त्यांनी तंत्रज्ञानसंबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली. संगणक, दूरसंचार क्षेत्राच्या प्रगतीसाठी त्यांनी खास प्रयत्न केले. लायसन्स राज संपविण्याचा प्रयत्नदेखील राजीवजींनी केला.

  • शिरिष मराठे

    श्री शिरिष मराठे हे मुंबईतील एक संगणक व्यावसायिक आहेत

  • रियातसरकार सरदेसाई

    रावसाहेब, रावबहादुर, पद्मभूषण (१९५७), पुणे विद्यापीठाची डी. लिट. पदवी इत्यादी अनेक मान-सन्मान ज्यांना लाभले ते गोविद सखाराम सरदेसाई म्हणजेच ‘रियासतकार सरदेसाई’ यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील गोविल या गावी १७ मे १८६५ साली झाला.

  • सोनी’ची ध्वजा जगभर फडकविणारे ‘नोरिओ ओगा’

    संगणक व त्याच्याशी संबंधित लहानमोठी उपकरणे आता आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहेत. कॉम्पॅक्ट डिस्क- अर्थात ‘सीडी’ ही त्यातीलच एक.

    रेकॉर्ड प्लेअरची जागा टेप रेकॉर्डरने घेतली आणि पुढे काही काळातच कॅसेट कालबाह्य़ ठरून त्यांची जागा ‘सीडीं’नी घेतली. संगीत साठवणे आणि ऐकणे हा ‘सीडी’चा केवळ एक उपयोग झाला. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही माहितीचा साठा संग्रहित करण्यापासून तो दुसर्‍याला हस्तांतरित करण्यापर्यंतच्या प्रचंड व्यवहारात ‘सीडी’ हे महत्त्वाचे माध्यम ठरले.

    १९८२ साली सोनी कंपनीने पहिली सीडी बनवून वितरित केली तेव्हा हाताच्या एका पंजात मावेल अशी ही तबकडी कालांतराने धनाढ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांसाठी दैनंदिन वापराच्या वस्तूचे स्थान पटकावेल असे कोणालाही वाटले नसेल. मात्र फार थोडय़ा व्यक्तींना याची जाणीव असेल, त्यातीलच एक म्हणजे ‘सोनी’ या जगप्रसिद्ध उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष नोरिओ ओगा !

    नोरिओ ओगा हे दूरदृष्टीच्या व्यावसायिक नेतृत्वापैकी एक होते. ‘सोनी’ची ध्वजा जगभर फडकविणार्‍या नोरिओ ओगा यांच्या कर्तृत्वाचा आलेख प्रचंड मोठा असला तरी त्यांची चटकन पटणारी ओळख कॉम्पॅक्ट डिस्क- अर्थात ‘सीडी’चा जनक अशी करून देता येईल. आपल्या उद्योगातून तयार होणारे कोणतेही उत्पादन हे मुख्यत: ग्राहकाला सहजतेने हाताळता आले पाहिजे हा ओगा यांचा आग्रह असे आणि या ध्यासातूनच त्यांनी या क्रांतिकारी तबकडीला जन्म दिला होता.

    १९५३ साली ‘त्सुशिन क्योगो’ मध्ये आलेले नोरिओ ओगा तेव्हा फाइन आर्ट्स व संगीताचे शिक्षण घेत होते. ऑपेरा सिंगर होण्याचे त्यांचे स्वप्न होते. प्रत्यक्षात घडले ते वेगळेच. या तरुणाची ध्वनी व विद्युत अभियांत्रिकीची जाण आपल्याला फायद्याची ठरेल हे सोनीच्या संस्थापकांनी हेरले आणि ओगा हे रीतसर या उद्योगात रुजू झाले. तिशी गाठण्याआधीच ओगा अधिकारपदी पोहोचले. सर्वसाधारणपणे जपानी उद्योगात एवढय़ा अल्प काळात असे पद मिळणे दुर्लभ असते.

    १९५८ साली ‘त्सुशिन क्योगो’चे नामकरण ‘सोनी कॉर्पोरेशन’ असे झाले. ही कंपनी जगातील पहिला टेपरेकॉर्डर बनविण्याच्या खटपटीत होती. अल्पावधीतच ते साध्य झाले आणि पुढे वर्षभरात ओगा हे कंपनीच्या टेपरेकॉर्डर विभागाचे सरव्यवस्थापक बनले.

    ओगा यांचे स्वप्न त्यापुढचे होते. कॅसेटची एक बाजू वाजवून झाली की ती उलटी करून पुन्हा चालू करावी लागे. संगीत ऐकणार्‍यांसाठी ही एक ‘कटकट’ होती. एखाद्या गायकाचे गाणे ऐन रंगात आले आहे आणि तेवढ्यात टेप संपल्यामुळे रसभंग झालाय हे चित्र तेव्हा नेहमीचेच. त्यामुळे जास्त काळ, विना-व्यत्यय संगीताचा आस्वाद घेण्यासाठी एखादे नवे साधन शोधून काढता येईल काय, यावर त्यांचे विचारचक्र सुरू झाले.

    त्यांचा आवडता संगीतकार बिथोवेन याची नववी सिंफनी ७५ मिनिटांची होती. ही पूर्ण सिंफनी सलग ऐकता येईल अशी १२ सेंटिमीटर व्यासाची कॉम्पॅक्ट डिस्क बनवण्याचा ध्यास त्यांनी घेतला.

    १९८२ साली सोनीची पहिली सीडी बाजारात आली. अवघ्या पाच वर्षांतच सीडींच्या खपाने लॉंग प्लेईंग (LP) रेकॉर्ड्सना मागे टाकले. सीडीमध्ये सुधारणा होऊन १९९२ मध्ये मिनी डिस्क (एमडी) आली. त्यानंतर सीडीच्याच आकारात अधिक साठा करण्याच्या क्षमतेच्या ‘डीव्हीडी’ तयार होऊ लागल्या.

    शिक्षण घेताना त्यांनी ऑपेरा सिंगर होण्याचे स्वप्न बाळगले होते, त्यानुसार स्वत:चा वाद्यवृंद बनवण्याची त्यांची मनीषाही पूर्ण झाली. ‘टोकियो फीलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा’ चे ते प्रमुख होते.

    २००० साली निवृत्त झाल्यानंतरही ओरिओ नोगा यांनी सोनीच्या सल्लागारपदाची धुरा अखेपर्यंत सांभाळली. एप्रिल २०११ मध्ये वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि ‘सोनी’ची ध्वजा जगभर फडकविणारे एक सक्षम व खंदे नेतृत्व लुप्त झाले.

    एखाद्या उद्योगसमूहाची कीर्ती देशाच्या सीमा ओलांडते... जगभर पसरते... खरे तर त्या उद्योगाला लाभलेले कल्पक आणि दूरदृष्टीचे नेतृत्व यासाठी कारणीभूत असते हेच खरे !

    -- निनाद प्रधान