जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
पेशवे उद्यानातल्या फुलराणीचे उद्घाटन ८ एप्रिल १९५६ ला पुण्यातील पूर्व प्राथमिक शाळेतील तेव्हाची विद्यार्थिनी वसुंधरा डांगे हिच्या हस्ते झाले. (पुढे त्या वाचकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांच्या पत्नी झाल्या.) इंजिन आणि दोन डबे अशी ‘फुलराणी’ची रचना होती. या रेल्वेसाठी दोन फलाट, तिकीट विक्रीची खिडकी, तिकीट तपासनीस, सिग्नल अशी सारी व्यवस्था उभारण्यात आली होती. लहानग्यांच्या करमणुकीसाठी उद्यानात चालविल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये पुण्यातली ‘फुलराणी’ देशातली सर्वात जुनी रेल्वे आहे, हे विशेष.
April 8, 2022
गोविंद तळवलकर यांच्यावर लोकमान्य टिळक आणि एम.एन. रॉय यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून त्यांनी तब्बल २८ वर्षे काम केले.
July 22, 2021
जॉनी लिव्हर यांचे खरे नाव जॉन प्रकाशराव जनुमाला. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९५७ रोजी कनगिरी, आंध्र प्रदेश येथे झाला. आंध्रप्रदेशातील एका तेलगु ख्रिश्चन कुटुंबात जॉनी लिव्हर यांचा जन्म झाला. जॉनी लिव्हर यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. त्यांचे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा यांच्या सोबत मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प-धारावीमध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचे. ते नकला करायचे. रेकॉर्ड डान्स करायचे. पैसे मिळायचे, ते घरी आईला द्यायचे. ते मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना नाचून वगैरे दाखवून खूश ठेवायचा प्रयत्नच करीत. फीचे पैसे नसल्यानं जॉनीला अपमानास्पदरीत्या सातव्या वर्गात असतानाच शाळा सोडावी लागली. मग जगण्यासाठी त्याने काहीही केले.
देशी दारूच्या गुत्त्यात पोऱ्या म्हणून काम केले. फडकी मारली, ग्लास धुतले, रस्त्यात उभं राहून बॉलपेनं, गोळ्या विकल्या. १८ व्या वर्षी हिंदुस्थान लिव्हर या कंपनीत कामाला लागला. काम मिळाले ते स्वीपरचे. झाडू मारणे फरशा पुसणे वगैरे कामे असायची. त्यात एक काम होते रसायनांचे ड्रम उघडण्याचे व ते साफ करून ठेवण्याचे. पहिल्याच वेळी जॉनीने ड्रम उघडला व तो पुसला, त्यात डोके घातलं व उगाच आवाज काढला. तो घुमला. त्याला गंमत वाटली. पुन्हा दुसरा आवाज काढला. नंतर अनेक आवाज काढले.
एका कामगाराने तक्रार केली. मग त्याच्या सुपरवायझरने त्याला जाब विचारण्यासाठी बोलावले. त्याला जॉनीने अनेक नकला करून दाखवल्या. तर तो खूशच झाला आणि त्याने जॉनीला गेट्टुगेदर मध्ये संधी दिली. रंगभवनच्या त्याया संमेलनात शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, अशोककुमार आदींची मिमिक्री करून जॉनीने सारे सभागृह दणाणून सोडले. एक हास्याभिनय केला. त्यानंतर जॉनी क्षणात लोकप्रिय झाला. युनियनच्या लीडर, सुरेश भोसलेंनी ते पाहिले व ते म्हणाले, ‘अरे याने तर लिव्हरचा बॅण्ड वाजवला, आजपासून याला जॉनी नाही, जॉनी लिव्हर म्हणायचे.’ त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमात जॉनीने स्वतःची ओळख जॉनी लीव्हर अशी करून दिली व तेव्हापासून तेच त्यांचे व्यावसायिक नाव झाले.
कार्यक्रमांचे पैसे बऱ्यापैकी मिळू लागले म्हणून सात वर्षांनी जॉनीने नोकरी सोडली. त्यांच्या कार्यक्रमाची पहिली व्हिडीओ कॅसेट आली होती. नंतर तो कल्याणजी आनंदजी यांचे समवेत जगभर फिरला. जॉनीची चित्रपटात एंट्री झाली, पण अनेक वर्षे ते मी मिमिक्रीच करायचे. त्यांना अभिनयाची संधीच मिळत नव्हती. ती एन. चंद्रांनी ‘तेजाब’मधून दिली. ती भूमिका कशी करायची, तिचे विविध पैलू त्यांनी समजावून सांगितले. त्यात जॉनीने त्याचे रंग भरले. त्यानंतर लोकांनी त्याला अॅधक्टिंग कलाकार म्हणून स्वीकारले. पुढे त्याने 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात काम केले. त्यानंतर मात्र त्याला अनेक चित्रपटात कामे मिळाली. या चित्रपटांची संख्या ४०० हून खूप अधिक आहे.
जॉनी लिव्हर स्टँडिंग कॉमेडी सुद्धा करतात. विनोदी भुमिकेत गाजलेले सिनेमे इश्क, साजन चले ससुराल, जुदाई.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 14, 2021
भारतातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा “२जी स्पेक्ट्रम” घोटाळ्याचा खटला दिल्लीच्या विशेष न्यायालयात सुरु झाला, त्यात केंद्रिय गुप्तचर विभाग (सी.बीआय.) आणि अंमलबजावणी संचालनालय (ई.डी.) या दोन तपासणी यंत्रणांच्या वतीने अभियोग चालवण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने उदय लळीत यांच्यावर टाकली आहे.
July 3, 2013
कळीदार कपूरी पान’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशा दर्जेदार काव्य रचना करणारे कवि राजा बढे यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी... रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी म्हणजे राजा बढे. आजच्या पिढीला कदाचित राजा बढे हे नावसुद्धा माहीत नसेल. परंतु ज्यांच्या गीतांची सुदैवाने चिरफाड न होता त्यावर रिमिक्सचा मुलामा चढलेला नाही, अशी गीते राजा बढे यांच्या नावावर आहेत. राजा बढे यांचे जन्म नागपूरचा. प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले.
१९३५ मध्ये त्यांनी पंजाब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्याच्या दैनिक ‘सकाळ’ मध्ये संपादकीय विभागात त्यांनी नोकरी केली. नागपूरच्या दैनिक ‘महाराष्ट्र' मध्ये एक वर्ष ते सहसंपादक होते. त्याचवेळी ‘वागीश्वरी'च्या संपादक मंडळात ते कार्यरत होते. पुढे साप्ताहिक ‘सावधान' मध्ये मावकर-भावे यांच्यासोबत त्यांनी कार्य केले. दरम्यान कॉलेज करून पदवी प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न अपुरा राहिला. त्यांनी बरचसं स्फुटलेखन "कोंडिबा' या टोपणनावानं केलं. वयाच्या सतरा-अठरा वर्षांपासूनच कविता लिहू लागले. नवकवींच्या काव्यसंग्रहात राजा बढे यांच्या कवितांना विशेष स्थान असे. 'ओहोळ' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. कवितांची आवड जोपासणाऱ्या बढे आई-वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ म्हणून लहान भावंडांची जबाबदारी, पालनपोषण यातच सर्वस्व मानून स्वत: अविवाहित राहिले.
१९४० च्या आसपास चित्रपट व्यवसायात त्यांनी प्रवेश केला. ‘सिरको फिल्म्स' मध्ये दोन वर्ष त्यांनी कामे केली. १९४२ मध्ये ते "प्रकाश स्टुडिओ'त रुजू झाले आणि त्यांनी "रामराज्य' चित्रपटाची गाणी लिहिली. महेश कौल सोबत ‘अंगुरी' चित्रपटात काम केले. पुढं १९४४ मध्ये ते मराठी रंगभूमीकडं वळले. आळतेकर यांच्या "लिट्ल थिएटर्स'च्या "कलेसाठी सारस्वत' नाट्यप्रयोगात त्यांची भूमिका होती. ‘संत बहिणाबाई,' ‘गळ्याची शपथ' या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवर ‘निर्माता' म्हणून कार्यरत होते. आपल्या वाङ्मयीन अभिरुचीला पोषक ठरतील, अशा व्यवसायांसी धरसोड ते आयुष्यभर करीत राहिले, तरी आपले कवित्व ते सतत सांभाळून होते. "चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले', "दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी', "प्रेम केले काय हा झाला गुन्हा?' इत्यादी सुरेल भावगीतं त्यांनी लिहिली. स्त्रियांचे मनोभाव आकर्षकरीत्या शब्दबद्ध करण्यात बढे सिद्धहस्त होते. "वाट कशी चुकले रे', "कधी न पाहिले तुला', "होशी तू नामानिराळा', "काय कोणी पाहिले,' "मला मोहू नका' इत्यादी गीतांमधून व्याकुळता, विरहार्तता, मीलनातुरता असे मनोभाव त्यांनी नाट्यपूर्ण रीतीनं चितारले आहेत. संस्कृत काव्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. आपली भाषा अलंकृत करण्याची क्षमता त्यांच्यात असली तरी संस्कृत शब्दांच्या भाराखाली ती दडपली जाणार नाही, याचं भान बढे यांच्या गीतांमध्ये दिसतं.
बढे यांचा उर्दू शायरीचाही अभ्यास होता. त्या पद्धतीच्या भावाविष्काराचा ढंग आणि कल्पनाविलासाची पद्धत बढे यांनी त्यांच्या काही गझलसदृश भावगीतांमध्ये अंगीकारली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे बढे यांचं परमदैवत होतं. दिग्दर्शक विजय भट यांच्या 'रामायण' चित्रपटाकरिता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गीतकार म्हणून राजा बढे यांचे नाव सुचविले. या चित्रपटातील 'सृजनहो परिसा रामकथा, जानकी जीवन विरह व्यथा' हे बढे यांनी लिहिलेले गीत काळजाचा ठाव घेणारे ठरले. त्यानंतर महात्मा विदूर, गळ्याची शपथ अशी काही चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केले. हे करीत असताना व्यावसायिक हेतू त्यांनी कधीच ठेवला नाही. धोतर, कुडता असा वेष आणि वरण-भात प्रिय असणाऱ्या बढेंच्या लेखी पैशाला फारसे महत्त्व नव्हते. कामाला महत्त्व देणाऱ्या बढेंच्या अनेक भावगीतांमधून कवीच्या भावना हळुवार प्रकट होतात आणि मनाला विलक्षण आनंद देऊन जातात. म्हणूनच लता मंगेशकर, आशा भोसले बढे यांच्या गीतांवर प्रेम करीत. ‘हसताच नार ती अनार मनी फुले' ही बढे यांची गजानन वाटवे यांनी गायिलेली, ‘हसतेस अशी का मनी' लता मंगशकरांनी गायलेली, तर ‘चांदणे शिपीत जा' ही आशा भोसले यांनी गायिलेली गीतरचना , कुमार गंभर्वांनी ‘प्रेम केले काय हा झाला गुन्हा' ही बढे यांची गायिलेली रचना लोकप्रिय झाली. राजा बढे हे कट्टर हिदुत्ववादी होते. स्वा. सावरकर हे त्यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्या ‘क्रांतिमाला' या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २१ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत.
प्रत्यक्ष सावरकरांनी ‘प्रस्तावनेत' ‘‘आपण स्वत:च नामवंत, सुप्रतिष्ठित प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने, माझ्या प्रस्तावनेची गरज नाही'' असे गौरवोद्गार काढले आहेत. १९३५ ते १९५९ दरम्यानच्या सामाजिक-राजकीय घडामोडींचे पडसाद यात आहेत. ‘विस्मृतीत गुंफलेली क्रांतिमाला', ‘गगनात आज जो चंद्र सुखे मिरवावा । ते तेज घेऊनी करिती काजवे कावा । तो बाबू गेनू, कोतवाल उरलेले । विसरलो अनामिक किती बळी गेलेले', ‘सुजला सुफला देश आमचा', ‘हिमालय थिजला । थिजला धीरचा । गंगा सिधुतुनी वाहतो प्रवाह रुधिराचा' अशा सर्वच कवितांमध्ये मंगल पांडे, हुतात्मा फडके, चाफेकर, सेनापती बापट अशा क्रांतिवीरांची नावे गुंफून त्यांना विस्मृतीत टाकल्याचे दु:ख व्यक्त केले आहे. ‘घडू दे पुन्हा एकदा भारत' मधून सावरकरांच्या दिव्य देशभक्तीचा गौरव केलेला असून, ‘नवोन्मेषशाली कवींच्या कवे' असे सावरकरांना संबोधले आहे. राजा बढे यांनीच. १९६४ साली मुंबईत बढे यांच्या पुढाकाराने प्रथमच कथाकथनचा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे, गदिमा यांनी प्रथमच कथा कथन केल्या होत्या.
मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर बढे यांनी छोटे छोटे माहितीपट करून दिले. नंतर बंधू बबनराव यांच्या मदतीनं त्यांनी "स्वानंद चित्र' ही संस्था उभी केली आणि "रायगडचा राजबंदी' हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला. गीत, गझल याप्रमाणेच ‘चारोळी' हा रचनाप्रकार बढे यांनी हाताळला. ‘कोंडिबा' हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या... त्या मुंबईच्या ‘विविधवृत्त' साप्ताहिकातून प्रकाशित झाल्या होत्या. राजा बढे हे केवळ कवी नव्हते. काव्याखेरीज ‘किती रे दिन झाले,' ही पत्रमय कादंबरी; ‘स्वप्नगंधा',‘चतुर किती बायका,' ‘ही रात सवत बाई,' ‘पेचप्रसंग,' ‘अशी गंमत आहे' अशी पाच नाटके त्यांनी लिहिलीत... तरी बढेंची ओळख कवी म्हणूनच कायम राहिली. "गर्जा महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्रगीत म्हणजे कविवर्य राजा बढे यांच्या काव्यप्रतिभेचा परमोच्च बिंदू होय. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली. या विजयानिमित्त बढे यांच्या या रचनेची ध्वनिमुद्रिका "एचएमव्ही'नं तयार केली.
शाहीर साबळे यांच्या खड्या आवाजातील आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने महाराष्ट्राची थोरवी सातासमुदापार पोहोचवली.. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ठिकठिकाणी कार्यक्रमांत ऐकवलं जाणारं हे गीत आजही तितकंच ताजं, टवटवीत आहे. राजा बढे यांना पान खायची भारी हौस होती. याच पानावर त्यांनी 'कळीदार कस्तुरी पान' लावणी लिहिली. ती सुलोचना चव्हाण यांनी अशा ठसक्यात गायिली की, भल्याभल्यांना पानाचा मोह आवरायचा नाही. पण अनेकांना ती राजा बढे यांनी लिहिली आहे, हे माहित पण नसेल.
त्यांनी एक कविता स्वतःविषयीच लिहिली... ते दोन "राजां'चं वर्णन होतं.
तेव्हा आणि आता...
एक राजा -
टोपी किंचित उंच, नीट कलती बाजूस डोकावित
खासे धोतर, पायघोळ अगदी, टाचेवरी लोळत..
ओठांनी रसरंग फेकित सदा या मंगलाचे धडे
आहे काय म्हणुन काय पुसतां? तो हाच राजा बढे..
दुसरा राजा -
टोपी सोडून, मुंबईस फिरतो, आता सदा बोडखा
बंगाली डगला, न पालट दुजा, खाक्या जुना सारखा..
आहे तोच विडा, अजूनही तसे, ते मंगलाचे सडे
जैसा नागपुरात, आजही तसा, तो हाच राजा बढे..
ज्येष्ठ दिवंगत कविवर्य वा. रा. कांत यांनी बढे यांच्याविषयी म्हटलं आहे:-
"आपल्या कवितेचा धर्म ओळखून शेवटपर्यंत मनाला आल्हाद देणाऱ्या कविता लिहिण्याचं ‘चांद्रव्रत' त्यांनी निष्ठेनं पार पाडलं, यातच त्यांची थोरवी आहे....हा कवी जन्मभर चांदणं शिंपीत जगला आणि चांदणं शिंपीत शिंपीत अचानक निघून गेला. ह्या "चांद्रव्रती'ची आठवण विझणं अशक्य!!'' राजा बढे यांचे ७ एप्रिल १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 1, 2019
साधारणपणे दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २००७ – २००८ साली ठाण्यातल्या घंटाळी मंदिरात मी आणि स्वप्नाली पहिल्यांदाच एकमेकांसमोर आलो. निमित्त होतं गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या एका शूटचं. या मंदिराच्या आवारात असलेल्या डौलदार झाडांच्या बॅकग्राऊंडला आम्ही शूट करत होतो. मराठमोळी संस्कृती उठून दिसावी असाच पेहराव स्वप्नालीचा होता. लाल रंगाची नक्षीदार साडी, नाकात नथ, लाल रंगाची मोठाली टिकली, अंबाडा त्यावर हळुवारपणे सजलेला मोगऱयाचा गजरा आणि या सगळ्यात तिचा खुललेला चेहरा. हे सारं काही कॅमेऱयात बंदिस्त करण्याची माझी धडपड सुरू होती. अत्यंत प्रसन्न वातावरणात आमचं शूट तासाभरात पार पडलं.
March 23, 2019
अँजेलो मॅथ्यूजचा फलंदाज म्हणून ठसा असला तरी त्याने सर्वोत्तम गोलंदाजीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात केली. अँजेलो मॅथ्यूजने २००९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. काँपॅक कपमधील (२००९) तिसऱ्या लढतीत यजमानांच्या ३०८ धावांच्या मोठया आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १६८ धावांत संपला.
June 2, 2021
ज.द. गोंधळेकर हे टाइम्स ऑफ इंडियाचे कलादिग्दर्शक होते. ते चांगले शिक्षक, संस्थाचालक आणि दूरदृष्टी असलेले कलावंत होते. जर्मनी, बेल्जियम या देशांत आणि लॅटिन अमेरिकेत भरलेल्या अनेक चित्रप्रदर्शनांत गोंधळेकरांची चित्रे झळकली आहेत. गोंधळेकरांची ५०-६०चित्रे जगातील कलादालनांची शोभा वाढवत आहेत.
April 22, 2022
शास्त्रीय संगीतात आपल्या अनोख्या आणि स्वयंभू गायकीने उच्चस्थान निर्माण करणारे पं. कुमार गंधर्व हे पं.सत्यशील देशपांडे यांचे गुरू! त्यांचा जन्म ९ जानेवारी १९५१ रोजी झाला. लहान मुले खेळताना भिंतीआडून डोकावणाऱ्या एखाद्या भिडूला ज्या सहजतेने आपल्या खेळात समाविष्ट करून घेतात, तेवढय़ाच सहजतेने एखाद्या रागातील एखाद्या वज्र्य स्वराला हळूवार कुरवाळणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांची संगीताकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी आणि उदात्त होती. हाच उदात्त दृष्टिकोन आपल्या जीवनाचे साध्य बनवून संगीताची आराधना करणाऱ्या पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकीचे अक्षरश: झाड फुलवले. विशेष म्हणजे, कुमारजींप्रमाणेच पं.सत्यशील देशपांडेही संगीताच्या बाबतीत कोणत्याही बंधनात अडकून पडले नाहीत. भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी हा प्रकार लोकप्रिय असला, तरी कलाकारांसाठी तो साधनेचा विषय आहे.
पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकी साधनेने आत्मसात केली. त्यांनी ज्या सहजतेने आणि तन्मयतेने ख्याल गायकी गायली, त्याच तन्मयतेने त्यांनी ‘लेकीन’ किंवा ‘विजेता’ अशा चित्रपटांमधील गाणीही गायली. ख्याल गायकी सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाऊंडेशनसाठी ‘पाच मिनिटांचे शास्त्रीय संगीत’ असा एक पाच मिनिटांचा तुकडा तयार केला होता. संगीताकडे वेगळ्याच दृष्टीने पाहणारा हा सुरांचा गुरू शास्त्रीय संगीत हा फक्त ऐकण्याचा किंवा गाण्याचा विषय नसुन अनुभवण्याचा देखील विषय आहे हे पं.सत्यशील देशपांडे जेव्हा सांगतात ते रसिकांना नक्की पटत असेल. हा अनुभव स्वत: घेण्यासाठी व लुटण्यासाठी सत्यशीलजींनी आयुष्यभर अक्षरशः जीवाचं रान केलं.
मुख्य म्हणजे त्यांचे गुरु कुमारजी नेहमीच आधी कुठलीही गोष्ट करुन दाखवायचे व मग त्यावर भाष्य करायचे. कुमारजींच्या ह्या आगळ्यावेगळ्या शिष्याचीही तीच पद्धत आहे. नुसत्या समीक्षेपेक्षा हे वेगळं व अवघड काम आहे. एखादी नवीन बंदिश बसवणं म्हणजे काय असतं ते गवयांना चांगलेच माहितेय. मग प्रत्येक रागातील पाचपन्नास बंदिशी नुसत्या बसवुनच नाही तर त्यातील सौष्ठव व सौंदर्यासहित स्वत: गाऊन अनुभवण्याचा वसा त्यांनी घेतला व अजुनही तो चालुच ठेवलाय. तसेच त्या बंदिशीचे पोषण कुठल्या गायकिने चांगले होते ही सौंदर्य दृष्टी सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी विविध गायकींचा अभ्यास करुन त्या आत्मसात केल्यायत. त्यामुळे वेगवेगळ्या गायकींचा तुलनात्मक आभास करणं त्यांना शक्य झालंय. टोकाचा व्यासंग, तल्लख बुद्धी व उत्तम प्रतिभा हा त्रिवेणी संगम सत्यशीलजींपाशी आहे.
तरुण संगीतकार कौशल इनामदार हे पं.सत्यशील देशपांडे यांचे शिष्य.
कौशल इनामदार आपल्या गुरु बद्दल सांगताना म्हणतात, गुरु अंतर्दृष्टी देतो ती फक्त कलेकडे पाहण्याची नाही तर जगण्याकडे पाहण्याची. त्यांनी गाण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. ते स्वतः कुमारजींचे शिष्य. तरीही त्यांच्या गाण्यात कुमारजींची नक्कल नाही. कुमारजींनीपण त्यांना सांगितलं होतं की तुमचे खड्डे तुम्ही खणा! थोडक्यात काय तर अगदी गुरूचीसुद्धा नक्कल न करता स्वतःचं वेगळेपण स्वतः सिद्ध करा. त्यामुळे मी विचार करताना कधीही सत्यशील देशपांडे यांच्यासारखा करत नाही. मी माझ्या सारखा विचार करतो. मला वाटतं की आपल्यासमोर वाट असतेच, ती आपण शोधत जातो. गुरु आपल्याला जाणीव करून देतो की तुमची वाट तुम्ही शोधा. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी गुरु पुरवतात.
मी गाण्याचा विचार माझ्यासारखा करतो कारण मी त्यांचा शिष्य आहे. एखादी चाल फसली तर ते सांगतात की त्यात काय करता येईल. त्यातलं एक सूत्र सांगतात ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतात. मी संगीत द्यायला लागल्यापासून माझ्या चालींवर त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव आहे. ते स्वतः उत्तम संगीतकार आहेत. त्यांना संगीतातले बारकावे अचूक कळतात. त्यांनी दाखवलेलं प्रतिबिंब इतकं स्वच्छ असतं की ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ अशी काहीशी स्थिती होते! त्यामुळे असं म्हणायला हवं की गुरु म्हणजे वाटाडय़ा नाही. तो सतत तुमच्याबरोबर राहत नाही. वेगवेगळे मार्ग ते तुम्हाला सांगतात. तिथे जाताना तुम्हाला प्रश्न पडतात. माझ्या गुरुचं वेगळेपण हेच की त्यांनी आम्हाला असे प्रश्न पाडले. आज जवळजवळ १६ वर्ष मी त्यांच्याकडे शिकतोय पण जाऊन त्यांच्याकडे शिकायला बसलोय असं कधीच झालं नाही. मी कधीही त्यांना भेटायला जातो आणि शिक्षण सुरु होतं. त्यांनी मला अगदी मुलासारखं वाढवलं आहे.
सध्या ‘अजिंठा’ या चित्रपटासाठी ते माझ्याकडे गातायत. मला वाटतंय ‘हे गीत जीवनाचे’ नंतर पहिल्यांदाच ते चित्रपटासाठी गातायत. त्यांनी माझ्याकडून चाल समजून घेतली, त्यावर मी जेवढा विचार केला नसेल तेवढा त्यांनी केलाय, त्याच्या शंभरेक तालमीसुद्धा केल्यात! ते नुसते गायक किंवा संगीतकार नाहीत तर एक विचारवंत, लेखकसुद्धा आहेत. त्यांचा भाषेचा सेन्स अतिशय उत्तम आहे. होतं.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 9, 2018
नूरजहाँ यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. ‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ यांचे खरे नाव 'अल्लाह वसई होते. नूरजहाँ यांचा जन्म पेशावर येथील संगीतकार मदद अली यांच्या परिवारात झाला. संगीतकार परिवारात जन्म झाल्याने नूरजहाँ यांना लहानपणा पासून संगीताची आवड निर्माण झाली. नूरजहाँ यांनी वयाच्या पाचव्या वर्षी गाणे शिकायला सुरवात केली होती. नूरजहाँ यांचा परिवार १९३० मध्ये कलकत्ता येथे आला. तेथे नूरजहाँ यांना नृत्य व गाणे शिकायला मिळाले. नूरजहाँ यांच्या गाण्यावर प्रभावित होऊन संगीतकार गुलाम हैदर यांनी पंजाबी चित्रपट ‘शीला’ उर्फ ‘पिंड दी कुड़ी’ मध्ये बाल कलाकाराची भूमिका दिली. हा चित्रपट पंजाब मध्ये गाजला. त्या काळी पंजाब म्हणजे लाहोर पण होते. १९३० च्या दशकात लाहोर मध्ये अनेक स्टूडियो स्थापन झाले. गायकाची वाढती मागणी लक्षात घेऊन नूरजहाँ यांचा परिवार १९३७ मध्ये परत लाहोरला आला. तेथे डलसुख एल पंचोली यांनी बेबी नूरजहाँ यांचे गाणे बघून ‘गुल-ए-बकवाली’ या चित्रपटात भूमिका दिली. या नंतर त्यांचा यमला जट (1940), ‘चौधरी’ चित्रपट प्रदर्शित झाला. यातील गाणी ‘कचियां वे कलियाँ ना तोड़’ व ‘बस बस वे ढोलना की तेरे नाल बोलना’ ही खूप लोकप्रिय झाली. १९४२ मध्ये नूरजहाँ यांनी आपल्या पुढील बेबी हा शब्द काढला. त्याच वर्षी ‘खानदान’ चित्रपटातून त्यांनी लोकांचे ध्यान वेधून घेतले. याच चित्रपटाचे निर्देशक शौकत हुसैन रिजवी यांच्या बरोबर लग्न केले. १९४३ मध्ये नूरजहाँ मुंबईला आल्या. आजही जुन्या पिढीतील लोक त्यांच्या ‘लाल हवेली’, ‘जीनत’, ‘बड़ी माँ’, गाँव की गोरी और मिर्जा साहिबाँ, अनमोल घडी या चित्रपटासाठी नूरजहाँ यांची आठवण काढतात. अनमोल घड़ी चे संगीत नौशाद यांनी दिले होते त्यातील ‘आवाज दे कहाँ है’, ‘जवाँ है मोहब्बत’ और ‘मेरे बचपन के साथी’ ही गाणी आजही लोक आवडीने एैकतात. नूरजहाँ फाळणी नंतर मुंबई लाहोरला आल्या. त्यांचे पती रिजवी यांनी शाहनूर स्टूडियो चालू केला. शाहनूर प्रोडक्शन नी ‘चन्न वे’ ची निर्मिती केली ज्याचे निर्देशन नूरजहाँ यांनी केले होते. त्यातील ‘तेरे मुखड़े पे काला तिल वे’ हे गाणे लोकप्रिय झाले. नूरजहाँ यांची शेवटचा चित्रपट ‘बाजी’ होता त्यांनी पाकिस्तातात १४ चित्रपट बनवले त्यातील १० उर्दू होते. काही कारणाने त्यांना अभिनय सोडवा लागला पण त्यांनी गाणे चालू ठेवले. पाकिस्तानात पार्श्व गायिका म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘जान-ए-बहार’ होता. यातील ‘कैसा नसीब लाई’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या फिल्मी करियर में उर्दू, पंजाबी व सिंधी भाषात अनेक गाणी गायली. त्यांना पाकिस्तान मधील सर्वोच्च सम्मान ‘तमगा-ए-इम्तियाज’ मिळाला होता. मा.नूरजहाँ यांचे २३ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 3, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti