(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • मंगेश तेंडुलकर

    मंगेश तेंडुलकर हे अखेरपर्यंत कार्यरत असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. मंगेश तेंडुलकर यांनी ९० हून अधिक व्यंगचित्र प्रदर्शन आयोजीत केली होती. स्वतःचा मृत्यू या विषयावरही त्यांनी व्यंगचित्रांची मालिका बनवली होती.

  • गोपीनाथ तळवलकर

    बालसाहित्यिक, चरित्रकार, कवी व “आनंद” मासिकाचे संपादकपद ३५ वर्षे सांभाळणारे गोपीनाथ तळवलकर यांनी  प्रौढसाक्षरांसाठीही लिखाण केले.

  • मास्टर दत्ताराम

    मास्टर दत्ताराम म्हणजेच दत्ताराम वळवईकर. साहित्यसंघाच्या’कौन्तेय’, ’दुसरा पेशवा’, ’भाऊबंदकी’ , ’वैजयंती’ , ’राजकुमार’ यांसारख्या नाटकांत नटवर्य नानासाहेब फाटक, दुर्गा खोटे, मामा पेंडसे यांसारख्या बुजुर्ग अभिनेत्यांबरोबर तोडीस तोड भूमिका करून दत्तारामांनी ‘नटवर्य’ हे बिरुद मिळवले. पुढे ‘ललितकलादर्श’ च्या’दुरितांचे तिमिर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘पडछाया’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.

  • बाबाराव दामोदर सावरकर

    बाबाराव यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान आहे. बाबाराव सावरकर हे स्वा.विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांनीच स्वा. सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन, अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतीकार्यातही भाग घेतला.

  • राजदत्त

    १९७९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘अपराध’ त्यातील मांडणीमुळे लोकप्रिय ठरला आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा राज्य शासनाचा पहिला पुरस्कार पटकावला. आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कळत-नकळतपणे अपराध करण्याच्या मानवाच्या मूलभूत प्रवृत्तीवर हा चित्रपट भाष्य करतो.

  • अनंत आजगावकर

    सानेगुरुजींचं आंतरभारतीचं स्वप्न उराशी बाळगून आपल्या जन्मभूमीमध्ये शिक्षणक्षेत्रात काम करण्याचं व्रत स्वीकारलेलं, खादीचा नेहरू शर्ट, खादीचीच पांढरी विजार तसेच खांद्याला खादीचीच पिशवी या वेषातील आणि कोणाच्याही मदतीला सदैव तयार असलेलं हे ऐंशी वर्षांचं 'आजगावकर सर' या नावाचं उत्साही व्यक्तिमत्त्व कोल्हापूर जिल्ह्यात आबालवृद्धांना आदरणीय असंच आहे!

    आजगावकर सरांनी आपल्या काही सहकार्‍यांच्या मदतीने १९५८ मध्ये उत्तूर विद्यालयाची स्थापना करून परिसरातल्या २० ते २५ खेड्यांमधल्या अशिक्षित, गरीब लोकांच्या मुलाबाळांसाठी ज्ञानार्जनाचा मार्ग खुला करून दिला. त्यातूनच आता अरविंद विद्यामंदिर, उत्तूर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. जे. पी. नाईक वरिष्ठ महाविद्यालय अशी बालवाडीपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत एकाच गावी सुविधा निर्माण झाली आहे. त्याचबरोबर चिमणे (ता. आजरा), पिंपळगाव आणि बारवे (ता. भुदरगड) आणि करवीर प्रशाला (कोल्हापूर) असा शाखाविस्तारही झाला आहे.

    या खेडेगावांमधून आंतरभारतीच्या शाळा सुरू झाल्या नसत्या तर ग्रामीण, मागास, निरक्षर आणि आथिर्कदृष्ट्या विपन्नावस्थेत असणार्‍या बहुजन समाजातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्याअभावी आपलं आयुष्य बेभरवशाच्या शेतीमध्ये किंवा मुंबईतील रोजगारावर घालवावं लागलं असतं. मुलींना तर घराचा उंबरठाही ओलांडण्याची संधी मिळाली नसती. अत्यंत दारिद्रयाच्या परिस्थितीतून शिक्षण घेतलेले आंतरभारतीचे अनेक माजी विद्यार्थी आज समाजाच्या विविध स्तरांत चांगल्या पदांवर कार्यरत आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

    आजगावकर सरांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय 'आदर्श शिक्षक पुरस्कार', नूल ग्रामस्थांचा 'साथी पुरस्कार' या पुरस्कारांप्रमाणेच 'फाय फौंडेशन'तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. कोणाकडेही हात न पसरता कष्ट, त्याग, संघर्ष आणि सेवेच्या जोरावर त्यांनी उत्तूर परिसरात उभं केलेलं शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य करू पाहणार्‍यांना निश्चितच प्रेरणादायी आहे.
    शिक्षणाचा धंदा करून सम्राट बनण्याची स्पर्धा सुरू असलेल्या सध्याच्या काळात आजगावकर सरांनी आपली ध्येयवादी विचारसरणी अखंड ठेवून खेडेगावांमधून मांडलेला हा ज्ञानयज्ञ अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • भगवान रघुनाथ कुलकर्णी

    कथाकार, कादंबरीकार व कवी “बी. रघुनाथ” म्हणजेच भगवान रघुनाथ कुलकर्णी.

    अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी ७ कादंबर्‍या ६० कथा आणि १५० च्या आसपास कविता लिहिल्या होत्या.

    अवघ्या ४० व्या वर्षी ७ सप्टेंबर १९५३ रोजी त्यांचे निधन झाले.

    Bhagwan Raghunath Kulkarni

  • सुधीर ठाकरे

    गरिबांच्या मुळावर उठलेला चर्मोद्योग घोटाळा उघड करणे असेल, गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल, कापूस विक्रीतून सरकारला नफा मिळवून देणे असेल..अशी विविध सरकारी कामं कर्तबगारीने पार पाडणारे अधिकारी ही सुधीर ठाकरे यांची ओळख.

    नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधून एम.एससी. (इलेक्ट्रॉनिक्स) केल्यानंतर त्यांनी प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. यानंतर त्यांनी प्रशासनात एम.ए. पदवी मिळवली. एलएलबीही पूर्ण केले. अभ्यास सुरू असतानाच त्यांनी भरती परीक्षा देऊन १९७५मध्ये विक्रीकर अधिकारी म्हणून पहिले प्रशासकीय पद स्वीकारले.

    १९७८ मध्ये त्यांची सहकार खात्यात नियुक्ती झाली. याच खात्यात ते जॉईंट रजिस्टार झाले. यावेळी त्यांनी चमोर्द्योग घोटाळा उघड केला. राज्यातील अनेक बड्या घोटाळ्यांपैकी हा एक घोटाळा मानला जातो. यामध्ये मुंबईचे तत्कालीन नगरपालांपासून ते अनेक राजकीय नेत्यांना कोर्टाच्या पायर्‍या चढाव्या लागल्या. त्यांच्या या कामात तत्कालीन आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी त्यांना खूप मदत केली.

    यानंतर ते कापूस महामंडळात जॉईंट एम.डी. म्हणून रूजू झाले. त्यावेळेस सरकार शेतकर्‍यांचा कापूस विकत घ्यायचे आणि तो चढ्या भावाने विकायचे. मात्र यामध्ये म्हणावी तितकी सुसूत्रता नव्हती. सरकारला नफा मिळवणंही अवघड होत होतं. पण त्यांनी विभागीय कामात सुसूत्रता आणून सरकारला नफा मिळवून दिला. ठाकरे यांनी त्यांच्या कारकीदीर्त एका वर्षी सरकारला ७०, तर दुसर्‍या वर्षी ५० कोटींचा नफा मिळवून दिला. त्यांच्यानंतर हा नफा मिळवणे अद्याप कोणाला शक्य झाले नाही. यानंतर ते ग्राहक हित विभागात जॉईंट एम.डी. झाले.

    १९९१ मध्ये ते आयएएस झाले. यानंतर त्यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सीईओपदाची सूत्रे स्वीकारली. लगेच त्यांना जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेथेही त्यांनी विविध प्रयोग केले.

    यानंतर मंत्रालयात विविध विभागांत काम करताना त्यांनी गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान अशा योजनांना चालना दिली. ग्राम विकास विभागात सचिव असताना त्यांनी राज्यातील सर्व गावे कम्प्युटरने जोडण्याचा 'संग्राम' हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविला.

    त्यांची ग्रामविकास खात्याच्या सचिवपदावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. दोन वर्षांच्या या काळात एमपीएससीचा दर्जा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दर्जापर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे. आता नव्या विभागातील आव्हानांना सामोरे जाताना या विभागाचा कायापालट करण्याचे त्यांचे ध्येय आहे. आम्ही समाजाचे सेवक आहोत राजे नाही, अशी भावना जपणारा हा अधिकारी याही कामात यशस्वी होईल, यात शंका नाही.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • आर. के. लक्ष्मण

    रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्रातून काढलेली व्यंगचित्रे खूप गाजली होती. ‘कॉमन मॅन’ या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून त्यांनी भोवतालच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींवर मार्मिक भाष्य केले होते. कॉमन मॅन हे त्यांचे गाजलेले व्यंगचित्र.

  • श्रीराम कामत

    कामत, श्रीराम

    जीवनभर जगातील महनीय व्यक्तींची जीवनचरित्रे लिहून त्यांचे संकलित रूप कोशाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचा ध्यास घेतलेल्या श्रीराम कामत यांचेही चरित्र समजून घेण्यासारखे आहे. जगातील अनेक नामवंतांना सतत भेटत राहिलेल्या कामतांनी त्यांची चरित्रे संकलित स्वरूपात प्रकाशात आणण्याचा संकल्प वयाच्या चाळिशीत केला. मराठीतून विश्वचरित्रकोश निर्माण करण्याची ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी कमालीची जिद्द आणि चिकाटी यांची गरज होती.

    पत्रकारितेचा अनुभव असलेल्या श्रीराम कामतांनी ही जिद्द आणि चिकाटी दाखवून आपल्या या संकल्पाला मूर्त रूप दिले. त्यांच्या या अभिनव कोशाचे पाच खंड प्रकाशित झाले आहेत आणि त्यांचे हे काम आता जगापुढे आले आहे. कविवर्य बा. भ. बोरकर यांचे कामत हे जावई. त्यामुळे साहित्यिकांचा सहवास त्यांना मिळणे स्वाभाविक होते. आपण स्वत: लेखक होण्यापेक्षा लेखकांचीच चरित्रे लिहिण्याचे त्यांनी योजले. गाठीला ‘गोमंतक’ या दैनिकातील नोकरीचा अनुभव होता. पत्रकारितेतील तात्पुरत्या साहित्यात रमण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता आणि लिहिण्याची तर हौस होती. कामतांनी मग स्वत:च ‘मांडवी’ नावाचे मासिक सुरू केले. साहित्य, कला, राजकारण, समाजकारण अशा सगळय़ाच विषयांना प्राधान्य देणाऱ्या या मासिकाचा लौकिक चांगला राहिला, याचे कारण त्यामागे कामतांची दृष्टी होती. मासिकाच्या जोडीला त्यांनी ज्या कामासाठी आपल्या आयुष्यातील उणीपुरी अडतीस वर्षे खर्ची घातली, त्या विश्वचरित्रकोशाचे काम वेगाने होण्यासारखे नव्हतेच. कविवर्य बोरकर यांचे मार्गदर्शन आणि मदत त्यांना मिळत असली, तरीही अशा कोशाच्या कामात आवश्यक असणारी पायपीट कामतांनाच करावी लागत होती. हे काम त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेले असल्याने त्यामुळे होणारी ओढगस्त क्वचित त्यांना सुखाचीच वाटत असावी. कामतांचा स्वभाव अतिशय लाघवी आणि सगळय़ांशी जमवून घेणारा. त्यामुळे या कामात त्यांना मित्र आणि हितचिंतक यांचे मोठे सहकार्य लाभले. पैसे उभे करणे आणि अशा कामात सगळय़ांचे सहकार्य मिळवणे यासाठी आवश्यक असणारा मनमिळाऊपणा कामतांकडे होता, म्हणूनच तर विश्वचरित्रकोशाचे पाच खंड प्रकाशित होऊ शकले. कामत यांना गोव्याच्या गोमंतक मराठी अकादमीने कालिदास पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. याच अकादमीचे ते फेलोही होते. आपल्या मतांबद्दल ते नेहमीच आग्रही असत. मराठी ही गोव्याची सांस्कृतिक भाषा असून तिच्यामुळेच परकीय सत्तेच्या काळात गोव्याचे व्यक्तिगत आणि राष्ट्रीय अस्तित्व टिकून राहू शकले, असे त्यांचे मत होते. मराठी साहित्यात कोशवाङ्मयाचे दालन अनेकांनी समृद्ध केले आहे. श्रीधर व्यंकटेश केतकरांपासून ही परंपरा अधिक देदीप्यमान झाली. केतकरांनी तयार केलेले कोश वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी खाल्लेल्या खस्ता ऐकल्यानंतर कुणाही मराठी सुसंस्कृत आणि सुजाण माणसाची मान लज्जेने खाली जाईल. घरोघरी जाऊन आपल्या कोशाची विक्री करणाऱ्या केतकरांनी केलेल्या प्रयत्नांच्या खांद्यावर श्रीराम कामत यांना आणि त्यांच्या आधीच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महादेवशास्त्री जोशी यांच्यासारख्या दिग्गजांना उभे राहता आले. मराठी माणसाला कोश साहित्याचे महत्त्व कळायला लावण्यात या सगळय़ांचा फार मोठा हातभार आहे, यात शंकाच नाही. कामत यांनी या सगळय़ामध्ये अगदी वेगळे आणि महत्त्वाचे काम केले आहे. जगावर प्रभाव टाकणाऱ्या आणि ज्यांच्या चरित्रातून नव्या पिढीला जगण्याचे इंधन मिळू शकेल, अशा व्यक्तींचे चरित्र, त्यातील बारकाव्यांसह तयार करणे हेच काम फार मोठे आहे. अशा अनेकांच्या चरित्रांचा विश्वकोश तयार करण्याचे शिवधनुष्य श्रीराम कामत यांनी केवळ उचलण्याचे धाडस केले नाही, तर ते समर्थपणे पेलूनही दाखवले. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत असताना, त्यांच्या या कार्याचा दीपस्तंभ यापुढेही सगळय़ांना दिशा दाखवत राहील, असा विश्वासही व्यक्त करायला हवा.

    -------------------------------------------------------------------

    विश्वचरित्रकोशकार श्रीराम कामत

    मराठी विश्वचरित्रकोशकार श्रीराम पांडुरंग कामत

    एक जिद्दी वाङमय अभ्यासक-----

    कामत यांच्या विश्वचरित्रकोशाचे पाच खंड प्रकाशित झाले असून सहाव्या खंडाचे काम चालू होते.

    दिवंगत कवी बा.भ. बोरकर यांचे ते जावई

    कामत यांचा जन्म १७ मे १९३४ रोजी अस्नोडा येथे झाला. सुरुवातीच्या काळात त्यांनी “मांडवी” हे मासिक सुरु केले. कामत यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा “साहित्य विशारद” पुरस्कार मिळाला आहे. २००८ साली गोमांतक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन गोवा सरकारने यंदा त्यांची पदमसाठीही शिफारस केली होती.