प्रबोधनकार सदैव नव्या पिढीबरोबर वाटचाल करीत राहिले याचे कारण ते स्वत: अखेरपर्यंत वृत्तीने ताजे-टवटवीत नि तरुण होते. प्रबोधनकारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जे कर्तृत्व गाजवले ते मोलाचे.
जागतिक कीर्तीचे चित्रपट-कलादिग्दर्शक, चित्रपटदिग्दर्शक व निर्माता नितिन चंद्रकांत देसाई यांचा जन्म ६ ऑगस्ट १९६५ रोजी झाला.
नितिन चंद्रकांत देसाई यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला विद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले.१९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली.
प्रतिभा, प्रयत्न आणि प्रज्ञा या त्रयीच्या जोरावर आपले अढळ स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई!
एका चाळकरी मध्यमवर्गीय मुलानं रुपेरी पडद्यावर हालचाल करणारी चित्रं पाहिली, त्यामागचे भव्य सेटस् पाहिले आणि ते सारं मोहमयी वातावरण पाहताना आपणही असंच माणसाला मोहवून टाकणारं भव्य काही तरी निर्माण केलं पाहिजे असं मनाशी ठरवूनही टाकलं. अडीच खणांच्या खोलीत राहणाऱ्या माणसानं अडीच दशकांनंतर मुंबई-पुणे महामार्गावर चौक-कर्जत रस्त्यावर अडीचशे एकरात ते भव्य स्वप्न साकारलं- एन् डी स्टुडिओ! आज देशातील अग्रगण्य स्टुडिओमध्ये या स्टुडिओची गणना होते.
नितीन देसाई हे भारतीय चित्रपटसृष्टीमधील एक महत्वाचे नाव. गेल्या शतकातील ऐंशीच्या दशकापासून हे नाव छोट्या पडद्याला व मोठ्या पडद्याला आपलं रुपडं देत आलं आहे. भारतातील प्रत्येक मोठा चित्रपट किंवा दूरदर्शनवरील प्रकल्प हा नितीन देसाई यांच्या कलादिग्दर्शनाने सजत असतो. भारत की खोज सारखी ऐतिहासिक महत्वाची मालिका असो किंवा लगान सारखा अफाट चित्रपट असो. त्या प्रकल्पावर नितीन देसाई हे असणारच! त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी खालापूर तालुक्यातील चौकजवळ हा स्टुडीओ उभारायला घेतला. एक भव्य स्वप्न सृष्टी येथे आकाराला येऊ लागली. हा स्टुडिओ मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांपासून समान अंतरावर आणि हमरस्त्याला लागून आहे.
शेजारीच मोरबे धरणाचा सुंदर परिसर, सह्याद्रीच्या डोंगररांगा, वळणदार रस्ते, सहकार्याला कायम उत्सुक असणारे गावकरी आणि नयनरम्य पार्श्वभूमी ही या स्टुडिओची खासियत आहे. आज खालापूर कर्जतचे नाव एक कलापूर या नात्याने सर्वदूर पसरण्यात एन् डी स्टुडिओचा फार मोठा सहभाग आहे. स्टुडिओमुळे खरंतर या संपूर्ण परिसरातील अर्थकारण आणि समाजकारण बर् यापैकी बदललं आहे. या परिसरात भारतातील छोटे मोठे सर्व कलाकार येतात, हजारो जणांना रोजगार मिळतो, याबरोबरच एका व्यवसायाला जोडून अनेक नवनवे जोडधंदे सुरू होत जातात.
एकूणच सारा भाग हा जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे अनेक कंपन्या बंद पडत असताना, एन् डी स्टुडिओमुळे काही प्रमाणात सावरला गेला आहे. आमीर खानचा द रायझिंग हा येथे चित्रित केला गेलेला पहिला भव्य चित्रपट. त्यानंतर या स्टुडिओने मागे पाहिले नाही. मधुर भांडारकर यांचा गाजलेला ट्रॅफिक सिग्नल हा त्यानंतरचा महत्वाचा चित्रपट. १८५७ चा भारला गेलेला कालखंड असेल किंवा मुंबईची अफाट गर्दी वाहून नेणारा गजबजलेला हमरस्ता असेल, तो तेथे साकारला गेला. जोधा अकबर सारखा पिरियड ड्रामा असणारा चित्रपटही येथेच चित्रित झाला. आग्र्याचा भव्य किल्ला येथे दिमाखाने त्यातील सर्व बारकाव्यांसह स्टुडिओमध्ये उभा केला गेला.
ग्रेट कॉमेडी सर्कस, बिग बॉससारख्या अनेक लोकप्रिय आणि भव्य मालिकांचे निर्माण येथे झाले आहे. राजा शिवछत्रपति सारखी भारतीय दूरचित्रवाणीमधील आजवरची सर्वात भव्य मालिका जवळपास संपूर्णपणे येथेच चित्रित झाली. छत्रपतींची राजधानी, त्यांचा दरबार, राजगड, पन्हाळा, रायगड, शिवनेरीसारखे किल्ले उभे केले गेले, आणि ते आजही मालिका संपून गेल्यानंतर त्याच दिमाखात जतन केले गेले आहेत. यासंदर्भात बोलताना श्री नितीन देसाई म्हणाले की, हे सर्व सेट आम्ही निर्माण केले पण ते आम्ही मोडणार नाही, ते तसेच जतन करून ठेवणार, या प्रत्येक सेटला एक ऐतिहासिक महत्व आहे याची जाणीव आम्हाला आहे.
भारतीय कलाइतिहासाची ही सोनेरी पाने आहेत. हा स्टुडिओ म्हणजे लवकरच एक पर्यटन स्थळ म्हणून आम्ही विकसित करणार आहोत. आज अनेकदा ही मयसृष्टी आणि सर्वसामान्य माणसं यांच्यात अंतर पडलेले आपणांस जाणवते. हे अंतर या निमित्ताने कमी होईल आणी कलावंताबद्दलच्या आकर्षणाबरोबरच या कलावंताला आपली कला जोपासायला, पडद्यावरील आपली व्यक्तिरेखा साकारताना किती प्रकारचे कष्ट उपसावे लागतात याची नम्र जाणीव आम्ही करून देऊ शकू. एका दृष्टीने ते लोकशिक्षणच असेल.
आमच्या स्टुडिओमध्ये एकाच वेळी शेकडो कलावंतांची, सहयोगी तंत्रज्ञांच्या राहण्याची, जेवण्याची, अखंड विद्युत पुरवठ्याची आम्ही सोय करू शकतो. आज आमच्या कंपनीचं प्रचंड मोठं असं कार्यालय पवई येथे आहे. एका सामान्य कुटुंबात मी जन्माला आलेलो असल्यामुळे मला माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या लोकांसमोर विनम्र असं उदाहरण ठेवता येतं आहे यासाठी मी परमेश्वराचा आभारी आहे. एन् डी स्टुडिओने आता स्वत:ची कंपनी स्थापन करून नव्या दूरचित्रवाणी मालिका, नवे चित्रपटही घडवायला सुरुवात केली आहे.
राजा शिवछत्रपति या मालिकेच्या निर्मितीबरोबरच तुफान गाजलेल्या महाराणी पद्मिनी, झाशीची राणी या मालिकांची निर्मिती एन् डी स्टुडिओने केली आहे. जगातील सात आश्चर्ये येथे उभी करून ज्यांना ज्यांना ही आश्चर्ये पहाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी त्या सात आश्चर्यांच्या प्रतिकृती येथे उभारल्या जातील, येथे एक जागतिक दर्जाचं म्युझियम बनविण्याचा श्री देसाई यांचा मानस आहे.
एन् डी स्टुडिओ हे एका सामान्य परिस्थितीमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीनं आपल्या जिद्द, चिकाट आणि कला यांच्या सहाय्याने साकारलेलं सत्य-स्वप्न आहे! नितिन देसाई यांच्यावर ‘आधुनिक युगाचा विश्वकर्मा: नितीन चंद्रकांत देसाई’
लेखक मंदार जोशी. हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
नितीन देसाई हे व्यक्तिमत्व एकूणात ‘नाही रे’ वर्गाला भुरळ घालणारं व्यक्तिमत्व आहे. खिशात काहीही नसताना, वरळीच्या चाळीत राहणार्याव एका सर्वसामान्य परिस्थितीतील बँक कर्मचाऱ्याचा हा मुलगा पुढे अवघ्या अडीच दशकात जागतिक कीर्तीचा कर्तबगार कलादिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर बनतो, १०० एकरांच्या एन्. डी. स्टुडिओचा मालक कसा बनतो याचा शोध हा मराठी मनाच्या कुतुहलाचा विषय आहे आणि हे कुतुहल शमविणारं हे पुस्तक आहे.
चित्रपटदिग्दर्शक व निर्माता नितिन चंद्रकांत देसाई (6-Aug-2021)
दिग्दर्शक नितीन देसाई (6-Aug-2017)
#NitinChandrakantDesai
भाऊराव दातार आपल्या अभिनेता करीयर नंतर मेकअप आर्टीस्ट म्हणून काम केले. नंतर ते दादा दातार नावाने ओळखले. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये मेकअप मास्टर म्हणून सेवा केली.
कडेठाणकर, सुचेता
सुचेता कडेठाणकर या पुणेकर युवतीच्या नावापुढे आता ‘पहिली भारतीय व्यक्ती’ असे विशेषण लागले आहे. जे भल्याभल्यांना जमणार नाही असे आव्हान तिने यशस्वीरीत्या पेलले- ते म्हणजे जगातील सर्वात मोठे थंड वाळवंट असलेले मंगोलियातील गोबी वाळवंट पार करण्याचे!
इनमीन पाच फूट उंचीची मूर्ती, पण आपल्या कामगिरीद्वारे तिने स्वत:ची खरी उंची दाखवून दिली. एखाद्या गोष्टीसाठी झोकून देऊन, तिचा सातत्याने पाठपुरावा केल्यावर सर्वकाही साध्य आहे, हे तिने या कामगिरीतून सिद्ध केले. गोबीच कशाला? कोणत्याही वाळवंटातून चालण्यासाठी शरीराचा तर कस लागतोच आणि मनाच्या कणखरपणाचीही कसोटी लागते. अथांग पसरलेल्या गोबी वाळवंटात- जिथे चुकूनच कधीतरी माणसाचे दर्शन होते- सलग ५२ दिवस चालून सुचेताने या दोन्ही कसोटय़ा लिलया पार केल्या. सुचेता तशी मध्यमवर्गीय संस्कृतीत वाढलेली. पुण्यात कसबा पेठेतील वाडय़ात आई, वडील आणि लहान बहीण अशा कुटुंबात वाढली. इतिहास, संस्कृत, मराठी व पत्रकारिता या विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सुरुवातीला दोन वर्षे ‘लोकसत्ता’ साठी काम केले, नंतर मुक्त पत्रकार म्हणून लिहू लागली. पुढे चांगले पैसे मिळवून देणाऱ्या ‘टेक्निकल रायटिंग’ मध्ये प्रवेश केला. विविध आयटी कंपन्यांसाठी ती असे लेखन करू लागली. त्यातून चांगले अर्थार्जन होत असल्याने अशा प्रकारचे छंद पूर्ण करणे सोपे गेले. शाळेत असल्यापासूनच भटकंती, डोंगरवाटा पालथ्या घालणे आणि शरीराचा कस लागणाऱ्या साहसी क्रीडाप्रकारांची आवड! त्यातूनच सह्य़ाद्रीचे कडे-कपारी, हिमालयाच्या रांगा व एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत तिने अशी भटकंती केली. लांब अंतराच्या सायकल स्पर्धा तसेच, पुणे, दिल्ली, मुंबई येथे भरल्यिा जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या मॅरेथॉन्समध्ये तिने अनेकदा भाग घेतला आहे. पुण्यातील खडतर अशा ‘एन्डय़ुरो अॅडव्हेंचर रेस’ चे एकदा विजेतेपदही मिळविले. लेखन व वाचनाच्या छंदाबरोबरच साहसी क्रीडाप्रकारांची आवड जोपासणेही सुरू होते. तिचे करिअर स्थिर होत असतानाच वडिलांचे निधन झाले. त्यांच्याशी तिची खूप मानसिक जवळीक असल्याने तिला हा मोठा आघात होता, पण त्यातून उभी राहून सुचेताने टेक्निकल लेखनाचे करिअर वाढविले. सुरुवातीला ‘एअरटाईट नेटवर्क्स’ व नंतर ‘सिमॅन्टेक’मध्ये तिने विविध पदांवर काम केले. सध्या ती ‘प्रिन्सिपल इन्फर्मेशन डेव्हलपर’ या पदावर तिथे आहे. मधल्या काळात मागे पडलेली साहसी क्रीडाप्रकारची आवड तिने गेल्या काही वर्षांमध्ये वाढविली आणि गोबी मोहिमेची तयारी सुरू केली. त्यासाठी बरेच कष्ट घेतले आणि अखेर एक स्वप्नपूर्ती करून दाखविली. हे सर्व करून दाखविणारी सुचेता अतिशय शांत आहे. तिच्या स्वभावात बडेजाव मिरविणे नाही. त्यामुळे कितीही उंचीवर पोहोचली तरी तिचे पाय जमिनीवरच असतात, मित्र-मैत्रिणींमध्ये ती तितकीच मिळून-मिसळून, खळखळून हसणारी असते. आता आणखीही काही आव्हाने तिच्या मनत घोळत आहेत. ती निश्चितपणे त्यांचा वेध घेईलच.. त्यासाठी सुचेताला भरपूर शुभेच्छा!
लामणदिवा हा १९४७ साली प्रसिध्द झालेला मोकाशी यांचा हा पहिलाच कथासंग्रह. रोजच्या जीवनातल्या साध्यासुध्या प्रसंगांतून आकारणारी लेखकाची कथा सौम्य आणि संयत प्रकृतीची आहे. ह्या पुस्तकात प्रारंभी ‘ पहिली पावले’ ह्या शीर्षकाखाली त्यांनी आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या कालखंडाविषयी लिहिले आहे. तेही कथेइतकेच रंजक आहे.
‘कट्यार काळजात घुसली’ नाटकात पं. वसंतराव देशपांडे यांच्यासमवेत भूमिका साकारण्याची संधी पं. दिनकर पणशीकरांना लाभली. ‘आडा चौताला’ सारख्या कमी प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या २०० बंदिशी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी बहुमूल्य ठेवा मानला जातो.
कार्यकर्ता आणि ज्येष्ठ विचारवंत यांचा अपवादात्मक असा संगम वसंत पळशीकर यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला आहे.
त्यांचा जन्म हैदराबादमधला. महात्मा गांधींच्या चळवळीतील वडिलांच्या संस्कारात ते वाढले. इंटरनंतर शिक्षण सोडून ते सामाजिक कार्याकडे वळले. गांधींजींच्या विचारांचा चिकित्सक स्वीकार त्यांनी केला. आचार्य विनोबा भावे, अण्णासाहेब सहसबुद्धे, साने गुरुजी, रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे यांच्या कार्यात वेळोवेळी सहभागी होत त्यांनी स्वत:ला अधिक समृद्ध केले. भूदान आंदोलन, आनंदवन, ओरिसातील कोरापूर येथे सर्वसेवासंघाच्या कामात त्यांचा सक्रिय वाटा होता.
सन १९५९ मध्ये ते महाराष्ट्रात परतले आणि प्रबोधनाच्या कामाला त्यांनी वाहून घेतले. मात्र हे काम ते प्राध्यापकीय अलिप्तपणे नव्हे, तर व्रत म्हणून पार पाडत आले आहेत. समाज प्रबोधन पत्रिका, नवभारत यांच्यासारख्या वैचारिक नियतकालिकांचे संपादन त्यांनी दीर्घकाळ केले, तसेच कार्यकर्त्यांची शिबिरे, वैचारिक परिषदा-संमेलने यांतही तेवढ्याच कळकळीने मार्गदर्शन केले. देशभरातील परिवर्तनवादी गट, प्रयोगशील संस्था यांना त्यांच्या मांडणीचा लाभ होत आला आहे.
संथ, अनाक्रमक शैली, पण ठाम युक्तिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य. एकांगीपणा, साचेबद्ध गृहितांवर आधारित भोवतालच्या घटितांचा अर्थ लावण्याची खटपट, सखोल चिकित्सेपेक्षा दुसर्याला निरुत्तर करण्यातील आनंद यापासून त्यांचे लेखन आणि संवाद कायम दूर राहिला. त्यामुळेच त्यांची मांडणी अंतिमत: पटो वा न पटो, त्यातून विचाराला चालना देणारी, आपल्या समजांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडणारी निरीक्षणे मिळत नाहीत असे कधी होत नाही. राजकारण, समाजकारण, शिक्षण, साहित्य-कला, विज्ञान, संस्कृती, स्त्री-पुरुष संबंध, चिरंजीवी विकास यासारख्या क्षेत्रांत त्यांनी मूलगामी लेखन केले आहे. समग्रतेचे भान हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. विचारांशी सुसंगत अशीच त्यांची जीवनशैलीही आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांना सच्चेपणा लाभला आहे.
समाजाच्या धारणेच्या, उन्नयनाच्या दृष्टीने किती मोलाचा विचार दिला, ही एखाद्याला 'विचारवंत' संबोधायचे की नाही याची एक कसोटी आहे, असे त्यांनी लिहून ठेवले आहे. या कसोटीला खुद्द पळशीकर उतरतात, असाच निवाडा त्यांचे वाचक करतील. गेली काही वर्षे प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांच्या लेखनात खंड पडला असला, तरी चिंतनात नाही.
महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने मराठी भाषा दिनी वसंत पळशीकर यांचा 'जीवन गौरव' पुरस्काराने केलेला सन्मान हा विचारी मराठीजनांसाठी कृतज्ञता सोहळाच होता.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
आकाश ठोसर हा मराठी चित्रपटसृष्टीत फार कमी वेळात मोठं नाव कमावलेला अभिनेता आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘ सैराट ‘ ह्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमवलेल्या मराठी चित्रपटात त्याला मुख्य अभिनेता साकारण्याची संधी प्राप्त झाली. त्या चित्रपटात त्याने परश्या नामक पात्र साकारले होते.
कसोटी क्रिकेट संपले की क्रिकेटपटू काय करतात? कुणी आपल्या कार्यालयाचे काम इमानेइतबारे करायला लागतो. किमान पूर्वीच्या काळातील क्रिकेटपटू तरी हे करायचे. काही क्रिकेटपटू क्रिकेट प्रशिक्षकाच्या पेशाकडे वळतात. काहींनी समालोचकाचा माईक हातात धरला. काहींनी क्रिकेट अॅकॅडमीज् सुरू केल्या. काहींनी क्रिकेट प्रशासन व्यवस्थेकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. अजित वाडेकरांनी काय केलं?
अजित वाडेकरांनी सर्वप्रथम आपल्या कार्यालयाला न्याय दिला. फावल्या वेळात त्यांनी अपंग क्रिकेटपटूंसाठी संघटन कार्य करायला सुरुवात केली. १९८८ मध्ये अपंग क्रिकेटपटूंची संघटना स्थापन झाली. तेव्हापासून आजतागायत या क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. आज या संघटनेने २३ राज्यांच्या संघटनांना आपल्या कृपाछत्राखाली घेतले आहे. रणजी करंडक, दुलीप करंडक, इराणी करंडक क्रिकेट स्पर्धाच्या धर्तीवर ही संघटना अपंगांसाठी क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करते. ३ वर्षांपूर्वी या संघटनेने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट मालिकेचे आयोजन केले होते.
भारताने ही मालिका जिंकली होती. अपंगांसाठीच्या मिनी वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाचा विचार ही संघटना करीत आहे.अपंग क्रिकेटपटूंच्या या भरारीला पंख देण्याचे काम अजित वाडेकरांनी केले. त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. आयपीएलसारख्या लिगवर करोडो रुपये उधळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघटनेला मात्र अद्याप अपंगांना मदतीचा हात द्यावासा वाटत नाही हे क्रिकेटचे दुर्दैव. सुदैवाने अपंग क्रिकेटपटंना अजित वाडेकरांसारखा मसिहा भेटला. ज्याने आपल्या प्रसिद्धीच्या वलयाचा अपंगांच्या क्रिकेटसाठी वापर केला. आपल्या नोकरीतील पदाचा लाभ अपंगांच्या क्रिकेटसाठी केला.
वाडेकरांच्या या कार्याची दखल सातासमुद्रापलिकडच्या अमेरिकन क्रिकेट संघटनेने घेतली. त्यांना ‘हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांनी स्थान दिले. सर गारफिल्ड सोबर्स, विवियन रिचर्डस, मायकेल होल्डिंग, सुनील गावसकर यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूंच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांनी अजित वाडेकरांना बसविले. १९७१ ला वेस्ट इंडिजला कॅरिबियन द्विपसमूहात मालिकेत पराभूत करता येते हे स्वप्न वाडेकरांनी प्रत्यक्षात उतरविले होते. ब्रिटिशांना त्यांच्याच भूमीवर मालिकेत लोळविण्याचा पराक्रम वाडेकरांच्या भारतीय संघाने केला होता.
१९७१ नंतर भारतीय क्रिकेट संघाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन वाडेकरांनी बदलायला लावला. अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला, वाडेकरांनी प्रशिक्षक बनून तब्बल साडेतीन वर्षे विजयी संघ बनविले. वाडेकरांच्या यशाचा तो परिसस्पर्श सुदैवाने अपंग क्रिकेटपटूंनाही लाभला. वाडेकरांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा मदर टेरेसा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवार्ड’ हा पुरस्कार देण्यात आला.
सातासमुद्रापलिकडच्या लोकांना वाडेकरांमध्ये दिसले ते आपल्या इथल्या लोकांना दिसले नाही हे मोठे दुर्दैव आहे. मोदी यांची प्रकरणे आणि भ्रष्टाचाराच्या अन्य गोष्टींनी कलंकित झालेल्या भारतीय क्रिकेटला गरज आहे ती जुन्या, बुजूर्ग क्रिकेटपटूंना मानसन्मान देण्याची. विनू मांकड, विजय हजारे, र्मचट, अमरनाथ, यांच्यासारख्या क्रिकेटपटूंच्या स्मृती जतन करून ठेवण्याची; त्यांची स्मारके उभी करण्याची. अजित वाडेकरांच्या कार्याचा, क्रीडाकौशल्याचा गुणगौरव अमेरिकेत होऊ शकतो, मात्र त्यांच्या कर्मभूमीत मुंबईत का नाही? मुंबईच्या क्रिकेटने देशाला महान क्रिकेटपटू दिले. त्या महान क्रिकेटपटूंची ओळख भावी पिढीला कायमस्वरुपी राहावी याकरिता मुंबई क्रिकेट असोसिएशनने ‘हॉल ऑफ फेम’च्या धर्तीवर काहीतरी उभे करण्याचीगरज आहे.
पदाधिकाऱ्यांच्या फोटोच्या गर्दीत हरविलेल्या क्रिकेटपटूंना पुढे आणण्याची गरज आहे. अजित वाडेकरांना मुंबई क्रिकेट संघटना विसरली. पण क्रिकेटची फारशी ओळख नसलेल्या ठिकाणी त्यांच्या नावाची पूजा बांधली जाते. हा विजय कुणाचा? अजित वाडेकरांच्या कर्तृत्वाचा तो निश्चितच गौरव आहे. त्यांना पुरस्कार देणाऱ्या संस्थेच्या विशाल दृष्टीकोनाचा तो एक पुरावा आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यासारख्या संघटनांमधील दूरदर्शीपणाच्या अभावाचे ते एक द्योतक आहे.
तरुण संगीतकार कौशल इनामदार हे पं.सत्यशील देशपांडे यांचे शिष्य. कौशल इनामदार आपल्या गुरु बद्दल सांगताना म्हणतात, गुरु अंतर्दृष्टी देतो ती फक्त कलेकडे पाहण्याची नाही तर जगण्याकडे पाहण्याची. त्यांनी गाण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. ते स्वतः कुमारजींचे शिष्य.
Copyright © 2025 | Marathisrushti