(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • लीला भोसले

    भोसले, लीला

    लढवय्या साम्यवादी चळवळीतील आपल्या साथीदाराचा संसार नेटाने चालवताना डाव्या चळवळीमध्येही योगदान देणाऱ्या त्या तिघीजणी. एकाच पक्षाशी म्हणजे लाल निशाण पक्षाशी बांधिलकी असलेल्या या तीन रणरागिण्यांचे अवघ्या काही दिवसांच्या अंतराने निधन झाले आणि एक पर्व संपले.
    लीला भोसले म्हणजे पूर्वाश्रमीच्या लीला चव्हाण. लाल निशाण पक्षाचे नेते यशवंत चव्हाण यांच्या त्या भगिनी. रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या लीलाताईंचा वावर सुरू झाला की आपोआपच स्वयंशिस्तीची आणि स्वावलंबीपाणाची झुळूक फिरायला लागायची.

    भावाच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या राजकीय मार्गदर्शनामध्येच त्या चळवळीमध्ये आल्या. त्यासाठी त्यांनी दहावीनंतर शाळा सोडून दिली. शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन पिकेटिंग करणे, प्रभातफेऱ्या काढणे यामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांना कधी तुरुंगवास झाला नसला तरी तुरुंगामधील राजबंद्यांना बाहेरचे निरोप पोहोचवण्याचे काम त्या करीत असत. कोल्हापूर हे संस्थान असल्याने चळवळीतील स्त्रियांच्या भागीदारीवर थोडय़ा मर्यादा होत्या. तरीही सुशीला कुलकर्णी, विमल चव्हाण, सुमन कात्रे, लीला फडके (पाटील), सरल राशिंगकर (नाईक), प्रभा राशिंगकर, शशिकला सबनीस यांच्यासमवेत लीलाताई विविध राजकीय कामे करण्यात पुढे असत. स्त्री शिक्षण, जातिभेदविरोधी कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता. लीलाताईंचे वडील (व्ही. जी. चव्हाण) कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये निस्पृह न्यायाधीश म्हणून ओळखले जात. त्यांनी कधी आपल्या मुलांना चळवळीमध्ये जाण्यापासून रोखले नाही. लीलाताईंच्या राजकीय कार्यामध्ये त्यांच्या सासर आणि माहेरचा मोठा वाटा होता. लीलाताईंचे सासरे कै. डी. बी. भोसले हे साखर कारखान्याचे इस्टेट मॅनेजर असल्याने त्यांचा कामगार चळवळीशी संबंध होता. चळवळीत वॉरंट असलेल्या कार्यकर्त्यांला आपल्या घरात आश्रय देणे हे जोखमीचे काम लीलाताईंनी आपले आईवडील, सासूसासरे, मोठी बहीण शकुंतला, तिचे पती एस. जी. पाटील यांच्या मदतीने केले. १९४७ मध्ये कॉ. आप्पासाहेबांबरोबर विवाह झाल्यावर त्या पुण्याला आल्या. पुणे महानगरपालिका युनियनच्या कामकाजात सहभागी झाल्या. लाल निशाण पक्षाच्या ‘लाल निशाण’ या पाक्षिकाच्या व्यवस्थापन आणि प्रकाशनाची जबाबदारी त्या सांभाळत होत्या. माणसाचे गुण हेरून त्याला पोषक असे वातावरण तयार करणे हा त्यांचा गुण होता. १९८० मध्ये त्यांनी मोलकरणींची संघटना स्थापन केली. त्यासाठी त्यांनी पुण्यातल्या सगळ्या झोपडपट्टय़ा पालथ्या घातल्या आणि त्यांचे प्रश्न समजावून घेतले. संघटित आणि सामुदायिक नेत्तृत्व तयार करणे यावर त्यांचा अधिक भर होता. वार्धक्य आणि आयुष्यभर चळवळीत खालेल्या खस्ता यामुळे शरीर थकले तरी मन थकले नव्हते. कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी जीवन वाहिले होते.

  • गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार

    “गंधर्व भूषण” जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान. चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये "गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते.

    जयराम शिलेदार यांचा जन्म ६ डिसेंबर १९१६ रोजी झाला. घरचा सराफीचा व्यवसाय चांगला चालत होता. आजोबांच्या हातून घडलेल्या तोडे, बाजूबंद, पैंजणादी अलंकारांना आजूबाजूच्या संस्थानांतील राजघराण्यांतून मागणी असे. संगीताच्या सुरांशी या घराचा काहीही संबंध नव्हता. पण तत्कालीन प्रथेप्रमाणं प्रतिष्ठेचा प्रघात म्हणून कर्णेवाला ग्रामोफोन आणि गाजलेल्या कलाकारांच्या ध्वनिमुद्रिका घरात आल्या. खोडकर जयराम सतत खेळत असे. पण ग्रामोफोनच्या कुतूहलाने जयरामाचे पाय घरात रेंगाळू लागले. रेकॉर्ड्स ऐकत त्यांचं अनुकरण करता करता छोटय़ा जयरामला सूर गवसला.

    निसर्गत: उत्तम आवाज, गळ्याला चांगली फिरत, प्रभावी आकलनशक्ती यामुळं त्याला संगीताचा चांगलाच नाद लागला. सर्वाना जयरामचे गाणे आवडू लागले. गल्लीतल्या गणेशोत्सवात हौशी मंडळींनी ‘स्वयंवर’ नाटक बसवायचा घाट घातला. गाणाऱ्यांची वानवा असल्याने पदं कटाप करून गद्य नाटक करायचं ठरलं. ग्रामीण बोलीमुळे ‘सयेंवर’ नाटक तुफान विनोदी वाटू लागलं. उपस्थित प्रेक्षक हुर्यो करू लागले की शिलेदारांच्या जयरामला रंगमंचावर ढकललं जाई.. ‘कंचंबी कृष्नाचं गान गाऊन सोड.’ पण नाटकाशी संबंध नसलेलं ‘राधेकृष्ण बोल मुखसे’ हे पद जयराम यांनी सुरू करताच उधळलेले प्रेक्षक शांत झाले आणि आवडीनं पद ऐकू लागत. त्यांनी टाळ्या व ‘वन्स मोअर’ने जयरामला डोक्यावर घेतले. बाल जयरामने गद्य ‘स्वयंवर’ संगीत करण्याची ही घटना म्हणजे भावी काळात संगीत रंगभूमीची धुरा वाहण्याचं अवघड कार्य त्यांच्या हातून होणार याची नांदी होती. .

    सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर जयराम शिलेदार यांना शाळेचा कंटाळा आला. लिहिता-वाचता आलं, हिशेब करता आला की शाळेत जायलाच पाहिजे हे बंधन सैल होई. वडिलोपार्जित सराफी व्यवसायात जयराम यांनी यावं असं आजोबांना वाटत असे. पण त्यात जयराम यांचं मन अजिबात रमलं नाही. मग एका वकिलाकडं कारकुनी करायला त्यांना पाठवलं गेलं. तिथंही त्यांचे गाणं गुणगुणणं चालूच होते. ‘सयेंवर’च्या चमत्कारानंतर आजोबांनाही वाटू लागलं, की हा पोरगा नाटकातच नाव काढील; तर आपणच त्याला नाटक मंडळीत भरती करू. त्या काळात ही गोष्ट आगळीच म्हणावी लागेल.

    बेळगावात मुक्कामाला आलेल्या रघुवीर सावकारांच्या रंगदेवता हिंदी-उर्दू-मराठी थिएट्रिकल कंपनीत आजोबांनी जयराम यांना दाखल केलं. पूर्वीच्या नाटक मंडळ्या म्हणजे नाटय़विद्यालयेच असत. भावी कलाकारांना संगीत आणि नाटय़ाचं पद्धतशीर शिक्षण देण्यात तिथं कसूर होत नसे. सुरुवातीचं नमन म्हणण्यासाठी स्त्रीवेश धारण करून हात जोडून उभं राहण्याचं काम त्यांनी सहा महिने केलं. मग छोटय़ा भूमिका करत एका वर्षांत जयराम यांनी धैर्यधराच्या भूमिकेपर्यंत झपाटय़ानं मजल मारली. त्यावेळी त्यांचं वय होतं अठरा वर्ष..

    मूकपटाचं बोलपटात रूपांतर झाल्यावर नाटकाचा प्रेक्षक चित्रपटांकडं वळला. नाटक मंडळ्या बंद पडू लागल्या. रंगदेवता नाटक मंडळी बंद होताच त्यांनी ‘राजाराम संगीत मंडळी’, ‘नवजीवन संगीत नाटक मंडळी’ या संस्थांत कामं केली. राजाराम संगीत मंडळीत त्यांना चिंतुबुवा गुरव, गणपतराव बोडस यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. किर्लोस्कर मंडळीच्या पठडीचं शिक्षण मिळाल्याने जयराम यांची कामगिरी उठावदार होऊ लागली. नंतर त्यांना गंधर्व नाटक मंडळीचं बोलावणं आलं. त्यांच्या दृष्टीनं हा भाग्ययोग होता. बालगंधर्व म्हणजे त्यांचं परमदैवत. गंधर्वाच्या सुरांनी मोहून गंधर्व-गायकी आत्मसात करणारे अनेक होते, पण जयराम शिलेदार वेगळेपण हे- की त्यांनी गंधर्ववृत्तीचं अनुसरण केलं. संगीत नाटक कसं पेश करावं, त्यासाठी जीवन कसं झोकून द्यावं, हे त्यांना गंधर्वाकडून शिकायला मिळालं. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी संगीत नाटकाची पताका फडकवीत ठेवली.

    वयाच्या १६ व्या वर्षी रंगदेवता रघुवीर सावकारांच्या कंपनीत त्यांनी नाट्यकलेचा श्रीगणेशा केला. नंतर गंधर्व नाटक मंडळींमध्ये नटसम्राट बालगंधर्वांबरोबर नायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपटात ललिता पवार, सुमती गुप्ते, तर नाटकात हिराबाई बडोदेकर, शांता आपटे, मीनाक्षी, जयमाला शिलेदार यांच्याबरोबर त्यांची कारकीर्द गाजली. गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते यांचे मार्गदर्शन मिळाले. पुढे "मराठी रंगभूमी‘सारखी संस्था उभी केली. ४५ हून अधिक संगीत नाटकांचे सहा हजारहून अधिक प्रयोग केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत नाटकाची पताका फडकवत ठेवली.

    राम जोशी यांच्यात जीवनावर आधारीत व्ही. शांताराम आणि बाबुराव पेंटर यांनी दिग्दर्शीत केलेला 'लोक शाहीर राम जोशी' हा चित्रपट १९४७ साली प्रदर्शित झाला. त्या चित्रपटामध्यें जयराम शिलेदार यांनी राम जोशी यांची तर हंसा वाडकर यांनी बयाची भूमिका साकारली होती.

    'जिवाचा सखा'मधील त्यांची भूमिकाही विशेष गाजली. १९४७ मध्ये डॉ. भालेराव यांच्या नाटय़महोत्सवातील 'धरणीधर' या नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्यासमवेत जयमाला यांनी पहिल्यांदा काम केले. तर 'शाकुंतल' नाटकामध्ये त्या शिलेदार यांच्या नायिका होत्या. १० ऑक्टोबर १९४९ रोजी जयराम शिलेदार, नारायणराव जाधव आणि प्रमिला जाधव यांनी मराठी रंगभूमी संस्थेची स्थापना केली. २३ जानेवारी १९५० रोजी जयराम शिलेदार यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या जयमाला शिलेदार झाल्या.

    जयमाला आणि जयराम शिलेदार यांचा संगीत नाटक हाच प्राण आणि सर्वस्व होते. संगीत रंगभूमीसाठी त्यांनी अपार कष्ट केले, पण त्याचा गाजावाजा कधीही केला नाही. संगीत रंगभूमीची सेवा ही त्यांनी निर्मोहीपणे केलेली नटराजाची सेवा होती. संगीत सौभद्र, सुवर्ण तुला, संशय कल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, शाकुंतल, मृच्छकटिक, मानापमान, ही एककाळ लोकप्रियतेचा कळस गाठलेली नाटके या दोघांनी सातत्याने रंगभूमीवर सुरू ठेवली. नव्या युगात संगीत रंगभूमीचा प्रेक्षकवर्ग कमी झाल्यामुळे, ही नाटके चालणार नाहीत, हा समजही त्यांनी खोटा ठरवला.

    कोल्हापूर, सांगली, सोलापूर या शहरात संगीत रंगभूमीचे महोत्सव होत. काही महोत्सवाच्या सर्व नाटकांची तिकीट विक्री पूर्ण झाल्यावर, रसिकांना नाट्यगृहात बसायलाही जागा उरत नसे. तेव्हा अनेक रसिकांनी जमिनीवर बसून संगीत नाटकांचा आनंद लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. संगीत नाटक रसिकांनी या दोन्ही शिलेदारांवर अफाट प्रेम केले. हे प्रेम आणि संगीत रसिकांचा प्रतिसाद हेच त्यांचे खरे भांडवल होते. रसिकांची प्रशंसा हाच आपला सन्मान, असे हे दोघेही कृतज्ञपणे सांगत असत.

    'मराठी रंगभूमी' ही संगीतनाट्य संस्था स्थापन करून त्यांनी अनेकांची कारकीर्द घडविली. जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर "गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट' ही संस्था स्थापन करून जयमालाबाईंनी कलावंतांना घडवायचे कार्य केले होते.

    जयराम शिलेदार यांचे ६ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.

    जयराम शिलेदार यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

    “गंधर्व भूषण” जयराम शिलेदार (6-Nov-2016)

    “गंधर्व भूषण” जयराम शिलेदार (6-Nov-2017)

    गंधर्वभूषण जयराम शिलेदार (6-Dec-2017)

    गंधर्वभूषण जयराम शिलेदार (10-Nov-2019)

    ‘गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार (12-Jun-2019)

    आज “गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांची जयंती (6-Dec-2016)

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • (डॉ.) राजाराम देशमुख

    कृषिप्रधान असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशात कृषी विद्यापीठांची स्थापना केली. तेव्हा कृषीक्षेत्रात नव्या संशोधनाची आवश्यकता होती, तशीच हे संशोधन सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहचण्याचीही गरज होती. नेहरूंच्या मनातले हे स्वप्न साकार करण्यासाठी ज्या ज्या कृषी तज्ज्ञांनी अथक प्रयत्न केले, त्यामध्ये राहुरी कृषी विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी जे कष्ट केले आहेत, त्याला तोड नाही.

    उद्योगाच्या क्षेत्रात संशोधन आणि त्याचा प्रत्यक्ष वापर ही साखळी इतकी कमी कालावधीची आहे की, जगात कोणतेही नवे संशोधन होताच, त्याचा दैनंदिन जीवनात तातडीने वापर कसा करता येईल, याचा विचार उद्योगक्षेत्रातील सगळेचजण करत असतात. मात्र भारतातील कृषी विद्यापीठे आणि सामान्य शेतकरी यांच्यातील दुरावा बराच काळ तसाच राहिला. त्यामुळे कोणत्याही पिकाचे नवे वाण तयार करण्यात यश मिळाले, तरी त्याचा प्रत्यक्ष वापर होण्यासाठी बराच कालावधी जावा लागत असे. डॉ. देशमुख यांनी कृषी विद्यापीठे ही शेतकऱ्यांची तीर्थस्थाने कशी होतील, याकडे लक्ष दिले. राहुरी कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांची पंढरी झाली, याचे कारण शेतकरी आणि संशोधक यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट. त्यासाठी शेतकरी शास्त्रज्ञ मंच, कृषी तंत्रज्ञान सप्ताह, इंटरनेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरबसल्या सल्ला असे अनेक उपक्रम डॉ. देशमुख यांनी यशस्वीरीत्या राबवले. त्यांना भारतातल्या शेतकऱ्यांची मानसिकता चांगलीच ठाऊक आहे. हे संशोधन शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरत नाही, तोवर त्याला प्रतिसाद मिळणे कठीण आहे, याची जाणीव त्यांना होती. हरभऱ्याचे पीक घेताना येणारे उत्पादन वाढण्यासाठी त्यांनी केलेले संशोधन अक्षरश: वरदान ठरले आहे.

    फुले जी-५, फुले जी-१२, विजय, विशाल, विराट, विहार, दिग्विजय या हरभऱ्याच्या जाती त्यांनी विकसित केल्या. पूर्वी हरभऱ्याचे उत्पादन फार कमी येत असे. या नव्या वाणानंतर त्यात तिपटीने वाढ झाली. कडधान्यांच्या उत्पादनाची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची देशपातळीवर प्रशंसा झाली. सध्याच्या शेतीची चौकट बदलण्यासाठी शेतकऱ्याची मानसिकता बदलणेही आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन, त्यांनी जगात येऊ घातलेल्या जैवतंत्रज्ञानाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी एका स्वतंत्र प्रयोगशाळेची उभारणी केली. खासगी कंपन्यांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या क्षेत्रावर जीएम बियाणे विकसित करण्याचे त्यांचे प्रयोग पर्यावरणवाद्यांच्या दृष्टीने वादग्रस्त ठरले आणि कोल्हापूरच्या केंद्रावर हल्लाही झाला. त्यावेळी शास्त्रज्ञांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहत ते केंद्र सुरू राहील याची दक्षता त्यांनी घेतली. सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्राला असलेल्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी खासगी उद्योगांच्या मदतीने प्रयोग सुरू केले.

    महिको, मोसॅन्टो, जैन, पारस, महिंद्रा, कोरसपाइप यांच्यासह अनेक कंपन्यांच्या मदतीने कृषी क्षेत्रातील संशोधनास चालना देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी सुरू केला आणि त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला. जगाला भेडसावणाऱ्या तापमानवाढीचा कृषी क्षेत्रावर सर्वात मोठा परिणाम होऊ शकेल, हे लक्षात घेऊन डॉ. देशमुख यांनी नवी पीकपद्धती (क्रॉप पॅटर्न) विकसित करण्याची योजना आखली आहे. सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेतीबाबत टोकाचा आग्रह न धरता मध्यममार्ग अनुसरून शेतकऱ्याचे हित पाहणारे ते आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत. स्वत:च्या गुणवत्तेवर पीएच.डी.पर्यंत मजल मारणारे डॉ. देशमुखांचा, शालेय शिक्षणात कृषी हा विषय समाविष्ट व्हायला हवा, असा आग्रह आहे. राष्ट्रीय कृषी संशोधन परिषदेने राहुरी कृषी विद्यापीठाला सवरेत्कृष्टतेचे प्रमाणपत्र देऊन त्यांच्याच कार्याचा गौरव केला आहे. जगातील अनेक मान्यवर पुरस्कारांचे धनी असलेले डॉ. राजाराम देशमुख निवृत्त झाले ते केवळ नियमानुसार. या नंतरही त्यांचे कार्य असेच जोमदार असेल, अशी कामना देशातील सगळेच शेतकरी करतील, यात शंका नाही.

  • संत गुलाबराव महाराज

    विदर्भातील एक सत्पुरूष. बालपणापासून ज्ञानेश्वरीचा व्यासंग. भरतातील नानाविध धार्मिक संप्रदाय; हिंदू, बौध्द, जैनाधी भारतीय धर्म आणि ख्रिस्ती, मूसलमानादी सर्व अभारतीय धर्म, वैदिक धर्माच्याच एकेका अंशावर स्थित आहेत, असे समन्वयात्मक विचार त्यांनी प्रतिपादन केले.

  • चंद्रकांत देवताले

    अब मुद्दत बाद सुना है की दिन रात लिख रहा है

    संभालकर- चिडीयों के जवाब, खोल दिया है उसने बीचोंबीच आकाश के, मँझरात एक डाकघर
    हिंदीतील ज्येष्ठ कवी चंद्रकांत देवताले यांच्या ‘पत्थर फेंक रहा हू’ या गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहातील ही कविता त्यांच्या प्रतिभेचा आणि अनोख्या प्रतिमा योजनांचा अविष्कार घडवते.

    अन्य भाषांतील दर्जेदार साहित्याचा मराठी अनुवाद करण्याची परंपरा काही वर्षांत ‘पॉप्युलर’ झाल्याने मराठी रसिकांनी देवतालेंच्या प्रतिभेची केव्हाच दखल घेतली आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ देवतालेंना शनिवारी नाशिकमध्ये देण्यात आला. त्यापूर्वी हिंदीतील ज्येष्ठ कवींनी एकत्र येऊन सुरू केलेला पहिला ‘कविता समय’ हा पुरस्कारही त्यांना देण्यात आला. वयाची पंच्याहत्तरी गाठलेल्या देवतालेंना आजवर अनेक पुरस्कार लाभले आहेत. मात्र हे पुरस्कार त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचे आहेत.

    भूखंड तप रहा है, पत्थर की बेंच, इतनी पत्थर रोशनी आदी ११ काव्यसंग्रह गाठीशी असणाऱ्या या कवीला सन्मानित करावे, असे साहित्य अकादमीला अद्याप वाटले नाही. हा कवी खरं तर ज्ञानपीठ पुरस्काराच्या योग्यतेचा. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवरील जौसखेडा येथे जन्म झालेले देवताले मराठीला मावशीची बोली मानतात. मराठी कवितेतील नवे-जुने प्रवाह त्यांना ज्ञात आहेत. नामदेव ढसाळ, चंद्रकांत पाटील आणि कै. दिलीप चित्रे यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री. त्यामुळेच चित्रेंच्या काही कविता त्यांनी हिंदीत नेल्या तर देवतालेंच्या कविता चंद्रकांत पाटील यांनी ‘तिची स्वप्ने’ या काव्यसंग्रहाद्वारे मराठीत अनुवादीत केल्या आहेत. हे कमी म्हणून देवताले यांनी संत तुकारामांच्या दीड एकशे अभंगांचा अनुवाद हिंदीत येऊ घातला आहे.

    मराठीशी असलेल्या या जवळीकीमुळे चव्हाण विद्यापीठाने केलेला गौरव देवतालेंना सुखावून गेला असेल. शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून निवृत्त झालेला हा कवी डाव्या विचारसरणीशी बांधिलकी मानतो. स्त्रीच्या विविध भूमिका-नाती आणि प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करणारा सर्वसामान्य माणूस देवतालेंच्या कवितांच्या केंद्रस्थानी असतो आणि म्हणूनच त्यांचा हात आजही लिहीता आहे. हिंदीतील शीर्षस्थ कवी गजानन माधव मुक्तीबोध यांना केवळ गुरूस्थानी न मानता त्यांच्या काव्यावर पीएचडी करण्याची कामगिरी देवतालेंनी केली आहे.

    आधुनिकतेच्या रेटय़ात हरवत चाललेला साधेपणा या कवीला अस्वस्थ करतो आणि त्यामुळेच ते तुमच्या-आमच्यातील होऊन जातात. शासकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापकीपासून प्राचार्यपदाचा अनुभव घेतलेल्या या कविचे सभोवतालच्या सामाजिक बदलांबाबत अखंड चिंतन सुरू असते. या चिंतनाला उपजत प्रतिभेची जोड मिळते आणि अस्वस्थ करणाऱ्या शब्दांच्या लडी उलगडत जातात. या चिंतनामुळेच वयाच्या या टप्प्यावरही त्यांची सृजनशीलता अखंडपणे टिकून आहे. याच अस्वस्थतेमुळे लेखणी म्यान करून वयाच्या ज्येष्ठतेची साथ घेऊन मोठेपणा वसूल करणे त्यांना मान्य नाही. विचार ठासून मांडणारे विचारवंत व्यक्तीगत पातळीवर दांभिकही असतात.

    आत्मपरिक्षणाचे त्यांना वावडे असते. देवताले मात्र स्वत:ला ही संधीही देत नाहीत. सर्वसामान्य माणूस सर्वार्थाने सबल होण्याचे स्वप्न पहाणाऱ्या या कवीला याच सर्वसामान्यांपासून आपण लांब गेल्याची जाणीव आहे, हे त्यांचे वेगळेपण!

  • डॉ. सच्चिदानंद शेवडे

    स्विट्झर्लंडमधील माउंट टिटिलिस या युरोपातील सर्वोच्च शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान देण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नांवावर जमा आहे.

  • राहुल देशपांडे

    राहुल देशपांडे हा मराठी शास्त्रीय संगीतसृष्टी मधील एक ताजा व भावपुर्ण आवाज.

  • डॉ. दिनकर साळुंके

    प्रतिजैविकांना दाद न देणारे रोग व रोगांचे बदलते स्वरुप यामुळे मानसाच्या शरीरातील प्रतिकारशक्तीचा अभ्यास दिवसेंदिवस महत्त्वाचा ठरत आहे. भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या दिल्लीतील संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. दिनकर साळुंके यांनी या क्षेत्रात भरीव असे संशोधन केले आहे. बेळगावजवळच्या हिंडलगा खेड्यातून मोठे झालेले डॉ. साळुंके आज त्यांच्या संशोधनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहेत...

    बायोटेकचा बादशहा

  • गजानन पांडुरंग परचुरे (ग.पां.परचुरे)

    परचुरे प्रकाशन मंदिर या मराठी साहित्य विश्वातील सर्वात जुन्या व जाणत्या प्रकाशन संस्थेचे गजानन पांडुरंग परचुरे उर्फ ग.पां. परचुरे हे संस्थापक होते.

    स्वातंत्र्यवीर सावरकर व आचार्य अत्रे या दोन महापुरूषांचे निस्सीम भक्त असल्यामुळे त्यांनी या दोघांच्या जीवनसंघर्षांवर आधारित असलेली व त्यांचे व्यक्तित्व उलगडवून दाखवणारी अनेक दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली आहेत. व्यावसायिकतेचे गणित डोक्यात नसूनही रसिकांना सतत नवीन वाङ्मय वाचायला देण्याची जिद्द असल्यामूळे, परचुरेंनी साहित्यविक्रीचा उच्चांक गाठला होता.

  • डॉ. प्रियदर्शन मनोहर

    डॉक्टर प्रियदर्शन मनोहर हे एक प्रतिभावंत मराठी लेखक आहेत. त्यांच वास्तव्य हे परदेशात असून सध्या ते मराठी मंडळ या पिटसबर्ग या संस्थेसाठी लेखक म्हणुन काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेल्या विपुल लेखनाला अमाप प्रसिध्दी मिळाली असून त्यांच्याभोवती गेल्या काही वर्षांमध्ये प्रसिध्दीच एक वलयच निर्माण झालय. सातासमुद्रापल्याड, मराठीचा कलात्मक तसेच वैचारिक प्रसार व प्रचार करणारा हा गुणी कलाकार, गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या वेगळ्या व स्वतंत्र लेखनशैलीची रसिकांवर छाप पाडण्यात विलक्षण यशस्वी ठरला आहे लघुकथा हा जरी प्रियदर्शनांचा आवडता प्रांत असला तरी सांगितीक नाटकांच्या लेखना व सादरीकरणापासून ते विनोदी, मनोरंजन कथा लिहीण्यापर्यन्त सार्‍याच गोष्टी त्यांना उत्तम जमतात. संसार व्हर्जन 2 हा त्यांनी सादर केलेला अतिशय रंजक असा सांगितीक एकपात्री प्रयोग चांगलाच गाजला. त्यांनी लिहीलेल बहुतांशी साहित्य हे मराठी मंडळातर्फेच प्रकाशित केल जात. त्यांच्यामधील अष्टपैलु, काहीसा भावनाप्रधान पण तेवढाच मिश्कील असा लेखक वाचकांमध्ये चांगलाच रूजला असून त्यांच्या यशाच हेच तर गमक आहे.