(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • आनंद इंगळे

    आनंद इंगळे हा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. आतापर्यंत त्याने बऱ्याच मराठी चित्रपटात आणि नाटकांत काम केले आहे. तो मराठी सिनेसृष्टीपुरता मर्यादित न रहाता हिंदी सिनेमासृष्टीत मुशाफिरी करू लागला आहे. त्याचा “Daddy” हा हिंदी सिनेमा बहुचर्चित ठरला.

  • नरेंद्र बेडेकर

    काही व्यक्ती या अशा असतात ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा रुबाब हा समोरच्याला चटकन आपलसं करुन घेतो. असंच ठाण्यातलं एक रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ निवेदक नरेंद्र बेडेकर होय.

  • माधव श्रीहरी अणे (लोकनायक बापूजी अणे)

    विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे. ह्यांचा जन्म २९ ऑगस्ट १८८० साली झाला. त्यांच्या घराण्याचे मूळ नाव वणी. त्यांचे आजोबा हे वैदिकी होते. त्याचे लहानपणापासूनच संस्कार अणे यांच्यावर झाले.

  • शंकर गोवारीकर

  • गजानन सरपोतदार

    गजानन सरपोतदार हे राजकारणीही होते. गं.नी. जोगळेकर यांच्याविरुद्ध ते निवडणुकीला उभे होते, पण थोड्या मतांनी हरले.

  • ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे

    ज्येष्ठ गायिका आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म ११ मे १९१४ रोजी गोव्यातील बांदिवडे गावी झाला.

    आपल्या अथक परिश्रमांच्या बळावर ज्यांनी ‘स्वरज्योत्स्ना’ असं नावं मिळवलं.
    त्या गायला लागल्या, की वाद्यं आपोआप झंकारायला लागत, असं म्हटलं जात असे. गायिका म्हणूनच नव्हे, तर अभिनेत्री म्हणूनही नाव कमावलेल्या जुन्या पिढीतील कलावंत ज्योत्स्ना भोळे.

    ज्योत्स्ना भोळे यांना अभिनया प्रमाणे आवाजाची दैवी देणगी होती. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा खास आवाज होता. ज्योत्स्ना केशव भोळे या पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळेकर होत. त्यांचा जन्म गोव्यातल्या बांदिवडे या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव वामन केळेकर होते. एकूण चौदा भावंडांपैकी त्या एक होत्या. त्यांना गाण्याचे उपजतच अंग आणि फार वेड होते.
    वयाच्या आठव्या वर्षी पहिल्या दोन इयत्ता बांदिवड्याच्या शाळेत पूर्ण करून दुर्गा आपल्या थोरल्या गायिका भगिनी गिरिजाबाई यांच्यासह मुंबईत वास्तव्यास आल्या. संगीत शिक्षणासाठी मुंबईस येणे भागच होते. त्या लॅमिंग्टन रोडवर राहत असत व तिथल्याच महानगरपालिकेच्या शाळेत त्यांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतले. संगीत हेच मुख्य ध्येय असल्याने त्यांनी शाळा सोडली.

    गिरिजाबाई आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गवई खाँसाहेब विलायत हुसेन यांच्याकडे तालीम घेत असत. ज्योत्स्नाबाईही आग्रा घराण्याचे खादिम हुसेन खाँ यांची तालीम घेऊ लागल्या. मुंबईत शालेय, आंतरशालेय गायनस्पर्धांमध्ये नेहमीच पहिला नंबर पटकावून त्यांचे बरेच नाव झाले होते. ‘बॉम्बे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ या आकाशवाणीवर ज्योत्स्नाबाई महिन्यातून तीन-चार वेळा गात असत. बालगायिका म्हणून त्या खूपच प्रसिद्ध झाल्या. तेराव्या-चौदाव्या वर्षापर्यंत त्या रागदारी संगीतातही उत्तमपणे पारंगत झाल्या.

    याच सुमारास महाराष्ट्रात, खास करून मुंबईत काव्यगायन, त्यातूनच निर्माण होऊ पाहणारे ‘भावगीत’ हा गानप्रकार मूळ धरू लागला होता. केशवराव भोळे हे यात अग्रेसर असून, भावगीत गायक म्हणून संगीत शौकिनांमध्ये चांगलेच प्रसिद्ध व लोकप्रिय होते. त्यांच्या नाट्यपदांनी त्यांनी अगोदरच नाव मिळविले होते. केशव ‘एकलव्य’ या टोपणनावाने संगीतावर समीक्षापर लेखनही करीत होते. त्यामुळे याही क्षेत्रात त्यांच्या नावाची खूप चर्चा होती.

    ज्योत्स्नाबाईंचा भाऊ रामराय हा केशवराव भोळ्यांचा मित्र व चहाता होता. त्याने केशवराव भोळ्यांना आपल्या बहिणीला भावगीत शिकवण्याची विनंती केली. या वेगळ्याच, नवीन व सुंदर गानप्रकाराचे ज्योत्स्नाबाईंना वेडच लागले. मनापासून, लक्षपूर्वक शिकून घेऊन त्यांनी ‘भावगीत’ आत्मसात केले. गाण्यातले भावनेचे महत्त्व त्यांना जाणीवपूर्वक असे प्रथमच या वेळी कळले. तोवरचे त्यांचे गायन हे नकळतपणे स्वाभाविक भावनेने होत असे. लवकरच ज्योत्स्नाबाई भावगीत गायिका म्हणूनही अतिशय लोकप्रिय झाल्या.

    केशवराव भोळ्यांशी १९३२ साली त्यांचा विवाह झाला. केशव भोळे यांचे संगीत असलेल्या ‘कृष्ण सिनेटोन’ या कंपनीच्या ‘संत सखू’ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. ज्योत्स्नाबाई यात सखूची भूमिका करीत होत्या. त्या वेळी त्यांचे नाव दुर्गा भोळे असेच होते; पण सिनेमात आणखी एक दुर्गा शिरोडकर नावाच्या नटी काम करीत होत्या. या दोन दुर्गांमुळे जरा गोंधळ होऊ लागल्याने लहान दुर्गाचे ‘ज्योत्स्ना’ असे नामकरण झाले व त्या ज्योत्स्ना भोळे झाल्या.

    केशवराव भोळ्यांचे, ज्योत्स्नाबाईंच्या सांगीतिक आयुष्यातलेही स्थान आत्यंतिक महत्त्वाचे होते. विवाहानंतर त्यांचे कलागुण अधिकच बहरू लागले. विवाहसमयी त्या जेमतेम अठरा वर्षांच्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांतच प्रो. बा.र. देवधर यांच्या म्युझिक सर्कलमध्ये मैफल करून ज्योत्स्नाबाईंनी देवधर मास्तर व जाणकार श्रोत्यांची दाद मिळवली.

    केशवराव भोळे यांचा मंजी खाँ, रामकृष्णबुवा वझे, मल्लिकार्जुन मन्सूर, मास्तर कृष्णराव इ. अनेक गवयांशी स्नेह होता. त्यांनी अनेक बंदिशींचा संग्रह केला. वेगवेगळ्या घराण्यांच्या रंगांमुळे ज्योत्स्नाबाईंच्या गायकीचे एक स्वतंत्र, प्रभावी असे रसायन तयार झाले. पक्का सूर, लय-तालावरची पकड, तडफ, लालित्य आणि माधुर्य या गुणांनी युक्त असे त्यांचे गायन श्रोत्यांना खिळवून ठेवी.

    बशीर खाँ, घम्मन खाँ (ठुमरीची तालीम) या उस्तादांकडेही त्यांनी थोडी तालीम घेतली. बरीच वर्षे त्या ‘तानरस खाँ’ घराण्याचे खाँसाहेब इनायत हुसेन यांच्याकडे शिक्षण घेत होत्या. त्यांनी अनेक गुरूंकडे डोळसपणे तालीम घेतली.

    गोरख कल्याण, भीम, मधमाद सारंग, शुद्ध भटियार, शामकल्याण, जलधर-केदार इ. काही राग खास ज्योत्स्नाबाईंचे म्हणून लोकप्रिय झाले. भेंडीबाजार घराण्याचे मोहंमद हुसेन खाँ (सारंगिये कादरबक्ष यांचे चिरंजीव) यांनी बांधलेला ‘शिवकंस’ हा रागही ज्योत्स्नाबाईंनी गाऊन लोकप्रिय केला.

    ज्योत्स्नाबाईंनी देशभरातल्या महत्त्वाच्या संगीत सभांमधून अनेक वर्षे गायन केले. असरदार गायन, तसेच आवाजावरची हुकमत, उत्तम दमसास, सूक्ष्म सांगीतिक जाण, रंगतदार आलापी, प्रभावी तानक्रिया, शास्त्र आणि भाव यांचा सहजसुंदर मेळ आणि सुधमुद्रा-सुधबानी म्हणजेच ज्योत्स्नाबाई.

    लग्नानंतर वर्षभरातच, म्हणजे १९३३ मध्ये ज्योत्स्नाबाईंना नाटकात काम करण्याचा योग आला. ‘आंधळ्यांची शाळा’ हे ते नाटक. लेखक वर्तक, के.नारायण काळे, पार्श्वनाथ आळतेकर, केशवराव दाते, केशवराव भोळे या नवमतवादी मंडळींनी ‘नाट्य मन्वंतर’ ही संस्था स्थापन केली.

    रंगभूमीवर स्त्रियांनीच स्त्रियांची कामे करावीत या आग्रहाने ज्योत्स्नाबाई व वर्तकांची पत्नी रंगभूमीवर उभ्या राहिल्या. यापूर्वीही हिराबाई बडोदेकर व त्यांच्या भगिनींनी नाटकमंडळी काढून रंगभूमीवर कामे केली होती. पण ‘आंधळ्यांची शाळा’ हे सर्वार्थाने आधुनिक नाटक तर होतेच; पण यात संगीत म्हणजे अनंत काणेकरांची भावगीते घेतली होती व ती फार परिणामकारक, प्रसंगोचित होती. त्यामध्ये पार्श्वसंगीताचा वापरही प्रथमच केला होता. केशवराव भोळेच याचे संगीतकार होते.

    ज्योत्स्नाबाईंचे हे प्रथम पदार्पण त्यांच्या ठायी असलेल्या रूप, संगीत व अभिनय या त्रिवेणी संगमामुळे ऐतिहासिक महत्त्वाचे ठरले. पुढे १९४१ साली ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेत प्रवेश केल्यावर संगीत अभिनेत्री म्हणून त्या चांगल्याच प्रस्थापित झाल्या. त्यांनी या संस्थेत एकूण अकरा नाटकांतून प्रमुख भूमिका केल्या, पैकी ‘संगीत कुलवधू’ने त्यांना अजरामर कीर्ती दिली.

    मास्तर कृष्णरावांचे संगीत या नाटकाचे महत्त्वाचे यश होते. ज्योत्स्नाबाईंचे अभिनयमंडित गायन, तेही संयम ठेवून नेटके व वेधक असे. हा बदल घडवून आणण्याचे मोठे श्रेय ज्योत्स्नाबाईंना, लेखक-दिग्दर्शक मो.ग. रांगणेकरांना, तसेच मास्तर केशव, श्रीधर पार्सेकर, स्नेहल भाटकर इ. संगीतकारांनाही जाते. ज्योत्स्नाबाईंच्या अत्यंत लोकप्रिय नाट्यपदांमध्ये, ‘कुलवधू’तील सर्व पदे, ‘क्षण आला भाग्याचा’, ‘मन रमणा मधुसूदना’, ‘बोला अमृत बोला’; ‘एक होता म्हातारा’मधील ‘छंद तुझा मजला’, ‘ये झणी येरे माघारी’; ‘कोणे एके काळी’मधील ‘का रे ऐसी माया’ ही भैरवी; ‘राधामाई’ या नाटकातले ‘खेळेल का देव माझिया अंगणी’; ‘भूमिकन्या सीता’मधील ‘मी पुन्हा वनांतरी फिरेन’, ‘मानसी राजहंस पोहतो’ इ. वानगीदाखल सांगता येतील. ‘कुलवधू’तील ‘बोला अमृत बोला’ने लोकांच्या अंत:करणाचा ठाव घेतला.
    ज्योत्स्नाबाईंना उत्कृष्ट भावगीत गायिकेचाही मान मिळाला. आकाशवाणीवरही त्यांच्या भावगीतांना वाढती मागणी येऊन अधिक प्रसार झाला. त्या बहुतांशी राजा बढे, अनंत काणेकर, कवी अनिल, मो.ग. रांगणेकर अशा कवी-गीतकारांच्या रचना गात असत.

    त्यांच्या लोकप्रिय भावगीतांमध्ये राजा बढे यांची ‘माहेर’विषयीची तीन गीते, यांतील ‘माझिया माहेरा जा’ हे पुलंनी चाल दिलेले फारच लोकप्रिय झाले. अनंत काणेकरांचे ‘किती गोड गोड वदला’ व ‘आला खुशीत समींदर’; मो.ग. रांगणेकरांचे ‘नको वळून बघू माघारी’ इ.च्या ‘यंग इंडिया’, ‘कोलंबिया’, ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ अशा कंपन्यांनी ध्वनिमुद्रिकाही काढल्या.

    ज्योत्स्नाबाईंच्या भावगीतांत विस्तार-शक्यता असूनही त्या खूप तारतम्याने, जडपणा आणू न देता, चालीच्या अंगाने आकर्षकपणे गायल्या याची प्रचिती त्यांची कोणतीही ध्वनिमुद्रिका ऐकताना येते.

    खानदानी गाण्याच्या तालमीमुळे आवाजाला जी झिलई व तेज लाभले, त्याचा त्यांनी नाट्यपदे व भावगीते यांत वेगळा आणि खुबीने वापर केला. त्यांनी गीतांचा व नाट्यगीतांचाही दर्जा जो प्रथमच उंच करून ठेवला, याचे महत्त्व फार मोठे आहे. ती त्यांची या क्षेत्राला देणगी आहे. कारण त्यामुळेच श्रोत्यांना विशिष्ट दर्जाची भावगीते ऐकण्याची चोखंदळ वृत्ती आली. त्यांची अभिरुची घडली.

    ज्योत्स्नाबाईंनी गीतापासून भावगीत, भावगीतापासून पद, पदापासून ख्याल ही सगळी स्थित्यंतरे मोठ्या सहजपणे केली. सुगम संगीत पुढे नेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यात एक पद्धत अशी की, आकार तोच ठेवायचा; पण त्यात स्वत:च्या आवाजाच्या पोताची भर घालायची, आणि हे ज्योत्स्नाबाईंनी केले.

    ज्योत्स्नाबाईंनी थोडे लेखनही केले. १९६० च्या सुमाराला त्यांनी ‘आराधना’ हे संगीत नाटक लिहिले. निर्मिती, दिग्दर्शन, काव्य, संगीत सर्वकाही त्यांचेच होते. चारएक वर्षांनी ‘अंतरीच्या खुणा’ हे पत्ररूपी पुस्तक, तसेच नभोवाणीसाठी ‘घराण्याचा पीळ’ ही नाटिका लिहिली. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार, ‘विष्णुदास भावे’ पुरस्कार (१९८०), संगीत नाटक अकादमीचा संगीत अभिनेत्रीचा पुरस्कार (१९७७), ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार, चौसष्टाव्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा म्हणून १९८४ साली बिनविरोध निवड, गोमंतक मराठी अकादमीचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार (१९९५), महाराष्ट्र सरकारचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार (१९९९) असे काही महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. १९९९ मध्ये, त्यांच्या निधनाच्या तीन वर्षे आधी ‘तुमची ज्योत्स्ना भोळे’ हे आत्मचरित्र लिहिले होते.

    पुण्यातील सृजन फाऊंडेशन ही संस्था २००९ सालापासून दरवर्षी दोन दिवसांसाठी ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव’ नावाचा कार्यक्रम आयोजित करते. ज्योत्स्ना भोळे यांच्यावर एक लघुपटही निघाला आहे. ज्योत्स्ना भोळे यांचे निधन ५ ऑगस्ट २००१ रोजी झाले.

    ज्योत्स्ना भोळे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

    सुप्रसिद्ध मराठी गायिका ज्योत्स्ना भोळे (11-May-2017)

    ज्योत्स्ना भोळे (5-Aug-2017)

    ज्येष्ठ गायिका आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे (5-Aug-2021)

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ वंदना खांडेकर

  • संत ब्रम्हानंद

    महाराष्ट्राच्या सन्त परंपरेला महाराष्ट्रेतर प्रदेशचं वावडं नव्हतं, हे आपल्याला संत नामदेवांच्या काळापासून माहित आहे. विश्वात्मकता हे सन्तांच्या विचारसरणीचं अधिष्ठान होतं व त्यांच्या तत्त्वज्ञानानून व साहित्यातून तीच प्रतिबिम्बित झाली आहे.

    महाराष्ट्रातील नागेश सम्प्रदायाची सन्त परंपरा केवळ महाराष्ट्रात आढळत नाही तर ती कर्नाटकातही आढळते. बेळगावच्या वाटेवरील हत्तरगी हे गाव कर्नाटकात आहे. तेथील आधुनिक संत हरिकाका गोसावी ह्यांची परंपरा संत एकनाथांपासून आहे. रामदास स्वामींच्या संप्रदायाची व शिष्यांची परंपरा केवळ महाराष्ट्रा आढळत नाही तर मध्य भारतात व दक्षिण भारतातही आढळते. संतांना नि त्यांच्या परंपरेला भूगोलाच्या सीमा रेषांचं कसं असेल ?

    गोंदवलेकरांच्या शिष्यपरंपरेचा फारसा विचार महाराष्ट्राच्या वाड्मयेतिहासात झाला नाही. तो करुन देणं अगत्याचं असल्यानं त्यांच्या शिष्यपरंपरेचा साहित्याचं स्वरुप दर्शन या लेखात हेतुत: घडवून दिलं आहे.

    ब्रम्हानंद महाराजांचा जन्म भारताच्या १८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या आगेमागे झाला त्याचा मास व तिथी माघ वद्य दशमी अशी नोंदविली असून इसवी सनानुसार त्यांचं जन्मवर्ष १८५९ हे आहे.

    त्याचं घराणं कर्नाटकातील जालीहाळ गावाचं. भक्तीची परंपरा त्यांच्या घराण्यात असून हे गाडगोळी घराणं त्या भागात वेदविद्या पारंगत म्हणून प्रसिद्ध होतं. त्यांचे वडील वाळंभट्ट हे वेदशास्त्र संपन्न पंडित होते. असं असलं तरी त्यांचे पुत्र अनंत (हे ब्रम्हानंदमहाराजांचं सन्यासग्रहणापूर्वीचं नाव) मात्र तसे नव्हते त्यांचे बालपण वेदोध्ययानात न जाता खेळण्याबागडण्यात उनाडकीत जाऊ लागलं. तु कुलर्दपक नसून कुळाला काळिमा फासणारा आहेस, असं बाळंभट्टांनी कंटाळून नि अत्यंत त्रस्त होऊन म्हटल्या वर अनंताला पश्चाताप झाला व परतीही झाली. मुळगुंदच्या पंडित रघुनाथ शास्त्रींकडे त्यांनी वेदाध्ययन केलं. शास्त्री बुवांच्या सत्संगाचा योग्य तो परिणाम झाला व अनंतानं वेदाध्ययन पूर्ण केलं एवढंच नव्हे तर ते भागवत ही सांगू लागले अनंताच्या जीवनातील हा कायापालटच होता. ब्रम्हचैतन्य हेच आपले गुरु आहेत असा दृष्टान्त झाल्यावर ते गोंदवल्यास आले नि त्यांनी ब्रम्हचैतन्यांचा अनुग्रह घेतला.

    ब्रम्हानंदमहाराजांनी आपल्या गुरुचा महिमा आपल्या अनेक अभंगातून अत्यंत श्रद्धेने व्यक्त केला आहे.गुरुर्ब्रह्मा या सूत्राची प्रचीती त्यांच्या या अभंगातून येते, त्यातील गुरुराव माझे ब्रम्हची साकार या मध्यवर्ती संकल्पनेवरुन त्यांच्या गुरुभक्तीची सहज कल्पना येईल.

    साष्टांग वंदूनी सदगुरुरायासी । चिंतावी मानसीं गुरुमूर्ति ।।
    गुरुराव माझे ब्रम्हचि साकार । केला उपकार धरुनी देह ।।
    नाहीं निराकार नाही हो साकार । ऐसा गुरुवर माझा आहे ।।
    निर्वाच्य ब्रम्ह चैनत्यसि आलें । दुष्टहि तरले दर्शनयोगें ।।४।।
    सकल निगमागम नेणती महिमा । नाहीं दुजी उपमा सदगुरुसी ।।५।।
    दीन ब्रम्हानंद प्रार्थीतसे भावें । मन लय व्हावें रामरुपीं ।।६।।

    कधी ते आपल्या गुरुला रामस्वरुप मानतात तर कधी तो मारुतीचा अवतार आहे, असंही मानतात.

    गुरुच्या वात्सल्याची ते मातेच्या वात्सल्याची तुलना करतात म्हणूनच ते आपल्या गुरुला 'सद्गुरुआई' असंही म्हणतात. या संदर्भातील त्यांचा अभंग असा आहे.

    ऐसे करीं सद्गुरुआई । आपुलें स्मरण वसो ह्दयी ।।१।।
    नावडो हे विषयध्यान । रामनामी लागो मन ।।२।।
    देहबुद्धि उकरुन । लावीं रोप समाधान ।।३।।
    पळवी माझी दुजी भ्रांति । वासना जाळुनि देई शांति ।।४।।
    बहु बळकट चिज्जडग्रंथी । सोडुनि दावा दाशरथि ।।५।।
    ब्रम्हानंदी अशा फार । करीं दीनाचा उद्धार ।।६।।

    आपण परमार्थमार्गाला लागन शक्यच नव्हतं कारण ते आपल्या प्रारब्धात नव्हतं तरीही गुरुकृपेमुळं आपल भाग्य उजळलं आणि आपण परमार्थमार्गाला लागलो यामूळं आपला गुरु हेच आपलं वैकुंठ आहे आणि तोच आपला कैलास आहे. तेच आपलं ब्रम्हज्ञान आहे. आणि तोच आपला मोक्ष आहे, असं ब्रम्हानंदमहाराज म्हणतात. अशा गुरुची अखंड सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभो अशा विनवणीही ते परमेश्वराजवळ करतात.

    परमार्थाची रेषा नाही कपाळांत । करवी सदगुरुनाथ अपुले सत्ते ।।१।।
    आपले सत्तेने तोडी कर्मफांसा । माझा सदगुरु ऐसा कृपानिधी ।।२।।
    कृपानिधी एक धरिला असे भावें । काय तें करावें वैकुंठासी ।।३।।
    वैकुंठ कैलास आम्हां सदगुरुप्राय । चुकती अपाय तेणें सर्व ।।४।।
    हाचि माझा मोक्ष, हेंचि ब्रम्हज्ञान । नाम मुखीं चरणसेवा करुं ।।५।।
    सेवा अखंडित राहो माझे चित्ती । हरीची विनंती पायापाशीं ।।६।।

    आणि केवळ असं सांगूनच ब्रम्हानंदमहाराज थांबत नाहीत तर ते आयुष्यभर आपल्या गुरुची अत्यंत निष्ठेनं सेवाही करतात.

    संदर्भ - डॉ.यू.म.पठाण यांचा 'महान्यूज'मधील लेख.

  • सेतुमाधवराव श्रीनिवास पगडी

    इतिहासाच्या अभ्यासात, संशोधनात तसंच सनदी सेवेसाठी योगदान देणार्‍या सेतुमाधवराव पगडी यांचा जन्म २७ ऑगस्ट १९१० साली झाला.इतिहासाचे संशोधक म्हणून ख्याती मिळवण्यासोबतच, त्यांनी विपुल प्रमाणात स्फुट व ग्रंथलेखन केले. उर्दुचा गाढा आभ्यास असल्यामुळे आशयाला धक्का न लावता इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता, फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीत आणला. शिवाजी महाराजांवर लिहिलेले यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट या नवी दिल्लीतील प्रकाशनाने मराठी भाषेत प्रकाशित केले आहे. “भारतीय मुसलमानः शोध आणि बोध“ व “१८५७चे आणखी काही पैलू“ ही त्यांची दोन पुस्तके परचुरे प्रकाशन संस्थेनी प्रसिध्द केली आहेत.

    सेतु माधवराव पगडी हे १९६० ते१९६९ या काळात महाराष्ट्राच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव म्हणून काम पाहिले होते. १९५१ साली औरंगाबाद जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून व त्यापूर्वी ते हैदराबाद संस्थानमध्ये सनदी अधिकारी होते.

    मुंबईत वास्तव्यास असताना पगडी यांनी तेरा वर्षांत किमान तेराशे गंथ अभ्यासले. त्यांच्याकडे आत्मचरित्र लिहिण्याचा आग्रह धरला गेला तेव्हा त्यांनी विविध भाषेतील किमान शंभर आत्मचरित्रे वाचून काढली. इंग्रजी, मराठी, उर्दू, फारसी, बंगाली, अरबी, तेलुगू, कन्नड अशा जवळपास सतरा भाषा त्यांना अवगत होत्या. राष्ट्रपती डॉ. राजेंदप्रसाद औरंगाबादेत आले तेव्हा पगडींनी एक तास अस्खलित उर्दूमधून सूफी संप्रदायावर भाषण दिले. ते राष्ट्रपतींना इतके आवडले की, त्यांनी 'अ मोस्ट लनेर्ड पर्सन' या शब्दात पगडी यांची प्रशस्ती केली. “मराठवाडा साहित्य परिषद“ , “इंदूर साहित्य सभा“, “मराठी वाड्मय परिषद“चे अध्यक्षपद सेतुमाधवराव पगडींनी भुषविलेले आहे.

    मराठवाडा विद्यापीठाने डॉक्टरेट ही मानाची पदवी प्रदान करून त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला होता . पगडी यांच्या “जीवनसेतु“, “छत्रपती शिवाजी“ या त्यांच्या माहितीपर ग्रंथाना राज्य पुरस्कार, मराठा मंदिरातर्फे चरित्रकार पदक आणि न. चिं. केळकर पारितोषिक प्राप्त झाले.

    भारत सरकारच्या पद्मभुषण पुरस्काराने सेतुमाधवराव पगडी यांना गौरविण्यात आले आहे.

    १४ ऑक्टोबर १९९४ रोजी सेतुमाधवराव पगडी यांचे निधन झाले.

  • बाळ गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक)

    राजकारणी, वृत्तपत्रकार, वैदिक संशोधक, प्राच्यविद्यापंडित आणि भगवदगीतेचे भाष्यकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी झाला. “

    केसरी” व “मराठा” ही वर्तमानपत्रे सुरु करणार्‍या टिळकांचे आग्रलेख गाजले आणि ब्रिटिश सरकारची झोप उडवणारे ठरले. मंडालेच्या तुरुंगात असताना “गीतरहस्य अर्थात कर्मयोगशास्त्र” या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले. वेदकालनिर्णयावर “ओरायन” आणि आर्यांच्या इतिहासशोधाचा “आर्क्टिक होम ऑफ द वेदाज” हे ग्रंथही त्यांनी लिहिले. परखड, सडेतोड राजकीय अग्रलेखांची मराठीतील परंपरा लोकमान्यांशीच नाते सांगते.

    विद्वत्ता, अभ्यास आणि परखड लेखणी यांची सांगड राजकारणाशी घालणारे “लोकमान्य” बाळ गंगाधर टिळक यांचे ०१ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  • दिलीप कुलकर्णी

    दिलीप कुलकर्णी यांचे नाव प्रकाशझोतात आले, ते त्यांनी सुरू केलेल्या पहिल्या राज्यस्तरीय पर्यावरण साहित्यसंमेलनामुळे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे महाराष्ट्रातील सर्वच पर्यावरणप्रेमींनी, समाजसेवकांनी, साहित्यीकांनी व कलाप्रेमी रसिकांनी जोरदार स्वागत केले.