(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • सई परांजपे

    नाटककार, लेखिका आणि उत्कृष्ट नाट्यसिने दिग्दर्शिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या सई परांजपे यांची अजून एक महत्त्वाची ओळख म्हणजे बालसाहित्य लेखिका. एक वेळ प्रौढ साहित्य लिहिणे हे सहज शक्य असते मात्र बालसाहित्य हे तेवढेच अवघड काम. परंतु सई परांजपे हे अवघड काम आपल्या लेखणीद्वारे सहजतेने करून जातात आणि ते सहज असतं म्हणूनच सुंदर होतं.

  • प्रसाद वनारसे

    चित्रपट क्षेत्रातील ग्लॅमर सोडून सर्जशील नाट्यकलावंत घडवण्याचा वसा रंगकर्मी प्रसाद वनारसे यांनी घेतला आहे. देशविदेशातील नाट्यप्रशिक्षणांमुळे नाट्यगुरू अशी त्यांची ओळखही निर्माण झाली आहे.

    प्रसाद वनारसे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हाडाचा नाट्यशिक्षक हा लेख पुढील पानावर वाचा.

    प्रसाद वनारसे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हाडाचा नाट्यशिक्षक हा लेख वाचा.

    vanarase-prasad-modified

  • पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर

    राष्ट्रीय पातळीवर संगीत प्रसाराचं अवघड काम यशस्वीपणे करण्याचं श्रेय पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांना दिलं जातं. ते स्वतः द्रष्टे संगीतकार, थोर गायक आणि भाष्यकार होते. त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी मैफिली रंगवल्या, “रघुपती राघव राजाराम“ हे भजन स्वतः गाऊन त्यांनी लोकप्रिय केलं.

    स्वतःची अशी स्वतंत्र संगीत लेखन पध्दती सुरु केली व सुमारे साठ संगीतविषयक ग्रंथ लिहून प्रकाशित केले. तसेच गांधर्व महाविद्यालय स्थापून पध्दतशीर अभ्यासक्रमाधारे संगीत शिकवून संगीतप्रसार करणार्‍या तज्ज्ञांची फळी उभी केली. स्त्रियांना संगीत शिकवण्याची स्वतंत्र व्यवस्था करुन दूरदृष्टी दाखवली. विष्णू दिगंबरांचा गायकीचा ठसा आणि संगीत प्रसाराचे प्रयत्न कधीही न पुसले जाणारे आहेत.

    पंडित विष्णू दिगंबर गाडगीळ पलुस्कर यांचा जन्म कुरुंदवाड इथे १९ ऑगस्ट १८७२ रोजी झाला. दिवाळीच्या दिवसांत फटाका चेहर्‍यासमोर अचानक फुटल्यामुळे लहान वयात डोळे अधू झाले. या अवस्थेतही विष्णू दिगंबर मात्र सतत कार्यमग्न राहिले. संगीताच्या क्षेत्रात परिवर्तन घडल्याशिवाय संगीत विद्येला व विद्यार्थि वर्गालाही चांगले दिवस येणार नाहीत याची विष्णू दिगंबर यांना खात्री झालेली होती. त्यामुळे संगीत आणि संगीतकाराला समाजजीवनात योग्य स्थान मिळावं या ध्येयपूर्ततेसाठी त्यांनी १८९६ साली मिरज हे गाव सोडलं व संपूर्ण भारत दौर्याला प्रारंभ केला.

    ५ मे, १९०१ रोजी त्यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. विद्यालयातून संगीत शिक्षण ही संकल्पना त्या वेळी नव्हतीच. गुरुकुलात राहून विद्या शिकणं ही संकल्पना त्या वेळी नव्हतीच. गुरुकुलात राहून विद्या शिकणं ही जी संगितविद्येची परंपरा होती, त्याला काहीसा छेद देऊन त्यांनी विद्यालयीन शिक्षणपध्दती सुरु केली. मात्र हे करत असताना त्यांनी गुरुशिष्यपरंपरेचा त्याग केलेला नव्हता. विद्यालयात दोन प्रकारचे विद्यार्थी होते. एक प्रकार असा की विद्यार्थी नियमित वेळेत येत व निघुन जात, तर दुसर्‍या प्रकारच्या विद्यार्थ्यीवर्गाला पंडितजी उपदेशवर्ग असं म्हणत. या उपदेशवर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा दिनक्रम निश्चित केलेला होता. हे शिष्यच उद्याचे संगीतकार आहेत, याची पूर्णत्वाने खात्री पंडितजींना होती.

    लाहोरसारखं एका परप्रांतातील गाव त्यांनी शिक्षणशाळा सुरु करण्यासाठी निवडलं. जो प्रदेश पाहिलेला नाही, जिथल्या भाषेचा गंध नाही, संस्कार-रीतीभाती ठाऊक नाहीत, अशा अनोळखी गावी, अनोळखी प्रदेशात त्यांनी विद्यालय सुरु केलं. निव्वळ आत्मविश्वासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं ठरलेलं संगीतामृतप्रवाह‘ हे मासिकही त्यांनी सुरु केलं.

    लाहोरनंतर १९०८ साली पंडितजींनी विद्यालयासाठी मुंबईमध्ये एक भली मोठी इमारत बांधली. शिवाय विद्यार्थ्यासाठी वसतिगृह काढलं. छापखाना काढला आणि ‘नारदी शिक्षा‘ ‘मांडूकी शिक्षा‘ असे ग्रंथ छापण्यास सुरुवात केली. वाद्यांची व्यवस्था नीट असावी या हेतूने वाद्यांचा स्वतःचा कारखाना काढला, त्यामुळे नवीन बनावटीची वाद्यंही तयार होऊ लागली. हा एवढा मोठा प्रपंच चालवण्यासाठी व त्यासाठी आर्थिक व्यवस्था स्वबळावर होण्यासाठी त्यांनी सामुदायिक जलसे सुरु केले. त्यामुळे अत्यल्प रसिकांना अभिजात संगीत ऐकायला मिळू लागलं.

    एवढा मोठा संस्थापक प्रपंच चालवत असतांना त्यांनी स्वतःच्या गायकीकडे दुर्लक्ष केलं नाही. ते दूरदर्शी असल्यामुळे त्यांनि स्वतःच्या आवाजाचा अभ्यास स्वतःच केला. आपला आवाज मोठा आहे, मात्र तो तानक्रियेस म्हणावा तसा साहयभूत होणार नाही ही जाणीव झाल्याबरोबर त्यांनी मंद्रसाधनेला सुरुवात केली. विविध पलटे अशा पध्दतीने घोटले की तानक्रिया करते वेळी कोणताही त्रास होऊ नये आणि आवाजाला जडत्व राहू नये यासाठी त्यांचे हे प्रयत्न चालू होते. या कष्टाचं अर्थातच त्यांना फळ मिळालं. पंडितजींचा आवाज बुलंद होता, मात्र त्यात अत्यंत निर्मळ गोडवा होता. पूर्ण तीन सप्तकांत सहजतेने फिरणारा तो आवाज होता. सुरेलपणा हे त्या आवाजाचं प्रमुख वैशिष्टय होतं. लयतालाची पंडितजींची समज तर त्या काळी सर्वत्र गौरवलेली होती. गायन मांडणीसाठी त्यांनी काही सोपे उपाय सांगितले व त्या उपायांचा उपयोग शिष्यांकरवी प्रस्तुतीकरणात राबवला. त्यांनी सुरु केलेली ही पध्दतही संगीताला त्यांचं असलेलं योगदान म्हणता येईल.

    पंडितजींच्या काही वैशिष्टयांचा उल्लेख करावयास हवा. कारण त्या वैशिष्टयांचे चांगले परिणाम आज संगीतावर झालेले पाहावयास मिळतात. १) गाण्याविषयी समाजात अभिरुची निर्माण व्हावी हे सांस्कृतिक कार्य त्यांनी स्थापन केलेल्या गांधर्व महाविद्यालय संस्थेमार्फत करुन दाखवलं. २) जे जे नवं व चांगलं ऐकावयास मिळेल त्याचा शक्य असल्यास स्वतःच्या गायकीत समावेश करुन घेण्याची त्यांची तयारी असे. ३) खोटं बोलणं, वागणं , खोटे मानअपमान त्यांना कधी आवडले नाहीत. ते शेवटपर्यंत खरं काम करत राहिले. ४) संगीत प्रचार व प्रसारासाठी स्वतःजवळ वक्तृत्व हवं म्हणून स्वतःभाषेचा अभ्यास केला आणि हिंदी, ब्रज व मराठी भाषेवर प्रभूत्व मिळवलं. इतकंच नाही, तर संपूर्ण भारतातला श्रेष्ठ वक्त्यांत त्यांचं नाव घेतलं जात असे.
    ५) पलुस्करांची शिष्यशाखा संख्येने, गुणवत्तेने व कर्तृत्वाने खूप संपन्न होती.

    पुढे विष्णू दिगंबर यांचा कर्तृत्वकाळ साधारणपणे ३४ वर्षाचा मानला तर एवढयाशा काळात किती अफाट काम त्यांनी उभं करुन ठेवलं आहे, याचा अंदाज येतो. त्यांच्या ग्रंथसंपदेमुळे आणि गांधर्व महाविद्यालयामुळे त्यांच्या मृत्यूनंतरच्या अनेक पिढया संगीताला जोडून राहू शकल्या. गांधर्व महाविद्यालय ही संस्थांही सुमारे शंभर वर्ष कार्यरत आहे. त्यावरुन विष्णू दिगंबरांच्या द्रष्टेपणाची झेप कळते.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

    गायक पं.दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर (25-Oct-2021)

    पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर (28-May-2017)

    पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर (25-Oct-2016)

  • शिल्पकार नानासाहेब सरपोतदार

    भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आद्य शिल्पकार नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८९६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील नांदवली येथे झाला.

    घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे नोकरी करत शिक्षण घेण्यासाठी नानासाहेब मुंबईला गेले, पण शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. जन्मजात वाचनाची व अभिनयाची आवड असल्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षीच घर सोडून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत जाऊन राहिले. तिथे वत्सलाहरण, सैरंध्री, दामाजीमध्ये छोटया-मोठया भूमिका केल्या. आईच्या आग्रहाखातर, शिक्षणासाठी ते एका नातेवाइकाकडे इंदूरला गेले. तिथेही अभ्यासात त्यांचे लक्ष लागेना!

    नटश्रेष्ठ गणपतराव जोशींच्या ओळखीने २१ ऑक्टोबर १९१९ रोजी नव्यानेच स्थापन झालेल्या कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत दाखल झाले. महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या ‘सैरंध्री’ या पहिल्या चित्रपटाचे लेखक नानासाहेब सरपोतदारच होते.

    नाना स्त्री कलाकारांच्या भूमिकाही हुबेहूब वठवत. ‘सैरंध्री’ने चांगले यश संपादन केले. महाराष्ट्र फिल्म कंपनीसाठी नानांनी ‘वत्सलाहरण’, ‘सिंहगड’, ‘कल्याण खजिना’, ‘सती सावित्री’, ‘दामाजी’, ‘शहाला शह’ आदी चित्रपट लिहिले. काही चित्रपटांत भूमिकाही केल्या. इथल्या पाच वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी दिग्दर्शनातील बारकावेही शिकून घेतले.

    छायालेखक पांडुरंग तेलगिरी यांनी मुंबईला ‘डेक्कन पिक्चर्स’ ही संस्था स्थापन केली. त्यांच्या ‘प्रभावती’ या मूकपटाचे दिग्दर्शन नानासाहेबांनी केले. दिग्दर्शक म्हणून नानांचा हा पहिलाच चित्रपट होता.पुढे तेलगिरीची पुण्यात खडकीला ‘युनायटेड पिक्चर्स’ ही संस्था स्थापन केली. नानासाहेबांनी या संस्थेसाठी दोन वर्षात ‘रायगडचे पतन’, ‘चंद्रराव मोरे’, ‘रक्ताचा सूड’ चित्रपट दिग्दर्शित केले. नाशिकजवळच्या येवळे गावातील अंबू सगुण मूकपटात बालकलाकाराची भूमिका करत असे. नानासाहेबांच्या ‘आर्यन फिल्म’ कंपतीत प्रथम ती नायिका झाली व पुढे ललिता पवार या नावाने प्रचंड लोकप्रिय झाली. ‘महाराची पोर’ हा चित्रपट नानांनी लिहून दिग्दर्शित केला होता. ऐंशी वर्षापूर्वी त्यांनी असा संवेदनशील सामाजिक विषय हाताळला होता. अंबू ऊर्फ ललिता पवारने महाराजाच्या मुलीची भूमिका केली होती. हा चित्रपट पाहायला सरोजिनी नायडू खास गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमात आल्या होत्या. या चित्रपटाची महात्मा गांधी, मौलाना शौकत अली, बॅ. बाप्टिस्टा, अच्युत बळवंत कोल्हटकर आदींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. मद्रासच्या ‘हिंदू’, ‘जस्टिस’ वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहून नानांचे कौतुक केले होते.

    १९२७ सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर पर्वतीच्या पायथ्याशी, आदमबाग येथे एक रुपया भांडवलावर नानांनी ‘आर्यन फिल्म’ कंपनीची स्थापना केली. आठ आणे जमिनीचे भाडे व बाकी आठ आण्यांचे पेढे, नारळ, हार, फुले घेऊन मुहूर्त केला गेला. पुढे चित्रपट प्रदर्शक, मुंबईच्या ‘कोहिनूर’ थिएटरचे मालक बाबुराव कान्हेरे ‘आर्यन फिल्म कंपनी’च्या भागीदारीत आले.

    नाना अनुभवी नट, लेखक, दिग्दर्शक होतेच याशिवाय ते छायालेखनही शिकले होते. आता ते निर्मातेही झाले होते. ‘हरहर महादेव’ हा आर्यनचा पहिला चित्रपट होता, पण चित्रपटाच्या नावावर ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने हरकत घेतल्यामुळे त्यांनी नाव बदलून ‘निमक हराम’ केले. या चित्रपटाची जाहिरात त्यांनी मोठया कल्पकतेने केली होती. त्यानंतर मद्याचे दुष्परिणाम दाखवणा-या १९२८ साली ‘आर्य महिला’ चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये ललिता पवार नायिका तर ‘भारतमाता थिएटर’चे मालक भोपटकर नायक होते. या चित्रपट निर्मितीसाठी नानासाहेबांचा ‘बालगंधर्व’ व अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. ‘आर्यन कंपनी’चा १९२८ सालचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा मुख्य नायिका म्हणून भूमिका असलेला ललिता पवारचा यांचा पहिला मूकपट होता.

    १९२८ ते १९३० या काळात नानानी, ‘मराठयाची मुलगी’, ‘गनिमी कावा’, ‘उणाडटप्पू’, ‘पतितोद्धार’, ‘पारिजातक’, ‘राजा हरिश्चंद्र’, ‘सुभद्राहरण’, ‘भीमसेन’, ‘भवानी, तलवार’ आदी चोवीस मूकपटांची निर्मिते व दिग्दर्शन केले. यातील सहा मूकपटांची नायिका अंबू ऊर्फ ललिता पवार होती. यातील बहुतेक मूकपट चांगले चालले. १९३१मध्ये बोलपटांचा जमाना चालू झाल्यावर नानासाहेबांनी चित्रपटनिर्मिती थांबवली.

    अर्देशीर इराणी यांच्या इम्पिरियल कंपनीचा ‘रुक्मिणीहरण’ हा बोलपट नानांनी दिग्दर्शित केला. यामध्ये डी. बिलिमोरिया, पंडितराव नगरकर, भाऊराव दातार यांनी भूमिका केल्या. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘देवकी’ या बोलपटात भाऊराव दातार, मिस दुलारी व राजा सॅण्डो होते. चित्रपट व्यवसाय हा बिनभरवशाचा धंदा आहे, हे ओळखून नानासाहेबांनी १९३६च्या अनंत चतुर्दशीला लक्ष्मी रोडवरील सामान्यजनांना स्वस्तात पोटभर भोजन मिळावे, म्हणून केवळ दोन आण्यांत राइस प्लेट चालू केली.

    स्वस्त आणि रुचकर अन्नपदार्थ, नानासाहेबांचा बोलका-मिश्कील स्वभाव यामुळे थोडयाच अवधीत ‘पूना गेस्ट हाऊस’ कलावंत आणि साहित्यिकांची आवडती मठी बनली. त्यानंतरही नानासाहेबांनी १९३८ साली ‘रवींद्र पिक्चर्स’साठी ‘संत जनाबाई’ व ‘सरस्वती सिनेटोन’साठी ‘भगवा झेंडा’ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात पहिला रौप्यमहोत्सव साजरा करण्याचा मान ‘सरस्वती सिनेटोन’च्या ‘श्यामसुंदर’ या बोलपटाला जातो. ‘आर्यन फिल्म’साठी नानासाहेब त्याची निर्मिती करणार होते. त्यासाठी शांता आपटे, शाहू मोडक, भाऊराव दातार आदी कलाकारांची निवडही करण्यात आली होती. तशी ज्ञानप्रकाशमध्ये जाहिरातही आली होती, परंतु त्यांच्या भागीदारांना ही कल्पना रुचली नाही, म्हणून त्यांना हा विचार सोडून द्यावा लागला. भालजी पेंढारकरांच्या ‘सरस्वती सिनेटोन’ने हेच कलाकार घेऊन ‘श्यामसुंदर’ यशस्वी करून दाखवला. मुंबईच्या ‘वेस्ट एंड’ (सध्याचे नाझ) थिएटरमध्ये तो सत्तावीस आठवडे चालला. नानासाहेबांना वाचनाचा नाद होता, साहित्याची आवड होती. त्यांनी ‘चंद्रराव मोरे’, ‘बाजीरावचा बेटा’, ‘उनाड मैना’ नाटके लिहिली. ‘मौज’मध्ये ते परखड लेख लिहिले. शाहू मोडक, ललिता पवार, राजा सँडो, रत्नमाला, भाऊराव दातार, पार्श्वनाथ आळतेकर, डी. बिलिमोरिया आदी कलाकारांना प्रथम संधी दिली.

    पुण्याच्या आदमबाग रस्त्याला ‘नानासाहेब सरपोतदार पथ’ असे नाव देण्यात आले होते. नानासाहेबांचा हा यशस्वी वारसा त्यांच्या कुटुंबीयांनीही पुढे चालवला. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव बंडोपंत सरपोतदार यांनी ‘ताई तेलीण’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली. पुना गेस्ट हाउसचा कारभार चारुदत्त सरपोतदार सांभाळत असत. विश्वास सरपोतदार यांनी यशस्वी निर्माता व वितरक म्हणून नावलौकिक मिळवला. चित्रपट महामंडळाचे ते अध्यक्षही होते. गजानन सरपोतदार चित्रपट निर्मिती-लेखन व दिग्दर्शनही करत असत. कन्या उषा दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये अध्यापनाचे काम करत असत.

    नानासाहेब सरपोतदार यांचे २३ एप्रिल १९४० रोजी निधन झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #NanasahebSarpotdar

  • नितीन माधव पायतोडे

    नितीन पायतोडे हे मूळचे नागपूरचे पण गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकर. चित्रपट, नाटकं यामध्ये विशेष आवड असणार्‍या नितीन यांनी अविष्कार या हौशी नाट्य संस्थेत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

  • माधव सदाशिव गोळवलकर (गोळवलकर गुरुजी)

    उत्तूंग व्यक्तिमत्व, निरभ्र चारित्र्य, ज्वलंत राष्ट्रनिष्ठा आणि संघटना कौशल्य असणारे, डॉ. हेडगेवार यांच्या नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सारथ्य करणारे गोळवलकर गुरुजी हे हजारो लाखोंच्या मनात आदराचे स्थान असलेले एक विभूतीमत्व होते. गुरुजींचा जन्म नागपूर येथे १९ फेब्रुवारी १९०६ रोजी झाला. कोकणातील गोळवल हे त्यांचे मूळ गाव परंतु वडिलांच्या नोकरीमुळे ते कुटूंब नागपुरात आले. गुरुजींची आठ वडील भावंडे दगावली. नववं आणि शेवटचं अपत्य म्हणजे माधव ९ तथा गुरुजी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. नागपुरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये इंटरपर्यंत शिक्षण झाल्यावर वैद्यकीय अभ्यास करण्याच्या ईच्छेने ते लखनौला गेले. परंतु तेथे प्रवेश मिळाला नाही. मग ते वाराणसीला गेले आणि बनारस हिंदु विद्यापीठातून बी. एस्सी. व नंतर एम.एस्सी या पदविका प्राप्त केल्या. ते प्राणी शास्त्राचे विद्यार्थि होते. संशोधन करावे म्हणून ते मद्रासला गेले. परंतु हवामान न मानवल्यामुळे ते नागपूरला परत आले. त्यानंतर एका अंध व्यक्तिकडून त्यांनी संगीताची संथा घेतली.

    १९३३ मध्ये प्राणीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून बनारस विद्यापीठाने त्यांची तीन वर्षासाठी नियुक्ती केली. त्यावेळी डॉ. हेडगेवार हे पंडित मदनमोहन मालवीय यांच्या भेटीसाठी येत असत. त्यावेळी हेडगेवारांनी गरुजींना पाहिले, जाणले व संघकार्यात त्यांना सहभागी करुन घ्यावे असे त्यांना वाटले परंतु १९३६ मध्ये गुरुजींचा विद्यापीठाचा सेवाकाळ संपल्यावर गुरुजी साधनेसाठी सारगाची येथिल आश्रमात गेले. १९३७ च्या मकर संक्रांतीच्या दिवशी अखंडानंदांनी गुरुजींना अनुग्रह दिला. काही दिवसांनी अखंडानंद समाधिस्थ झाले परंतु जन्म राष्ट्रकारणासाठी आहे. राष्ट्रदेवो भव‘ हा मंत्र जपत तू देशभर फिरशील. आपल्या गुरुंच्या निर्वाणानंतर गुरुजी अस्वस्थ झाले. त्यांची आणि डॉ. हेगेवार यांची भेट झाली. समाधीची जागा राष्ट्रहिताने घेतली डॉ. हेडगेवारांना आपला उत्तराधिकारी मिळाला. त्यानंतर डॉ. हेडगेवारांनी संघाच्या काही निवडक लोकांचे सिंदी येथे एका विचार शिबीर घेतले. त्यात संघाच्या प्रार्थना गीतापासून कार्यपध्दतीपर्यंत ध्येय धोरण ठरवले आणि आपल्या सर्व कार्याची धुरा गुरुजींच्या खांद्यावर ठेवली. डॉक्टरांच्या नंतर ३३ वर्षे गुरुजीनी संघाचे सारथ्य केले. त्याच काळात संघाचा प्रसार आणि प्रचार फार मोठया प्रमाणात झाला. हे होत असताना संघबंदीचा आदेशही आला. गुरुजींना कारावास घडला. त्यांना संशयित आणि देशद्रोही ठरविण्यात प्रयत्नही झाला. परंतु हा पालापाचोळा कधीच उडून गेला आणि ‘राष्ट्राय स्वाहा‘ म्हणत गुरुजींचे संघकार्य राष्ट्रकार्य म्हणून सुरुच राहिले.

    नमस्ते सदावत्सले मातृभूमी हे शब्द सदा ओठावर बाळगणार्‍या गुरुजनांना कॅन्सर झाल्याची वार्ता आली आणि ५ जून १९७३ या दिवशी त्यांनी देहत्याग केला.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  • डॉ. वसुधा कामत

    शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी करणारी योग्य व्यक्ती आहे. मूळच्या पुण्याच्या असणाऱ्या डॉ. कामत यांची वाटचाल कौतुकास्पद आहे.

  • प्रवीण ठिपसे

    बुद्धिबळावर ज्यांनी १०० च्यावर पुस्तकं लिहिली आहेत, असे रशियाचे प्रसिद्ध खेळाडू युरी अवेरबाख भारतात आले असताना, ते एकाच वेळी २५ अव्वल खेळाडूंशी खेळतील असं जाहीर करण्यात आलं. त्यांपैकी २४ खेळाडूंना त्यांनी हरवलं. त्यांची एकच मॅच बरोबरीत सुटली. तो प्रतिस्पर्धी होता प्रवीण ठिपसे, वय वर्ष १५.

  • डॉ. प्र. चिं. शेजवलकर

    वाणिज्य, व्यवस्थापन, अर्थ, बँक, विमा, शिक्षण, साहित्य, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत सहजपणे मुसाफिरी करणारे प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर.

    ज्या काळामध्ये आपल्या देशात व्यवस्थापन या विषयाचा शास्त्र म्हणून उदय झाला नव्हता, त्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांना या विषयाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी दिली.

    'मॅनेजमेंट गुरू' ही संज्ञा आता प्रचलित झाली आहे. शेजवलकर हे या संज्ञेचे एक चालते-बोलते उदाहरण. याच्या पुढे जात ते 'मॅनेजमेंट एज्युकेशन गुरू' बनले. म्हणूनच पुण्यातील व्यवस्थापन शिक्षणक्षेत्रात त्यांचा उल्लेख 'शेजवलकर शिक्षण संस्था' म्हणून केला जातो. त्यांनी विद्यापीठाच्या स्तरावर तब्बल ६० वर्षे अध्यापन केले. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाचे ते प्रमुख होते. त्यांच्या हाताखाली ८२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. मिळवली आहे. काही व्यवस्थापन संस्थांचे प्रमुख संचालकपद ते अखंडपणे भूषवित आहेत. पुणे विद्यापीठाच्या 'नॉलेज मॅनेजमेंट' या अभ्यासमंडळाचे ते अध्यक्ष होते. पुणे स्टॉक एक्स्चेंजचे ते संचालक होते. ही यादी आणखी वाढविता येईल; पण केवळ एवढ्या उल्लेखांमध्येही त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाची झलक दिसून येते.

    त्यांचे मराठी भाषाप्रेमही सर्वज्ञात आहे. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी ते नेहमीच आपल्या लेखनातून आणि व्याख्यानांमधून पाठपुरावा करतात. पुण्यात बी.कॉम.चा अभ्यासक्रम आज मराठी भाषेतून शिकवला जातो. उत्तरपत्रिकासुद्धा मराठी भाषेमधून लिहिता येते. हे सारे डॉ. शेजवलकर यांच्या प्रयत्नांमधूनच साध्य झाले. वाणिज्य विद्याशाखेत पीएच.डी.चा प्रबंध मराठीतून लिहिण्यास परवानगी मिळावी, हा त्यांचा आग्रह पुणे विद्यापीठाने मान्य केला. परंतु तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. सुमारे ३० पाठ्यपुस्तके त्यांनी मराठीतून लिहिली.

    महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे ते पाच वर्षे अध्यक्ष होते. या सार्‍या व्यापातून वेळ काढून त्यांनी चार हजारांहून अधिक मराठीतून भाषणे केली. कामगारांसाठी ज्ञानशिक्षण देण्याचे वर्ग काढले. गेली ५० वर्षे त्यांनी अध्यात्मावरही विविधांगी लेखन केले आहे. 'प्रार्थने'संबंधी ते लिहितात, 'सुखदु:खाच्या पलीकडे जाऊन परमेश्वराजवळ जाण्याची खरी ओढ निर्माण होते, तेव्हा केलेली प्रार्थना आत्मोन्नती करणारी असते.' व्यवस्थापनापासून अध्यात्मापर्यंतचा त्यांचा सहजसुंदर वावर खरोखरच स्तिमित करणारा आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदावरील त्यांच्या निवडीमुळे राजकारणविरहीत भाषासेवेचे बीज रोवले जाईल, अशी आशा आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • डॉ. दीप्ती देवबागकर

    जीवतंत्रज्ञानासारख्या आधुनिक विषयातील संशोधनात स्वत:चे आगळे स्थान निर्माण करणार्‍या पुणे विद्यापीठाच्या प्राणीसास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दीप्ती देवबागकर विज्ञान प्रसारकही आहेत. विज्ञान लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. जनुकाचे कामकाज बदलल्यामुळे कॅन्सरच्या पेशंटांवर होणारे परिणाम कसे कमी करता येतील, यावर त्या महत्वपूर्ण संशोधन सध्या करीत आहेत.

    डॉ. दीप्ती देवबागकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला विज्ञानप्रसाराचा डीएनए हा लेख पुढील पानावर वाचा.

    डॉ. दीप्ती देवबागकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला विज्ञानप्रसाराचा डीएनए हा लेख वाचा.

    devbagkar-dipti-modified