१९७२ साली चीनच्या जनता-प्रजासत्ताकास अधिकॄत भेट देऊन अमेरिका-चीन राजनैतिक संबंध पुन्हा स्थापण्यात पुढाकार घेतला, तसेच त्याच वर्षी सोव्हियेत संघाशी क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्रांवर मर्यादा घालून घेण्याचा तह केला. चंद्रावर मानव पाठवण्याच्या अमेरिकी प्रयत्नांना अपोलो ११ च्या रूपाने निक्सन प्रशासनाच्या कार्यकाळातच यश लाभले; तरीही एकंदरीत दॄष्टिकोनातून पाहता निक्सन प्रशासनाने समानव अंतराळ मोहिमा सीमित करण्याचेच धोरण अनुसरले.
९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे.
प्रेमानंद गज्वी हे मराठी नाटककार, लेखक व कवी आहेत. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे ‘घोटभर पाणी’ अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालं. ‘श्रेष्ठ भारतीय एकांकी’ या द्विखंडीय ग्रंथात प्रसिद्धही झालं. इंग्रजीत शांता गोखलेंनी ते अनुवादिलं आणि त्याचे प्रयोगही बंगलोरच्या एका नाटय़संस्थेनं केले. त्यापैकी एक प्रयोग एनसीपीएच्या मिनी थिएटरमध्ये अलेक पदमसींनी आयोजित केला होता. पण ‘लघुनाटय़’रूप असल्यामुळे असेल कदाचित, समीक्षकांनी त्याची विशेषशी दखल घेतली नाही.
‘तन-माजोरी’ मराठीत विलक्षण गाजलं. त्याला राम गणेश गडकरी, मामा वरेरकर, अनंत काणेकर आदी लेखन पुरस्कारही मिळाले. नाना पाटेकरांना घेऊन ते व्यावसायिक रंगमंचावर आलं. महाराष्ट्र मंडळाच्या प्रेमामुळं त्याचा प्रयोग आणि ग्रंथप्रकाशन सोहळा लंडनमध्येही झाला. गोवा विद्यापीठात एम.ए.च्या अभ्यासक्रमात ते शिकवलं जाऊ लागलं. कोकणीत त्याचा अनुवाद झाला. पुढे सगीर अहमद चौधरी या मित्रानं ते हिंदीत अनुवादित केलं. त्याचे पृथ्वी थिएटरला प्रयोग झाले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं त्याची दखल घेतली. अजमेरच्या (राजस्थान) ‘कृष्णा ब्रदर्स’नं ग्रंथरूपात ते प्रसिद्धही केलं. एवढंच कशाला, अमिताभ बच्चन आणि नासिरुद्दीन शाहला घेऊन त्यावर फिल्म करण्याची घोषणाही दिग्दर्शक राहुल रवैल यांनी केली होती.
‘किरवंत’ खरं तर त्यांनी लिहिलं होतं १९८१ साली; पण त्याचं समीकरण नीट सुटलं नव्हतं. मग ते समीकरण पुन्हा सोडवून पाहिलं. डॉ. श्रीराम लागूंनी ते व्यावसायिक रंगमंचावर सादर केलं. आणि मग हा-हा म्हणता प्रेमानंद गज्वी हे नाव सर्वतोमुखी झालं. स्मशानकर्मे करणाऱ्या ‘किरवंता’चं उपेक्षित जीणं त्यातून प्रथमच मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी आलं होतं. पं. वसंत देवांनी ‘किरवंत’चा हिंदी अनुवाद केला. तो ‘समकालीन भारतीय साहित्य’ या साहित्य अकादमीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाला नि पुढं दिल्लीच्या श्रीराम सेंटरनं ‘महाब्राह्मण’च्या रूपात हिंदी रंगमंचावर तो सादर केला. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या भारत रंगमहोत्सवातही ते सादर झालं व गाजलं. बघता बघता ‘किरवंत’ इंग्रजीत (अनुवाद- म. द. हातकणंगलेकर) आलं. कोलकाताच्या सीगल बुक्सनं ते प्रकाशित केलं.
त्यांची गाजलेली नाटके व एकांकिका: किरवंत, गांधी आणि आंबेडकर, छावणी, जय जय रघुवीर समर्थ, डॅम इट अनू गोरे, तन-माजोरी, देवनवरी, नूर महंमद साठे, शुद्ध बीजापोटी.
घोटभर पाणी, पांढरा बुधवार, बेरीज-वजाबाकी, (प्रेमानंद गज्वी) समग्र एकांकिका. प्रेमानंद गज्वी यांना वि. वा. शिरवाडकर पुरस्कार, मसापचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
प्रेमानंद गज्वी यांचे पहिले नाव आनंद गजभिये.. या बद्दल ते म्हणतात. मुळातच मला कव्वालीचा भारी नाद होता. गावी आमच्या बौद्ध समाजाचं ‘भीमबुद्ध भजनी मंडळ’ होतं. ते गावोगावी भजन गात. अशाच एका गावी कव्वालीचा सामना मी केला होता. सिनेमातील गाण्यांच्या चालीवर शेदीडशे गाणी मी लिहिली आहेत. तर मुद्दा मी प्रेमानंद गज्वी कसा झालो? आपली अंगीभूत आवड आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाते. गोविंद म्हशीलकर हा मुंबईमधील प्रसिद्ध कव्वाल. मालाडमध्ये त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता. ते यायला उशीर होत चालला होता.
लोक चुळबूळ करायला लागले. कुणीतरी मला म्हणालं, ‘म्हशीलकर येईपर्यंत ‘गा’ की लेका.’ तोवर कुणीतरी तबला-पेटी आणली. मी गावू लागलो. दरम्यान म्हशीलकर आले. ‘आले; आले! ए तू थांब आता!’ मी थांबलो. गोविंद म्हशीलकरांची कव्वाली सुरू झाली. मी स्टेजवरच मागे बसलेला, ‘कोरस’ करीत. म्हणजे म्हशीलकर पुढं म्हणतील त्याच ओळी मागच्यांनी पुन्हा आळवणं. सकाळी कव्वाली संपली. जाता-जाता म्हशीलकरांनी विचारपूस केली. म्हणाले, ‘मला घरी येऊन भेट.’ मी परेलच्या बी.आय.टी. चाळीत त्यांच्या घरी भेटलो.
मैत्रीचे धागे जुळले. मी गाणी लिहित होतो सिनेमातील गाण्यांच्या चालीवर नि गातही होतो कोरसमध्ये. एक दिवस ते म्हणाले, कितना लम्बा है तुम्हारा नाम.. ‘ग-ज-भि-ये’? छोटा कर दूँ? ‘गज्बी’! मी तसा शागिर्दच त्यांचा. कशाला नाही म्हणतो? दरम्यान माझ्या कानावर एक नाव आलं ‘गज्वी’ हे मुस्लीम आडनाव. गज्बीपेक्षा ‘गज्वी’ मला अधिक बरं वाटलं. मी गज्वी हे नाव स्वीकारलं. मी गाणी लिहित होतोच. आपल्या गाण्याची एखादी पुस्तिका प्रसिद्ध व्हावी ही इच्छा. तशी तयारी केली. पण पुस्तिकेला नाव काय देणार? म्हशीलकरांचा प्रश्न. मी म्हटलं ‘आनंद गीते’. तर ते म्हणाले, ‘या नावाची किताब तर आहे, मार्केटमध्ये.’ मी लगेच म्हणालो, ‘आनंद को प्रेमानंद कर देते है!’ आणि अशाप्रकारे मी आनंद गजभियेचा ‘प्रेमानंद गज्वी’ झालो. बाजारात माझी पुस्तिका आली. ‘प्रेमानंद गीते’ हे पुस्तक छापलं गेलं ‘बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस’मध्ये. भैयासाहेब आंबेडकरांनी ते छापून दिलं. भैयासाहेब; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव.
मराठी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून रंगभूमी/थिएटर, कला, प्रतिभा याविषयावर ड्रामा स्कूल मुबईच्या वतीने निलम सकपाळ यांनी प्रेमानंद गज्वी यांच्याशी साधलेला संवाद.
https://www.youtube.com/watch?time_continue=36&v=B65YsRASIng
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
प्रा. गुरुराज गणेश गर्दे यांची संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेली आणि प्रत्येक महिलेचा आत्मविश्वास वाढविणारी, स्वाभिमान उंचावणारी कविता.... त्यांच्याच "चांदणझुला" मधून एक नवी कोरी कविता......
"जगणं विसरू नकोस...."
"सखे,"
जगाकडे रोज नव्याने..
बघणं विसरू नकोस....
सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....
तुला निराश करणारे
अनेक क्षण येतील...
पाय घालून पाडणारे
अनेक जण येतील...
त्यांना घाबरून तुझं तू
चालणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस.... १
तुझं कौतुक प्रत्येकाला इथं
रुचेलच असं नाही...
कौतुकासाठी तुझं नाव
सुचेलच असं नाही...
कौतुक मिळवण्यासाठी, काम
करणं विसरू नकोस...
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस.... २
तुला सुद्धा मन आहे
याचा विचार कर...
बदलवणा-या मानसिकतेचा
जोरात प्रचार कर...
काळजापासून माया तुझी
झरणं विसरू नकोस...
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस.... ३
रडावंसं वाटेल तेव्हा
रडून मोकळी हो...
लढावंसं वाटेल तेव्हा,
लढून मोकळी हो....
रडण्यामध्ये तुझं तू
लढणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस.... ४
तुला कुणाला पुरावे
द्यायची गरज नाही...
कुणासाठी तुला परतून
यायची गरज नाही....
ध्येयासाठी पुढेपुढे
चालणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस.... ५
तसा राजेंद्रकुमार म्हणजे म्हटला तर स्टार, म्हटला तर नट तरी पण ६० च्या दशकात त्यांचे अनेक चित्रपट सिल्वर जुबली झाले. या मुळे त्यांचे नाव ‘ज्युबिली कुमार’ म्हणून पडले.
आज ५ डिसेंबर
आज वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाने जगभर प्रसिद्ध झालेल्या डॉ. लक्ष्मण देशपांडे यांची जयंती.
जन्म ५ डिसेंबर १९४३
प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी एम. ए.,पीएच.डी.,मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स या पदव्या प्राप्त केल्या. १९६६ ते १९६८ या कालावधीत मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर १९६८ ते १९८० स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. २३ नाटय़महोत्सवाचे आयोजन, २०० पेक्षा अधिक नाटय़कथांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर दोन चित्रपटांत भूमिका, अशी त्यांची नाटय़-चित्रपट कारकीर्द आहे. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगामुळे डॉ. देशपांडे यांचा प्रेक्षक-श्रोता जगभर आहे. एकूण ५२ पात्रांचे विविध आवाज आणि कमीतकमी प्रभावी हालचाली हे या एकपात्री प्रयोगाचे खास वैशिष्टय़ होते. मराठवाडय़ाच्या ग्रामीण जीवन शैलीशी एकरूप असलेले आणि अस्सल व्यक्तिरेखा असणारा हा प्रयोग केवळ मराठवाडय़ातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विविध देशांतील मराठी नाटय़रसिकांना भावला. हे उत्तुंग प्रतिभेचा कलावंत होते. ‘गीनिज बुक’मध्ये तब्बल दोन वेळा नोंद घेण्यात आलेले लक्ष्मण देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. ‘वऱ्हाड’चे लेखन, दिग्दर्शन आणि कलावंत या सगळ्या भूमिका डॉ. देशपांडे यांच्याच होत्या. तीन छोटे दिवे, तीन माईक आणि पंचा इतके छोटे साहित्य वापरून ५२ व्यक्तिरेखा उभ्या करणाऱ्या ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ची सुरुवात १९८०मध्ये झाली. आजपर्यंत या एकपात्री प्रयोगाचे ३ हजारांपेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत. प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे २२ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हिंदुस्थानी संगीतातील अस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणून ओळखल्या जाणा-या धृपद गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणा-यांमध्ये उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचा जन्म २० एप्रिल १९३९ रोजी झाला. ते धृपद-धमार गायला बसले की, मैफलीचे राजाच असतात. डागर घराण्याच्या मागील १९ पिढयांकडून हा समृद्ध वारसा उस्ताद सईदुद्दीन यांच्याकडे आलेला आहे. आता तो त्यांचे दोन्ही सुपुत्र उस्ताद नफिसुद्दीन डागर आणि उस्ताद अनिसुद्दीन डागर तसेच शिष्य पुढे नेत आहेत. डागर साहेबांचे देश-विदेशात अनेक कार्यक्रम संपन्न झाले असून धृपद गायनशैलीतील बारकावे समजून सांगण्याचे त्यांच कौशल्य थक्क करणारे आहे. संगीतातील विद्वता प्रत्यक्ष मैफिलीमध्ये अभिव्यक्त करणा-या काही मोजक्या कलावंतांमध्ये त्यांचे स्थान उच्च स्तरावर आहे. उस्ताद सईदुद्दीन डागर यांना मिळालेल्या पुरस्कारांची मालिकाही मोठी आहे. देशविदेशात त्यांचा शिष्यसंप्रदाय आहे. याशिवाय त्यांनी अनेक शिष्यांनाही या कठीण गायकीच्या क्षेत्रात तयार केले आहे. उस्ताद सईदुद्दीन डागर यांना बालगंधर्व पुरस्कार मिळला आहे. संगीतातील विद्वता प्रत्यक्ष मैफिलीमध्ये अभिव्यक्त करणा-या काही मोजक्या कलावंतांमध्ये त्यांचे स्थान उच्च स्तरावर आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे गायन
https://www.youtube.com/watch?v=ot4kcsFW8Y8
https://www.youtube.com/watch?v=Lwzhj_bf7LI
https://www.youtube.com/watch?v=48Bi7NqzMHo
मराठी माणसांची ‘डिस्को दांडिया’शी जानपहचान करून दिली ती याच बाबला शहा यांनी. दोन काठ्या घेऊन तलवारबाजी केल्यागत नाचणाऱ्या तरूण पिढीला नवरात्रीत दांडियात शिस्तबद्ध कसं नाचायचं याचं बाळकडू मिळालं या बाबलांच्यामुळे.
हा माणूस डॉक्टर होता, तो वकिलही होता, तो आयपीएस म्हणजे जिल्हा पोलिस प्रमुख दर्जाचा अधिकारी तसंच आयएएस म्हणजे कलेक्टर दर्जाचा अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय. श्रीकांत जिचकार यांची भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तींच्या पक्तिंत गणती होते.
कवी बी हे नामाभिधान धारण करून नारायण मुरलीधर गुप्ते यांनी आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठीचिये नगरी मधील विचाराचे व कल्पनेचे कुंज काही काळ निनादवून सोडले व तेथील रसिक रहिवाशांवर आपल्या गीतमाधुर्याची जबरदस्त मोहिनी घातली. त्यांचा जन्म १ जून १८७२ रोजी झाला. खरे सांगायचे म्हणजे ‘बी’ हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे. त्यांच्या कवितांची शैली ही अतिशय बांधेसूद आणि मधुर आहे. दीर्घकविता हे कवी ‘बीं’च्या लेखन शैलीचे वैशिष्ठ्य. त्यांच्या प्रणयपत्रिका, बकुल, माझी कन्या, चाफा, वेडगाणे या काही विशेष उल्लेख कराव्या अश्या कविता! यातील ‘माझी कन्या‘ ही कविता पूर्वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना अभ्यासाला असल्यामुळे आणि ‘चाफा‘ ही कविता लता मंगेशकरांच्या समधुर स्वरात गीतबद्ध झाल्यामुळे सर्वोपरीचीत आहे. त्यांची पहिली कविता ‘प्रणय पत्रिका‘ ही वर्हा डात चिखलदरा येथे दिनांक १४ सप्टेंबर १८९१ रोजी लिहिली गेली. त्यावेळी ते सुमारे १९ वर्षांचे असावेत. ही कविता त्याच वर्षी कै. हरिभाऊ आपटे यांच्या ‘करमणूक’ पत्रात प्रसिद्ध झाली. अनेक दिवस झाले तरी प्रियकराचे कुशल सांगणारे पत्र आले नाही म्हणून चिंताग्रस्त अशा प्रेयसीचे आपल्या प्रियकराला लिहिलेले पत्र म्हणजे ‘प्रणय पत्रिका. १९११ साली ‘बी’ हे अभिनव नाव धारण करून त्यांनी “टला-ट रीला-री । जन म्हणे काव्य करणारी ।” ही ‘वेडगाणे‘ नावाची एक अत्यंत नादमधुर व तात्त्विक कविता ‘मासिक मनोरंजनात’त प्रसिद्ध केली. केवळ यमकाला यमक जुळवून अर्थहीन काव्य करण्यावर उपहासात्मक आणि तात्त्विक अशी ही कविता म्हणजे बींच्या प्रतिभेचे एक उत्तम उदाहरण. परंतू ही अतिशय अर्थपूर्ण कविता रचताना स्वतः कवी बी मात्र यमक जुळविल्याशिवाय रहात नाहीत. पण हे सारे साधताना कवितेचे सौंदर्य देखील त्यांनी ढळू दिले नाही. १९११ ते १९३३ पर्यंत, म्हणजे सुमारे एक तपभरच ‘बी’ कवींची प्रतिभा फुलून आली असे म्हणता येईल. १९३४ साली त्यांचा “फुलांची ओंजळ” हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. 'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना आचार्य अत्र्यांची आहे. कवी बी यांचे निधन ३० ऑगस्ट १९४७ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ प्रियांका / स्वानंद
मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचे शालेय शिक्षण मिरज येथेच इयत्ता पहिलीपर्यंत झाले. त्यांचा जन्म १ जानेवारी १९०९ मिरज येथे झाला. वडील लक्ष्मणरावांना संगीताची आवड होती. संगीताचे भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांकडे ते थोडीफार गायकी शिकले होते. गणपतरावांना २ भाऊ आणि ५ बहिणी. मोठा बळवंत हा बळवंतराव मराठे यांच्या ‘हिंदी नाटक मंडळीत’ बालनट होता. मधला शंकर हा जनुभाऊ निमकरांच्या ‘स्वदेश हितचिंतक मंडळीत होता. पुढे लक्ष्मणरावांनी शंकर आणि गणूला संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’मध्ये दाखल केले. ललितकलादर्शच्या ‘शापसंभ्रम’ मध्ये गणूने महाश्वेताच्या मैत्रिणीचे काम केले. मराठी संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या किर्लोस्कर संगीत मंडळीतील दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांनी ‘किर्लोस्कर’मधून बाहेर पडून नवीन नाटय़संस्था काढण्याचे ठरविले. १८ जानेवारी १९१८ रोजी बोरिवली येथे या नवीन ‘बलवंत संगीत मंडळी’ची स्थापना झाली. या तीन प्रमुख कलाकारांबरोबरच अन्य कलाकारांचीही संस्थेला आवश्यकता होती.
शंकर आणि गणू या बालनटांची कीर्ती ऐकून कृष्णराव कोल्हापुरे यांनी त्यांना ‘बलवंत’मध्ये आणले. ज्या बलवंत संगीत मंडळीने गणूचे आयुष्यच बदलून टाकले, उजळून टाकले त्या कंपनीत गणू वयाच्या दहाव्या वर्षीच दाखल झाला.
नाटय़ाचार्य अण्णासाहेब (बळवंत) किर्लोस्कर आणि लोकमान्य टिळक यांच्या नावाचा सार्थ अभिमान बाळगणारी बलवंत कंपनी राष्ट्रकार्यातही अग्रेसर होती. कंपनीच्या स्थापनेनंतर लगेचच लोकमान्य टिळकांच्या होमरूल चळवळीच्या फंडासाठी आयोजित केलेल्या ‘पुण्यप्रभाव’ या नाटकाच्या प्रयोगाला स्वत: लोकमान्य टिळक हजर होते. या नाटकात युवराजाची भूमिका करताना गणूच्या ‘भुलूनिया खलजनालापा’ ‘दुर्दैवे हेतू झाला’ ‘अंतरि खेद भरे’ या पदांना आणि भूमिकेला श्रोत्यांची भरपूर दाद मिळाली. पदांना ‘वन्समोअर’ मिळाले. मध्यंतरात लोकमान्यांनी गणूचे विशेष कौतुक करताना म्हटले,‘युवराजाची सुंदर भूमिका करणऱ्या या मुलाचे कौतुक करावेसे वाटते. याला काहीतरी द्यायला हवे. पण मी हा असा! काय देऊ या मुलाला?’
टिळक असे म्हणताहेत तोच त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या गृहस्थांनी आपली सोन्याची अंगठी काढून टिळकांच्या हातात दिली. ‘‘या सद्गृहस्थांनी दिलेली ही अंगठी मी या मुलाला बक्षीस देतो,’’ असे म्हणून टिळकांनी ती अंगठी गणूच्या बोटात घातली.
पुढे १९३१ मध्ये झालेल्या बलवंतच्या स्वातंत्र्यवीर सावरकरलिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकाच्या वेळीही नलिनीच्या अप्रतिम भूमिकेबद्दल स्वातंत्र्यवीरांनी त्यांचे कौतुक केले. शासकीय पुरस्कारांकडून सदैव उपेक्षित राहिलेल्या गणपतरावांना लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीरांनी केलेले हे कौतुक कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे वाटत असे.
१९१८ ते १९४० या बलवंत कंपनीच्या कार्यकाळात गणपतरावांनी कंपनीचे मुख्य कलाकार दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्याबरोबर प्रामुख्याने स्त्री भूमिका केल्या. शारदा, उग्रमंगल, भावबंधन, राजसंन्यास, संन्यस्त खड्ग, ब्रह्मकुमारी इ. नाटकातील त्यांच्या भूमिका रसिकांना पसंत पडल्या. दीनानाथांच्या सहवासात आणि त्यांच्याकडून मिळालेल्या संगीत शिक्षणाने गणपतरावांची कला बहरली. बलवंत कंपनीच्या मालकांनी कपंनी बंद करून ‘बलवंत पिक्चर्स’ ही चित्रपटनिर्मिती संस्था काढली. दीनानाथांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही तरी ‘कृष्णार्जुन युद्ध’, ‘ठकीचं लग्न’, ‘भक्त पुंडलिक’, ‘अंधेरी दुनिया’ या चित्रपटातील गणपतरावांच्या भूमिका रसिकांना भावल्या. यातील काही चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले. दीनानाथांच्या अकाली निधनानंतर त्यांनी मो. ग. रांगणेकराच्या ‘आशीर्वाद’, ‘कुलवधू’ इ. नाटकात प्रमुख भूमिका केल्या. अत्रे पिक्चर्सच्या ‘पायाची दासी’ या चित्रपटाच्या वेळी आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘मा.अविनाश’ हे नाव दिले आणि तेच पुढे रूढ झाले. मास्टर अविनाश यांचे मंगेशकर कुटूंबियांशी त्यांचे घनिष्ठ सबंध होते. दिनानाथ मंगेशकरांच्या पडत्या काळात त्यांनीच हात दिला. दीनानाथांनंतर ह्रदयनाथ, लतादीदींना त्यांनी आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं. दीनानाथांचेही गणपतराव हे प्रिय शिष्य सहकारी होते. १९४२ साली दीनानाथांच्या निधनाच्या वेळी गणपतराव पुण्यात नव्हते. दीनानाथांनी मृत्यूपूर्वी आपल्या या प्रिय शिष्याची आठवण काढताना,
‘इतुके कळवि आजि माझ्या गुरुला’
‘मरताही भय नाही शिवले कचाला’
या विद्याहरण नाटकातील पदात थोडा पदल करून
‘इतुके कळवि आजि माझ्या गणूला
मरताही भय नाही शिवले दिनाला’
असा निरोप गणूसाठी ठेवला.
संगीत आणि नाटय़क्षेत्रातून अकाली, अकारण निवृत्ती घेतलेल्या गणपतरावांनी १९५३-५७ मध्ये तळेगाव दाभाडे येथे ‘अशोक सहकारी शेतकरी संघा’च्या माध्यमातून सामुदायिक शेतीचा प्रयोग केला. त्यानंतर मात्र सांगली येथे जाऊन वानप्रस्थ जीवन ते व्यतीत करू लागले. सांगलीकरांनी त्यांचा योग्य तो सन्मान करताना ‘‘विष्णुदास भावे पुरस्कार’, ‘सांगली भूषण’ हे पुरस्कार त्यांना दिले. तरी शासकीय सन्मान त्यांच्या योग्यतेनुसार मिळणे आवश्यक होते ते त्यांना मिळाले नाहीत. शासनदरबारी त्यांची उपेक्षा झाली हे शल्य त्यांच्या मित्रपरिवाराला आणि चाहत्यांना अस्वस्थ करणारे आहे. मास्टर अविनाश हे संगीत आणि नाटय़क्षेत्राचा चालताबोलता इतिहास आणि शतकाचा साक्षीदार होते. मास्टर अविनाश यांचे निधन ३ एप्रिल २००९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ डॉ. रवींद्र घांगुर्डे
Copyright © 2025 | Marathisrushti