लता मंगेशकर यांच्याविषयी माहिती असलेल्या आणि नसलेल्याही माहितीचा संग्रह..
जन्म - सप्टेंबर २८, इ.स. १९२९ ; इंदोर, मध्य प्रदेश (ब्रिटिश काळातील मध्य भारत एजन्सी)
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ गाव - मंगेशी, गोवा
भाषा - मराठी
पारिवारिक माहिती
आई - माई मंगेशकर
वडील - मास्टर दीनानाथ मंगेशकर
बंधू-भगिनी - आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, मीना खडीकर
संगीत साधना गुरू - मास्टर दीनानाथ मंगेशकर
संगीत कारकीर्द
पार्श्वगायन, सुगम संगीत
कारकिर्दीचा काळ - इ.स. १९४२ पासून
गौरव
विशेष उपाधी - गानकोकिळा
पुरस्कार - भारतरत्न(२००१)
लता मंगेशकर या भारताच्या महान गायिका आहेत. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते.
लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे.
त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे.
लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत.
लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.
भारताचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' प्राप्त होणार्या गायक-गायिकांमध्ये लता दीदी या दुसर्या गायिका आहेत..
लता मंगेशकर हे नाव 'गिनेस बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये इ.स. १९७४ ते इ.स. १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नमूद झालेले आहे.
लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात शीख मोहल्ला येथे एका महाराष्ट्रीय गोमंतक कुटुंबात झाला.
त्यांचे पाळण्यातले नाव हृदया.
त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य.
आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे.
लताला पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी तिने वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली.
इ.स. १९४२ मध्ये लता अवघ्या १३ वर्षांची होती, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक - मास्टर विनायक ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.
लताने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. इ.स. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लताबाई मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (इ.स. १९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले (दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते).
लता आणि आशा (बहीण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (बडी माँ - इ.स. १९४५) नूर जहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लताने माता तेरे चरणोंमें हे भजन गायले.
मास्टर विनायकांच्या दुसर्या हिंदी चित्रपटाच्या (सुभद्रा - इ.स. १९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लताबाईंची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.
इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवालें यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी उस्ताद अमानत खाँ(देवासवाले) यांचेकडून शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लताबाईंना तालीम मिळाली.
इ.स. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताबाईंचे मार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई(अंबालेवाली), ह्यांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या.
ग़ुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद (इ.स. १९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लताचा आवाज "अतिशय बारीक" म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते - येणार्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदरांनी लतादीदींना मजबूर (इ.स. १९४८) ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली.
सुरूवतीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लताने स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लीम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर हिंदुस्तानी शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीपकुमार यांनीन लताच्या हिंदी/हिंदुस्तानी गाण्यातील "मराठी" उच्चारांसाठी तुच्छतादर्शक शेरा मारला, तेव्हा लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून हिंदुस्तानी उच्चारांचे धडे घेतले.
लोकप्रिय चित्रपट महल(इ.स. १९४९)चे आयेगा आनेवाला हे गाणे लताच्या कारकिर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. (गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबालाने म्हटले होते.)
१९५० च्या दशकात लताने ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायिली, अशा नामांकित संगीतकरांची नावे - अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिन देव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार मुखोपाध्याय, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहल आणि उषा खन्ना. (सुप्रसिद्ध संगीतकार ओ.पी. नय्यर हे असे एकमेव अपवाद होते ज्यांनी आपल्या रचनांसाठी लताऐवजी आशा भोसले यांना प्राधान्य दिले.)
संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली बैजू बावरा (इ.स. १९५२), मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) आणि कोहिनूर (इ.स. १९६०) ह्या चित्रपटांसाठी लताने शास्त्रोक्त संगीतावर आधारित काही गाणी गायिली. लताने नौशादांसाठी गायिलेले पहिले गाणे हे जी.एम.दुर्राणींसोबतचे द्वंद्वगीत छोरेकी जात बडी बेवफ़ा आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी तर आपल्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्या(विशेषतः राज कपूरनिर्मित) गाण्यांच्या गायिका म्हणून लताचीच निवड केली. अशा चित्रपटांमध्ये आग, आह, (इ.स. १९५३), श्री ४२० (इ.स. १९५५) आणि चोरी चोरी (इ.स. १९५६) यांचा समावेश आहे. इ.स. १९५७ पर्यंत सचिन देव बर्मन आपल्या बहुतेक चित्रपटगीतांच्या प्रमुख गायिका म्हणून लताची निवड करीत, उदा. सज़ा (इ.स. १९५१), हाउस नं. ४४, (इ.स. १९५५) आणि देवदास (इ.स. १९५५). पण इ.स. १९५७ ते इ.स. १९६२ च्या काळात बर्मनदादांनी लतादीदी ऐवजी गीता दत्त आणि आशा भोसले ह्या गायिकांना घेऊन आपली सर्व गाणी बसवली.
इ.स. १९५० च्या दशकात लताबरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणार्यांपैकी एक सलिल चौधरी होते. लतादीदीला "सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका" म्हणून सर्वप्रथम फ़िल्मफ़ेयर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजा रे परदेसी ह्या मधुमती (इ.स. १९५८) मधील गीतासाठी मिळाले.
१९६०च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. ह्या काळात लताने जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यांपैकी अनेक गाणी अजरामर झाली. १९६० मध्ये प्यार किया तो डरना क्या हे मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) चे नौशादने संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रित गाणे तुफान लोकप्रिय झाले. हवाई-धरतीचे अजीब दास्ताँ है ये हे शंकर-जयकिशन दिग्दर्शित आणि दिल अपना प्रीत पराई (इ.स. १९६०) मध्ये मीना कुमारी वर चित्रित गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले.
इ.स. १९६१ मध्ये लताने सचिन देव बर्मन यांचे साहाय्यक जयदेव यांसाठी अल्ला तेरो नाम हे भजन गाण्याचे पाऊल उचलून बर्मनदादांसोबत पुन्हा वाटचाल सुरू केली.
इ.स. १९६२ मध्ये लताने बीस साल बाद चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल ह्या हेमंत कुमार मुखोपाध्याय-दिग्दर्शित गाण्यासाठी दुसरा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला.
२७ जून, इ.स. १९६३ ला, भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लताबाईंनी कवी प्रदीप लिखित आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ऐ मेरे वतन के लोगों हे देशभक्तिपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणार्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे झाले.
इ.स. १९६३ मध्ये सचिन देव बर्मन यांव्याबरोबर पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर लताने गाईड (इ.स. १९६५) मधील आज फिर जीनेकी तमन्ना है, पिया तोसे नैना लागे रे, गाता रहे मेरा दिल हे (किशोर कुमार सोबतचे द्वंद्वगीत) तसेच ज्युवेल थीफ़ (इ.स. १९६७) मधील होटोंपे ऐसी बात यांसारखी बर्मनदादांची अनेक लोकप्रिय गाणी म्हटली.
इ.स. १९६० च्या दशकात लतादीदीने मदनमोहन ह्या आपल्या आवडत्या संगीतकाराची अनेक गाणी म्हटली. अशा गाण्यांमध्ये अनपढ (इ.स. १९६२) चे आपकी नज़रोंने समझा, वो कौन थी (इ.स. १९६४) ची लग जा गले, नैना बरसे तसेच मेरा साया (इ.स. १९६६) चे तू जहां जहां चलेगा ह्या सुरेल गाण्यांचा विशेष उल्लेख होतो.
१९६० च्याच दशकात लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्या नवोदित संगीतकार-जोडीची जवळ-जवळ सर्व गाणी लतानेच म्हटली. लता मंगेशकरच्या गाण्यांमुळेच ही जोडी हिंदी चित्रपटसंगीतक्षेत्रात अजरामर झाली. पारसमणी (इ.स. १९६३) ह्या लक्ष्मी-प्यारे जोडीच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटातली लताची गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. लतादीदीने मराठी सिनेमांसाठी अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी ज्या नामांकित संगीतकारांबरोबर काम केले, त्यांमध्ये हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख करायला हवा. लतादीदीने स्वतः 'आनंदघन' ह्या टोपणनावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत. १९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये लताने संगीतकार सलिल चौधरी आणि हेमंतकुमारांची बांगला भाषेतली गाणीही म्हटली आहेत.
लता मंगेशकरने (मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांसारख्या त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांबरोबर युगलगीते गायिली आहेत.
अभिजात संगीतात उस्ताद अमीरखाँ आणि उस्ताद बडे गुलामअली हे त्यांचे आवडते गायक आहेत.
लेखन
लता मंगेशकर यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ग्रंथाली प्रकाशनाने सन १९९५च्या आसपासच्या वर्षी प्रसिद्ध केला होता. त्याचे संपादन मधुवंती सप्रे यांनी केले होते. पुढे हे पुस्तक मिळणे कठीण झाले. जयश्री देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे ’मैत्रेय प्रकाशन’ने ’फुले वेचिता’ या नावाने ते पुस्तक पुनर्मुद्रित केले आहे.
लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ’स्वरयोगिनी’ नावाचे पुस्तक मधुवंती सप्रे यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची यादी आहे.
The Voice of a Nation (मूळ लेखक पद्मा सचदेव; अक्षय गाणे-मराठी अनुवाद : जयश्री देसाई)
ऐसा कहाँ से लाऊँ (हिंदी- पद्मा सचदेव)
लतादीदी आणि माझ्या कविता (सुचित्रा कातरकर)
लतादीदी : अजीब दर्शन हैं यह (मूळ लेखक : हरीश भिमाणी-हिंदी); (लतादीदी-मराठी अनुवाद : अशोक जैन.)
In search of Lata Mangeshkar. (इंग्रजी - हरीश भिमाणी)
Lata in her own voice (नसरीन मुन्नी कबीर)
लता मंगेशकर (चरित्र)- राजू भारतन
लता मंगेशकर गंधार स्वरयात्रा (१९४५- १९८९)- संपादन:विश्वास नेरूरकर
गाये लता, गाये लता- डॉ.मंगेश बिच्छू. प्रकाशक- पल्लवी प्रकाशन
हे रत्न भारताचे - लता मंगेशकर (लेखक : रेखा चवरे)
मोगरा फुलला (संपादक : रेखा चवरे)
सप्तसुरांच्या पलीकडे : लता मंगेशकर (हरीश भिमाणी)
लता मंगेशकर - संगीत लेणे (मोरया प्रकाशन)
संकलन - अमित कुलकर्णी
संदर्भ - विकिपिडिया, विविध वेबसाईटस व पुस्तके
पूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत पंजाबी, बंगाली व हिंदी भाषिक संगीतकारांची मांदियाळी असताना वसंत देसाईंचा सन्माननीय अपवाद वगळता बहुसंख्य मराठी संगीतकारांनी इंग्रजी आद्याक्षरांचा आसरा घेत मराठीपण लपविण्याचा प्रयत्न केला. के. दत्ता (कोरगावकर) सी. रामचंद्र (चितळकर) दत्ताराम(वाडकर), सुधीर (फडके) यांसारख्या मराठमोळ्या संगीतकारांनी आपली आडनावे खुबीने लपवीत या क्षेत्रात मुसंडी मारली. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी के. दत्ता यांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शकाचे काम केले होते. १९५४ साली के.दत्ता यांनी संगीत दिलेल्या 'रिश्ता' या चित्रपटातही लता मंगेशकर यांचे साजन से पहली बार, व तलत मेहमूद यांनी गायलेले 'वोही चांदनी है' ही गाणी त्या काळी गाजलेली होती. मा.के.दत्ता यांनी अनेक हिन्दी व मराठी चित्रपटाना संगीत दिले. काही चित्रपट, याद, बडी माँ, दामन, नादान, रिश्ता, चंद्रराव मोरे, सुखाचा शोध, गीता, गोरखनाथ, गोरा कुंभार, सूनबाई, महात्मा विदूर, हरिहर भक्ती, रायगडचा बंदी मा.के.दत्ता यांचे २३ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
राष्ट्रपती डॉ. राजेंदप्रसाद औरंगाबादेत आले तेव्हा पगडींनी एक तास अस्खलित उर्दूमधून सूफी संप्रदायावर भाषण दिले. ते राष्ट्रपतींना इतके आवडले की, त्यांनी ‘अ मोस्ट लनेर्ड पर्सन’ या शब्दात पगडी यांची प्रशस्ती केली.
”भारतीय सिनेमांमध्ये सामाजिक, स्त्रीप्रधान असे चित्रपट जेव्हा बनू लागले त्यावेळी अनेक गुणी कलाकार या इंडस्ट्रीला लाभले. त्या काळच्या कलाकारांमध्ये असलेल्या असाधारण प्रतिभेमुळे यशाचं शिखर अगदी सहज सर करता आलं आणि त्यांचं नाव चित्रपटाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले; त्यापैकीच एक नाव होते शांता आपटे. त्यांचा जन्म १९ मार्च १९२३ रोजी झाला. शांता आपटे यांचे वडिल रामचंद्र आपटे रेल्वेत नोकरीला होते; शांता आपटें यांचे शालेय शिक्षण ४ थी पर्यंतचं, त्यानंतर घरीच शिकवण्यासाठी शिक्षक येत, अभ्यासाव्यतिरिक्त वयाच्या ५ व्या वर्षापासून गायनाचे धडे सुध्दा शांता आपटेंना दिले गेले; पुण्यात असताना बापूराव केतकर यांच्याकडे संगीताचं पहिलं प्रशिक्षण घेतलं; कालांतर त्यांच्या वडिलांची बदली पंढरपूरला झाली त्यामुळे तिथे गायन आणि संगीताचं प्रशिक्षण नारायण बिवा थिटे व मास्टर कृष्णाराव यांच्याकडून घेतले. लहान वयातच शांता आपटेंनी गायनाचे छोटे-मोठे जलसेही करु लागल्या; अश्या या गोड गळ्याच्या गायिकेला रुपेरी पडद्यावर अभिनय करण्याची संधी मिळाली. कला तसंच अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवायची असेल तर सर्वच गोष्टी अवगत असणं गरजेच्या आहेत; हे माहित असल्यामुळे शांता आपटेंनी ड्रायव्हींग, स्वीमिंग यासारखे प्रकार शिकून घेतले. नृत्यात तर त्या निपुणच होत्या! भालजी पेंढारकरांच्या ‘श्यामसुंदर’ या चित्रपटातून या सिनेमात शांता आपटेंनी ‘राधा’ ची भूमिका साकारली; त्यानंतरच्या २-३ वर्षात शांताजींनी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं व कालांतराने ‘प्रभात’च्या ‘अमृत-मंथन’ , ‘वहॉं’ , ‘राजपुतरमणी’ सारख्या हिंदी चित्रपटातून भूमिका करुन आपल्यातील वैविध्यपूर्ण कलेची चुणूक दाखवून दिली; तसंच ”गोपालाकृष्ण” , ”अमरज्योती” या चित्रपटातील भूमिका सुध्दा प्रचंड गाजल्या; ”कुंकू” चित्रपटानी त्यांच्या अभिनयावर आंतरराष्ट्रीय मोहोर उमटवली. कारण त्याकाळात बर्लिन फेस्टीव्हल मध्ये शांता आपटेंच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं, आणि कुंकू त्यांच्या कारकीर्दीचा ”माइलस्टोन” ठरला. शांता आपटेंची ओळख बनला; कारण त्यांची कुंकूतील भूमिका त्या काळातल्या एका अतृप्त मनाचा ठाव घेणारी होती जी शांता आपटेंनी हिबेहूब रंगवली. ”कुंकू” आणि ”स्वयंसिध्दा” या चित्रपटात अन्यायाविरोधात पेटून उठनाऱ्याच स्त्रीचं दर्शन शांता आपटेंनी घडवून दिलं. शांता आपटेंचा खाजगी जीवनात वावरसुध्दा अन्याय सहन करायचा नाही आणि वेळ प्रसंगी त्यांनी ते दाखवून देखील दिले. एकदा एका पत्रकाराने शांता आपटें यांच्या विषयी काहीतरी खोटी खरपूस बातमी बनवली, ती बातमी वाचल्यावर त्या खूपच हैराण झाल्या ! आपण ही गोष्ट बोललोच नव्हतो तर त्या पत्रकाराने छापलीच कोणत्या आधारावर? त्याक्षणी अगदी बेधडकपणे शांता आपटे त्या वृत्तपत्राच्या कार्यालयात गेल्या व ही बातमी छापणाऱ्या व पत्रकाराला आपल्या फटक्यांचा प्रसाद द्यायला देखील मागे-पुढे पाहिले नाही. हा प्रसंग म्हणजे एक अपवाद असला तरी खोटेपणाच्या विरोधात केलेला हा मुकाबलाच होता; मिलेट्री माईंडेड असल्याने वेळेचे भान, हजरजबाबीपणा, शिस्तबध्दता, आणि हाती घेतलेलं कार्य वेळच्यावेळी पूर्ण करणे हे गुण अगदी नमुद करण्यासारखेच होते. तसंच एक आई म्हणून शांता आपटे स्वत: आपल्या मुलीवर बारीक लक्ष ठेवून होत्या. नाटक आणि शुटिंग्समधून वेळ मिळेल तेव्हा जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबियासोबत व्यतीत करण्याचा प्रयत्न करत; इंग्रजी भाषेचं वाढतं महत्व ओळखून शांता आपटेंनी आपल्या दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले, पण घरात असताना अगदी सक्तीने मराठीतच बोलायचे यावर त्या ठाम असायच्या. शांता आपटेंना हिंदी, मराठी, इंग्रजी सोबतच अनेक भाषा अवगत होत्या; त्यामुळे अनेक प्रादेशिक चित्रपटामध्ये त्यांना भूमिका करता आल्या ज्यामध्ये गुजराती, बंगाली, तमिळ, तेलुगू या भाषांचा समावेश आहे. त्याकाळी महिलांचा रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावरील वावर कमी होता,पण या क्षेत्रात महिलांनी दैदिप्यमान कामगिरी करावी असं त्यांना मनोमन वाटे, आणि म्हणून ऑफस्क्रीन आणि बॅकस्टेज आर्टिस्ट ना शांता आपटेंकडून सतत प्रोत्साहून मिळत असे.
”शांता आपटे” यांचे, ”कुंकू” मधील निरा या त्यांच्या भूमिकेमुळे जाचक परंपरेला विरोध करणारी स्त्री आणि अन्यायाविरुध्द बंड पुकारुन समाजाला सत्मार्गाकडे नेणार्याल स्त्रीची प्रतिमा निर्माण झाली; त्याकाळी अश्या भूमिका साकारुन अजरामर करणं हे मोठं धारिष्ठ्यच होतं आणि मा.शांता आपटेंनी हे लिलया पेललं; १९३१ ते १९५३ या काळात मा.शांता आपटे यांनी रुपेरी पडद्यावर आणि मराठी संगीतरंगभूमीवर साकारलेल्या भूमिका कायम स्मरणात राहिल्या. भारतीय चित्रपटामधील झंझावती अभिनेत्री म्हणून ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते अश्या काही मोजक्या स्त्रीकलाकारांमधील ‘शांता आपटे’ हे नाव वर्तमानकाळातील कलाकारांना प्रेरणा देत राहिले आहेत. त्याकाळात पार्श्वगायनाची संकल्पना रुजली नसल्याने बहुदा गायक-गायिका या रुपेरी पडद्यावर भूमिका करत; पण मा.शांता आपटे म्हणजे गायन आणि चतुस्थ अभिनयाचा आविष्कार होता. १९५३ नंतर मा.शांता आपटें यांनी मराठी संगीत रंगभूमीवर ”सौभद्र” , ”मानापमान” , ”लग्नाची बेडी” , ”एकच प्याला” सारख्या नाटकांमधून दर्जेदार भूमिका केल्या, अनेकअंकी असलेल्या या नाटकांसमोर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे मोठे आवाहन असे; म्हणून प्रयोगात सतत नाविन्यपूर्ण भूमिका सादर करण्याची जबाबदारी कलाकारांवर असायची, याच भान शांता आपटेंना असल्याने नेहमीच आपल्या अभिनयाचे वैविध्यमय आविष्कार सादर केले तसंच अनेक जुन्या ‘संगीत’ नाटकांना, पुनर्जीवीत केले, ते म्हणजे त्याकाळातील नामवंत कलाकारांना सोबत घेऊन अर्थात या नाटकांचा पारंपारिक बाज आणि मुळ गाभा मात्र तसाच ठेवला गेला.
एका प्रसंगाचा किस्सा नयना आपटे सांगतात की मुंबईतल्या गोरेगाव परिसरात मोतीलाल नगर या रस्त्याचे उद्घाटन पंडित नेहरुंच्या हस्ते करायचे होते. अभिनेत्री शांता आपटेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यावेळी पंडित नेहरूंनी शांता आपटेंना वंदेमातरम गाण्याची विनंती केली. आणि त्यांच्या सुरमधूर स्वरांनी कार्यक्रमाला चार चांद लागले. मा.शांता आपटे यांचे २४ फेब्रुवारी १९६४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
त्यांची गेल्या सहा दशकांहून अधिक त्यांची प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना अशी ख्याती राहिली होती. त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२० रोजी कोलकाता येथे झाला. सितारा देवींनी देशविदेशांमध्ये कथ्थक नेले. लोकप्रिय केले आणि कथ्थकला रसिकांच्या मनात कायमसाठी एक उन्नत स्थान त्यांनी मिळवून दिले. त्यांचे वडिल सुखदेव महाराज मिश्रा यांनी त्यांना कथ्थकची उत्तम तालीम आणि प्रशिक्षण दिले. आपल्या वडीलांप्रमाणेच लखनौ घराण्यातील अच्छन महाराज, लच्छू महाराज आणि शंभू महाराज यांच्याकडूनही त्यांनी कथ्थकचे धडे गिरवले. बनारस आणि लखनौ घराण्यांचा मिलाफ त्यांच्या नृत्यातून दिसून येत असे.
भावविभोर डोळे, ठसठशीत सौंदर्य आणि त्याला भारतीय भारदस्तपणाची डुब हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्टय़ होते. एक नर्तकी म्हणून त्यांच्या अदाकारीमुळे त्यांच्या सौंदर्यामध्ये काही औरच जीव ओतला गेला होता. सितारादेवी या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक के. आसिफ यांच्या पत्नी. जवळपास १९३४ पासून ते १९७४ पर्यंत त्यांनी नृत्यप्रधान भूमिका करून हिंदी चित्रपटही गाजवले. एक अवसर असा आला की, त्यांनी कथ्थक नृत्यशैलीशी पुरते तादात्म्य ठेवावे या हेतूने हिंदी सिनेसृष्टीला रामराम ठोकला. पडद्यावर आणि प्रत्यक्ष लाईव्ह डान्समध्ये सितारा देवींचे नृत्य पाहणे हा एक चित्तथरारक, रोमहर्षक आणि प्रेक्षकाला खिळवून ठेवणारा असा अनुभव असायचा. प्रेक्षकाला अधिक करणारा, कलेच्या निरामय लाटेवरून स्वर्गीय आनंदाची सर घडवणारा असा तो अनुभव असायचा.
‘रोटी’ चित्रपटातील जंगल डान्स (१९४२) किंवा ‘सौतन के घर ना जाईयो’ हा ‘आबरू’ चित्रपटातील (१९४३) डान्स अशा त्यांच्या अनेक उल्लेखनीय कलाकृती आहेत. नागनृत्य हे स्नेक डान्स या नावाने जास्त प्रचलित आहे. १९५७ मध्ये ‘अंजली’ या चित्रपटामध्ये सितारा देवींनी स्नेक डान्स केला आहे. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शनही केले होते. वयाच्या १६व्या वर्षी सितारादेवींनी गुरुवर्य पं. रवींद्रनाथ टागोर यांच्यासमोर सुंदर कथकनृत्य सादर केले.
सितारादेवींचे सुरेख नृत्य पाहून पं. रवींद्रनाथ टागोर भारावून गेले व त्यांनी सितारादेवींना ‘कथकक्वीन’ उपाधी (पदवी) दिली. सितारादेवी यांना त्यांच्या नृत्य कारकिर्दीत आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री, आणि कालिदास सम्मान यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले होते. कथ्थक या नृत्यप्रकाराला त्यांनी बॉलिवूडमध्ये स्थान मिळवून देण्याचे श्रेय त्यांना जाते. नृत्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना २०११ मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सितारा देवी यांचे निधन २५ नोव्हेंबर २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ग्रेगरी पेक हे हॉलिवुड मधले स्टाइल आयकॉन होते. १९४० ते १९६० पर्यतचं दशक ग्रेगरी पेक यांनी गाजवला. ‘मॅकेनाज् गोल्ड’च्या मुळे युवा पिढीमध्ये ते लोकप्रिय झाले.
अगदी पुराणात सुद्धा ज्याचा उल्लेख आहे आणि नेहमी जोडीने (जोडप्याने )जो फिरतो . जो आपल्या जोडीदाराला मरे पर्यंत सोडत नाही.दोघांपैकी एकच मृत्यू झालातर दुसरा अन्नपाणी वर्ज्य करून प्राणत्याग करतो.पायाची नखे ते चोच अशी किमान साडेपाच ते सहा फूट उंचीचा हा अत्यंत देखणा पक्षी. विस्तीर्ण पंख विखुरले तर तब्बल चौदा ते सोळा फुटांपर्यंत रुंद..! भातशेतातच स्वत:चं घर करणारा अन् त्यामध्ये किमान तीन ते चार किलो वजनाचं अंड घालून प्रजातींची संख्या वाढवणाऱ्या आणि गम्मत म्हणजे अंडी उबवण्याचा अधिकार फक्त मादीचाच या निसर्ग नियमालाही छेद देत अंडे उबणारा नर पक्षी, या पक्षाचे नाव आहे सारसपक्षी. या सारस पक्ष्यांवर शेतकऱ्यांची कुऱ्हाड कोसळत होती. २००० पर्यंत नामशेष होण्याच्या मार्गावर सारस होता. केवळ चार जोड्याच शिल्लक होत्या.
असे म्हणतात कि ज्यांचे पटत नाही अशा भांडणा-या पतीपत्नीला या सारस पक्षाच्या सान्निध्यात ठेवण्याची प्रथा भारतात एकेकाळी होती.करड्या रंगाचा ,लालभडक मान असलेला पक्षी याला एका शिका-यांनी मारताना वाल्मिकी ऋषींनी पहिला .वाल्मिकी ऋषींना खूप वेदना झाल्या . त्यांनी त्या शिका-यास शाप दिला आणि त्या तडफडून मरणा-या पक्षाला पाहून त्यांना 'रामायण' हे महाकाव्य सुचले अशी कथा आहे. असे म्हणतात एकमेकांसाठी जीवनभर जगणा-या सारस पक्षाच्या जोडीला पाहून त्यांना प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांच्या एकनिष्ठ प्रेमाची कथा लोकांना सांगावीशी वाटली . हि सारस पक्षाची जोडी अशी रामायण काळा पासून प्रसिद्ध आहे.रामायण हे महाकाव्य म्हणजे एक शोकांतिकाच आहे. विवाह झाल्यापासून त्रास ,वनवास, वियोग या वेदना रामायणात आहेत.प्रभू रामचंद्र आणि सीतेचा विवाह हा पुष्य नक्षत्रावर झाला होता.विवाह झाल्यानंतर त्यांना आजन्म वेदना आणि विरहच सोसावा लागला म्हणून कितीही शुभ असले तरी पुष्य नक्षत्र विवाह साठी वर्ज्य समजले जाते. .पतीपत्नी मध्ये सारस पक्षा सारखी निष्ठा असावी म्हणून भारतात न पटणा-या जोडप्याला या पक्षाच्या सान्निध्यात ठेवतात.
असे म्हणतात कि जहांगीर बादशहा यांनी हे पक्षी पाळले होते. दुधात पाव भिजवून जर या पक्षांना दिले तर हे पक्षी पावाचा तुकडा पाण्यात बुडवून धुतात आणि दुध वेगळे झाल्यावर पाव खातात.एकाद्या इमानी कुत्र्या सारखे माणसांच्या मागे हे पक्षी चालतात. उभ्या पिकातलं भात दाणे हे पक्षी खातात म्हणून शेतकरी या पक्षांना शेतात येऊ देत नाहीत. परंतु काहीही असले तरी अत्यंत आश्चर्य कारक या पक्षांचे जीवन असते.
संपूर्ण जगात हे पक्षी नामशेष होत आहेत. भारतात तर फक्त ४ जोड्या शिल्लक राहिल्या होत्या. गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी त्यांच्या नेहमीच्या रुक्ष कामातून वेळ काढला आणि हे पक्षी वाचवण्यासाठी पक्षी प्रेमी संघटनांच्या मदतीने या पक्षांचे संगोपन करून त्यांची संख्या वाढवली .
एक जिल्हाधिकारी काय करू शकतो याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे . आपल्या देशात असे अनेक अधिकारी आहेत कि ज्यांच्या कार्याला जनतेच्या शाब्बासकीची फक्त गरज असते. त्यांच्या कामाला आपण उत्तेजन दिले पाहिजे.अतिशय दुर्मिळ आणि वाल्मिकी मुनींना प्रिय असलेल्या सारस पक्षांना वाचवणा-या जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना सलाम !!!!
-- चिंतामणी कारखानीस
विवेक आपटे यांनी गेली तीस हून अधिक वर्षे चित्रपट, जाहीराती, जिंगल्स पबल्सीटी कँम्पेन, एकांकिका, नाटके, मालीकांची शिर्षक गीते, चित्रपट गीते असे भरपुर लेखन केले आहे.
बासरी म्हटले की प्रथम पं. हरिप्रसाद चौरासिया हे नाव आपल्या डोळ्यांसमोर येते. बांबूपासून बनविलेली बासरी हे वाद्य साधे वाटत असले तरी ते पंडित चौरसियांच्या हाती आल्यावर ते रसिकांना खिळवून ठेवणारे वाद्य बनते. या साधनेमुळे पंडित चौरसिया यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली आहे.
गदिमांना १० भाषा येत होत्या. मराठीमधील लावणी या प्रकाराला त्यांनी एक विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी १५७ मराठी चित्रपट केले तर २३ हिंदी चित्रपट केले.
Copyright © 2025 | Marathisrushti