(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • लेखक विश्वास पाटील

    इतिहासाशी पूर्ण प्रामाणिक राहून व त्याचे नवे पैलू शोधून मांडणारा लेखक अशी त्यांची प्रतिमा आहे. सुभाषबाबूंच्या चरित्राचा एवढा व्यापकपणे शोध घेणारी कादंबरी खुद्द बंगालीतही नाही.

  • बॉलिवुड गायिका सुनिधी चौहान

    दिल्लीत जन्मलेली सुनिधी प्रतिभावंत असल्याचे तिच्या वडिलांनी तिच्या बालपणीच ओळखले होते. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९८३ रोजी झाला. वयाच्या केवळ सुनिधी चौहानचे बालपणीचे नाव निधी चौहान असे होते. चौथ्या वर्षापासून तिने मंदिरात गायन सुरु केले होते.

    शालेय जीवनात सुनिधी दिल्लीत अनेक ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स देत होती. याच काळात टीव्ही अँकर तबस्सुम यांची नजर सुनिधीवर पडली. त्यांनी आपल्या एका शोमध्ये सुनिधीला गाण्याची संधी दिली आणि तिच्या कुटुंबाला मुंबईत स्थायिक होण्याचा सल्ला दिला. तबस्सुम यांनीच सुनिधीची भेट प्रसिद्ध संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी सोबत घालून दिली. त्यांनी सुनिधीला त्यांच्या ग्रुपमध्ये गाण्याची संधी दिली होती.

    वयाच्या १३व्या वर्षी 'मेरी आवाज सुनो' या शोचे विजेतेपद पटकावल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी सुनिधीला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला. मस्त या सिनेमातील रुकी रुकीसी जिंदगी... हे तिने गायलेले पहिले बॉलिवूड गाणे आहे. हे गाणे जबरदस्त हिट ठरले. या गाण्यासाठी सुनिधीला तब्बल 14 वेगवेगळ्या अवॉर्ड्ससाठी नॉमिनेशन मिळाले होते. यापैकी दोन अवॉर्ड्स सुनिधीने आपल्या नावी केले. त्यानंतर सुनिधीने कधीही मागे वळून पाहिले नाही.

    सुनिधीने केवळ हिंदीतच नव्हे तर उर्दू, उडिया, पंजाबी, मराठी, तामिळ, तेलगू, भोजपुरी, बंगाली, आसामी, गुजराती आणि नेपाळी भाषेत गाणी गायली आहेत. सुनिधी चौहानने लग्न २००२ मध्ये वयाच्या १८ वर्षी दिग्दर्शक बॉबी खानबरोबर केले होते. पण फार काळ त्यांचे लग्न टिकू शकले नाही आणि या दोघांचा घटस्फोट झाला. एप्रिल २०१२ मध्ये सुनिधीने दुसरे लग्न केले. बालपणीचा मित्र आणि म्युझिक डायरेक्टर हितेश सौनिकबरोबर सुनिधीने संसार थाटला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मुगल ए आझम

    ५ ऑगस्ट १९६० साली भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील बहुचर्चित चित्रपट "मुगल ए आझम " मराठा मंदिर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, या गोष्टीला ५७ वर्षे झाली.

    हिंदी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरलेला आणि अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरलेला ‘मुघल ए आझम’ हा ‘क्लासिक’ चित्रपट आज अनेक वर्षे सुजाण प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे.

    मूळ ‘मुघल ए आझम’ चित्रपट हा देखील ‘अनारकली’ या नाटकावर आधारित होता आणि त्यातील काही संवाद चित्रपटात जसेच्या तसे स्वीकारण्यात आले. या नाटकापासूनच के. आसिफ यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी ‘मुघल ए आझम’ची निर्मिती केली.

    के. आसिफ यांच्या सारखा दिग्दर्शक आणि सलीम अनारकलीच्या प्रेमकहाणीचा भव्य पट..
    फक्त सर्वोत्तमाचाच ध्यास घेतलेल्या आणि कसलीही तडजोड मान्य नसलेल्या के आसिफ यांच्याकडे हा चित्रपट आला तेव्हांच एका अतिभव्य रूपेरी इतिहासाचा पाया घातला गेला होता.

    त्या काळचा सर्वात खर्चिक चित्रपट, या काळातला सर्वात खर्चिक संगणकीय संकलन असलेला चित्रपट
    प्रत्येक सिनेमागॄहात सगळे खेळ सलग तीन वर्षं अखंड चालले... हा विक्रम आजवर मोडला गेलेला नाही...

    अकरा वर्षांच्या निमिर्तीकाळात आणि पुढच्या ५७ वर्षांत या सिनेमाशी जेवढ्या सुरस कथा , दंतकथा जोडल्या गेल्या, तेवढ्या खचितच दुसऱ्या कुठल्या सिनेमाशी जोडल्या गेल्या असतील.

    त्या काळचा सुपरस्टार दिलीपकुमार सलीमच्या भूमिकेत असतांना अकबराच्या भूमिकेत पॄथ्वीराजकपूरला सन्मानाने आमंत्रित करतानाच दिलीपला तू या चित्रपटाचा नायक नाहीस हे के आसिफ सूचित करून गेले होता आणि अकबर बादशहाला एक शाही व्यक्तिमत्त्व बहाल करण्याचे काम पृथ्वीराज कपूर करून गेले.

    कमावलेलं शरीर, गोरापान वर्ण, रूपेरी केस आणि खर्जातला धडकी भरवणारा आवाज यामुळे अकबर बादशहाचा वावर असताना पब्लिक टेन्शनमध्येच असायचं. विशेषतः सलीम अनारकली एकत्र असताना बहार बादशहाला चुगली करते आणि बादशहा रागारागाने एकेक दालनातून तावातावाने निघतो तेव्हाचा याचा संताप अंगावर येतो. त्या प्रसंगात आता काय होणार म्हणून गळ्यात आवंढा येतो इतका दरारा पॄथ्वीराज यांनी पडद्यावर निर्माण केलाय..

    अनारकली उन्मत्त होऊन उर्मटासारखा प्रश्न विचारत असताना बादशहाच्या रागाचा पारा चढत जातो आणि शेवटी असह्य होऊन तो दाणकन आपली मूठ वज्रासारखी सिंहासनावर आपटतो तेव्हां महाराणी जोधाच्या डोळ्यातलं भय आपल्या काळजात उतरत जातं.

    खरं तर दिलीपकुमारला आपण शाहजादा म्हणून कसे दिसू याबद्दल शंकाच होती. पण फाळणीनंतर बरेचसे कलाकार पाकिस्तानात गेल्याने दिलीपकुमार या चित्रपटात आला आणि नर्गीसने चित्रपट सोडला. चित्रपट सुरू झाला तेव्हां नर्गीसच्या स्वप्नाळू डोळ्यांची जादू देशातल्या रसिकांवर अशी काही होती कि मधूबालादेखील तोपर्यंत त्या डोळ्यांपुढे ताठ उभी राहू शकलेली नव्हती. पण राजकपूरसाठी काम करणार असल्याने दिलीपबरोबर ती काम करणे शक्य नव्हतेच आणि मग मधूबालाच्या नावावर हा चित्रपट लागला.

    या चित्रपटाचा आवाका पाहून के आसिफ त्या काळाचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शापूरजी पालनजी यांच्याकडे आर्थिक मदतीसाठी गेले होते. या धंद्यात उतरण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सुरूवातीला सांगितले पण आसिफ यांनी ही गोष्ट अशी काही रंगवून त्यांच्यासमोर "दाखवली" कि त्यांचे मतपरिवर्तन झाले आणि ते अर्थसहाय्यास तयार झाले....

    पुढच्या काळात शापूरजींना या चित्रपटापायी बराच मनःस्ताप सोसावा लागणार आहे आणि के आसिफ हा मनुष्य किती वेडा आहे हे त्यावेळी माहीत असलेली नियती मात्र शापूर्जीच्या कार्यालयाच्या आढ्यावर बसून खुदुखुदू हसत होती !

    के आसिफ यांना या चित्रपटासाठी शीशमहाल उभारायचा होता. ३५ फूट उंच, रुंदीला ८० तब्बल ८० फूट आणि लांबी..............? फक्त १५० फूट !

    दोन वर्षे लागली हा महाल उभारायला...! त्यासाठी बेल्जियमवरून आरसे मागवण्यात आले होते. शापूरजींनी त्या काळी पैसे किती मोजले असतील? १५ लाख रूपये !!

    कळतंय का १५ लाख म्हणजे किती ? सोनं चाळीस रूपये तोळा होतं म्हणे !! काढा आता हिशोब !!!
    आणि तज्ञांशी चर्चा करून आशिफ म्हणाले या महालात फक्त एकच गाणं चित्रीत होणार आहे.
    शापूरजींचं डोकं आउट व्हायला हे पुरेसं होतं आणि के आसिफ वि शापूरजी हे युद्ध भडकत गेलं...
    शीशमहालच्या छतावर असलेल्या आरशांमुळे प्रकाश परिवर्तित व्ह्यायचा त्यामुळं कॅमेरामन चित्रीकरणास नकार देत. तर के आसिफला बादशाला तख्तपोशीकडे पाहतांना छताच्या प्रत्येक आरशात अनारकली दिसते असं दाखवायचं होतं. हे कठीण होतं. खरं तर अशक्यच शब्द योग्य होता पण आपल्यासमोर रिझल्ट आहे...

    तर काय सांगत होतो....अशक्य असा निर्वाळा तंत्रज्ञांनी दिल्यावर सर्वांनी असे असेल तर हे गाणे कट करा इथपासून ते नाही दिसली मधूबाला आरशात तर कोणतं आभाळ कोसळणार आहे असे सल्ले के आसिफ ला दिले..

    पण वेड्या आसिफला कलाकॄतीसाठी कोणतीही तडजोड मान्य नव्हती. त्याला त्याच्या मनःपटलावर ही कथा कशी दिसली होती तशीच ती सादर करायची होतॉ.

    त्याने निर्वाणीचा इशारा दिला..मला चित्रीकरण करता येणार नसेल तर या शीशमहालला मी माझ्या हाताने आग लावीन ..

    आणि घाबरलेल्या शापूरजींनी शीशमहालचे सर्व भाग सुट्टे करून तो पॅक करून ठेवायला सांगितले..

    इथून पुढे ते आसिफचे तोंडही पहायला तयार नव्हते...!
    आसिफची गच्छंती जवळजवळ निश्चित होती
    पण हार मानणा-यातला आसिफ नव्हता. हे प्रकरण सोहराब मोदींकडे गेलं. मोदी आणि पॄथ्वीराज कपूर हे दोघेही शापूरजींचे परिचित. ..

    शापूरजींनी धंद्याचे गणित मांडले. आणि आसिफच्या त-हेवाईकपणचे सर्व किस्से सांगून अशा माणसाबरोबर मी काम करू शकत नसल्याचे ठासून सांगितले. मोदींनी आसिफशी चर्चा केली. आसिफ काय चीज आहे हे त्यांना चांगलेच माहीत होते, पण कलंदरी वॄत्तीला असलेला शाप म्हणजे फटकळपणा...परखड म्हणा किंवा स्पष्टवक्तेपणा म्हणा...ज्याला सुनावले जाते तो मात्र फाटक्या तोंडाचा अशीच संभावना करीत असतो. कमाल अमरोहींसारखा मनुष्यही आसिफला सोडून गेला आणि वेगळ्या चित्रपटासाठी जुळवाजुळव करू लागला..चित्रपटाचे नाव अनारकली !

    एस. मुखर्जीही प्रदीपकुमार आणि बीना रॉय या अप्रतिम लावण्यावतीला घेऊन याच नावाचा चित्रपट बनवायच्या तयारीला लागेलेले होते. आसिफ वर या कशाचाही परिणाम झालेला नव्हता.
    कटू सत्य लोण्यात घोळवून सांगणं ही व्यापारी कला कलाकारांना अवगत नव्हती त्याकाळी...
    मोदींनी यशस्वी मध्यस्थी केली. मोदींवर विश्वास ठेवून शापूरजींनी पुन्हा आसिफला एक संधी दिली...
    द्यावीच लागली........... !

    इंग्लंडहून आलेल्या सदस्यांनी इथे शूटींग होणार नाही असा निर्वाळा दिलेला. आसिफ ने विचार करायला सुरूवात केली.

    रोज तो दिव्यांची मांडणी बदलत असे, कॅमेरा बदलत असे. पण व्हायचं काय कि आरशांच्या विशिष्ट रचनेमुळं कधी त्यात कॅमेरा तर कधी प्रकाशझोत येत...मोठी समस्या होऊन बसलेली. शिवाय मधूबाला तर प्रत्येक आरशात हवी होती...शापूरजींनी इशारा दिलेला...

    शेवटी आसिफच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली. त्याने जिथून त्रास होत नाही ते दिवे तसेच ठेवले व झुंबरांच्या आजूबाजूला आणि विशिष्ठ ठिकाणांवर मेणबत्त्यांचा वापर केला. आता सगळीकडूनच उजेड येत असल्याने ऑब्जेक्ट आरशात दिसू लागला आणि प्रकाशाचेही संतुलन झाले !!!

    सगळ्या युनिटने नि:श्वास सोडला. हा कार्यभाग तर पार पडला आणि पुढच्या सगळे शूटींगच्या तयारीला लागले. आता विघ्न येऊ नये असंच सर्वांना वाटत होतं
    आणि आसिफचे नवे खूळ सुरू झाले ...

    सिनेमाला सुरूवात केल्याला आता सात वर्षे उलटून गेली होती. आणि आता रंगीत फिल्मसचा जमाना सुरू झाला होता. आसिफने रंगीत फिल्मसाठी पैसे मागितले. पुन्हा एकदा संघर्ष , पुन्हा मोदी !!
    आता असे ठरले कि सरसकट रंगीत फिल्मवर शूट न करता काही भाग शूट करून तो इंग्लंडला लॅबमधे पाठवावा. तज्ञांचे मत विचारावे आणि मगच पुढचा निर्णय घ्यावा...
    झालं

    प्यार किया तो डरना क्या चे बोल शीशमहालात घुमले. मधूबालाचे पाय त्या बोलांवर थिरकू लागले. बादशहाला आरशात अनारकली दिसू लागली.....

    हे गाणं रंगीत झालं. फिल्म टेस्ट करण्यासाठी इंग्लंडला गेली..प्रोसेसींग होऊन परत आली. तज्ञांनी अप्रतिम असा निर्वाळा दिला होता. आता पुढचा सिनेमा रंगीत होणार होता..आणि आसिफचं वेड पुन्हा उफाळून वर आलं......!

    चित्रपटाचा रंगीत भाग पाहील्यावर आधी शूट केलेला भाग त्याला कमअस्सल वाटू लागला. आसिफ हे सर्वोत्तमाचे दुसरे नाव होतं.

    आमीरला आपण पर्फेक्शनिस्ट म्हणतो..पण आसिफ या सच्च्या कलाकाराची तुलना कदाचित हॉलिवूडच्याच दिग्दर्शकांशीच करावी लागेल..

    आता आसिफचे म्हणणे होते..चित्रपट पुन्हा पहिल्यापासून शूट करायचा..
    संपूर्ण रंगीत !!

    शापूरजी यांना ह्रूदयविकाराचा झटका येणेच बाकि होते...कारण आतापर्यंत या चित्रपटासाठी त्यांचे .......
    दीड कोटी रूपये खर्ची पडले होते.. !!

    एक हाडाचा कलाकार आणि एक हाडाचा व्यावसायिक यांच्यातलं हे युद्ध होतं. आसिफ हा हाडाचा कलाकार होता, त्यामुळंच तो मनासारखी कलाकॄती व्हावी यासाठी हट्ट धरत होता. आजचे सिनेमे पाहीले तर आसिफच्या या वेडाची महती काही औरच आहे.

    पण शापूरजींच्या पदरातही त्यांच्या श्रेयाचे माप घालायला हवे. एका अट्टल व्यावसायिकाने एका खुळ्या कलाकाराला इतकी भरघोस मदत करावी हे त्यांच्या कलासक्त मनाचेच निदर्शन आहे.

    ११ वर्षानंतर सिनेमा पुन्हा पहिल्यापासून शूट करणे हे खरंच व्यावहारिक नव्हते. वितरकांचा दबाव वाढल्यावर असं ठरलं कि सिनेमा आहे तसा प्रदर्शित करावा. आसिफ रूसून बसलेला होता. सिनेमा बनेपर्यंतच त्याचा अधिकार होता. त्याने ती कलाकृती बनवली होती. आता शापूरजी आपले अधिकार वापरत होते. पैसा त्यांचा होता..

    सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिले तीन दिवस थेटर्स खाली होते. सगळे धास्तावलेले होते. पण आसिफ तरीही सांगत होता, या सिनेमाला ब्लॅक होईल..

    आणि माऊथ पब्लिसिटीचा परिणाम होऊन सिनेमाकडे पब्लिक असं वळलं कि पुढचा इतिहास त्यांच्या या पावलांनीच लिहीला गेला !!!

    प्रीमिअर चालू असतांना मात्र शापूरजींच्या मनातून आसिफबद्दलचा राग निवळत चालला होता. तो काय म्हणत होता हे त्यांना आता पडद्यावर कळत होते. आणि रंगीत भाग सुरू झाला मात्र..

    त्यांना आतापर्यंतचा कृष्णधवल सिनेमा एकदम डावा वाटू लागला. ऐकलं असतं आसिफचं तर असं वाटून गेलं..

    आणि मग त्यांनी आसिफचा हात प्रेमभरानं दाबत त्याला वचन दिला.

    एक दिवस हा सिनेमा संपूर्ण रंगीत बनेल. मी हा सिनेमा तुझ्यासाठी कलरफुल करेन..!!
    काही वर्षांपूर्वी त्यांच्याच कंपनीने हा सिनेमा रंगीत अवतारात दाखल केला आणि एका अवलिया कलाकाराला एका उद्योगपतीने दिलेल्या वचनाची पूर्तता झाली ..!!

    सगळंच अतर्क्य !!!

    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / मायबोली.कॉम

  • वेस्ट इंडिजचा विख्यात गोलंदाज मायकेल होल्डिंग

    वेस्ट इंडिजचा विख्यात गोलंदाज मायकेल होल्डिंग यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९५४ रोजी झाला.

    मायकेल होल्डिंग हे वेस्ट इंडिजच्या तेज चौकडीतील एक भक्कम खांब. जलतगती गोलंदाज, बोलिंग करताना बाजूने धावत गेले तरी बुटांचा आवाज येत नसे. म्हणून काही इंग्लिश पंचांनीच त्यांचे व्हिस्परिंग डेथ असे नामकरण केले होते.

    होल्डिंग यांच्या गोलंदाजीतली कविता रनअपपुरतीच असायची. प्रत्यक्ष चेंडू अत्यंत विध्वंसक ठरायचा. सीम, स्विंग, वेग अशा तिन्हींवर हुकूमत.

    त्यांचा फिटनेसही आदर्शवत होता. निव्वळ नेटप्रॅक्टिस करून काही साधत नाही. तेज गोलंदाजांनी भरपूर धावलं पाहिजे, असं ते आजही सांगतात.

    ६० सामन्यांमध्ये २४९ विकेट्स, त्यांतल्या बहुतेक वेस्ट इंडिजबाहेर घेतलेल्या आहेत.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • पंडित जितेंद्र अभिषेकी

    पंडितजी संस्कृत भाषेचे पदवीधर होते ते काही काळ आकाशवाणीवर होते. जेव्हा अनेक संगीतकार , वादक यांच्याशी त्यांचा परिचय झाला तेव्हा त्यांनी अनके ठिकाणी आकाशवाणीवर आणि अनके ठिकाणी कार्यक्रम केले. पुढे त्यांना भारत सरकारने आझम हुसेन खान शिष्यवृती दिली.

  • अभिनेत्री तितिक्षा तावडे

    कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सरस्वती’ या मालिकेमध्ये तितिक्षाने मुख्य अभिनेत्रींचे काम केले. झी मराठीवरील ‘कन्यादान’ या मालिकेमधून तितिक्षा घराघरात पोहोचली. ‘टोटल नादानिया’ या हिंदी मालिकेमध्ये सुद्धा तितिक्षाने काम केले आहे.

  • ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव

    ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव यांचे निधन झाले..

    आनंद यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ रोजी कोल्हापूर येथे झाला.अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या आनंद यादव यांनी साहित्य क्षेत्रात कादंबरीकार अशी स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. झोंबी, घरभिंती हय़ा त्यांच्या कादंबऱया वाचकप्रिय ठरल्या होत्या. त्यांच्या झोंबी या कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्य प्रकारातही त्यांनी चौफेर मुशाफिरी केली होती. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. मा. आनंद यादव यांना यादव यांच्या नटरंग कादंबरीवरून चित्रपटनिर्मिती झाली होती. मा.आनंद यादव यांनी संत तुकारामाच्या जीवनावर लिहिलेल्या ’संतसूर्य तुकाराम’ या काल्पनिक कादंबरीवर आक्षेप घेत वारकऱ्यांनी हल्लाबोळ करून त्यांना २००९ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यापासून वंचित केले. कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतर देखील वारकऱ्यांचे समाधान झाले नाही. अखेर कादंबरी बाजारातून काढून घ्यावी लागली.
    मा.आनंद यादव यांनी सुमारे ४० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. आनंद यादव यांची साहित्यसंपदा : अ९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह, साहित्याची निर्मिती प्रक्रिया, ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या, ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव, ग्राम संस्कृती,मराठी साहित्य : समाज आणि संस्कृती, मराठी लघुनिबंधाचा इतिहास, कलेचे कातडे, साहित्यिकाचा गाव, आदिताल, सैनिक हो, तुमच्यासाठी, शेवटची लढाई, आत्मचरित्र मीमांसा, झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचवेल, गोतावळा, भय, माउली, नटरंग, भूमिकन्या, उखडलेली झाडं, झाडवाटा, स्पर्शकमळे, माळावरची मैना, पाणभवरे, डवरणी, खळाळ, मळ्याची माती, मातीखालची माती, माय-लेकरं, एकलकोंडा, घरजावई, उगवती मने, लोकसखा ज्ञानेश्वनर, संतसूर्य तुकाराम.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ पटकथाकार वसंत सबनीस

    रघुनाथ दामोदर सबनीस, हे वसंत सबनीस यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी झाला. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतल्यावर महाराष्ट्र सरकारची नोकरी त्यांनी केली. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात झाले तर, पुणे येथील फग्यूर्सन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. पुण्यातल्या वास्तव्यात, पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. 'घरोघरी हीच बोंब', 'कार्टी श्रीदेवी', या नाटकांबरोबरच, 'विच्छा माझी पुरी करा' सारखे अप्रतिम नाटय, इथून सुरुवात होऊन, सोंगाडया, एकटा जीव सदाशिव, हे गाजलेले चित्रपट दादा कोंडके यांच्यासाठी त्यांनी दिले. व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट यामधे एक प्रतिष्ठित विनोद रूजविण्याचा सबनीसांनी केलेला प्रयत्न बराचसा यशस्वी झाला. ते हसविण्यासाठी कधीच स्वस्त झाले नाहीत. त्यांच्या अनेक कथांना राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत.

    नाटककार राम गणेश गडकरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 'गेला माधव कुणीकडे' सारखे तब्बल १० वर्षे मराठी रंगभूमीवर हाऊस फुल्ल जाणारे, 'कलावैभव' संस्थेला यश देणारे नाटक, 'अशी ही बनवाबनवी', 'गंमत जंमत' सारखे चित्रपट त्यांची ही खासियत अधोरेखित करतात. 'घरोघरी हीच बोंब' ’निळावंत’, 'नाटक' नावाचेचे नाटक तसेच 'सौजन्याची ऐशी तैशी', 'विच्छा माझी पुरी करा', 'गेला माधव कुणीकडे', अशी एकापाठोपाठ एक यशस्वी नाटकांची मालिका श्री. सबनीस यांच्या श्रेयनामावलीमध्ये आहे. 'सबनिशी' हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह, 'थापडया', 'पखाल', हे विनोदी कथासंग्रह, तर 'माझेश्वरी' हे ब-यावाईट अनुभवांचे संकलन प्रसिध्द झाले आहे.

    मराठी लोककलांच्या क्षेत्रात सबनीस लीलया वावरले. त्यांनी ’विच्छा माझी पुरी करा’ लिहीले तेव्हा तमाशा, वग आदि प्रकारांना पांढरपेषांच्या कलांत वा मनोरंजनात स्थान नव्हते. दादा कोंडके हे नावही 'विच्छा' मुळे घरा घरात पोहचले. राजा, परधानजी, कलावंतीण आणि शिपाई ही पात्रे शहरातही चमकू लागली. मुंबईतील रंगभवन आणि राणीच्या बागेतील रंगमंचावरून 'विच्छा'ने सरळ दादरच्या शिवाजी मंदिर, गिरगावच्या साहित्य संघ इ. नाटयगृहांमधे धडक मारली. कित्येकदा विच्छाच्या प्रयोगात वसंत सबनीस दादांबरोबर बतावणीला उभे राहिले होते. पु. लं. समवेत त्यांनी 'तुका म्हणे' मधेही काम केले होते. वग नाटय लेखनात सबनीसांची लेखणी विशेष खुलली. 'छपरी पलंगाचा वग', म्हणजेच 'विच्छा' हे नाटक, व त्याबरोबरच 'खणखणपूरचा राजा', 'एक नार चार बेजार', 'त्रिशूलाचा वग', 'तुम्ही माझं सावकार', 'आदपाव सुतार, पावशेर न्हावी, सव्वाशेर शिंपी' अशीही अनेक नाटके त्यांनी लिहीले.

    ४५ वर्षे सबनीसांच्या लेखणीने विनोद फुलविले. अनुभवापलिकडचे विनोद करण्याची त्यांच्यात जबरदस्त ताकद होती. वसंतरावांना पैशापेक्षा लेखन अधिक प्रिय होते. भालजी पेंढारकरांनी वसंतरावांची दादांबरोबर जोडी जमविली, आणि 'सोंगाडया' रूपेरी पडदयावर आला. 'एकटा जीव सदाशीव' सुध्दा वसंतरावांनी दादांसाठी लिहीला. मात्र नंतर द्वयर्थी संवादांच्या आग्रहामुळे दादांसाठी त्यांनी लिहीणेही नाकारले. साध्या साध्या गोष्टींमधून, खास कारण नसतानाही विनोदनिर्मिती करण्याची त्यांची अनोखी अदा अनेकांना मोहवून जाते. सचिन बरोबर त्यांचे 'नवरी मिळे नव-याला', 'गंमत जंमत', 'एकापेक्षा एक', 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', असे एकाहून एक धम्माल विनोदी आणि सुपरहिट चित्रपट पडदयावर आले. मा.वसंत सबनीस यांचे १५ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मातृभूमीसाठी आपल्या प्राणांचे बलीदान करणारे अनंत लक्ष्मण कान्हेरे

    नाशिक येथील एका नाटकगृहामध्ये किर्लोंस्कर मंडळीच्या शारदा या नाटकाचा प्रयोग होता. त्याला कलेक्टर जॅक्सन यांना आमंत्रण होते व जॅक्सन यांनी ते स्वीकारले होते. ही बातमी सर्वत्र पसरली होती. लोकांमध्ये खूप उत्सुकता होती. अनंत कान्हेरे यांनी ही संधी साधण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे जॅक्सन आले व त्यांच्या खास ठरविलेल्या राखीव खुर्चीवर बसले. अनंत कान्हेरे तेथे जवळच होते. क्षणार्धामध्ये त्यांनी आपले पिस्तूल काढले व जॅक्सन यांच्यावर सात आठ गोळयांच्या वर्षाव केला जॅक्सन जागेवरच ठार झाले. तो दिवस होता, २१ डिसेंबर १९०९.

  • मराठीतले व्यंगकवी आणि पटकथा लेखक रामदास फुटाणे

    मराठीतले व्यंगकवी आणि पटकथा लेखक रामदास फुटाणे यांच्या कोपरखळ्या मारणाऱ्या छोट्याछोट्या कवितांनी महाराष्ट्रीय वाचकांचे अनेक वर्षे मनोरंजन केले आहे. रामदास फुटाणे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. कविता, वात्रटिका, चित्रपटाचे लेखन, निर्माते, दिग्दर्शनाबरोबरच त्यांचा राजकीय क्षेत्रातील आमदारकीपर्यंतचा प्रवास मोठा आहे.

    रामदास फुटाणे हे मूळचे नगर जिह्यातील जामखेडचे. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९४३ रोजी झाला. १९६१ ते १९७३ या काळात कला विद्यालयात शिक्षक म्हणून त्यांनी १२ वर्षे नोकरी केली. त्याचवेळी त्यांचा ‘कटपीस’ हा हिंदी कवितांचा संग्रह प्रसिध्द झाला. त्यानंतर ‘सफेद टोपी, लाल बत्ती’, ‘चांगभलं’ हे मराठी कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. १९९७ साली त्यांच्या ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या कवितासंग्रहाने वेगळीच कलाटणी त्यांच्या आयुष्याला मिळाली. या कवितांचे जाहीर कार्यक्रम सादर होऊ लागले तशी रसिकांची दादही त्याला मिळत गेली. पुढे फोडणी, कॉकटेल हे मराठी ककितासंग्रह प्रसिध्द झाले. त्यांनी साहित्य, कला, राजकीय क्षेत्रात मुक्त संचार केला. रामदास फुटाणे यांची निरीक्षणशक्ती आणि सर्वांमध्ये मिसळून वेगळेपण शोधण्याची कलाच त्यांना भाष्यकवितांसाठी उपयोगी पडत गेली. पाना- फुलांच्या कवितांपेक्षा त्यांनी राजकीय प्रसंग, वातावरणातील कविता सादर करणे पसंद केले. त्यातूनच त्यांचा एक रसिकवर्ग निर्माण झाला. फुटाणे नेहमी सांगतात, वात्रटिका हा कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा शब्द. वात्रटिका या खऱया तर भाष्य कविता आहेत. त्या सोप्या आणि चटकन भिडतात. चार ओळींची वात्रटिका लिहिणे हे सोपे नाही. त्यासाठी ४० ओळी लिहाव्या लागतात, त्यातून चार ओळी तयार होतात. कोणतीही घटना सोप्या पध्दतीने आणि शक्यतो व्यक्तीचे नाव न घेता ही भाष्यकविता मांडली जाते. ग्रामीण भागातील आणि नवकवींना काव्यसंमेलनात हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नानांचे योगदान मोठे आहे. आज अनेक कवी त्यातूनच तयार झाले. साहित्यातील त्यांची ही घोडदौड सुरू असतानाच त्यांचे एकीकडे चित्रपटाचे लेखन सुरू होते. त्यांनी १९७५ साली निर्मिती केलेला ‘सामना’ चित्रपट प्रचंड गाजला. आजही या चित्रपटाचे गारूड रसिकांच्या मनावर आहे. त्याचबरोबर सर्कसाक्षी या चित्रपटाची पटकथा, निर्मिती, दिग्दर्शन त्यांनी केले. पुढे सुर्वंता अशा चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. त्यांच्या सामना चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर ऍवॉर्ड, राज्य पुरस्कार आणि १९७५ साली बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी याची निवड झाली. नंतर सर्वसाक्षी या चित्रपटाची पटकथा, निर्मिती, दिग्दर्शन त्यांनी केले. पुढे सुर्वंता चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. सामना चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर ऍवॉर्ड, राज्य पुरस्कार मिळाले. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी त्याची निवड झाली. सर्वसाक्षी चित्रपटाची बेंगलोरच्या इंडियन पॅनोरमासाठी आणि हाँगकाँग येथे झालेल्या पाचक्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सकासाठी निवड झाली होती. सुर्वंता चित्रपटाला उत्कृष्ट ग्रामीण चित्रपटाचा १९९५ चा राज्य पुरस्कार आणि १९९५चा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा कालनिर्णय पुरस्कार मिळाला होता. रामदास फुटाणे यांच्या ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या काव्यसंग्रहाचा शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. ‘फोडणी’ला या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र सरकारचा बालकवी पुरस्कार, गोवा कला अकादमीचा वाक्यहोत्र पुरस्कार मिळाला आहे. रामदास फुटाणे यांना प्रसिध्द कलावंत दादा कोंडके, निळू फुले, भालजी पेंढारकर, विजय तेंडुलकर यांचा सहवास लाभला. प्रत्येकामध्ये असलेले वेगळेपण जवळून अनुभवता आले. भाष्य कविता कशी सुचते हे सांगताना फुटाणे म्हणतात, मी खूप निरीक्षण करतो, सर्व पक्षातील व्यक्तींशी माझी मैत्री आहे. राजकीय व्यक्ती नीट माहिती हवी, महाराष्ट्रातील प्रवाह तुम्हाला माहिती असले पाहिजे. ट ट आणि प प लिहून चालत नाही. भाष्यकवितांमध्ये आशय महत्त्वाचा असतो. विसंगती नेमकी शोधता आली तर उत्तम भाष्यकविता तयार होते. हिंदी कविता ऐकूनच आपण भाष्यकवितांकडे वळालो. कीर्तन ऐकणे, ग्रंथालयात खूप वेळ देणे आणि तर्कशुध्दीने विचार करणे यामुळेच कवितांचा प्रवास करू शकलो असे रामदास फुटाणे सांगतात. रामदास फुटाणे यांच्या कोपरखळया मारणाऱया वात्रटिकां इतक्याच त्यांच्या कविता हृदयाला भिडतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    https://www.youtube.com/watch?v=pZl6pi9dKFc

    "सामना‘ चित्रपट
    https://www.youtube.com/watch?v=qss_9no2Oeo
    https://www.youtube.com/watch?v=EqnFwzOtcAM