(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित पुरुषोत्तम वालावलकर

    मोठमोठ्या गवयांकडून रियाज घेतल्यामुळे पं. वालावलकर हार्मोनियम वादनात एवढे पारंगत झाले की श्रोत्यांना त्यांच्या हार्मोनियम वादनाची भुरळ पडायची. बेळगावच्या एका कार्यक्रमात त्यांनी कुमार गंधर्वांना ऐनवेळी साथ केली होती. तो कार्यक्रम एवढा रंगला की कार्यक्रम संपल्यावर खुद्द कुमारजींनी पं. वालावलकरांना ‘असे षड्ज-पंचम मला कुणी दिले नाहीत’ अशी पावती दिली होती.

  • ज्येष्ठ अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर

    कॅमेऱ्यासमोर आपण उभे राहिलो, की आपल्यासारखा दुसरा कलाकार कुणी नाही, हा शांता आपटे यांचा गुरुमंत्र जपणारे चित्तरंजन कोल्हटकर हे सर्वार्थाने महान रंगकर्मी होते. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे झाला.

    घराणेशाहीचा वरदहस्त लाभलेले, नटश्रेष्ठ चिंतामणराव कोल्हटकर यांचे सुपुत्र चित्तरंजन कोल्हटकर यांनी वडिलांचा अभिनयाचा वारसा तितक्याच सामर्थ्यांनं तब्बल ६० वर्षे मराठी रंगभूमीवर चालविला. वडिलांच्या ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’मुळे नाटकाचा वारसा चित्तरंजन कोल्हटकर यांच्याकडे आला असला तरी चिंतामणरावांना मात्र प्रारंभी आपल्या मुलाने नाटकात यावे असे मुळीच वाटत नव्हते. त्याने उत्तम शिक्षण घेऊन बॅरिस्टर व्हावे आणि राष्ट्रकार्य करावे, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यासाठीच त्यांनी देशभक्त बॅ. चित्तरंजन दास यांच्या नावावरून आपल्या या मुलाचे नाव ‘चित्तरंजन’ ठेवले होते. परंतु चित्तरंजनने बॅरिस्टर व्हावे, ही त्यांची इच्छा फलद्रुप होऊ शकली नाही. चित्तरंजन कोल्हटकरांनी प्राथमिक शिक्षण घेतले आणि ते पोटापाण्यासाठी नोकरी शोधू लागले. मुंबईत अॅीम्युनिशन फॅक्टरीत त्यांना नोकरी मिळालीही.

    परंतु तिथे त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला गेल्याने स्वाभिमानी चित्तरंजननी नोकरीसह मुंबईही सोडली. त्यांना सैन्यात भरती व्हायचे होते. परंतु उंची आणि वजनात मार खाल्ल्याने तिथे त्यांची डाळ शिजली नाही. मुलाचे कुठेच काही जमत नाही, हे पाहिल्यावर त्याला बेकार बसू देणे धोक्याचे आहे, हे ओळखून चिंतामणरावांनी त्यांना आपल्या नाटक कंपनीत प्रॉम्प्टरचे काम दिले. नाटक कंपनीचे मालक असलेल्या दुसऱ्या कुणा बापाने मुलाला एखाद्या नाटकात मुख्य नट म्हणून उभे केले असते. परंतु चिंतामणरावांनी तसे केले नाही. त्यामुळे एक झाले- अनेक नाटकांत प्रॉम्प्टर म्हणून काम केल्याने आणि प्रॉम्प्टरला सबंध नाटकभर दक्ष राहावे लागत असल्याने चित्तरंजनना अनेक नाटके मुखोद्गत झाली. त्याच वेळी वडिलांच्या नाटकांच्या तालमींतून हजर राहिल्याने त्यांची नाटक बसविण्याची पद्धत, संवादफेकीचं तंत्र, रंगमंचीय व्यवहारांतील मेख, बडय़ा नटांच्या अभिनयातील खाचाखोचा यांचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष शिक्षण त्यांना मिळत गेले.

    तरीही चिंतामणरावांनी त्यांना नाटकात घेण्याचे मनावर घेतले नाही. परंतु एके दिवशी काही अडचणीमुळे ‘भावबंधन’मधील बावळट मोरूचे काम करण्याची संधी चिंतामणरावांनी चिरंजीवांना दिली. त्या छोटय़ा कामात चित्तरंजननी हुकमी हशे वसूल करून वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला. आणि तेव्हापासून कंपनीच्या नाटकांतून चित्तरंजनना छोटय़ा छोटय़ा भूमिका मिळू लागल्या. पण वसंत शिंदे, जयराम शिलेदार यांच्यासारखे बडे नट कंपनीत असेतो चित्तरंजनना कधीही मोठी भूमिका मिळाली नाही. या नटांनी कंपनी सोडल्यावर ‘युद्धाच्या सावल्या’त मारवाडी, ‘भावबंधन’मधील घन:श्याम, ‘पुण्यप्रभाव’मध्ये नुपूर अशा महत्त्वाच्या भूमिका चित्तरंजन यांच्याकडे आपसूक चालत आल्या. विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही भूमिका चित्तरंजन एव्हाना लीलया पेलू लागले होते. याच काळात बोलपटांमुळे नाटकाच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आणि चिंतामणरावांची नाटक कंपनी बंद पडली.

    चित्तरंजन यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तेव्हा नाइलाजाने ते मुंबईच्या नाटकांतून ‘नाइट’वर कामे करू लागले. याच दरम्यान त्यांना ‘गरिबांचे राज्य’ या बोलपटात एक छोटीशी भूमिका मिळाली आणि त्यांचा चित्रपटक्षेत्रात प्रवेश झाला. या चित्रपटातले त्यांचे काम भालजी पेंढारकरांना इतके आवडले, की त्यांनी ‘मी दारू सोडली’ या त्यांच्या चित्रपटात चित्तरंजनना घेतले. आणि इथून त्यांचे चित्रपटसृष्टीत बस्तान बसले. यशस्वी खलनायकी भूमिकांबरोबरच काही चित्रपटांतून त्यांनी नायकाची कामेही केली. ‘सौभाग्य’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मुरळी मल्हारीरायाची’, ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’, ‘रायगडचा राजबंदी’, ‘अशी रंगली रात’ आदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका वाखाणल्या गेल्या. शारीरिक उंचीची उणीव त्यांनी अभिनयाने भरून काढली. गोरेपान देखणे व्यक्तिमत्त्व, घारे डोळे आणि सहजाभिनयाबरोबरच सळसळता उत्साह यामुळे त्यांच्याकडे भूमिका चालून येऊ लागल्या. एव्हाना सिनेमाचा रूपेरी पडदा त्यांनी आपलासा केलेला असला तरी स्वत:ला रंगभूमीचा विसर त्यांनी कधीही पडू दिला नाही.

    दोन्हीकडे त्यांचा मुक्त संचार सुरू झाला. तत्कालीन नाटकांतून पल्लेदार संवाद, भाषेची चित्तचमत्कारिक आवर्तने, स्वच्छ, सुस्पष्ट वाणी यांना मागणी होती. चित्तरंजन कोल्हटकर या सगळ्यांत ‘बाप’ होते. पल्लेदार वाक्ये उच्चारताना भल्याभल्यांचा अभिनय सटपटे आणि अभिनयाकडे जास्त लक्ष दिले की तोंडची वाक्ये घरंगळत. पण चित्तरंजन याला अपवाद होते. ‘भावबंधन’मधील त्यांचा घन:श्याम आजही रसिकांच्या स्मरणात आहे. ‘एकच प्याला’तील ‘सुधाकर’ आणि ‘तळीराम’ या दोन्ही भूमिकांवर त्यांनी अशीच आपली नाममुद्रा उमटविली. कुठल्याही भूमिकेच्या अंतरंगात शिरण्यात चित्तरंजन वाकबगार होते. रंगभूमीवर सहज वावर असलेल्या हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा कलावंतांमध्ये चित्तरंजन कोल्हटकरांचा अंतर्भाव करावा लागेल. ते एकदा का रंगमंचावर अवतरले, की नाटक सहजी कवेत घेत. ‘नाटय़संपदा’चे ‘अश्रूंची झाली फुले’ हे अत्यंत गाजलेले नाटक रंगभूमीवर येत असताना एका मोठय़ा अनर्थातून चित्तरंजननीच वाचविले. त्याचे झाले असे : ‘नाटय़संपदा’ची तत्पूर्वीची दोन-तीन नाटके कोसळल्याने संस्था अडचणीत आली होती. त्यामुळे ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक संस्थेसाठी जीवनमरणाचा विषय झाले होते. या नाटकासाठी सरकता रंगमंच बनवण्यात आला होता. परंतु पहिल्याच प्रयोगाच्या वेळी तांत्रिक अडचणींमुळे तो रंगमंच सरकेचना. त्याची दुरुस्ती करून तो चालू करण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले.

    तशात प्रयोगाला जसजसा उशीर होऊ लागला, तसतसे प्रेक्षकही अस्वस्थ होऊ लागले होते. शेवटी प्रयोग आहे त्या परिस्थितीत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिलीच एन्ट्री चित्तरंजन कोल्हटकरांची होती. रंगमंचावरील आयत्या वेळच्या अडचणीमुळे दुसरा तिसरा नट कदाचित हेलपाटला असता; परंतु चित्तरंजननी सहज एन्ट्री घेतली आणि काही क्षणांतच प्रयोगातील ताण नाहीसा झाला. नाटक मार्गी लागले. या नाटकाने पुढे उत्तम धंदा केला आणि ‘नाटय़संपदे’ला कर्जातून बाहेर काढले. कुणाच्याही अडीअडचणीला धावून जाणे, हा चित्तरंजन कोल्हटकरांचा स्वभावच होता. ‘गारंबीचा बापू’मध्ये डॉ. काशीनाथ घाणेकरांचा ‘बापू’ लोकांनी डोक्यावर घेतला होता. घाणेकरांचा करिष्माच तसा होता. काही कारणांनी घाणेकरांनी चांगले चाललेले हे नाटक अचानक सोडले आणि निर्माते मोहन वाघांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला : डॉ. घाणेकरांच्या जागी ‘बापू’ म्हणून कुणाला उभे करायचे? या भूमिकेवर त्यांची एवढी जबरदस्त छाप होती, की त्यांच्या जागी कुणा ऐऱ्यागैऱ्याला प्रेक्षक स्वीकारणे शक्यच नव्हते. मोहन वाघांनी चित्तरंजनना या भूमिकेसाठी विचारलं.

    दुसऱ्या नटाने गाजवलेली भूमिका सहसा कुणी नट स्वीकारीत नाही. कारण त्याची आधीच्या नटाशी तुलना होते आणि त्याने कितीही जीव तोडून काम केले तरी ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही. पण चित्तरंजन कोल्हटकरांनी हे आव्हान स्वीकारले आणि डॉ. घाणेकरांची आठवणही येऊ न देता आपल्या पद्धतीने ही भूमिका रसिकांच्या गळी उतरविली. रंगभूमीवरील अव्यभिचारी निष्ठा हे चित्तरंजन कोल्हटकरांचे व्यवच्छेदक लक्षण होते. ते शेवटपर्यंत आपल्या ‘वरद रंगभूमी’ या संस्थेद्वारे सक्रीय होते. साठहून अधिक वर्षांच्या प्रदीर्घ नाटय़-कारकिर्दीत त्यांनी वाटय़ाला आलेल्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतला. ‘मुद्राराक्षस’ या नाटकातील आर्य चाणक्याची भूमिकाही त्यांनी नव्या रंगभाषेच्या शोधात निघालेल्या मंडळींबरोबर तितक्याच सहजतेने केली. ‘वरद रंगभूमी’तर्फे त्यांनी आपल्या हातखंडा भूमिका असलेल्या ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘पुण्यप्रभाव’ आदी नाटकांची निर्मिती केली. शेवटपर्यंत आपल्याला रंगभूमीची सेवा करता यावी, ही त्यांची इच्छा होती. त्यानुसार ते शेवटपर्यंत सक्रीय राहिले. या प्रवासात विष्णुदास भावे पुरस्कारासह अनेक मानसन्मान त्यांच्याकडे चालत आले. नाटय़संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांना लाभले. पुणे नाटय़ परिषदेच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता.

    चित्तरंजन कोल्हटकरांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही देण्यात आला होता. त्यांना सिनेमांतील आणि नाटकांसाठी विष्णुदास भावे पुरस्कार, शासनाचा चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार, छत्रपती शाहू पुरस्कार, अल्फा गौरव पुरस्कार, नानासाहेब फाटक जीवनगौरव पुरस्कार अभिनयासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले. अनेक सामाजिक संस्थांशी ते निगडित होते. हिंदुत्ववादाचा वसा त्यांनी अभिमानाने मिरवला. रंगभूमीच्या भल्यासाठीच्या मागण्या घेऊन ते शासनाकडे जात आणि त्या पदरात पडेतो त्यांचा पाठपुरावा करीत. आपल्या नाटय़कर्तृत्वाने शासन दरबारी दबदबा निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मीमध्ये चित्तरंजन कोल्हटकर अग्रस्थानी होते. मा.चित्तरंजन कोल्हटकर यांचे २५ ऑक्टोबर २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ प्रशांत देसाई

  • मालगुडी डे चे जनक आर.के. नारायण

    "मालगुडी डेज'सह आपल्या इतर लेखनाने भारतासह जगभरातील वाचकांना भुरळ घालणारे भारतीय लेखक आर.के. नारायण यांचे पुर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९०६ रोजी झाला.

    १९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी फ्रेन्ड्‌स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात.

    या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट 'दि गाईड' यावर गाईड नावाचा हिंदी चित्रपट निघाला. दि गाईडचे मराठी रूपांतर श्री.ज.जोशी यांनी केले आहे. आर.के.नारायण यांच्या मिस्टर संपत आणि दि फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्तकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या मालगुडी डेज वर आधारित १९८० च्या दशकात दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात ‘मालगुडी डेज्’ ही मालिका प्रसारित झाली होती. त्या मालिकेसाठी नारायण यांचे बंधू प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढलेल्या रेखाचित्रांमुळे ती मालिका आणि ते पुस्तक यांच्या लोकप्रियतेत भरच पडली.

    मालगुडी या एकाच गावातील विविध व्यक्ती, घटना, परिसर, बदलत्या जगाच्या तिथे उमटणार्याच पाऊलखुणा, त्यातून तिथे बदलत जाणारे विश्व, अगदी लहान मुलापासून ते इंग्रजी साहेबाकडे कारकुनी करणार्याल नव-बूर्ज्वा समाजाचे वेधक चित्रण त्या पुस्तकाने केले. प्रचंड लोकप्रिय झालेल्या या मालिकेचे काही वर्षांपूर्वी ‘मालगुडी डेज् रिटर्न’ या नावाने पुनप्रसारणही करण्यात आले होते. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये तयार करण्यात आलेल्या या मालिकेचे तेव्हा ३९ भाग प्रसारित झाले होते. मालिकेतील ‘स्वामी’ हा लहान मुलगा, त्याचे मित्र आणि त्यांचे भावविश्व मालिकेतून सादर करण्यात आले होते. आर. के. नारायण यांनी लिहिलेल्या काही लघुकथांवर ही मालिका आधारीत होती. साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियनलेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जात असे. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.

    नारायण यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी आदी सन्मान मिळाले होते. आर.के.नारायण यांचे १३ मे २००१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट.

  • अभिनेते शरद पोंक्षे

    गांधी हत्या या अत्यंत संवेदनशील विषयामुळे ‘मी नथूराम गोडसे बोलतोय’ हे नाटक विवादाच्या भोवऱ्यात सापडूनही रसिकांनी या नाटकास उचलून धरल ते शरद पोंक्षे यांच्या अभिनयामुळे नथूराम गोडसे या व्यक्तीबद्दल प्रचलित असलेले सर्व गैरसमज काही अंशी कमी करण्यात आणि खऱ्या अर्थानी गोडसे यांची भूमिका स्पष्ट करणारे हे नाटक समीक्षकांच्या पसंतीस ही उतरले.

  • संगीतसमीक्षक,अभ्यासक व लेखक केशवराव भोळे

    मराठी व शास्त्रीय संगीत समीक्षा केशवराव भोळे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भावसंगीताचे जनक, नाट्यसंगीत विचाराला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्त्व अशीही केशवरावांची ख्याती होती. त्यांचा जन्म २३ मे १८९६ रोजी अमरावती येथे झाला. केशवराव भोळे यांचे वडीलही संगीताचे शौकीन होते. ते स्वतः सतारही वाजवीत असत. केशवरावांचा जन्म होण्यापूर्वीच त्यांचे वडील वारले. तथापि घरातील संगीतमय वातावरणामुळे केशवरावांना लहानपणापासूनच नाटक-संगीतादी पाहण्या-ऐकण्याचा नाद लागला आणि तो वाढत जाऊन अखेरपर्यंत टिकला. वैद्यकीय अभ्यासासाठी ते मुंबईस आल्यावर ह्या नादाला खोली आणि चौरसपणा येऊन तो इतका वाढला की, त्यांनी वैद्यकीय अभ्यासावर पाणी सोडले. ह्याच सुमारास त्यांचा दुर्गा केळेकर (विवाहोत्तर ज्योत्स्ना भोळे) ह्यांच्याशी विवाह झाला. त्यांनीही कालांतराने संगीत-नाटकाच्या क्षेत्रांत चांगला नावलौकिक संपादन केला. जुलै १९३३ मध्ये ‘नाट्यमन्वंतर’ या संस्थेच्या आंधळ्यांची शाळा ह्या श्री. वि. वर्तकलिखित प्रसिद्ध नाटकामध्ये त्यांनी केलेले पहिलेच बिंबाचे (नायिका) काम अतिशय गाजले. केशवरावांचाही ‘नाट्यमन्वंतरा’शी संबंध जडला. आंधळ्यांची शाळामध्ये ज्योत्स्नाबाईंनी गायलेल्या दोन गाण्यांची सुभग भावपूर्ण स्वररचना केशवरावांनीच केली होती. ह्या सर्वांमुळे केशवराव संगीताचे नवरचनाकार म्हणून प्रसिद्धीस आले.१९३३ साली गोविंदराव टेंबे ह्यांच्या नंतर केशवरावांनी ‘प्रभात’ ह्या सिनेमाकंपनीत संगीतदिग्दर्शक म्हणून प्रवेश केला. ‘प्रभात’ कालखंडात केशवरावांची स्वररचनाकाराची वृत्ती फुलून आली. हा बहर अमृतमंथन, संत तुकाराम, कुंकू, माझा मुलगा, संत ज्ञानेश्वर, संत सखू, चंद्रसेना इ. बोलपटांमधील गीतांच्या त्यांनी केलेल्या स्वररचनांमध्ये आणि संगीताच्या दिग्दर्शनामध्ये भरपूर दिसून येतो, त्यांखेरीज कित्येक सुट्या भावगीतांनाही त्यांनी चाली लाविल्या, हा प्रामुख्याने त्यांचा निर्मितिकाल मानता येईल. पुढे ते आकाशवाणी मुंबई केंद्राच्या संगीतविभागाचे प्रमुख झाले.

    ‘एकलव्य’ ह्या टोपणानावाने केशवराव भोळे ह्यांनी वसुंधरा ह्या साप्ताहिकात लिहिलेले अभिजात गायक-गायिकांविषयीचे अनेक लेख त्यांच्या रमणीय शैलीमुळे आणि माहितगारीमुळे विख्यात झाले. तेच लेख पुढे आजचे प्रसिद्ध गायक (१९३३) ह्या पुस्तकात संगृहीत करण्यात आले. ह्या पुस्तकाची सुधारून वाढविलेली आवृत्ती म्हणजे संगीताचे मानकरी (१९४९) होय. त्यांनी नंतर ‘शुद्धसारंग’ ह्याही टोपणनावाने लेख लिहिले. त्यांत त्याची चिकित्सावृत्ती, परखडपणा, बोचरेपणा इ. विशेष दिसून येतात. आवाजाची दुनिया, अस्ताई, वसंतकाकाची पत्रे, माझे संगीत, अंतरा आणि जे आठवते ते हे आठवणीवजा आत्मचरित्र सुद्धा लिहिले.
    केशवराव भोळे यांचे ९ नोव्हेंबर १९७७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठीतले व्यंगकवी आणि पटकथा लेखक रामदास फुटाणे

    मराठीतले व्यंगकवी आणि पटकथा लेखक रामदास फुटाणे यांच्या कोपरखळ्या मारणाऱ्या छोट्याछोट्या कवितांनी महाराष्ट्रीय वाचकांचे अनेक वर्षे मनोरंजन केले आहे. रामदास फुटाणे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. कविता, वात्रटिका, चित्रपटाचे लेखन, निर्माते, दिग्दर्शनाबरोबरच त्यांचा राजकीय क्षेत्रातील आमदारकीपर्यंतचा प्रवास मोठा आहे.

    रामदास फुटाणे हे मूळचे नगर जिह्यातील जामखेडचे. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९४३ रोजी झाला. १९६१ ते १९७३ या काळात कला विद्यालयात शिक्षक म्हणून त्यांनी १२ वर्षे नोकरी केली. त्याचवेळी त्यांचा ‘कटपीस’ हा हिंदी कवितांचा संग्रह प्रसिध्द झाला. त्यानंतर ‘सफेद टोपी, लाल बत्ती’, ‘चांगभलं’ हे मराठी कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. १९९७ साली त्यांच्या ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या कवितासंग्रहाने वेगळीच कलाटणी त्यांच्या आयुष्याला मिळाली. या कवितांचे जाहीर कार्यक्रम सादर होऊ लागले तशी रसिकांची दादही त्याला मिळत गेली. पुढे फोडणी, कॉकटेल हे मराठी ककितासंग्रह प्रसिध्द झाले. त्यांनी साहित्य, कला, राजकीय क्षेत्रात मुक्त संचार केला. रामदास फुटाणे यांची निरीक्षणशक्ती आणि सर्वांमध्ये मिसळून वेगळेपण शोधण्याची कलाच त्यांना भाष्यकवितांसाठी उपयोगी पडत गेली. पाना- फुलांच्या कवितांपेक्षा त्यांनी राजकीय प्रसंग, वातावरणातील कविता सादर करणे पसंद केले. त्यातूनच त्यांचा एक रसिकवर्ग निर्माण झाला. फुटाणे नेहमी सांगतात, वात्रटिका हा कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा शब्द. वात्रटिका या खऱया तर भाष्य कविता आहेत. त्या सोप्या आणि चटकन भिडतात. चार ओळींची वात्रटिका लिहिणे हे सोपे नाही. त्यासाठी ४० ओळी लिहाव्या लागतात, त्यातून चार ओळी तयार होतात. कोणतीही घटना सोप्या पध्दतीने आणि शक्यतो व्यक्तीचे नाव न घेता ही भाष्यकविता मांडली जाते. ग्रामीण भागातील आणि नवकवींना काव्यसंमेलनात हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नानांचे योगदान मोठे आहे. आज अनेक कवी त्यातूनच तयार झाले. साहित्यातील त्यांची ही घोडदौड सुरू असतानाच त्यांचे एकीकडे चित्रपटाचे लेखन सुरू होते. त्यांनी १९७५ साली निर्मिती केलेला ‘सामना’ चित्रपट प्रचंड गाजला. आजही या चित्रपटाचे गारूड रसिकांच्या मनावर आहे. त्याचबरोबर सर्कसाक्षी या चित्रपटाची पटकथा, निर्मिती, दिग्दर्शन त्यांनी केले. पुढे सुर्वंता अशा चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. त्यांच्या सामना चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर ऍवॉर्ड, राज्य पुरस्कार आणि १९७५ साली बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी याची निवड झाली. नंतर सर्वसाक्षी या चित्रपटाची पटकथा, निर्मिती, दिग्दर्शन त्यांनी केले. पुढे सुर्वंता चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. सामना चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर ऍवॉर्ड, राज्य पुरस्कार मिळाले. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी त्याची निवड झाली. सर्वसाक्षी चित्रपटाची बेंगलोरच्या इंडियन पॅनोरमासाठी आणि हाँगकाँग येथे झालेल्या पाचक्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सकासाठी निवड झाली होती. सुर्वंता चित्रपटाला उत्कृष्ट ग्रामीण चित्रपटाचा १९९५ चा राज्य पुरस्कार आणि १९९५चा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा कालनिर्णय पुरस्कार मिळाला होता. रामदास फुटाणे यांच्या ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या काव्यसंग्रहाचा शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. ‘फोडणी’ला या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र सरकारचा बालकवी पुरस्कार, गोवा कला अकादमीचा वाक्यहोत्र पुरस्कार मिळाला आहे. रामदास फुटाणे यांना प्रसिध्द कलावंत दादा कोंडके, निळू फुले, भालजी पेंढारकर, विजय तेंडुलकर यांचा सहवास लाभला. प्रत्येकामध्ये असलेले वेगळेपण जवळून अनुभवता आले. भाष्य कविता कशी सुचते हे सांगताना फुटाणे म्हणतात, मी खूप निरीक्षण करतो, सर्व पक्षातील व्यक्तींशी माझी मैत्री आहे. राजकीय व्यक्ती नीट माहिती हवी, महाराष्ट्रातील प्रवाह तुम्हाला माहिती असले पाहिजे. ट ट आणि प प लिहून चालत नाही. भाष्यकवितांमध्ये आशय महत्त्वाचा असतो. विसंगती नेमकी शोधता आली तर उत्तम भाष्यकविता तयार होते. हिंदी कविता ऐकूनच आपण भाष्यकवितांकडे वळालो. कीर्तन ऐकणे, ग्रंथालयात खूप वेळ देणे आणि तर्कशुध्दीने विचार करणे यामुळेच कवितांचा प्रवास करू शकलो असे रामदास फुटाणे सांगतात. रामदास फुटाणे यांच्या कोपरखळया मारणाऱया वात्रटिकां इतक्याच त्यांच्या कविता हृदयाला भिडतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    https://www.youtube.com/watch?v=pZl6pi9dKFc

    "सामना‘ चित्रपट
    https://www.youtube.com/watch?v=qss_9no2Oeo
    https://www.youtube.com/watch?v=EqnFwzOtcAM

  • जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे

    महाराष्ट्राच्या-भारताच्या जलनीतीचा अभ्यास करताना माधवराव चितळे हे नाव टाळून पुढे जाता येत नाही. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३४ रोजी औरंगाबाद येथे झाला. नेपाळ, भूतान, बांग्लादेश व पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांबरोबर शांततापूर्ण मार्गाने केलेला पाणीवाटपाचा करार असो, भारताची पहिली राष्ट्रीय जलनीती साकारणं असो, किंवा राष्ट्रीय जलदिन साजरा करण्याची कल्पना राबवणं असो, प्रत्येक टप्प्यावर डॉ. माधवराव चितळे हे नाव, पाण्याशी जोडलेलं आहे.

    डॉ. माधव चितळे यांचे शालेय शिक्षण चाळीसगाव येथे झाले. शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातून दुस-या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यानंतर माधव चितळे यांनी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुवर्णपदकासहित बी.ई. सिव्हिलची पदवी प्राप्त केली.

    माधव चितळे यांनी १९९२ पर्यंत सरकारी नोकरीच्या माध्यमातून आणि निवृत्तीनंतर अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात योगदान दिले आहे. पुण्यात पानशेत धरण फुटल्यानंतर पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी त्यांची विशेष अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पुढे नगरचा मुळा प्रकल्प, मुंबईचा भातसा प्रकल्प येथेही अभियंता म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर कोयनेच्या भूकंपानंतरची परिस्थिती नियंत्रणात आणून कोयनेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम मार्गी लावण्यासाठी त्यांची नियुक्ती चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे झाली. पुढे प्रिन्स्टन विद्यापीठाच्या वुड्रो विल्सन स्कूलच्या आंतरराष्ट्रीय व सामाजिक व्यवहाराच्या अभ्यासक्रमासाठी चितळे यांचं नाव सुचवलं गेलं.

    १० वर्षे जबाबदारीच्या पदांवर काम केलेल्या लोकांमधून जगभरातील ४० व्यक्तींची निवड या अभ्यासक्रमासाठी केली जाते. चितळे यांची या मुलाखतीतून निवड झाली. प्रिन्स्टनमध्ये त्यांनी 'सर्वोत्तम पर्विन फेलो' हा सन्मान पटकावला. त्यापुढील काळात दिल्लीत केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.

    ५ वर्षांच्या या दिल्लीतील नियुक्तीचा काळ संपत येत असतानाच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी जलसंपदा मंत्रालयाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती केली. जल आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असतानाच सामान्य जनतेच्या मनात पाण्याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून चितळे यांनी जल दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला फक्त दिल्लीत साजरा होणारा हा जल दिवस पुढे १९९२ साली भारतभरात १२०० ठिकाणी साजरा झाला. सरकारी सेवेतून निवृत्तीनंतर १ जानेवारी १९९३ रोजी आंतरराष्ट्रीय जलसिंचन व जलनिस्सारण आयोगाचे सरकार्यवाह म्हणून माधव चितळे यांची नियुक्ती झाली.

    जलसंधारण आणि जलसंपदेबाबत जनजागरण या क्षेत्रांमधील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना १९९३ सालच्या स्टॉकहोम वॉटर प्राईझ या पाण्याचे नोबेल पारितोषिक म्हणवल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जलसंधारणाबरोबरच अन्यही अनेक क्षेत्रांत चितळे यांचे समाजप्रबोधनाचे कार्य सुरू आहे. औरंगाबाद येथे वाल्मीकि रामायणावर त्यांनी दिलेली ८८ प्रवचने पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाली आहेत. भारतीय राष्ट्रीय सौर कालगणनेच्या प्रसारासाठीही ते काम करीत असतात.

    माधव चितळे यांचा विवाह आशा पटवर्धन (विजया चितळे) यांच्याशी झाला. आशा पटवर्धन विद्यार्थीदशेत स्वतः उत्तम खेळाडू, संगीत विशारद व सुवर्णपदक विजेती होत्या. विजया चितळे यांनी त्यांच्या माधव चितळे यांच्या बरोबरच्या सहजीवनावर 'सुवर्णकिरणे' या नावाने पुस्तक लिहिले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.

    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • प्रसिध्द चित्रकार  प्रफुल्ला डहाणूकर

    प्रफुल्ला दिलीप डहाणूकर, माहेरच्या प्रफुल्ला सुब्राय जोशी. प्रफुल्ला डहाणूकर या एक मराठी चित्रकार होत्या. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, आर्टिस्ट्स सेंटर, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, गोवा कला अकादमी आदी अनेक कलासंस्थांच्या त्या अध्वर्यू होत्या. प्रफुल्ला डहाणूकर यांचे वडील सुब्राय अनंत जोशी, यांचा वाहतुकीचा व वाहनांचा व्यवसाय होता. प्रफुल्ला डहाणूकर पाच वर्षांच्या असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईत आले.

  • ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट

    नटांची अत्यंत काळजी घेणारे, इंटिरियर डिझायनिंग करणारे, उत्तम खवय्ये आणि तेवढ्याच प्रेमाने खाऊ घालणारे म्हणून भट प्रसिद्ध होते. “मोरूची मावशी‘ हे नाटक प्रचंड गाजले.

  • नटसम्राट डॉ. श्रीराम लागू

    भूमिका जिवंत करणे हा वाक्प्रचार लागूंच्या बाबतीत अगदी खरा ठरतो. मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट यात यशस्वी मुशाफिरी करणारे लागू खऱ्या अर्थाने रमले ते नाटकातच.