(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संगीतकार रवींद्रनाथ टागोर

    ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी झाला.

    रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २०व्या शतकाच्या प्रारंभी रवींद्रनाथाच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगितात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेल विजेते होत.

    बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते; यावरून बंगाली साहित्यावरील रवीन्द्रनाथांचा प्रभाव लक्षात आपल्याला लक्षात येतो. कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी प्रथम कविता वयाच्या ८ व्या वर्षी लिहिली.

    वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने ब-याचशा कविता लिहिल्या. शांतीनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांगलादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत.

    दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे जगातील वरील एकमेव कवी आहेत. पारंपारिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला. रविंद्रनाथकालीन भारतामध्ये सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळींचे प्रमुख केन्द्रांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभाव रवींद्रनाथांवरही पडला होता. संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता.

    संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत. ७ ऑगस्ट १९४१ रोजी रवींद्रनाथांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • चरित्र अभिनेते नाना पळशीकर

    नाना पळशीकर हे केवळ आपल्या मुद्राअभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे असामान्य चरित्र अभिनेते होते. मध्य प्रदेशात जन्म झाल्यामुळे त्यांच्यावर मराठीपेक्षा हिंदी भाषेचे संस्कार खूप होते. नाना पळशीकर यांनी १०० हून अधिक हिंदी व ४ मराठी चित्रपटात कामे केली. त्यांनी चित्रपटसृष्टीत नेहमी चरित्र भूमिका केल्या होत्या.

  • अभिनेते , चित्रकार श्री. चंद्रकांत मांढरे

    चंद्रकांत यांनी ‘ ज्वाला ‘ या चित्रपटात अभिनेते चंद्रमोहन यांच्याबरोबर १९३८ मध्ये अभिनय केला. त्याच वर्षी भालजी पेंढारकर यांच्या ‘ राजा गोपीचंद ‘ या चित्रपटासाठी साठी त्यांनी चंद्रकांत यांना बोलवले आणि त्यांचे सिनेसृष्टीसाठी पहिल्यांदा ‘ चंद्रकांत ‘ हे नाव ठेवले.

  • निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री व्ही.शांताराम

    निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री व्ही.शांताराम यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०१ रोजी कोल्हापूर येथे झाला. शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपट सृष्टीतलं सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेलं नाव. शांताराम बापू या नावानं ते ओळखले जात. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला खोल ठसा उमटवला. दिग्दर्शक म्हणून अनेक नवीन संकल्पना त्यांनी पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीत वापरल्या. जवळजवळ सहा दशकं ते चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती कोल्हापुरातील बाबुराव पेंटर यांच्या मालकीच्या `महाराष्ट्र फिल्म कंपनी'पासून. कंपनीत पडेल ते काम करता करता १९२१ साली निर्माण झालेल्या `सुरेखा हरण' या मूकपटात छोटीशी भूमिका केली. येथून त्यांची घोडदौड सुरू झाली.

    १९२५ साली निर्माण झालेल्या `सावकारी पाश' या सामाजिक चित्रपटात त्यांनी एका तरुण शेतकर्यााची भूमिका केली आणि १९२७ साली त्यांनी `नेताजी पालकर' हा पहिला मूकपट दिग्दर्शित केला.बाबुराव पेंटर यांच्याकडे नऊ वर्षं नोकरी केल्यानंतर त्यांनी श्री. दामले, श्री. फत्तेलाल, श्री. धायबर आणि श्री. कुलकर्णी यांच्या भागीदारीत कोल्हापुरात `प्रभात फिल्म्स'ची स्थापना केली. तेथे शांताराम बापूंना आपली कला विकसित करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळालं. `गोपाळ कृष्ण', `राणी साहेबा', `खुनी खंजर', `उदयकाल' असे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्यांनी दिले.`प्रभात'चा पहिला मराठी बोलपट `अयोध्येचा राजा' १९३२ साली प्रदर्शित झाला. १९३३ साली त्यांनी `सैरंध्री' हा भारतातला पहिला रंगीत चित्रपट काढण्याचं धाडस केलं. पण चित्रपटाच्या प्रिंट्स नीट डेव्हलप न झाल्यामुळे हा प्रयत्न फसला. `प्रभात'ला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. पण त्यातून डगमगून न जाता शांताराम यांनी `अमृतमंथन'ची निर्मिती केली. हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला. त्यानंतरचा १९३७ साली निर्मिलेला `संत तुकाराम' हा बोलपट भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला.

    भारतात-विशेषत: महाराष्ट्रात-हा चित्रपट धो धो चालला. त्याची कीर्ती सातासमुद्रापार गेली. व्हेनीस चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात आला. जरठ विवाहावर टीका करणारा `कुंकू' (दुनिया ना माने), वेश्येच्या पुनरुज्जीवनावर भाष्य करणारा `माणूस'(आदमी) आणि हिंदू-मुस्लीम दंग्यांच्या पार्श्वभूमीवर मैत्रीचा संदेश देणारा शेजारी (पडोसी) हे सामाजिक चित्रपट अफाट गाजले.शांताराम बापूंनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडली. त्यांनी मुंबईत येऊन `राजकमल कला मंदिर' या स्वत:च्या संस्थेची स्थापना केली.

    `राजकमल'च्या माध्यमातूनही त्यांनी दर्जेदार चित्रपटांची मालिका सुरू ठेवली. `राजकमल'ने १९४६ साली डॉ. कोटणीसांच्या जीवनावर आधारीत `डॉ. कोटणीस की अमर कहानी', १९५१ सालचा होनाजी बाळांचा `अमर भूपाळी', १९५५ सालचा रंगीत `झनक झनक पायल बाजे', १९५७चा १९५९चा `नवरंग' हे चित्रपट विशेष उल्लेखनीय ठरले. `डॉ. कोटणीस' आणि `दो आँखे' या चित्रपटांमध्ये त्यांनी स्वत: नायकाची भूमिका केली होती. १९७२चा `पिंजरा' या चित्रपटाने मराठी चित्रपटांच्या लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मागे टाकले. `पिंजरा' मराठीतला पहिला संपूर्ण रंगीत चित्रपट होता.शांताराम बापूंना चित्रपट माध्यमाची भाषा उत्तमपणे अवगत होती.

    बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माता-निर्देशक-नट चार्ली चॅप्लीन यांनी शांताराम बापू यांच्या दिग्दर्शनाचं कौतुक केलं होतं. शांताराम बापूंना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. महाराष्ट्राचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या आचार्य प्र. के. अत्रेंनी शांताराम बापूंना `चित्रपती' ही पदवी दिली. चित्रपट माध्यमातील व्यक्तींना दिला जाणारा भारतातला सर्वोच्य पुरस्कार `दादासाहेब फाळके पुरस्कार' १९८५ साली मा.शांताराम बापूंना प्रदान करण्यात आला, तर १९९२ साली भारत सरकारने त्यांना `पद्मविभूषण' पुरस्कार देऊन सन्मानीत केले.चित्रपटासाठीच्या विषयाची निवड, त्याचा आशय, कॅमेर्यामचे तंत्र, संकलन या सर्व बाबतीत बापूंचे चित्रपट काळाच्या पुढे असत.

    चित्रपट हे कलेचं आणि मनोरंजनाचं माध्यम तर आहेच, पण यातून समाजाला योग्य तो संदेशही प्रभावीपणे देता येतो हे त्यांनी जाणले होते. शांताराम बापू अतिशय कडक शिस्तीचे होते. कलाकार आणि तंत्रज्ञांवर त्यांचा वचक असे. भारतीय चित्रपटात पहिल्यांदा ऍनिमेशनचा वापर केला तोही शांताराम बापूंनी. `बॅक लिट' प्रोजेक्शनचा वापर करणारे ते पहिले दिग्दर्शक. शांताराम बापूंनी तीन विवाह केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव विमल, दुसरी जयश्री आणि तिसरी संध्या. जयश्रीला किरण हा मुलगा आणि राजश्री ही मुलगी तर संध्या यांना प्रभात कुमार हा मुलगा आणि मधुरा पंडित ही मुलगी अशी अपत्ये आहेत.

    `शांताराम' हे त्यांचं आत्मवृत्त मराठी आणि हिंदीमध्ये १९८६ साली प्रकाशित झालं आहे. आहे. व्ही.शांताराम यांचे ३० ऑक्टोबर १९९० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०७१३३
    संदर्भ. इंटरनेट

  • जाहिरातकार व ललित लेखक सुरेश नावडकर

    स्मिता तळवलकर यांच्या ‘तू तिथं मी’ या चित्रपटासाठी स्थिरचित्रण व जाहिरात दोन्ही कामे सुरेश नावडकर यांनी केली. हा चित्रपट सुवर्णमहोत्सवी ठरला. या कामाबद्दल त्यांना दुसऱ्यांदा राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. 

  • ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर

    काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी काश्मीर कमिटीचे काम ते करत होते. जून महिन्यापासून धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यात शांततेची फुंकर घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राबवलेल्या आठ कलमी कार्यक्रमांतर्गत काश्मिरी जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारचे संवादक म्हणून त्यांची अलिकडेच नियुक्ती करण्यात आली होती.

  • फिलिपिन्सचे तिसरे राष्ट्राध्यक्ष रेमन मॅगसेसे

    १९५३ पर्यंत मॅगसेसे यांनी राबवलेली ‘अँटी गोरीला’ मोहीम ही आधुनिक इतिहासातल्या सर्वांत यशस्वी मोहिमांपैकी एक मानली जाते. सर्वसामान्यांचा पाठिंबा नसेल तर हुक चळवळ टिकणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर लष्कराने सामान्यांना सन्मानाने वागवावं असं सांगतं तसंच गरीब शेतकऱ्यांना जमीन आणि अवजारं देऊ करत, त्यांना सरकारच्या बाजूला वळवून घेतलं.

  • सरोजिनी शंकर वैद्य

    सरोजिनी वैद्य या ललित लेखिका, चरित्रकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध होत्या. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक म्हणून त्यांनी योगदान दिलं होतं.

  • मास्टर दीनानाथ

    वंदनीय माई मंगेशकर ह्यांच्या लेखाचे शब्दांकन करण्याची सुवर्णसंधी मला लाभली होती. "स्वरमंगेश" ह्या गौरवग्रंथामध्ये "मालक" ह्या शीर्षकाने, २४ एप्रिल १९९५ रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख ! लतादीदी, मीनाताई, आशाताई, उषाताई, पं हृदयनाथजी ह्या पंचामृताने माझं कौतुक केलं ! आज चोवीस एप्रिल २०१७ रोजी वंदनीय मास्टर दीनानाथांची पंचाहत्तरावी पुण्यतिथी आहे,

    || मालक ||
    "माझ्या घरांत मी तुला काही काम पडू देणार नाही", असं मालकांनी मला लग्नाच्यावेळीच सांगितलं होतं ! अगदी तांब्यासुद्धा उचलू दिला नाही कधी. एकदा मालक आंघोळीला निघाले म्हणून मी धोतराच्या नि-या करून ठेवल्या, तर किती रागावले माझ्यावर, "तू काय हमालाची बायको आहेस का ?"

    आज माझ्या वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी मी मालकांच्या आठवणी आठवू पहाते, तर अगदी काल परवा घडल्या असाव्यात, अशा सा-या स्मृती माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागतात !

    माझ्या माहेरी जेवणानंतर, मला पान खायची सवय होती ! लग्नानंतर दोन दिवसांनी मालकांना काय वाटले, कोणास ठाऊक ? "यापुढे पान बंद", असं मालक म्हणाले. पानाचे सगळे साहित्य मालकांनी फेकून दिले. नंतर काय झाले, मालक गड्याला म्हणाले, "जेवण झालं की एक विडा करून हिच्या उशापाशी ठेवत जा" !

    एक दिवस मालक, खालूनच "माई, माई", अश्या मोठ्याने हाका मारीत आले. "अहो काय झालं?" मी विचारलं, पाहते तर काय, एका खिशात पानाचं सगळ साहित्य, नि दुस-या खिशात पिकलेली पानं, म्हणाले, "तुला लागतात ना, म्हणून पिकलेली पानं घेऊन आलोय"! मालकांचा असा भोळा अन् प्रेमळ स्वभाव !

    माझी सासू फार कडक होती. मी खानदेशातली म्हणून सासू मला "घाटी" म्हणायची, पण मालक इतके शांत की, आईला कधीही काहीही बोलायचे नाहीत. मी थोडी रागावले की, मालक म्हणायचे, "अगं माई, कां रागावलीस ? प्रेमाच्या राज्यांत तलवारीचं आणि भाल्याचं काय काम ?"

    इतका शांत स्वभाव होता ह्यांचा ! हं दिवसभर शब्दांच्या कोट्या करायचे आणि दुस-याला हसवायचे !
    मालाकांचं जेवण अगदी कमी असायचं, पण षोक मात्र खूप जेवण करून ठेवायचा. ह्यांना ओल्या हरभ-याची भाजी फार आवडायची. मटण, मासे,कोंबडी सगळं एकदमच करून ठेवायचं. दर पंगतीला ह्यांना कुणीतरी लागायचं. कधीही एकटे जेवले नाहीत, कुणीच नसलं, तर गॅलरीत उभे राहायचे आणि लोकांना हाका मारायचे, " काय रे बाबा, कुठे चाललास ? जेवलास कां नाही ? नाही तर ये आणि जेवून जा."
    काही वेळा मालक अगदी बेफिकीर असायचे. एकदा गोव्याला रस्त्यानं आम्ही दोघे चाललो होतो. ते पुढे आणि मी मागे. ह्यांनी शर्टामध्ये गळ्याशी नोटा खोचून ठेवल्या होत्या. जोराचा वारा आला आणि शर्टामधल्या काही नोटा उडून खाली पडल्या. मी त्या नोटा उचलायला खाली वाकले, तर माझ्यावर ओरडलेच, "खाली पडलेल्या नोटा भिका-यासारख्या उचलू नकोस, गेले पैसे तर गेले, त्याच्या मागे कधी जाऊ नये."

    प्रसंगी मालक अगदी लहान मुलासारखे हळवेही व्ह्यायचे. एकदा पुण्याला भाजीमंडईमध्ये, मी भाजी आणायला गेले होते, मुलं माझ्या बरोबर होती. घरी यायला आम्हाला जरा उशीर झाला तर इकडे जीव कासावीस होऊन, बायको-मुलं हरवली, अशी मालकांनी पोलिसात तक्रारही केली !

    मालाकांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. मी ही त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही. बैठकीचं गाणं ठरवायला कुणी आलं, तर म्हणायचे."माईला विचारा, तिने सांगितलं तर एका रुमालावरही गाईन."

    मालक अगदी सनातनी होते. मुलींच्या लहानपणी, त्यांची सक्त ताकीद होती की, मुलींनी स्टेजवर यायचं नाही. मुलींनी पावडर लावायची नाही.

    मालक उदार वृत्तीचे होते. एकदा मुंबईला रेडिओवर गायला गेले होते तर हातातल्या अंगठ्या कुणाला तरी देऊन, रिकाम्या बोटांनी घरी आले. मैत्री कशी करावी, हे तर मी मालकांच्या स्वभावातूनच पाहिलं. आयुष्यात फार मोठा दानधर्म मालकांनी केलेला मी स्वतः जवळून पाहिला आहे. पण शेवटी मालकांच्या अंगावर काय आलं तर भगवं धोतर !

    मला चार मुली झाल्या, पण लोकांसारखे मालकांनी कधी, "मुलीच कां झाल्या ?" असं नाही म्हटलं. त्यांना मुलींचीच भारी हौस होती. मुलीना रागे भरलेले त्यांना आवडायचे नाही. मुलींना ते जराही दृष्टीआड होऊ द्यायचे नाहीत.

    श्रीमंगेशावर मालकांची अगाध श्रद्धा होती ! लताच्या, बाळच्या आजारपणांत अगदी हळवे व्ह्यायचे. लताच्या आजारपणांत मालक कुंडली उघडून बसायचे. तंबोरा वाजवीत तोंडाने सारखी रामरक्षा म्हणायचे. लता देवीच्या आजारातून उठल्यावर तर मालकांनी बँड लावला होता. जेवढ्या बायका, लताला पहायला आल्या होत्या, तेवढ्या सगळ्यांची मी खणा-नारळांनी ओटी भरली होती ! उषाच्या पाठीवर मला मुलगा झाला, म्हणून उषाच्या वाढदिवसाला मालक उषाच्या पाठीची पूजा करायचे. उषा उगवली की प्रकाश येतो, म्हणून बाळला हे प्रकाश म्हणायचे. लताला हे "तताबाबा" म्हणायचे. आशा अगदी भोळसट म्हणून तिला हब्बू म्हणायचे. तर नाकाचं टोक जरा वरती म्हणून उषाला बुंडरी म्हणून हाकारायचे.
    आम्ही सांगलीला होतो, तेव्हाची एक आठवण ! मालक नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने नेहमी मुंबईला जायचे. एकदा रुसून मी ह्यांना म्हणाले, "इतके नेहेमी मुंबईला जाता, तर माझ्यासाठी दोन चांगली लुगडी आणा". मालकांनी येतांना खरंच माझ्यासाठी दोन चांगली लुगडी आणली, त्यातल्या एका लुगड्याची मी घडी मोडली, तेवढ्यात दाराशी एक भिकारीण गात गात आली. तिच्या बरोबर तिची बारा-तेरा वर्षांची पोरगी होती, ती नाचत होती. ते पाहून मालकांना रडू आलं, मला म्हणाले, "पोटासाठी ती पोर नाचवीत आहे, ते मला बघवत नाही. तुझ्या अंगावरचे हे लुगडं, तिला देऊन टाकशील कां ?" काय करणार ? अंगावरचे लुगडं सोडून, मी त्या भिकारणीला देऊन टाकले. दिलदार असे की, एकदा त्यांनी नव्या आणलेल्या चादरी, दुस-याला देऊन टाकल्या.

    मालक म्हणजे देवमाणूस होते ! लग्न झाल्यावर मी कधी माहेरी गेलेच नाही. कंपनीच्या किल्ल्या माझ्यापाशीच असायच्या.
    मालकांना जाऊन आज त्रेपन्न वर्षे झाली, पण त्यांच्या संगीताचा जराही विसर पडला नाही.त्यांच्या गायकीपुढे आजचे तरुण गायक नम्रतेने मान झुकवतात. मालकांचा विलक्षण पल्लेदार आवाज, त्यांच्या नाट्यसंगीताला असलेला शास्त्रीय संगीताचा जबरदस्त आधार, रागदारी आणि लय यावरची त्यांची हुकमत, पंजाबी आणि राजस्थानी संगीताचा त्यांच्या गायकीत झालेला गोड मिलाफ, यामुळे त्यांच्या गाण्याने मनाला घातलेली मोहिनी सुटत नाही. मालक दिवसभर गाणं म्हणायचे. पहाटे चार वाजता उठून तंबोरा घेऊन बसायचे. आपला आवाज ताब्यात ठेवायचे. मालक गातांना कधी वेडे-वाकडे तोंड करायचे नाहीत. लता, मीना, आशा, ह्यांच्याजवळ गाणं शिकायच्या. केव्हां केव्हां गणूलाही (गणपत मोहिते) मालक शिकवायचे. नाटकाच्या पदांच्या तालमी तेवढे मालक घ्यायचे.

    नाटक नसलं की, रिकाम्यावेळी मालक गाण्याच्या बैठकी करत. व-हाडामध्ये मालकांच्या गाण्याचे खूप कार्यक्रम झाले. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, धारवाड, इंदूर, ग्वाल्हेर, सिमला अश्या कितीतरी ठिकाणी ह्यांच्या गाण्यांच्या मैफली रंगल्या ! मालकांची सर्व नाटकं मी आवर्जून बघितली. प्रत्येक पटाला वन्समोअर घेणारे, टाळ्यांच्या गजराने, डोक्यावर घेतलेले थिएटर मी पाहिलेय !

    मालकांना ज्योतिषाचा भारी नाद होता. ज्योतिष विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता. मालकांनी मला पत्रिका बघायला शिकविलं. "हे तारे बघ, त्या कुंडल्या काढ," असं सारखे मला म्हणायचे. आपली पाची मुलं पुढे नामवंत होतील, हे भाकीत फार पूर्वीच त्यांनी वर्तविले होते !

    मालकांनी पुण्याला घर घेतलं, तेव्हां गृह्शांतीला ब्राह्मण नाही बोलावले. आपल्या मुलांकडून, त्यांनी संस्कृत मंत्र म्हणवून घेउन, घराची शांती केली. मालकांची स्मरणशक्ती तल्लख होती. संस्कृत भाषेचं त्यांना खूप वेड होतं ! ते सामवेद म्हणायचे. मोठमोठी पुस्तकं वाचली होती त्यांनी. मालकांनी मला खूप हिंडवले, फिरवले !

    मालकांना शिकारीची आवड होती. कधी कधी ते शिकारीला जातांना मलाही बरोबर न्यायचे. एकदा तर तान्ह्या आशाला बरोबर नेले होते. कधी सांगलीच्या रानात, तर कधी थेट बेळगावपर्यंत जायचे. शनिवार, रविवार, बुधवार कंपनीची नाटकं असायची, तर बाकी दिवस शिकारीचे. मी रान उठवायची. ते, तितर, सश्यांची शिकार करायचे. मालकांनी वाघ मात्र कधी मारला नाही, कारण, "ते आमचे कुलदैवत आहे," असे ते म्हणायचे !

    मालकांनी "बलवंत सिनेटोन" ही चित्रपट कंपनी काढून, "कृष्णार्जुन युद्ध" हा चित्रपट निर्माण केला. दुर्दैवाने ह्यांना चित्रपट निर्मितीमध्ये यश लाभलं नाही आणि त्यातूनच त्यांच्यावर भरलेले खटले आणि झालेला तीव्र मनस्ताप फार कठीण काळ होता तो. त्या परिस्थितीमध्ये मालकांची तब्येत ढासळली, ती कायमचीच !

    सोळा डिसेंबर एक्केचाळीसचा तो दिवस, लताचं रेडिओवरून पहिल्यांदा गाणं झालं, तेव्हां मालकांनी आपल्या लताचं गाणं, घरी बसून ऐकलं मात्र, मला म्हणाले, "माई, आज मी माझं गाणं ऐकलंय, आता मला जायला हरकत नाही". मालकांनी लताला शेवटची चीज शिकविली ती, "म्हारा मुजरा". मालकांनी लताला स्वतःची चिजांची वही आणि तंबोरा दिला. पुढचं भाकीत मालकांना उमजलं होतं !
    मालकांनी लताचं गाणं ऐकलं पण वैभव पाहायला दैव नाही लाभलं. मालकांचं राज्यच वेगळं होतं, आता हे राज्यही मोठंच आहे, पण ते सत्तेच होतं......

    शब्दांकन : उपेंद्र चिंचोरे
    संदर्भ.इंटरनेट

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    डॉ.बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला.