आज ११ नोव्हेंबर.. आज ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा यांचा वाढदिवस
माला सिन्हा यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३६ साली कोलकाता,( बंगाल) येथे झाला.
माला सिन्हा यांचे मूळ नाव एल्डा आहे. रोशनआरा या बंगाली चित्रपटाव्दारे माला सिन्हा यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. गुरुदत्तच्या प्यासा चित्रपटात वहिदा रेहमान असतानाही माला सिन्हा यांनी 'हम आपकी आखोमें' या गाण्यातून आपला वेगळा ठसा उमटविला होता. १९५४ ते १९७४ अशा वीस वर्षांत जवळपास ६५ हिंदी चित्रपटांमध्ये अदाकारी करणारी आणि आपल्या मादक अदांनी लाखो सिने रसिकांना घायाळ करणारी नायिका म्हणजे माला सिन्हा. परवरिश या चित्रपटातील माला सिन्हा यांचे सौंदर्य अनेकांना घायाळ करणारे ठरले होते. दिल्लगी, गहरा दाग, गीत, अनपढ, हिमालय की गोद में, गुमराह, दिल तेरा दिवाना, मेरे हुजूर, होली आई रे, संजोग या चित्रपटांमध्ये माला सिन्हा यांनी प्रभावी अभिनय केला. माला सिन्हा ह्यांनी हिंदी बरोबरच बंगाली आणि नेपाळी चित्रपटांतून काम केले आहे. माला सिन्हा यांच्यावर चित्रित झालेली गाणी रसिकांना प्रचंड भावली. ये हरियाली और रास्ता..., धीरे धीरे चल चाँद गगन में... आपकी नजरोने समझा, प्यार के काबिल मुझे... झुमता मौसम मस्त महिना... यांसारख्या एकाहून एका सरस गाण्यांना अभिनेत्री मा.माला सिन्हा यांनी आपल्या अदाकारीने चार चाँद लावले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
साहित्याइतकीच अध्यात्माचीही ओढ असणाऱ्या रविंन्द्र भट यांनी एकूण १४ कादंबऱ्या, पाच नाटके, सहा काव्यसंग्रह व चित्रपट, अनुबोधपट, बालवाङमय असे विपुल लेखन केले. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३९ रोजी झाला. इंदायणी काठी, सागरा प्राण तळमळला, भगीरथ, आभाळाचे गाणे, देवाची पाऊले, भेदिले सूर्यमंडळा या त्यांच्या कादंबऱ्यांना वाचकांची विशेष पावती मिळाली होती.
नसती उठाठेव, गोविंदा गोपाळा, ते माझे घर या चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले. मोगरा फुलला, ओठावरली गाणी, जाणता अजाणता हे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय आहेत. भट यांनी एस.पी कॉलेजमधून बी. ए. केले, त्यानंतर त्यांनी १९६८-८० या कालावधीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर नोकरी केली. १४ वर्षे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह काम केले.
त्यांना राष्ट्रपती पुरस्कार, मसाप पुरस्कार, चेतना ट्रस्टचा पुरस्कार, दर्पण, पुणे विद्यापीठाचा आणि ना. ह. आपटे स्मृती पुरस्कार मिळाले होते. रवींद्र सदाशिव भट यांचे २२ नोव्हेंबर २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
लोकमान्य टिळक म्हणायचे, पंचांग हे आकाशाचा आरसा असला पाहिजे, लोकमान्यांचं हे विधान नानाशास्त्रींना प्रेरणा देऊन गेले. नानाशास्त्री यांनी १९१६-१७ या वर्षासाठीचं पंचांग काढलं, ते कोल्हापुरातल्या आर्यभूषण प्रेसमधून छापून घेतलं.
ज्येष्ठ कलाकार बलराज सहानी हे एक श्रेष्ठ चित्रपट अभिनेते म्हणून लोकांना माहित आहेत. पण ते एक थोर तत्त्वचिंतक, समाजसेवक होते ही गोष्ट पहात थोड्यांना ज्ञात आहे. बलराज साहनी डाव्या विचारसरणीचे व्यक्ती होते. ते इंडियन पीपुल्स थिएटरशी जोडलेले होते.
बलराज साहनी यांचा जन्म १ मे १९१३ रोजी झाला. बलराज साहनी यांनी लाहोरच्या सरकारी कॉलेजमध्ये प्रोफेसर सोढी आणि प्रोफेसर बुखारी यांच्या मार्गदर्शनात शेक्सपिअर लिखित नाटकात अभिनय केला. शांती निकेतनमध्ये बर्नाड शॉ यांच्या ‘आर्म्स अँड मॅन’ मध्ये काम केले.
बलराज साहनी हे एम. ए. झाल्यानंतर ते काही काळ ‘शांतिनिकेतन’मध्ये प्राध्यापक होते. नंतर मात्र, लंडनमध्ये बीबीसीमध्ये नोकरी करून भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय नाटकातच काम केले.
बलराज साहनी यांनी चित्रपट उद्योगात वयाच्या ३४ व्या वर्षी प्रवेश केला. बलराज साहनी हे चित्रपटसृष्टीतील मातब्बर कलावंत होते. हिंदी चित्रपटांत त्यांनी तब्बल २५ वर्षे काम केले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचा ठसा उमटवला. रंगभूमी आणि एकूणच सांस्कृतिक विकासात त्यांनी मोलाची भर घातली.
देव आनंद अभिनीत ‘बाजी’ चित्रपटाची पटकथा बलराज साहनी यांनी लिहिली. काही वर्षांनंतर चेतन आनंदच्या ‘हकीकत’ मध्ये त्यांनी अभिनयाबरोबरच लेखन आणि निर्मितीतसुद्धा सहकार्य केले. सारांश एवढाच की, हे सगळे शिक्षित लोक होते आणि कोणताही वाद ताणत नव्हते. मा.बलराज साहनी यांचा चेहरा पारंपरिक नायकाचा नव्हता. ते मध्य अवस्थेत अभिनयाशी जोडले गेले होते. जिया सरहदी यांच्या ‘हम लोग’ च्या शूटिंग वेळी त्यांना रोज तुरुंगातून आणावे लागत होते. कारण एका आंदोलनामुळे त्यांना राजकीय बंदी बनवण्यात आले होते. ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘धरती के लाल’ मध्ये त्यांनी अभिनय केला होता. मात्र, १९४६ मध्ये जागोजागी दंगे झाल्यामुळे चित्रपटाचे सामान्य प्रदर्शन होऊ शकले नाही. बिमल रॉय यांनी ‘दो बीघा जमीन’ मध्ये त्यांना मुख्य भूमिकेत घेतले. चित्रपटाच्या यशासोबत बलराज यांनासुद्धा खूप प्रशंसा मिळाली. अमिय चक्रवर्ती यांच्या ‘सीमा’ मध्ये त्यांनी गांधीवादी संस्थेच्या प्रमुखाची भूमिका केली होती. या भूमिकेची खूप प्रशंसा झाली होती. हा चित्रपट शंकर-जयकिशन-शैलेंद्र यांच्या यांच्या गीत व संगीत्नाने आठवणीत राहीला. ‘काबुलीवाला’ मध्येही बलराज यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या कहाणीवर आधारित होता. शांती निकेतनशी जोडलेले असल्यामुळे रवींद्रनाथ टागोर यांनी कधी काळी हा चित्रपट पंजाबीमध्ये लिहिण्याची प्रेरणा बलराज यांना दिली होती. मा.बलराज साहनी यांचे अजूनही ‘वक्त’ मधील गाणे ‘ओ मेरी जोहरा जबी, तुझे मालूम नहीं, तू अब तक हैं हंसी और मैं जवां.’ लक्षात आहे.. ते पठाण कुटुंबाच्या उत्सवात गाणे म्हणत आहेत. मा.बलराज साहनी यांचे ‘गरम कोट’, ‘सट्टा बाजार’, ‘सीमा’, ‘लाजवंती’, आणि ‘गर्म हवा’ अविस्मरणीय चित्रपट होते. एमएस सथ्यु यांचा ‘गर्म हवा’ फाळणीवर बनलेला महान चित्रपट होता.
बलराज साहनी अतिशय संवेदनशील व्यक्ती होते. त्यांची कलात्मक आवड त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक कार्यात दिसून आली. ते स्टार असूनही खूपच सामान्य जीवन जगत होते. राज खोसला यांच्या ‘दो रास्ते’ मध्ये त्यांनी सावत्र भावाची भूमिका केली होती. तो त्या कुटुंबाचा प्रमुख असतो. राज खोसला एक स्वछंदी व्यक्ती होते. त्यांना लवकर आणि कमी खर्चात काम करणे आवडत नव्हते. त्यांच्यासारखे विविध चित्रपट इतर दिग्दर्शकांनी केले नाहीत.
पंचवीस वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत बलराज साहनी यांनी १२५ चित्रपटांत अभिनय केला. बिमल रॉय यांचा "दो बिघा जमीन‘, अमिया चक्रवर्ती यांचा "सीमा‘, राजेंद्रसिंह बेदी यांच्या "गरम कोट‘ या कथेवरील चित्रपट, हेमंत गुप्ता याचा "काबुलीवाला‘, यश चोप्रा यांचा "वक्त‘ यांतील त्यांचा अभिनय अविस्मरणीय आहे. एम. एस. सथ्यू यांचा "गरम हवा‘ या त्यांनी अभिनय केलेल्या शेवटच्या चित्रपटात फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार देणाऱ्या मुस्लिमाचे त्यांचे पात्र अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील. जीवनाचे शेवटचे क्षण त्यांनी अमृतसरच्या पंजाबी कला केंद्रात घालवले. या संस्थेसाठी त्यांनी एक नाटक ‘क्या यह सच है बापू’ लिहिले. मात्र हे ‘अर्श-फर्श’ च्या नावाने सादर करण्यात आले.
बलराज साहनी यांचे १३ एप्रिल १९७३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आमचा सुहृद मित्र कै. दिलीप सत्तूर मला दरवर्षी आठवण करून द्यायचा “श्रीकांत, तळवलकर ट्रस्टच्या “अनुकरणीय उद्योजक” पारितोषिकासाठी तू मन्मनच्या गोखल्यांचा विचार का करत नाहीस? एकदा त्यांना भेट. मन्मन उद्योग सदाशिव पेठेत मुलांच्या भावेस्कूल समोर आहे. तुला फार लांब नाही. फार वेगळे गृहस्थ आहेत. बघ एकदा त्यांच्याशी बोल आणि तुला योग्य वाटले तरच पारितोषिकासाठी विचार कर.” माझ्या डोक्यात अनेक नावे असत, त्यामुळे गोखल्यांचे नाव मागे पडत गेले. यंदा परत दिलीपने आठवण करून दिली आणि आग्रह देखील केला. तु गोखल्यांना एकदा भेटच तुमचा अनुकरणीय उद्योजकाचा शोध नक्की संपेल. फार अफलातून गृहस्थ आहेत. मी ठरवले, जाऊयात एकदा हा एव्हडा म्हणतोय तर. खरं म्हणजे सदाशिव पेठेत असा काही उद्योग असेल असे मनाला पटत नव्हते आणि असलाच तर असून असून किती मोठा असेल? असा प्रश्न मला उगीचच पडत होता. कदाचित म्हणूनच माझे पाय तिकडे वळत नव्हते. पण शेवटी मी ठरवले गोखल्यांना भेटायचे. दिलीपला विचारले तुझी ओळख देऊ का? तर दिलीप म्हणाला छे छे मी त्यांना १०-१२ वर्षांपूर्वी भेटलोय ते मला आता ओळखणार देखील नाहीत. शेवटी मी, अरुण नित्सुरे आणि अजय मोघे मन्मनच्या ऑफिसमध्ये धडकलो. स्वागतिकेला गोखल्यांना भेटायचे आहे म्हणून सांगितले. माझे कार्ड दिले. तिने कार्ड आत नेऊन दिले आणि १० मिनिटात बोलावतील असे सांगितले. आम्ही रिसेप्शन मध्ये वाट पहात बसलो. तेव्हड्यात एक कुरियरवाला आला त्याने पार्सल स्वागतिकेकडे दिले. बिल दिले आणि निघाला तोच तिने त्याला परत बोलावले आणि Octroi रिसीट विचारली. तो म्हणाला
“Octroi भरला नाही, मटेरियल तसचं आणलाय. पण मॅडम octroi भरला नाही म्हणून पैसे पण घेतले नाहीत.” आणि तो वळून जाऊ लागला. रिसेप्शनिष्टने त्याला जरबेने बोलून घेतले आणि सुनावले.
“हे बघा, octroi भरला नसेल तर ते पार्सल परत घेऊन जा. मी पाठवणाऱ्या कंपनीला कळवते की ह्या कुरियरने परत पार्सल पाठवू नका. हे घेऊन जा आणि octroi भरून आणा.” कुरियरवाल्याला हे नवीन होते तो बाईंना पटवू लागला
“बाई, तुमचं काहीतरी वेगळच. आता मी कुठे भरू octroi? घ्याना ह्यावेळी पुढे बघू.”
“हे बघा हे चालायचं नाही. मी आत्ताच फोन करते त्यांना” आणि फोन लावला देखील.
शेवटी होय नाही म्हणता कुरियर ते पार्सल परत घेऊन गेला. बाईंनी पार्सल पाठवणाऱ्या सप्लायारला याची खबर दिली व असे परत होणार नाही याची तंबी दिली.
पार्सल परत देताना मन्मन मधल्या कोणी ते मागवले होते? वेळेत न मिळाल्याने व्यवसायावर काय परिणाम होईल? याचा विचार न करता ते परत पाठवले. मी हे सर्व बघत होतो. गोखल्यांच्या कंपनीचे एथिकल वेगळेपण इथेच बघायला मिळाले. मला गोखल्यांचे आत बोलावणे आले आणि स्वागतिकेने स्वत: मला त्यांच्या केबिनपर्यंत सोडले. आत मनोहर गोखल्यांचे दर्शन झाले. वय साधारण सत्तरच्या आसपास, कोकणस्थी गोरेपण आणि चेहऱ्यावर सात्विक शांत भाव असलेले गोखले प्रथम दर्शनीच आवडले. रिसेप्शनिस्टने octroi न भरल्याने पार्सल परत पाठवल्याचे गोखल्यांच्या कानावर घातले. उत्तम केलेस, असे बाईंचे कौतुक केले आणि माझ्याकडे बघून स्माईल केले व मला बसण्याची खुण केली. मी माझा येण्याचा उद्देश सांगितला की, “आम्ही तुमच्या विषयी खूप ऐकले आहे एक उत्सुकता म्हणून आपण काय करता हे जाणून घेण्यास आलोय.” त्यांना माझी ओळख सांगितली. असे काही कुणी उत्सुकते पोटी येईल अशी त्यांना कल्पना नसल्याने आश्चर्य मिश्रित कौतुकाने मला म्हणाले “बोला काय माहिती हवी.”
“हेच की आपण काय करता? प्रॉडक्ट काय?”
“आम्ही मेडिकल सर्जरीसाठी लागणारी सामग्री बनवतो.” असे म्हणून त्यांनी त्यांचा एक प्रॉडक्ट कॅटलॉग समोर ठेवला. मी इंजिनीअर असून मला फारसे आकलन झाले नाही. पण त्यांनीच हा प्रश्न सोडवला आणि त्यांनी सुरवात केली. “आम्ही orthopedic सर्जरी पासून मेंदूच्या सर्जरी पर्यंत लागणारी सर्व प्रकारची शल्य उपकरणे बनवतो, ज्यामुळे डॉक्टरला शल्यक्रिया करणे सुकर जाते. आम्ही १००-१२५ प्रकारची शल्य उपकरणे बनवतो. देशात तसेच परदेशात देखील वितरीत करतो.” एकंदर मला जे कळले त्यावरून जशी कारखान्यात आपण वेगवेळ्या प्रकारची टूल्स वापरतो तशीच टूल्स एखाद्या सर्जनला ऑपरेशन करता वापरावी लागतात. एखादे मशीन दुरुस्त करताना ठराविक वेळेत दुरुस्त व्हावे असे इंजिनीअरला बंधन नसते. आज काम अपुरे राहिले तर उद्या करू. आहे काय अन नाही काय. पण माणसाचे हृदय, किडनी अथवा मेंदूची दुरुस्ती करताना, वेळ अतिशय काटेकोरपणे वापरावा लागतो. आज दुरुस्ती झाली नाही रुग्णाला तसेच ठेऊन उद्या उरलेली करू असे चालत नाही. हा महत्वाचा फरक माणूस आणि मशीन दुरुस्त करण्यातला आहे. तसाच इंजिनियर आणि सर्जन या मधला आहे. त्यामुळे शल्यक्रीयेची अशी उपकरणे बनवताना अजून एक महत्वाची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे त्या आयुधामुळे रुग्णास कोणतीही इजा होता कामा नये. एकंदर लक्षात आले की, गोखलेसाहेब आपल्या आकलना आणि आवाक्याच्या पलीकडचे काम करतायत. “तुम्ही इकडे कसे वळलात?” असे मी विचारले
“ अहो त्याची मोठी गम्मतच झाली.” श्रोते मिळाल्यामुळे गोखलेसाहेब रंगात आले होते.
“२० वर्षांपूर्वी माझा भाऊ ससूनमध्ये न्युरो सर्जन होता. तो एकदा म्हणाला अरे मला मेंदूचे ऑपरेशन करताना कवटीतून मेदू मोकळा करून कवटी डाव्या हाताने धरून शस्त्रक्रिया करावी लागते त्यामुळे शस्त्रक्रियेस वेळ लागतो आणि आपले काहीतरी चुकले तर? ही मोठी भीती वाटत रहाते. तर तू अशी काही वस्तू कर की ती कवटी अलगद पकडून ठेवेल आणि माझे दोन्ही हात शल्यक्रियेस मोकळे राहतील, जेणेकरून मला नीट काम करता येईल आणि वेळ कमी लागेल. परदेशात अशी उपकरणे मिळतात पण ती फार महाग असतात आणि त्यामुळे शस्त्रक्रीयेचा खर्चही वाढतो आणि तो रुग्णास परवडत नाही. मी म्हटले मला तू ऑपरेशन करताना एकदा बघावे लागेल.”
“त्याने मला एकदा ऑपरेशन करताना बोलावले. जवळ जवळ ४ तास ऑपरेशन चालले. मी शांतपणे तो काय करतो ते बघत होतो. तेव्हा काही आत्ता सारखी मोबाईलवर व्हिडीओ घेण्याची सोय नव्हती. मोजमाप देखील घेता येणार नव्हते. मी फक्त निरीक्षण केले आणि २ महिन्यांच्या प्रयत्नाने एक साधे मेदूची कवटी पकडणारे उपकरण बनवले, ते भावास दिले. त्याने ते पुढच्या ऑपरेशनसाठी वापरले आणि त्याला खूप आवडले आणि उपयुक्त देखील वाटले. त्याचे ऑपरेशन निम्म्या वेळात झाले. मुख्य म्हणजे परदेशी उपकरणाच्या तुलनेत फक्त १०% किमतीत हे उपकरण तयार केले ह्यात आमचा प्रॉफिट देखील आला.”
“ही बातमी हा हा म्हणता अनेक शल्यकर्मीपर्यंत पोहचली. हळूहळू अनेक डॉक्टर्स मला भेटून विविध प्रकारची उपकरणे बनवून घेऊ लागली. यात orthopedic आले, पोटाचे, किडनीचे अशा सर्व प्रकारच्या स्पेशालीस्टना मी वेगवेगळी उपकरणे करून देऊ लागलो. मला तो नादच लागला कोणतेही ऑपरेशन करताना निरीक्षण करायचे आणि वर्कशॉप मध्ये उपकरण बनवायचे. अशा शेकडो शस्त्रक्रिया मी ऑपरेशन थियेटर मध्ये जाऊन बघत असे. यातून मी अशा प्रकारची शेकडो उपकरणे बनवली. देशात असे कोणतेही मोठे हॉस्पिटल आणि सर्जन नसेल ज्याला माझे नाव माहीत नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो हल्ली मेंदूतल्या ट्युमरची शस्त्रक्रिया करण्यास सर्व कवटी उघडावी लागत नाही. जिथे ट्युमर अथवा दोष असेल त्याच्या वर कवटीला एक भोक पाडतात आणि शस्त्रक्रिया करून ती जागा पुन्हा बंद करतात. ह्या मेंदूच्या कवटीस ड्रील करण्याचे मशीन आम्ही बनवतो. आता एक विचार करा कुलकर्णी, हे ड्रील मेंदूत एक मायक्रॉन देखील घुसलेही नाही पाहिजे आणि अर्धवट ड्रील करून देखील चालणार नाही. असे अवघड उपकरण मी डिझाईन केले आहे आणि अनेक शस्त्रक्रियेत ते वापरले जाते.” माझ्या अंगावर सणकून शहारा आला. गोखलेसाहेब हे अगदी सहज सांगत होते.
गोखलेसाहेब या व्यवसायात पडले, ते देखील वयाच्या पन्नाशीत. पुण्याच्या कुस्रो वाडिया इंस्टीटयूटमधून draftsman चा कोर्स करून ते भोपाळच्या BHEL मध्ये नोकरी केली. ती नोकरी सोडून पुढे पुण्याच्या टाटा मोटर्समध्ये (तेव्हाची टेल्को) आले. तिथे ते ट्रेनिंग विभाग बघू लागले. जेआरडी जेव्हा जेव्हा पुण्याला भेट देत तेव्हा ते प्रथम या विभागास भेट देऊन मगच पुढच्या कामास जात. जेआडींच्या या सवयीमुळे हा विभाग कायम व्यवस्थित ठेवण्याची सवय लागली. गोखल्यांच्या क्रिएटिव्ह स्वभावामुळे जेआरडी त्यांना नेहमी विचारत गोखले यावेळी नवीन काय? गोखले एखादी नवीन केलेली गोष्ट त्यांना दाखवत. नवीन काहीतरी शोधण्याचा त्यांना ध्यासच लागला. त्यातून अनेक गोष्टी निर्माण होऊ लागल्या. त्यांच्या बंधुंमुळे यातूनच पुढे विविध शल्यसामग्री डिझाईन करून बनवू लागले. आता व्याप वाढू लागला आणि टेल्कोची आरामाची नोकरी सोडून पूर्णपणे व्यवसायात झोकून दिले. सदाशिवपेठेतली जागा कमी पडू लागली तर अरण्येश्वर रोड वर उपकरणे बनवण्यासाठी एक वर्कशॉप सुरु केले. मुलगा समीर ते वर्कशॉप बघत असे. नावही मोठे गमतीचे ठेवले “समीरचे वर्कशॉप” घरचे इतर देखील सर्व त्यांना उद्योगात मदत करू लागले. पण मध्येच एका अपघातात समीरचे तरुण उमद्या वयात निधन झाले. ज्या बंधुंमुळे ते या व्यवसायात आले तो डॉक्टर भाऊ देखील अकाली गेला. पण गोखले साहेब त्या आघातातून सावरले.
“गोखले हे “मन्मन” ही काय भानगड आहे ? नुसतं मन का नाही?” मला सतावणारा प्रश्न मी शेवटी विचारलाच. त्याच काय आहे कुलकर्णी, मी असे समजतो आपल्याला दोन मने असतात. एक बाहेरचे मन जे चंचल असते. सारखं सुख, दुखः, बरे, वाईट याचा विचार करते. ते स्वार्थी असते, दुसऱ्याला पीडा देण्याचा विचार करते, हे हवंय, ते हवंय असा हव्यासी विचार करते. पण त्या मनाच्या आत एक आणखीन मन असते ते निरागस असते, क्रिएटिव्ह असते. ते मनाचे मन असते. तिथे चांगले विचार निर्माण होतात. तिथे वेगवेगळी डिझाईन घडतात. त्या बाहेरच्या चंचल मनाचे जे अंतर्मन ते “मन्मन.” हे अंतर्मन जागे असले, तर उत्तम कल्पना सुचतात. मी एखाद्या डॉक्टरचे ऑपरेशन बघतो तेव्हा माझे हे मन्मन मला ते उपकरण कसे बनवायचे ते सुचवते आणि मी ते फक्त प्रत्यक्षात आणतो. मला drawing काढावे लागत नाही. ते आतूनच येते. कसे येते ते माहित नाही पण सुचत जाते. परमेश्वराने दिलेली देणगी आहे. मी निमित्तमात्र करता करविता तोच, विधाता.” गोखल्यांमधला निगर्वी उद्योजक बोलत होता. मीपणाचा स्पर्शही नाही. पेशाने इंजिनीअर असलेले गोखले किती कविमनाचे तत्वचिंतक कलाकार आहेत ह्याचे मी प्रत्यंतर घेत होतो.
त्यावर्षीचा अनुकरणीय उद्योजकाचा शोध संपला होता. इथे सगळेच अनुकरणीय होते. गोखलेसाहेब इंजिनिअर आहेतच, पण कलाकार, गुरु, तत्वचिंतक, सेवाभावी शिवाय एथिकल आणखीन काय काय होते. त्यांना सगळ्यात शेवटी माझा येण्यातला स्वार्थ सांगितला आणि तळवलकरसरांच्या नावाने अनुकरणीय उद्योजक हा पुरस्कार त्यांना देणार असे सांगितले. त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. काही क्षण ते बोलू शकले नाही. अहो मी फार छोटा माणूस मला कसले पारितोषिक? माझ्यापेक्षा कितीतरी महान लोक या जगात आहेत? त्यांच्या मृदू स्वभावाला साजेल अशी शंका त्यांनी उपस्थित केली. त्यांना तळवलकरसरांविषयी सांगितले. ते म्हणाले मी त्यांना ओळखायचो कारण, मी देखील कुस्रो वाडीयाचाच ना. मला ते शिकवायला नव्हते पण त्यांची शिस्त माहीत होती. पुरस्कार स्वीकारणार असे त्यांनी कबूल केले. प्रत्यक्ष कार्यक्रमाची तारीख जवळ आली तर त्यांनी मला फोन केला कुलकर्णी मी पुरस्कार स्वीकारणार आहे, पण ते भाषण वगैरे मला जमणार नाही. मी कधी असे लोकांसमोर बोललो नाही. तर ते जरा टाळता आले तर बघा. मी त्यांना समजावले गोखले आमच्याशी जे बोललात तेच सांगा लोकांना आवडेल. भाषण करावेच लागेल. होय नाही करता तयार झाले. परत एकदा माझ्या ऑफिसमध्ये आले म्हणाले भाषण लिहून आणलंय तुम्ही ऐका. मी ऐकले. छान लिहिले होते. त्यावर्षी जी चार भाषणे झाली त्यात गोखल्यांनी बाजी मारली. प्रत्यक्ष भाषण करताना लिहून आणलेले भाषण तसेच राहिले आणि फार उत्कट आणि उत्स्फूर्त बोलले. जेष्ठ विचारवंत विद्याताई बाळ अध्यक्षा होत्या त्या भान हरपून ऐकत होत्या. त्यांनी त्यांच्या भाषणात गोखल्यांचे मनापासून कौतुक तर केलेच, पण पुढे त्यांच्या ऑफिसमध्ये देखील जाऊन आल्या.
खरे म्हणजे गोखल्यांचे भाषण एव्हडे नितांत सुंदर झाले कारण, ते त्यांच्या मन्मनातून आले होते. आतून आले होते आणि ते सर्व श्रोत्यांच्या मन्मनात खोलवर भिडले. मनोहर गोखल्यांचा जीवनपट निरागस कर्मयोगी जीवन जगण्याचा एक वस्तुपाठ आहे.
श्रीकांत कुलकर्णी
९८५००३५०३७
Shrikaant.blogspot.com
Shrikantkulkarni5557@gmail.com
WhatsApp वरुन
गोपीनाथ सावकार यांनी संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात मराठी रंगभूमीवर सातत्याने संगीत नाटकं सादर केली. 'भावबंधन', 'शाकुंतल', 'सुवर्णतुला', 'ययाती देवयानी' अशा अनेक संगीत नाटकांचे दजेर्दार प्रयोग सादर करून त्यांनी संगीत नाटकाचा प्रेक्षक टिकवून ठेवायचा जवळ जवळ एकहाती प्रयत्न केला. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९१० रोजी झाला. ‘संगीत ययाती आणि देवयानी’ हे नाटक गोपीनाथ सावकार यांनी त्यांच्या ‘कलामंदिर’ या नाटय़संस्थेतर्फे २० ऑगस्ट १९६६ रोजी रंगभूमीवर आणले.
पहिला प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघाच्या रंगभूमीवर सादर केला गेला होता. गोपीनाथ सावकार गोव्याचे. धि गोवा हिंदु असोसिएशन या संस्थेचा सांस्कृतिक विभाग गोपीनाथ सावकार यांनीच सुरू केला. पु. भा. भाव्यांचं 'वीषकन्या' हे नाटक सावकार आपल्या संस्थे तर्फे’सादर करीत. यातली नीळकंठाची खलनायकी भूमिका त्यांनी अजरामर केली. आपल्या अभिनयाने त्यांनी रंगभूमीवर एक मानदंड निर्माण केला. आचार्य अत्रेंच्या 'उद्याचा संसार'मध्ये गोपीनाथ सावकार प्रमुख भूमिका करीत होते. शरीर मधुमेहाने पोखरलेलं होतं. पायाला इजा झालेली.
जखम चिघळत गेली, गॅंगरिन झालं. शेवटी पाय कापावा लागला. कुठच्याही नटाने आपली रिप्लेसमेंट तयार करा, असा सल्ला दिला असता. पण गोपीनाथ सावकार स्वत:च नाटक सादर करत होते. सांगणार कुणाला? आणि शरीरात भिनलेली नाटकाची झिंग शमवणार कशी? मागची पुढची तमा न बाळगता हा अवलिया कुबड्या घेऊन रंगमंचावर भूमिकेत उभा राहिला आणि त्यांनी ती भूमिका आपल्याला आलेल्या पंगुत्वाची फिकीर न करता शेवटपर्यंत उत्कृष्टपणे निभावून नेली. ही आठवण विजय तेंडुलकरांनी त्यांच्या 'कोवळी उन्हे' या सदरातल्या लेखात नोंदवून ठेवली आहे.
नाट्य-चित्रपट क्षेत्रातले ख्यातनाम अभिनेते अशोक सराफ हे गोपीनाथ सावकार यांचे भाचे.
संगीत रंगभूमीवर गायक नट म्हणून प्रतिष्ठा पावलेले प्रसाद सावकार हे पुतणे. अनेक संगीत नाटकांत उत्तम स्त्री पाटीर् नट म्हणून लौकिक मिळवणारे रघुनाथ सावकार हे त्यांचे चिरंजीव आणि शिष्यगणांत रामदास कामत, आशालता आणि अशा कित्येक हुन्नरी गायक कलावंतांचा भरणा होता. अशोक सराफ आणि सुभाष सराफ या गोपीनाथांच्या भाच्यांनी आपल्या मामांची कायमस्वरुपी आठवण राहावी म्हणून त्यांच्या नावे विश्वस्त निधी स्थापन केला आहे. या विश्वस्त निधीने अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या यशवंत नाट्य मंदिराला आणि पार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाला गोपीनाथ सावकारांच्या तैलचित्राची प्रतिमा दिलेली आहे.
गोपीनाथ सावकार स्मृती विश्व स्त निधीच्या वतीने गोपीनाथ सावकार स्मृती नाट्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. गोपीनाथ सावकार यांचे निधन १४ जानेवारी १९७३ साली झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
संगीत संशोधक आणि अभ्यासक विश्वास नेरुरकर यांनी संगीतकार वसंत देसाई यांची संपूर्ण कारकीर्द रसिकांना उपलब्ध करून दिली आहे. ग्रंथाचं नाव आहे, ‘वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’.
केवळ हिंदी चित्रपटसृष्टीचा विचार केला तर वसंत देसाई हे कधीच व्यावसायिकदृष्टय़ा आघाडीचे संगीतकार नव्हते. परंतु वसंतरावांच्या सांगितिक आयुष्याचा, हिंदी चित्रपट हा केवळ एक पैलू आहे. मराठी चित्रपट संगीत, नाटय़संगीत गैरफिल्मी संगीत असा त्यांच्या प्रतिभेचा व्याप मोठा आहे. अशा प्रत्येक क्षेत्रातील कामगिरीची विस्तृत माहिती मिळवून, त्याची वर्गवारी करून ते या ग्रंथात अतिशय आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले आहे. छायाचित्रांची नुसतीच संख्यात्मक रेलचेल नाही, तर ती चित्रे आणि त्यातील व्यक्ती पाहता पाहता अनेक दुर्मिळ क्षण जे कुठे कुठे विखुरले होते ते एकत्रितरीत्या गवसल्याचा आनंद मिळतो.
‘मराठी संस्कृती’चे जतन करण्यासाठी अलीकडे अनेकांचे हात शिवशिवत असतात, त्या सर्वाना असे ग्रंथ पाहिल्यावर ‘संस्कृती जतना’चा खरा अविष्कार म्हणजे काय, ते खरे तर लक्षात यायला हवे!
कलावंताला, त्याच्या चाहत्यांना, कलावंताच्या वारसांना त्या कलावंताच्या कामगिरीचे चीज झाले अशी भावना हा देखणा ग्रंथ पाहताना होते. वसंतरावांच्या कर्तृत्वाचा विभागवार आढावा घेणाऱ्या या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्यांच्या एकूण कारकीर्दीची ओळख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, सुहृदांनी सांगितलेल्या आठवणी आहेत. त्यात पुस्तकाचे संकलक, संपादक विश्वास नेरूरकर यांनी ‘टेल ऑफ द मिस्टिक मिन्स्ट्रल’ या १५ पानी प्रदीर्घ लेखात वसंत देसाई यांच्या संपूर्ण प्रवासाची ओळख करून दिली आहे. त्यात वसंतरावांच्या सुरुवातीच्या अभिनय प्रवासाची व संगीत कारकिर्दीची माहिती आहे.
लेखक, गीतकार गुलजार यांनी ‘गुड्डी’, ‘आशीर्वाद’ या चित्रपटांच्या वेळी आलेले आपले अनुभव अतिशय मोजक्या परंतु भावपूर्ण शब्दात व्यक्त केलेले आहेत. ‘गुड्डी’साठी वसंतरावांनी संगीतबद्ध केलेली ‘हमको मन की शक्ती देना’ ही प्रार्थना ए. आर. रहमानलासुद्धा स्तिमित करते, हे गुलजार यांनी आवर्जून नमूद केले आहे. वसंतरावांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बोले रे पपीहरा’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा आता पाहतोसी अंत’ या गाण्यांमुळे मराठी घरांमध्ये ‘सोयरी’ झालेल्या वाणी जयराम हिने अत्यंत आत्मियतेने वसंतरावांवर लेख लिहिला आहे.
‘आय वॉज लाईक ब्लॉटिंग पेपर, अॅाब्सर्बिग एव्हरीथिंग ही टॉट मी’ असे ती म्हणते तेव्हा वसंतरावांचे तिच्या कारकिर्दीतील स्थान अधोरेखित होते. विकास देसाई, वैजयंतीमाला, भालचंद्र पेंढारकर, सुलोचना चव्हाण, इनॉक डॅनिअल्स, डॉ. मंदार बिच्छू, जगदीश खेबुडकर, फैयाज, हेमंत पंडित, बाळ देशपांडे यांच्या लेखांमधून वसंतराव एक संगीतकार आणि एक व्यक्ती म्हणून म्हणून उलगडत जातात. चित्रपट संगीताचे आस्वादक-अभ्यासक राजू भारतन यांनी त्यांच्या ‘ही टय़ून्ड विथ गॉड’ या लेखात वसंतरावांच्या दैवी प्रतिभेचे मर्म उलगडून दाखविले आहे. गूंज उठी शहनाई, दो आँखे बारह हाथ, गुड्डी, रामराज्य यातील गाण्यांचे अतिशय सुंदर असे रसास्वादन त्यात आहे. ‘अमर भूपाळी’मधील ‘तुझ्या प्रीतीचे..’ हे गाणे ‘अर्धागिनी’मध्ये ‘बडे भोले हो’ असे नवे शब्द घेऊन कसे वेगळेच झाले, याचीही आठवण आहे.
विश्लेषण, माहिती आणि आठवणींनी भरलेली ही सव्वाशे पाने संपली की मग सुरू होतो लेखा-जोखा! त्यात पहिल्या भागात हिंदी चित्रपट भेटतात. १९४२ साली ‘शोभा’ या चित्रपटापासून सुरू झालेला संगीतकार म्हणून प्रवास १९७६ साली ‘शक’ या चित्रपटाशी थांबला तो वसंतरावांच्या अकाली अपघाती मृत्युमुळे. या दरम्यान त्यांनी संगीतबद्ध केलेले ५२ हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले तर ‘अमर समाधी’ आणि ‘कामदेव’ अप्रदर्शित राहिले. या चित्रपटांमधील कलावंत, गाणी, गायक असा सर्व तपशील यात आहे. याच पद्धतीने पुढील भागांमध्ये २१ मराठी चित्रपट (सात अप्रदर्शित मराठी चित्रपट), गुजराती, बंगाली चित्रपट, १४ संगीत नाटके, माहितीपट, गैरफिल्मी गीते, नृत्यनाटके यांची १९ तपशीलांसह नोंद आहे. समूहगानाच्या क्षेत्रात देसाई यांच्या अपूर्व योगदानाची व्यवस्थित दखलही घेण्यात आली आहे.
पुस्तकातील लेख आणि फोटोखालील ओळी इंग्रजीत तरी इतर सर्व तपशील आणि माहिती हिंदी/मराठी व इंग्रजीत देण्यात आली आहे. पुस्तकात सर्वत्र वसंतरावांचे विविध मूडस् टिपणारी आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व ठसठशीतपणे दाखविणारी छायाचित्रे आहेत. सहकाऱ्यांसमवेत गाण्यांची चर्चा करणाऱ्या भावमुद्रा आहेत. मासिकाच्या आकारातील पुठ्ठा बांधणीचे सुंदर मुखपृष्ठ, उत्तम दीर्घ-जीवी कागद आणि अप्रतिम छपाई यामुळे हे पुस्तक म्हणजे वसंतरावांच्या प्रतिभेला खरा सलाम ठरते.
‘जब तक सूरज चंदा चमके, गंगा जमूना मे बहे पानी’ असे टिकणारे संगीत यात बंदिस्त आहे. अशा प्रतिभावंतांचे संगीत या मातीत जन्मते, हेच ‘ऋणानुबंधांच्या सुरेल गाठी’सारखे असते, याचा प्रत्यय देणारे हे पुस्तक आहे! ‘वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’, संशोधन, संकलन, संपादन- विश्वास नेरूरकर, बिश्वनाथ चॅटर्जी, गायत्री पब्लिकेशन व स्वरयोग, पृष्ठे- ४०८, किंमत- ८०० रुपये!
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
संदर्भ.श्री.श्रीकांत बोजेवार
आज दिग्गज दिग्दर्शक व निर्माते यश चोप्रा यांची पुण्यतिथी
जन्म:-२७ सप्टेंबर १९३२
यशजींनी अभियंता बनावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती, लंडनला जाण्यासाठी त्यांचा पासपोर्टही बनला होता. मात्र नियतीला काही औरच मंजूर होते आणि ते चित्रपटसृष्टीत आले.
यश चोप्रा यांच्या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे गीत आणि संगीत. यश चोप्रा हे कवी असल्याने त्यांनी स्वत: कधीही उथळ दर्जाची गीते निवडली नाहीत. त्यामुळे सगळी इंडस्ट्री आनंद बक्षीची धूळ झाडत असतानाही चोप्रा यांनी साहिर लुधियानवीची साथसंगत कधी सोडली नाही.
बी. आर. चोप्रा आणि यश चोप्रा हे सख्खे भाऊ. सहायक दिग्दर्शक म्हणून यश चोप्रा यांनी आपल्या करिअरला सुरवात केली. १९५९ मध्ये "धूल का फूल‘ या चित्रपटाद्वारे त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. राजेंद्र कुमार व माला सिन्हा या कलाकारांना घेऊन त्यांनी हा चित्रपट बनविला. त्यानंतर "आदमी और इन्सान‘, "धरतीपुत्र‘, "वक्त‘ असे काही चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. १९६५ मध्ये त्यांचा 'वक्त' चित्रपट आला. बॉलीवूडमधील हा पहिला मल्टी स्टार चित्रपट होय. राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांना घेऊन बनविलेल्या "दाग‘ या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मितीत पाऊल टाकले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. १९७३ मध्ये त्यांनी यशराज चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली. "काला पत्थर‘, "चांदनी‘, "लम्हे‘, "दिल तो पागल है‘, "वीर झारा‘, "सिलसिला‘, "डर‘, "रब ने बना दी जोडी‘ अशा अनेक चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. तसेच "दीवार‘, "त्रिशूल‘ अशा काही अन्य निर्मात्यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्याबरोबर अनेक कलाकारांनी काम केले असले अमिताभ बच्चन हे त्यांचे आवडते कलाकार होते. "सिलसिला‘साठी त्यांनी अमिताभ बच्चन, जया भादुरी व रेखा यांना एकत्र आणले. त्या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. विविध आणि आकर्षक लोकेशन्स व सुमधुर गाणी ही त्यांच्या चित्रपटांची खासियत होती. दादासाहेब फाळके पुरस्कारासह पद्मभूषण, तसेच अन्य काही पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. यशजींनी पाच दशक चित्रपटसृष्टीवर राज्य केले. यादम्यान त्यांना ६ राष्ट्रीय व ११ फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. चित्रपटसृष्टीतील अतुल्य योगदानासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मा.यश चोप्रा यांचे २१ ऑक्टोबर २०१२ रोजी निधन झाले. यश चोप्रा यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.विकी पिडीया
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया।
‘हम दोनो’ चित्रपटातील या गाण्याच्या ओळीप्रमाणेच प्रत्यक्षातही बिनधास्त जीवन जगणाऱ्या सदाबहार देव आनंद यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ रोजी झाला.
देव आनंद यांना बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. लाहोरच्या कॉलेज मध्ये १९४२ मध्ये इंग्रजी साहित्यात ग्रॅज्युएशन केले. याच कॉलेजमध्ये त्यांची ओळख बलराज साहनी, बी. आर. चोपडा, आणि खुशवंत सिंह या भविष्यात खूप मोठ्या झालेल्या व्यक्तींशी झाली.शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी लष्कराच्या सेन्सॉर ऑफिसमध्ये कारकून पदावर नोकरी सुरू केली. सैनिक आणि त्यांचे नातलग यांच्यातील पत्रव्यवहार तपासणे आणि पत्र योग्य पत्त्यावर लवकर पोहोचवण्याची व्यवस्था करणे हे त्यांचे काम होते. अल्पावधीतच नोकरी सोडून त्यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. प्रभात कंपनीच्या हम एक है मधून चित्रपट सृष्टीतली कारकिर्द सुरू करणा-या देव आनंद यांना आधी मोठे अपयश पचवावे लागले. हम एक है आपटला. पुढे देव आनंद यांच्याच नवकेतन कंपनीचा अफसर हा चित्रपट देखील पडला. पण या अपयशाने न डगमगता चित्रपट सृष्टीत पाय रोवून उभ्या राहिलेल्या देव आनंद यांचा बाजी हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला. त्यानंतर उत्तरोत्तर देव आनंद यांनी अनेक छान चित्रपट दिले.
हम एक है, अफसर, बाजी, मुनीम जी, दुश्मन, कालाबाजार, सी. आय. डी., पेइंग गेस्ट, गॅम्बलर, तेरे घर के सामने, काला पानी, जाल, गाइड, तेरे मेरे सपने, छुपा रुस्तम, हरे रामा हरे कृष्णा, हिरा पन्ना, देश परदेस, लूटमार, स्वामी दादा, सच्चे का बोलबाला, अव्वल नंबर, हम दोनो आणि ज्वेल थीफ हे देव आनंद यांचे निवडक चित्रपट कायमच चर्चेचा विषय राहिले. देव आनंद यांची हम एक है चित्रपटाचे काम सुरू असतानाच गुरुदत्त यांच्याशी एक कॅमेरामन म्हणून ओळख झाली होती. पुढे ज्येष्ठ बंधू चेतन आनंद यांनी दिग्दर्शित केलेला अफसर चित्रपट पडल्यावर देव आनंद यांनी गुरुदत्त यांनाच दिग्दर्शकाच्या भूमिकेत आणले. नवकेतन कंपनीसाठी गुरुदत्त यांनी बाजी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा सिनेमा हिट झाला. त्यानंतर गुरुदत्त यांनीच देव आनंदसाठी जाल चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
जाल चित्रपटानंतर मात्र गुरुदत्त यांनी फक्त स्वतःच्या कंपनीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आणि देव आनंद यांच्या नवकेतन कंपनीच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी विजय आनंद यांच्याकडे आली. देव आनंद यांचे धाकटे बंधू विजय आनंद यांनी काला बाजार, तेरे घर के सामने, छुपा रुस्तम या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. याच काळात देव आनंद आणि सुरय्या विवाहाची चर्चा सुरू झाली. चित्रपट सृष्टीत वावरणा-या देव आनंद यांनी अभिनय आणि चित्रपट निर्मिती सोबतच पटकथा लेखन करण्याचाही प्रयोग केला. आंधिया, हरे रामा हरे कृष्णा , हम नौजवान, अव्वल नंबर, प्यार का तराना, गँगस्टर, मै सोलह बरस का, सेन्सॉर या चित्रपटांसाठी देव आनंद यांनीच पटकथालेखन केले. हिरा पन्ना, देश परदेस, लूटमार, स्वामी दादा, सच्चे का बोलबाला, अव्वल नंबर अशा निवडक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. अफसरच्या निमित्ताने देव आनंद-सुरय्या जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसली होती. तेव्हापासूनच देव आनंद सुरय्याच्या प्रेमात होते. पण सुरय्या आजीने तीव्र विरोध केल्यामुळे हे लग्न झाले नाही. अखेर देव आनंद १९५४ मध्ये चित्रपट अभिनेत्री कल्पना कार्तिक हिच्याशी विवाहबद्ध झाले.
देव आनंद यांनी अनेक नव्या अभिनेत्रींना चित्रपटसृष्टीत आणले. हरे रामा हरे कृष्णा मधून झीनत अमान चित्रपटसृष्टीत आली. टीना मुनीम, नताशा सिन्हा, एकता यांना देखील देव आनंद यांनी चित्रपटसृष्टीचे द्वार खुले करुन दिले. संगीतप्रधान हिंदी चित्रपटांतून रंगवलेल्या त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी यांमुळे उठून दिसणार्या् त्यांच्या फॅशनदार व्यक्तिमत्त्वाने चित्रपटरसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ग्रेगरी पेक या अभिनेत्याशी तुलना केली जाई. गीता बाली, वहिदा रेहमान, मधुबाला अशा अनेक नामवंत अभिनेत्रींसोबत त्यांनी अनेक चित्रपट केले.
देव आनंद यांची अनेक गाणी गाजली. तू कहा ये बता, देखे रूठा ना करो, दिल का भवर करे पुकार, गाता रहे मेरा दिल, मै जिंदगी का साथ निभा था चला गया, दिन ढल जाये, छोड दा ऑँचल अशी अनेक गाणी प्रचंड गाजली. देव आनंद यांना काला पाला सिनेमासाठी बेस्ट अॅक्टर फिल्मफेअर पुरस्कार १९५० व गाइड सिनेमासाठी बेस्ट अॅक्टर, फिल्मफेअर पुरस्कार १९६५ साली मिळाला. मा.देव आनंद यांना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार व पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. देव आनंद यांचे ३ डिसेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मुक्ता बर्वेचे वडील श्री वसंत बर्वे टेल्को कंपनीत नोकरी करत होते, तसेच आई विजया बर्वे या शिक्षिका तसेच नाट्यलेखिका होत्या. मोठा भाऊ देबू बर्वे कमर्शियल आर्टिस्ट आहे तसेच त्याने लहानपणी काही चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. तिचा जन्म १७ मे १९८१ रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथे झाला. रंगभूमीवरील मुक्ताची सुरुवात बालपणापासून झाली. मुक्तावर कलेचे संस्कार लहानपणापासून घरातूनच होत होते. मूळचा लाजाळू आणि बुजरा स्वभाव कमी व्हावा यासाठी मुक्ताच्या आई विजया बर्वे यांनी "रुसू नका फुगू नका" हे बालनाट्य लिहिले, यात भित्रा ससा आणि परी राणी अश्या दुहेरी भूमिका मुक्ताने साकारल्या. अश्या पद्धतीने वयाच्या चौथ्या वर्षी मुक्ताचे रंगभूमीवर पदार्पण झाले.
दहावीच्या परीक्षेनंतर "घर तिघांचे हवे" या रत्ना्कर मतकरी लिखित नाटकात मुक्ताने भूमिका साकारली. या नंतर नाटकाविषयी ओढ निर्माण झाल्याने त्यात करियर करायचे ठरविले. इयत्ता ११ आणि १२ वी चे शिक्षण सर परशुराम भाऊ कॉलेज पुणे येथे घेतले. यानंतर ललित कला केंद्र , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे नाट्य शास्त्र विषयात पदवी घेतली आणि सोबतच 'ड्रामा' या विषयातून तिने बॅचलर डिग्री सुद्धा मिळवली आहे. १९९९ मध्ये 'घडलंय बिघडलंय' या कार्यक्रमातून मुक्ताने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं. तिचं पहिलं नाटक होतं 'आम्हाला वेगळं व्हायचंय' आणि तिचा पहीला चित्रपट होता २००२ मध्ये प्रदर्शित झालेला 'चकवा' त्यासाठी तिला पदार्पणातच पुरस्कार मिळाला.
मुक्ता प्रामुख्याने मराठी भाषिक चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे. मुक्ताने काही हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. थांग, सावर रे, माती माय, एक डाव धोबी पछाड, बदाम राणी गुलाम चोर, ऐका दाजीबा, हायवे, मंगलाष्टक वन्स मोअर, जोगवा, मुंबई पुणे मुंबई, मुंबई पुणे मुंबई -२, डबल सिट असे एकापेक्षा एक सरस चित्रपट मुक्ताने दिले. मुक्ताने घर तिघांचं असावं, देहभान, फायनल ड्राफ्ट, छापा काटा, रंग नवा, इंदिरा इ. नाटकात काम केले आहे. तसेच पिंपळपान, बंधन, बुवा आले, चित्त चोर, आभाळमाया, अग्निशिखा, मधू इथे चंद्र तिथे या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे तिने केल्या आहेत. मुक्ता ने जोगवा ह्या २००९ सालच्या मराठी चित्रपटामधील भूमिकेसाठी मुक्ताचे कौतुक झाले व तिला ह्यासाठी काही पुरस्कार देखील मिळाले.
२०१२ मध्ये झी मराठी प्रदर्शित झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका मुक्ता बर्वेने केली होती. मुक्ताने महाराष्ट्र स्टेट फिल्म अॅवार्डचे उत्कृष्ट पदार्पणासाठी एक, व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून चार पुरस्कार जिंकले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti