१९५२ साली दत्ता धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ अखेर जमलं ‘ ह्या चित्रपटामध्ये ‘ बेबी जीवनकला ‘ म्ह्णून काम केले ह्या चित्रपटामध्ये सूर्यकांत, बेबी शकुंतला , वसंत शिंदे , राजा गोसावी , शरद तळवलकर यांनी भूमिका केल्या होत्या.
मा.रमेश मंत्री यांनी विपूल लेखन केले आहे. त्यांची शंभरपेक्षाही जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. `थंडीचे दिवस` सुखाचे दिवस, `नवरंग` इत्यादी त्यांची प्रवासवर्णन अतिशय वैशिष्टयपूर्ण ठरली आणि वाचकांच्या पसंतीत उतरली. त्यांनी प्रचंड लेखन केले.
डेगवेकर यांचे मूळ घराणे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. डेगवेकर यांचा जन्मही इथलाच. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९३४ रोजी झाला. इंग्रजी तिसरीपर्यंतचे त्यांचे शिक्षण श्रीवर्धन येथेच झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. गिरगाव येथील विल्सन हायस्कूल येथे त्यांचे पुढील शिक्षण झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ‘मॅट्रिक’ झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी छोटी-मोठी कामे केली. पुढे ‘सीटीओ’ (पोस्ट अॅाण्ड टेलिग्राफ)मध्ये त्यांना ‘फोनोग्राम ऑपरेटर’ म्हणून नोकरी लागली. ही नोकरी करत असतानाच के.सी. महाविद्यालयातून त्यांनी ‘इंटर’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. हरी डेगवेकर हे त्यांचे वडील. . त्यांना भजनाचे वेड होते. त्यामुळे घरात लहानपणापासूनच गाणी, भजने त्यांच्या कानावर पडत गेली आणि तोच संस्कार त्यांच्यावर झाला. लहानपणी वडिलांनी त्यांना छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमांतून अभंग म्हणण्यासाठी पाठविले. त्यामुळे स्टेजवर उभे राहण्याची, वावरण्याची त्यांची भीती लहानपणीच गेली. गणेशोत्सवात वेगवेगळ्या नाटकांतून त्यांनी कामेही केली. गिरगावातील गायवाडी येथील बंडोपंत रानडे यांच्याकडे ते काही काळ गाणेही शिकले. त्या वेळी काही संगीत नाटकांतूनही त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका केल्या होत्या.
चंडू डेगवेकर यांनी राज्य नाट्य स्पर्धेत मराठा मंदिर कला केंद्र या संस्थेने सादर केलेल्या आणि बाळ कोल्हटकर यांनी गाजविलेल्या ‘मुंबईची माणसे’ या नाटकातील ‘वसंत’ ही भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्यांना राज्य नाट्य स्पर्धेचे पारितोषिक व चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक मिळाले. त्यांची ही भूमिका ‘नाटय़संपदा’ या संस्थेच्या तीन मालकांपैकी एक असलेल्या मोहन वाघ यांनी पाहिली आणि त्याणी डेग्वेकरांचे नाव नाटककार विद्याधर गोखले यांना सुचविले आणि मला गोखले यांच्या ‘मदनाची मंजिरी’ या नाटकातील ‘चक्रदेव’ ही भूमिका मिळाली आणि येथूनच त्यांच्या व्यावसायिक रंगभूमीवरील कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. १९६७ मध्ये ‘ललितकलादर्श’चे भालचंद्र पेंढारकर यांनी त्यांच्या नाट्यसंस्थेत डेग्वेकरांना बोलाविले आणि ते ‘ललितकलादर्श’शी कायमचे जोडले गेले . 'पंडितराज जगन्नाथ' या १९६८ साली आलेल्या नाटकाद्वारे ते नट म्हणून ठळकपणे पुढे आले. या त्यांच्या पहिल्याच नाटकात त्यांनी कलंदरखाँच्या इरसाल भूमिकेत गायलेले 'इश्क के गहरे खतरे में बडे भी खा गये ठोकर' हे कव्वालीवजा पद प्रचंड दाद घेऊन जाई.पंडितराज जगन्नाेथमध्ये कलंदरखाँची भूमिका आधी शंकर घाणेकर करत असत. त्यांनी कंपनी सोडल्यानंतर 'ललितकलादर्श'च्या भालचंद्र पेंढारकरांच्या हाताला चंदू डेगवेकर नावाचा हिरा लागल्याने. डेग्वेकरांनी अगदी आयत्यावेळी पंडितराज जगन्ना'थ या नाटकातली भूमिका वठवली. पुढे 'बावनखणी' या नाटकापर्यंत चंदू डेगवेकर हे 'ललितकलादर्श'चे महत्त्वाचे नट होते. त्यांचा आवाज खणखणीत आणि पल्लेदार असून त्यांना त्यांना टायमिंगचे अत्युत्तम भान आणि संगीताची सुरेख जाण होती. त्यामुळे ते गद्य आणि पद्य दोन्ही प्रकारच्या भूमिकांत सारख्याच सफाईने फिरायचे. सुरेश खरे यांच्या 'रक्त नको मज प्रेम हवे' या गद्य नाटकात ते नायक होते.
'दुरितांचे तिमिर जावो'मधील मा. दत्ताराम आजारी पडल्यानंतर ते करीत असलेली भूमिका चंदू डेग्वेकरांनी पूर्ण जबाबदारीने निभावली. 'मदनाची मंजिरी'मधील चक्रदेव या पागल आशिकाची त्यांची भूमिका अतोनात गाजली. 'मंदारमाला' या विद्याधर गोखले यांच्या गाजलेल्या नाटकातील राम मराठे आणि प्रसाद सावकारांच्या जुगलबंदीत (बसंत की बहार) ते सावकारांचे चेले म्हणून शेजारी बसायचे आणि एक चीज तयारीच्या गायकाप्रमाणे अशी पेश करायचे की प्रेक्षक थक्क व्हायचे. 'जय जय गौरी शंकर' नाटकात ते 'नारायणा रमारमणा' आणि 'भरे मनात सुंदरा' ही पदे बहारीने पेश करायचे. त्यांनी 'सौभद्र'पासून 'स्वरसम्राज्ञी' पर्यंत जवळपास सगळीच संगीत नाटके केली, काही दिग्दर्शितही केली. ही सर्व नाटके त्यांना तोंडपाठ होती.
चंदू डेगवेकर हे दत्तारामांना आदर्श आणि अण्णा पेंढारकरांना आपले गुरू मानत असत.
डेगवेकर यांनी त्या काळात नोकरी सांभाळूनच सर्व नाटके, तालमी व प्रयोग केले. चित्रपटात काम करण्याविषयी त्यांना विचारणा झाली होती. पण चित्रीकरणासाठी अनेक दिवस मुंबईबाहेर जावे लागेल आणि नोकरी करत असताना ते शक्य होणार नाही म्हणून ते चित्रपटाकडे वळलेच नाहीत.
डेगवेकर यांनी आत्तापर्यंत सुमारे ५० संगीत, सामाजिक, ऐतिहासिक नाटके तसेच फार्समधून विविध भूमिका साकार केल्या आहेत. ‘शारदा’ (कांचनभट), ‘सौभद्र’ (बलराम), ‘मृच्छकटीक’ (शकार), ‘मानापमान’ (धैर्यधर), ‘मत्स्यगंधा’ (भीष्म), ‘स्वयंवर’ (शिशुपाल), ‘संशयकल्लोळ’ (फाल्गुनराव),‘भावबंधन’ (प्रभाकर व कामण्णा), ‘एकच प्याला’ (भगीरथ, शरद), ‘पंडितराज जगन्नाथ’ (कलंदर), ‘मंदारमाला’ (भैरव), ‘सुवर्णतुला’ (नारद), ‘जय जय गौरी शंकर’ (शृंगी), ‘स्वरसम्राज्ञी’ (भय्यासाहेब), ‘बावनखणी’ (मोरशास्त्री) ही डेगवेकर यांची गाजलेली संगीत नाटके. ‘दुरितांचे तिमीर जावो’मधील त्यांनी साकारलेला ‘बापू’ही गाजला. ‘बेबंदशाही’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘उद्याचा संसार’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘देव दिनाघरी धावला’, ‘अपराध मीच केला’, ‘साष्टांग नमस्कार’ आदी ऐतिहासिक, सामाजिक नाटकांतूनतसेच ‘गीत सौभद्र’, ‘महाश्वेता’ आदी संगीतिकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या. डेगवेकर यांना अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेच्या ‘जीवनगौरव’पुरस्कारासह गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे पुरस्कार, रंगशारदा संस्थेचा विद्याधर गोखले पुरस्कार, नाटय़ परिषद-पुणे यांचा केशवराव दाते पुरस्कार, गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार आदींनी सन्मानित करण्यात आले आहे. राज्य शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. नव्या पिढीकडून बसवून घेतलेली जुनी संगीत नाटके हे डेगवेकर यांचे सगळ्यात महत्त्वाचे काम आहे. विशेष म्हणजे ही नाटके बसविण्यासाठी, नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्या त्या संगीत नाटकातील विविध पात्रे, त्यांच्या भूमिका उलगडून दाखविण्यासाठी त्यांनी कोणताही आर्थिक मोबदला/मानधन आजवर कधीही घेतले नाही. त्यांच्या या निरलस व नि:स्वार्थी सेवेविषयी त्यांना विचारले असता डेगवेकर म्हणतात, संगीत रंगभूमीने मला मान-सन्मान, प्रतिष्ठा, यश, आर्थिक स्थैर्य असे सर्व काही दिले. संगीत रंगभूमीच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी कोणतेही आणि मराठी संगीत रंगभूमीचा वैभवशाली वारसा जपण्यासाठी मी हे काम केले. शिवरंजनी (पुणे), नादब्रह्म परिवार (चिंचवड), कलाद्वयी (पुणे), ऋतुरंग (डोंबिवली) आदी संस्थांसाठी मी जुनी संगीत नाटके नव्याने बसवून दिली.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. सुहासिनी कोरटकर यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४४ रोजीचा.
पं. त्र्यंबकराव जानोरीकर, श्रीमती नैना देवी हे त्यांचे गुरू होत. सूर-सिंगार संसद, मुंबई तर्फे त्यांना सुरमणी पुरस्कार तर गानवर्धन पुणेतर्फे स्वर-लय भूषण, संगीत शिरोमणी पुरस्कार, पूर्णवाद विश्वविद्या प्रतिष्ठानतर्फे संगीत मर्मज्ञ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
भेंडीबाजार घराण्याची गायकीचा वारसा पुढे नेत निगुनी या टोपणनावाने त्यांनी बंदिशींची रचना केली. आकाशवाणीच्या अ.भा.गांधर्व महाविद्यालयाची संगीताचार्य ही सर्वाच्च पदवी त्यांना बहाल करण्यात आली होती.डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे मंगळवार ७ नोव्हेंबर २०१७ रोजी पुण्यात निधन झाले.
डॉ. सुहासिनी कोरटकर यांची वेबसाईट
http://www.suhasinikoratkar.com/#!/page_Home
डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे गायन
https://www.youtube.com/watch?v=AcgChcpfeEk
https://www.youtube.com/watch?v=PGvytWN-eMs
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
बहुरंगी आणि बहुढंगी अशा मिष्कील व्यक्तिमत्त्वाच्या मोतीराम गजानन रांगणेकर उर्फ मो.ग.रांगणेकर यांची १९२४ साली संपादक या नात्याने कारकीर्द सुरू झाली. त्यांचा जन्म १० एप्रिल १९०७ रोजी झाला. वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी एक कवडी नसतानाही स्वत:चे साप्ताहिक काढले. ‘तुतारी’, ‘वसुंधरा’, ‘चित्रा’, ‘आशा’ ही त्यांची गाजलेली साप्ताहिके, त्याचप्रमाणे ‘अरुण’, ‘सत्यकथा’, ‘नाट्यभूमी’ ही त्यांची गाजलेली मासिके होत. संपादक या नात्याने नाना प्रकारचा मजकूर लिहिणे, व्यवस्थापक म्हणून जाहिराती मिळवणे, साप्ताहिकाचा प्रसार करण्यासाठी निरनिराळे मार्ग शोधणे यासाठी त्यांनी अफाट मेहनत घेतली. प्रत्येक अंकात काहीतरी नावीन्यपूर्ण, आकर्षक लेख असावेत यासाठी त्यांची धडपड असे. साप्ताहिकांसाठी बातम्या मिळविण्यासाठी नाटक कंपन्यांमधून फेरफटका मारत असल्याने रांगणेकरांनी झालेल्या ओळखींचा उपयोग करून नाटक कंपनी काढण्याचा विचार पक्का केला आणि ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेची स्थापना केली.
१९४० साली पहिले नाटक लिहिले त्याचे नाव ‘आशीर्वाद’. या नाटकाच्या निर्मितीच्या वेळी केशवराव दाते यांच्याशी मतभेद झाल्याने रांगणेकर नाटककाराबरोबर दिग्दर्शक म्हणूनही मान्यता पावले. आशीर्वाद, कुलवधू, नंदनवन, अलंकार, माझे घर, वहिनी, एक होता म्हातारा, कोणे एके काळी, मोहर इ. नाटके रांगणेकरांनी लिहिली आणि दिग्दर्शितही केली. याखेरीज ‘भटाला दिली ओसरी’ हे विनोदी नाटक तसेच ‘सीमोल्लंघन’ आणि ‘कलंकशोभा’ या कादंबऱ्याही लिहिल्या. ‘औटघटकेचा राजा’ या चित्रपटाची कथा लिहिली. ‘सुवर्णमंदिर’ हा संगीत बोलपट तयार केला. ग्रामोफोन रेकॉर्डस्च्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले. ते उत्तम चित्रकारही होते. चित्रकार हळदणकरांकडे त्यांचे चित्रकलेचे शिक्षण झाले होते. वयाच्या १५-१६ व्या वर्षी त्यांनी चित्ता फाइट म्हणून काढलेले चित्र पूर्वीच्या काड्यापेटीवर येत असे.
रांगणेकरांचे बहुरंगी व्यक्तिमत्त्व होते. नाट्यनिकेतन या संस्थेलाही नाट्यक्षेत्रात महत्त्वाचे स्थान निर्माण झाले होते. नट निर्माण करण्याचे एक पीठ अशी नाट्यनिकेतनची ख्याती होती. नाट्यनिकेतनच्या नाटकात काम करून अनेक नटनट्यांनी लौकिक संपादन केला होता. सध्या लोकप्रिय असलेला एकांकिका हा नाट्यप्रकार १९४७ सालीच रांगणेकरांनी नाट्यनिकेतनतर्फे प्रेक्षकांची अभिरुची वाढविण्यासाठी तीन एकांकिका सादर करून केला. १९६८ साली ४९ व्या नाट्यसंमेलनाचे मो. ग. रांगणेकर हे अध्यक्ष होते. मो. ग. रांगणेकर यांचे १ फेब्रुवारी १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ शुभदा दादरकर
चेतन आनंद हे देव आनंद आणि विजय आनंद यांचे जेष्ठ बंधू. त्यांचा जन्म ३ जानेवारी १९२१ रोजी लाहोर येथे झाला. देव आनंद आणि त्यांचे बंधू यांनी अनेक संस्मरणीय चित्रपट निर्माण करून ठेवले आहेत. अॅडव्होकेट पिसोरिलाल आनंद घराण्यात जन्मलेला चेतन आनंद यांनी लाहोर शासकीय महाविद्यालातून शिक्षण पूर्ण केल्यावर ते डेहराडूनचा डून स्कूलमधे शिकवू लागले. कथालेखनाची आवडच असल्याने त्यांना त्यांच्या कथेवर चित्रपट बनवण्याचा ध्येयाने मुंबईत घेऊन आली. त्यांची सम्राट अशोकवरील कथा ऐकून त्यावर चित्रपट बनण्याऐवजी दिग्दर्शक फणी मुजुमदार यांनी या देखणा, शार्प तरुणाला त्यांचा राजकुमार चित्रपटात नायकाची भूमिका ऑफर केली. अन अशाप्रकारे लेखक बनण्यास आलेले चेतन आनंद १९४४ साली राजकुमार या चित्रपटाचे नायक बनले. हा चित्रपट जरी तिकिटाचा खिडकीवर क्लीक झाला नाही तरी निराश न होता त्यांनी आता पटकथा लेखनाबरोबर दिग्दर्शनही करायचे ठरवले अन त्यातूनच ’नीचानगर’ या चित्रपटाची निर्मिती झाली. ज्यामुळे अभिनेत्री कामिनी कौशल पुढे आल्या. १९४६ मधील चेतन आनंद यांचा या चित्रपटाला आंतरराट्रीय कान्स चित्रपटमहोत्सवात सर्वोत्कृट चित्रपटाचा जागतिक सन्मान मिळाला. ज्याला प्रख्यात सतारवादक पं.रवीशंकर यांचे चे संगीत होते. आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपटमहोत्सवाचे नामकरण पुढे ग्रॅण्ड प्रिंक्स असे झाले. चेतन आनंद हे हाडाचा दिग्दर्शक होते. पुढे चित्रपटात काम करण्याच्या इराद्याने आलेला देव आनंदने आपला थोरला भावाच्या मदतीने १९४९ साली निर्मिती क्षेत्रात पर्दापण करुन नवकेतन चित्रसंस्थेची रीतसर स्थापना करुन या बॅनरतर्फे आपला ’अफसर’ याचित्रपटाची निर्मिती केली. ज्यात त्याच्याबरोबर सुरैया नायिका होती व चेतन आनंदचे दिग्दर्शन होते. हा चित्रपट चांगला चालला. ज्यामुळे प्रोत्साहित होऊन चेतन आनंद यांनीच नंतर नवकेतनचा ’टॅक्सी ड्रायव्हर’ आणि ’आँधिया' या चित्रपटाची निर्मिती केली. या दोन्ही चित्रपटांपैकी ’टॅक्सी ड्रायव्हर’ला चांगले यश मिळाले. नंतर मग गीताबालीसह नवकेतनचाच फंटुश हा देव आनंदचा चित्रपटही चेतन आनंद यांनीच दिग्दर्शित केला.
आपल्या कथाकल्पनेशी विचारांशी एवढेच नव्हे तर जीवनविषक तत्वज्ञानाशी एकनिष्ठ अन प्रामाणिक राहणाऱ्या चेतन आनंद यांचे पुढे नवकेतनशी जमू शकले नाही. कारण त्याच्याकडे देवआनंद सारखा पूर्णत: व्यावसायिक दृटिकोन नव्हता. तिकिटाचा खिडकीशी तडजोड ते कधीच करत नसल्याने अल्पावधीतच ते नवकेतनशी फारकत घेउन ते वेगळे झाले. एक उत्तम प्रतिभा शाली विचारवंत व सृजनशील दिग्दर्शकाचे त्याच्या विचारसरणीच्या आग्रहीपणामुळे कुणाशीच तसे पटणे अवघड होते. त्यांनी स्वत:ची स्वतंत्र चित्रसंस्था निर्माण केली. अन त्यांनी निर्मिलेला आणि दिग्दर्शित केलेला त्यांचा गाजलेला व नावाजलेला पुरस्कारप्राप्त चित्रपट म्हणजे १९६२ चा चिनी आक्रमणावर बेतलेला "हकीकत " हा चित्रपट होय आजच्या भाषेत त्यात तत्कालीन सर्व आघाडीचे व नवोदित कलाकार असल्याने तो मल्टीस्टार असूनही त्यात कलाकारांपेक्षा परिस्थितीला महत्व होते. बलराज सहानी, संजय, धम्रेद्र, जयंत, प्रिया राजवंश, विजय आनंद सारखे कलाकार व मदनमोहन यांची एकसे बढके एक सुरेल सुमधुर अजरामर गाणी. ज्यात 'कर चले हम फिदा जानेमन साथियो" या गाणाचा राट्रीय गीतांचा सन्मान मिळाला. या चित्रपटासाठी ते कितीतरी दिवस तयारी करत होते. याच दरम्यान देव आनंद "गाईड" चित्रपटाची तयारी करत होते अन या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा थोरला भावाने चेतन आनंद यांनी करावे अशी देवसाहेबांची उत्कट इच्छा होती. पण हकिकत चित्रपटाचे लडाख लेह भागात चित्रिकरणास नेमकी त्याच वेळेस संरक्षण खाताने परवानगी दिली. अन चेतन यांनी आपला "हकिकत" या ड्रीम प्रोजेक्टला सर्वोच्च प्राधान देत गाईड दिग्दर्शित करणास नकार दिला. पण "हकिकत" हा भव्य कृष्ण धवल चित्रपट सुरु करणापूर्वी त्यांनी "किनारे किनारे "हा जयदेव यांचा फक्त संगीतामुळे स्मरणात राहिलेला देवआनंद मिनाकुमारीचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यांच्या हिमालय प्रॉडक्शन हाउसतर्फे त्यांनी 'हकिकत'नंतर "आखरी खत",हसते जख्म, हिररांझा, हिंदुस्थानकी कसम, कुदरत, हाथोकी लकिर आदि चित्रपट निर्माण केले ज्यामध्ये केवळ प्रिया राजवंश हीच नायिका असायची. चेतन आनंद यांनी त्यानंतर जवळपास दशकभरानंतर ‘हिंदुस्थान की कसम’ या युद्धपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले. पण मदन मोहन यांचे संगीत वगळता त्या चित्रपटात फारसा थरार नव्हता. त्यांच्या अखेरच्या पर्वात त्यांनी "जानेमन व साहेबबहादूर हे त्यांच्या नावलौकिकाला न शोभणारे चित्रपट दिले. "परमवीर चक्र" ही त्यांची दूरदर्शन मालिकाही याच काळात त्याना चांगले यश देउन गेली.
नवकेतनचा "कालाबाजार"मधे प्रथमच चेतन आनंद, विजय आनंद व देव आनंद हे तिघे बंधू एकत्र चमकले. ज्यात चेतन आनंद यांनी एका निष्णांत वकिलाची भूमिका केली होती. तर गोल्डीने एका पळपुट्या प्रियकराची ..
चेतन आनंद हे त्यांच्या’ हकीकत’ या सिनेमासाठी या कथेला सूट होईल अशी नायिका ते शोधत होता. योगायोगाने गाठ पडलेल्या प्रिया राजवंश यांचे व्यक्तीमत्व त्याला खूप भावलं. त्यांनी थेट तिच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्या सिनेमासाठी साईन केले. याचकाळाच चेतन आनंदच्या विवाहित आयुष्यात ब-याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याची पत्नी उमा पासून ते विभक्त झाला होते. प्रिया राजवंश यांनी केवळ अभिनयच नव्हे तर कथा, पटकथा, संवाद आणि संकलन या सर्व कामात चेतन आनंद यांना मदत केली. त्यामुळे हकीकतच्या चित्रीकरणादरम्यान या दोहोंत जवळीक वाढली. त्या दोघांच्या वयात बावीस वर्षांचे अंतर असूनही त्यांचे एकमेकावर निस्सीम प्रेम केले. वयातले अंतर त्यांच्या प्रेमात अडसर ठरले नाही. चेतनचे तिच्यावर प्रेम असले तरी इंडस्ट्रीत त्यांच्या नात्यास त्याने चर्चेचा विषय होऊ दिले नाही. त्या दोघांचाही लुक काहीसा ऑफबीट असल्याने त्यांच्या जोडीत विजोडपणा कधी वाटला नाही. ‘हकीकत’नंतर प्रिया आणि चेतन एकत्र राहू लागले होते. या दोघांनी लग्न केले नाही. मात्र बॉलिवूडमध्ये त्यांना पती-पत्नी म्हणूनच ओळखले जात होते. ‘हकीकत’नंतर प्रिया राजवंश यांना अनेक ऑफर आल्या. चेतन आनंद यांनी हयात असेपर्यंत त्याच्या प्रत्येक चित्रपटात प्रिया राजवंश यांना रोल दिले. चेतन आनंद यांनी हकीकत, आखरी खत, हीर राँझा, हसते जख्म असे चित्रपट दिले. चेतन आनंद यांचे चिरंजीव केतन आनंद यांनी टूटे खिलौने हा चित्रपट आणि काही लघुपट तयार केले. चेतन आनंद यांच्या सर्व चित्रपटाना मदनमोहन यांचे संगीत व कैफी आझमी यांची गीतरचना असे. त्यांचे चित्रपट अत्यंत तरल,भावदर्शी व वास्तवाचे भान न हरपू देताही विलक्षण काव्यात्मक असत. मग तो "हिर रांझा"असेल वा "हसते जख्म..नीचानगर त्यांच्या "हकिकत"या चित्रपटाला १९६५ मधे सर्वोत्कृट चित्रपटाचा व्दितीय क्रमांकाचा राट्रीय सन्मान मिळाला. चेतन आनंद यांचे ६ जुलै १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ दिलीप कुकडे
जगातील सर्वात प्रतिष्ठेचे मानले गेलेले नोबेल पारितोषिक स्विडीश शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिले जाते. आल्फ्रेड नोबेल यांचा जन्म १३ ऑक्टोबर १८३३ रोजी स्टॉकहोम येथे झाला. त्यांचा मृत्यू १० डिसेंबर १८८६ रोजी झाला.
आल्फ्रेड नोबेल यांनी सैन्याच्या कामासाठी डायनामाईटचा शोध लावला. युद्धाबरोबरच खाणी, रस्ते तयार करण्याच्या कामातही त्याचा वापर होऊ लागला.
नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते व आल्फ्रेडने स्वत शालेय शिक्षण खाजगी शिक्षकांकडून घेतले.यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असले तरी आफ्रेडला रासायनिक संशोधनात रस होता. भरीस वडील बंधूचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू ओढवल्यावर आल्फ्रेडने स्वतला सुरक्षित स्फोटके शोधण्यासाठीच्या संशोधनाला वाहून घेतले व पुढे डायनामाइटचा शोध लावला.
डायनामाइटच्या शोधामुळे नागरी तसेच लष्करी बांधकामे करणे सुलभ झाले. यातून नोबेलने गडगंज संपत्ती मिळवली. आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त होत असल्याचे व त्यामुळे आपण स्वत: इतरांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे शल्य नोबेलच्या मनाला सलत होते. त्या कारणाने आल्फ्रेड नोबेलने दहा लाख स्विडीश क्रोनरचा निधी देऊन ट्रस्ट स्थापन केला व जगातील उत्तमोत्तम संशोधकांना व शांतिदूतांना त्यातून पारितोषिक देण्याचे सुरू केले. हे पारितोषिक म्हणजेच नोबेल पारितोषिक होय.
नोबेल यांना विज्ञानाबरोबरच साहित्य, कला, शांतिकार्य या क्षेत्राचीही आवड होती. विविध क्षेत्रातील व्यक्तींचा योग्य बहुमान व्हावा असे त्यांना वाटे. त्यामुळेच त्यांनी मृत्यूपत्र लिहतांना नोबेल पारीतोषिकाची व्यवस्था केली. त्यांनी आपल्या उत्पादनाच्या ९४ टक्के रक्कम या विविध पुरस्कारांसाठी राखून ठेवली.
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १९०१ पासुन हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. शांतिकार्य, साहित्य, पदार्थविज्ञन, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र व अर्थशास्त्र ह्या विषयात संशोधन करणार्यांना नोबेल पुरस्कार दिले जातात.
-- मराठीसृष्टी टिम
शब्दांचे जादूगार, अंधारावर ममत्वाचा अधिकार गाजवणारे आणि कवितेला "सखी' म्हणून आपल्या अस्तित्वातच सामावून घेणारे कवी म्हणजे सुधीर मोघे. त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९३९ रोजी सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे झाला.खरे म्हणजे ते एक कवीच पण आपल्या कवितेची अभिव्यक्ती इतर माध्यमातून करायला देखील मागे राहिले नाहीत आणि म्हणूनच त्यांनी गीतकार, संगीतकार, लेखक, चित्रकार, लघुपट निर्माते, दिग्दर्शक अशा अनेक भूमिकातून आपले कवित्व मांडले. सुधीर मोघे यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कविता लेखनास सुरुवात केली. १९७२ मध्ये ते पुण्यात कायमच्या वास्तव्यास आले. तेव्हा त्यांनी ‘स्वरानंद प्रतिष्ठान’च्या ‘आपली ओळख’ या कार्यक्रमातून निवेदनास सुरुवात केली. स्वरानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून भावगीतांचा कोश तयार करण्याचे काम मोघे यांनी हाती घेतले होते. कोश जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गवर होता. आपल्या निवेदन शैलीतून त्यांनी निवेदनाचा मापदंड उभा केला. दरम्यान, त्यांचे ‘नक्षत्रांचे देणे’ व ‘स्मरणयात्रा’ हे दोन कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाले. प्रत्येक वर्षी किमान एक चित्रपट करावा अशी त्यांची अपेक्षा होती.
चित्रपट गीतलेखन, संगीत दिग्दर्शन, ललित लेखन, पटकथा व संवाद लेखन, रंगमंचीय आविष्कार अशा अनेक प्रांतांत आपला ठसा उमटवला. सहजसुंदर शब्दरचना करणारे कवी-गीतकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे ‘आत्मरंग’, ‘गाण्याची वही’, ‘पक्ष्यांचे ठसे’, ‘लय’, ‘शब्द धून’, ‘स्वतंत्रते भगवती’ असे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांसाठी गीतलेखन केले. तसेच त्यांनी अनेक गाण्यांना संगीतही दिले. दूरदर्शन व आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले. फिटे अंधाराचे जाळे, सांज ये गोकुळी, एकाच या जन्मी जणू, रंगुनी रंगात सा-या, गोमू संगतीनं, आला आला वारा अशी एकापेक्षा एक सरस गीते त्यांनी लिहिली.
साहित्य व संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांनी तब्बल चार वेळा पटकावला होता. नाट्यअभिनेते मा.श्रीकांत मोघे हे सुधीर मोघे यांचे थोरले बंधू.
सुधीर मोघे यांचे निधन १५ मार्च २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
सुधीर मोघे यांच्या कविता संग्रह: ‘आत्मरंग’, ‘गाण्याची वही’, ‘पक्ष्यांचे ठसे’ - ३ हून अधिक आवृत्त्या, ‘लय’ - एकाहून अधिक आवृत्त्या, ‘शब्द धून’, ‘स्वतंत्रते भगवती.’ गद्य : ‘अनुबंध’, ‘गाणारी वाट’, ‘निरांकुशाची रोजनिशी.’ सुधीर मोघे यांचे चित्रपट गीते
‘आत्मविश्वास’, ‘एक डाव भुताचा’, ‘कळत-नकळत’,‘चौकट राजा’, ‘जानकी’, ‘पुढचं पाऊल’, ‘राजू’, ‘लपंडाव’, ‘शापित’, ‘सूर्योदय’,‘हा खेळ सावल्यांचा.’ संगीत दिलेली गीते : ‘अज्ञात तीर्थयात्रा’, ‘भन्नाट रानवारा मस्तीत शीळ’, ‘भेटशील केव्हा माझिया जीवलगा’, ‘माझे मन तुझे झाले’,‘रंगुनी रंगात सार्या.
सुधीर मोघे यांचे संगीत दिग्दर्शन ‘कशासाठी प्रेमासाठी’ (मराठी चित्रपट), ‘सूत्रधार’ (हिंदी चित्रपट), ‘स्वामी’, ‘अधांतरी’, ‘नाजुका’ (मराठी मालिका), ‘हसरतें’, ‘डॉलर बहू’, ‘शरारते’ (हिंदी मालिका).
माझे वडील पूज्य पंडित विष्णू चिंचोरे हे त्यांच्या काळातील नामवंत शिक्षक होते ! पुणे येथील डेक्कन जिमखान्यावरील भांडारकर रोडवर असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर शाळेचे, जून १९३६ ते ३१ मे १९६१ ह्या कालावधीमध्ये ते मुख्याध्यापक होते. पुढे १ जून १९६१ ते ३० सप्टेंबर १९७५ या कालावधीमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेचे ते मुख्याध्यापक होते !
"चिंचोरे गुरुजी" ह्याच नावाने ते ओळखले जायचे ! गोष्टीरूप इतिहास शिकवण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. गणित विषयाची भीती, मुलांच्या मनातून कायमची काढून टाकण्यात ते वाकबगार होते. भाषेचे धडे शिकविताना ते चित्ररूपी भाषेतील वर्णन करून सांगायचे तर प्रत्येक कविता ते चालीमध्ये म्हणून दाखवित असत, आपोआपच मुलांच्या कविता तोंडपाठ होत असायच्या. स्कॉलरशिपचे वर्ग ते वर्षानुवर्षे घेत होते !
चिंचोरे गुरुजींच्या शिकवण्याच्या हातोटीचे अनेक दाखले, त्यांचे विद्यार्थी ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे ह्यांनी त्यांच्या वपुर्झा, गुलमोहर, रंगपंचमी, ककचीक अश्या अनेक पुस्तकाद्वारे वाचकांसमोर दिले आहेत. तसेच १७ मार्च १९८२ रोजी मुंबई दूरदर्शन वरून सादर झालेल्या, "आमची पंचविशी" ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, व. पुंनी आपल्या लाडक्या चिंचोरे गुरुजींच्या अनेक हृद्य आठवणी साध्यंत कथन केल्या होत्या !
माझ्या वडिलांच्या काही विद्यार्थ्यांची नावेच पाहा ना, ज्यांनी आपल्या यशोगाथेचे सर्व श्रेय मुक्तकंठाने आपल्या चिंचोरे गुरुजींना आदरपूर्वक दिले आहे :
भारताचे एअर मार्शल भूषण गोखले, ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे, ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया, ब्रिगेडिअर विजय खांडेकर, ब्रिगेडियर सदाशिव जावडेकर, डायबेटीस स्पेशलिस्ट डॉ. सुभाष काळे, कँसरतज्ज्ञ डॉ. पुष्पाताई शिरोळे, विख्यात निर्माते व्ही.शांताराम ह्यांचा पुतण्या व्हणकुद्रे. रोहिणी भाटे, ज्योत्स्ना भोळे ह्यांचा मुलगा सुहास केशव भोळे, अभिनेते विक्रम गोखले, मनीषा साठे, डॉ ओतूरकर, विद्युत बापट, दिलीप जोशी, जयंत दामले (मॅनेजमेंट कन्सलटंट) डॉक्टर माधव कवडे, अल्हाद धर्माधिकारी, चारू रानडे, नीता, पुष्पा पुजारी भगिनी, मेधा पंडित, सुरेखा गायधनी-पेठे, दिलीप दाणी, जयंत मालशे, जयंत झेंडे, चंद्रशेखर म्हैसकर, ही यादी फार मोठी आहे ….
विशेष म्हणजे ह्या तमाम विद्यार्थीगणांनी आपल्या लाडक्या चिंचोरे गुरुजींना आजही लक्षात ठेवलेय, ते तसा आवर्जून उल्लेख करतात, ह्यामाध्येच चिंचोरे गुरुजींच्या पवित्र शिक्षकी पेशाचे चीज झाले, असे मी आदरपूर्वक म्हणतो, माझ्या सर्व ज्ञात-अज्ञात गुरु बंधू-भगिनींना माझा मनोभावे नमस्कार,
वरून कडक शिस्तीचे दिसणारे चिंचोरे गुरुजी आतून मात्र खूप हळवे होते. व. पु. काळे, उद्योगपती अरुण फिरोदिया, जेंव्हा माझ्या वडिलांच्या अखेरच्या आजारपणात भेटायला घरी आले, तेव्हां सर्वजण जुन्या आठवणीत रमले. त्यावेळी चिंचोरे गुरुजींनी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांच्या आठवणी नावासह सांगितल्या, संग्रहामधील जुने फोटो दाखविले, तेव्हां तर सर्वजण भावुक झाले होते. व पु काळे जेव्हां बोलत होते, तेव्हां मी म्हणालो, "बापू, "शिक्षक" शब्दाची व्याख्या अशी करता येईल कां ? शिकविण्याच्या क्षमतेचा कलावंत म्हणजे शिक्षक", माझे वाक्य पूर्ण होताच, व पुंनी मला टाळी दिली ! एअर मार्शल बी एन गोखले सर तर अभिमानाने सांगतात, "आम्हांला चिंचोरे गुरुजींनी घडवलं" डायबेटीस स्पेशलिस्ट डॉ. सुभाष काळे ह्या त्यांच्या विद्यार्थ्याने तर, चिंचोरे गुरुजींना एकवीस वर्षे विनामोबदला औषधोपचार केले, मी काही बोललो, कि ते म्हणायचे, "उपेंद्र, गुरुजींची सेवा, हीच माझी गुरुदक्षिणा आहे"! ज्येष्ठ उद्योगपती श्रीमान अरुण फिरोदिया ह्यांना पद्मश्री जाहीर होताच, त्यांनी मुलाखत कर्त्यांना आपल्या यशाचे श्रेय माझ्या आई वडिलांना आणि चिंचोरे गुरुजींना असल्याचे जाहीर केले. टीव्ही वर मी जेव्हां हे ऐकले, पाहिले तेव्हां माझे डोळे भरून आले. मी त्यांना लगेच फोन केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे घरी जाऊन नमस्कार केला, तेव्हां त्यांनी माझ्या वडिलांच्या अनेक आठवणी कथन केल्या होत्या. धन्य ते शिक्षक आणि धन्य ते कृतज्ञ विद्यार्थी !
मॅनेजमेंट कन्सलटंट जयंत दामले आणि मोहन कानडे, हे त्यांचे विद्यार्थी आजही साठ वर्षांपूर्वीच्या, चिंचोरे गुरुजींच्या शालेय सहल नियोजनाच्या आठवणी सांगतात ! डॉ उषा केळकर वय वर्षे फक्त सत्याऐंशी, चिंचोरे गुरुजींनी, गीतेचा पंधरावा अध्याय कसा पाठ करून घेतला, ह्याविषयी त्यांच्या लेखात सांगतात. डॉ सुमन करमरकर (सध्याचे वय ८७) ह्या चिंचोरे गुरुजींच्या शब्दसंग्रहाचे वर्णन करतात. हो, शब्दकोडी पटापट सोडविण्यात ते तरबेज होते. महाराष्ट्र कोश मंडळ लि. पुणे, ह्यांनी १९३५-१९३६ मध्ये सात खंड प्रसिद्ध केले होते. पीवायसी ग्राउंड जवळ राहणारे कर्नल के जि घारपुरे साहेबांनी ते सातही खंड त्याकाळी चिंचोरे गुरुजींना भेट दिले होते. आजही ते खंड म्हणजे माझा जीव कि प्राण आहेत ! ह्या कर्नल घारपुरे साहेबांचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे त्याकाळी शाळेच्या संमेलनाची अनेक छायाचित्रे त्यांनी स्वतः टिपलेली होती, जी आजही माझ्या संग्रहामध्ये आहेत, ह्या पोस्टवर टाकलेले छायाचित्र हे त्याचेच सर्वोत्तम उदाहरण आहे !
शिक्षणतज्ज्ञ वि वि चिपळूणकर सरांच्या हस्ते जेव्हां चिंचोरे गुरुजींचा "शिक्षक दिनी" सन्मान झाला, तेव्हां ते म्हणाले होते, "पंडित" हे नाव सार्थ करणारे "पंडित विष्णू चिंचोरे गुरुजी" ! महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालिका डॉक्टर चित्राताई नाईक ह्यांच्या शुभहस्ते चिंचोरे गुरुजींचा "आदर्श शिक्षक" हे बिरुद अर्पण करून पुणे येथे १७ ऑगस्ट १९७३ रोजी सन्मान करण्यात आला होता !
माझी आईनं त्याकाळी गाण्याचं नियमित शिक्षण घेतलं होतं ! आमचे नातेवाईक होसिंग काकांनी त्यांची बेल्ज्यियम सुरांची पेटी माझ्या आईला भेट दिली होती. चिंचोरे गुरुजीही पेटी वाजवायचे, "तुला रं गाड्या भीती कशाची" हे गाणं ते पेटीवर वाजवायचे आणि आम्ही भावंडं ते ऐकत, त्यांच्या पुढ्यात बसायचो !
तिथीने चंपाषष्ठीला आणि तारखेनी ३ डिसेंबर रोजी चिंचोरे गुरुजींची जयंती आहे, आज सात मे रोजी त्यांची ३३ वी पुण्यतिथी आहे,
-- उपेंद्र पंडित चिंचोरे
वेगवेगळ्या भूमिकांनी रुपेरी पडदा गाजविणारे बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी यांनी मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बोमन यांनी त्याच्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवुडमध्ये आज त्यांनी त्यांच्या अभिनयाने आपले प्रस्थ निर्माण केले आहे.
चतुरस्त्र बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी यांचा जन्म २ डिसेंबर १९४९ रोजी झाला बोमन इराणी बॉलिवुडमध्ये फोटोग्राफी करत होते पण त्यांचा कल हा अभिनयाकडे होता. अभिनयक्षेत्रात जाण्याचा ते नेहमीच विचार करत होते. मुन्नाभाई एमबीबीएस हा त्यांचा पहिला चित्रपट या चित्रपटातील काम आवडल्यामुळे निर्मात्यांचे, दिग्दर्शकांकडून अनेक कामे मिळाली. बोमन इराणी हे मा.बलराज सहानी, मा.अमिताभ बच्चन यांचे फॅन आहेत. बोमन इराणी मा.अमिताभ बच्चन यांच्या बद्दल म्हणतात. अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट मी अनेकवेळा पाहिले आहेत. त्यांच्यासोबत काम करायला मिळणे ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. त्यांच्यासोबत मी केवळ कामच केले नाही तर भूतनाथ या चित्रपटाच्या पोस्टरवर त्यांच्यासोबत मी झळकलो होतो. आपण ज्या व्यक्तिचे चाहते आहोत, त्याच्यासोबत चित्रपटात काम करण्याचा, त्यांच्यासोबत पोस्टरवर झळकण्याचा आनंद मी शब्दांत व्यक्तच करू शकत नाही. अनेकवेळा हे सगळे खरे आहे का? मी कोणत्या स्वप्नात तर नाही ना असा मी विचार करतो.
बोमन इराणी यांचे काही चित्रपट
मैं हूं ना, लगे रहो मुन्नाभाई, दोस्ताना, खोसला का घोंसला, वक्त, नो एंट्री, थ्री इडियट्स वीर-जारा, मैंने गांधी को नहीं मारा, लक्ष्य, हनीमून ट्रैवल्स प्रा. लि. सॉरी भाई,पेज-3 ,माई वाइफ्ज मर्डर, फरारी की सवारी.
नुकताच मराठीत आलेला 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात डॉक्टर श्रॉफ यांच्या भूमिकेत बोमन इराणी यांनी धमाल उडवली आहे.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti