(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • जेष्ठ संगीतकार वसंत देसाई

    वसंत देसाई यांचे बालपण कोकणात गेले. त्यांचा जन्म ९ जून १९१२ रोजी सोनवाड, सावंतवाडी येथे झाला. काही तरी वेगळे करण्याची उर्मी त्यांना कोल्हापुरात घेऊन आली. कोल्हापुरात प्रभातमध्ये असतांना पडेल ते काम करीत असत. त्यांचे आयुष्य घडण्याला येथेच सुरुवात झाली. देवल क्लबमधे असतांना अल्लादियां खॉं व मंजी खॉं यांसारख्याचे गाणे ऐकून त्यांचे कान तयार झाले. अयोध्येचा राजा तील पहिली नांदी ही नाटकातल्या नांदीप्रमाणे होती. या नांदीमध्ये वसंत देसाईंचा आवाज होता. म्हणजेच बोलपटांची सुरुवात देसाईंच्या आवाजाने झाली असे म्हणता येईल. त्यांनी सुरुवातीला अनेक हिंदी चित्रपटांमध्ये गीते गायली.

    प्रभातमध्ये संगीत, पार्श्र्वसंगीत देण्यास सुरुवात झाली होती. संत ज्ञानेश्र्वरमधील गाडीवानाची भूमिका, संगीतासाठी बैलांचे खूर व बैलगाडीचा आवाज, विविध पक्ष्यांचे आवाज, ग्रामीण वाद्यांचा सुयोग्य वापर... वसंत देसाई यांच्या कारकीर्दीतील अशा अनेक गोष्टी सांगता येतील. केशवराव भोळे, गोविंदराव टेंबे, कृष्णराव हे प्रभातचे सुरुवातीचे संगीत दिग्दर्शक. त्यांच्या हाताखाली वसंत देसाई तयार झाले. पुढे ते शांतारामबापूंबरोबर राजकमलमध्ये आले. त्यांच्या पहिला स्वतंत्रपणे संगीत दिलेला चित्रपट होता नायिका जयश्रीचा शकुंतला(हिंदी).

    राजकमलच्या ह्या शकुंतलाने उत्पन्नांचे सर्व रेकॉर्डस् मोडले. पहिला तमाशाप्रधान चित्रपट राम जोशी मधील ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या लावण्यांना वसंतरावांनी फक्कड चाली दिल्या. कवी होनाजी बाळा यांच्या जीवनावर काढलेल्या `अमरभूपाळी' ह्या चित्रपटातील घन:श्याम सुंदरा ही भूपाळी अप्रतिम स्वररचनेमुळे खरोखरच अमर झाली आहे.

    अभिजाततनेने ओतप्रोत भरलेल्या नृत्यांवर आधारित झनक झनक पायल बाजे चे संगीत वसंत देसाईंनी अजरामर केले आहे. त्यांनी त्यासाठी भारतांतील वेगवेगळ्या प्रांतांमधे प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा अभ्यास केला. पं. शिवकुमार शर्मा, पं. सामताप्रसाद, सुदर्शन, गोपीकृष्ण व मृदुंगवादक रामदास या सर्वांना त्यांनी राजकमलमध्ये पाचारण केले. झनक झनकने अफाट यश संपादन केले. त्यांची कीर्ती सगळीकडे झाली. आचार्य अत्रे यांनी १९५६ मध्ये काढलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाचे संगीत वसंत देसाईंचे होते. कवी यशवंत यांची आई ही अतिशय भावूक, करुण कविता त्यांनी स्वरबद्ध केली. श्यामची आई मध्ये ६ गाणी होती. मराठमोळे वातावरण निर्माण करणारे अप्रतिम पार्श्र्वसंगीत त्यांनी या चित्रपटास दिले. म्हणूनच या चित्रपटाच्या यशातील मोठा वाटा वसंतरावांकडे जातो.

    वसंत देसाईंनी एकूण २० मराठी चित्रपटांना संगीत दिले. छोटा जवान मधील माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू हे गाणे किंवा मोलकरीण मधील देव जरी मज, दैव जाणिले कुणी ही गाणी सर्वश्रृत आहेत. इये मराठीचिये नगरीतील गीतांसाठीचे संगीतही प्रसंगानुरूप होते. त्यांनी पाठ्यपुस्तकांतील अनेक कवितांना या बाई या, देवा तुझे किती, माझ्या मामाची रंगीत गाडी, लेझिम चाले जोरात, घाल घाल पिंगा वार्या, आनंदी आनंद गडे इत्यादी कवितांना - सोप्या, सुंदर चाली दिल्या. शास्त्रीय रागांवर आधारीत असंख्य गाणी त्यांनी हिंदी -मराठीतून दिली. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांना त्यांनी चित्रपट माध्यमात आणले.

    वसंत देसाई यांनी ‘गुड्डी’ चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं ‘हमको मनकी शक्ती देना’ हे प्रार्थना गीत गेली अनेक वर्षे देशभरातल्या शाळांमधून गायले जाते. वसंतरावांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बोले रे पपीहरा’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा आता पाहतोसी अंत’ या गाण्यांमुळे मराठी घरांमध्ये वाणी जयराम प्रसिद्ध झाल्या. गूंज उठी शहनाई, दो आँखे बारह हाथ, गुड्डी, रामराज्य यातील गाण्यांचे अतिशय सुंदर असे रसास्वादन त्यात आहे. ‘अमर भूपाळी’मधील ‘तुझ्या प्रीतीचे..’ हे गाणे ‘अर्धागिनी’मध्ये ‘बडे भोले हो’ असे नवे शब्द घेऊन कसे वेगळेच झाले, याचीही आठवण आहे. समूहगानाच्या क्षेत्रात देसाई यांच्या अपूर्व योगदानाची आहे.

    ‘जब तक सूरज चंदा चमके, गंगा जमूना मे बहे पानी’ असे टिकणारे वसंत देसाई यांनी संगीत दिले आहे. जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळचे ’जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकर यांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. १९४२ ते १९७६ या कालावधीत मा.वसंत देसाई यांनी एकूण ४६ चित्रपटांना उत्कृष्ट संगीत दिले. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. वसंत देसाई हे १९७३ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी काही चित्रपटांत भूमिकाही केल्या होत्या. हिंदी व मराठी चित्रपटांमधे स्वत: गायलेली उत्तम गाणी त्यांनी दिली.

    १९६० ते १९७५ मध्ये संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करून त्यांना संगीत दिले. त्यांनी १३ लघुपटांनाही संगीत दिले. वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’ या नावाने पुस्तक लिहून श्री.विश्वास नेरुरकर यांनी संगीतकार वसंत देसाई यांची संपूर्ण कारकीर्द रसिकांना उपलब्ध करून दिली आहे. www.vasntdesai.com या वेब साईटवर वसंत देसाई यांची गाणी,माहिती व फोटो आहेत.

    वसंत देसाई यांचे २२ डिसेंबर १९७५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मराठी साहित्यिक सुभाष भेंडे

    गोव्यातील बोरी हे मा.सुभाष भेंडे यांचे गाव. त्यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३६ रोजी झाला. त्यांचे शिक्षण सांगली व पुण्यात झाले होते. त्यांनी अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली होती. ते मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. गोवा मुक्तिसंग्रामानंतर प्रकाशझोतात आलेल्या साहित्यिकांपैकी ते एक होते.

    २००३ साली कराड, महाराष्ट्र येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच वळवयी येथे झालेल्या २१ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता.

    तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला. सुभाष भेंडे यांचे २० डिसेंबर २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • इंग्लंडचे डावखुरे फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवुड

    सुनील गावस्कर हे डेरेक अंडरवुड यांची १२ वेळा ‘शिकार’ठरले होते. डेरेक अंडरवुड यांची गोलंदाजी इतकी सफाईदार होती की, त्यांनी आपल्या संपुर्ण क्रिकेट कारकिर्दीत एकही वाईड चेंडू टाकला नाही.

  • संगीत सूर्य केशवराव भोसले

    केशवराव यांचे वडील वैद्यकी करत. कोल्हापुरात भोसले वैद्य म्हणून ते परिचित होते. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८९० रोजी कोल्हापूर येथे झाला. पण लहानपणीच वडील वारले आणि घराचं घरपण नाहीसं झालं. चार चिमण्या जिवांची जबाबदारी आईवर पडली. दत्तू, केशव, नारायण आणि एक अगदी छोटी लहान बहीण. त्यांच्या आईला मोलमजुरीसाठी घराबाहेर पडणं भाग पडलं. त्यावेळी ‘स्वदेशी हितचिंतक’ नाटक कंपनीचा मुक्काम कोल्हापुरातच होता. ‘विद्याविलास’कार शंकरशास्त्री गोखले यांच्या मध्यस्थीने, त्यांची आई घरकामासाठी कंपनीत जाऊ लागली.

    आईबरोबर दत्तू आणि केशवही होतेच. दोन्ही मुलगे मोठे चुणचुणीत होते. कंपनीचे मालक जनुभाऊ निमकर यांनी त्या दोघांना वरकामासाठी कंपनीत ठेवून घेतले. त्यावेळी दत्तू नऊ वर्षांचा आणि केशव अवघा चार वर्षांचा होता.

    ‘स्वदेशी हितचिंतक’ नाटक मंडळी हे एक मोठं कुटुंबच होतं. कुटुंब प्रमुख जनुभाऊ मोठे व्यवहार कुशल आणि करड्या शिस्तीचे होते. व्यवसाय नाटकाचा असला तरी कंपनीचं वातावरण अगदी घरगुती होतं. कुठे नाटकाची तालीम सुरू आहे, कुणी आपली नक्कल पाठ करतो आहे, कुणी तंबोरा जुळवून रियाज करतो आहे, कोणी ताला-सुरात आपलं गाणं पक्क करतो आहे. अशा अनोख्या पण आवडत्या वातावरणात दत्तू आणि केशव तिथे रंगून जात होते.

    कंपनीतल्या मुलांना गाणं शिकवण्यासाठी दत्तूबुवा जांभेकर होते. दत्तूबुवा जांभेकर हे केशवरावांचे गानगुरू आणि जनुभाऊ निमकर हे नाट्यगुरू. इतर मुलांबरोबर केशव कंपनीत गाणं शिकू लागला. त्याची गाण्यातली चमक लक्षात यायला बुवाना वेळ लागला नाही. ‘हे पाणी काही वेगळं आहे’ अशी बुवांची खात्री पटली आणि बुवा त्याच्याकडे अधिक लक्ष देऊ लागले.

    बालकलाकार म्हणून केशव हळूहळू रंगभूमीवर वावरू लागला. कधी त्याला स्त्री पात्राची भूमिका करावी लागत असे. तो प्रेक्षकांच्या प्रथम नजरेत भरला तो ‘शारदा’ नाटकातल्या ‘वल्लरी’च्या मिष्किल भूमिकेत. ते काम तो मोठ्या ठसक्यात करी. त्याचं कौतुकही होऊ लागलं.

    कंपनीचा मुक्काम पंढरपूरला होता. खेळ चालू होते. शनिवारचा कंपनीचा पेटंट खेळ ‘शारदा’ जाहीर झाला होता. गुरूवारपासून तिकीट विक्री चालू झाली होती. पण नाटकात ‘शारदे’ची भूमिका करणारा कृष्णा देवळी हा अचानक आजारी पडला. तो तापाने फणफणत होता. शनिवारचा खेळ रद्द करावा अशी बोलणी सुरू झाली. इतक्यात छोटा केशव जनुभाऊंसमोर येऊन धीटपणे म्हणाला, ‘खेळ बदलू नका, मी करतो शारदा! माझी नक्कल पाठ आहे.

    गाणी तयार आहेत! घ्या म्हणून हवी तर...’ तो एका दमात भराभर बोलत होता. मालक जनुभाऊ म्हणाले, ‘अरे वेड्या, एवढं मोठं काम तुला एकदम कसं झेपेल?’ त्यावर तो ताडकन म्हणाला, ‘मी खरंच करीन! एकदा पहा तर खरं! माझं काही चुकलं तर थोबाडीत मारा!’ जनुभाऊ कौतुकानं त्याच्याकडे बघू लागले आणि त्यांना एकदम काय वाटलं कुणास ठाऊक? मॅनेजर म्हैसकरना ते म्हणाले, ‘यादीत ‘शारदे’साठी केशवचं नाव टाका!
    दोन दिवस कसून तालमी झाल्या.केशव आनंदाने फुलून आला होता.

    शनिवार उजाडला. रात्री नाटकाचा पडदा वर गेला. जनुभाऊंच्या पायावर डोकं ठेवून केशव रंगभूमीवर गेला. स्टेजवर तो असा वावरत होता की जसं काही तो नेहमीच रोजचंच काम करत होता. शारदेच्या भूमिकेत तो सुरेल गायला आणि सुंदर दिसत होता. ‘मूर्तिमंत भीती उभी’ हे पद असं गायला की प्रेक्षकांतून ‘वन्समोअर’ वर ‘वन्समोअर’ मिळत होते. प्रेक्षक शारदेला रंगभूमीवरून आत जायलाच देत नव्हते. शेवटी जनूभाऊ स्टेजवर आले आणि केशवला जवळ घेऊन प्रेक्षकांना म्हणाले, ‘‘पोरगं लहान आहे, दमलं आहे. सांभाळून घ्या. क्षमा करा!’’ जनुभाऊंचे आणि प्रेक्षकांचेही डोळे अश्रूंनी भरून आले होते. त्या दिवसांपासून केशव ‘हितचिंतक’ ‘रंगशारदा’ ठरला. वय होतं फक्त दहा वर्षे! साल होतं, १९०१!

    ‘शारदे’चं अपरंपार कौतुक झालं. प्रयोग रंगू लागले. पैशांचा पाऊस पडू लागला. उभ्या महाराष्ट्रात केशवरावांचं नाव झालं. सौभद्र, मृच्छकटिक, इत्यादी खेळ रंगू लागले. सुभद्रा, वसंतसेना केशवरावांकडेच आल्या. प्रेक्षक खेळांना गर्दी करू लागले. साहजिकच आपल्यामुळेच उत्पन्न भरपूर मिळतं. हे दत्तोबा आणि केशवराव यांच्या मनात यायला वेळ लागला नाही. कौतुक होत होतं. पण त्यांच्या हातात पैसे अधिक पडत नव्हते. आईला आता जास्त पैसे पाठवावेत, असं त्यांना वाटत होतं. पण ते जमत नव्हतं. जनुभाऊंकडे विषय काढला तरी ते लक्ष देत नव्हते. खूप धीर धरला, पण शेवटी एक दिवस सगळ्या मित्र मंडळींनी उचल खाल्ली आणि सगळेजण कंपनी सोडून बाहेर पडले.

    ‘जो पगार घेणार नाही तो मालक’ या तत्त्वावर नवीन कंपनी सुरू करण्याचं ठरलं. नोकरांपेक्षा मालकच जास्त! सुरूवातीला वीस-एकवीस मालक होते, पण कंपनी सुरू झाली तेव्हा दत्तोबा आणि केशवराव हे दोघे भाऊ, आणि वीरकर बेडेकर असे स्नेही मिळून सात आठ मालक झाले. कंपनीची स्थापना हुबळी मुक्कामी, सिद्धरूढ स्वामींच्या शुभाशीर्वादाने झाली. कंपनीचं नाव केशवरावांनी सुचवलं. ‘ललित कलादर्श नाटक मंडळी’ तो दिवस होता. एक जानेवारी १९१० आणि तेव्हा केशवराव होते अवघे अठरा वर्षाचे! त्या काळातली ‘ललित कलादर्श’ ही एकमेव नाटक मंडळी आज शंभर वर्षानंतरही भालचंद्र पेंढारकर यांच्या रूपाने कार्यरत आहे.

    सौभद्र, शारदा, गोपीचंद असे खेळ संस्था करत होती. पण कंपनीचा जम बस नव्हता. सावकार तगादा लावत होते. केशवराव जीव तोडून आपल्या भूमिका करत होते. कंपनी उत्तम चालवत होते, पण वर्षा, दोन वर्षातच, एकेका मालकाने अंग काढून घेतले आणि कंपनीची जबाबदारी दोघा भोसले बंधूंवर पडली.

    केशवराव नव्या नाटकाच्या शोधात होते. त्यांनी आ. रा. दोंदे यांचं ‘मदालसा’ आणि हिराबाई पेडणेकर यांचं ‘दामिनी’ अशी दोन नाटकं बाहेर काढली. पण, त्यांनी दम धरला नाही. हिराबाई या तत्कालीन ‘अकुलिना स्त्री’चं नाटक रंगभूमीवर आणून त्यांनी तत्कालीन सामाजिक प्रतिष्ठेचा आशयही साकार केला. याच सुमाराला त्यांनी वीर वामनराव जोशी यांचं ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ हे नाटक मिळवलं.

    २० सप्टेंबर १९१३ रोजी मुंबईत बॉम्बे थिएटरमध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. नाटकाचा विषय, आशय, याला पूरक असं सुसंग नेपथ्य, सिद्धहस्त कलाकार आनंद मेस्त्री यांनी दिलं होतं. प्रथमच इथे मराठी रंगभूमीला मखमली पडदा मिळाला. या नाटकातील केशवरावांच्या ‘मृणालिनी’च्या भूमिकेने आणि तेजस्वी गायनाने रसिक दिपून गेले. कंपनीवर पैशांचा पाऊस पडला. कर्ज तर फिटलेच पण गाठीशी पैसाही खूप आला. यावेळी मुंबई रसिकांनी आणि मित्र परिवाराने केशवरावांचा भव्य नागरी सत्कार करून त्यांना एक थैली अर्पण केली होती. या समारंभाला केशवरावांचे गुरू दत्तोपंत जांभेकर मुद्दाम आले होते. केशवरावांनी कृतज्ञतापूर्वक नम्रपणे त्यांना मिळालेली थैली गुरूचरणी अर्पण केली.

    तिथून पुढे केशवराव कंपनी घेऊन विदर्भाच्या दौऱ्यावर गेले, तेही स्पेशल ट्रेन घेऊन. ट्रेनवर फलक झळकत होता, ‘ललित कलादर्श नाटक मंडळी.’ त्याकाळी नाटक कंपन्या संस्थानिकांच्या राजे राजवाड्यांच्या आश्रयावर, सहाय्यावर चालायच्या. पण केशवराव आपल्या कंपनीचा उल्लेख, खास लोकाश्रयाखालील असा मोठ्या अभिमानाने करीत होते.

    ‘राक्षसी महत्त्वाकांक्षे’च्या जोडीला दुसरं नवं नाटक आणण्याच्या विचारात केशवराव होते. इतक्यात त्यांना ‘मानापमान’ नाटकाच्या प्रयोगाचे हक्क मिळाले. याच वेळी बापूराव पेंढारकर त्यांना मिळाले. ‘मानापमान’ च्या तालमी जोरात सुरू झाल्या आणि ‘मानापमान’चा पहिला प्रयोग त्यांनी मुंबईत डिसेंबर १९१५ मध्ये बॉम्बे थिएटरमध्ये सादर केला. धैर्यधर (केशवराव) भामिनी (बापूराव पेंढारकर) आणि लक्ष्मीधर (दत्तोपंत भोसले)! खुद्द काकासाहेब खाडिलकर यांनी, ‘मला तुमचा धैर्यधर खूप आवडला!’ असं केशवरावांचं कौतुक केलं.

    ‘कर्ज फिटेपर्यंत कपाळाला गंध लावणार नाही’ असा केशवरावांनी पण केला होता. म्हणून ते गंध लावत नसत. ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ आणि ‘मानापमान’ च्या अपूर्व यशानंतर ते नरसोबावाडीला गेले. दत्त हे त्यांचं दैवत. तिथे षोडशोपचारे पूजा केली. सहस्त्रभोजन घातलं आणि मंत्रघोषात आशीर्वाद घेऊन कपाळी केशरी गंध लावलं आणि मग पुण्याला परतले.

    पुढचा मुक्काम होता कोल्हापूर. वयाच्या चौथ्या वर्षी घर सोडल्यापासून जन्मभूमीत ते प्रथमच पाऊल टाकत होते. दोन महिन्याच्या मुक्कामात सौभद्र, शारदा, राक्षसी महत्त्वाकांक्षा, मानापमान अशा खेळांनी कोल्हापूर दुमदुमून गेलं. उत्पन्नही अफाट मिळालं. मिळालेला सारा पैसा त्यांनी दानधर्मात खर्च केला. आई अंबाबाईच्या मंदिराच्या कळसाला सोन्याचा मुलामा चढवला. अनेक संस्थांना देणग्या दिल्या. कोल्हापूरला मिळालेला पैसा कोल्हापूर वेशीच्या बाहेर नेला नाही.

    मामा वरेकर हे नवे नाटककार आता ललित कलेला लाभले होते. त्यांची ‘हाच मुलाचा बाप’ आणि ‘संन्याशाचा संसार’ ही दोन नवी सामाजिक नाटके केशवरावांनी रंगभूमीवर आणली आणि त्यातून हुंडा आणि पतित परिवर्तन, अशा सामाजिक विषयांना त्यांनी कलारूप साकार केलं. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकात पशू डॉक्टरचं काम, दामू अण्णा मालवणकर यांनी केलं होतं. प्रेक्षक त्यांच्यावर बेहद्द खूष झाले होते.

    गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांच्याबद्दल केशवरावांच्या मनात अतिव आदर होता. ललितकला नाट्य कंपनीचे ते गुरू! वझेबुवांची गायकी आक्रमक होती. त्यांना केशवरावांसारखा तडफदार आवाजाचा शिष्य लाभला.
    १९२१ हे ललितकलाचं वैभवाचं वर्ष होतं. केशवरावांच्या कारकीर्दीचं ते सोनेरी वर्ष होतं. पुण्यात किर्लोस्कर थिएटरमध्ये तेव्हाचं नाट्यसंमेलन भरलं होतं. या नाट्य संमेलनाचं यजमानपद ललितकलेकडे होतं. संमेलनाचा सर्व खर्च त्यावेळी केशवरावांनी केला होता. जमलेले सर्व रसिक संमेलनात, केशवरावांचं मनापासून कौतुक करीत होते.

    याच वर्षी, आप्पासाहेब टिपणीस यांचं ‘शहाशिवाजी’ हे नाटक केशवरावांनी १४ मे १९२१ रोजी रंगभूमीवर आणलं. शिवाजी महाराज प्रथम गायले ते याच नाटकात. केशवरावांचा ‘संगीत शिवाजी’ प्रेक्षकांना इतका पसंत पडला की खरा शिवाजी असाच दणदणीत गात असला पाहिजे, असे प्रेक्षकांना वाटू लागले.

    १९२० साली लो. टिळकांचं निधन झालं आणि देशाने गांधीजीचं नेतृत्व स्वीकारलं. गांधीजींनी लोकमान्य स्वराज्य फंडासाठी एक कोटी रूपयांचा संकल्प सोडला होता. या संकल्पामुळेच रंगभूमीवर एक अभूतपूर्व प्रयोग घडला. तो म्हणजे संयुक्त ‘मानापमान’चा! यात केशवराव धैर्यधर होते, तर बालगंधर्व भामिनी, इतर पात्रांची विभागणी करताना गणपतराव बोडस म्हणाले, ‘केशवराव, शिपाई ललितकलेतले आणा, चोर गंधर्व कंपनीत आहेत.’

    या प्रयोगाला त्यावेळी पहिले तिकीट होते १०० रूपये आणि पिटातले तिकीट होते पाच रूपये. प्रयोग केव्हाच हाऊसफुल्ल झाला होता. केशवरावांच्या तेजस्वी ताना आणि बालगंधर्वांच्या गळ्यातील गोडवा, यांनी रसिकांची मने तृप्त झाली. या प्रयोगानंतर रसिकांच्या पसंतीची टाळी केशवरावांच्या गाण्याकडे झुकलेली होती असे इतिहास सांगतो.

    या प्रयोगात खर्च जाऊन प्रत्येकी साडेचार हजार रूपये आले. कर्जबाजारी झालेल्या बालगंधर्वांना केशवराव म्हणाले, ‘दादा, कर्ज—कर्ज काय घेऊन बसलात? मनात आणलं तर असे प्रयोग करून कर्जाचे डोंगर आपण फेकून देऊ!’

    प्रयोगाच्या वेळी ‘संदेश’कार अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी सर्वप्रथम केशवरावांचा उल्लेख ‘संगीतसूर्य’ असा केला. ललित कलादर्श नाट्य संस्थेच्या रूपाने रसिकांचे ऋण मान्य करणे, मखमली पडद्याचे वास्तव नेपथ्य सुरू करणे आणि आपल्या मालकीची, आपण निर्माण केलेली, वाजती, गाजती आपली नाट्यसंस्था आपल्या कलेच्या वारसदाराकडे बापूराव पेंढारकरांकडे सोपवणं हे करायला मन केवढं मोठं असावं लागतं. कौटुंबिक वारसांचा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवला नाही. इथे ओढ होती ती रक्ताचं पाणी करून उभ्या केलेल्या संस्थेच्या भवितव्याची!

    मराठी रंगभूमीवरच्या अनेक मूलभूत उपक्रमांचे केशवराव धनी होते.आणखी एक महत्त्वाचा केशवरावांनी राबवलेला उपक्रम म्हणजे नाटक ठरल्यावेळी घड्याळाच्या ठोक्याला सुरू करण्याचा. केशवरावांच्या ललितकलाच्या नाटकाच्या तिकिटावर ‘रात्री नऊ’चा आकडा छापलेला असे. याचा अर्थ, नाटक रात्री नऊच्या ठोक्यालाच सुरू होणार.

    यासंबंधी एक आठवण सांगितली जाते. एकदा एका संस्थानात ललितकलाच्या नाटकाचा प्रयोग होता. वाड्यावरून निरोप आला की, ‘राजेसाहेब नाटकाला येणार आहेत, तेव्हा प्रयोग अर्धातास उशिरा म्हणजे साडेनऊला सुरू करावा.’ केशवरावांनी ठरल्या वेळी नऊ वाजता तिसरी घंटा दिली आणि नांदी सुरू केली. केशवरावांच्या तेजस्वी तडफदार आवाजात प्रेक्षकांना त्या दिवशी अर्धातास नांदी ऐकायला मिळाली.

    महाराज साडेनऊला आले. तोपर्यंत नांदी चालू होती आणि नांदी संपल्यानंतर साडेनऊला नाटक सुरू झाले.
    पुढे ‘माझा सूर ज्या क्षणी कमी होईल, त्याक्षणी मला मृत्यू यावा’ असा संकल्प केशवरावांनी केला आणि त्यांना ताप येऊ लागला. त्याही अवस्थेत त्यांनी बालगंधर्वासोबत ‘सौभद्र’ नाटक केलं पण ताप त्यांचा पिच्छा सोडेना. अखेर तो टायफॉईड ठरला आणि ४ ऑक्टोबर १९२१ रोजी या केशव भोसले नावाच्या संगीतसूर्याचा अस्त झाला. केशवराव नावाचं तुफान शांत झालं.

    वामन काळे
    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • प्रसिद्ध गीतकार इन्दीवर

    गीतकार इन्दीवर यांचे खरे नाव श्यामल बाबू राय, इन्दीवर यांना लहान पणा पासून लेखक, संगीत आणि गायन लेखन याची आवड होती. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२४ रोजी झाला. बाबू भाई मिस्त्री यांच्या चित्रपट 'पारसमणि' मधील इन्दीवर यांची गाणी गाजली.

    निर्माता-दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या चित्रपटात मा.इन्दीवर गाणी लिहिली. 'उपकार' मधील "क़स्मे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या..." ही गाणी काय किंवा 'पूरब और पश्चिम' मधील "दुल्हन चली वो पहन चली" और "कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे" ही गाणी तर अजून ही अवीट वाटतात मा. इन्दीवर यांनी संगीतकार जोड़ी कल्याणजी-आनंदजी च्या बरोबर "छोड़ दे सारी दुनिया किसी के लिये...", "चंदन सा बदन..." और "मैं तो भूल चली बाबुल का देश..." अशी सुंदर गाणी लिहिली आहेत.

    राकेश रोशन यांच्या चित्रपटात इन्दीवर यांनी सदाबहार गाणी लिहिली. 'कामचोर', 'ख़ुदग़र्ज', 'खून भरी मांग', 'काला बाज़ार', 'किशन कन्हैया', 'किंग अंकल', 'करण अर्जुन' व 'कोयला' या राकेश रोशन यांच्या चित्रपटातील गाणी मा.इन्दीवर यांनी लिहिली. त्यांच्या या गाण्या मुळे राकेश रोशन यांचे चित्रपटातील गाणी आज आपण आठवणीने ऐकतो. विजय आनंद यांच्या 'जॉनी मेरा नाम' या चित्रपटातील "नफ़रत करने वालों के सीने में...", "पल भर के लिये कोई हमें..." ही गाणी मा.इन्दीवर यांचीच.

    मनमोहन देसाई यांच्या 'सच्चा-झूठा' या चित्रपटातील "मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनियां..." हे इन्दीवर यांचे गाणे आज ही लग्नात वाजवले जाते. 'सफ़र' या चित्रपटातील इन्दीवर यांचे "जीवन से भरी तेरी आंखें..." व "जो तुमको हो पसंद..." ही गाणी तर लाजबाब.

    १९७५ मध्ये 'अमानुष'या चित्रपटासाठी इन्दीवर यांना 'फ़िल्म फेयर पुरस्कार' मिळाला. इन्दीवर यांनी ३०० पेक्षा जास्त चित्रपटांसाठी गाणी लिहिली. २७ फेब्रुवारी १९९७ मा.इन्दीवर यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    इन्दीवर यांनी लिहीलेली काही गाणी
    दिल ऐसा किसीने मेरा तोडा
    फुल तुम्हे भेजा है खत में
    गरजत बसरत
    जिंदगी का सफर
    चंदन सा बदन
    जो तुमको हो पसंद
    मधुबन खुशबु देता है
    एक तु जो मिला
    पास बैठो तबीयत बहेल जायेगी
    एक बार तु कहदे
    इस दिल मे बसा था प्यार तेरा
    ओठों से छु लो तुम
    कोई जब तुम्हारा
    दिल एैसा किसीने

  • लेखक, कवी, नाटककार, राम गणेश गडकरी

    ‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा।
    प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा।।

    असे अप्रतिम काव्य लिहिणारे गोविंदाग्रज. त्यांचा जन्म २६ मे १८८५ रोजी झाला. मुलासकट माणुसकीला, सिंधुसकट संसाराला, सद्गुणासकट सुखाला, जगासकट जगदीश्वराला या सुधाकराच्या निर्वाणीच्या निराशेतला अखेरचा प्रणाम, अशी नादमधुर भाषा लिहिणारे नाटककार मा.राम गणेश गडकरी! बाळकराम या टोपण नावाने विनोदी लेखन करणारे गडकरी! मा.राम गणेश गडकरी म्हणजे मराठी नाटय़- साहित्य क्षेत्रातला चमत्कारच आहे.
    गडकरी यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.

    महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरीभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविताा व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले. गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत.त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला सारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे. राम गणेश गडकरी या नावाने नाटके लिहिणार्याि, गोविंदाग्रज नावाने काव्यलेखन करणार्याा या प्रतिभावंत साहित्यकाराने 'बाळकराम' या नावाने विनोदी लेखनही केले, सुरुवातीला 'मनोरंजन' नावाच्या मासिकात ' रिकामपणची कामगिरी' सारखे विनोदी लेखन ते करू लागले होते. तेंव्हा ते 'नाटक्या', 'सावाई नाटक्या' या टोपण नावांनी लेखन करत असत.'संपूर्ण बाळकराम' या पुस्तकात त्यांचे विनोदी लेखन संकलित केले गेले आहे. 'एकच प्याला', 'भावबंधन' या नाटकांमधील बळीराम व धुंडीराज यांच्यामार्फत त्यानी विनोद प्रकट केला आहे. गंभीर आशय आणि वैचारिक विवेचनाला विनोदाची झालर लावण्याची हातोटी त्यांना साधली होती. त्यांच 'ठकीच लग्न'ही खूप गाजल. आपल्या विनोदात गडकर्यांकनी अतिशयोक्ती तसेच वक्रोक्तीचाही वापर केला आहे. मा.गडकऱ्यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकऱ्यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्‌पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. मा.राम गणेश गडकरी यांचे २३ जानेवारी १९१९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • ज्येष्ठ गायक विनायकराव पटवर्धन

    पटवर्धनबुवांनी पुण्यात ८ मे १९३२ रोजी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. त्यातील काही जण उत्कृष्ट गायक तर काही जण उत्तम शिक्षक बनले. त्यांच्या शिष्यांतील काही निवडक मंडळी म्हणजे पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर, पं. एस. बी. देशपांडे, पं. व्ही. आर. आठवले, पं. विष्णू घाग व पं. व्ही. डी. घाटे हे होत.

  • जेष्ठ चित्रकार रघुवीर मुळगावकर

    प्रल्हाद केशव अत्रे, विनायक दामोदर सावरकर, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी, अ.वा. वर्टी यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने सजली. त्याचप्रमाणे दीपलक्ष्मी, धनुर्धारी, वसंत, अनुप्रिता, नंदा, माधुरी, माणिक, अलका, पैंजण अशा अनेक नियतकालिकांची व त्यांच्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने साकारली.

  • “सर्वोत्कृष्ट अभिनयाचा उष:काल”

    ‘ती आली, तिला पाहीलं आणि तिने सर्वांचं मन जिंकलं. आपल्या अद्वितीय अभिनय शैलीत आणि कलेवर प्रचंड हुकुमत असणार्‍या तसेच मॉडेलिंग विश्वावर आपली अनोखी छाप पाडणार्‍या राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव यांच्यासोबत खास गप्पा..फक्त मराठीसृष्टी.कॉमच्या महाराष्ट्राच्या दिपशिखा या सदरासाठी..

  • ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले

    धूमकेतू म्हटलं की, आपल्याला लगेच आठवतो तो ‘हॅले’ चा धूमकेतू. या धूमकेतूचं नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या नावावरून दिलं गेलं. १६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ्यास केला.