एक भावकवी आणि ‘मृगावर्त’ या नाविन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते म्हणून कविवर्य कृ. ब. निकुंब मराठी साहित्यसृष्टीला परिचित आहेत. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. ‘घाल घाल पिंगा वार्याा माझ्या परसात...’ असे हळूवारपणे लिहिणारे निकुंब जितके कवी म्हणून थोर होते तितकेच एक शिक्षक म्हणूनही फार मोठे होते.
कृ. ब. निकुंब कॉलेजमध्ये ‘साहित्यातील परंपरा आणि संप्रदाय’ हा विषय समरसून शिकवायचे. शिकविण्याच्या ओघात कितीतरी कवींच्या कविता सहज म्हणायचे. प्रत्येक वर्गाला काहीतरी नवीन देण्याचा निकुंब प्रयत्न करायचे. त्यांच्या व्याख्यानातून विद्वतेचा फार मोठा ओघ विद्यार्थ्यांच्या काळजापर्यंत पोहोचायचा. कितीतरी कविता, ज्ञानेश्व्री सरांना पाठ होती. गर्व, अहंकार यापासून लांब राहून विद्यार्थ्यांत मिसळून निकुंब समजावून द्यायचे.
कृ.ब.निकुंब यांची 'घाल घाल पिंगा वाऱ्या' ही कविता तिच्या वेगळेपणामुळे आणि रसाळ काव्यआशया मुळे उठून दिसते. थेट काळजाला हात घालणारे शब्द अन भावविभोर झालेल्या सासूरवाशिणीचे हृदयंगम प्रकटन जणू आपण अनुभवत आहोत असा भास या कवितेतून होतो. या कवितेला कमलाकर भागवत यांनी अत्यंत करुण चाल लावली अन त्यांच्या संगीतदिग्दर्शनाखाली सुमन कल्याणपूर यांनी आर्त स्वरात हे गाणं असं काही गायलं की पुर्वी रेडीओवर हे गाणं लागलं की सर्व वयाच्या सासूरवाशिणी हमसून हमसून रडत असत !! आजही या गाण्याची अवीट गोडी टिकून आहे एक भावकवी आणि `मृगावर्त’ या नावीन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते म्हणून कृष्णाजी बळवंत निकुंब उर्फ कृ. ब. निकुंब परिचित आहेत.
`पारख’ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू. निर्मळ, आस्वादक दृष्टी, निर्णयातील सूक्ष्मता आणि निश्चितता, शैलीचे ललित्य आणि संयम या विशेषांचा समन्वय तर ह्या समीक्षालेखांत झालाच आहे, पण महत्त्वाची गोष्ट अशी की, `केकावली’त संज्ञाप्रवाहाचे दर्शन घडते किंवा बालकवींच्या कवितेत जोडाक्षराचे दाठरपण मोडून त्याला सुकुमार रूप प्राप्त होते, यांसारखी लहानमोठी अपरिचित सौंदर्यस्थळे निकुंबाना अचूक गवसली होती. कवी निकुंब यांच्या कविता मोजक्याच मात्र आशयघन आहेत.
मृगावर्त, पंखपल्लवी, ऊर्मिला, उज्वला, अनुबंध हे त्यांचे लेखन होय. कवी निकुंब यांचे ३० जून १९९९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. समीर गायकवाड.
लहानपणापासूनच प्रभाकर पणशीकर यांचा ओढा नाट्यक्षेत्राकडे होता. त्यांचा जन्म १४ मार्च १९३१ रोजी मुंबईतल्या गिरगांव येथील फणसवाडीत झाला.शाळेत असताना विविध व प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. इककेच नाही तर ती नाटके गिरगावातील गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे तरूणपणीच त्यांना घरापासून परागंदा व्हावे लागले. .पणशीकरांनी आपले पदवी पर्यंतचे शिक्षण कला शाखेतुन मुंबईतल्या विल्सन महाविद्यालयातून पूर्ण केले.
१३ मार्च १९५५ ह्या दिवशी “राणीचा बाग” नाटकाद्वारे मा.प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. नाट्य वर्तुळात मा.प्रभाकर पणशीकरांना “पंत” या नावाने ओळखले जात असत; वयाच्या पंचविशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक मो.ग.रांगणेकरांच्या “नाट्यनिकेतन” या संस्थेत प्रवेश केला आणि “कुलवधू”,“भूमिकन्या सीता”,“वहिनी”,“खडाष्टक” अशा नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केली.
पुढे मो.ग.रांगणेकरांशी काहीकारणास्तव मतभेद झाल्यामुळे “नाट्यनिकेतन” मधून प्रभाकर पणशीकर बाहेर पडले आणि “अत्रे थिएटर्स” मधून “तो मी नव्हेच”या नाटकाचे प्रयोग सादर करू लागले. या नाटकात तो मी नव्हेच, असं म्हणत लखोबा लोखंडेने काही वर्षांपूर्वी बऱ्याच जणांना गंडा घातला होता. त्यातील विविध व्यक्तिरेखा साकारत मा.प्रभाकर पणशीकर यांनी जवळपास साऱ्यांनाच चकित केलं होतं. आपले स्नेही मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर ह्यांच्या मदतीने मा.प्रभाकर पणशीकरांनी १९६३ साली “नाट्यसंपदा” या संस्थेची स्थापना केली. विद्याधर गोखले लिखीत “अमृत झाले जहराचे” आणि वसंत कानेटकर ह्यांचे “मोहिनी” ही दोन नाटके “नाट्यसंपदे”ने रंगमंचावर आणली. पण दुर्दैवाने ही नाटके फार काळ चालली नाहीत. मात्र त्यानंतरच्या “मला काही सांगायचंय” आणि “इथे ओशाळला मृत्यू” ह्या नाटकांच्या निर्मितीने “नाट्यसंपदे”ला व्यावसायिक यश आणि अमाप ख्याती मिळाली. “इथे ओशाळला मृत्यू’मधील औरंगजेब साकारताना ते नमाज पढायला शिकले. या नाटकात औरंगजेबाच्या व्यक्तिरेखेला मिळालेली दाद ही पणशीकरांच्या अभिनयकौशल्याला होती. “अश्रूंची झाली फुले’ नाटकामध्ये पणशीकर यांनी साकारलेले प्रा. विद्यानंद आणि आधी डॉ. काशिनाथ घाणेकर व नंतरच्या टप्प्यात रमेश भाटकर यांनी साकारलेला “लाल्या’ ही अभिनयाची जुगलबंदी रसिकांना अनुभवता आली. या नाटकाच्या गुजराती भाषेतील प्रयोगातदेखील त्यांनी भूमिका साकारताना जणू आपण जन्माने गुजराती आहोत असेच सिद्ध केले. नाट्यसंपदेच्या “कट्यार काळजात घुसली” संगीत नाटकाने तर इतिहास घडवला; तर १९७० मध्ये “तो मी नव्हेच” चे हक्क “नाट्यसंपदे”ने विकत घेऊन पुढे ह्या नाटकाचे मा. पणशीकरांनी दोन हजार पेक्षाही अधिक प्रयोग केले. पंतांनी आणखीन ज्या नाटकांमध्ये अभिनय केला ती नाटकं म्हणजे “अश्रुंची झाली फुले”,“थँक यु मि. ग्लाड”,“जेव्हा गवताला भाले फुटतात”,“भटाला दिली ओसरी”; तर “संगीत मदनाची मंजिरी”,“संगीत सुवर्णतुला”,“अंधार माझा सोबती”,“किमयागार”,“पुत्रकामेष्टी” या सारख्या गद्य व संगीत नाटकांची निर्मिती केली. याशिवाय पणशीकरांनी मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही आपल्या अभिनयाची प्रतिभा दाखवुन दिली.नाटकांसोबतच ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका आणि आकाशवाणीसाठी असंख्य नाट्यवाचने केली. पणशीकरांनी नाट्य तसंच चित्रपट क्षेत्राला दिलेल्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांने सन्मानित कराण्यात अले होते. यामध्ये महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणजे “महाराष्ट्रभूषण पुरस्कार”,“विष्णुदास भावे सुवर्ण पदक”,“राजेश्री शाहू सुवर्ण पदक”,“नाट्यगौरव सुवर्ण पुरस्कार”,“संगीत नाटक अकादमी पुरस्कार”,“नटसम्राट बालगंधर्व स्मृति पुरस्कार”,“नटश्रेष्ठ केशवराव दाते पुरस्कार”,“डॉ.काशिनाथ घाणेकर स्मृति पुरस्कार”,“नटवर्य दत्ताराम पुरस्कार”,“आचार्य अत्रे पुरस्कार”,“कलाश्री पुरस्कार”,“उत्तुंग पुरस्कार”,“महाराष्ट्र गौरव पुरस्कार”,“जागतिक मराठी परिषद पुरस्कार”,“मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति पुरस्कार”,“नटसम्राट नानासाहेब फाटक स्मृति पुरस्कार”,“सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कार”,व “महाराष्ट्र शासनाचा पहिला जीवन गौरव पुरस्कार”असे पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या जीवन गौरव पुरस्काराचे ‘प्रभाकर पणशीकर पुरस्कार’ असे नामांतर करण्यात आले. मा. प्रभाकर पणशीकर यांचे १३ जानेवारी २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
प्रभाकर पणशीकर यांची नाटके
मोहिनी, मदनाची मंजिरी, अमृत झाले जहराचे, सुवर्णतुला, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू. कट्यार काळजात घुसली, इथे ओशाळला मृत्यू, मला काही सांगायचंय, वीज म्हणाली धरतीला, संत तुकाराम, तो मी नव्हेच, विकत घेतला न्याय, महारामी पद्मिनी, लागी करेजवा कटार (हिंदी), होनाजी बाळा, बेईमान, प्रश्नक नाजूक आहे, तो राजहंस एक, त्या कातरवेळी, तीन लाखांची गोष्ट, थॅंक यू मि. ग्लाड, तुझी वाट वेगळी, राजसन्यास, भटाला दिली ओसरी, पुत्रकामेष्टी, मी मालक या देहाचा, निष्पाप, अवनु नानल्ला (कानडी-तो मी नव्हेच), जिथे गवतास भाले फुटतात, किमयागार, घर अण्णा देशपांडेंचं.
मोगॅम्बो खूश हुआ'...'त्या' भारदस्त आवाजातील हे तीन शब्द कानांवर पडले की समोरच्याचा थरकाप झालाच म्हणून समजा. त्यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी झाला. 'मि. इंडिया' या सिनेमात अमरिश पुरी यांनी साकारलेली मोगॅम्बोची व्यक्तिरेखा विसरणे केवळ अशक्य. अशा एकापेक्षा एक सरस खलनायकी व्यक्तिरेखा, चरित्र भूमिका साकारणारे मा.अमरीश पुरी हे जुन्या काळातले प्रसिद्ध हिंदी चित्रपट कलाकार मा.मदन पुरी यांचे धाकटे भाऊ. अमरीश यांना हिंदी चित्रपटांमध्ये नायक बनायचं होतं म्हणून त्यांनी पंजाब सोडून मुंबई गाठली. मोठ्या भावाने सरळ सांगितलं की मी अजिबात मदत करणार नाही, जे काही या क्षेत्रात करायचं ते स्वतःच्या जोरावर करायचं.
नायक बनण्याच्या अमरीश यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. मग त्यांनी पृथ्वी थिएटर्समधल्या नाटकांमध्ये कामं करायला सुरुवात केली. तिथे मोठ्या दिग्दर्शकांकडे त्यांनी काम केलं. अगदी इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी अमरीश यांची नाटकं बघायला आवर्जून येत. मग हळूहळू अमरीश यांनी आपला मोर्चा परत एकदा हिंदी चित्रपटांकडे वळवला. सुरुवातीलाच चांगल्या दिग्दर्शकांचे चित्रपट अमरीश यांना मिळू लागले आणि हळूहळू त्यांनी आपले पाय हिंदी चित्रपटात घट्ट रोवायला सुरुवात केली. त्यांच्या कारकिर्दीबद्दल नव्याने लिहायची काहीच आवश्यकता नाही.
भारदस्त आवाज, भेदक नजर आणि करारी, देखणे रुप असलेले मा. अमरिश पुरी यांनी हिंदी सिनेमासृष्टीवर अनेक वर्षे राज्य केले. मा.अमरिश पुरी यांना बॉलिवूड सिनेमांमध्ये हीरो बनायचे होते. मात्र त्यांच्या नशीबात काही वेगळेच लिहिले होते. ते हीरो नाही मात्र बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक बनले. अमरिश पुरी यांनी आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत सर्वाधिक नकारात्मक भूमिका साकारल्या.
पाश्चिमात्य प्रेक्षकांमध्येही अमरिश पुरी लोकप्रिय अभिनेते आहेत. स्टीवन स्पिलबर्ग यांच्याबरोबरील 'इंडियाना जोन्स' या हॉलिवूड सिनेमातील मोला रामची भूमिका आणि 'टेंपल ऑफ डूम' या सिनेमातील भूमिकेसाठी प्रेक्षक त्यांना कधीही विसरु शकत नाही. त्यांची खलनायकाची प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये एवढी परिणामकारक बनली होती की त्यांच्या मुलाचे मित्र जेव्हा घरी येत तेव्हा अमरीश यांच्यासमोर नुसतं जायलाही घाबरत असत.
खऱ्या आयुष्यात मात्र अमरीश अतिशय साधे, मन मिळावू, मृदू स्वभावाचे, आपल्या कुटुंबात रमणारे असे होते. आपल्या वडिलांविषयी राजीव पुरी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की ''पापा तारुण्याच्या काळात हीरो होण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांचे थोरले बंधू मदन पुरी सिनेसृष्टीत कार्यरत होते. निर्मात्यांनी त्यांना सांगितले, की त्यांचा चेहरा हीरोसारखा नाहीये. त्यामुळे ते खूप निराश झाले होते. अमरिश पुरी यांचे १२ जानेवारी २००५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते. त्यांचा जन्म २६ जून १८८८ रोजी झाला.रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले. बालगंधर्वानी आपल्या भूमिका साकारनाच संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहीलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली. बालगंधर्वांनी कंपनीतील सर्वांना चांदीच्या थाळीतून वरण-भात तूप आणि पक्वान्नं खाऊ घातली, त्यांनाच आंधळ्या प्रेमापोटी जर्मनच्या थाळीतून जेमतेम अर्धी भाकरी अन् मूठभर भात खाण्याची वेळ यावी, यापरता दैवदुर्विलास कोणता? मोत्यांचा चारा खाऊन जगणाऱ्या "राजहंसा‘वर अशी वेळ आली, ती निव्वळ अव्यवहारीपणा, आंधळं प्रेम अन् व्यक्तिगत अवगुणांमुळं, असं आचार्य प्र. के. अत्रे, गंधर्व कंपनीतील हीरो-कृष्णराव चोणकर आणि विनायकराव पटवर्धन-यांनी लिहून ठेवलंय...अन् तरीही अनुपम सौंदर्य अन् स्वर्गीय गाणं यामुळं "असा बालगंधर्व आता न होणे‘ हे शब्द सार्थच ठरतात!
बालगंधर्व हे महाराष्ट्राला पडलेलं देखणं, सुरेल स्वप्न होतं. महाराष्ट्राचे महाकवी ग. दि. माडगूळकर यांनी त्यांचं यथार्थ वर्णन केलंय...
जशा जन्मती तेज घेऊन तारा । जसा मोर घेऊन येतो पिसारा ।
तसा येइ कंठात घेऊन गाणे ।
असा बालगंधर्व आता न होणे ।।
रतीचे जया रूपलावण्य लाभे ।
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे ।
सुधेसारखा साद; स्वर्गीय गाणे।
असा बालगंधर्व आता न होणे ।।
अनुपम सौंदर्य अन् स्वर्गीय गाणं यामुळं "असा बालगंधर्व आता न होणे‘ हे शब्द सार्थच ठरतात!
‘गंधर्व’ या शब्दात काहीतरी विलक्षण जादू असलीच पाहिजे. कारण या शब्दावर आधारून जितक्या पदव्या दिल्या गेल्या किंवा घेतल्या गेल्या तितक्या दुसर्याल कोणत्याही शब्दाच्या वाट्याला आल्या नाहीत. बालगंधर्व, भूगंधर्व, सवाई गंधर्व, महाराष्ट्र गंधर्व, कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, नूतन गंधर्व, हिंद गंधर्व, आनंद गंधर्व, भावगंधर्वपासून अक्षरशः डिट्टो गंधर्वपर्यंत गंधर्वांची एक मांदियाळीच महाराष्ट्रात तयार झाली. यांपैकी बर्याधच जणांनी आपल्या कर्तृत्वाने ती पदवी सार्थ करून दाखवली आणि काहीजणांनी आपल्या अतिहुशारीमुळे त्या पदवीलाच लाजविले. नारायण श्रीपादराव राजहंस या माणसाने मात्र ‘बालगंधर्व’ ही आपणाला मिळालेली पदवी अजरामर केली. बरं, ही पदवी बहाल करणारा माणूस तरी लेचापेचा होता? अजिबात नाही. १८९८ साली नारायण राजहंस या छोट्या मुलाचं गाणं ऐकून ‘अरे, हा तर साक्षात बालगंधर्व आहे!’ असे उद्गार काढणारी ती व्यक्ती कोण असेल? भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अध्वर्यू, असंतोषाचे जनक, प्रख्यात प्रकांड पंडित, भगवद्गीतेचे भाष्यकार, ज्योतिर्विद्येचे जाणकार आणि वैदिक गणितज्ज्ञ- साक्षात लोकमान्य टिळक!
या घटनेचं वर्णन करताना गदिमांनी लिहिलंय-
त्याच संधिला कुणा अनामिक रसिकाची हौस
टिळकांपुढती ठेवि बोलका कुणी राजहंस
राजहंस तो नेत्यासन्मुख गीत मनोहर म्हणे
देवदत्त तो साद मनोहर ऐकूनिया कानी
बाल गायका अमोल पदवी दिली टिळकांनी
शिरोधार्य ते दान मानिले इवल्या नारायणें
तो तोच बालगंधर्व
जाणिती सर्व
वाढला पुढती
यशसिद्धी राहिली त्याची सदोदित चढती
वाढला बालगंधर्व युगंधर झाला
वर्षाव प्रीतीचा रसिकजनांनी केला
सन्मान असा ना मिळतो सम्राटाला
मंत्रमुग्ध जन होत राहिले त्यांच्या मधुगायनें…
साक्षात सम्राटालाही मिळत नाही असा मान बालगंधर्वांना मिळाला. जवळपास पन्नास वर्षे रसिकमनावर त्यांनी अधिराज्य केले. आवाजाच्या जोरावर ते संगीतातील विलक्षण जादूगार झाले. ज्याप्रमाणे त्यांचे रूप मोहक होते त्याचप्रमाणे त्यांचा आवाजही मोहिनी घालणारा होता. अत्यंत मधुर, झार असलेला स्वयंप्रकाशी असा तो आवाज होता. त्यांच्या आवाजाच्या झारेला इंद्रधनुष्यातील विविध रंगांच्या छटांची उपमा एका मर्मज्ञ रसिकाने दिली होती व ती सार्थही होती. इतर कलावंत गायकांप्रमाणे जरी त्यांच्या गायनात पुष्कळ तर्हाआ नसल्या तरी त्यांचे साधेसुधे गोड गाणे आल्हाददायक बनू शकले ते या कंठमाधुर्याच्या देणगीवरच! हा आवाज प्रत्यक्ष ऐकण्यासाठी लोक शेकडो मैलांवरून धावत येत; तारेने थिएटरमध्ये जागा रिझर्व्ह केल्या जात; स्पेशल मोटारी सोडल्या जात. एवढेच नव्हे तर नाटकाच्या तिसर्याम अंकापर्यंत तिकिटं मिळवण्याची लोक खटपट व धडपड करीत. असं काय बालगंधर्वांमध्ये होतं की त्यांना पाहायला, ऐकायला लोक एवढे वेडावले होते? ही सर्व किमया बालगंधर्वांच्या जादुई आवाजाची होती! ऑर्गन व सारंगीवर त्यांनी आपला आवाज मिळवला की त्या तीन सुंदर स्वरांच्या मिलाफाने श्रोत्यांच्या कानांचे समाधान होऊन अंगावर रोमांच उभे राहत. रंगमंदिरात विलक्षण शांतता प्रस्थापित होई. १९८८ साली भारत सरकारने बालगंधर्व यांचे पोस्टाचे तिकीट त्यांच्या स्मृती निमीत्त छापले होते. बालगंधर्व यांचे १५ जुलै १९६७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ विष्णू सूर्या वाघ
गोगा कपूर यांचे खरे नाव रविंद्र कपूर पण ते बॉलीवूड मध्ये गोगा कपूर या नावाने काम करत असत. अनेक चित्रपटात सपोर्टींग व्हिलनची भूमिका करणाऱ्या गोगा कपूर यांनी अभिनय क्षेत्रात रंगभूमीच्या माध्यमातून पदार्पण केले.
स्वरराज छोटा गंधर्व व पं. कुमार गंधर्व यांचे समकालीन असलेले परंतु फारसे परिचित नसलेले असे एक गंधर्व म्हणजे ‘महाराष्ट्र गंधर्व’ सुरेश हळदणकर. ते गोमांतकात जन्मले. गाणे शिकण्याच्या निमित्ताने पुण्यात आले. त्यांना पं. बापुराव केतकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. त्याच सुमारास गोविंदराव टेंब्यांकडून काही नाट्यपदांचीसुद्धा तालीम मिळाली. सुरेश हळदणकर हे मा. दीनानाथ, बालगंधर्व व मा. कृष्णराव यांना गुरुस्थानी मानत. दैवयोगाने, त्यांना सुरेल, बारीक परंतु धारदार आवाज प्राप्त झाल्याने त्यांच्या गाण्यात दीनानाथ मास्तरांच्या गाण्यातील तडफदारपणा व बालगंधर्वांच्या गाण्यातील लडिवाळपणा या दोन्ही गोष्टी साधता आल्या व त्यामुळे अनेक वर्षे संगीत रंगभूमीवरून व खासगी मैफलीतून ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. ‘होनाजी बाळा’ या नाटकातील त्यांची भूमिका व विशेष करून त्यातील ‘श्रीरंग कमलकांता’ हे त्यांचे पद गाजले.
एके दिवशी त्या नाटकाच्या प्रयोगाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रणेते प्र. के. अत्रे हजर होते. त्या दिवशी ‘श्रीरंगा कमलकांता’ हे त्यांचे पद इतके रंगले, की अत्रे मोहित होऊन अंक संपल्यावर रंगमंचावर आले व सर्व रसिकांच्या समोर पडदा उघडून त्यांनी सुरेश हळदणकरांना ‘महाराष्ट्र गंधर्व’ ही पदवी बहाल केली. पुण्यातून मुंबईला आल्यावर हळदणकरांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण पं. मनहर बर्वे, पं. जगन्नाथबुवा पुरोहित, पं. गणपतराव देवासकर आदी संगीततज्ञांकडे झाले. पुढे ते प्रसिद्धीपासून दूर गेले. तरीसुद्धा त्या अगोदर अनेक वर्षे ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. त्यांनी गायलेल्या काही जुन्या रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. त्यांतील पदे उदाहरणार्थ, ‘विमल अधर निकटी’, ‘रघुराया गं माझा’, ‘श्रीरंगा कमलकांता’, ‘मानिली आपुली’, ‘सुरसुखकनी तू विमला’, ‘पद्ममनाथा नारायणा’ ही पदे त्यांना प्रसिद्धी देऊन गेली. मा.सुरेश हळदणकर यांचे १७ जानेवारी २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-thinkmaharashtara
मा. सुरेश हळदणकर यांची काही गाणी.
‘विमल अधर निकटी’
‘रघुराया गं माझा’
‘श्रीरंगा कमलकांता’
‘मानिली आपुली’
‘सुरसुखकनी तू विमला’
‘पद्ममनाथा नारायणा’
निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री व्ही.शांताराम यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०१ रोजी कोल्हापूर येथे झाला. शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपट सृष्टीतलं सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेलं नाव. शांताराम बापू या नावानं ते ओळखले जात. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला खोल ठसा उमटवला. दिग्दर्शक म्हणून अनेक नवीन संकल्पना त्यांनी पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीत वापरल्या. जवळजवळ सहा दशकं ते चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती कोल्हापुरातील बाबुराव पेंटर यांच्या मालकीच्या `महाराष्ट्र फिल्म कंपनी'पासून. कंपनीत पडेल ते काम करता करता १९२१ साली निर्माण झालेल्या `सुरेखा हरण' या मूकपटात छोटीशी भूमिका केली. येथून त्यांची घोडदौड सुरू झाली.
१९२५ साली निर्माण झालेल्या `सावकारी पाश' या सामाजिक चित्रपटात त्यांनी एका तरुण शेतकर्यााची भूमिका केली आणि १९२७ साली त्यांनी `नेताजी पालकर' हा पहिला मूकपट दिग्दर्शित केला.बाबुराव पेंटर यांच्याकडे नऊ वर्षं नोकरी केल्यानंतर त्यांनी श्री. दामले, श्री. फत्तेलाल, श्री. धायबर आणि श्री. कुलकर्णी यांच्या भागीदारीत कोल्हापुरात `प्रभात फिल्म्स'ची स्थापना केली. तेथे शांताराम बापूंना आपली कला विकसित करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळालं. `गोपाळ कृष्ण', `राणी साहेबा', `खुनी खंजर', `उदयकाल' असे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्यांनी दिले.`प्रभात'चा पहिला मराठी बोलपट `अयोध्येचा राजा' १९३२ साली प्रदर्शित झाला. १९३३ साली त्यांनी `सैरंध्री' हा भारतातला पहिला रंगीत चित्रपट काढण्याचं धाडस केलं. पण चित्रपटाच्या प्रिंट्स नीट डेव्हलप न झाल्यामुळे हा प्रयत्न फसला. `प्रभात'ला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. पण त्यातून डगमगून न जाता शांताराम यांनी `अमृतमंथन'ची निर्मिती केली. हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला. त्यानंतरचा १९३७ साली निर्मिलेला `संत तुकाराम' हा बोलपट भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला.
भारतात-विशेषत: महाराष्ट्रात-हा चित्रपट धो धो चालला. त्याची कीर्ती सातासमुद्रापार गेली. व्हेनीस चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात आला. जरठ विवाहावर टीका करणारा `कुंकू' (दुनिया ना माने), वेश्येच्या पुनरुज्जीवनावर भाष्य करणारा `माणूस'(आदमी) आणि हिंदू-मुस्लीम दंग्यांच्या पार्श्वभूमीवर मैत्रीचा संदेश देणारा शेजारी (पडोसी) हे सामाजिक चित्रपट अफाट गाजले.शांताराम बापूंनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडली. त्यांनी मुंबईत येऊन `राजकमल कला मंदिर' या स्वत:च्या संस्थेची स्थापना केली.
`राजकमल'च्या माध्यमातूनही त्यांनी दर्जेदार चित्रपटांची मालिका सुरू ठेवली. `राजकमल'ने १९४६ साली डॉ. कोटणीसांच्या जीवनावर आधारीत `डॉ. कोटणीस की अमर कहानी', १९५१ सालचा होनाजी बाळांचा `अमर भूपाळी', १९५५ सालचा रंगीत `झनक झनक पायल बाजे', १९५७चा १९५९चा `नवरंग' हे चित्रपट विशेष उल्लेखनीय ठरले. `डॉ. कोटणीस' आणि `दो आँखे' या चित्रपटांमध्ये त्यांनी स्वत: नायकाची भूमिका केली होती. १९७२चा `पिंजरा' या चित्रपटाने मराठी चित्रपटांच्या लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मागे टाकले. `पिंजरा' मराठीतला पहिला संपूर्ण रंगीत चित्रपट होता.शांताराम बापूंना चित्रपट माध्यमाची भाषा उत्तमपणे अवगत होती.
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माता-निर्देशक-नट चार्ली चॅप्लीन यांनी शांताराम बापू यांच्या दिग्दर्शनाचं कौतुक केलं होतं. शांताराम बापूंना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. महाराष्ट्राचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या आचार्य प्र. के. अत्रेंनी शांताराम बापूंना `चित्रपती' ही पदवी दिली. चित्रपट माध्यमातील व्यक्तींना दिला जाणारा भारतातला सर्वोच्य पुरस्कार `दादासाहेब फाळके पुरस्कार' १९८५ साली मा.शांताराम बापूंना प्रदान करण्यात आला, तर १९९२ साली भारत सरकारने त्यांना `पद्मविभूषण' पुरस्कार देऊन सन्मानीत केले.चित्रपटासाठीच्या विषयाची निवड, त्याचा आशय, कॅमेर्यामचे तंत्र, संकलन या सर्व बाबतीत बापूंचे चित्रपट काळाच्या पुढे असत.
चित्रपट हे कलेचं आणि मनोरंजनाचं माध्यम तर आहेच, पण यातून समाजाला योग्य तो संदेशही प्रभावीपणे देता येतो हे त्यांनी जाणले होते. शांताराम बापू अतिशय कडक शिस्तीचे होते. कलाकार आणि तंत्रज्ञांवर त्यांचा वचक असे. भारतीय चित्रपटात पहिल्यांदा ऍनिमेशनचा वापर केला तोही शांताराम बापूंनी. `बॅक लिट' प्रोजेक्शनचा वापर करणारे ते पहिले दिग्दर्शक. शांताराम बापूंनी तीन विवाह केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव विमल, दुसरी जयश्री आणि तिसरी संध्या. जयश्रीला किरण हा मुलगा आणि राजश्री ही मुलगी तर संध्या यांना प्रभात कुमार हा मुलगा आणि मधुरा पंडित ही मुलगी अशी अपत्ये आहेत.
`शांताराम' हे त्यांचं आत्मवृत्त मराठी आणि हिंदीमध्ये १९८६ साली प्रकाशित झालं आहे. आहे. व्ही.शांताराम यांचे ३० ऑक्टोबर १९९० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ. इंटरनेट
संजीव हे इंडियन सुपर लीगमधील एटीके फुटबॉल क्लबचे मालक आहे. २००९-२०१० मध्ये त्यांची ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली. याशिवाय ते IIT खरगपूरचे अध्यक्ष देखील आहेत. २००१ मध्ये कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे अध्यक्ष होते. सर्वात तरूण वयात त्यांनी ही जबाबदारी पार पाडली होती.
बडोद्याहून इ.स. १९४० मध्ये मुंबईत आल्यानंतर बॉम्बे आर्ट सोसायटी गॅलरीमध्ये बाबा पाठक यांनी भरविलेले प्रदर्शन खूप गाजले होते. हा काळ स्वातंत्र्यसमराचा होता. त्यापासून अलिप्त राहणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी पुण्यात आल्यावर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. त्यांच्या अटकेचे वॉरंट निघाल्यावर बाबा काही वर्ष भूमिगत राहिले.
यत शिक्षण शाळेत ते मुख्याध्यपक होते. त्यांचा त्यावेळच्या अनेक साहित्यकांशी मैत्री होती.
Copyright © 2025 | Marathisrushti