(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर

    त्यांच पहिलं नाटक “जयद्रथ विडंबन” हे १९०४ मध्ये प्रकाशित झाल. हे एक संगीत नाटक होत. या नाटकातील पदे तत्कालीन टीकाकारांनी उचलून धरली. त्यांच दुसरे नाटक “दामिनी” हे १९१२ मध्ये प्रसिद्ध झाल. हे नाटक केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श या कंपनीने रंगमंचावर आणले. अशाप्रकारे हिराबाई या पहिल्या महिला नाटककार बनल्या.

  • छत्रपती राजाराम महाराज

    छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी झाला.

    संभाजी महाराजांच्या मृत्यूसमयी राजाराम महाराज यांचे वय अवघे १९ वर्षांचे होते. राजाराम महाराजांच्या वाट्याला फक्त तीस वर्षांचे आयुष्य आले. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर विस्कटलेले स्वराज्य सावरण्याचे महान कार्य राजाराम महाराजांनी केले. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या मराठा साम्राज्याला ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. मोगलांकडे गेलेल्या मराठा सरदारांना मराठ्यांच्या राज्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव करून देताना ते म्हणत, ""हे मऱ्हाठे राज्य तुम्ही आम्ही मऱ्हाठे लोकी इनामासी खता (लबाडी) न करिता मराठा धर्माची दुरे (ईर्ष्या-अभिमान) धरून स्वामिकार्य करावे.'' शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठा धर्माचे रक्षण करणे ही तुमची- माझी सर्वांची प्रामाणिक जबाबदारी आहे, याची जाणीव त्यांनी या सरदारांना करून दिली.

    राजाराम महाराजांनी सटवाजी डफळे, नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, नागोजी माने, गणोजी शिर्के इत्यादी मोगलांकडील मराठा सरदारांना स्वराज्यात परत आणण्याचे काम केले. नावजी बलकवडे, विठोजी करके, बहिर्जी घोरपडे, हणमंतराव निंबाळकर, गंगाजी बाबर, अमृतराव निंबाळकर, गिरजोरी यादव, कृष्णाजी सावंत, चांदोजी व नागोजी पाटणकर, बडोजी ढमाले, मकाजी देवकाते, नामाजी गायकवाड इत्यादी सरदार या काळात नावारूपाला आले.

    राजाराम महाराजांच्या काळात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे पराक्रमी सरदार उदयाला आले. त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य राजाराम महाराजांनी केले. राजाराम महाराजांचा जन्म झाल्यानंतर शिवाजी महाराज म्हणाले होते, ""राजाराम मोगलशाही पालथी घालील.'' त्यांचा हा विश्वास राजाराम महाराजांनी सार्थ ठरविला. दिल्ली जिंकण्यासाठी घोरपडे बंधूंना त्यांनी प्रोत्साहन दिले, तर कृष्णा सावंत यांना फौज देऊन उत्तेरकडे पाठवले. नर्मदा पार करून लष्करी मोहीम काढणारे कृष्णा सावंत हे पहिले मराठा वीर होते. राजाराम महाराजांनी जिंजीवरून महाराष्ट्रातील लष्करी मोहिमांसाठी वेळोवेळी आर्थिक मदत पाठवली. विशेषतः १६९० मध्ये एक लाख होनांचा खजिना त्यांनी रायगडाकडे पाठवला होता.

    स्वराज्याची अर्थव्यवस्था भक्कम असावी याकडे त्यांचे लक्ष होते. अर्थव्यवस्था, लष्करी यंत्रणा, प्रशासन यावर त्यांची उत्तम पकड होती. जिंजीच्या वेढ्यात असताना मोगलांचे संकट टाळण्यासाठी झुल्फिकार खानाबरोबर त्यांनी अंतःस्थ मैत्री प्रस्थापित केली, राजाराम महाराजांनी कृष्णाजी अनंत सभासदांकडून "शिवचरित्र' लिहून घेतले. हा मराठी भाषेचा आणि शिवचरित्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. राजाराम महाराजांनी महाराणी ताराबाईंना युद्धकला, राजनीतीचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे ताराबाईंनी मराठा साम्राज्याचे मोठ्या हिमतीने संवर्धन आणि संरक्षण केले. राजाराम महाराज हे पराक्रमी, निर्भीड, मुत्सद्दी, समंजस, धोरणी, प्रजावत्सल राजे होते. मोगलांशी कडवी झुंज देत स्वराज्याचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.

    १६९७ साली जिंजी मोघलांच्या ताब्यात पडला पण तत्पुर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले होते. महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम महाराजांनी १६९८ मध्ये धनाजी जाधव, परसोजी भोसले आणि खंडेराव दाभाडे यांना घेऊन खानदेशची मोहिम आखली. पण या मोहिमेतच त्यांची तब्येत बिघडली, मोहिमेतून त्यांना सिंहगड किल्लावर नेण्यात आले.

    छत्रपती राजाराम महाराज यांचे ३ मार्च १७०० रोजी सिंहगडावर निधन झाले.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • विनोदी बॉलिवूड कलाकार मोहम्मद उमर अली मुक्री

    मुक्री यांच्या वडिलांची उरण येथे मिठागरे होती. लहानपणापासूनच मुक्री यांना शिक्षण वगैरे क्षुल्लक गोष्टींचे फारसे आकर्षण नव्हते. त्याच्या हाडीमांसी सिनेमाच मुरलेला होता. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९२२ रोजी झाला. एका मुलाखतीत मुक्री यांनी सांगितले होते `उरणमध्ये पूर्वी गल्लीबोळात सिनेमे दाखविले जात. अब्बाजींचा डोळा चुकवून मुक्री हे सिनेमे हटकून बघायचा. एक दिवस चोरी उघडकीस आली. बापाने चांगला मार दिला, पण मुक्री काही सुधारला नाही. वडिलांसमोर अभ्यासाचे नाटक करायचे आणी त्यांच्या माघारी चित्रपट बघायचे हा नेम त्याने काही चुकविला नाही.' वयाच्या दहाव्या वर्षी मुक्रीने घरातून एकदा पलायनच केले. बाप से बेटा सवाई हे अब्बाजींना कळून येताच त्यांनी मुक्रीची रवानगी आपल्या मोठ्या भावाकडे मुंबईला केली.

    शाळेच्या कोंडवा़ड्यापेक्षा बाहेरचे मुक्त जग मुक्रीला अधिक प्रिय होते. मुंबईत आल्यानंतर तर त्याला मोकळे रानच मिळाले. नाना हिकमती लढवून तो सिनेमे बघायचा. त्या विश्वात रंगून जायचा. याच मंतरलेल्या अवस्थेत मुक्रीला सिनेमात काम करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. बोरीबंदरच्या अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीचा सहाध्यायी होता दिलीपकुमार. पुढे दोघेही सिनेमाक्षेत्रात स्थिरावले. दिलीपकुमारची प्रतिमा `लार्जर दॅन लाईफ' असलेल्या नायकाची झाली व मुक्री विनोदी नटाच्याच पायरीवर घुटमळला. पण दिलीपकुमार आपल्या या शाळुसोबत्याला कधीही विसरला नाही. दोघांच्या जिव्हाळ्यामध्ये कीर्ती, पैसा असे लौकिक अडथळेही कधी आले नाहीत. आपल्या अखेरच्या दिवसांतही मुक्री दिलीपकुमारच्या या मनमोकळेपणाचा आदराने उल्लेख करीत असे.

    कुठेतरी मुक्रीची आठवण प्रसिद्ध झाली आहे. चौथी इयत्तेत शिकणारे मुक्री नावाचे कार्टे सरोज मुव्हिटोनच्या मालकापुढे जाऊन उभे राहिले. मला चित्रपटात काम करायला द्या म्हणून त्याच्या खनपटी बसले. त्याकाळी चित्रपटात गाणार्या कलावंतांची परंपरा होती. स्टुडिओच्या म्युझिक रुममध्ये नसीर व झेबुन्निसा या त्यावेळच्या कलावंतांसमोर मुक्रीने अत्यंत भसाड्या आवाजात शिरी फरहाद चित्रपटातले गाणे म्हणायला सुरुवात केली. गाणे म्हणताना मुक्रीने असे काही विनोदी हावभाव केले की म्युझिक रुममधील सर्व मंडळी हसून लोटपोट झाली. खरं म्हणजे मुक्रीला गाणे बजावणे यापैकी काही म्हणजे काही येत नव्हते. पण कॅमेर्यासमोर उभी राहायची आस त्याला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे तो चक्क खोटे बोलून सरोज मुव्हिटोनच्या म्युझिक रुममध्ये गायला उभा राहिला होता. पण खोट्याचेही खरे झाले. मुक्रीला विनोदी नट म्हणून महिना ७५ रुपये पगारावर सरोज मुव्हिटोनमध्ये नोकरी मिळाली.

    अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीने दिलीपकुमारबरोबर अनेक नाटकांत भूमिका केल्या. त्या गाजविल्या. किमान शिक्षण पूर्ण करुन मुक्रीने पुन्हा चंदेरी दुनियेत पाय ठेवला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याच्या कारकिर्दीने एक वळण घेतलेले होते.` नादान' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक म्हणूनही त्याने काम केले. फुल चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम करणार्या मुक्रीला देविकाराणीने हेरले. ठेंगण्याठुसक्या, भरगच्च गालांमधून हसतानाही दांत न दाखविण्याची किमया साधणार्या मुक्रीला देविकाराणीने `प्रतिमा' चित्रपटातील मालकिणीच्या विनोदी नोकराची भूमिका करण्यासाठी पाचारण केले. या चित्रपटातील दिलीपकुमार-मुक्री यांची जोडी पुढे अनेक चित्रपटांत कायम राहिली. कोहिनूर, आन, अमर, अनोखा प्यार, राम और श्याम या चित्रपटांत दिलीपकुमारसमवेत मुक्रीने आपल्या विनोदी आविष्काराने अक्षरश: धमाल उडवून दिली. याचवेळी स्टंटपटांचाही बराच बोलबाला होता.

    स्टंटपट हे तसे दुय्यम दर्जाचेच समजले जात. पण तिथेही मुक्रीने आपल्या अभिनयाची कमाल दाखविली. दणकट पहेलवान शेख मुख्तार याच्या जोडीने मंगू दादा, दिल्ली का दादा, उस्ताद पेद्रो, कैदी नं. ९११ अशा चित्रपटांमधून मुक्रीने बहार आणली. हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसले. त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. शिवाय तो जमानाही कथिलाचा नव्हता. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद या लिजंड्सबरोबर काम करताना मुक्री कधीही दुय्यम कलाकार वाटला नाही. देव आनंदबरोबर असली नकली, काला पानी, राज कपूरबरोबर चोरी चोरी असे काही चित्रपट त्याने केले. त्याकाळचे लोकप्रिय नायक सुनील दत्त, राजकुमार, मनोजकुमार यांच्या संगतीतही मुक्री पडद्यावर रमला.

    विनोदी भूमिका हे त्याचे पंचप्राण होते. तो त्यात जगला, त्याच प्रतिमेत मुक्रीचा श्वासही विरघळला. गोल्डन एरानंतर अँग्री यंग मॅनचे वादळ घोंघावू लागले. चित्रपटसृष्टीमध्ये होणार्या बदलांशी ज्यांनी जुळवून घेतले नाही, असे अनेक कलावंत नंतर मोडीत निघाले. पण या परिवर्तनात मुक्री लव्हाळ्याच्या स्थितप्रज्ञतेने टिकला.

    सुपरस्टार पदाची वस्त्रे राजेश खन्नाने खाली उतरविल्यानंतर आपला तमाम प्रेक्षकगण अमिताभच्या मनस्वी, प्रसंगी विखारी व्यक्तिरेखांमध्ये स्वत:चे प्रतिबिंब पाहू लागले. अमिताभच्या प्रतिमेला खुलविण्यासाठी मुक्रीनेही यथाशक्ती प्रयत्न केले. `बॉम्बे टू गोवा'पासून ते थेट `शराबी'पर्यंत अमिताभ व मुक्री यांच्यामधील विनोदी प्रसंग प्रेक्षकांच्या मनात अजूनही ताजे आहेत. `तय्यब अली प्यार का दुश्मन' हे गाणे फक्त त्याच्यासाठीच जन्माला आले होते. मुक्रीने तब्बल सव्वाशे चित्रपटांतून विविधढंगी भूमिका केल्या.

    चित्रपट कारकीर्दीच्या प्रारंभी तो सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत वावरला. जीवनाच्या अखेरीस मस्तान चित्रपटाचे दिग्दर्शन करुन हे वर्तुळ पूर्ण करण्याची तयारी मुक्रीने केलेली होती, पण त्याच्या निधनामुळे या वर्तुळालाच छेद गेली आहे. हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसला.

    त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. मा.मुक्री यांचे ४ सप्टेंबर २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ समीर परांजपे

  • बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रे

    सोनाली बेंद्रेचा जन्म १ जानेवारी १९७५ रोजी झाला. सोनालीने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. सोनालीने अभिनेत्री म्हणून १९९४ मध्ये आलेल्या झालेल्या 'आग' सिनेमातून पदार्पण केले होते. सोनालीला उत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मात्र, सोनालीचे फिल्मी करिअर काही खास राहिले नाही. तिने अनेक मेगाबजेट आणि मल्टीस्टार सिनेमांत काम केले. सोनाली सिनेमांत हवे तसे यश मिळवू शकली नाही तरी तिने जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले आहे. त्यामध्ये शाहरुख खान (इंग्लिश बाबू देशी मेम), सलमान खान (हम साथ साथ है) आमिर खान (सरफरोश), अमिताभ बच्चन (मेजर साहब), अजय देवगण (दिलजले, जख्म) आणि अक्षय कुमार (तराजू) यांची नावे सामील आहेत. सोनालीने आपल्या ११ वर्षांच्या करिअरमध्ये जवळपास ३० सिनेमे केले. शिवाय तिने, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी सिनेमांतसुध्दा काम केले आहे. २००३ मध्ये रिलीज झालेल्या 'कल हो ना हो' सिनेमानंतर तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. दहा वर्षानंतर २०१३ मध्ये रिलीज झालेल्या 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' सिनेमातून सोनालीने कमबॅक केले. सोनाली बराच काळ चित्रपटांपासून दूर होती. कमबॅक करत तिनं एक-दोन चित्रपट केलेही, पण नंतर तिनं टीव्हीकडे मोर्चा वळवला. 'क्या मस्ती क्या धूम', 'इंडियन आयडॉल', 'इंडियास गॉट टॅलेंट', 'सिनेस्टार की खोज' असे एकामागोमाग एक रिअॅलिटी शोज तिला मिळत गेले. सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीत काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अनाहत’ या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. अगं बाई अरेच्चा या चित्रपटातील ‘छम छम करता है ये नशिला बदन’ या गाण्याच्या तालावर आपल्या सर्वांना थिरकायला लावून सोनाली ने एक धक्का दिला होता. सोनाली ने ‘पालकत्व’ या विषयावर एका उत्तम, दर्जेदार पुस्तकाचे लिखाण केले आहे. हे पुस्तक कथेच्या स्वरुपात आणि तिच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित आहे. पालकत्वाची जबाबदारी सांभाळताना येणारे सुखद अनुभव याबरोबरच आयुष्यातील चढ-उतार त्यांनी नीटनेटकेपणे मांडले आहेत. या पुस्तकात सोनाली बेंद्रे ने आपल्या मुलासोबतचे वेगवेगळे अनुभव मांडले असून चांगले पालक होण्यासाठी नेमके काय करायला हवे हे समजते. सोनालीने निर्माता गोल्डी बहलसोबत लग्न केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव

    सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांची ओळख महाराष्ट्रातील व्यासंगी-प्राच्यविद्यापंडित व मराठी कोशसाहित्यकार, महामहोपाध्याय अशी होती.डॉ. श्री. व्यं. केतकर यांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळा’त सहसंपादक म्हणून त्यांची १९२१ मध्ये नियुक्ती झाली. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १८९४ पुणे येथे झाला. महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील वेदविद्या खंडाच्या संपादनकार्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. महाराष्ट्रात ऋग्वेदविषयक अध्ययनाचा पाया घालून त्यांनी संपूर्ण ऋक्‌संहितेचे मराठी भाषांतर प्रथम प्रकाशित केले (१९२८). ‘भारतीय चरित्रकोश मंडळ’ या संस्थेचे ते संस्थापक व अध्यक्ष आहेत. ह्या संस्थेतर्फे त्यांनी भारतवर्षातील प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन काळातील प्रसिद्ध व्यक्तींचे तीन कोश संपादून ते प्रसिद्ध केले (१९३२, १९३७, १९४६). त्यातील भारत वर्षीय प्राचीन चरित्रकोशाच्या सुधारलेल्या हिंदी आवृत्तीस (१९६४) अहिंदी प्रांतांत प्रकाशित झालेला सर्वोत्कृष्ट हिंदी ग्रंथ म्हणून मध्य प्रदेश सरकारचे पारितोषिक मिळाले (१९६७). अथर्ववेदाचे मराठी भाषांतरही त्यांनी केले आहे. यांशिवाय पतंजलीच्या महाभाष्याचा महाभाष्यशब्दकोश, पाणिनीच्या अष्टाध्यायीचा व गणपाठाचा शब्दकोश हे ही ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले आहेत. प्राचीन भारतीय स्थलकोश ते संपादित असून त्याचा प्रथम खंड प्रकाशित झाला आहे (१९६९). पुरीच्या श्री शंकराचार्यांकडून ‘महामहोपाध्याय’ (१९५७) व चिदंबरम्‌च्या शंकराचार्यांकडून ‘विद्यानिधि’ अशा उपाध्याही त्यांना प्राप्त झाल्या आहेत. एक मान्यवर संस्कृत पंडित म्हणून राष्ट्रपतींचे संस्कृत सन्मानपत्र त्यांना मिळाले (१९६५). त्यांच्या विद्वत्कार्याच्या गौरवार्थ रिव्ह्यू ऑफ इंडॉलॉजिकल रिसर्च इन लास्ट सेव्हंटी फाइव्ह यीअर्स हा इंग्रजी ग्रंथ राष्ट्रपतींच्याच हस्ते त्यांना अर्पण करण्यात आला (१९६७). पुणे विद्यापीठाने डी. लिट्. ही सन्मानपदवी त्यांस दिली (१९६९). १९७१ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला. प्राच्यविद्यांच्या प्रसारार्थ त्यांनी केलेले ज्ञानकार्य चिरंतन स्वरूपाचे असून ते सर्व अभ्यासकांना प्रेरक ठरणारे आहे. सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचे ६ जानेवारी १९८४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ विश्व कोष

  • सुप्रसिद्ध अभिनेते मधुकर तोरडमल

    शाळेत पहिल्या दिवशी ओळख करून देताना त्यांनी नाटकात काम करण्याचा छंद असल्याचे वर्गशिक्षिका जयकर बाईंना सांगितले. बाईंनी ते लक्षात ठेवून गणेशोत्सवात एका नाटकाची संपूर्ण जबाबदारी मामांवरच सोपविली.

  • १० मे – कवी ग्रेस यांची जयंती

    कवी ग्रेस हे मराठी कवितेच्या प्रांतावर मौलिक ठसा उमटवून गेलेले कवी...'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' या काव्याने घरोघरी पोहचलेले माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस. त्यांचा जन्म १० मे १९३७ रोजी झाला.

    माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांची मर्ढेकरोत्तर नव कवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये गणना होते. ग्रेस मूळचे नागपूरचे. त्यांचे वडील सैन्यात होते. नागपुरातील कर्नल बाग परिसरात त्यांचं बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेलं. आईच्या अकाली निधनामुळे नोकरी व शिक्षण यांच्यात मेळ साधत त्यांना आपली प्रतिभा जपावी लागली. १९६६ मध्ये ते नागपूर विद्यापीठातून मराठीमध्ये एम.ए. झाले. त्यानंतर दोन वर्षं त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजमधे अधिव्याख्याता म्हणून नोकरी केली. १९६८ पासून १९९७ साली निवृत्त होईपर्यंत ते नागपूरमधील वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे प्राध्यापक होते. निवृत्तीनंतर काही काळ ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मराठी विभागात सौंदर्यशास्त्र या विषयाचं अध्यापनही करत होते. ग्रेस यांच्या लिखाणाला सुरुवात झाली १९५५ सालापासून. 'छंद', 'सत्यकथा' या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता सुरुवातीला प्रसिद्ध झाल्या. १९६७ साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह 'संध्याकाळच्या कविता' प्रसिद्ध झाला. त्यांचं समकालीन कवितेत असलेलं वेगळेपण या कविता संग्रहामुळे अधोरेखित झालं. मुक्तछंदाचा प्रभाव असणाऱ्या या काळात ग्रेस यांनी निष्ठेने वृत्तबद्ध आणि नादानुसारी लयविभोर काव्यरचना केली.त्यामुळे त्यांची कविता सौंदर्यवादी असूनही तिला अभिजाततेची वैशिष्ट्यं प्राप्त झाली. यानंतर प्रसिद्ध झालेल्या राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४), चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७), सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५), सांजभयाच्या साजणी (२००६) आदी संग्रहांमधून त्यांची कविता अधिक गूढ आणि व्यामिश्र होत गेलेली जाणवते. मा.ग्रेस हे विलक्षण आत्ममग्न कवी होते. ग्रेस एक बेट आहे आणि या बेटाला समजून घेण्यासाठी त्या बेटावरच यावे लागते असे मा.ग्रेस वारंवार म्हणायचे. मा.ग्रेस यांचे मराठीसोबत इंग्रजी व उर्दू भाषांवर प्रभुत्व होतं. त्यांच्या कवितांमधून याचा प्रत्यय येतोच, पण त्यांच्या व्याख्यानांमधे व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यक्रमांमधूनही त्यांच्या प्रखर वाणीचा अनुभव रसिकांना येत असे. मा.ग्रेस यांच्या काव्याइतकीच मोहिनी त्यांच्या ललित लेखनानेही वाचकांच्या मनावर घातली आहे. 'चर्चबेल' हा त्यांचा पहिला ललित लेख संग्रह १९७४ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर 'मितवा', 'संध्यामग्न पुरुषाची लक्षणे', 'मृगजळाचे बांधकाम', 'वाऱ्याने हलते रान', 'ओल्या वेळूची बासरी' हे त्यांचे ललित लेख संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. " मा.माणिक गोडघाटे यांनी कवी म्हणून 'ग्रेस' हे नाव धारण करण्यामागे कारण ठरली ती लोकप्रिय पाश्चात्त्य अभिनेत्री इन्ग्रीड बर्गमन. 'द इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस' या चित्रपटात इन्ग्रीडसंबंधी 'शी इज इन ग्रेस' असं वाक्य उच्चारलं जातं. हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि आपल्याला प्रतिभेचा पहिला साक्षात्कार झाला, असं ग्रेस यांनी म्हटलं आहे. इन्ग्रीडचे ऋण आठवणीत राहावं यासाठी त्यांनी कायमस्वरूपी 'ग्रेस' हेच नाव लावलं. स्वतःला त्यांनी दुःखाच्या स्वाधीन केले होते. त्याबाबतीत त्यांनी म्हटलेले आहे, "मी महाकवी दुःखाचा म्हणत, दुःखाचा धागा विणताना, दगडाचे माझ्या हाती, वेगाने फूल होते'. मा.ग्रेस यांच्या ‘ती आई होती म्हणुनि...’ या गीताबद्दल, मा.ग्रेस यांच्या आईचे जेव्हा निधन झाले, त्यांना ही कविता सुचली. त्यांच्या विषण्ण मनाने ही कविता लिहिली. ग्रेस यांच्या कवितेतल्या शब्दांना हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरांनी साद घातली आणि एक अजरामर गीत जन्माला आलं...

    ती गेली तेव्हा रिमझिम
    पाऊस निनादत होता
    मेघात अडकली किरणे
    हा सूर्य सोडवीत होता...

    पावसाचा रिमझिम निनाद दु:खाचा सांगावा घेऊन येणारा...आई गेल्यानंतरचं पोरकेपण सांगणारा...जाणारी ती आई होती म्हणून घनव्याकूळ करणारा... हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वरांमधून ग्रेस यांची ही कविता ऐकताना आपल्या मनाची अवस्था कशी होते हे सांगण्यासाठी शब्द बापुडे होतात. पावसाच्या प्रत्येक थेंबात दु:ख ठिबकत राहावं ना, अगदी तसच वाटत राहतं. त्यांच्या इतर ''भय इथले संपत नाही'',घर थकलेले संन्यासी '',पाऊस कधीच पडतो''अशा या सुंदर कवितांना ही हृदयनाथ यांनी आपल्या सुरेल स्वरांच्या कोंदणात बसवून अजरामर केले आहे. ग्रेस यांच्या ''संध्याकाळच्या कविता''या संग्रहाला १९६८ मध्ये महाराष्ट्र सरकारचे ''कवी केशवसुत''पारितोषिक मिळाले .त्यांच्या ''वाऱ्याने हलते रान'' या ललितबंध संग्रहाला २०१२ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.२०१२ साली ''युनिक फीचर्स ''ने आयोजित केलेल्या ''दुसऱ्या मराठी ई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय गुणी व प्रतिभाशाली संगीतकार रोशन हे ग्रेस यांचे आवडते संगीतकार. 'चर्चबेल' या ललित गद्याच्या पुस्तकात ग्रेस यांचा 'रोशनची गाणी' या शीर्षकाचा अतिशय सुंदर लेख आहे. त्यात सुरवातीलाच ग्रेस म्हणतात, 'मी रोशनचे छायाचित्र पाहिले आहे, पण त्याला भेटू शकलो नाही. भेटायची खूप इच्छा होती. अशा ब-याच गोष्टी राहून गेल्या आहेत; राहून जातात. मृत्यू असं काही करुन जातो.' ग्रेसनी, रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या 'बहुबेगम' चित्रपटातील कव्वालीतील वाकिफ़ हूं खूब इश्क की तर्जे-बयां से मैं, ऐसे में तुझको ढूंढके लाऊं कहां से मैं! या ओळी उद़्धृत करुन, रोशनना आदरांजली वाहिली होती. ग्रेस यांचे २६ मार्च २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    ग्रेस यांचे कवितासंग्रह
    संध्याकाळच्या कविता (१९६७)
    राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४)
    चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७)
    सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५)
    सांजभयाच्या साजणी (२००६)
    बाई! जोगिया पुरुष (२०१२)

    ललितबंध संग्रह
    चर्चबेल (१९७४)
    मितवा (१९८७)
    संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (२०००)
    मृगजळाचे बांधकाम (२००३)
    वाऱ्याने हलते रान (२००८)
    कावळे उडाले स्वामी (२०१०)
    ओल्या वेळूची बासरी (२०१२)

    ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस होता
    https://youtu.be/pM3eOOP786w
    भय इथले संपत नाही.
    https://youtu.be/x88r7JI4ljU
    तुला पाहिलें मी नदीच्या किनारीं
    https://youtu.be/e_-9GiAMInY

  • कविवर्य वामन रामराव कांत म्हणजेच वा. रा. कांत

    बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात असे सर्वांच्या ओठी असलेले गीत लिहिणारे कविवर्य वामन रामराव कांत म्हणजेच वा. रा. कांत यांची पुण्यतिथी ८ सप्टेंबर रोजी झाली.

    आशयगर्भ आणि भावतरल कविता लिहिणा‍ऱ्या कविवर्य कांतांनी दोन पारतंत्र्यं पाहिली ती म्हणजे एक इंग्रजांचं व दुसरं कांत कुटुंब जिथं रहात होतं, त्या मराठवाडा भूमीवरचं निजामांचं जुलमी पारतंत्र्य. जिथं मराठी भाषा बोलण्यासही बंदी होती. अशा परिस्थितीतही कांतांचं काव्यलेखन स्वतःच्याच स्फूर्तिदायक व स्वातंत्र्यांचं स्फुल्लिंग उजळीत समृद्ध होत होतं. पारतंत्र्यातच प्रसिद्ध झालेला कविवर्य कांतांचा 'रुद्रवीणा' हा काव्यसंग्रह त्यावेळेस मराठवाड्यातच नाही तर उभ्या महाराष्ट्रात लक्षवेधक ठरला. 'रुद्रवीणा' या कवितासंग्रहात कांतांच्या कवितेतील राष्ट्रीय ओजस्वीपणा व प्रणयगीतातील सोज्वळ हळुवारपणा अन्‍ भावमधुर शब्दशैली वाचकांचं लक्ष वेधून गेली. त्यानंतर आयुष्याच्या अखेरीपर्यंत कवी कविवर्य कांतांनी मराठी सारस्वताची सेवा केली. मात्र मराठी सारस्वताने त्यांची काहीशी उपेक्षाच केली.

    वा. रा. कांत हे मात्र महाराष्ट्राच्या साहित्यपटावर प्रसि‌द्धीपरांगमुखच राहिले. साठ संवत्सरांच्या आपल्या काव्यप्रवासात कांतांनी एकूण 14 काव्यसंग्रह लिहिले. त्याशिवाय 10 अनुवादि्त ग्रंथ, 11 नाट्यकाव्यं, 2 नाटकं. कांतांनी साहित्याचे अनेक प्रकार हाताळले. त्यांनी आपल्याच कवितेवर प्रयोग करून 'दोनुली' हा कवितासंग्रह एका वेगळ्याच काव्यबंधात रसिकांसमोर ठेवला. पण या काव्यप्रकाराची काव्यसमीक्षकांनी हवी तशी दखल घेतली नाही. कदाचित या काव्यप्रकारामुळे मराठी साहित्यात काही मूल्यात्मक भर पडली नसेल, पण या कवितासंग्रहाने मराठी काव्यप्रांतात मौलिक अधिष्ठान दिलं आहे हे विसरता कामा नये. मराठी काव्यसमीक्षकांनी माझ्या कवितेची योग्य दखल घेतली नाही, अशी खंत कांतांनी अखेरच्या दिवसात बोलून दाखवली होती. वार्धक्याने हताश झालेल्या कांतांची या आजारपणातही काव्यलेखनाची उमेद शाबूत होती. तिथेच आपल्या शब्दांना त्यांनी बजावून सांगितलं होतं - 'मी पंगू झालो म्हणून तुम्ही अपंग होवू नका माझ्या शब्दांनो!' ज्या राजकीय, सामाजिक वातावरणात कांत आपला जीवनप्रवास करीत होते त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत सतत प्रकर्षानं परावर्तीत होत होते. फक्त राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय घटनांचे भान हा कांतांच्या कवितेचा, प्रतिभेचा खास पैलू होता. स्व. जयप्रकाश नारायण यांनी तेव्हा चालविलेल्या चळवळीवर लिहलेली कविता- पांढरे शुभ्र वादळ, महात्मा गांधींवरील 'राजघाट' ही कविता वा चीनमध्ये झालेल्या सामाजिक लढ्याच्या संदर्भात चीनच्या भिंतीवर तैयानमेन चौकात झालेल्या रक्तरंजनावर लि‌हिलेली 'भिंतीला फुटले पंख' ही कविता - एकंदरीत या सगळ्याच कविता तत्कालीन सामाजिक व्यथांचा उद्घोष करणाऱ्या आहेत. व्हिएतनाम व बांगलादेश येथील सामाजिक दुरावस्था व शोषणावरही कांतांनी प्रहार केला आहे. क्रांतिदर्शी, प्रकाशपूजन, देहभान जागवून बेभान करणारी कांतांची कविता ही अगदी भावतरल, संवेदनशील व हळुवारही होती. जीवनातील सौंदर्य, सुखदुःख, प्रीतिचवियोग, मृत्यू आदी जीवनानुभवांना सजीवपणे प्रकट करीत कांतांची कविता वाचकांना खचीतपणे अंतःर्मुख करणारी आहे. अन् ही कविताच कांतांच्या पारदर्शक व्यक्तिमत्त्वाची प्रमाण होतं. शब्द माझा धर्म / शब्द माझे कर्म / शब्द हेच वर्म / ईश्वराचे असं म्हणणारे कांत आपल्या अखेरच्या कवितासंग्रहात 'मावळते शब्द'मध्ये लिहतात -

    'जे शोधित होतो जीवनात दिन-रात

    ते नाही सापडले कधीही शब्दात

    शब्दातूनी शब्दच फिरूनी हाती आला

    दोन्हीतूनी अंती अर्थ गळूनिया गेला

    कविताही काय अंती एक निसटणे

    लाटांची लीला गळ टाकोनी बसणे -'

    आपल्या साठ वर्षांच्या काव्यलेखनानंतरही कांतांची ही गळ टाकून बसण्याची अन्कबवितेची मासोळी गळातून निसटून जाण्याची व्यथा म्हणजेच अजूनही सर्वपूर्ण कविता हाती लागायची आहे ही अतृप्ती दाखवनते. विचारांची परिपक्वता, प्रतिभेची प्रगल्भता व व्यापक मानवतावादी दृष्टि्कोन या कलागुणांवर आरुढ असलेली कांतांची कविता पुढे जीवनानुभूतीचं गहिरेपण घेऊन विशाल पण तितकीच व्यापक अन्‍ गहनखोल जलाशयासारखी आहे. काठावर बसून या जलाशयावरचे तरंगच तितके आपल्याला पहायला मिळतील.

    मराठी वाङ्मयाच्या उत्तुंग क्षितिजावर कांतांनी शब्दांचं नवीन आकाश उभं करण्याबरोबरच मराठी कवितेस समृद्ध केलं. निदान कांतांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात तरी या वास्तवाचा मराठी समीक्षकांनी व साहित्य रसिकांनी मोकळ्या व उदात्त मनाने स्वीकार करायला हवा आहे. प्रा. डॉ. उषा जोशींनी 'पंचधारा'च्या कांत विशेषांकात कांतांच्या कवितेबद्दल आदरभाव व्यक्त करीत असताना लिहिलं आहे- 'कांतांच्या काव्यरचनेत अनेक विभ्रम तसेच रचनेचे अनेकविध बंध आहेत. त्यांच्या विशिष्ट भाववृत्तीतून निर्माण झालेली कविता सदैव सतेज, टवटवीत, रसरशीत आहे. त्यांच्या कवितेची तुलना कुणा इतर कवीबरोबर करावी हा एकदम धोकादायक व निसरडा प्रांत आहे. कांतांची कविता ही अलौकिक सौंदर्याचे वरदान घेवून आलेली आहे. ती चिरतरुण, सुंदर व गुणसंपन्न आहे.' डॉ. उषा जोशींचं कांतांबद्दलचं, त्यांच्या कवितेबद्दलचं मत सर्वथा बरोबर आहे. कारण स्वतः कविवर्य कांतांना शंभर वर्षांनंतर आपल्या कवितेचं भाकीत माहित होतं. म्हणूनच आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात कांत म्हणतात -

    दिव्याचे तेज डोळ्यांचे वेज कोण तिथे जाळीत आहे

    शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?

    -माझी उन्हे मावळली आहेत

    माझी फुले कोमेजली आहेत

    कालचा प्रकाश कालचा सुवास मात्रा वेलांटीत शोधीत आहे

    शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?

    आजची फुले आजच्या उन्हात

    पाखरांचा शब्द पिकला रानात

    माझी कविता तिथे वाचा जिथे ती दिनरात घडत आहे

    शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?

    वा.रा कांत* यांचे ८ सप्टेंबर १९९१ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ.मु.वा कांत / म.टा

  • द रियल हिरो – हिमांशू रॉय

    मुंबई हल्ल्यानंतर रॉय यांनी भारतावर वाकडी नजर ठेवणाऱ्यांच्या हातचे बाहुले बनलेल्या अनेक दहशतवाद्यांकडून अत्यंत महत्त्वाची माहिती काढून घेतली होती. पुन्हा असा हल्ला होणार नाही, यासाठी त्यांनी स्वत:च एक अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला होता. त्यामुळे ते खूपच आत्मविश्वासाने म्हणत होते की, मी मुंबईत असेपर्यंत आता कुणी मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही.

  • बोला अमृत बोला – ज्योत्स्नाबाई भोळे ह्यांच्या सहवासातील आठवणी

    मराठी रंगभूमीचा तो सोनेरी काळ सोन्याचा करणाऱ्या ज्योत्स्नाबाई भोळे ह्यांचा मला स्नेहार्द्र सहवास लाभला, पुण्याच्या आपटे रोडवरील स्वरवंदना ह्या त्यांच्या निवासस्थानी माझे जाणे होते ! आजही त्यांची गाणी रेडिओवर जेव्हां ऐकू येतात, तेव्हां कान आपोआप तिकडे वळतात !

    त्यांचे चिरंजीव श्रीमान सुहास भोळे हे माझ्या वडिलांचे, पुण्यातील भांडारकर रोडवरील बाल शिक्षण मंदिर शाळेच्या चिंचोरे गुरुजींचे तेव्हाचे विद्यार्थी होते. माझे वडील सुहास भोळे ह्यांची शिकवणी घ्यायला स्वरवंदनामध्ये जायचे. त्या अनेक आठवणी ज्योत्स्नाबाई ह्यांच्या मनात शेवटपर्यंत जाग्या होत्या. गप्पांच्या ओघात, त्या मला सगळ्या आठवणी सांगायच्या. मुलाच्या शिकवणीच्या वेळी, घरात, गाणं, नाटक, ह्याविषयी कसलीही चर्चा चालायची नाही, तंबोरा, पेटी ह्याचे आवाजही नसायचे. त्यां नेहेमी म्हणायच्या, "उपेंद्र, तुझे वडील, चिंचोरे गुरुजी पक्के हाडाचे शिक्षक होते, त्याकाळी आमचे कुलवधू नाटक खूप जोरात होते, खूप दौरे व्हायचे. पुण्यातल्या प्रत्येक प्रयोगाला आम्ही गुरुजींना आमंत्रण द्यायचो, पण ते म्हणायचे, "अहो, मी शिक्षक आहे, शिकवणे एवढेच माझे काम आहे, नाटकाला कसा येऊ?" हं, एकदा मात्र, नगरला आमचा प्रयोग होता, तेव्हां चिंचोरे गुरुजी, त्यांचे गावी नगरमध्ये होते, त्यादिवशी मात्र, गुरुजी प्रयोगाला आवर्जून आले, इतकंच काय, प्रयोग संपल्यावर, विंगेत येऊन चिंचोरे गुरुजींनी आमचं कौतुकही केलं" !

    मी त्यांना एकदा म्हणालो, "अहो, आपले चिरंजीव सुहास, स्कॉलरशिप परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यावर, आपण माझ्या वडिलांना चांदीच्या भांड्यातून पेढे दिले होते, ते चांदीचे भांडे आजही आमच्या घरी उपयोगात येते, विशेष म्हणजे दरवर्षी गुढी उभारतांना काठीवर आपण दिलेले ते चांदीचे भांडे ठेवले जाते आणि त्याभोवती रेशमी वस्त्र नेसवले जाते"! मी सांगितलेली ती आठवण ऐकून ज्योत्स्नाबाई पुन्हा जुन्या आठवणीत शिरल्या !

    ज्योत्स्नाबाई ह्यांचे जावई ब्रिगेडियर विजय खांडेकर हे सुद्धा माझ्या वडिलांचे विद्यार्थी, मला त्यांचाही सहवास मिळाला होता, हे माझे अहोभाग्य !
    मा. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा पुरस्कार ज्योत्स्नाबाई ह्यांना जाहीर झाला, त्यादिवशीही आमची गप्पांची मैफल त्यांचे घरी वरच्या मजल्यावरजमली होती !

    आज अकरा मे, वंदनीय ज्योत्स्नाबाईंची आज जयंती आहे, त्यांचे पवित्र स्मरण कायम मनात आहे, "बोला अमृत बोला" गाणं म्हणणाऱ्या ज्योत्स्नाबाई नेहेमीच अमृतमय बोलायच्या,

    -- उपेंद्र चिंचोरे