(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • पॉपस्टार रेमो फर्नांडिस

    ‘प्यार तो होना ही था‘ चित्रपटातील दमदार टायटल सॉंग, हम्मा हम्माचा सुपरहिट ताल आणि ओ मेरी मुन्नी सारखा हट के अल्बम, अशा आपल्या मोजक्या कामानेही संगीतकार रेमो फर्नांडिसने मनोरंजन क्षेत्रावर आपली मुद्रा उमटवली आहे. गोमंतकीय संस्कृतीचे वेगळेपण कायम आपल्या संगीतातून देशापुढे रेमो यांनी मांडले आहे. रेमो फर्नांडिस यांचे पूर्ण नावलुईस रेमो डी मारिया बर्नॅर्डो फर्नांडिस. त्यांचा जन्म ८ मे १९५३ रोजी झाला.

    रेमोला नवी पिढी ओळखते ती त्याच्या 'ओ मेरी मुन्नी' या एकमेव हिंदी गाण्यांच्या अल्बमवरून. याहून थोडं मागे गेल्यास 'प्यार तो होना ही था' या अजय देवगण-काजोल च्या चित्रपटाच्या शिर्षकगिताचा गायक म्हणून आणि त्यापेक्षाही थोडं मागे गेल्यास 'बॉम्बे' चित्रपटात रेमोने गायलेल्या 'हम्मा, हम्मा' या गाण्यावरून त्याची ओळख अनेकांना पटेल. त्यापेक्षाही जुन्या लोकांना रेमोने गायलेल्या 'ये है जलवा' या गाण्यावर थिरकणारी अर्चना पुरणसिंग आठवेल. मात्र हिंदी चित्रपटात रेमोने गायलेली गाणी ही त्याच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीचा एक टक्का देखील परिचय करून देण्यास समर्थ नाहीत, इतकी त्याची या क्षेत्रातील कारकिर्द मोठी आहे. रेमो फर्नांडिस यांचा पणजी येथे बर्नॅर्डो आणि लुईझा फर्नांडिस या गोवन कॅथोलीक दाम्पत्याच्या पोटी रेमो चा जन्म झाला, तेव्हा त्याचे वडिल गोव्यातील समाजवादी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते होते.

    घरात रॉक-पॉप संगिताचं वातावरण अजिबातच नव्हतं. एक दिवस रेक्स नावाच्या रेमोच्या चुलत भावाने पुण्याहून 'रॉक अराउंड द क्लॉक' नावाची एक रेकॉर्ड त्याच्यासाठी आणली. 'बिल हॅलॅ ऍण्ड हीस कॉमेटस' या अमेरिकेतल्या गाजलेल्या रॉक ऍण्ड रोल बॅण्डने तयार केलेल्या या रेकॉर्डने रेमोचं आयुष्यच बदलवून टाकलं. या वेळी रेमोचं वय होतं अवघं आठ वर्ष. त्यानंतरची दहा वर्ष रेमोने रॉक-पॉप क्षेत्रातील गुरूंची एकलव्य-स्टाईल मुशाफिरी करण्यात घालवली. ईल्व्हीस प्रिसले, क्लीफ रिचर्डस्, द शॅडोस, द रोलींग स्टोन्स, आणि द बिटल्स -- एक ना अनेक रॉक बॅण्डला ऐकत तो मोठा होउ लागला. सत्तरच्या दशकात रॉक संगिताने अमेरिकेच्या सिमा उल्लंघून जगाला वेड लावायला सुरवात केली. लॅटीन, आफ्रिकन, वेस्टर्न क्लासिकल, आणि जॅझ संगिताबरोबर रॉक म्युजिक चे फ्युजन बनु लागले, आणि हळूहळू 'लेट्स रॉक' हे सगळ्या जगाचंच आवडतं वाक्य बनलं. रेमो त्या वेळी शाळकरी होता. मात्र शाळेतील चार मित्रांबरोबर त्याने 'बिट फोर' नावाचा रॉकबॅण्ड तयार केला होता. या बॅण्डबरोबर काम करतांना त्याच्या हाती गिटार आली, आणि तेव्हापासून बास गिटार आणि रेमो यांचं अतुट नातं जुळलं ते आजतागायत कायम आहे. शालेय शिक्षण संपवून रेमो आर्किटेक़्ट बनण्यासाठी मुंबईला आला. मायानगरी म्हणजे कलाकारांचं नंदनवनच. कॉलेजला बुट्टी मारून गिटार वाजवण्याच्या कार्यक्रमांना जाणे हा रेमोचा आवडता उद्योग बनला. या कालावधीत त्याने हिंदी आणि मराठी भाषा शिकली. सितार आणि बासरी कशी वाजवायची हे तो स्वतःहूनच शिकला. आज हिंदी, मराठी, कोकणी, ईंग्रजी, पोर्तुगिज आणि फ्रेंच या भाषांमध्ये तो गाणी लिहतो.

    गोवन, पोर्तुगिज, सेगा, मॉरिशस आणि सिसेलस, आफ्रिकन, लॅटिन, क्युबा, निकाराग्वा या सगळ्या संगितप्रकारांमध्ये ही गाणी कंपोज करतो. आणि जगभर ही गाणी सादर करतो. गोव्यात लहानाचा मोठा होत असतांना रेमोने अनेक युरोपिअन हिप्पी पाहिले होते. तेव्हाच त्याने युरोपमध्ये 'ईंडियन हिप्पी' बनुन जायचं असं ठरवलं होतं. आज आपलं स्वप्न तो जगतोय. मुंबईतील चार वर्षांचं वास्तव्य आणि त्यानंतर वेगवेगळ्या बॅण्डबरोबर केलेले युरोप आफिकेचे दौरे रेमोला गोव्यापासून तोडू शकले नाहीत. युरोपमध्ये स्थायिक होण्याची सुवर्णसंधी जवळ असतांना हा अवलीया भारतात परत आला. गोव्यात मात्र त्याचं हवं तसं स्वागत झालं नाही. 'घर की मुर्गी दाल बराबर' या भारतीय लोकांच्या स्वभावाचा त्याला परिचय आला. ईंग्रजीत लिहलेली आणि कंपोझ केलेली रेमोची गाणी रेकॉर्ड करायला एकही कंपनी तयार होई ना. आणि आपल्या संगित साधनेशी तडजोड करायला रेमो तयार नव्हता. १९८० च्या दशकामध्ये भारतीय रेडिओ स्टेशन्सवरदेखील रॉक पॉप संगिताला अनुकुल वातावरण नव्हते. त्यामुळे गाणं लोकांपुढे आणावं कसं, हा यक्षप्रश्न रेमोपुढे होता. मात्र हार मानेल तो रेमो कसला?

    गोवन क्रेझी नावाची एक रेकॉर्ड कॅसॅट त्याने पोर्टास्टुडिओ या घरगुती टेपरेकॉर्डरवर रेकॉर्ड केली. यातली सगळी गाणी रेमोनं स्वतः लिहली, संगितबद्ध केली आणि रेकॉर्ड केली. गाण्यातील विविध आवाज त्याने एकट्याने काढले. सगळी वाद्ये स्वतःच वाजवली. स्वतःच साउंड इजिनिअर बनुन या अल्बमचं मिक्सिंग केलं. अल्बमचं कव्हरही स्वतःच डिझाईन केलं. आणि मुंबईला जाऊन कॅसॅटसच्या प्रती काढून आणल्या. या कॅसॅटस घेऊन तो आपल्या तुटक्या स्कुटरवर गोव्यातील मार्केटमध्ये स्वतः फिरायला लागला. दुकानदारांना आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याने आपल्या गाण्याच्या बोलांचं एक पुस्तकही स्वतःच्या हस्ताक्षात लिहून स्वतःच सायक्लोस्टाईल प्रिंटरवरती प्रकाशित केलं. शिवाय पोस्टकार्ड, टि शर्ट्स आणि टोप्यांवरती आपल्या अल्बमचं चित्र काढून या गोष्टी कॅसॅटसबरोबर वाटायला सुरवात केली. याला मेहनत म्हणावे की साधना की वेड म्हणावे? हे अविश्वसनिय काम रेमोने एक दोन नव्हे, तर तब्बल सहा वर्षांपर्यंत केलं. 'गोवन क्रेझी' नंतर त्याने ओल्ड गोवन गोल्ड आणि ईतर कॅसॅटसही प्रकाशित केल्या.

    सन १९८६ पंतप्रधान राजीव गांधी यांची गोवा भेट. या भेटीदरम्यान रेमोने 'हॅलो राजीव गांधी' हे गाणं स्टेजवर सादर केलं. यात राजीव गांधी यांना 'ड्युड, बडी' अश्या एकेरी संबोधनांनी संबोधीत केल्यामुळे रेमो नव्याच वादामध्ये फसला. मात्र शेवटी राजीव गांधींनीच हे गाणं आपल्याला मनापासून आवडल्याचं जाहीर केलं आणि रेमोची या वादातून सुटका झाली. यामुळे त्याला भारतभर प्रसिद्धी मात्र मिळाली. २००७ मध्ये मिळालेला पद्मश्री पुरस्कार ही याची पावतीच म्हणावी लागेल. रॉक म्युजीकचा उपयोग जन-आंदोलनादरम्यान लोकांच्या भावना बोलत्या करण्यासाठी केला जातो, याची रेमोला जाणीव आहे. त्यामुळेच त्याने भोपाळ गॅस दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी झालेल्या संगितमय कार्यक्रमामध्ये स्वतःसाठी दोन गाणी मागुन घेतली. हा कार्यक्रमा आणि त्यानिमित्ताने ही गाणी त्यावेळला दुरदर्शनवरून संपुर्ण देशभर दाखवली गेली आणि रेमोचं नाव युवकांच्या ओठावर येऊ लागलं. याच दरम्यान जलवा चित्रपटाचं शिर्षकगित गाण्याची ऑफर त्याला आली आणि तेव्हा मुंबईतच असल्यामुळे त्याने सहज म्हणुन ते गाणं गायलं. पुढे या गाण्याने काय चमत्कार घडवला ते आपण जाणतोच.
    बॉलीवूड मध्ये नावारूपाला आल्यावर मुंबई सोडण्याचं जिगर मोठमोठे कलाकार दाखवू शकत नाहीत. रेमो मात्र या सगळ्याला अपवाद आहे. कुणातरी (रॉक न जाणणार्र्या) संगितकाराने बनवलेलं गाणं कुणातरी (रॉक न जाणणार्र्या) गितकाराने लिहलेलं गित आपण त्यांच्या स्टाईलमध्ये गायचं, म्हणजे आपल्या संगिताचा अपमान आहे असं त्याचं मत होतं. त्यामुळे बॉलीवुडसाठी गाणी म्हणायचं त्याने टाळलं.

    १९९५ मध्ये ए आर रेहमान ने मणिरत्नमच्या 'बॉम्बे' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीमध्ये 'हम्मा हम्मा' हे गाणं गाण्यासाठी रेमो ला विनंती केली. या गाण्याचे हिंदी बोल मात्र मी लिहणार, आणि ते माझ्या पद्धतीने सादर करणार, असा बाणेदारपणा प्रत्यक्ष रहमानला दाखवण्याचं धाडस रेमोच करू जाणे. मात्र या गाण्याने रेमोबरोबरच रेहमानसाठीही रसिकांच्या मनाची कवाडे खुली केली, यात शंका नाही.
    या दरम्यान रॉक सिंगर म्हणुन त्याचे अनेक अल्बम्स येत गेले आणि ते भारतीय उपखंडाबरोबरच युरोपातही लोकप्रिय होत गेले. दिग्दर्शक अनुराग कश्यकप दिग्दर्शित ‘बॉंबे वेलवेट‘ चित्रपटातून रेमो फर्नांडिस याने अभिनय केला आहे. मात्र हे सगळं काम रेमोने गोव्यात राहूनच करायचं असं ठरवलं होतं. गोवा या आपल्या जन्मभुमी बद्दल त्याच्या मनात असलेल्या प्रेमाचं ते प्रतिक आहे. ख्रिस्चन आणि हिंदू संस्कृतीचा मिलाप असलेल्या गोवा सिओलीम झागोर फेस्टीवल मध्ये रेमोच्या गाण्याशिवाय लोकांचे मन भरत नाही. शिवाय गोव्याचा गणेशोत्सव रेमोच्या बासरिशिवाय पुरा होत नाही. रेमोच्या घरीदेखील गणपतीबाप्पा येतात आणि दहा दिवसांचा उत्सव साजरा होतो. मुळची फ्रेंच असलेली त्याची पत्नी मिशेल आणि दोन मुले आजही गोव्यातील सिओलीम या खेड्यात असलेल्या त्यांच्या घरातच राहतात. मुले राज्य शासनाच्या शाळेत जातात. गोव्याच्या राजकारणात आपल्या वडिलांचा समाजवादाचा संदेश रेमो आपल्या गाण्याच्या माध्यमातून पसरवत असतो. कोकणी भाषेतील त्याची गाणी निवडणुकीदरम्यान प्रचारात वापरली जातात. गोव्याच्या उत्कर्षासाठी तेथील राजकारण्यांवर आणि राजकारणावर तो नेहमीच कडक शब्दात टिका करत असतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / गौरांग प्रभु

  • नाट्य आणि संगीतातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व फय्याज शेख

    सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी आणि संगीतप्रधान अशा विविध प्रकारच्या नाटकांतून आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९४८ रोजी झाला. गजल, ठुमरी, लावणी आणि नाट्यसंगीत असा गायनाचा मोठा आवाका असणाऱ्या मा.फय्याज यांनी गेली अनेक वर्षे आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचे पूर्ण नाव फय्याज इमाम शेख.

    फय्याज शेख या मूळच्या सोलापूरच्या. खरं तर कर्नाटकातल्या सूरपूरवरून फय्याज यांचं कुटूंब सोलापूरला आलं. एका साध्या मुस्लिम घरात त्या जन्मल्या, वाढल्या. फय्याज यांचे शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकिरण प्रशालेत झालं. खरं तर लहानपणी फय्याजना गायिका किंवा अभिनेत्री असं काही बनायचं नव्हतं. सर्वसामान्य मुलीप्रमाणे लग्न वगैरे करून संसार करायचा, असंच त्यांचं स्वप्न होतं. मात्र कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना बाराव्या-तेराव्या वर्षी त्यांना मेळ्यात-कलापथकात काम करावं लागलं. गाण्याची-नृत्याचीआवड तर होतीच. ती ओळखलेल्या आजीने राम जालीहाळ आणि पंचवाडकरबुवांची तालीम गाण्यासाठी लावली; तर नृत्यासाठी मास्टर हसन (कथ्थक) आणि कट्टीबंधू (भरतनाटयम) यांच्याकडे पाठवलं.

    नृत्य-गायनाचे हे संस्कार होत असतानाच आकाशवाणीवरील संगीतसभासारख्या कार्यक्रमांतून बडे गुलामअली खान, बेगम अख्तर यांच्यासारख्या गायकांची गायकी त्यांच्या कानावर पडत होती. त्यांचं आकाशवाणीवरचं गाणं फय्याज अजिबात चुकवत नसत. या गायकांपैकी कुणाची सोलापुरात मैफल असली की, फय्याज यांचा जीव तुटायचा, पण तिकीटाच्या भरमसाठ दरामुळे त्यांना या मैफली ऐकता यायच्या नाहीत. एकदा शाळेच्या मदतीसाठी सोलापूरच्या पानमळ हायस्कूलमध्ये झालेली बेगम अख्तर यांची मैफल मात्र दुरून का होईना, ऐकता आली. त्यांच्या जादूई सुरांनी फय्याज भारावून गेल्या. बडे गुलामअली खाँ आणि बेगम अख्तर यांच्या गायकीमुळे त्यांनी उत्तर हिंदुस्थानी गायकीचा ध्यास घेतला. ही गायकी आपल्याला कधी शिकता येईल का, असा प्रश्न वयाच्या बारा-तेराच्या वर्षीच त्या स्वत:लाच विचारू लागल्या.

    मॅट्रिकच्या वर्षी अभ्यासाला प्राधान्य देऊन त्यांनी कलाराधना थांबवली; पण त्यांचा मूळ ओढा होता तो कलेकडेच आणि याच क्षेत्रात आपण काम करणार आहोत, हे जणू त्यांनी लहानपणीच ठरवूनही टाकले होते. त्यामुळे आज ना उद्या सोलापुरातून बाहेर पडायचे आणि मुंबईला जायचे, याची खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. फय्याज १९६५ साली मुंबईत आल्या तेव्हा आपल्या कलेला मुंबईतच वाव मिळू शकेल, असा होरा तर होताच; पण त्याचबरोबर कुटुंबासाठी पैसे कमावण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. मात्र, काम करायचे ते मनाला पटले तरच, हा पीळ मात्र फार लहानपणापासूनच त्यांच्या अंगी होता. त्यामुळे पैसे कमवण्यासाठी कोणतेही काम करायची त्यांची तयारी नव्हती. मुंबईत दाखल झाल्यावर लवकरच त्यांना "गीत गायिले आसवांनी' या नाटकात पहिले काम मिळाले. त्यात फय्याज यांनी एका मुस्लिम मुलीचीच भूमिका रंगवली होती. खरं तर मुस्लिम धर्मातील एक मुलगी नाटकात काम करते, हे तेव्हा फारसं रुचणारं नव्हतं, पण फय्याज यांनी मागे एका मुलाखतीत बोलताना संगितलं होतं की, त्यांना प्रवाहाविरुद्ध जायला आवडतं.

    म्हणूनच अनेक मर्यादा असूनही त्या अभिनायाच्या क्षेत्रात उतरल्या. ‘गीत गायले आसवांनी’ मध्ये त्यांनी मंझरची भूमिका केली होती. आपल्यात पहिल्याच नाटकात त्यांनी आपल्या आवाजाची अशी काही जादू दाखवली की, प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सगळ्यांनीच त्यांचं कौतुक केलं. फय्याज यांचे हे पहिलेच नाटक खूप गाजले. प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि भावगर्भ आवाज यामुळे पहिल्याच नाटकात त्यांची विशेष दखल घेतली गेली. नाट्यसृष्टीत फय्याज यांचा प्रवेश झाला आणि पहिल्याच नाटकात हे वेगळे पाणी आहे, हेदेखील जणू त्यांच्या क्षेत्रातील मंडळींच्या लक्षात आले. त्याच वर्षीची मा.मोहन वाघ आणि मा.प्रभाकर पणशीकर यांनी एकत्रितपणे "मदनाची मंजिरी' या नाटकाची निर्मिती केली. या नाटकातील मंजिरीची भूमिका फय्याज यांनी साकारली आणि मग हा यशाचा सिलसिला सुरू झाला. "अश्रूंची झाली फुले' मधली नीलम आणि काही वर्षांनंतर त्याच नाटकातील सुमित्रा या दोन भूमिकाही दीदींनी साकारल्या.

    याशिवाय "वीज म्हणाली धरतीला'मधील जुलेखा ही त्यांची भूमिका तर खूपच गाजली. "तो मी नव्हेच', "मी मालक या देहाचा', "अंधार माझा सोबती', "कट्यार काळजात घुसली'ही "नाट्यसंपदे'ची आणि "पंडितराज जगन्नाथ', "मत्स्यगंधा', "संत गोरा कुंभार', "बावनखणी', "गुंतता हृदय हे', "सूर राहू दे' ही इतर संस्थांची नाटकेही त्यांनी आपल्या अभिनयाने आणि गायनाने गाजवली. त्या काळात "तो मी नव्हेच'चे हजार प्रयोग झाले होते. "अश्रूंची झाली फुले'चे ७०० ते ७५० प्रयोग झाले होते, तर "कट्यार'चे भारतभरात ५३५ प्रयोग झाले. "कट्यार' हे त्या काळातले अतिशय गाजलेले नाटक. पुरुषोत्तम दारव्हेकर, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. वसंतराव देशपांडे या तीन दिग्गजांच्या प्रतिभेतून साकारलेल्या या नाटकात संवाद आणि संगीताची बहार होती. नाटकाची सुरवातच भैरवीने होत असे. त्यावेळी हा एक नवा प्रयोग होता. "या नाटकाने आणि त्यातील दिग्गजांनी मला खूप काही शिकवले,' असे फय्याज सांगतात. ""गाणे किती गावे आणि कुठे संपवावे, हे अभिषेकीबुवांनी आम्हाला शिकवले. गाण्यातील भावना गळ्यात आणण्यासाठी ती भावना आठवायची आणि मग ते गळ्यातून व्यक्त करायचे, अशी बुवांची शिकवण होती. ती अंगीकारण्याचा मी कायमच जिवापाड प्रयत्न करायचे.''

    कोणतीही नवी गोष्ट शिकायची आणि ती स्वतःच्या शैलीत उतरवायची, अशी सवयच त्यांनी स्वतःला लावून घेतली. आज फय्याज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे जे वेगळेपण रसिकांना जाणवते ते बहुधा त्यामुळेच. "वेट अंटिल डार्क' या चित्रपटावर बेतलेल्या "अंधार माझा सोबती' या नाटकात ज्योती या अंध मुलीची भूमिका फय्याज यांनी केली होती. फय्याज यांच्या कारकिर्दीतील ही एक वेगळी भूमिका. अभिनेत्री म्हणून या भूमिकेने त्यांना एक वेगळा आयाम दिला. या भूमिकेत फय्याज यांनी अक्षरशः जीव ओतला. भूमिका जगणे म्हणजे काय ते फय्याज यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आंधळ्या मुलीचे नेमके बेअरिंग यावे, तिचे जगणे कळावे यासाठी दिग्दर्शक कांती मडिया त्यांना रोज अंधशाळेत घेऊन जात. मग तिथून परतल्यावर डोळ्यावर पट्टी बांधून अभिनय करवून घेत. ""हा सराव करत असताना मी कितीतरी वेळा धडपडले. मार लागला, गुडघे फुटले; पण त्यामुळेच ती भूमिका मी समरसून साकारू शकले,'' फय्याज सांगतात.

    "तो मी नव्हेच'मध्ये फय्याज यांनी साकारलेली चन्नक्का बघून पु. ल. देशपांडे यांनी त्यांना "वटवट'मध्ये भूमिका दिली. ""या नाटकात नाट्यसंगीत होते, लावणी होती आणि पुलंबरोबर एक द्वंद्वगीतही होते. पुलंमुळेही "पॉझ' कसे घ्यायचे, "पंचेस' कसे घ्यायचे, अशा अनेक नव्या गोष्टी शिकता आल्या, त्यांची भर मी माझ्या पुढच्या प्रत्येक कामामध्ये घालत राहिले,'' असे फय्याज नोंदवतात. अभिनय आणि संगीत या दोन्ही क्षेत्रांमध्ये वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी, दारव्हेकर मास्तर या उत्तुंग माणसांनी फय्याज यांना घडवले. वसंतराव त्यांना कौतुकाने आपली लाडकी शिष्याच म्हणत असत. इतरही अनेक दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. मात्र कोणाचेही थेट अनुकरण करण्याचा मोह त्यांना कधी झाला नाही.

    नाटयगीतांबरोबर गझल, ठुमरी, लावणी असा प्रवास केला. "निर्गुणाचा संग धरिला जो आवडी' किंवा "चार होत्या पक्षिणी त्या' किंवा माडगूळकरांची "जोगिया' ही फय्याज यांची गाणी इतर दिग्गज गायिकांइतकीच आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. अशोक रानडे यांच्याबरोबर बैठकीची लावणी साजरा करण्यात त्यांचा सहभाग होता. प्रख्यात गायिका बेगम अख्तर यांच्याकडून गाणं शिकण्याची संधी त्यांना मिळाली होती, परंतु त्यावेळी त्यांची नाटयकारकीर्द जोरात असल्याने त्यांना गाणं शिकता आलं नाही. परंतु त्यांनी बगम अख्तर यांना मनोमन आपला गुरू मानलं. त्यांच्याकडून गाणं शिकता न आल्याची रूखरूख त्यांना आजही वाटते. बेगम अख्तर यांच्याकडून गाणं शिकता आलं नाही, तरी ब-याच जणांकडून बरंच काही शिकल्याची कबुली त्या आजही न विसरता देतात.

    नृत्यकलाही जणू फय्याज यांच्या रक्तातच होती. वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या "संत तुकाराम' आणि "होनाजी बाळा' या दोन नाटकांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. या नाटकाचे नृत्यदिग्दर्शन गोपीकृष्ण यांनी केले होते. त्यात फय्याज यांच्या नृत्याला अर्थातच वाव होता. त्यांच्या अदाकारीवर गोपीकृष्ण यांची प्रतिक्रिया होती, "ही मुलगी एवढे चांगले नृत्य करू शकते, तर ते सोडून ती गाण्यातच का गुंतून पडली आहे?' प्रत्येक काम त्या इतके जीव ओतून करायच्या, की त्या क्षेत्रातील माणसाला वाटायचे की फय्याज यांनी याच क्षेत्राला वाहून घेतले पाहिजे. दादा कोंडकेंबरोबर त्यांनी ‘विच्छा माझी पूर्ण करा’चे अडीचशे प्रयोग केले, तर ‘मित्र’मध्ये डॉ. श्रीराम लागूंबरोबर भूमिका केली. मा.फय्याज यांनी "महानंदा', "पैंजण', "एक उनाड दिवस', "वजीर' अशा काही वेगळ्या चित्रपटांमधूनही अभिनय केला.

    ऋषिकेश मुखर्जींच्या "सबसे बडा सुख' या चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती. याशिवाय "धरतीपुत्र', "चॉंद का टुकडा' अशा चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. "शेष रात्री' या बंगाली चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर काम केले. इंग्रजीत स्क्रिप्ट लिहून घेऊन ते पाठ करून त्यांनी ही भूमिका साकारली होती. "बावर्ची', "प्रेमपर्बत', "आलाप', "रंगबिरंगी' या हिंदी चित्रपटांसाठी मा.फय्याज यांनी पार्श्वगायनही केले. फय्याज यांना बोरीवली नाटय परिषदेचा स्वररंगराज पुरस्कार, विष्णुदास भावे गौरव पदक, ‘चंद्रलेखा’तर्फे दिला जाणारा शारदाबाई वाघ पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार, माणूस पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

    श्री.संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    फय्याज यांनी केलेली नाटकं आणि त्यातील त्यांच्या भूमिका
    गीत गायिले आसवांनी (मंझर), अंधार माझा सोबती (ज्योती), अश्रूंची झाली फुले (नीलम, सुमित्रा), कटयार काळजात घुसली (झरीना), किनारा (जीजी), गुंतता हृदय हे (कल्याणी), संत गोरा कुंभार (संता), तो मी नव्हेच (चनक्का, प्रमिला परांजपे, सुनंदा दातार), पंडितराज जगन्नाथ (लवंगिका), पेइंग गेस्ट (सुनंदा), प्रीत राजहंसी (मेहजबीन), बावनखणी (चंद्रा), भटाला दिली ओसरी (नटी), मत्स्यगंधा (सत्यवती), मदनाची मंजिरी, मित्र (नर्स), मी मालक या देहाचा (सिस्टर), वटवट (अनेक भूमिका), वादळवारं (अम्मी), वीज म्हणाली धरतीला (जुलेखा), वेडयाचं घर उन्हात, संत तुकाराम (रंभा), सूर राहू दे, होनाजी बाळा (गुणवती).

  • ज्येष्ठ अभिनेत्री  शांता जोग

    वि.वा.शिरवाडकर यांच्या नटसम्राटमध्ये बेलवलकरांच्या भूमिकेत असलेले श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी आणि चंद्रकांत गोखले या चारही नटसम्राटांच्या बरोबर, पत्नी कावेरी हिची भूमिका शांता जोग यांनी साकारली होती. शांता जोग यांचे नाव टिळकनगर, चेंबूर (मुंबई) येथील एका रस्त्याला दिले गेले आहे.

  • लेखक विश्वास पाटील

    इतिहासाशी पूर्ण प्रामाणिक राहून व त्याचे नवे पैलू शोधून मांडणारा लेखक अशी त्यांची प्रतिमा आहे. सुभाषबाबूंच्या चरित्राचा एवढा व्यापकपणे शोध घेणारी कादंबरी खुद्द बंगालीतही नाही.

  • संवेदनशील कवी सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी’

    उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील मिजवां येथे एका जमीनदाराच्या घरी कैफी आझमी यांचा १४ जानेवारी १९१९ रोजी जन्म झाला. नातेवाईकांच्या हट्टामुळे धार्मिक शिक्षणासाठी लखनौच्या सुलतान-अल-मदरिस मध्ये दाखल व्हावे लागलेल्या कैफी यांना त्याच्या बंडखोर स्वभावामुळे तिथून हाकलून देण्यात आले. ते अत्यंत संवेदनशील होते. लहानपणापासूनच जो माणूस अलम दुनियेतील दु:खे संपवणा-यांच्या गटात सामील झाला, सर्वांच्या दु:खाला आपल्या गीतांमधून ज्याने शक्ती दिली आणि न्यायाच्या लढाईत ज्याची गाणी पुढच्या रांगेत असत, तो स्वत:चे दु:ख कधीही व्यक्त करीत नसे. मा.कैफी आझमी फार मोठे कवी होते. आपल्या भावाची गझल पूर्ण करण्यासाठी त्यांनी १२ व्या वर्षी जी गझल लिहिली ती अमर झाली. नंतर तीच गझल बेगम अख्तर यांनी गायिली. ‘इतना तो जिंदगी में किसी की खलल पडे, हंसने से हो सुकून न रोने से कल पडे’.

    कैफी आझमी यांचे नशीब म्हणजे त्यांना मित्र फारच चांगले मिळाले. मुंबईत इप्टाच्या दिवसांतील त्यांचे मित्र नंतर नावाजलेले कलावंत म्हणून ओळखले जाऊ लागले. इप्टामध्येच होमी भाभा, किशन चंदर, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, बलराज साहनी, मोहन सहगल, मुल्कराज आनंद, रोमेश थापर, शैलेंद्र, प्रेम धवन, इस्मत चुगताई, ए. के. हंगल, हेमंतकुमार, अदी मर्झबान, सलिल चौधरींसारख्या कम्युनिस्टांसोबत त्यांनी काम केले. ते एकदा असेच हैदराबादला गेले असताना ‘यूँही कोई मिल गया था चलते चलते’ असे काहीसे त्यांच्या बाबतीत घडले. ज्या मुलीच्या प्रेमात ते पडले होते ती मुलगी म्हणजेच उदारमतवादी याह्या खान यांची कन्या शौकत.

    शौकत यांनी कैफींना पसंत करण्याचे कारण म्हणजे कैफी विख्यात शायर होते. प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनचे संस्थापक सज्जाद जहीर यांच्या ड्रॉइंग रूममध्ये त्यांचे लग्न लागले होते. १९४६ मध्ये क्रांतिकारी विचारसरणीच्या शौकत यांनी आईच्या मर्जीविरुद्ध आपल्या पुरोगामी वडिलांसोबत औरंगाबादहून मुंबईला येऊन कैफी यांच्याशी लग्न केले होते. त्यांच्या निकाहच्या वेळी काझीने शौकतजींना विचारले, ‘‘तुला हे लग्न कबूल आहे?’’ तिने ‘हो’ म्हटले. पण पंचाईत पुढे आली. मुलगा शिया अन् मुलगी सुन्नी पंथाचा. असे लग्न असेल, तर तिथे दोन्ही काझी आवश्यक असतात. त्याकाळी ते परिस्थितीने गरीब होते. त्यांनी कसाबसा एक काझी आणला होता. दुसर्या् काझीला द्यायला पैसे नव्हते. तेव्हा काझीने मुलाचा धर्म विचारताच मित्राने सांगितले, ‘‘मुलगा हनफियुल (म्हणजे इमाम अबू हनाफी यांचे जे अनुयायी आहेत, त्यांच्या पंथाचा) आहे.’’ या युक्तीवादाच्या जोरावर लग्न पार पडले. लग्नानंतर कैफींनी ब-याच खस्ता खाल्ल्या. ते गावी गेले. तिथे त्यांच्या मुलाचा जन्म झाला. त्यांचा पहिला मुलगा ‘खय्याम’ एक वर्षाचा होऊन वारला. नंतर ते मुंबईला गेले.

    सुरुवातीलाही ते लखनऊला राहिले होते. धार्मिक शिक्षण घेण्यासाठी ते गेले होते; पण न्यायासाठी लढा सुरू केल्याने त्यांना हाकलून देण्यात आले. त्यांची मुलगी शबाना पोटात होती तेव्हा कम्युनिस्ट पक्षाने आदेश दिला की, गर्भपात करा. कैफी भूमिगत होते आणि पक्षाला मुलाबाळांच्या खर्चाची चिंता होती. शौकत कैफी आपल्या आईकडे हैदराबादला गेल्या. तेथेच मुलगी शबाना आझमी यांचा जन्म झाला. नंतर त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव अहमद ऊर्फ बाबा.

    शबाना आझमी यांच्या यशात कैफींचा फार मोठा वाटा आहे.
    शबाना आझमीने आपले वडील कैफी आझमी यांच्या कवितांना समर्पित एका वेबसाइटची निर्मिती केली आहे.
    http://www.azmikaifi.com
    या वेबसाइटवर कैफी आझमी यांनी लिहिलेली गाणी आणि कविता ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरुपात उपलब्ध आहेत. त्याशिवाय येथे व्हिडिओ, त्यांनी लिहिलेल्या कविता आणि गाण्यांबरोबरच त्यांच्या विषयीची माहितीदेखील पुरविण्यात आली आहे. विसाव्या शतकातील अनेक उत्कृष्ट चित्रपट कैफींच्या नावाने ओळखले जातात. ‘हीर रांझा’मध्ये चेतन आनंदने सर्व संवाद कवितेच्या रूपात सादर करण्याची इच्छा व्यक्त केली आणि कैफी यांनी ते संवाद लिहिले. प्रियाऐवजी कुणी दुसरी नायिका असती तर राजकुमारला हा चित्रपट कुठवर घेऊन गेला असता सांगता येत नाही. सर्वोत्कृष्ट युद्धपट ‘हकीकत’ हाही कैफींचा चित्रपट. ‘गर्म हवा’, ‘कागज के फूल’, ‘मंथन’, ‘कोहरा’, ‘सात हिंदुस्तानी’, ‘बावर्ची’, ‘पाकीजा’, ‘हंसते जख्म’, ‘अर्थ’, ‘रजिया सुलतान’, असे चित्रपट कैफींमुळे अजरामर झाले.

    कैफी यांनी जास्ती गाणी लिहीली नाहीत पण जी लिहीली ती काळजाचा ठाव घेणारी ठरली. त्यातला अर्थपूर्ण आशय रसिकांच्या मनाला अलगद स्पर्श करणारा होता. 'चलते-चलते यूँ ही कोई मिल गया था' (पाकिजा), 'वक्त ने किया क्या हसीं सितम' (कागज के फूल), 'तुम बिन जीवन कैसा जीवन'(बावर्ची), 'तुम जो मिल गए हो तो ये लगता है...' (हंसते जख्म), 'कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं' (अनुपमा), 'इक जुर्म करके हमने चाहा था मुस्कुराना' (शमा), 'जीत ही लेंगे बाजी हम तुम' (शोला और शबनम), 'ये नयन डरे डरे' (कोहरा), 'सारा मोरा कजरा चुराया तूने'(दो दिल), 'बहारों...मेरा जीवन भी सँवारो'(आखिरी खत), 'धीरे-धीरे मचल ए दिल-ए-बेकरार' (अनुपमा), 'या दिल की सुनो दुनिया वालों' (अनुपमा), 'मिलो न तुम तो हम घबराए' (हीर-रांझा), 'ये दुनिया ये महफिल' (हीर-रांझा), 'जरा सी आहट होती है तो दिल पूछता है' (हकीकत) ही त्यांची काही लोकप्रिय चित्रपट गीते होत... १९८० च्या दशकात कैफी आझमींनी 'अर्थ' चित्रपटासाठी अतिशय आशयसंपन्न गीते लिहिली 'झुकी झुकी सी नजर करार है की नही, दबा दबा सा सही, दिल में प्यार है की नही' 'कोई ये कैसे बतायें की वो तनहा क्यों है' आणि तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो'.

    भारत सरकार ने १९७४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सम्मानित केले होते. मा.कैफी आझमी यांचे निधन १० मे २००२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • रंगकर्मी नूतन पेंढारकर म्हणजेच अनंत दामले

    नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी नूतन पेंढारकर म्हणजेच अनंत दामले यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१५ रोजी झाला.

    अनंत दामले यांनी १९३० ते १९९० अशी जवळ-जवळ सहा दशके मराठी संगीत रंगभूमी आपल्या गायकीने व अभिनयाने ९२ नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका करीत समर्थपणे गाजविली. आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीच्या काळात अनंत दामले यांनी अनेक भूमिका वठविल्या, परंतु त्यांचा मुख्य लौकिक झाला तो नारदाच्या भूमिकेमुळे.

    'नारद म्हणजे दामलेबुवा आणि दामलेबुवा म्हणजे नारद' असं समीकरणच होऊन बसलं. रंगभूमीवर ३००० पेक्षा ज्यास्तवेळा नारदाची भूमिका साकारण्याचा उच्चांक अनंत दामले यांनी केलेला होता. १९३९ साली न.चि.केळकर अनंत दामले यांचे 'कृष्णार्जुन युद्ध' या नाटकाचा प्रयोग पहायला आले होते. त्यांना मनापासून असे वाटले की अनंत बापू पेंढारकरांसारखाच बोलतो व गातो. बापू पेंढारकर हे अनंत दामले यांचे गुरू होते.

    १९४० ला ऑपेरा हाऊसला 'सत्तेचे गुलाम' या नाटकाचा प्रयोग एका संस्थेच्या मदतीसाठी धर्मार्थ प्रयोग म्हणून लावला होता.अध्यक्ष म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर आले होते. या प्रयोगाच्या वेळी अ.ह.गद्रे यानी स्वा.सावरकरांच्या हस्ते अनंत दामले यांना "नूतन पेंढारकर"ही पदवी देऊ केली आणि सावरकर अनंत दामले यांच्या कानात हळूच म्हणालेही, "पदवी मिळविणे सोपे असते पण टिकविणे कठीण असते बर!". पुण्यातील 'भारत गायन समाज' हे अनंत दामले यांचे श्रद्धास्थान होते.

    अनंत दामले यांनी सत्तेचे गुलाम, कृष्णार्जुन युद्ध, संगीत सौभद्र, संगीत शारदा संगीत संशयकल्लोळ संगीत पंढरपूर रीती अशी प्रीतीची, संगीत मृच्छकटिक, सुवर्णतुला, शारदा अशा अनेक नाटकात कामे केली. अनंत दामले यांचे ९ ऑक्टोबर १९९९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील

    त्यांनी आत्तापर्यंतच्या २४ निवडणुकांपैकी २३ निवडणुका जिंकल्या आहेत. सध्या ते मोदी सरकार मध्ये रेल्वे राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

  • प्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान

    ‘लगे रहो मुन्नाभाई’ मधील ‘खटय़ाळ म्हातारा’ प्रधानांनी रंगविला. भूमिका छोटीशीच असली तरी ते आपली छाप पाडून गेले. ‘जब वुई मेट’मधील त्यांच्या ‘स्टेशन मास्तर’ही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण हिंदी चित्रपट आणि तेथील वातावरणात ते फारसे रमले नाहीत.

  • ज्येष्ठ समालोचक विष्णू विश्वनाथ करमरकर उर्फ वि.वि.करमरकर

    क्रीडा क्षेत्रातील दिग्गज पत्रकार व मराठीतील ज्येष्ठ समालोचक विष्णू विश्वनाथ करमरकर उर्फ वि.वि.करमरकर यांचा जन्म ११ ऑगस्ट १९३८ रोजी नाशिक येथे झाला.

    वि. वि.करमरकर यांना मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक मानले जाते. खेळासाठी झोकून काम करणाऱ्या पत्रकार करमरकरांनी क्रीडा कार्यकर्त्यांची भूमिकाही बजावली. जे मनात घेतले तसे व्हायलाच हवे, हा हट्ट त्यांनी कायम धरला. वागण्यात कोणतीही लवचीकता न ठेवता ते सतत सत्याचा ध्यास धरत राहिले.

    ‘वि.वि.क.’ या नावाने प्रचलित असलेले विष्णू विश्वनाथ करमरकर मुळचे नाशिकचे. वि. वि.करमरकर यांचे शालेय व माध्यमिक शिक्षण नाशिकच्या न्यू हायस्कूलमध्ये झाले. पदवी परीक्षेपर्यंत ते नाशिकच्याच हंसराड प्रागजी ठाकरशी महाविद्यालयात शिकले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम.ए. झाले. वि. वि. करमरकरांचे वडील डॉ. वि. अ. करमरकर हे निष्णात डॉक्टर होते.

    मुलानेही आपल्याच क्षेत्रात कार्यरत व्हावे अशी प्रत्येक पित्याची इच्छा असते. मात्र त्यांच्या वडिलांनी ‘विष्णू’चा बाळहट्ट पुरविला. वि. वि. करमरकरांनी निवडलेल्या क्षेत्रात त्यांना आडकाठी येऊ दिली नाही. शालेय जीवनात प्रा. ग. वि. अकोलकर, रि.पु. वैशंपायन व भट तर महाविद्यालयात प्रा. वसंत कानिटकर, प्रा. आचार्य, प्रा. सोहोनी, प्रा. राम बापट, मुंबई विद्यापीठात प्रा. दांतवाला, प्रा. कांता रणदिवे व प्रा. अप्पू नायर यांनी करमरकरांच्या आचार-विचारांना दिशा दिली. लोकशाही समाजवादी विचाराने क्रियाशील असलेल्या करमरकर यांनी डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, मधू लिमये यांना आपले आदर्श मानले.

    पत्रकारिता करताना द्वा. भ. कर्णिक, गोविंद तळवलकर, दि. वि. गोखले, साखळकर, पुरुषोत्तम महाले, चंद्रकांत ताम्हाणे, दिनू रणदिवे यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात. पत्रकारितेची सुरुवात नाशिकचे रसरंग साप्ताहिक आणि मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते एस. एम. जोशी यांनी सहकारी तत्त्वावर चालवलेल्या दैनिक ‘लोकमित्र’मधून केली.

    जून १९६२पासून ‘टाइम्स’ समूहाचे ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या क्रीडा विभागाचे प्रमुख व सहसंपादक या नात्याने खेळाच्या पानाचे यशस्वी संपादन केले. खेळाच्या बातम्या, समीक्षण व स्तंभलेखन याविषयी मराठी माणसाची अतृप्त, तहान-भूक भागवण्यास करमरकरांची क्रीडा पत्रकारिता पूरक ठरली आणि सर्व मराठी वृत्तपत्रांत क्रीडा पत्रकारांना मानाचे स्थान व हक्काचे पान उपलब्ध झाले.

    क्रिकेट कसोटी मालिका, क्रिकेट विश्वचषक, ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यांची दैनंदिन क्रीडा समीक्षा करणारे वि. वि. करमरकर यांचे स्तंभलेखन वाचकांनी उचलून धरले. आजही वाचकांना त्यांच्या लेखणीची ओढ कायम आहे. खेळाचे हौशी स्वरूप झपाटय़ाने बदलत गेले.

    पाश्चात्त्य दुनियेइतके अफाट प्रमाणात नसले तरीही भारतीय क्रीडा क्षेत्रात साधारणत: मध्यम स्वरूपाच्या उद्योग समूहाचे (इंडस्ट्री) रूप येत आहे. त्याचा वेध करमरकरांनी सर्वप्रथम घेतला. औद्योगिक समूहात अटळ असलेली स्टेडियम्स, क्रीडा संकुले यांची उभारणी-त्यावरील बेफाम खर्च, त्यातील भ्रष्टाचार यावर त्यांनी १९९३पासून झगझगीत प्रकाश टाकला.

    १९८२च्या दिल्लीमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेच्या बांधकामात सुमारे १००पर्यंत अनामिक मजूर मृत्युमुखी पडले, त्याची कैफियत त्यांनी ‘रक्तरंजित’मधून मांडली. दक्षिण कोरिआ, क्युबा, केनिया आदी छोटय़ा देशांच्या तुलनेतील भारतीय खेळाडूंचे मागासलेपण या गोष्टी ते नेहमी मांडत राहिले. खेळ हा विषय कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही, ही व्यथा ते व्यक्त करतात.

    खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ यांच्या सहभागाशिवाय खेळाचे पान कसदार होणार नाही. याची जाणीव करमरकरांना पहिल्यापासून होती. कितीतरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, संघटक, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ यांच्या जिवंत अनुभवाचे त्यांनी शब्दांकन स्वत: केले.

    देशी व ऑलिंपिक खेळाच्या प्रचार-प्रसार आणि विकासासाठी त्यांनी पदरमोड करून कोकणात खेड्यापाड्यांत भटकंती केली. खेळांच्या स्पर्धाचे आयोजन एवढाच उद्देश न ठेवता खेळाडूंची बौद्धिक, मानसिक व शारीरिक जडणघडण व्हावी, त्यागी-निष्ठावान खेळाडू घडावेत, याचा अखंड ध्यास घेऊन 'महाराष्ट्र क्रीडा विकास संस्थे'ची त्यांनी निर्मिती केली. त्या संस्थेमार्फत ते सतत दहा वर्षे रत्ना गिरी, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांत देशी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करीत राहिले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी हा वसा अविरत चालू ठेवला.

    बडय़ा क्रीडा स्पर्धांदरम्यान, विशेष पुरवण्यांनी क्रीडा पान सतत सजवले. आकाशवाणी, दूरदर्शन, विविध टी. व्ही. चॅनल्सवरील करमरकर यांनी केलेली सामन्यांची धावती समालोचने व समीक्षणे खूप गाजली. क्रिकेटप्रमाणे कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस आदी खेळांच्या मराठीतील धावत्या समालोचनाने मराठी समीक्षेतील उणीव समर्थपणे दूर केली. निवृत्तीनंतर अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लेखमाला लिहिल्या आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • लेखिका कविता महाजन यांचा

    कविता महाजन यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात खुप काम केले होते. आदिवासी समाजजीवनाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आदिवासी समाज व महिला यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले.